Tuesday 5 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ७

                                                     मर्म बंधातली ठेव ही - ७

                      अंजली महाजनची तब्येत बरी नव्हती.मी भेटायला गेले होते.तेथे आर्यची आठवण निघाली.त्याचे काय झाले

एकदा दहा साडेदहालाच अंजलीचा फोन आला.आज पावभाजी केले.केशवराव काका, काकुना बोलाव म्हणत आहेत तर तुम्ही येता का? अंजलीचे तीन जिने चढून जायचे माझ्या जीवावर आले होते.पण आमचे बोलणे ऐकून आर्य म्हणाला आज्जी पाव भाजी आहे नको का म्हणतेस जाऊया ना.अंजलीने ते ऐकले आणि ती म्हणाली पहा तुमचा नातूही म्हणतोय,केशाव्रव्ही आग्रह  करत आहेत,तुम्ही याच.आर्यसाठी  पार्किन्सन मित्रमंडळाच्या माझ्या मित्र मैत्रिणी घरच्याच होत्या.शेवटी आम्ही पावभाजी खायला गेलो.

                    अंजलीकडे  तिच्या नातवासाठी ठेवलेले खेळ होते.केशवरावांच्या बरोबर कॅरम खेळून झाले.अंजलीची उर्जा आणि आर्यची उर्जा घर दणाणून गेले होते.केशवराव खुश होते.इतक्यात आर्यचे लक्ष व्हीलचेअरकडे गेले.अंजलीने शंभरीच्या सासू बाईंसाठी कमोड असलेली व्हीलचेअर घेतली होती. त्यांच्यासाठी ती सोयीची होती.त्या ती वापरायला अजिबात तयार नव्हत्या.नवी कोरी व्हीलचेअर तशीच पडून होती.गरज असून व्हीलचेअर वापरण्यास तयार नसलेल्या अनेक शुभार्थीबद्दल आमची चर्चा चालू झाली.

                     उतारवयाच्या अनेकांना व्हीलचेअर पाहिली की निगेटिव्ह फिलिंग येते.कितीही सोयीचे असले तरी ती वापरताना आजार,अवलंबित्व याच भावना प्रकर्षाने येतात.लहान मुले मात्र निरागस असतात.त्यांच्या साठी ते खेळणेच.मी बसू का यावर असे  अंजलीला विचारत आर्य त्यावर बसलाही.घरभर त्यावरून फिरु लागला.

                     अंजलीला त्यांनी वापरत नसाल तर OLX वर विकून का टाकत नाही असा सल्लाही दिला.त्याचा सल्ला ऐकून आम्ही खूप हसलो.आमची व्हीलचेअर बाबतीतील चाललेली गंभीर चर्चा त्याच्या गावीही नव्हती. 

 

Monday 4 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ६

                                                        मर्म बंधातली ठेव ही -  ६

                     आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला कार पार्कमध्ये दोन खांबाना कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या आहेत.मी कपडे वाळत घालत होते आणि आर्य खुर्चीवर चढून पाय वर करून काहीतरी कारभार करत होता.मी त्याला पडशील उतर खाली म्हणत होते.तो म्हणाला, 'सरप्राईज आहे आज्जी' त्यांनी खुर्चीवरून उडी मारली आणि मोबाईल मध्ये घेतलेला फोटो दाखवला.

 त्यांनी काढलेला फोटो पाहून मी थक्क झाले.दोन दोर्यांच्या मधल्या फटीत बरेच महिने एक पक्षांनी बांधलेले छोटे घरटे होते.त्या द्रोणाच्या आकाराच्या घरट्यात दोन छोटी अंडी होती.इतके दिवस घरटी होती पण त्याची काहीच अडचण नसल्याने मी ते काढून टाकले नव्हते.त्यात अंडी असतील का असे कुतूहलही मला वाटले नव्हते.

काही दिवसांनी तो सांगत आला अंड्यातून पिलू बाहेर आले.त्याचा त्यंनी फोटो काढून आणला होता.पिलांची आई कधी येते पिलांना चारा घालते हे पाहण्यात तो रंगून जाई.नंतर पिले उडून कधी गेली समजलेच नाही.घरटे रिकामे होते.

यूएन मिशनवर ऑफ्रिकेत असलेल्या त्याच्या बाबांची पुण्यात बदली झाली.आणि गोळीबार मैदानातील Family accommodation वाले घर बदलून आर्य आता खडकीला राहायला गेला.घर सोडून जायच्या दिवशी काही सामान टाकायला श्रद्धा आली होती.खूप घाईत होती.आर्य पळत पळत मागच्या बाजूला गेला.आई अरे लवकर चल अशा हाका मारत होती.मी त्याच्या मागोमाग गेले तर खुर्चीवर चढून त्यांनी घरटे काढले होते. त्याच्या हातात ते रिकामे घरटे होते.

हल्ली बाईच कपडे वळत घालण्याचे काम करते.माझे मागे जाणे होत नाही.काल काही कामासाठी गेले तर मला तसेच घरटे त्या ठिकाणी दिसले.आर्यची प्रकर्षाने आठवण झाली.

 

No photo description available.No photo description available.

Thursday 10 August 2023

जीवेत शरद: शतम पराग

                                                    जीवेत शरद: शतम पराग

                   पराग,पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण,सुख समृद्धीचे जावो.

                बघता बघता पराग पन्नास वर्षाचा झाला.मला कॉलेजमध्ये असलेला पाठीवर सॅक घेतलेला पोरगेलासा पराग अजून आठवतो.लिहायला बसल्यावर अनेक आठवणी जाग्या झाल्या.जावई मुलासारखा असे अनेक जण म्हणतात. ज्यांना फक्त मुली आहेत अशावेळी तर हे नाते जोडले जातेच.पण मला मात्र असे ओढूनताणूनणून नाते जोडावे वाटत नाही.ज्याला नाव देता येत नाही असे पण छान आणि अत्यंत जवळचे नाते आमच्यात आहे.तो मला काकूच म्हणतो.तो जसे काही वेळा माझे कौतुक करतो.तसेच स्पष्टपणे चुकाही दाखवतो.एकदा तो मला म्हणाला काकू तुमचे सीरिअल बघणे फारच वाढलेले दिसतेय.त्यानंतर मी टीव्ही पाहणे थोडे कमी केले.त्याला ते माझे अध:पतन वाटत असावे. 

               लग्नाच्या आधीपासून सामाजिक शास्त्रे हा विषय आमच्यातील दुवा ठरला.त्यामुळे वैचारिक चर्चा होत.तो प्राध्यापक झाल्यावर आणखी जिव्हाळ्याचे विषय वाढले.लिखाण,संगीत हाही एक समान धागा.आई जसे आमचे काही वर्तमानपत्रात आले की जपून ठेवायची तसे मी त्याच्या लेखनाची कात्रणे जपून ठेवली आहेत.त्याचे भारतातील आणि अमेरिकेतील रीसर्च मॅग्झीन मध्ये लेखन छापून आले याचा मला अभिमान आहे पण त्याहीपेक्षा तरुण भारत पासून हिंदू सारख्या उच्च दर्जाच्या वर्तमानपत्रात त्याचे सर्वसामन्यांना आर्थिक साक्षर करणारे लेखन येते.तेंव्हा मला जास्त आनंद होतो.

