Saturday 27 February 2021

अमराठी तरीही मराठी

                                                  अमराठी तरीही मराठी

मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्‍या मराठीतून पुस्तके लिहिणार्‍या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण नंतर अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्‍या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्‍या आशा रेवणकर. आमच्या आजुबाजूचे कितीतरी सिन्धी,मारवाडी,तेलगु भाषिक. पण या सर्वात मला अधिक भावली ती सुरेखाच. तिचीच ही पूर्वप्रकाशित कहाणी !

"१९७७मध्ये मी सातवी पास झाले. त्याच वर्षी मला सासरी यावे लागले. माझी शाळा सुट्ली. माझ्याच द्प्तरात पुस्तकांच्या ऐवजी कपडे कोंबून कृष्णा नदी ओलांडून मी महाराष्ट्रात आले. त्या दिवसापासून सातवीचा शिक्का कपाळावर ठळक दिसू लागला. डोळे पूर्ण उघडून जगाकडे बघताच येइना. मोठे शहर, शिकलेले लोक बघून पार भेदरुन गेले. शिकण्याची इच्छा मनाच्या पार तळाशी पड्ली. परत शिकण्याची संधी मिळेल असे वाटलेच नव्हते. परंतु टिमविच्या मुक्त विद्या केन्द्रामुळे माझे मध्येच तुटलेले स्वप्न साकार झाले."

पदवीधर झाल्यावर सुरेखाच भलं मोठ पत्र आल होत. त्यातील हा मजकूर. तिच्या पत्रात पदवीधर झाल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. टिळक विद्यापीठाबद्दलची अपरंपार कृतज्ञता,तिच्या घडणीतील विद्यापीठाचा वाटा याबद्दल तिने भरभरुन लिहिल होत. विवाहामुळे शिक्षण तुटलेल्या व मुक्त विद्या केन्द्रामुळे पदवीधर झालेल्या गृहिणीची कथा थोड्याफार फरकाने अशीच असते. परंतु सुरेखाच्या यशाला वेगळा रंग आहे. खर तर तिचे बी.ए..साठी प्रवेश घेणं एक धाडसच म्हणावयास हरकत नाही.

सुरेखा पाटील अथणीची. मातृभाषा कानडी. मराठीची दूरुनही ओळख नव्हती. हिंदी विषय शाळेत असल्याने देवनागरी लिपी मात्र येत होती. ती हुषार होती शाळेत पहिली यायची. परंतु खेळत्या वयात म्हणजे अगदी पहिलीतच लग्न झाल.सातवीत असताना सासरी आली. नव-याची बदली महाबळेश्वरला झालेली. आजूबाजूच्या काम करणार्‍या मुलींबरोबर लंगडी छप्पापाणी खेळताना त्यांची मराठी मोडकी तोडकी येऊ लागली. ग्रामीण भागातून नागरी जीवनात आलेल्या सुरेखाला त्याच जवळच्या वाटायच्या.चवदाव्या वर्षीच मुल झाल.

नंतर मुल,संसार्,नवर्‍याच्या बद्ल्या यात वर्ष निघून गेली. मुले इंग्रजी माध्यमात होती.त्याना एक विषय मराठी असल्याने थोडथोड वाचन सुरु झाल. कानडी तर नजरेलाही पडत नव्हत. घरात सकाळ यायचा तो वाचायचा. चांदोबासारखी लहान मुलांची मासिकही वाचायची. थोड्थोड मराठी समजायला लागल.बोलताही येऊ लागल.
आणि एके दिवशी मुलीनी बातमी आणली. घरबसल्या बी.ए.करता येइल. पूर्व शिक्षणाची अट नाही. पण अभ्यासक्रम मराठीतून. सुरेखानी घाबरत घाबरत फोन केला. ज्या व्यक्तीने फोन घेतला त्या व्यक्तीचे बोलणे इतके आश्वासक होते की सुरेखाला वाटले प्रवेश घ्यावा. तिने बी.ए. प्रवेश चाचणी परीक्षा दिली. आश्चर्य म्हणजे तिला १००पैकी ६८ गुण मिळाले. सुरेखानी प्रथम वर्षास प्रवेश घेतला.

