Saturday 27 February 2021

अमराठी तरीही मराठी

                                                  अमराठी तरीही मराठी

मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्‍या मराठीतून पुस्तके लिहिणार्‍या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण नंतर अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्‍या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्‍या आशा रेवणकर. आमच्या आजुबाजूचे कितीतरी सिन्धी,मारवाडी,तेलगु भाषिक. पण या सर्वात मला अधिक भावली ती सुरेखाच. तिचीच ही पूर्वप्रकाशित कहाणी !

"१९७७मध्ये मी सातवी पास झाले. त्याच वर्षी मला सासरी यावे लागले. माझी शाळा सुट्ली. माझ्याच द्प्तरात पुस्तकांच्या ऐवजी कपडे कोंबून कृष्णा नदी ओलांडून मी महाराष्ट्रात आले. त्या दिवसापासून सातवीचा शिक्का कपाळावर ठळक दिसू लागला. डोळे पूर्ण उघडून जगाकडे बघताच येइना. मोठे शहर, शिकलेले लोक बघून पार भेदरुन गेले. शिकण्याची इच्छा मनाच्या पार तळाशी पड्ली. परत शिकण्याची संधी मिळेल असे वाटलेच नव्हते. परंतु टिमविच्या मुक्त विद्या केन्द्रामुळे माझे मध्येच तुटलेले स्वप्न साकार झाले."

पदवीधर झाल्यावर सुरेखाच भलं मोठ पत्र आल होत. त्यातील हा मजकूर. तिच्या पत्रात पदवीधर झाल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. टिळक विद्यापीठाबद्दलची अपरंपार कृतज्ञता,तिच्या घडणीतील विद्यापीठाचा वाटा याबद्दल तिने भरभरुन लिहिल होत. विवाहामुळे शिक्षण तुटलेल्या व मुक्त विद्या केन्द्रामुळे पदवीधर झालेल्या गृहिणीची कथा थोड्याफार फरकाने अशीच असते. परंतु सुरेखाच्या यशाला वेगळा रंग आहे. खर तर तिचे बी.ए..साठी प्रवेश घेणं एक धाडसच म्हणावयास हरकत नाही.

सुरेखा पाटील अथणीची. मातृभाषा कानडी. मराठीची दूरुनही ओळख नव्हती. हिंदी विषय शाळेत असल्याने देवनागरी लिपी मात्र येत होती. ती हुषार होती शाळेत पहिली यायची. परंतु खेळत्या वयात म्हणजे अगदी पहिलीतच लग्न झाल.सातवीत असताना सासरी आली. नव-याची बदली महाबळेश्वरला झालेली. आजूबाजूच्या काम करणार्‍या मुलींबरोबर लंगडी छप्पापाणी खेळताना त्यांची मराठी मोडकी तोडकी येऊ लागली. ग्रामीण भागातून नागरी जीवनात आलेल्या सुरेखाला त्याच जवळच्या वाटायच्या.चवदाव्या वर्षीच मुल झाल.

नंतर मुल,संसार्,नवर्‍याच्या बद्ल्या यात वर्ष निघून गेली. मुले इंग्रजी माध्यमात होती.त्याना एक विषय मराठी असल्याने थोडथोड वाचन सुरु झाल. कानडी तर नजरेलाही पडत नव्हत. घरात सकाळ यायचा तो वाचायचा. चांदोबासारखी लहान मुलांची मासिकही वाचायची. थोड्थोड मराठी समजायला लागल.बोलताही येऊ लागल.
आणि एके दिवशी मुलीनी बातमी आणली. घरबसल्या बी.ए.करता येइल. पूर्व शिक्षणाची अट नाही. पण अभ्यासक्रम मराठीतून. सुरेखानी घाबरत घाबरत फोन केला. ज्या व्यक्तीने फोन घेतला त्या व्यक्तीचे बोलणे इतके आश्वासक होते की सुरेखाला वाटले प्रवेश घ्यावा. तिने बी.ए. प्रवेश चाचणी परीक्षा दिली. आश्चर्य म्हणजे तिला १००पैकी ६८ गुण मिळाले. सुरेखानी प्रथम वर्षास प्रवेश घेतला.