           तो विकल्पवेध नावाच्या मासिकात काम करत होता तेंव्हा त्याने माझ्याकडून लेखन करवून घेतले. होते.याचवेळी तो प्राध्यापकीही करत होता.तो विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहे.आता तर डीनही झाला आहे.त्याच्याकडे विद्यार्थी पीएचडी करतात.शिकवताना तो नवनवीन प्रयोग करतो.अमेरिकेतील विद्यापीठातील त्याचे ऑफिस पाहून आम्ही खुश झालो होतो.पिटूने तेथे काही कुंड्या नेवून ठेऊन ती आकर्षक केली होती.

          शिवाजीमराठा मधली खेड्यापाड्यातील पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी असोत की अमेरिकेतील आणि आता दिल्लीतील मोठ्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी असोत या सर्वाना तो आपलाच वाटतो. इतरांशी संवाद साधण्याचे त्याचे कौशल्य इतरत्रही तो वापरतो.त्यामुळे सर्वांवर त्याची प्रथमदर्शनी छाप पडते. ह्यांचे मित्र हेरेकर यांच्याकडे न्यू जर्सीला पराग घेऊन गेला होता.तेथेही त्यानाही परागने इम्प्रेस केले.

            पुण्यात आम्ही त्याच्याबरोबर गोव्याला गेलो होतो.वाटेत सरूकडे थांबा असतो.सरू नव्हती म्हणून मीनाकडे झाला.आम्ही मीनाकडे इतक्यांदा गेलो तरी वर जाऊन सर्व घर कधी पाहिले नाही. परागने मात्र ते केले.तो खुश झाला होता.त्याला विविध गोष्टींचे कुतूहल असते.कोठे जाईल तेथे तो लगेच मिक्स होतो. त्यामुळे ही तो सर्वाना आवडतो.

          अमेरिकेला आम्ही दोन महिने राहिलो तेंव्हा त्याचा जास्त सहवास मिळाला.विमानतळावर दोघे न्यायला आले होते.दोघांचे आनंदाने भरलेले चेहरे मला अजूनही आठवतात.त्या क्षणा पासून परत येइपर्यंतची आमची ट्रीप अत्यंत अविस्मरणीय झाली.पिट्टूनी  आम्हाला झेपेल,आवडेल अशी ठिकाणे निवडून नियोजन केले होते.तिचे थिसीसचे काही काम व्हायचे होते.परागला मात्र सुटी होती.त्यामुळे बर्याच वेळा पराग आमच्याबरोबर असायचा.त्यांनी छान खातिरदारी केली.

                आम्ही चौघांनी मिळून विविध विद्यापीठे, शाळा पाहिल्या.नायगारा ट्रीपही चौघांनी केली.त्यावेळचे क्षण नि क्षण आठवतात.परागच्या ड्रायव्हिंगमुळे आणि ड्रायव्हिंग करताना परागला Entertain  करण्यासाठी विविध भेंड्या आणि Gossips मुळे मजा यायची. 

          न्युबेडफर्डला त्यांचा Flat होता तेथे खाली एक थियेटर होते.कोणताही सिनेमा पहायचा तर आपल्याकडील सीडी नेऊन तो पाहता यायचा.तेथे आम्ही तिघांनी काही सिनेमी पाहिले.पराग तयार पाकिटे मिळतात त्याचे पॉपकॉरन करायचा आणि ते खात आम्ही पिक्चर पाहायचो.त्या थियेटरचा फायदा घेणारे फक्त आम्हीच असू.

        आम्ही बाख फ्लॉवर रेमेडीची बाखच्या पुस्तकातील Repertory मराठीत भाषांतरित  करण्याचे काम घेऊन गेलो होतो.ही १५० पानांची होती.मी शब्द सांगायची आणि हे सुवाच्य अक्षरात लिहायचे. एखाद्या शब्दाचा अर्थ आला नाही तर पराग डिक्शनरी पाहून नेमका शब्द सांगायचा.ही प्रोसेसही आम्ही खूप एन्जॉय केली.

            त्याला खाण्याची आवड असल्याने आपण अमेरिकेत त्याला काही करून घालू असे मला वाटायचे.किचन मध्ये दुसर्याची लुडबुड त्याला आवडायची नाही मला प्रत्यक्ष सांगू शकायचा नाही.पिटूकडे भुणभुण करायचा. शेवटी तिने दोघांना समोर बसवून सांगितले.मग तो मेन शेफ आणि मी त्याची असिस्टंट असे ठरले.सकाळीच विचारायचे काय आज्ञा? आणि तो सांगेल तेवढे मी करायची. भाज्या चिरणे,पोळ्या करणे अशी कामे मी करायची.तेथे खतखते,गड्डा दबदबित असे अस्सल बेळगावी पदार्थ आम्ही केले.त्याला सगळे सारस्वती पदार्थ आवडतात.आजही त्याचा फोन आला की समजावे कोठलीतरी रेसिपी पाहिजे.

            भारतात आल्यावर आता पुण्यात येणे आणि राहणे कमी झाले. तो खूप बिझी झाला आहे.पण पिटूशी बोलताना गप्पा ऐकणे त्याला आवडते.

          खर तर कितीतरी आठवणी आहेत.मलाच त्या नेमाक्या शब्दात मांडता येत नाही आहेत.पराग, काही गोष्टी सांगायच्या आहेत.गाण्याचा रियाज सोडू नकोस आणि सोशल मिडीयावर सत्य असली तरी स्फोटक विधाने करू नकोस.व्यायामाचा आळस करू नकोस.

 आनंदी रहा.यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत कर.जीवेत शरद: शतम.

 

           

              

Saturday 15 July 2023

मर्म बंधातली ठेव ही - ५

                                                      मर्म बंधातली ठेव ही - ५

                       आज मैत्रिणींच्या ग्रुपवर कोरांटीच्या फुलाचा फोटो आला आणि मला आर्यनी काढलेल्या एका फोटोची आठवण झाली.तो सात आठ वर्षाचा असेल.

आम्ही रस्त्यांनी चाललो होतो.रस्त्यात पडलेले एल फुल दाखवत आर्य म्हणाला 'आज्जी थांब थांब. किती सुंदर फुल आहे बघ'.माझ्या हातातील मोबाईल घेऊन त्यांनी फोटो काढला. फुल कोरांटीचे होते.आज ग्रुपवर आलेल्या रंगाचेच होते.आमच्या जवळ राहणाऱ्या ओबेरॉय यांच्याकडे कोरांटीची झाडे होती ती मी त्याला दाखवली.फुलांनी भरलेली झाडे पाहून तो हरकून गेला.लहनपाणापासून विविध रंगातील कोरांटी पाहिली होती.मला यात कधी सौंदर्य का दिसले नाही? आता आर्यनी म्हटल्यावर मला खरच सुंदर आहे की असे वाटले.

