Friday 3 December 2021

माझे दूरस्थ विद्यार्थी - अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                                       माझे दूरस्थ विद्यार्थी  -  अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                      रामदास म्हात्रे यांच्यावरील सदर लेख १२ जानेवारी २००६ मध्ये लिहिलेला आहे.केसरी वर्तमानपत्रात आमच्या टीमवी च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' हे सदर लिहित होते.हे विद्यार्थी सध्या काय करतात ते  शोधून त्यांच्या पुढील यशाबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहित होते.प्रत्येक अपंग दिनाला मला रामदास म्हात्रे त्यांची स्वप्ने आठवायची.त्यांचा माझ्याकडे असलेला फोन नंबर लागत नव्हता त्यांचा पत्ता शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण मिळाला नाही.अचानक मला ते फेसबुकवर ते भेटले.मी त्यांचा फोन नंबर मागितला त्यांच्याशी बोलून लिहायचे होते.पण त्यांचा फोन मिळालाच नाही.काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण शारदा वाडकर हिच्याशी बोलताना करोनामध्ये किती लोकांचे नाहक बळी गेले हे सांगताना रामदास म्हत्रेचे नाव घेतले गेले. माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक होते. त्यांचा पत्ता  सापडला तोही असा.शारदा त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होती.आज अपंग दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.                        

                            
                                        अपंगांचे खंबीर नेते
                         पुण्यातील कुमठेकर रोडवरील शिक्षण शास्त्र संस्थेचा हॉल खच्चून भरला होता ग.प्र.प्रधान, नारायण सुर्वे, शरदचंद्र गोखले अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर स्थानापन्नवर भेटले. झाली होती. निमित्त होते रामदास म्हात्रे यांच्या 'थोट्या' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे. रामदास म्हात्रे आमचे बी.ए.चे विद्यार्थी म्हणून मी आवर्जून गेले होते.
                              कोकणातल्या खेड्यातील एका गरीब शेतमजुराच्या मुलाची शिक्षणासाठीची धडपड अचंबित करणारी होती. जगण्याच्या प्रत्येक क्षणाला समाजाने अव्हेरले, नाकारले तरी सर्वातुन वर उठून रामदास म्हात्रेनी समाजालाच भरभरून दिले होते. 
                                 पेण जवळील मळवली गावातील शेतमजुराच्या घरात जन्मलेले रामदास हे पाचवे अपत्य. ते पाच वर्षाचे असतानाच पोलिओंनी अपंगत्व आले आणि नंतर सगळं जगणंच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे झाले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे आपण धांडोरे पिटतो पण शिक्षणाच्या जबरदस्त ओढीने खुरडत घराचा उंबरठा ओलांडून जाणाऱ्या रामदासला अपंग म्हणून शिक्षकांनी प्रवेशच नाकारला. वडिलांना काही झाल्यास मी जबाबदारी घेईन असे लिहून द्यावे लागले. पाच मैलावरच्या शाळेत रामदास माकडासारखा सारख्या उड्या मारत जाई. पावसाळ्यात हात चिखलाने कोपरापर्यंत  बरबटलेले असत. साप अंगावरून जात. शाळे बरोबर शेतात ढेकळे फोडणे, लावणी करणे, गुराखी पण करणे अशी कामेही रामदास करी. यातूनही रामदास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होई. पुढे पुण्याला  शिक्षणासाठी जायचे खुळ डोक्यात शिरले. अशोक विद्यालयात धडपड करून प्रवेश मिळविला. तिथे राहायची मोफत सोय होती. जेवायला मिलो ची भाकरी मिळायची कोकणात दारिद्र्य असलं तरी रान मेवा भरपूर असे. पळून जावं वाटे पण शिक्षणाच्या ओढीने त्यावर मात केली. पुढे ज्ञानेश्वर वस्तीगृहात प्रवेश मिळाला. जीपीओ ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत खुरडत, तेथून न्यू इंग्लिश स्कूलला बसने जावे लागे. अपंग रामदाससाठी हे खूप कष्टाचे होते. एसएससीला बोरमाळ विकून आई ने पैसे भरले दहावीत ६५  टक्के गुण मिळाले. एस.पी.त सायन्सला प्रवेश घेतला. शिक्षणाच्या वाटेवर वेगळीच समस्या निर्माण झाली.भावाचे निधन झाले. गावाकडून पैसे येणे बंद झाले. त्याचा संसार हि उघड्यावर पडला. शिक्षण सोडून अर्थार्जन करावे लागले.
                                            रामदास ने निर्वाहासाठी आपली कामे सुरू केली.पुढे समाज कल्याण खात्यात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. येथेही अपंग म्हणून घेण्यास खळखळ होती. या काळात सेवा दलाशी संपर्क आला. एस. एम. जोशी, भाई वैद्य यांचा सहवास लाभला व्यक्तिमत्त्व विकसित झाले१९८१ मध्ये जागृत अपंग संघटनेची स्थापना केली. अपंग जागृतीसाठी लेखन, कृती सर्व मार्ग हाताळले.पु.ग. वैद्यांनी आपटे प्रशालेत संस्थेसाठी मोफत जागा दिली. अपंग जागृती करणे तसे सोपे नव्हते अपंगांचे पत्ते काढून घरी जायचे घरच्यांना पटवायचे स्त्रियांसाठी तर हे अधिक कठीण होते पण नोकरी सांभाळून झपाटल्यासारखे रामदास ने काम केले फलित म्हणून १९८१ मध्ये राज्य पुरस्कार १९८७  मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.
                              अपंगांच्या हक्कासाठी लढायचे तर कायद्याचे शिक्षण हवे होते त्यासाठी पदवी नव्हती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पदवी मिळाली आणि लगेच शाहू कॉलेजमध्ये सकाळच्या शाखेत प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज दिवसा नोकरी, संध्याकाळी संस्थेचे काम अशी कसरत सुरू झाली अपंगांचे विवाह, नोकऱ्या, प्रवेश, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करणे, न्यूनगंड नाहीसा करणे, समाजात अपंगांच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास निर्माण करणे हे सगळे म्हणजे कठीण खडकात बी पेरणे होते. कोकणातल्या निसर्गाने खडतरतेवर मात करावयाची दिलेले शिक्षण कामी आले. दुर्दम्य इच्छाशक्ती होती आज संस्थेच्या रोपट्याचा वृक्षासारखा विस्तार झाला आहे.४० अपंगांची निवासाची सोय आहे. संगणक, शिवणकाम असे स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण दिले जाते. रामदास ने अपंगांतून नेतृत्वाची पुढची फळी तयार केली आहे. संस्थेचा  डोलारा सांभाळताना  महाराष्ट्र अपंग विकलांग मंच, महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना यांच्या कार्याध्यक्ष पदांची धुरा ही आता रामदास म्हात्रे यांच्याकडे आहे. हे सर्व करताना अपंगांचे सोबती, अपंगाचे हक्क, सनद हे हँडबुक, गंगाजळी कादंबरी आणि भरपूर स्फुट लेखन म्हात्रे यांनी केले आहे.
 आज ते ऑफिस सुपरिटेंडेंट या पोस्टवर आहेत. धडधाकटांनाही लाजवेल असे  त्यांचे कर्तृत्व पाहून त्यांच्या मित्रांच्या अव्यंग असलेल्या मावशीनीच त्यांच्याशी विवाह केला. त्या जिल्हापरिषदेच्या शिक्षिका आहेत. दोन मुलं उत्तम शाळेत शिकत आहेत स्वतःची कोणतीही गोष्ट बायको-मुलांना करावी लागू नये असा त्यांचा कटाक्ष असतो. पत्नीची शनिवारी सकाळची शाळा म्हणून घरातील स्वयंपाका पासून सर्व कामे करतात पण तरी अपंगांच्या बाबतीत समाजाच्या मानसिकतेबद्दल त्यांना खंत वाटते. ते म्हणतात कार्पोरेशन,  एटीएम सेंटर अशा अनेक ठिकाणी जाताना बिल्डिंगच्या रचनेत अपंगांचा विचार न केल्याने अडचणी येतात. इतरांवर अवलंबून राहावे लागते. रामदास मात्रे यांच्या जीवन कार्यातून धडधाकट माणसांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे कार्य आहे. अपंगा बद्दल च्या त्यांच्या कार्यासाठी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
 

Sunday 17 October 2021

रिक्षावाले अरुण शिंदे - घरचा माणूस

                                              रिक्षावाले अरुण शिंदे  -  घरचा माणूस

                                 पुणेरी रिक्षा वाल्यांच्या बाबत नेहमी तक्रारीचा सूर असतो.आम्हाला मात्र नेहमी चांगलेच अनुभव आले.त्यातही अरुण शिंदे हे आमच्यासाठी घरचा माणूस आहेत.आम्ही दोघे जेष्ठ नागरिक असल्याने त्यातही माझ्या पतिना पार्किन्सन्स सारखा आजार असल्याने कोणीतरी मदतीला लागते.कोठेही जायचे असले तर आम्ही अरुण शिंदेना फोन करतो.जवळच्या  ATM मध्ये, किराणा माल, फळवाला,पिठाची गिरणी असे कोठेही अगदी छोट्या अंतरासाठी ते येतात. ते असले कि बिनधास्त वाटते काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी थांबत करतो.आम्हाला यासाठी वेळ लागतो पण त्यांची कधी कुरकुर नसते.उलट वस्तू. रिक्षात आणून ठेवणे, दळण गिरणीत ठेवणे अशी कामे ते न सांगता करतात.