प्रवेशाबरोबर मिळालेली मराठीतून असलेली दहा पुस्तके पाहिली आणि धडकीच भरली. पण मनाच्या तळाशी असलेली इच्छा आता नजरेच्या टप्प्यात होती. जिद्द होती कष्ट करायची तयारी होती. सुरेखाची तपश्चर्या सुरु झाली.

घरची काम उरकली की रोज रात्री तीन् तीन वाजेपर्यंत वाचन, लिहिण सुरु झाल. पुन्हापुन्हा वाचायच लिहायच. मुलांकडून न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. मराठीतल्या सनावळ्यांचे आकडे मुलाना विचारुन कानडीत लिहायचे. आणि पाठ करायचे असा क्रम चालू झाला. लिहून लिहून हात दुखला तरी लिहिणे थांबायचे नाही. मग हात तट्ट सुजायचा.काम करेनासा व्हायचा. मग तिला रडायला यायचे. हात दुखतो म्हणून नाही तर काम थांबले म्हणून.
सर्व संपर्कसत्राना ती हजर राहायची. जिवाचा कान करून प्राध्यापकांचा शब्द न शब्द ऐकायचा.आत्मसात करायचा. त्यावर चिंतन करायचे.हुषार सुरेखाच्या मेंदूवर ते कोरले जायचे

सुरेखा सांगते परीक्षेवेळी हातवार्‍यासकट. प्राध्यापकांचे व्याख्यान डोळ्यासमोर येई. आणि ती झट्पट पेपर लिहित असे.

प्रथम वर्षात अनेक गृहिणींचा एखादा विषय राहतो; सुरेख मात्र सर्व विषयात उत्तीर्ण झाली. कानडी मातृभाषा असूनही मराठी आत्मसात करणे,पहिल्या झट्क्यात सर्व विषयात पास होणे हे वाखाणण्याजोगे होते. या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला.या पूर्वीही काही अमराठी विद्यार्थ्यानी बी.ए. केले होते. परंतु त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. नोकरी व्यवसायामुळे बाह्य जगाशी मराठीशी संपर्क होता. अभ्यासक्रम मराठीतून असला आणि सर्व लिखित साहित्य मराठीतून असले तरी पेपर इंग्रजीमध्ये लिहिण्याची परवानगी होती. त्यामुळे लिखाणासाठी इंग्रजीचा आधार होता. आणि मुख्य म्हणजे बी.ए.होणे ही त्यांची व्यावसायिक गरज होती. परंतु सुरेखाच्या बाबतीत यापैकी काहीच नव्हते. सातवी उत्तीर्ण मराठी व्यक्तीही प्रवेश घेताना दहावेळा विचार करतात. पण सुरेखानी मात्र जिद्दीने प्रथम वर्ष पूर्ण केले.

पहिल्याच वर्षात तिला स्मिता देसाई,महाशब्दे वाणी, परदेशी अशा मैत्रिणी मिळाल्या. स्मिता त्यांची लीडर. सुरेखाला प्रोत्साहन देण्यात तिचा मोठा वाटा होता. या सर्वानी एकत्र येऊन अभ्यास तर केलाच शिवाय दिवसभर विद्यापीठात रेंगाळणे कँटीनमध्ये गप्पाटप्पा करणे, निवासी संपर्कसत्रात विद्यापीठाच्या उपक्रमात सह्भागी होणे; असे करत दूरशिक्षणात राहुनही महाविद्यालयीन जीवनाचा आनंदही लुटला. या सर्व मैत्रिणींच्या सहवासात भित्री सुरेखा बोलायला लागली. चक्क शुद्ध मराठीतून बोलायला लागली. अभ्यासाची खडतर तपश्चर्याही चालूच होती. दुसरे तिसरे वर्षही ती पहिल्या खेपेतच द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. तृतीय वर्षात संज्ञापन कौशल्य या विषयात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित वैचारीक निबंध असत. विद्यार्थ्याना नेहमीच हा विषय कठीण वाटतो. सुरेखाला मात्र यात प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. तिच्या सख्यानी एकत्र येऊन तिचा सत्कार केला. आम्हा प्राध्यापकानाही बोलावल होत. एरवी आम्ही असे विद्यार्थ्यांकडे जात नसू. पण आम्हा सर्वानाच या मैत्रीणींच्या भावनांचा आदर करावासा वाटला.