आमच्याकडे बेळगावला या फुलांना घोरटी म्हणतात.नवरात्रात पहिले दिवशी एक दुसरे दिवशी दोन अशा वाढत्या माळा घटावर सोडतात.त्या घोरटीच्या असायच्या.कारण याची पाने गळत नाहीत.फुले हलकीही असतात.त्याच्या कळ्यांच्या  केळीच्या दोर्यात वेण्या केल्या जायच्या.दुसरे दिवशी फुले फुलायची

 सुंदर फुल म्हणजे कधी कोरांटी असे मात्र डोळ्यासमोर आले नाही.गुलाब आणि सुंदर सुवासाची मोगरा,जाई,जुई,चाफा,निशिगंध यांचीच आठवण येते.भा.रा.तांबेनीही "मधु मागसी माझ्या" कवितेत "देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी" असे म्हटले त्यामुळे कोरांटीचे मनात जरा खालचेच स्थान असावे.आर्यची पाटी मात्र कोरी होती.उघड्या डोळ्यांनी तो आजूबाजूला पाहत होता.आमच्या बागेतील,समोरच्या सार्वजनिक बागेतील बारीक सारीक सौंदर्यस्थळे तो निरागसपणे दाखवायचा.नकळत मला संदेश जात होता उघड डोळे आणि आजूबाजूला बघ निट.त्याच्या सहवासात जगण्यात आलेला कोरडेपणा जात होता. 

 



Friday 23 June 2023

मर्म बंधातली ठेव ही - ४

                                              मर्म बंधातली  ठेव ही - ४

                   पावसाची वाट पहात जून सरत आला. सर्व हवालदिल. आणि आज अचानक तो आला.आपल्याला उकाडा कमी होण्याचे पडलेले असते.आपण आपल्या संकुचित विश्वात.मला या परीस्थितात माझा नातू आर्यच्या लहानपणीच्या एका प्रसंगाची आठवण येते.

                   तो सहा, सात वर्षाचा असेल. शाळा सुटली की आई ऑफिसमधून येईपर्यंत आमच्या कडे असायचा.आमची पार्किन्सन मित्रमंडळाची सभा असली की आमच्याबरोबर यायचा.रिक्षात दांडीला धरून उभा असायचा.

                  असाच बरेच दिवस पाऊस नव्हता.आम्ही अश्विनी लॉजमध्ये असलेल्या सभेला चाललो होतो.लक्ष्मी नारायण थियेटर पर्यंत आलो आणि अचानक जोराचा पाऊस सुरु झाला.आता सभेला लोक कसे येणार हा पहिला विचार माझ्या मनात आला.आणि त्याच क्षणी आर्य म्हणाला आज्जी शेतकर्यांना किती आनंद होईल ना? त्याचा चेहरा आनंदाने चमकला होता.तो आजही माझ्या डोळ्या समोर आहे.मला चपराक मारल्यासारखे झाले. मी त्याला म्हटले, तुला असे का वाटले? तो म्हणाला मम्मा बातम्या पहात होती तेंव्हा मी पहिले होते. शेतकरी दु:खी होते.

                तो असे शुद्ध मराठी बोलला की मला त्याचे कौतुक वाटायचे. त्यांनी शेतकरी शब्द वापरलेला पाहूनही मला आश्चर्य वाटले. तो आर्मी पब्लिक स्कूल मध्ये जायचा.आजूबाजूला मराठी बोलणारे नाहीत.हल्ली इंग्लिश मिडीयमला जाणार्या मुलाना रोजचे व्यवहारातील शब्दही माहित नसतात.इंग्रजी शब्दांचा वारेमाप वापर करतात.

              त्याचे हिंदी भाषिक दादा, दादी आले की तो त्यांच्याशी शुद्ध हिंदीत बोलतो.आणि आमच्याशी मराठीत.याचे मला कौतुक वाटते.

            त्याची आई आल्यावर तिला ही रिक्षातील घटना सांगताना माझा चेहरा खुलला होता.तिचे म्हणणे असते मी अतिशयोक्ती करते.पण माझ्याकडे पुरावा होता.माझी मैत्रीण निरुपमा त्यावेळी माझ्याबरोबर रिक्षात होती.तिनेही त्याचा चमकलेला चेहरा पाहिला होता.

           आर्य कितीही मोठ्ठा झालास तरी तुझ्यातले हे माणूसपण,Empathy हरवू देऊ नकोस.            

Monday 19 June 2023

आनंदी वृद्धत्व - ११

                                               आनंदी वृद्धत्व -  ११

             काही व्यक्ती कितीही अडचणीचे प्रसंग येवोत, समस्या येवोत.हतबल न होता.रडगाणे न गाता आपली आनंदी वृत्ती कायम ठेऊ शकतात.आमच्या शुभंकर ( Care taker ) जोत्स्ना सुभेदार त्यातील  त्यातील एक.आत्तापर्यंत मी हजारो शुभंकर,शुभार्थींशीबोलले असेन.प्रत्येकाची काही तरी समस्या असते.मन मोकळे करायचे असते.त्याला माझाही अपवाद नाही.मीही इतर शुभंकरांकडे मन मोकळे करते.जोत्स्नाताई हे वेगळेच रसायन आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर त्यांचे पती शुभार्थी ( पेशंट ) रामचंद्र सुभेदार यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला. त्यावर जोत्स्ना ताईंची व्हाइस मेसेज द्वारे प्रतिक्रिया आली.आज ८९ वर्षे पूर्ण झाली.वयोमानामुळे समस्या थोड्या वाढल्या आहेत,आवाज गेलेला आहे.गिळता येत नाही म्हणून सहा महिन्यापासून ट्यूब द्वारे फीडिंग करावे लागते.बाकी इतर काही कॉम्प्लिकेशन नाही त्यामुळे तब्येत बरी आहे.सकाळी व्हिल्चेअरवरुन खाली फिरायला नेतो.झोपूनही ते हातपाय हलवत व्यायाम करतात.केअरटेकर चांगला मिळाला आहे.मुलगाही खूप  चांगल पाहतो सगळे छान चाललय.आनंदी कावळ्याच्या गोष्टीसारखे जोत्स्नाताई कायम आनंदीच असतात.कितीही कठीण परिस्थिती आली तरी कुरकुर न करता त्या परिस्थितीतल्या जमेच्या बाजू हे पतीपत्नी पाहतात असे वेळोवेळी मी पाहिले आहे. 