रिक्षात वृध्द माणसे आहेत याचे त्याना भान असते.त्यात मला कमरेचा त्रास आहे ही जाणीव असल्याने ते अत्यंत सुरक्षित रिक्षा चालवतात.

 दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतरही ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळेनुसार हक्काने बोलावतो.एकदा सारसबागेत जायचे होते. त्यांनी बाजूच्या गेटने कमीत कमी पायर्या चढाव्या लागतील अशा ठिकाणा पर्यंत रिक्षा नेली. वयस्क माणसे पाहून बागेतही कोणी हरकत घेतली नाही.आमचे छान गणेश दर्शन झाले.जवळच एक शिव मंदिर आहे तेथेही बदल म्हणून त्यांना घेऊन जातो.घाई करू नका व्यवस्थित दर्शन घ्या असे सांगतात.

स्टेशन,विमानतळ अशा ठिकाणी पहाटे जायचे असेल तर अरुण शिंदेना रिक्षा सांगितली की अलार्मही न लावता बीनधास्त झोपता येते.

त्याना बोलावले की ते पाच मिनिटे आधीच येऊन थांबतात.बेल वाजवून मी आलो आहे. सावकाश आवरा काही घाई नाही.असे सांगतात..लगबगीने सामान घ्यायला येतात. कधी चहा घ्यायला थांबा म्हटले कि मात्र घाई करतात.कधीच थांबत नाहीत.मृदू आवाजात नम्रतेने बोलतात.

आमच्या साठी अडीनडीला उपयोगी पडणारा,आधार देणारा हा घरचा माणूस आहे.

 




Sunday 12 September 2021

आनंदी वृद्धत्व - ७

               या ग्रुपवर एका लेखाद्वारे एकट्या पुरुषांनी राहण्याविषयी चर्चा झाली होती. मला आमचे कलबागकाका आठवले आणि त्यांच्याबद्दल लिहावेसे वाटले ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे वाटले.                         

                                                        आनंदी वृद्धत्व - ७

                ' परंतु यासम हा' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे आमचे कलबाग काका होते. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान.उर्जा स्त्रोत,तन,मन धनानी  पार्किन्सन्स मित्रमंडळाशी  एकरूप झालेले कलबागकाका म्हणजे जेष्ठ शुभार्थी नारायण कलबाग.असा माणूस होणे नाही.आज ते आपल्यात नाहीत पण ९६ वर्षे ते आनंदात जगले.पर्किन्सन्सही त्यांच्या आनंदाला रोखू शकला नाही.यांचे ३० सप्टेंबर २०२० ला ९६ व्या वर्षी निधन झाले.तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.तरीही ते सेन्चुरी नक्की करतील असे वाटत होते.त्यांच्याशी अजून किती तरी विषयावर बोलायचे होते सर्व राहून गेले.माझा शेवटचा फोन lock down च्या काळात झाला.

                   .त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका  एकटेच राहात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत  नाही तर इतरांनाही मदत करत.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला होता. त्यानुसार दिनचर्या आखली.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली.या सपोर्ट सिस्टीममध्ये मुंबईचा भाचा,कॅनडाची भाची,मसाजवाला,कामवाली,तिची मुलगी,काही काळाकरता येणारा केअरटेकर,पीवायसीच्या कॅन्टीन मध्ये गप्पा मारायला भेटणारे मित्र.असे अनेकजण होते.आमचा सपोर्टग्रुपही त्यात असावा.सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.कधी गोकर्ण,कारवार असे गाडी करून जात.आळंदी देहूला जात.

                 ते भांडारकररोडला राहात.सकाळी  रिक्षाने वैशालीत जाऊन ब्रेकफास्ट करत. ते त्यांना पचनाला त्रासदायक वाटायला लागले.नंतर यात त्यांनी बदल केला.मुंबईच्या भाच्याकडे ते आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा ब्रेकफास्ट ठरवायचे.यात सूप sandwich,इ.हलका आहार असायचा. भाचा स्वीगीवरून तो बुक करायचा. 

                          Lock down काळात त्यांच्याकडे येणारा मसाजवाला सकाळी थोड्या वेळासाठी आणि रात्री येणारा केअर टेकर येत असेल का अशी काळजी मला वाटत होती..म्हणून चौकशीसाठी सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.

             मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची भारतात आलेली होती.ती काही दिवस राहिली आणि आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो.हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र नव्हते,त्यांचा टीव्हीही बिघडलेला.दुरुस्तीसाठी कोणाला बोलावणे शक्य नव्हते.याबाबत त्याना काही खंत नव्हती.ते सांगत होते माझी कॅनडाची भाची दोन वेळा भारतातल्या सर्व हकीकतीच्या बातम्या वाचून दाखवते.त्यांच्याकडे सर्व गोष्टीची त्यांच्या पद्धतिची सोल्युशन असायची.

                              त्यांच्या फोनच्या डीपीवर आमच्या मंडळाच्या सहलीच्या वेळचा वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असतानाचा फोटो होता. ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईत असले तरी मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येत.सह्लीना येत.
                          मंडळात ते सामील झाले तेंव्हा बहुदा त्यांची  ८५ वर्षे उलटून गेली होती.मध्यंतरी आता हयात नसलेल्या जुन्या शुभार्थीच्या घरी जाऊन भेटी द्यायचे ठरले कलबागांची पत्नी पेशंट होती.शेखर बर्वे त्यांच्या घरी गेले तर कलबागांची भेट झाली.ते म्हणाले मला आता पार्किन्सन्स झाला आहे मला मंडळात सामील करून घ्या.ते सामील झाले आणि आमच्यातलेच झाले.सभेच्यावेळी फार बोलता येत नसे पण सहलीत गप्पा होत. त्यांचे नवनवीन पैलू तुकड्यातुकड्याने समजत गेले.त्यांच्या तरुणपणातील मुंबईच्या साहित्यिक,सांस्कृतिक, वैद्यकीय,शैक्षणिक वर्तुळात त्यांचा संचार होता.त्या काळाचा ते चालताबोलता इतिहास होते.आचार्य अत्रे,विजय तेंडुलकर,वसंत देसाई अशी बुजुर्ग मंडळी त्यांच्या उठण्या बसण्यातील होती.वसंत देसाई यांच्या कार्यक्रमात ते सहभाग ही घेत असत.
                          .त्यांनी न्यूरॉलॉजिकल आजारावरची वृत्तपत्रातील, मासिकातील कात्रणे काढून ठेवली होती.ती वेगवेगळ्या आजारानुसार लावून ठेवली होती.ती त्याना आमच्याकडे सुपूर्द करायची होती.त्यांच्याकडे येणाऱ्या केअरटेकरच्या मुलीची शिक्षणासह सर्व जबाबदारी त्यांनी घेतली होती.ते दीडदोन तास सलग बोलायचे.दमतील म्हणून त्याना थांबावावे लागायचे.
                         माझे नाव त्याना आठवायचे नाही मग ते डॉक्टर म्हणायचे.२०१९ सालच्या सहलीत दुपारी कोणाला आराम करायचा असेल तर वेळ ठेवला होता.कलबाग म्हणाले डॉक्टर जरा बसा बोलायचे आहे.मला त्यांनी विश्रांती घ्यावी असे वाटत होते.पण गप्पा हीच त्यांची विश्रांती असावी.बसमधून येताना त्याना छोटी छोटी गावे दिसली.आय.एम,ए.चे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे त्यांचे Family Doctor. त्यांच्याशी बोलतो हे फॉर्म हाऊस छान आहे येथे डॉक्टर्सची मिटिंग घेऊन आजूबाजूच्या गावातील वैद्यकीय प्रश्नांचा  आढावा घ्यावा.ते प्रश्न सोडवावे असा त्यांचा विचार होता.त्यासाठी फार्महाउसचा फोन नंबरही त्यांनी घेतला.आम्ही बसमधून येताना गमती जमती करत होतो पण हा अनेक आजार असलेला ९५ वर्षाचा तरुण भोवतालच्या खेड्यांचा विचार करत होता.त्यांची यासाठी पैसे खर्च करायची तयारी होती. त्यांच्याविषयीच्या आदरानी मी नतमस्तक झाले.असे क्षण त्यांनी वेळोवेळी दिले.नंतर त्यांच्या  डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली.ते बरेच दिवस भाच्याकडे मुंबईला होते.हा विषय मागे पडला असावा.
                          सोमवार ११ डिसेंबर ला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती  कलबागकाकांचा  फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले..ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान  कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
                              त्यावर्षी आम्ही एप्रिलमधील जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात कलबाग काकांचे इशस्तवन ठेवायचे ठरवले. आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर (केअरटेकर) असा इशस्त्वनात सहभाग असायचा.आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असल्याने.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते. सकाळी त्यांचा फोन आला.'मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?'त्याप्रमाणे ते आलेही.
                                  ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले'.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला  तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील' असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते   त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.प्रमुख पाहुणे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
                       त्यांच्याकडे सांगण्याजोगे  खूप होते..कोणीतरी त्यांच्याशी  बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.त्यांच्या दिनचर्येचा व्हिडिओ केंला पाहिजे असे आम्हाला  वाटत होते.पण सर्व राहूनच गेले याची फारफार हळहळ वाटते.
.आपल्या परिवारातील वडिलधारे माणूस गेल्याची भावना आम्हा सर्वांच्याच मनात आहे.कलबागकाका आमच्यासाठी तुम्ही कायम प्रेरणा स्थान राहाल.
                      