आज सुरेखा डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहू शकते. स्वतःकडे स्वतःच्या कुटुंबाकडेही ती आता अधिक सुजाण नजरेने पाहू शकत आहे.

सुरेखानी सानेगुरुजींच्या आंतरभारतीचे एक सुरेख उदाहरण दिले आहे. तिच्याकडे पाहिले कि वाटते "कष्टाने मराठी शिकणार्‍या सुरेखाला अमराठी म्हणायचे की मराठी मातृभाषा असूनही मराठी माध्यमाची लाज वाटणार्‍याना."
हा लेख आल्यानंतरही तिची खबरबात फोनवरुन कळत होती आता तिची ज्ञानाची भूक वाढली होती. बी.ए.झाल्यावर तिने पुणे विद्यापीठाच्या स्त्री अध्यासन(women study department) येथे 'स्त्री विषयक अभ्यास' या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. सख्यांच बोट सोडून एकटी जाण्याएवढी ती धीट झाली होती. बिबवेवाडीहून बसने एकटी विद्यापीठात जायला लागली. वर्षाचा अभ्यास्क्रम.५ पेपर आणि शोधनिबंध अस अभ्यासक्रमाच स्वरुप होत. "बालविवाह आणि शिक्षण" असा तिचा शोधनिबंधाचा विषय होता. स्वतः च्या जीवनावरच केसस्टडी अस त्याच स्वरुप होत. तिला आता पंख फुटले होते. आकाश तिला खुणावत होत.

मायबोलीवर सुरेखावरचा लेख टाकायचा ठरवल्यावर तिला फोन करायच ठरवल तर माझ्याकडे असलेल्या फोनवर फोन लागेना. मग स्मिताला फोन केला तिच्याकडे नंबर मिळाला.सुरेखा फोन केल्यामुळे खुपच खुश झाली.आनंदाबरोबर तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
"मॅडम कालच आठवण काढली होती तुमची.धावत धावत याव आणि तुम्हाला भेटाव वाटतय. आज माझा दिवस छान जाणार. तुमचा चेहरा बोलण हातवारे सगळ डोळ्यासमोर येतय." ती भरभरुन बोलत होती. विद्यापीठातल्या जुन्या आठवणी सांगत होती पीएच,डी करणार असल्याच सांगत होती. सध्या मुलीच लग्न, बाळंतपण, नातवंडाना सांभाळण चालू होत. पण तिची स्वप्न तिला खुणावत होती.तिला मराठी दिनाच्या निमित्याने विचारण्यासाठी मी प्रश्न काढले होते. पण मला तिचा ओघ थांबवून ते विचारावेसे वाटलेच नाहीत. तिच बोलण ऐकत राहावस वाटत होत.

पण मी एक मनाशी ठरवल तिच तारु पीएच.डीच्या बंदराला लागण्यासाठी शिडात थोड वार भरायला हव. तिला मधून मधून फोन करायला हवा .

(वरील लेख ८ जानेवारी २००५च्या केसरीच्या अंकात 'उत्तुंग भरारी' या सदरात छापून आला होता. इथे पुन्हा टाकण्यासाठी दै. केसरीने परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार! )



Sunday 7 February 2021

आनंदी वृद्धत्व - ४

                                                      आनंदी वृद्धत्व  -  ४
आमची गार्डन ग्रुपची सर्वात तरुण मैत्रीण विद्याताई देशपांडे. वय वर्षे अवघे ८३.मुलगा,सून,नातवंडे असे एकत्र कुटुंब आहे.एक मुलगी अमेरिकेत एक पुण्यात.मुलेही त्यांच्यासारखीच क र्तुत्वी आहेत. आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत

 विद्याताईंची आणि आमच्या कुटुंबाची ओळख खुप पूर्वीची.त्यांची मुकुंदनगरची  किलबिल शाळा खूप प्रसिद्ध होती. आमच्या भागात त्यांनी बंगला बांधला.नव्यानेच  वस्ती विस्तारत होती. येथेही त्यांना किलबिलची शाखा काढायची होती.आमच्या साठी ही खूप चांगली सोय होती.आम्ही दोघींनी घरोघर जाऊन शाळेबद्दल सांगितले. बघता बघता अनेक विद्यार्थी दाखल झाले..माझी मुलगी शाळेची  पहिली विद्यार्थिनी.तिच्या मार्फत विद्यार्थ्यात विविध मुल्ये रुजवण्यातील त्यांची कल्पकता,शाळेचा दर्जा अत्युत्तम ठेवण्याची त्यांची तळमळ माझ्यापर्यंत पोचत होती.घराजवळ उत्तम शाळा मिळाल्याने आम्ही खुश होतो.त्यांचे वेगळेपण सांगणारे एक उदाहरण सांगते. स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदना साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते.त्यादिवशी धोधो पाऊस.कोणीच गेले नाही.विद्याताई आणि त्यांच्या पतीनी स्वत:ची गाडी काढली आणि घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना आणले.एखादे काम हातात घेतले की काही झाले तरी करायचेच आणि तेही उत्तमरीतीने हे त्यांचे वैशिष्ट्य हळू हळू लक्षात येत होते.
आमच्या सेकंड इनिंगमध्ये ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.आम्हा निवृत्त झालेल्या अनेकांना भिमाले उद्यानाने एकत्र आणले.सकाळी मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू मिळतो आणि एकमेकिंकडून सकरात्मक उर्जाही.ही उर्जा देण्यात विद्याताईंचा वाटा मोठ्ठा असतो.आमच्या सर्वात पूर्ण पणे निवृत्त न झालेल्या फक्त विद्याताईच.त्यांच्या डॉक्टर सुनेने वैद्यकीय कामाऐवजी आता शाळेचा भार उचलला आहे.पण विद्याताईंचे मन अजून शाळेत रेंगाळत असते.शाळेला  ५३ वर्षे झाली.तेथे त्यांनी अनेक उपक्रम राबवले. कोणताही उपक्रम असो,घरगुती कार्यक्रम असो,संगीत क्लास असो,दैनंदिन व्यवहार असो, त्यातील नियोजनबद्धता,शिस्तबद्धता  ही त्यांची खासियत असते.
बागेत त्या फिरायला येतात. आमचा हास्यक्लब झाला की आम्ही काहीजणी ओंकार करतो.त्यांनी एक दिवशी फतवा काढला,ओंकारानंतर रोज एक प्रार्थना म्हणायची.ती आठवडाभर म्हणायची, ती तयार झाली की दुसरी.यासाठी त्यांनी गूगलवरून प्रार्थना शोधल्या. कोणत्या ओळी कितीदा म्हणायच्या या तपशिलासह सुंदर अक्षरात त्या  लिहिल्या. झेरॉक्स करून फाईलमध्ये घालून सर्वाना दिल्या.एव्हढ्यावर न थांबता गाणी रेकॉर्ड करून आणणे ती ऐकवणे,म्हणून घेणे हेही केले'.तू बुद्धि दे,' 'हमको मनकी शक्ती देना','ये मलिक तेरे बंदे हम','गगन सदन',' इतनी शक्ती हमे देना दाता' अशा अनेक प्रार्थना तयार झाल्या.हे करताना ताल,चाल, उच्चार हे सर्व व्यवस्थित होत आहे ना याकडे त्यांचे लक्ष असे. प्रार्थनेच्या सकारात्मक सुरुवातीने दिवस सुंदर जायचा.त्यांच्या आजारपणात त्यांचे येणे बंद झाले आणि उपक्रमही थंडावला.आता त्या यायला लागल्या तो पुन्हा सुरु होईल.असे वाटत असतांना बागाच बंद झाल्या.