               ज्योस्नाताईनी पाठवलेल्या वाढदिवसाच्या फोटोत सुभेदार यांनी सिल्कचा झब्बा आणि धोतर घातले होते.नाकाला लावलेल्या ट्यूबसकटचा त्यांचा फोटो पाहून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक वाटले.आमच्या शुभंकर आशा रेवणकरनी 'सकारात्मकतेचे शिखर' असे फोटो पाहून प्रतिक्रिया दिली. ते अगदी खरे आहे.आम्हाला तुम्ही हवे आहात हे कुटुंबियांच्या.कृतीतून दिसले की शुभार्थीलाही जगण्यासाठी उर्जा मिळते.

             पार्किन्सन मित्रमंडळ आणि दिनानाथ हॉस्पिटलमध्ये चालणारा PDMDS चा स्वमदत गट या दोन्ही स्वमदत गटांचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला.

वर्गात पहिल्या बाकावर बसून शिक्षकाच्या प्रत्येक प्रश्नाला हात वर करणाऱ्या सिन्सियर विद्यार्थ्यासारख्या त्या मला वाटतात.           

            प्रत्यक्ष सभा,ऑनलाईन सभांना जास्तीत जास्त उपस्थिती कोणाची? - जोत्स्ना सुभेदार

युट्यूब वरील सर्व व्हिडिओ कोणी पहिले आहेत.- जोत्स्नाताई सुभेदार

पार्किन्सनवर लिहिलेले आमचे सर्व लेखन कोणी वाचले आहे ?-जोत्स्नाताई सुभेदार

शुभार्थीचे करताना स्वत:ला आणि कुटुंबियाना स्पेस देणे कोणाला जमले आहे?.ज्योत्स्नाताईना

पार्किन्सनसह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य आचरणात आणणे कोणाला जमले आहे? अर्थात जोत्स्नाताई सुभेदार यांना.

पत्नी, आई,शुभंकर,आज्जी,विद्यार्थिनी,मैत्रीण,पेशंट अशा सर्व भूमिका त्या चोख बजावतात.यात अजिबात अतिशयोक्ती नाही.

रामचंद्र सुभेदार हवामान खात्यात India Meteorological Department मधून असिस्टंट Meteorologist म्हणून निवृत्त झाले.शेतीची आवड,निवृत्तीनंतर घरची शेती करायला मध्यप्रदेशात आले.काही समस्या निर्माण झाल्याने आवडीचे काम सोडून पुण्यात आले. पुण्यात ११ वर्षे  मुलीकडे  होते.मुलगा ,सून आर्मीमध्ये.सारख्या बदल्या होत.मुलगा निवृत्त झाल्यावर दिल्लीला घेऊन गेला.अशी विविध ठिकाणी स्थलांतरे झाली तरी या दोघांना सर्वांशीच जमवून घेता आले.आणि तेही सर्वांना हवेशे वाटले.

 पुण्यात आल्यावर  ते  व त्यांचे पती गीता संथा वर्गात दाखल झाले संस्कृतची किंवा गीता पठणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.२०१८ मध्ये जोत्स्नाताई गीता धर्म मंडळाच्या 'संपूर्ण  गीता कंठस्थ परीक्षे'त ९३.९ % गुण मिळवून तिसऱ्या आल्या.त्यावेळी वय होते ७८. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचा अडसर येत नाही हे त्यांनी दाखवून दिले.शृंगेरीला जाऊन दिलेल्या गीता पठ्णाम्ध्ये त्यांना २१००० रु.बक्षीस मिळाले.अधिक महिन्यात त्यांनी गीतेचे ३३ पाठ केले.  

अश्विनीमधल्या आणि नर्मदा हॉलमधल्या सर्व सभांना त्या पतीना घेऊन हजर असत.काही दिवसानी त्यांच्याबरोबर केअरटेकर असे.सहलीलाही सक्रीय सहभाग असे.झूम मिटिंग सुरु झाल्या त्यातही त्यांचा पहिल्या पासून सहभाग होता.

मध्यंतरी त्या सुभेदाराना सावरत असताना स्वत:च पडल्या.खुब्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागली.माझे ऑपरेशन आहे सभा अटेंड करु शकणार नाही म्हणाल्या होत्या.परंतु सभेत नेहमीप्रमाणे उपस्थिती पाहून मला आश्चर्य वाटले.ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी सभेला हजेरी लावली होती.त्या काळात दोघा पतीपत्नीना वेगवेगळे केअर टेकर होते.मुलगी आणि जावई यांनी घेतलेली काळजी,सकारात्मक विचार यामुळे त्या लवकर बऱ्या झाल्या.बऱ्या झाल्यावर त्यांचा मेसेज आला. माझ्याकडे काम करणारी केअरटेकर चांगली आहे कोणाला हवी असेल तर फोन देत आहे.मेसेज ग्रुपवरही टाकला.तिला काम मिळावे आणि कोणाला तरी चांगली केअर टेकर अशी त्यांची मनापासून इच्छा होती.                       

लेखन,व्हिडिओ,सहल, कोणताही कार्यक्रम यावर लगेच त्यांची त्या त्या व्यक्तीला व्यक्तिश: प्रतिक्रिया असते.मी त्यांच्या कोणत्याच प्रतिक्रिया,फोटो,व्हाइस मेसेज गाळले नाहीत.ते पाहून मलाच उर्जा मिळते.पुणे सोडून दिल्लीला निघाल्या तेंव्हा भावूक झाल्या होत्या.ऑनलाईन मिटिंग,मेसेज, फोन द्वारे भेटत राहिल्या.त्यावेळची सुभेदार यांची परिस्थिती पाहता त्याना प्रवास कसा झेपणार असे वाटत होते.पण दोघे सुखरूप दिल्लीला पोचले.

 आमचे एक शुभंकर रमेश तिळवे औरंगाबादहून पुण्यात येणार होते अचानक गेटटुगेदर ठरले.आपण पुण्यात नाही याची त्याना हळहळ वाटत होती.त्यांचा व्हिडीओ कॉल आला  रमेश भाऊनी सर्वकडे फिरवून कोणकोण आले आहे, कशी सभा चालले हे दाखवले. माझ्याशी बोलल्या.दुधाची तहान ताकावर भागवली.१७ ऑक्टोबरला कोजागिरीचा ऑफलाईन कार्यक्रम चुकल्याचेही त्याना वाईट वाटत होते. त्यांचा मुलगा म्हणाला पुण्याची इतकी आठवण येते तर मी बाबांना पाहतो तू थोडे दिवस जाऊन राहून ये.

नवनवीन पदार्थ करण्याची त्यांना आवड आहे असे पदार्थ केले की त्या फोटो पाठवतात.एकहा रसमलाई बनवली त्याचा फोटो आला कृतीही सांगितली.मुला नातवंडाना नवीनवीन पदार्थ करून घालताना त्याना आनंद मिळत होता.दिवाळीत स्वत: केलेल्या फराळाचा फोटो त्यांनी पाठवला होता.खूप वर्षांनी मुलांसाठी फराळ करता आला यासाठी त्या खुश होत्या.