            

                
                      
 


                    

Wednesday 14 July 2021

आनंदी वृद्धत्व - ६

                                                               आनंदी वृद्धत्व - ६

                                             आत्तापर्यंत आमचे वृद्धत्व आनंददायी होण्यासाठी रोलमॉडेल असणाऱ्या  व्यक्तींच्याबद्दल  लिहिले यावेळी मात्र एका व्यक्तीबद्दल नाही तर जोडप्याबद्दल लिहिणार आहे.या दोघांचा एकमेकाव्यतीरिक्त विचारच करता येत नाही इतके त्यांच्यात अद्वैत आहे.हे जोडपे म्हणजे हास्य्योगी विठ्ठल काटे सर आणि सुमनताई  काटे.काटे सर वय वर्षे ८४ आणि सुमनताई वय वर्षे ७५. केवळ या वयामुळेच त्यांना वृद्ध म्हणायचे.नाहीतर कोणत्याच अंगाने ते वृद्ध नाहीत.गेली २३ वर्षे ते चैतन्य हास्ययोग परिवाराची धुरा समर्थथपणे सांभाळत आहेत..ही सांभाळतानाचा त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे.

                                  आमची रोजची सुप्रभात  विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांच्या टाळ्या आणि प्रार्थनेने होते.खणखणीत आवाजात आकडे मोजत आणि माहिती सांगत २० मिनिटे व्यायाम प्रकार,यात डोळ्यापासून पाउलापर्यंत सर्व अवयवांना व्यायम होईल अशी रचना आहे.त्यानंतर प्राणायाम आणि हास्य असे चालते.प्राणायाम झाला की मकरंद टिल्लू हास्य घेतात.प्रमोद ढेपे वाढदिवस साजरे करतात.ही सर्व रचना अनेक रथी मह्रारथीनी पाहून मान्यकेली आहे.काही सुधारणा सुचविल्या.त्याचे कौतुक केले.यात कै. डॉ. ह..वी.सरदेसाई, कै.डॉ.नितीन उनकुले,डॉ.शरद मुतालिक, डॉ संचेती, डॉ.हिमांशू वझे अशी दिग्गज मंडळी आहेत.

                           करोना पूर्व काळात १८० बागामधून विविध सहकारी हे सर्व घेत.अधून मधुन प्रत्येक बागेत दोघांची फेरी असे.त्यात्या  बागेत यांच्या फेरीने चैतन्य निर्माण होई.यासाठी  दोघे पहाटे पाचला उठत.अंघोळ,पूजा आवरून स्कूटरवर  लांबलांबच्या ठिकाणी जात.फक्त शस्त्रक्रिया,आजारपण यामुळे या अविरत चाललेल्या कामात खंड पडे.सगळ्या हास्यक्लबनी मिळून फोर व्हीलर भेट द्यायचा प्रस्ताव मांडला होता पण त्यांनी तो धुडकावून लावला.काही घेण्यापेक्षा देणेच ते पसंत करतात. मध्यंतरी त्यांच्या पंच्याहत्तरीला त्याना पंच्याहत्तर हजाराची थैली देण्यात आली.त्यात २५००० ची भर घालून  त्यांनी हास्य्क्लबलाच ती दिली.आमच्या समोरच्या बागेत २००७ साली हास्यक्लब सुरु झाला आणि आम्ही या दाम्पत्याच्या संपर्कात आलो.प्रथम दर्शनी प्रभाव पडावा अशी ही जोडी.बघता बघता आमच्या जवळची झाली.आमच्या बरोबर आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळ असतेच ते आमच्या या परिवारातलेही झाले.केंव्हाही बोलावले तरी आमच्यासाठी हजर झाले.

                          करोना नंतर बागा बंद झाल्या आणि एकदम हे सर्व ठप्प झाले.पण स्वस्थ बसतील ते काटे दाम्पत्य कसले? टिल्लू यांनी ओंनलाईन  हास्यक्लब घेण्याची कल्पना सुचवली आणि ती एकदम हिट झाली.आज महराष्ट्रातील विविध भागातून, भारत आणि परदेशातीलही २००० च्या वर सदस्य आहेत.झूमवर जास्तीत जास्त १००० सहभागी  मर्यादा आहे.ती संपल्यावर युट्युबवर सोय करण्यात आली.सहभागी करून घेणे थांबवले नाही.सेवादलातील सानेगुरुरुजींच्या आंतरभारती,विश्वभारतीची संकल्पना येथे प्रत्यक्षात आली आहे 'भारत जोडो विश्व जोडो' हे हास्यक्लबचे  ब्रीदवाक्य असते.सर्व जाती धर्माच्या, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक स्तरातल्या सदस्यामुळे सामजिक समरसतेचे हे उत्तम उदाहरण आहे. सेवादलाचे संस्कार असले तरी येथे सर्व राजकीय पक्षाचे सहभागी आहेत आणि विविध पक्षांचे  नेते या कार्याला मदत करत असतात. माणसे जोडण्याच्या या जोडप्याच्या गुणामुळे हे शक्य होते. हे मोफत चालते.या त्यांच्या कामाबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे.यावर  स्वतंत्र लेख लीहावा लागेल.आनंदी वृद्धत्व हा विषय असल्याने हात आवरता घेते.महत्वाचे म्हणजे या कार्याची सुरुवातच काटे सरांच्या निवृत्तीनंतर झाली.

                          गव्हर्मेंट पॉलीटेकनिक मधून निवृत्त झाले.घरातल्या जबाबदाऱ्या आधीच संपल्या होत्या. काम करून शिक्षण केल्याने सतत कामात राहायची सवय निवृत्तीनंतर रिकामपण खायला उठले.त्यातच स्वत;ची चूक नसताना एका जवळच्या व्यक्तीच्या चुकीने ते आर्थिक संकटात सापडले.त्याना नैराश्याने घेरले.त्याचा शरीरावर परिणाम होऊ लागला.वजन कमी होत होते.सर्व तपासण्या नॉर्मल.तरी तब्येतीची कुरकुर चालू होती.कुटुंबीय चिंतेत पडले. डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांच्याकडे गेले. त्यांनी लिहून दिले. रोज सकाळी बागेत जाणे आणि व्यायाम करणे.जवळच्या संभाजी उद्यानात जाऊन सेवादलात शिकलेले व्यायाम सुरु केले. हळूहळू इतर लोक सामील होऊ लागले.नैराश्य कधी पळून गेले समजलेच नाही.यात प्राणायाम ,हास्य यांचाही समावेश झाला. लोकाना फायदा होत होता लोक वाढू लागले.शिक्षक तयार झाले.वेगवेगळ्या बागात शाखा सुरु झाल्या..  

                       घरातील सर्व त्यांचे डिप्रेशन गेले म्हणून खुश होते. सुमनताईनी तर त्यांची अकाउंटंटची चांगली नोकरी पन्नासितच सोडली आणि जेथे राघव तेथे सीता म्हणत त्यांच्या कार्यात स्वत:ला झोकून घेतले.तसे त्यांचे एकत्र कुटुंब आहे.त्याना दोन मुले.एक मुलगा एअरफोर्से मध्ये त्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुली प्रथमपासूनच बदलीच्या ठिकाणी.दुसरा साफ्टवेअर इंजिनिअर.पत्नी शिक्षिका आणि दोन मुली,काटे सरांची एक अविवाहित बहीण सिंधुताई त्यांच्याबरोबर राहतात.त्या ९१वर्षाच्या आहेत.काटे दाम्पत्यासाठी  त्या रोल मॉडेल आहेत.मुख्याध्यपिका होत्या..सामजिक कामात सहभागी असतात.यासाठी कोरोना पूर्व काळात दुपारी तीन साडे तीनला बाहेर पडायच्या त्या रात्री आठ साडेआठला घरी यायच्या.अजूनही स्वत:ची कामे स्वत: करतात. पहाटे उठून व्यायाम करतात.काटे सरांचे आईवडील ९७/९८ वर्षाचे होऊन गेले.सरांची मावशीही त्यांच्याकडे राहायची.ती ९७ वर्षांची होऊन गेली.सुमन ताईंची याबद्दल तक्रार नसते.नोकरी सांभाळून सर्वांचे करताना त्यांना त्रास झाल असेल असे आपल्याला वाटते.त्या म्हणतात सहवासातून प्रेम निर्माण होते.आता सुनेशीही त्या छान जमवून घेतात.इतर कामाला बाई असली तरी स्वयंपाक घरीच असतो.दोघी मिळून परस्पर संगनमताने त्या स्वयंपाक  करतात.आपल्याला सामजिक काम सुनेच्या सहकार्यामुळे करता येते हे अभिमानाने त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.मुलांनीही बाबांना सांगितले आहे आतापर्यंत खूप केलेत आता घराची जबाबदारी माझी.तुम्हाला जे आवडेल ते करा.काटे सरांनी तन मन, धनाने हास्यक्लबच्या कार्याला वाहून घेतले. एकुणात काटे सरांच्या.तीन पिढ्या गुण्यागोविन्दानी राहतात. 

                       त्यांचे घर मोट्ठे आहे.पण कोरोनामुळे सगळे घरी आणि दोन नाती,सून मुलगा यांचे ऑनलाईन काम चालू असते.प्रत्येकजण एकेका खोलीत. दर बुधवारी हास्यक्लबची ऑनलाईन मिटिंग तसेच विविध कार्यक्रमही ऑनलाईन असतात.सर्वाना यासाठी एकमेकांशी जुळवून घ्यावेच लागते.सुमनताईनी निवृत्तीनंतर संगीताच्या विशारद पर्यंत परीक्षा दिल्या.आता घरात रोजच्या गरजेच्या गोष्टी विविध खोल्यातून ऑनलाईन चालू असल्याने रियाज करणे बंद असे सुमनताईनी परिस्थितीनुसार ठरवले आहे.हे एक तडजोडीचे उदाहरण सांगितले.अशा अनेक तडजोडी प्रत्येकाला कराव्याच लागत असणार तेंव्हाच आनंदाने एकत्र राहता येते.आता तर हे विश्वची यांचे घर झाले आहे.त्यांचे कुटुंब विस्तारीत झाले आहे.