त्यांच्या उत्साहाचे कारंजे सतत उसळत असते. त्याच्या शिडकाव्याने  शुष्क झालेली मनेही टवटवीत होत असतात.कधी डोळ्याची शस्त्रक्रिया कधी गळ्याची,कधी इतर काही आजार यामुळे अनेकदा त्यांचे बागेत येणे बंद होते. सर्वच जेष्ठ असल्याने प्रत्येकाचेच असे आजार चालू असतात.विद्याताई मात्र त्यांच्या इच्छ्याशाक्तीच्या जोरावर डॉक्टरनी दिलेल्या मुदती पूर्वीच बऱ्या होतात. उत्साहाने कामाला लागतात.                       

 गाण्याची आवड हा आम्हाला एकत्र आणण्याताला समान धागा आहे.ज्योती देशमुख यांचा संगीतानंद वर्ग त्यांच्या आणि आमच्या घरी असतो.बऱ्याचवेळा आम्ही एकमेकांचे स्पर्धक असतो पण ही स्पर्धा खेळीमेळीची असते.वैयक्तिक स्पर्धा असो किंवा दोन क्लास मधली असो.अटीतटीचे प्रयत्न आणि नंतर आत्मपरीक्षण हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे.सवाईगंधर्व महोत्सव हा त्यांचा विकपॉइंट आहे.यासाठी त्या इतरानाही प्रवृत्त करतात. तिकीटे काढण्याची व्यवस्था,येण्याजाण्याची सोय यासठी धडपड करतात.त्यांची तब्येत पाहता आता यावर्षी काही त्या जाणार नाहीत असे वाटते.पण आपला होरा त्य खोटा ठरवतात.सकारात्मक विचार प्रबळ इच्छ्याश्क्ती या जोरावर त्यांचे सर्व चालते. त्यांची युरोप सहलही  या बळावरच झाली

 .घरात संस्कृतचा वारसा असल्याने  आणि काही काळ संस्कृत शिक्षिका म्हणून काम केल्याने संस्कृत उच्च्याराबाबतही त्या जागरूक असतात.कोणाच चुकत असेल तर बरोबर येईपर्यंत शिकवण्याची त्यांची तयारी असते.अनेकांना त्यानी स्वत:च्या घरी गीता,श्रीसूक्त, विविध स्तोत्रे शिकविली आहेत.याशिवाय ८० व्या वर्षी मुलीकडे रोज जाऊन तिच्या आजूबाजूच्या बायकांनाही गीता शिकवली.

मुलीचा मुलगा दहावीला होता तर घरून रोज पाहटे त्या त्याला मराठी शिकवायला जात. आज आर्किटेक्ट झालेला नातू इंग्लिश मिडीयम असून त्याचे मराठी चांगले असण्याचे श्रेय आज्जीला देतो.पहिल्या पगाराची साडी त्यांनी आई आधी आज्जीला दिली.त्यांना सुनेपासून नातवंडे नातजावयापर्यंत  सर्व अग आई  म्हणतात.मुलांना त्यांची अडचण होण्याऐवजी मदतच होते.अमेरिकेतील मुलीला तिच्या गरजेनुसार मदतीला गेल्या.नातीचे मुंबईला घर शिफ्ट करायचे होते. आईला वेळ नव्हता तर या आपल्या फार्म हाउसवरच्या बाइला घेऊन मुंबईला गेल्या आणि चोख काम करून आल्या.              

 उत्साही, स्पष्टवक्ती,व्यवहारी, कडक शिस्तीची,परफेक्शनिस्ट,जीवाला जीव देणारी  अशी ही आमची मैत्रीण आहे.तोंडावर एक बोलेल मागे वेगळेच असे नसल्याने मैत्री करणे, निभावणे सोपे जाते.या त्यांच्या स्वभावामुळे कुटुंब नातेसंबंध हेही त्यांनी टिकवून ठेवले आहेत.त्यांचे पती अत्यंत उत्साही होते.सर्व बाबतीत पत्नीला प्रोत्साहन स्वातंत्र्य देणारे होते.लोक्संग्रहही मोठ्ठा हे सर्व संबंध त्यांनी आणि मुलांनीही जोपासले आहेत