या वयात कसे काय जमते तुम्हाला असे विचारल्यावर 'होते तोपर्यंत करत राहायचे आणि करत राहिले की होत राहते असेही त्यांनी लिहिले होते.आता त्यांचे वय वर्षे ८३. मी स्वत: अजिबात फराळ करायचा नाही सर्व विकत घ्यायचे ठरवले होते पण त्यांचा हा विचार वाचल्यावर मलाही उत्साह आला.आणि थोडा फराळ केला.

एकदा फोन केला तर त्या मुलाबरोबर पत्ते खेळत होत्या.मुलगा आणि सून जवळच राहतात. सून डॉक्टर आहे.मुलगा सकाळी फेरी मारून जातो.नंतर जेवायला येतो आईशी पत्ते खेळतो.२४ तास केअरटेकर आहे.तो छान सांभाळतो असे जोत्स्नाताई सांगतात.इतरेजनांच्या केअरटेकरबद्दल अनेक तक्रारी असताना यानाच चांगला केअरटेकर कसा मिळतो असा प्रश्न पडू शकतो.पण येथे मुद्दा असतो दृष्टीकोनाचा आणि केअरटेकरशी तुम्ही कसे वागता त्याचा.जोत्स्नताईंच्या सहवासात माणूस बदलून जात असावा.

 त्यांचा उत्साह, सकारात्मकता वेळोवेळी माझ्यापर्यंत पोचली ती तुमच्यापर्यंत पोचवावी यासाठी हा लेखन प्रपंच.

 




 

Monday 22 May 2023

मर्म बंधातली ठेव ही ३

                                               मर्म बंधातली ठेव ही  ३

                                              माझ्या मागे मागे मांजरी सारखा फिरणारा आर्य बघता बघता किती मोठा झाला. आज त्याचा दहावीचा उत्तम रिझल्ट ऐकल्यावर 'किती सांगू मी सांगू तुम्हाला' असं होऊन गेलं. निकाल पाठवला आणि तासाभराच्या आत स्विगीकडून श्रद्धा ने आनलाईन पाठवलेले चितळे बंधूंचे पेढेही आले. आज सगळी सकाळ ओळखीच्या आणि अनोळखी लोकांनाही पेढे वाटण्यात गेली. व्हाटस्अप वर मेसेज टाकणे,प्रतिक्रिया वाचणे चालूच आहे.

आर्यच्या कितीतरी आठवणी दाटून आल्या. आजी तुझ्या कुठे लागतो बघू असं सारखा म्हणायचा.आता खांद्यापर्यंत, आता डोक्यापर्यंत असं म्हणता म्हणता माझ्यापेक्षाही उंच झाला. माझ्या मांडीवर येऊन बसायचा नंतर थोडा मोठा झाला तरी तो आला की मांडीवर बसून फोटो काढणे हे व्हायचेच. टीनेजर झाल्यावर आजीच्या मागे फिरणं, आजी-आजी करणं कमी झालं पण मांडीवर बसून फोटो काढणं मात्र चालूच राहिलं आणि त्यासाठी तो कधी नाही म्हणाला नाही. तेवढाच बालपणाचा धागा.हा त्याचा मांडीवर बसलेला लेटेस्ट फोटो.
पुढील आयुष्यासाठी खुपखुप आशिर्वाद आणि शुभेच्छा!


Saturday 4 March 2023

प्राउड ऑफ यु क्षितीज

                                                        प्राउड ऑफ यु क्षितीज

                         माझ्यामागे आज्जी हे बिरूद लागले त्याला आज २५ वर्षे झाली.क्षितीज माझा पहिला नातू आज २५ वर्षाचा झाला.आता पीएचडी करत आहे.नुकताच आयर्लंडहून IEEEच्या कॉनफरन्ससाठी भारतात आला होता.इतक्या मोठ्या कॉनफरन्ससाठी त्याचा पेपर निवडला गेला याचे मला अप्रूप वाटत होते.तो मात्र कुल होता.त्याच्या आई, बाबापेक्षा उंच झालेल्या क्षितीजकडे मला मान वर करून पहावे लागत होते.बघता बघता किती मोठ्ठा झाला. माझ्या डोळ्यासमोर मात्र दुपट्यात गुंडाळलेला तान्हा, सोनालीने स्वत: तयार केलेल्या कापडी चिमण्या हलताना पाहून जोरजोरात पाय आपटून खेळणारा,तल्लीन होऊन ड्रम वाजवणारा,आज्जी गोष्ट सांग म्हणणारा,कल्हईवाल्याची कल्हइ करताना कमरेवर हात घेऊन कुतूहलाने पाहणारा,मला पास्ता करून खायला घालणारा,स्वत: रचून गणिताची कोडी घालणारा,जादूचे खेळ करून दाखवणारा अशी त्याची लहानपणापासूनची अनेक गोजिरी रूपे तरळत होती.

                         क्षितीज जो काही माझ्या वाट्याला आला तो खूप क्वालिटी टाईम होता. तो आमच्याकडे फारसा रमायचा नाही. एक तर त्याच्या बिल्डींग मध्ये त्याची खूप मित्रमंडळी होती. येथे कोणीच नव्हते.शिवाय त्याचे तीथले आज्जी आजोबा भक्कम होते.त्यांचा त्याला खूप लळा होता. तो म्हणायचा ते रिअल आज्जी, आजोबा आणि तुम्ही डूप्लीकेट.आज्जी त्याला खूप छान गोष्टी सांगे आणि अब्बू त्याला कोठेकोठे घेऊन जात.ते स्वत: सायंटीस्ट,शिकवायची आवड.त्याच्या विविध प्रश्नांचे निरसन होई. रेल्वे स्टेशन,फायर ब्रिगेड असे काहीकाही दाखवत विविधांगी ज्ञान देत.            

            अगदी लहानपणापासून विविध गाड्यांची आवड होती.डम्पर आणि एक्सेवेटर ही तर आवडीची. पुण्यात रस्त्याची कामे सारखी चाललेलीच असतात.आजोबा त्याला तेथे घेऊन जायचे आणि तो तासन तास पहात राहायचा.आमच्याकडे असे काम चालले होते तेंव्हा तो आवडीने राहिला आणि इतराना आवाजाचा त्रास होत असला तरी मला मात्र ते काम संपूच नये असे वाटत होते.

एकदा तो आमच्याकडे आला असता माझे विद्यार्थी आणि जे.जे स्कूल ऑफ आर्टचे प्रोफेसर डॉ.गजानन शेफाळ आले होते.क्षितीजची चित्रकला चालू होती.ते म्हणाले वयाच्या मानाने फारच सुंदर.तो मोठ्ठा चित्रकार होईल.त्याला सोनालीने चित्रकलेच्या क्लासला घातले.शिक्षक आवडले तरच तो शिकायला तयार असायचा.त्याची चित्रकला बंद पडली तरी हातातली जादू थोडीच जाणार गणपतीत आदले दिवशी गौरीचा मुखवटा लागतो त्याचे त्याने सुंदर चित्र बनवले.आणि आता दरवर्षी बनवतो.