                      या विस्तारित कुटुंबाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.आनंद लुटला जातो..कोरोन पूर्वी देश परदेश अशा  अनेक सहली झाल्या.अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. दिवाळीत ११००० किलो मिठाई वाटण्यात येते. शहीद जवान कुटुंबियांना मदत केली जाते.भूकंप,पूर अशी  कोठेही आपत्ती आली की हे धाऊन जातात तेथे जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते.अशा खूप गोष्टी आहेत.

                  ऑनलाईन हास्यक्लब मध्ये अनेकजण आपले मनोगत सांगतात काटे दाम्पत्याबाद्द्ल कृतज्ञता व्यक्त करतात..करोनामुळे,लॉकडाऊनमुळे जगणे विसरलेल्या नैराश्यात गेलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढले आहे.हे ते श्वासाईतक्या सहजतेने करतात.उलट या सर्वाना बदलताना पाहून आमचीच उर्जा वाढते, ही देवाणघेवाण आहे असे त्यांचे म्हणणे असते.कोणतेही काम आनंदाने करायचे ही या दोघांची वृत्ती आहे.अनेक पुरस्कार या त्यांच्या कार्यामुळे त्यांच्याकडे चालून आले आहेत.पुणे महानगरपालिकेचा जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष नागरी सत्कार करण्यात आला जनसेवा फौंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तशी यादी मोठ्ठी आहे हजारोंच्या मनातील अबाधित स्थान हाही मौलिक पुरस्कार आहेच.

                आपले कार्य असेच बहरो.यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही मनापासून प्रार्थना.

                   

                        

                     

                          

                              

                        

Wednesday 23 June 2021

आनंदी वृद्धत्व - ५

                                               आनंदी वृद्धत्व  - ५

                                            आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांना आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडावे असे सांगण्यासाठी मी फोन केला.विषय कोणता या बाबत विचारले तर म्हणाले, सध्या माझा करोनावर अभ्यास चालू आहे.त्यांचा करोना या आजाराचे स्वरूप,करोनाच्या चाचण्या,करोनामुळे होत असलेले सामाजिक मानसिक परिणाम असा करोना वर विविधांगी अभ्यास आकडेवारीसह झाला होता.एकीकडे या विषयाकडे तटस्थपणे पाहात असताना करोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या दोन घटना वाचून ते व्यथित झाले होते आणि यासाठी जेष्ठांसाठी स्वमदत गट तयार करावा का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.करोनाविषयी अजिबात वाचायचे नाही.बातम्या पहायच्या नाहीत. प्राथमिक माहिती आहे तेवढी बस झाली असा विचार करणाऱ्या मला हे भारीच वाटले.अर्थात मी हा विषय नाकारला त्यांच्या दुसऱ्या एका प्रयोगाबद्दल बोलायला सांगितले. २००० मध्ये त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हाचाच उत्साह आज ८७ व्या वर्षी तब्येतीच्या थोड्या तक्रारी असूनही पाहून मी अवाकच झाले.त्यांच्या सहवासात आल्यापासून असे आवाक होण्याचे क्षण अनेक आले.

                          
पटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.तेंव्हा त्यांनी सत्तरी ओलांडली होती.त्यावेळीही  आणि आताही त्याना वृद्ध म्हणावेसे वाटत नाही.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..
 १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.

'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्‍या आमच्या मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्‍या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का डीटीपी शिकून घ्यायचं नाही? पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना आपल शिकण होईल  हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.

स्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर  सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके  विनामूल्य देण याबाबत ते ठाम आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार  विरोध नव्हता.दुसर्‍याबाबत 'रुका हुवा फैसला' सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची बाजू मांडणार्‍या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले. तेही सायकलवर.

 या वयातही उन असो, पाउस  असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार असतो.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता १००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर पेशंटला नेमक कस  जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत. शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न .झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते  वजन काट्याच ओझ आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा (केअर टेकर)यांनाच जास्त असते.

कोरोनानंतर मात्र ते घराच्या बाहेर अजिबात पडले नाहीत.त्यामुळेच कदाचित घरात इतरांना कोरोना भेटून गेला पण पटवर्धन यांच्याकडे मात्र फिरकला नाही.त्यांच्या मुलांनी म्हटले गाडीतून थोडे फिरवून आणू का? तर त्यांनी नकार दिला एकदा बाहेर जायचे नाही हे स्वीकारले आहे.तर आता मला त्याचे काही वाटत नाही. असे त्यांचे म्हणणे.एक मुलगी पुण्यात तर एक तळेगावला करोना काळात त्यांच्या भेटीही फोनवरच असतात.असलेल्या परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार ते नेहमीच करत आले.आम्ही प्रथम त्यांच्या घरी गेलो तेंव्हा ते आणि पत्नी दोघेच होते.मुलगा जपानला होता,नंतर मुलगा जपानहून आला त्याचे लग्न झाले.त्यांच्याबरोबर एकत्रित राहत. पत्नीच्या निधनानंतर मुलगा सून नातवंड असे राहतात.पण या प्रत्येक परिस्थितीत ते विना तक्रार आनंदातच असतात.आता करोना काळात त्यांनी बाहेर तंबू ठोकला आहे आणि मधुन मधून  वाचन,आराम तेथेच करतात, आता पाउसात ते तंबूचे काय करणार आणि आणि कोणता वेगळा मार्ग शोधणार याची मला उत्सुकता आहे.सध्या सायकलला आराम मिळाला आहे.पटवर्धन मात्र आराम करणाऱ्यातले नाहीतच.

 ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आत्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते  फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी( पार्किन्सन्स डिसीज ) पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही रटाळ न होता संवाद साधणार्‍या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.

लिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात घेता इतकी वर्षे  त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप मोठ्ठा वाटा  आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या छोट्या काचेच्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे असत.वहिनी बरोबर असल्या  की त्यांच्या  औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ कस नेमक !

त्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्‍याचवेळा आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच राहतात.

पटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न असतात, शंका असतात काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.

एका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.मनोरंजनाच्या कार्यक्रमात Ramp Walk असो की सैराट वरील गाण्यावर नाचणे असो पटवर्धन यांच्या उत्स्फूर्त सहभागाने इतरांना ही स्फूर्ती मिळते..प्रत्येक सहलीत वहिनी बरोबर असायच्या.एक वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी  कोणीतरी वहिनींच्या मदतीला येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.

पार्किन्सन्स मित्रमंडळाला २०१४ मध्ये अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी म्हणजे मुलगा आणि दोन विवाहित मुली यांनी हॉस्पिटलचा सर्व  चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले होते.तुम्हाला इच्छा होईल तेंव्हा या असे सांगितले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना सन्मान चिन्ह  दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर त्यांचाही वाटा होताच ना?काही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा शुभार्थींच्या यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते. हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना?का नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.
त्यामुळे वाटलं पटवर्धन येतील?पटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून हेच गेले.

सध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम  स्वांतसुखाय आहे. स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून बदलली.आता बाहेर जाता येत नसल्याने हे काम थांबले पण त्याची खंत न  करता त्यांचा कोरोनावर अभ्यास सुरु झाला.  

माझ्या पाहण्यात ते एकदाच आजारी पडले त्यावेळी खोकला आणि अशक्त पण खूप होता आवाज खोल गेला होता.मुलगा सून घरी असल्याने त्यांचा आधार होता.तो घेण्यात त्यांनी अनमान केले नाही.या काळात त्यांनी आपल्या आजाराची कारणे शोधली ठराविक सिझन मध्ये हे होते हे त्यांच्या लक्षात आले त्यानुसार त्याकाळात ते आधीपासूनच तयार असतात एकदा हे होणार हे माहित आहे तर स्वीकार करून त्यातून मार्ग काढायचा हे त्यांनी ठरवून टाकले.सारखे पडून राहावे लागायचे तर त्यांनी श्रवणपचार शोधून स्वत:वर प्रयोग केले.पीडीमुळे हालचालीवर मर्यादा आलेल्याना बेडरिडन पेशंटना,वृद्धत्वामुळे विकलांग झालेल्यांना उपयोगी होईल असा एम पी ३ प्लेअर घेऊन  मराठी हिंदी भरपूर गाणी लोड केली.वापरायला सोपा असा हा प्लेअर तीन महिने शुभार्थिनी वापरायचा आणि उपयोगी वाटला तर ठेऊन घ्यायचा अशा तत्वावर प्रयोग केला स्वत:च्या पदरचे पैसे घातले.फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे का झाले याचा शोध घेणारा लेख लिहिला.मग काही शुभार्थीना ओळखीच्या स्नेही मंडळीना ऐका आणि आनंद लुटा म्हणत भेट दिला.असे आमचे स्वत:ही आनंदी राहणारे आनंद लुटणारे तरुण शुभंकर.

शुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे  पटवर्धन मला तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म जगणारे अध्यात्मिक.









Sunday 18 April 2021

आमच्या बागेतील मधुमालती

                                                          आमच्या बागेतील मधुमालती

                    आमच्या बागेतील मधुमालती फुललीय पांढऱ्या,गुलाबी, लाल रंगाच्या मिक्स फुलांनी लगडलेले गुछ्य मन मोहून घेतात.फुललेली मधुमालती पाहिली की मला सुंठणकर पती, पत्नींची आठवण येते.त्याचे असे झाले.        