  त्यांचे कुटुंब कोणीही अनुकरण करावे असेच आहे.गाण्याच्या क्लासमध्ये सासू, सून दोघीही आहेत.दैनदिन व्यवहार एकमेकीतील सामंजस्याने चालतात.मुला,नातवंडाना तिखट चमचमीत लागते. विद्याताईना तिखट चालत नाही त्या सुनेला म्हणाल्या मी माझी भाजी करत जाऊ का? सून म्हणाली कशाला आपण रोज दोन भाज्या करतो एक बिन तिखटाची करू.बाकीचे हवे असल्यास ठेचा मिसळून खातील.एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याने सर्व प्रश्न सोपे होऊन जातात.जेवायला सगळ्यांनी एकत्र बसायचे हा नियम. आई आल्यावरच मुलगा जेवायला सुरुवात करणार.हाच आपलेपणा आणि प्रेम वडील मंडळीना हवे असते.विद्याताई सर्व स्वत:ची कामे स्वत: करतात. पण आजारपण,शस्त्रक्रिया या काळात सून डॉक्टर असल्याने खुप आधार असतो. मुलगी पुण्यातच असल्याने तीही असते एकमेकांच्यात लुडबुड न कारता हवे तेंव्हा सर्व एकमेकांसाठी असतात.

त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली म्हणून सर्व मुलांनी  मिळून खूप मोठ्ठा कार्यक्रम केला.सूत्र संचलनाची जबाबदारी सुनेने उचलली होती.त्यांच्या जीवन प्रवासाची सुंदर व्हिडीओफित केली होती.त्या सुंदर नटल्या होत्या.गच्च सभागृहात लोकात त्याच उठून दिसत होत्या.यात ब्युटीपार्लरवालीचा जेवढा वाटा होता त्यापेक्षा जास्त त्यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थता, तृप्ती आणि समाधानाचा वाटा होता.गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.स्वत: त्यांनी 'प्रेमा काय देऊ तुला' मनापासून म्हटले.

सातत्याने नवनवीन शिकण्याच्या उत्साहामुळे त्यांच्यात साचलेपणा नाही.सध्या त्या ऑनलाईन फ्लॉवर रेमेडी शिकत आहेत.भोवतालच्या परिस्थितीतील,तब्येतीतील, नातेसंबंधातील बदल स्वीकारल्याने त्या आपल्या बरोबरीच्या लोकांशी तेवढ्याच दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीशीही उत्तम जुळवून घेतात.सुना मुली आधुनिक ड्रेस,इतर सौंदर्य साधने आणतात त्या आवडीने घालतात त्यांना ते शोभतेही.संक्रांतीला सर्वांनी आधुनिक काळे  गाऊन घालायचे ठरवले त्यांही सामील झाल्या.मुलीने आणलेला प्लाझोही त्यांनी आनंदाने घातला.मुलांइतक्याच सून ,जावई,नातवंडे,नातजावई यांच्या त्या लाडक्या अग आई आहेत.नात आणि नातजावई सिने क्षेत्रातील आहेत.त्यांचे त्यांना कौतुक आहे.अमराठी असलेल्या जावई म्हणतो आईसारखी सिनिअर सिटीझन मी कोठेच पहिली नाही.त्याच्याशी रमी खेळतानाचा फोटो सोबत दिला आहे.      

लॉकडाऊनच्या काळात घरात कामवाल्या येत नव्हत्या.सुनेला सर्व कामे करावी लागत.विद्यातैने काही करावे अशी कुणाची अपेक्षा नव्हती पण यांना पहाटे पाचला जाग येई. एक दिवशी त्यांनी किचन झाडून पुसून घेतले दुसरे दिवशी सर्व घराचा झाडू पोछा केला. प्रथम कंबर दुखली नंतर सवय झाली स्वेच्छेने त्यांनी हे काम कामवाली यावयास सुरु होईपर्यंत घेतले. यात मी काही मोठे केले असा आव नाही.          

            आज त्यांचे जीवन कृतार्थ आहे.संस्कारक्षम वयात त्यांनी घडवलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनीअर,संशोधक,उद्योजक असे विविध स्तरात आहेत.बागेत भेटतात तेंव्हा आदरानी त्यांच्याशी बोलतात आमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही सुखाऊन जातो.