मसुरकर नावाचे दुसरे एक विद्यार्थी मोटारजगत नावाचे मासिक काढतात. त्याचे गाड्यांविषयी ज्ञान पाहून त्याना कौतुक वाटले.ते आपले मासिक त्याला दर महिन्याला पाठऊ लागले.

 मुले मोठ्ठी होऊ लागली की आजी आजोबांच्या वाट्याला कमीच येतात.तो विविध उद्योगात रमलेला असायचा. सायकल चालवायला लागला. स्कूटरही चालवायला लागला.एनसीसीचा ड्रेस घालून ऐटीत एनसीसीत सामील होऊ लागला.फुटबॉल खेळू लागला,हॉकी टीममध्ये निवडला गेला.हे सर्वच करतात पण मला त्याचे कौतुक वाटणारे,अभिमान वाटणारे  काम म्हणजे त्याचे कार्पोरेशनच्या शाळेतील मुलाना इंग्रजी शिकवणे.आणि एका अत्यंत क्रिटीकल परिस्थितीत त्याचे कोणत्याही दबावाला बळी न पडता ठामपणे सत्याच्या बाजूने उभे राहणे. काही गोष्टी सांगता येत नाहीत.म्हणून येथे लिहू शकत नाही.लहान वयातील त्याची ही समज आणि कृती चकित करणारी होती.आणि त्याचा त्याला निर्णय घेऊ देणाऱ्या त्याच्या आई,बाबांचेही कौतुक होते.

              त्याच्या मुंजीच्या आधी इन्नाने ( तो आईला इन्ना म्हणतो.) आम्हालाही त्यांनी आमच्या झेन गाडीवरून अगदी छोटा असतानाच झेन आज्जी आणि झेन अब्बू असे नाव दिले आहे.झेन आता नाही पण अजूनही तेच नाव कायम आहे.तर काय सांगत होते,मुंजीच्या आधी इन्नाने संस्कार म्हणून अनेक क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घडवल्या.स्कुबा डायव्हिंग,अँनिमल सायकालॉजी,अर्कीऑलॉजी अशी काही उदाहरणे देता येतील.

आज्जीच्या गोष्टी,आब्बू आणि त्याच्या बाबाची प्रत्यक्ष कृती आणि आईचे जाणीवपूर्वक आणि त्याच्याही नकळत संस्कार करणे चालू होते.टीनेजर असताना सर्वच मुलांचे थोडे तंत्र बिघडते पण नकळत झालेल्या संस्कारांची मुळे अंतर्मनात रुजलेली असतातच.

               खर्या अर्थाने त्याच्याशी माझी मैत्री झाली ती जेंव्हा,जेंव्हा आम्ही त्याच्याकडे राहायला गेलो तेंव्हा.सोनालीने तिच्याकडे आम्ही रहायला जायचे हेच तिचे माहेरपण.अशी माहेरची नवीन व्याख्या केली आहे.क्षितीजनेही बहुदा आजोळची अशीच व्याख्या केली.कारण आमच्याकडे तो फारच थोडा राहिला.माझ्या एका शस्त्रक्रियेनंतर माझे काहीही न ऐकता हॉस्पिटलमधून सोनाली तिच्या घरी घेऊन गेली.लेकीचे माहेरपण आणि नातवाचे आजोळपण या दोन्हीची संधी मिळाली.आजार माझ्यासाठी इष्टापत्ती ठरली.

              तो शाळेतून आला की त्याच्याशी बे ब्लेड खेळण्यात वेळ छान जायचा. अर्थात कायम हरायची मीच.बे ब्लेड मी प्रथमच पाहत होते.माझ्यासारख्या कच्च्या खेळाडूबरोबर तो खेळायचा हेच विशेष.त्याला वाढदिवसाला मी मराठी पुस्तकेच भेट द्यायची मराठी वाचावे हा हेतू. त्यांनी मराठी वाचावे म्हणून आई आणि आज्जीने जंग जंग पछाडले पण त्यांनी काही दाद दिली नाही.जाडजूड इंग्लिश पुस्तकांचा मात्र फडशा पडू लागला.

मी त्याला बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा आणि विश्वास पाटलांचे महानायक दिले होते. रोज रात्री तो म्हणायचा आज्जी गोष्ट सांग.आता लहनपणी सांगायच्या त्या गोष्टी चालणार नव्हत्या.मी त्याला म्हटले ही पुस्तके मी तुला वाचून दाखवते.तो म्हणायचा नको.तू वाच आणि मसाला लावून सांग.मग असेच सुरु झाले.नावे, प्रसंग सर्व लक्षात ठेवून मला सांगावे लागे.मी अगदी झोपेत असताना त्याचे आज्जी गोष्ट सांग म्हणून येणे आजही माझ्या कानावर आहे.

मी त्याला मराठी वाचायला मागे लागायची .तो एकदा म्हणाला तू कुठे इंग्रजी वाचते? त्याचे आव्हान स्वीकारून मी त्याच्याकडे असलेले हॅरी पाॅटरचे सर्व खंड वाचले.यातून एक छान झाले त्याच्याशी चर्चेला छान विषय झाला.आमची मैत्री झाली. त्याच्या पिढीशी जोडले जाण्यासाठी त्यांच्या विश्वात जायला हवे असे लक्षात आले.मी त्यातील पात्रांचे गंमतशीर उच्चार करायची.Platform 9 and Three Quarters at kings Cross Station अशा काही गोष्टी डोळ्यासमोर यायच्या नाहीत.यासाठी आम्ही सर्वांनी मग एकत्रित हॅरी पाॅटर सिनेमा पाहिला.अनेक गोष्टी उलगडल्या.इतरही अनेक क्लासिक हिंदी,इंग्रजी सिनेमा एकत्रित पाहायला लागलो.तो आता ड्रम शिकत होता.ते वाजवून दाखवू लागला.हार्ड रॉक कॅफे मध्ये त्याचे कार्यक्रमही झाले.

 इन्नाने त्याला कॅमेरा दिला. तो आजूबाजूच्या निसर्गाचे छान फोटो टिपायचा. आज्जी आज्जी करत दाखवायला यायचा.त्याची सौंदर्य दृष्टी मला थक्क करायची.झेन अब्बुच्या चपला त्याच्या पायात येऊ लागल्या. त्यांचे घड्याळ आणि चपला घालून जायला त्याला आवडायला लागले.आम्हाला पास्ता करून खायला घालायला लागला.त्याच्याबरोबर मी खाली जाऊन सोसायटी क्लबहाउसच्या बाहेर बसायला लागले. तो खेळत असायचा ते पाहत बसायची.दुसऱ्या आजारात आम्ही राहायला गेलो तेंव्हा कॉलेजला जायला लागला होता.