                    माझ्या सासर्‍यांच्याजवळ धार्मिक,ज्योतिषविषयक,संस्कृत साहित्य इत्यादी पुस्तकांचा संग्रह होता ही पुस्तके पाहताना अचानक' लोकमित्र'चा अंक हातात आला.अंक १९३६चा होता आणि संपादक म्हणून नाव होते द.गो.सडेकर यांचे.मागे लिहिले होते 'हे पुस्तक खानापूर जिल्हा बेळगाव येथे द.गो.सडेकर यांनी आपल्या धनंजय प्रेसमध्ये छापिले.व घनं.६४३ येथे लोकमित्र ऑफिसात प्रसिद्ध केले' हा पत्ता तर आमच्या घराच्या शेजारचा होता.माझे कुतूहल चाळवले.मी शोध सुरु केला त्यांच्या वंशजाकडे माहिती मिळत नव्हती. याचा शोध घेताना मी अनेक ठिकाणी गेले.त्यातील एक नाव बा.रं.सुंठणकर

                      बा.रं. सुंठणकरांचे १९व्या शतकातील महाराष्ट्रावर पुस्तक छापून आले होते..बा.रं. सुंठणकर बेळगावचे.आमच्या पिढीच्या सर्वांसाठी आदरणीय नाव. आणि इतिहासाचे अभ्यासक.त्याना निश्चित माहित असेल असे वाटून त्यांच्याकडे गेले होते पौड रोडला प्रशांत सोसायटीत ते राहत ही सोसायटी माझ्या भावाच्या घराच्या अगदीच जवळ होती.माझ्या भाबजयीला घेऊन मी त्यांच्याकडे गेले.त्यांच्याकडून लोकमित्र हे चांगले मासिक होते आणि आर्थिक चणचणीमुळे बंद झाले एवढीच माहिती मिळाली.बेळगावच्या खूप गप्पा झाल्या..  

                  निघताना त्यांच्या बागेत छान मधुमालती फुलली होती.त्याबद्दल बोलताच त्यांच्या पत्नी म्हणाल्या एक रोप आहे तुम्हाला हवे असेल तर काढून देते.त्यांनी महत्प्रयासाने ते रोप काढून दिले.मी लगेच ते बागेत लावले. त्यावेळी  बंगला नवीनच झाला होता..इकडून तिकडून रोपे,कटिंग  गोळा करणे चालू असायचे.आता बागेत काम करणे झेपत नाही.बऱ्याच ठिकाणी फरशी घातली.जुनी जमवलेली अनेक झाडे आता शिल्लक नाहीत,

               मधुमालती मात्र टिकून आहे.आमचे शेजारी ती वेल सारखी तोडतात.आता ती गेली असे वाटते पण ती पुन्हा येते.ती फुलते.मला हसतमुख प्रसन्न चेहऱ्याच्या सुंठणकर पतीपात्नीची आठवण येते,त्यावेळी ते वयस्क होते पण गेटपर्यंत सोडायला आले आणि प्रेमाने ही वेल दिली.ते प्रेमच तिला जगवत असावे.ते दोघेही आता नाहीत आम्हीही पुढेमागे नसू पण मधुमालती मत्र फुलतच राहील.



                  

Wednesday 24 March 2021

अंधांची पांढरी काठी - दिलीप शेलवंटे

                                                अंधांची पांढरी काठी - दिलीप शेलवंटे

                   हल्ली बहुसंख्य तरुणांच्या फेसबुक भिंतीवर कुटुंबीय,मित्रमंडळीसह हॉटेल,सहली,अमुक सिनेमा पाहत अहो,अमुक एका एअरपोर्टवर आहोत असे फोटो झळकत असतात. आमचा दिलीप याला अपवाद आहे. त्याच्याबरोबरच्या फोटोत  कायम अंध,अंधांचे उपक्रम असतात.तन,मन धनानी त्यांनी या कामाला वाहून घेतले आहे.यात मी काही तरी मोट्ठे करतो आहे असा आव नाही.त्याच्या जगण्याचाच तो भाग झाला आहे. 

शेलवंटे कुटुंब आमच्या सोसायटीत राहणारे.दिलीप त्यांचे शेंडेफळ.कोरेगाव पार्क जवळच्या जे.एन.पेटीट शाळेत दिलीप जायचा जवळच असणाऱ्या अंधशाळेतील मुलांबद्दल कुतूहल, करुणा वाटायची.लहानपणी रुजलेले हे बीज सुप्तावस्थेतच राहिले.शाळा पुढे ईन्जिनिअरिंगचे शिक्षण अशी जगण्याची धडपड चालू होती.स्वत:चा बिझिनेस उभारायचे स्वप्न होते.सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. पहिल्या  नोकरीचा  पगार होता ८०० रुपये.त्यातले १०० रुपये रास्तापेठेतील पुना ब्लाइंड असोशिएशनला दिले.दर महिन्याच्या पगारातून पैसे देणे सुरु झाले.अंध प्रेमाच्या बीजाला छोटा अंकुर फुटला होता.व्यवसायाचे स्वप्न उराशी बाळगत सात वर्षे नोकरी केली मग घरातच छोटा उद्योग सुरु केला.व्याप वाढला तशी नवीन जागा घेतली इंडस्ट्रीअल कोटिंगच्या व्यवसायाला सचोटी,गुणवत्ता आणि प्रयोगातून विविधता,छोट्या गोष्टीपासून मोठ्या मशिनारीपर्यंत उत्पादन सुरु झाले.एकाचे तीन कारखाने झाले.स्थैर्य आले.दरम्यान विवाह,मुले संसारही बहरत होता.स्वत:पुरते न पाह्ता आई, वडील त्यांची मित्रमंडळी ,वृद्धांच्या संस्था यांच्यासाठी काहीना काही करणे चालू होते.पत्नीलाही हे सर्व करावे लागेल याची विवाहापूर्वीच कल्पना दिलेली होती.यातच आयुष्यातील एका प्रसंगाने  अंध प्रेमाच्या अंकुर हळूहळू फुलू लागला.

महर्षी नगर रस्त्याने दिलीप येत होता आणि एक अंध फुटपाथवर पडला.स्कूटर थांबउन दिलीपने विचारपूस केली त्याला जेथे जायचे होते तेथे सोडतो असे सांगितले.त्याला नेहरू स्टेडियमला जायचे होते.खरे तर दिलीपला उलट्या बाजूला जायचे होते पण त्यांनी मी त्या बाजुलाच चाललोय सांगत त्याला लिफ्ट दिली.तिथल्या एका गाळ्यात काही  अंध मुले राहतात.तिथून कॉलेजला जातात ,नोकरीला जातात.त्या सर्व मुलांशी दिलीपचे मैत्री झाली.त्या मुलाना पार्टी देणे,त्यांच्याबरोबर वाढदिवस करणे,त्यांची फी भरणे चालू झाले.संगणक बिघडला दिलीपने घेऊन दिला अशी गुंतवणूक वाढतच गेली आणि दृष्टीहिनांसाठी विविध पातळ्यांवर काम चालू झाले. त्यातील एक क्रिकेट.

ही मुले फर्ग्युसन कॉलेज मैदानावर क्रिकेट खेळत.त्यांना मदत चालू झाली .एकदा मॅचसाठी प्रायोजक हवा होता.प्रायोजक मिळणे मुश्कील होते.अंधांचे क्रिकेट लोकांना माहीतच नव्हते.दिलीप त्याना न समजू देता स्वत:च प्रायोजक झाला. .अंधान्चेही क्रिकेट असते,परस्परात, इंटरनॅशनल मॅचेस असतात,वर्ल्डकप असतो हे त्याला जगाला दाखवून द्यायचे होते अंधांचे क्रिकेट लाइमलाईटमध्ये आणायचे होते.यासाठी तो झपाटल्यासारखे काम करू लागला.

एकदा राजस्थान टीमची रेल्वे लेट आली रात्री साडेतीनला यांनी स्टेशन वर जाऊन सर्वाना आणले आणि हॉटेलवर पोचवले.अनेक मॅचचे काम तो यशस्वीरीत्या पार पाडत होता त्याचे फलित म्हणून वर्ल्डकप मॅचची जबाबदारी इंडियन क्रिकेट कमिटीने दिलीपवर सोपवली.तो इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोशिएशनच्या कमिटीवरही आहे.श्रीलंका विरुद्ध भारत ही मॅच नेहरू स्टेडियमवर. व्हायची होती.यासाठी त्याने जीवाचे रान केले.यात स्वत:ची टामटूम नव्हती तर त्याच्या अंध मित्रांचे कर्तुत्व त्याला जगाला दाखवायचे होते.त्याना आनंद मिळवून द्यायचा होता.आयपीएचच्या दर्जाची मॅच करून दाखवायची होती.जबाबदारी मोठ्ठी होती. दुसर्या देशातील टीम असल्याने भारतात आल्यापासून परत जाईपर्यंत त्याना  पोलीस प्रोटेक्शन द्यायचे होते.४२००० रूपयांचे कोटेशन आले..त्याने वरपर्यंत खटपटी करून ही मॅच कमर्शियल नाही तर सामाजिक कार्य आहे हे पटवून दिले.आणि काम मोफत झाले.