प्रवेशाबरोबर मिळालेली मराठीतून असलेली दहा पुस्तके पाहिली आणि धडकीच भरली. पण मनाच्या तळाशी असलेली इच्छा आता नजरेच्या टप्प्यात होती. जिद्द होती कष्ट करायची तयारी होती. सुरेखाची तपश्चर्या सुरु झाली.

घरची काम उरकली की रोज रात्री तीन् तीन वाजेपर्यंत वाचन, लिहिण सुरु झाल. पुन्हापुन्हा वाचायच लिहायच. मुलांकडून न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. मराठीतल्या सनावळ्यांचे आकडे मुलाना विचारुन कानडीत लिहायचे. आणि पाठ करायचे असा क्रम चालू झाला. लिहून लिहून हात दुखला तरी लिहिणे थांबायचे नाही. मग हात तट्ट सुजायचा.काम करेनासा व्हायचा. मग तिला रडायला यायचे. हात दुखतो म्हणून नाही तर काम थांबले म्हणून.
सर्व संपर्कसत्राना ती हजर राहायची. जिवाचा कान करून प्राध्यापकांचा शब्द न शब्द ऐकायचा.आत्मसात करायचा. त्यावर चिंतन करायचे.हुषार सुरेखाच्या मेंदूवर ते कोरले जायचे

सुरेखा सांगते परीक्षेवेळी हातवार्‍यासकट. प्राध्यापकांचे व्याख्यान डोळ्यासमोर येई. आणि ती झट्पट पेपर लिहित असे.

प्रथम वर्षात अनेक गृहिणींचा एखादा विषय राहतो; सुरेख मात्र सर्व विषयात उत्तीर्ण झाली. कानडी मातृभाषा असूनही मराठी आत्मसात करणे,पहिल्या झट्क्यात सर्व विषयात पास होणे हे वाखाणण्याजोगे होते. या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला.या पूर्वीही काही अमराठी विद्यार्थ्यानी बी.ए. केले होते. परंतु त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. नोकरी व्यवसायामुळे बाह्य जगाशी मराठीशी संपर्क होता. अभ्यासक्रम मराठीतून असला आणि सर्व लिखित साहित्य मराठीतून असले तरी पेपर इंग्रजीमध्ये लिहिण्याची परवानगी होती. त्यामुळे लिखाणासाठी इंग्रजीचा आधार होता. आणि मुख्य म्हणजे बी.ए.होणे ही त्यांची व्यावसायिक गरज होती. परंतु सुरेखाच्या बाबतीत यापैकी काहीच नव्हते. सातवी उत्तीर्ण मराठी व्यक्तीही प्रवेश घेताना दहावेळा विचार करतात. पण सुरेखानी मात्र जिद्दीने प्रथम वर्ष पूर्ण केले.

पहिल्याच वर्षात तिला स्मिता देसाई,महाशब्दे वाणी, परदेशी अशा मैत्रिणी मिळाल्या. स्मिता त्यांची लीडर. सुरेखाला प्रोत्साहन देण्यात तिचा मोठा वाटा होता. या सर्वानी एकत्र येऊन अभ्यास तर केलाच शिवाय दिवसभर विद्यापीठात रेंगाळणे कँटीनमध्ये गप्पाटप्पा करणे, निवासी संपर्कसत्रात विद्यापीठाच्या उपक्रमात सह्भागी होणे; असे करत दूरशिक्षणात राहुनही महाविद्यालयीन जीवनाचा आनंदही लुटला. या सर्व मैत्रिणींच्या सहवासात भित्री सुरेखा बोलायला लागली. चक्क शुद्ध मराठीतून बोलायला लागली. अभ्यासाची खडतर तपश्चर्याही चालूच होती. दुसरे तिसरे वर्षही ती पहिल्या खेपेतच द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. तृतीय वर्षात संज्ञापन कौशल्य या विषयात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित वैचारीक निबंध असत. विद्यार्थ्याना नेहमीच हा विषय कठीण वाटतो. सुरेखाला मात्र यात प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. तिच्या सख्यानी एकत्र येऊन तिचा सत्कार केला. आम्हा प्राध्यापकानाही बोलावल होत. एरवी आम्ही असे विद्यार्थ्यांकडे जात नसू. पण आम्हा सर्वानाच या मैत्रीणींच्या भावनांचा आदर करावासा वाटला.