घरापासून भारती विद्यापीठ खूप लांब. छोट्या गाड्यांशी खेळणारा क्षितीज आता सराईतपणे गाडी चालवू लागला. कॉलेजमध्ये गाडी घेऊन जाई.तेथेही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळालेला रद्द करून हवा तोच कोर्स त्यांनी निवडला.या चार वर्षाच्या कोर्स मध्ये प्रत्येक सेमिस्टरला डिस्टिंक्शन मिळाल्यास चवथ्या वर्षाला 'टेकनिकल युनिव्हर्सिटी ऑफ शेनॉन मिडलॅंड मिडवेस्ट' येथे प्रवेश मिळणार होता आणि त्या युनिव्हर्सिटीची बीईची डिग्री मिळणार होती.तसे न झाल्यास भारती विद्यापीठात तीन वर्षे झाल्यावर  बीएससीची डिग्री मिळणार होती.यात मोठी रिस्क होती.पण त्याने ती स्वीकारली.

यावेळी तो घरी कमी असायचा.आमच्या वाट्याला कमी यायचा.जिंजर हा नवा पाहुणाही आला होता.हा बोकोबा म्हणजे क्षितीजजे आज्ञाधारक बाळच.तो येण्याची जिंजरला बेल वाजण्यापुर्वीच चाहूल लागायची.त्याचे लाड करण्यात क्षितिजही रमायचा.

असे इतर व्याप असले तरी मला किमोला जावे लागे तेंव्हा सोनाली माझ्याबरोबर आणि तो अब्बुला छान सांभाळायचा.आता अब्बुला एकट्याला बाहेर जाणे शक्य नव्हते तर केस कापायला,इतर काही गरज लागली तर प्रेमाने घेऊन जायचा. अलीकडे नातवंडे आज्जी आजोबाना आईवडिलांना उलटून बोलणे,त्याना कमी लेखणे,त्यांचे न ऐकणे असे करताना दिसतात.क्षितीजचे वागणे मात्र घरातले असोत किंवा बाहेरचे असोत सर्वांकडे अत्यंत डीसेंट असेच होते आणि अजूनही आहे. 

यावेळी त्याचा रिझल्ट लागला.तो डीस्टीन्गशन मध्ये पास झाला होता.निकाल सांगून त्याने नमस्कार केला.निकाल ऐकणारी मी पहिली होते. त्याचा खुललेला चेहरा मला अजूनही आठवतो.           क्षितिजला सर्व सेमिस्टरला  डिस्टिंक्शन मिळाले आणि तो आयर्लंडला.इंजिनिअरिंगच्या चवथ्या वर्षाला रुजू झाला इतर मित्रमंडळीही होती.घर सोडून न जाणारा क्षितीज तेथे रमु शकेल का अशी भीती वाटायची पण तो रमला.स्वत: केलेल्या पाककृतीचे फोटो यायला लागले.बघता बघता पदवीधारक झाला.एम.एस.ला प्रवेश घेतला. इतर मित्रांनी पदवीवरच थांबणे पसंत केले.

 करोना काळात तर जवळचे विद्यार्थी आपापल्या घरी गेले हा एकटाच होस्टेल मध्ये होता.त्यावेळचे वातावरण अधांतरीच होते.केंव्हा कोठे जाण्यावर निर्बंध येतील सांगता येत नव्हते.आता संगणक फोन हेच काय ते मित्र राहिले.यात एक झाले एखादा विषय घेऊन खोलात जाऊन अभ्यास करणे सुरु झाले.प्रोजेक्ट गाईडशी मैत्री झाली.

त्यांनी आर्टीफिशियल इंटलीजन्स साठी पार्किन्सन मधील मास्क लाईक म्हणजे भावनाविहीन चेहरा या लक्षणाची निवड केली.त्यात तो काय करणार आहे हे मला समजले नाही.त्याला विचारले की तो म्हणतो झाले की सर्वात पहिला तुलाच सांगीन.

एम.एस. पूर्ण होऊन ऑनलाईन पदवीदान समारंभ झाला.तो आम्ही येथे बसून पाहिला.स्टेजवर येणाऱ्या भारतीय मुलांचे गमतीशीर नाव घेतले जात होते.क्षितीजचे मात्र क्षितीज सलील मालवणकर असे व्यवस्थित नाव घेतले.उच्चार कठीण असूनही तो निट केलेला पाहून मला आश्चर्य वाटले.नंतर समजले अनाउन्स करणारे त्याचे गाईड होते. आणि क्षितीजने त्याना नीट उच्चार समजाऊन सांगितला होता.मला शिक्षक विद्यार्थी यांच्यातील अशा मोकळ्या रिलेशनचे अप्रूप वाटले.

एम.एस. झाल्यावर त्याचा पीएचडी करण्याचा निर्णय आमच्यासाठी सुखद धक्का होता.आता तो पीएचडी करताना शिकवण्याचेही काम करतो.माझ्या लाईन मध्ये आला म्हणून मला छान वाटले.

मध्ये एकदा भारतात आला तेंव्हा भेटून गेला आता तो छोटा क्षितीज राहिला नव्हता.पुन्हा आला तो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे IEEE च्या जयपूरला होणाऱ्या इंटरनॅशनल सेमिनार मध्ये त्याचा पेपर निवडला होता म्हणून.

त्याला आता आपल्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट आहे.आज २५ व्या वाढदिवशी भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा! यशाची शिखरे गाठताना तुझ्यातील कलाकार, संवेदनाशील माणूस हरवू देवू नकोस.


                   

Friday 27 January 2023

मर्म बंधातली ठेव ही २

                                                   मर्म बंधातली ठेव ही  २

                  डे केअर सेंटरमध्ये लहान मुलांकडून विविध कलाकृती करुन घेत असतात.असाच एक आर्यकडून करवून घेतलेला स्टेनग्लास डिझाईन केलेला काचेचा ग्लास होता.जावयाच्या सतत बदल्यामुळे घर बदलावे लागे. कधी कधी आर्मी क्वार्टर मिळेपर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागे.अशी घरे बदलताना खुप सारे समान भंगारात निघे.ही सारी उठाठेव मुलीलाच करावी लागे. एकदा या भंगारात मी हा आर्यने केलेला ग्लास पाहिला आणि लगेच उचलून घेतला.माझ्या घरी आणून ठेवला.त्या छोट्या ग्लासचा वापर कसा करावा समजत नव्हते.शो पीस म्हणून कोठेतरी ठेवला जायचा तो नाजूक ग्लास धक्का लागून पडेल फुटेल अशी भीती वाटायची.माझ्यासाठी तो मौल्यवान होता.एक दिवशी अचानक त्यासाठीची जागा सुचली. संगमरवरी बांधलेल्या देवघराच्यावर जपमाळ घालून तो ग्लास ठेवला.आता रोज देवाला नमस्कार करताना तो दिसतो आणि त्या बरोबर आर्यच्या बालपणीच्या आनंददायी आठवणीही.