तो ३०/४० शाळात गेला. मुलांना मोफत मॅच बघायला पाठवा जोरदार टाळ्या देणे हे काम करायचे.अंधांना प्रोत्साहन  द्यायचे.त्याप्रमाणे भरपूर मुले आली.जागोजागी बॅनर लावले खूप पब्लीसीटी केली.सजावट केली.स्वत:च्या खिशातून तीन लाख खर्च केले.नेहरू स्टेडीयम पूर्ण भरले होते.मिशन यशस्वी झाले. नंतर कलकत्त्यात मॅच होती भारतातर्फे खेळणारा दिलीपचा पुण्यातील मित्र अमोल करचेचा फोन आला.सर तुमचे श्रीलंकेच्या कॅप्टनने कौतुक केले. त्यांनी Food, hospitality,ground सर्व अंगाने पुणे क्रिकेट उत्तम होते याचे श्रेय दिलीप शेलवंटे सराना जाते असे म्हटले.आता मुलींचा संघही तयार झाला आहे.विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही.या अंधांच्या टीमने आत्तापर्यंत चार वर्ल्डकप जिंकले पण त्याचे फारसे कौतुक होत नाही याचे त्याला वाईट वाटते.

अंधांनी भिक मागू नये स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठीही दिलीपची धडपड असते.बरीच मुले विमाननगर येथील निवांत मध्ये संगणक शिकून येतात त्यांना बँक,कंपन्यात नोकऱ्या मिळतात.उत्तम आणि ज्ञानेश्वर बँकेत काम करतात.उत्तमने नोकरी करून स्वत:चा flat घेतला आहे.काही ऑर्केस्ट्रात काम करतात.मुलांना विमाननगर लांब पडते म्हणू आता दिलीप स्वारगेटला क्लास सुरु करणार आहे.अंधांनी अंधांसाठी चालवलेल्या National Federation for  Blind चाही तो सल्लागार आहे या कमिटीत तो आणि गोखालेताई दोघेच डोळस बाकी सर्व अंध आहेत.स्वारगेटला ऑफिस आहे त्याची बरीच जबाबदारी तो घेतो.

ज्यांना शिक्षणाची आवड नाही त्यांना बीज भांडवल देवून उद्योगाला लावले जाते.ही मुले आता हात पसरत नाहीत तर नाना पाटेकर यांच्या संस्थेला इतर संस्थाना देणगी देतात.हे सांगताना दिलीपचा चेहरा आनंदाने फुललेला असतो.

त्यांची भावनिक गरजही महत्वाची आहे आणि दिलीप त्याला पुरेपूर न्याय देतो आपल्या मुलांचे करत नसेल तेवढे कोडकौतुक तो या मित्रांचे करतो.स्वत:चा वाढदिवस तो या मुलांबरोबर करतो.त्याना  घरी बोलावतो.त्याची पत्नी आणि मुलीही आनंदानी त्यांची बडदास्त ठेवतात.

अमोल करचे याला सचिन तेंडूलकरला स्पर्श करायचा होता त्याची ही इच्छा दिलीपने पूर्ण कली आणि सचिननेही संवेदनशीलता दाखवली.याना बराच वेळ दिला.त्याला विचारले की तू काय खेळतोस.अमोलने गोलंदाज.असल्याचे सांगितले.सचिनच्या स्पर्शाबरोबर अमोलला सचिनशी खेळताही आले.सचिनसह सर्वांसाठी हा क्षण भारावून टाकणारा होता.

या मित्रांकडून मलाच शिकायला मिळते असे दिलीप म्हणतो.जमीर शेखला दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायचे होते.दिलीपने त्याला नेले.हा मुस्लीम असून गणपतीला कसा असे आश्चर्य व्यक्त केले.तो म्हणाला,'अंधांना सर्व देव सारखेच तुम्ही डोळस लोकांनी देव वाटले.

दिलीप ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरत होता या मुलानाही भरायचा होता ती मुले म्हणाली आमचे डोळे सोडले तर इतर अवयव उपयोगी येतीलच की.या मुलांबद्दल बोलताना दिलीपला किती सांगू किती नको असे होते. तो भावनिक होतो.आपले मनही दिलीपाविषयीच्या कौतुकाने भरून जाते.तोम्हणतो मला आयुष्यभरयांची पांढरी काठी बनायचे आहे.

अंधांची पांढरी काठी त्यांना फक्त रस्ता दाखवत असते. दिलीप मात्र त्या पलीकडे जाऊन त्यांच्यासाठी पिलर आहे.त्यांच्या आर्थिक अडचणी,समस्या,सुख,दु:ख,आनंद,प्रेमाचा,आधाराचा  स्पर्श,प्रेरणा या सर्वांसाठी त्यांच्या सदैव बरोबर असलेली ही पांढरी काठी आहे. 

दिलीप तुझा आम्हाला अभिमान वाटतो.तुझ्या वाढदिवसासाठी,भविष्यातील योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा! आणि आशीर्वाद.


              

Saturday 27 February 2021

अमराठी तरीही मराठी

                                                  अमराठी तरीही मराठी

मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्‍या मराठीतून पुस्तके लिहिणार्‍या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण नंतर अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्‍या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्‍या आशा रेवणकर. आमच्या आजुबाजूचे कितीतरी सिन्धी,मारवाडी,तेलगु भाषिक. पण या सर्वात मला अधिक भावली ती सुरेखाच. तिचीच ही पूर्वप्रकाशित कहाणी !

"१९७७मध्ये मी सातवी पास झाले. त्याच वर्षी मला सासरी यावे लागले. माझी शाळा सुट्ली. माझ्याच द्प्तरात पुस्तकांच्या ऐवजी कपडे कोंबून कृष्णा नदी ओलांडून मी महाराष्ट्रात आले. त्या दिवसापासून सातवीचा शिक्का कपाळावर ठळक दिसू लागला. डोळे पूर्ण उघडून जगाकडे बघताच येइना. मोठे शहर, शिकलेले लोक बघून पार भेदरुन गेले. शिकण्याची इच्छा मनाच्या पार तळाशी पड्ली. परत शिकण्याची संधी मिळेल असे वाटलेच नव्हते. परंतु टिमविच्या मुक्त विद्या केन्द्रामुळे माझे मध्येच तुटलेले स्वप्न साकार झाले."

पदवीधर झाल्यावर सुरेखाच भलं मोठ पत्र आल होत. त्यातील हा मजकूर. तिच्या पत्रात पदवीधर झाल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. टिळक विद्यापीठाबद्दलची अपरंपार कृतज्ञता,तिच्या घडणीतील विद्यापीठाचा वाटा याबद्दल तिने भरभरुन लिहिल होत. विवाहामुळे शिक्षण तुटलेल्या व मुक्त विद्या केन्द्रामुळे पदवीधर झालेल्या गृहिणीची कथा थोड्याफार फरकाने अशीच असते. परंतु सुरेखाच्या यशाला वेगळा रंग आहे. खर तर तिचे बी.ए..साठी प्रवेश घेणं एक धाडसच म्हणावयास हरकत नाही.

सुरेखा पाटील अथणीची. मातृभाषा कानडी. मराठीची दूरुनही ओळख नव्हती. हिंदी विषय शाळेत असल्याने देवनागरी लिपी मात्र येत होती. ती हुषार होती शाळेत पहिली यायची. परंतु खेळत्या वयात म्हणजे अगदी पहिलीतच लग्न झाल.सातवीत असताना सासरी आली. नव-याची बदली महाबळेश्वरला झालेली. आजूबाजूच्या काम करणार्‍या मुलींबरोबर लंगडी छप्पापाणी खेळताना त्यांची मराठी मोडकी तोडकी येऊ लागली. ग्रामीण भागातून नागरी जीवनात आलेल्या सुरेखाला त्याच जवळच्या वाटायच्या.चवदाव्या वर्षीच मुल झाल.

नंतर मुल,संसार्,नवर्‍याच्या बद्ल्या यात वर्ष निघून गेली. मुले इंग्रजी माध्यमात होती.त्याना एक विषय मराठी असल्याने थोडथोड वाचन सुरु झाल. कानडी तर नजरेलाही पडत नव्हत. घरात सकाळ यायचा तो वाचायचा. चांदोबासारखी लहान मुलांची मासिकही वाचायची. थोड्थोड मराठी समजायला लागल.बोलताही येऊ लागल.
आणि एके दिवशी मुलीनी बातमी आणली. घरबसल्या बी.ए.करता येइल. पूर्व शिक्षणाची अट नाही. पण अभ्यासक्रम मराठीतून. सुरेखानी घाबरत घाबरत फोन केला. ज्या व्यक्तीने फोन घेतला त्या व्यक्तीचे बोलणे इतके आश्वासक होते की सुरेखाला वाटले प्रवेश घ्यावा. तिने बी.ए. प्रवेश चाचणी परीक्षा दिली. आश्चर्य म्हणजे तिला १००पैकी ६८ गुण मिळाले. सुरेखानी प्रथम वर्षास प्रवेश घेतला.

प्रवेशाबरोबर मिळालेली मराठीतून असलेली दहा पुस्तके पाहिली आणि धडकीच भरली. पण मनाच्या तळाशी असलेली इच्छा आता नजरेच्या टप्प्यात होती. जिद्द होती कष्ट करायची तयारी होती. सुरेखाची तपश्चर्या सुरु झाली.

घरची काम उरकली की रोज रात्री तीन् तीन वाजेपर्यंत वाचन, लिहिण सुरु झाल. पुन्हापुन्हा वाचायच लिहायच. मुलांकडून न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. मराठीतल्या सनावळ्यांचे आकडे मुलाना विचारुन कानडीत लिहायचे. आणि पाठ करायचे असा क्रम चालू झाला. लिहून लिहून हात दुखला तरी लिहिणे थांबायचे नाही. मग हात तट्ट सुजायचा.काम करेनासा व्हायचा. मग तिला रडायला यायचे. हात दुखतो म्हणून नाही तर काम थांबले म्हणून.
सर्व संपर्कसत्राना ती हजर राहायची. जिवाचा कान करून प्राध्यापकांचा शब्द न शब्द ऐकायचा.आत्मसात करायचा. त्यावर चिंतन करायचे.हुषार सुरेखाच्या मेंदूवर ते कोरले जायचे

सुरेखा सांगते परीक्षेवेळी हातवार्‍यासकट. प्राध्यापकांचे व्याख्यान डोळ्यासमोर येई. आणि ती झट्पट पेपर लिहित असे.