आज सुरेखा डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहू शकते. स्वतःकडे स्वतःच्या कुटुंबाकडेही ती आता अधिक सुजाण नजरेने पाहू शकत आहे.

सुरेखानी सानेगुरुजींच्या आंतरभारतीचे एक सुरेख उदाहरण दिले आहे. तिच्याकडे पाहिले कि वाटते "कष्टाने मराठी शिकणार्‍या सुरेखाला अमराठी म्हणायचे की मराठी मातृभाषा असूनही मराठी माध्यमाची लाज वाटणार्‍याना."
हा लेख आल्यानंतरही तिची खबरबात फोनवरुन कळत होती आता तिची ज्ञानाची भूक वाढली होती. बी.ए.झाल्यावर तिने पुणे विद्यापीठाच्या स्त्री अध्यासन(women study department) येथे 'स्त्री विषयक अभ्यास' या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. सख्यांच बोट सोडून एकटी जाण्याएवढी ती धीट झाली होती. बिबवेवाडीहून बसने एकटी विद्यापीठात जायला लागली. वर्षाचा अभ्यास्क्रम.५ पेपर आणि शोधनिबंध अस अभ्यासक्रमाच स्वरुप होत. "बालविवाह आणि शिक्षण" असा तिचा शोधनिबंधाचा विषय होता. स्वतः च्या जीवनावरच केसस्टडी अस त्याच स्वरुप होत. तिला आता पंख फुटले होते. आकाश तिला खुणावत होत.

मायबोलीवर सुरेखावरचा लेख टाकायचा ठरवल्यावर तिला फोन करायच ठरवल तर माझ्याकडे असलेल्या फोनवर फोन लागेना. मग स्मिताला फोन केला तिच्याकडे नंबर मिळाला.सुरेखा फोन केल्यामुळे खुपच खुश झाली.आनंदाबरोबर तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
"मॅडम कालच आठवण काढली होती तुमची.धावत धावत याव आणि तुम्हाला भेटाव वाटतय. आज माझा दिवस छान जाणार. तुमचा चेहरा बोलण हातवारे सगळ डोळ्यासमोर येतय." ती भरभरुन बोलत होती. विद्यापीठातल्या जुन्या आठवणी सांगत होती पीएच,डी करणार असल्याच सांगत होती. सध्या मुलीच लग्न, बाळंतपण, नातवंडाना सांभाळण चालू होत. पण तिची स्वप्न तिला खुणावत होती.तिला मराठी दिनाच्या निमित्याने विचारण्यासाठी मी प्रश्न काढले होते. पण मला तिचा ओघ थांबवून ते विचारावेसे वाटलेच नाहीत. तिच बोलण ऐकत राहावस वाटत होत.

पण मी एक मनाशी ठरवल तिच तारु पीएच.डीच्या बंदराला लागण्यासाठी शिडात थोड वार भरायला हव. तिला मधून मधून फोन करायला हवा .

(वरील लेख ८ जानेवारी २००५च्या केसरीच्या अंकात 'उत्तुंग भरारी' या सदरात छापून आला होता. इथे पुन्हा टाकण्यासाठी दै. केसरीने परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार! )



No comments:

Post a Comment