May be an image of flower and indoor

Friday 13 January 2023

सोनीचे पालकत्व

                                                  सोनीचे पालकत्व

                          सोनी मला भेटली 'गोष्ट नर्मदालयाची' या भारती ठाकूर यांच्या पुस्तकात.सोनी सात वर्षाची ती नर्मदालयात शिकणाऱ्या मुलींपैकी  नव्हती. छोट्या दोन मुलीना संध्याकाळी घसरगुंडीवर खेळायला घेऊन यायची.नर्मदालयात दिलेला संध्याकाळचा पोष्टिक आहार बहिणीना खाऊ घालून नंतर स्वत: खाउन परतायची. भारतीताईनी तु का शिकायला येत नाही विचारल्यावर तिचे उत्तर होते, या मुली मोठ्या झाल्या की त्याना पाठवीन.

                    सोनीची आई नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून घर सोडून गेली. सोनीचे वडील थोडीफार कमाई मिळवीत ती व्यसनात घालवीत. घर चालवण्याचे काम सोनी करी. त्यासाठी शेतात कापूस तोडणे,दुसऱ्याच्या गाई गुरांना चरायला नेणे अशी कामे करी.या सर्वात झालेल्या दमणूकिचा विचार न करता छोट्या बहिणीना खेळायला घेऊन येत होती.हे सर्व करून हसतमुख चेहऱ्यानी वावरायची. भारतीताईंनी नर्मदाल्यात आल्यास शिकायला मिळेल आणि काम करावे लागणार नाही असे सांगितले.तेंव्हा बहिणींना जेऊ खाऊ कोण घालेल? हा प्रश्न तिला होता. दारुड्या बापाच्या तावडीतून त्यांचा बचाव करणे हाही प्रश्न होता.दोन्ही बहिणीना घेऊन ये असे सांगितल्यावर माझ्या आज्जीकडे कोण पाहिलं तिला आता काम होत नाही असे तिचे उत्तर होते.स्वत:चे सुख,बालपण सर्वावर पाणी सोडून आज्जीचे आणि सर्व घराचेही हसतमुखाने आपणहून पालकत्व  स्वीकारणारी चिमुरडी सोनी मला भावली.खरे तर 'गोष्ट नर्मदालयाची' या पुस्तकातून भारती ताईंच्या शब्दातून ती नेमकी समजेल.

Friday 6 January 2023

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे

 

                      फेसबुकच्या कृपेने माझे अनेक दूरस्थ  विद्यार्थी ३०/३२ वर्षानंतर संपर्कात आले.त्यातील एक गौतम ननावरे.या मुक्त पत्रकारावर आज पत्रकार दिनादिवशी लिहावेसे वाटले.२००४ मध्ये मी त्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' या केसरीमधील लेखमालेत लेख लिहिला होता.तो सोबत दिला आहे.त्यानंतर १८ वर्षातील त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भरारीचे दर्शन त्यांच्याशी संपर्कातून आणि फेसबुकवरील पोस्टमधून होत राहिले.

                 त्यांचा झोपडपट्टी ते म्हाडाचे कांदिवलीतील स्वत:चे घर हा प्रवास सहज,सोपा नव्हता तरीही एक आनंदयात्रा आहे.हे करताना स्वत:बरोबर पत्नी, मुले यांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास होईल यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.मुलाना उत्तम संस्कार दिले.स्वत:चे करिअर निवडणे,विवाह याबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले.आंतरजातीय,आंतरधर्मीय,परदेशी कोणताही जोडीदार निवडा अशी मुभा दिली. एक मुलगा कोरा या साईटचा मराठी भाषेसाठी व्यवस्थापक आहे.वडिलांचा पत्रकारितेचा,सामाजाभिमुखतेचा, लेखनाचा वसा तोही चालवत आहे.त्याची पत्नी प्राध्यापक आहे.दुसरा मुलगा फाईव्हस्टार हॉटेलमध्ये शेफ आहे. सद्या ऑस्ट्रेलियात आहे, मुलीनी टुरीझमचा कोर्स केला आहे आणि ती भाग्यश्री ट्राव्हलमध्ये काम करते.पत्नीचे शिक्षण जास्त नसले तरी ती स्वत:च्या पायावर उभे राहील हे पाहिले.तिला स्वत:चा व्यवसाय निवडू दिला.या कोकण कन्येने मासळी विक्रीचा व्यवसाय निवडला.

                 सध्या त्यांची मुक्त पत्रकारिता सोशल मिडीयावर मुक्त संचार करत आहे.विविधांगी वाचन असल्याने कोरावर सामाजिक,राजकीय,शैक्षणिक अशा विविध विषयावर ते लेखन करतात.फेसबुकवरील  लेखही लक्ष वेधून घेतात.निर्वाहाचे साधन असलेली सायकल एक छंद झाली. त्यांच्या फोटोग्राफीचा अविष्कार फेसबुकवर सायकल,मुंबई सकाळ,ग्रामीण जीवन,निसर्ग,कात्रणातील बातमी अशा विविध विषयातून साकार होत आहे.त्यांचे सूक्ष्म निरीक्षण,सामाजिक भान,कलावंताची नजर यातून जाणवते.

                 निवृत्तीनंतर त्यांनी मनसोक्त प्रवास सुरु केला आहे.बस स्थानकावर जायचे मोकळी दिसेल त्या बसमध्ये बसायचे असा unplanned प्रवास ते करतात.तेथील प्रेक्षणीय स्थळे,निसर्ग,जनजीवन यांचे फोटो ते टाकतात.सकाळच्या सायकल राईडमधुनही त्याना फोटोसाठी विषय मिळत असतात.पन्नासी नंतरही त्यांनी सायकलवर बॉम्बे गोवा,इंटरनल गोवा या  ट्रीप केल्या. मुलांनी यासाठी प्रोत्साहन दिले.बोरिवलीपासून खारघर,कान्हेरी गुंफा,गोरेगाव आरे कॉलनी,अशा विविध सहली केल्या.कांदिवलीहून कुलाब्याला ऑफिसलाही ते जात.मुलांच्या दोनचाकी,चारचाकी आल्या तरी सायकल प्रेम संपले नाही.

                   ननावरे विध्यार्थी म्हणून मला तुमचे कौतुक आणि अभिमान वाटतो.

                 पर्यावरण,निसर्गप्रेमी,खुल्या विचाराचा, जुन्या नव्यातील चांगले वेचणारा,जगण्यातील विविध रंगत रंगणारा कलाकार,भरभरून जगणारा आणि इतरांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देणारा संवेदनशील माणूस,उक्ती आणि कृती एकच असणारा अशा या मुक्त पत्रकाराला पत्रकारदिनी भरभरून शुभेच्छा!

                           उत्तुंग भरारी

                        गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)