प्रथम वर्षात अनेक गृहिणींचा एखादा विषय राहतो; सुरेख मात्र सर्व विषयात उत्तीर्ण झाली. कानडी मातृभाषा असूनही मराठी आत्मसात करणे,पहिल्या झट्क्यात सर्व विषयात पास होणे हे वाखाणण्याजोगे होते. या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला.या पूर्वीही काही अमराठी विद्यार्थ्यानी बी.ए. केले होते. परंतु त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. नोकरी व्यवसायामुळे बाह्य जगाशी मराठीशी संपर्क होता. अभ्यासक्रम मराठीतून असला आणि सर्व लिखित साहित्य मराठीतून असले तरी पेपर इंग्रजीमध्ये लिहिण्याची परवानगी होती. त्यामुळे लिखाणासाठी इंग्रजीचा आधार होता. आणि मुख्य म्हणजे बी.ए.होणे ही त्यांची व्यावसायिक गरज होती. परंतु सुरेखाच्या बाबतीत यापैकी काहीच नव्हते. सातवी उत्तीर्ण मराठी व्यक्तीही प्रवेश घेताना दहावेळा विचार करतात. पण सुरेखानी मात्र जिद्दीने प्रथम वर्ष पूर्ण केले.

पहिल्याच वर्षात तिला स्मिता देसाई,महाशब्दे वाणी, परदेशी अशा मैत्रिणी मिळाल्या. स्मिता त्यांची लीडर. सुरेखाला प्रोत्साहन देण्यात तिचा मोठा वाटा होता. या सर्वानी एकत्र येऊन अभ्यास तर केलाच शिवाय दिवसभर विद्यापीठात रेंगाळणे कँटीनमध्ये गप्पाटप्पा करणे, निवासी संपर्कसत्रात विद्यापीठाच्या उपक्रमात सह्भागी होणे; असे करत दूरशिक्षणात राहुनही महाविद्यालयीन जीवनाचा आनंदही लुटला. या सर्व मैत्रिणींच्या सहवासात भित्री सुरेखा बोलायला लागली. चक्क शुद्ध मराठीतून बोलायला लागली. अभ्यासाची खडतर तपश्चर्याही चालूच होती. दुसरे तिसरे वर्षही ती पहिल्या खेपेतच द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. तृतीय वर्षात संज्ञापन कौशल्य या विषयात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित वैचारीक निबंध असत. विद्यार्थ्याना नेहमीच हा विषय कठीण वाटतो. सुरेखाला मात्र यात प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. तिच्या सख्यानी एकत्र येऊन तिचा सत्कार केला. आम्हा प्राध्यापकानाही बोलावल होत. एरवी आम्ही असे विद्यार्थ्यांकडे जात नसू. पण आम्हा सर्वानाच या मैत्रीणींच्या भावनांचा आदर करावासा वाटला.

आज सुरेखा डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहू शकते. स्वतःकडे स्वतःच्या कुटुंबाकडेही ती आता अधिक सुजाण नजरेने पाहू शकत आहे.

सुरेखानी सानेगुरुजींच्या आंतरभारतीचे एक सुरेख उदाहरण दिले आहे. तिच्याकडे पाहिले कि वाटते "कष्टाने मराठी शिकणार्‍या सुरेखाला अमराठी म्हणायचे की मराठी मातृभाषा असूनही मराठी माध्यमाची लाज वाटणार्‍याना."
हा लेख आल्यानंतरही तिची खबरबात फोनवरुन कळत होती आता तिची ज्ञानाची भूक वाढली होती. बी.ए.झाल्यावर तिने पुणे विद्यापीठाच्या स्त्री अध्यासन(women study department) येथे 'स्त्री विषयक अभ्यास' या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. सख्यांच बोट सोडून एकटी जाण्याएवढी ती धीट झाली होती. बिबवेवाडीहून बसने एकटी विद्यापीठात जायला लागली. वर्षाचा अभ्यास्क्रम.५ पेपर आणि शोधनिबंध अस अभ्यासक्रमाच स्वरुप होत. "बालविवाह आणि शिक्षण" असा तिचा शोधनिबंधाचा विषय होता. स्वतः च्या जीवनावरच केसस्टडी अस त्याच स्वरुप होत. तिला आता पंख फुटले होते. आकाश तिला खुणावत होत.

मायबोलीवर सुरेखावरचा लेख टाकायचा ठरवल्यावर तिला फोन करायच ठरवल तर माझ्याकडे असलेल्या फोनवर फोन लागेना. मग स्मिताला फोन केला तिच्याकडे नंबर मिळाला.सुरेखा फोन केल्यामुळे खुपच खुश झाली.आनंदाबरोबर तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
"मॅडम कालच आठवण काढली होती तुमची.धावत धावत याव आणि तुम्हाला भेटाव वाटतय. आज माझा दिवस छान जाणार. तुमचा चेहरा बोलण हातवारे सगळ डोळ्यासमोर येतय." ती भरभरुन बोलत होती. विद्यापीठातल्या जुन्या आठवणी सांगत होती पीएच,डी करणार असल्याच सांगत होती. सध्या मुलीच लग्न, बाळंतपण, नातवंडाना सांभाळण चालू होत. पण तिची स्वप्न तिला खुणावत होती.तिला मराठी दिनाच्या निमित्याने विचारण्यासाठी मी प्रश्न काढले होते. पण मला तिचा ओघ थांबवून ते विचारावेसे वाटलेच नाहीत. तिच बोलण ऐकत राहावस वाटत होत.

पण मी एक मनाशी ठरवल तिच तारु पीएच.डीच्या बंदराला लागण्यासाठी शिडात थोड वार भरायला हव. तिला मधून मधून फोन करायला हवा .

(वरील लेख ८ जानेवारी २००५च्या केसरीच्या अंकात 'उत्तुंग भरारी' या सदरात छापून आला होता. इथे पुन्हा टाकण्यासाठी दै. केसरीने परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार! )



Sunday 7 February 2021

आनंदी वृद्धत्व - ४

                                                      आनंदी वृद्धत्व  -  ४
आमची गार्डन ग्रुपची सर्वात तरुण मैत्रीण विद्याताई देशपांडे. वय वर्षे अवघे ८३.मुलगा,सून,नातवंडे असे एकत्र कुटुंब आहे.एक मुलगी अमेरिकेत एक पुण्यात.मुलेही त्यांच्यासारखीच क र्तुत्वी आहेत. आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत

 विद्याताईंची आणि आमच्या कुटुंबाची ओळख खुप पूर्वीची.त्यांची मुकुंदनगरची  किलबिल शाळा खूप प्रसिद्ध होती. आमच्या भागात त्यांनी बंगला बांधला.नव्यानेच  वस्ती विस्तारत होती. येथेही त्यांना किलबिलची शाखा काढायची होती.आमच्या साठी ही खूप चांगली सोय होती.आम्ही दोघींनी घरोघर जाऊन शाळेबद्दल सांगितले. बघता बघता अनेक विद्यार्थी दाखल झाले..माझी मुलगी शाळेची  पहिली विद्यार्थिनी.तिच्या मार्फत विद्यार्थ्यात विविध मुल्ये रुजवण्यातील त्यांची कल्पकता,शाळेचा दर्जा अत्युत्तम ठेवण्याची त्यांची तळमळ माझ्यापर्यंत पोचत होती.घराजवळ उत्तम शाळा मिळाल्याने आम्ही खुश होतो.त्यांचे वेगळेपण सांगणारे एक उदाहरण सांगते. स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदना साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते.त्यादिवशी धोधो पाऊस.कोणीच गेले नाही.विद्याताई आणि त्यांच्या पतीनी स्वत:ची गाडी काढली आणि घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना आणले.एखादे काम हातात घेतले की काही झाले तरी करायचेच आणि तेही उत्तमरीतीने हे त्यांचे वैशिष्ट्य हळू हळू लक्षात येत होते.
आमच्या सेकंड इनिंगमध्ये ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.आम्हा निवृत्त झालेल्या अनेकांना भिमाले उद्यानाने एकत्र आणले.सकाळी मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू मिळतो आणि एकमेकिंकडून सकरात्मक उर्जाही.ही उर्जा देण्यात विद्याताईंचा वाटा मोठ्ठा असतो.आमच्या सर्वात पूर्ण पणे निवृत्त न झालेल्या फक्त विद्याताईच.त्यांच्या डॉक्टर सुनेने वैद्यकीय कामाऐवजी आता शाळेचा भार उचलला आहे.पण विद्याताईंचे मन अजून शाळेत रेंगाळत असते.शाळेला  ५३ वर्षे झाली.तेथे त्यांनी अनेक उपक्रम राबवले. कोणताही उपक्रम असो,घरगुती कार्यक्रम असो,संगीत क्लास असो,दैनंदिन व्यवहार असो, त्यातील नियोजनबद्धता,शिस्तबद्धता  ही त्यांची खासियत असते.
बागेत त्या फिरायला येतात. आमचा हास्यक्लब झाला की आम्ही काहीजणी ओंकार करतो.त्यांनी एक दिवशी फतवा काढला,ओंकारानंतर रोज एक प्रार्थना म्हणायची.ती आठवडाभर म्हणायची, ती तयार झाली की दुसरी.यासाठी त्यांनी गूगलवरून प्रार्थना शोधल्या. कोणत्या ओळी कितीदा म्हणायच्या या तपशिलासह सुंदर अक्षरात त्या  लिहिल्या. झेरॉक्स करून फाईलमध्ये घालून सर्वाना दिल्या.एव्हढ्यावर न थांबता गाणी रेकॉर्ड करून आणणे ती ऐकवणे,म्हणून घेणे हेही केले'.तू बुद्धि दे,' 'हमको मनकी शक्ती देना','ये मलिक तेरे बंदे हम','गगन सदन',' इतनी शक्ती हमे देना दाता' अशा अनेक प्रार्थना तयार झाल्या.हे करताना ताल,चाल, उच्चार हे सर्व व्यवस्थित होत आहे ना याकडे त्यांचे लक्ष असे. प्रार्थनेच्या सकारात्मक सुरुवातीने दिवस सुंदर जायचा.त्यांच्या आजारपणात त्यांचे येणे बंद झाले आणि उपक्रमही थंडावला.आता त्या यायला लागल्या तो पुन्हा सुरु होईल.असे वाटत असतांना बागाच बंद झाल्या.

त्यांच्या उत्साहाचे कारंजे सतत उसळत असते. त्याच्या शिडकाव्याने  शुष्क झालेली मनेही टवटवीत होत असतात.कधी डोळ्याची शस्त्रक्रिया कधी गळ्याची,कधी इतर काही आजार यामुळे अनेकदा त्यांचे बागेत येणे बंद होते. सर्वच जेष्ठ असल्याने प्रत्येकाचेच असे आजार चालू असतात.विद्याताई मात्र त्यांच्या इच्छ्याशाक्तीच्या जोरावर डॉक्टरनी दिलेल्या मुदती पूर्वीच बऱ्या होतात. उत्साहाने कामाला लागतात.                       

 गाण्याची आवड हा आम्हाला एकत्र आणण्याताला समान धागा आहे.ज्योती देशमुख यांचा संगीतानंद वर्ग त्यांच्या आणि आमच्या घरी असतो.बऱ्याचवेळा आम्ही एकमेकांचे स्पर्धक असतो पण ही स्पर्धा खेळीमेळीची असते.वैयक्तिक स्पर्धा असो किंवा दोन क्लास मधली असो.अटीतटीचे प्रयत्न आणि नंतर आत्मपरीक्षण हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे.सवाईगंधर्व महोत्सव हा त्यांचा विकपॉइंट आहे.यासाठी त्या इतरानाही प्रवृत्त करतात. तिकीटे काढण्याची व्यवस्था,येण्याजाण्याची सोय यासठी धडपड करतात.त्यांची तब्येत पाहता आता यावर्षी काही त्या जाणार नाहीत असे वाटते.पण आपला होरा त्य खोटा ठरवतात.सकारात्मक विचार प्रबळ इच्छ्याश्क्ती या जोरावर त्यांचे सर्व चालते. त्यांची युरोप सहलही  या बळावरच झाली

 .घरात संस्कृतचा वारसा असल्याने  आणि काही काळ संस्कृत शिक्षिका म्हणून काम केल्याने संस्कृत उच्च्याराबाबतही त्या जागरूक असतात.कोणाच चुकत असेल तर बरोबर येईपर्यंत शिकवण्याची त्यांची तयारी असते.अनेकांना त्यानी स्वत:च्या घरी गीता,श्रीसूक्त, विविध स्तोत्रे शिकविली आहेत.याशिवाय ८० व्या वर्षी मुलीकडे रोज जाऊन तिच्या आजूबाजूच्या बायकांनाही गीता शिकवली.

मुलीचा मुलगा दहावीला होता तर घरून रोज पाहटे त्या त्याला मराठी शिकवायला जात. आज आर्किटेक्ट झालेला नातू इंग्लिश मिडीयम असून त्याचे मराठी चांगले असण्याचे श्रेय आज्जीला देतो.पहिल्या पगाराची साडी त्यांनी आई आधी आज्जीला दिली.त्यांना सुनेपासून नातवंडे नातजावयापर्यंत  सर्व अग आई  म्हणतात.मुलांना त्यांची अडचण होण्याऐवजी मदतच होते.अमेरिकेतील मुलीला तिच्या गरजेनुसार मदतीला गेल्या.नातीचे मुंबईला घर शिफ्ट करायचे होते. आईला वेळ नव्हता तर या आपल्या फार्म हाउसवरच्या बाइला घेऊन मुंबईला गेल्या आणि चोख काम करून आल्या.              

 उत्साही, स्पष्टवक्ती,व्यवहारी, कडक शिस्तीची,परफेक्शनिस्ट,जीवाला जीव देणारी  अशी ही आमची मैत्रीण आहे.तोंडावर एक बोलेल मागे वेगळेच असे नसल्याने मैत्री करणे, निभावणे सोपे जाते.या त्यांच्या स्वभावामुळे कुटुंब नातेसंबंध हेही त्यांनी टिकवून ठेवले आहेत.त्यांचे पती अत्यंत उत्साही होते.सर्व बाबतीत पत्नीला प्रोत्साहन स्वातंत्र्य देणारे होते.लोक्संग्रहही मोठ्ठा हे सर्व संबंध त्यांनी आणि मुलांनीही जोपासले आहेत

  त्यांचे कुटुंब कोणीही अनुकरण करावे असेच आहे.गाण्याच्या क्लासमध्ये सासू, सून दोघीही आहेत.दैनदिन व्यवहार एकमेकीतील सामंजस्याने चालतात.मुला,नातवंडाना तिखट चमचमीत लागते. विद्याताईना तिखट चालत नाही त्या सुनेला म्हणाल्या मी माझी भाजी करत जाऊ का? सून म्हणाली कशाला आपण रोज दोन भाज्या करतो एक बिन तिखटाची करू.बाकीचे हवे असल्यास ठेचा मिसळून खातील.एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याने सर्व प्रश्न सोपे होऊन जातात.जेवायला सगळ्यांनी एकत्र बसायचे हा नियम. आई आल्यावरच मुलगा जेवायला सुरुवात करणार.हाच आपलेपणा आणि प्रेम वडील मंडळीना हवे असते.विद्याताई सर्व स्वत:ची कामे स्वत: करतात. पण आजारपण,शस्त्रक्रिया या काळात सून डॉक्टर असल्याने खुप आधार असतो. मुलगी पुण्यातच असल्याने तीही असते एकमेकांच्यात लुडबुड न कारता हवे तेंव्हा सर्व एकमेकांसाठी असतात.

त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली म्हणून सर्व मुलांनी  मिळून खूप मोठ्ठा कार्यक्रम केला.सूत्र संचलनाची जबाबदारी सुनेने उचलली होती.त्यांच्या जीवन प्रवासाची सुंदर व्हिडीओफित केली होती.त्या सुंदर नटल्या होत्या.गच्च सभागृहात लोकात त्याच उठून दिसत होत्या.यात ब्युटीपार्लरवालीचा जेवढा वाटा होता त्यापेक्षा जास्त त्यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थता, तृप्ती आणि समाधानाचा वाटा होता.गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.स्वत: त्यांनी 'प्रेमा काय देऊ तुला' मनापासून म्हटले.

सातत्याने नवनवीन शिकण्याच्या उत्साहामुळे त्यांच्यात साचलेपणा नाही.सध्या त्या ऑनलाईन फ्लॉवर रेमेडी शिकत आहेत.भोवतालच्या परिस्थितीतील,तब्येतीतील, नातेसंबंधातील बदल स्वीकारल्याने त्या आपल्या बरोबरीच्या लोकांशी तेवढ्याच दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीशीही उत्तम जुळवून घेतात.सुना मुली आधुनिक ड्रेस,इतर सौंदर्य साधने आणतात त्या आवडीने घालतात त्यांना ते शोभतेही.संक्रांतीला सर्वांनी आधुनिक काळे  गाऊन घालायचे ठरवले त्यांही सामील झाल्या.मुलीने आणलेला प्लाझोही त्यांनी आनंदाने घातला.मुलांइतक्याच सून ,जावई,नातवंडे,नातजावई यांच्या त्या लाडक्या अग आई आहेत.नात आणि नातजावई सिने क्षेत्रातील आहेत.त्यांचे त्यांना कौतुक आहे.अमराठी असलेल्या जावई म्हणतो आईसारखी सिनिअर सिटीझन मी कोठेच पहिली नाही.त्याच्याशी रमी खेळतानाचा फोटो सोबत दिला आहे.      

लॉकडाऊनच्या काळात घरात कामवाल्या येत नव्हत्या.सुनेला सर्व कामे करावी लागत.विद्यातैने काही करावे अशी कुणाची अपेक्षा नव्हती पण यांना पहाटे पाचला जाग येई. एक दिवशी त्यांनी किचन झाडून पुसून घेतले दुसरे दिवशी सर्व घराचा झाडू पोछा केला. प्रथम कंबर दुखली नंतर सवय झाली स्वेच्छेने त्यांनी हे काम कामवाली यावयास सुरु होईपर्यंत घेतले. यात मी काही मोठे केले असा आव नाही.          

            आज त्यांचे जीवन कृतार्थ आहे.संस्कारक्षम वयात त्यांनी घडवलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनीअर,संशोधक,उद्योजक असे विविध स्तरात आहेत.बागेत भेटतात तेंव्हा आदरानी त्यांच्याशी बोलतात आमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही सुखाऊन जातो.