Sunday 4 January 2015

मला भेटलेले डॉक्टर वसंत गोवारीकर

                        डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या निधनानंतर वैद्न्यानिक,राजकीय नेते,सहकारी,सर्वानीच भरभरून लिहील.संशोधन ,लेखन,प्रशासन सर्वच पातळ्यावर समाजाभिमुख, विकासाभिमुख,उद्देशाभिमुख अस त्याचं काम राहील.अनौपचारिक सह्जसंवादी अस त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वर्णन केल गेल.मलाही याचा अनुभव आला.त्यांच्याशी भेट ही माझ्या  आयुष्यातील अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अशी घटना आहे.त्याविषयी.
                    ' मी वसंत गोवारीकर बोलतोय 'मी फोन उचलला होता खरा पण दुसर्‍या बाजुने बोलणारी व्यक्ती? मला फोन का आहे हे लक्षात आल. पण हे अगदी  अनपेक्षित,धक्कादायक (सुखद) होत. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता.अवसान गोळा करून मी थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
                  त्याच अस झाल,माझा एम.फिलचा विषय  निरंतर शिक्षण हा होता.पुणे विद्यापीठाच्या या विभागाचा १० वर्षाच्या काळाचा आढावा त्यात होता.१९८७ साली मी एम.फिल केल तेंव्हापासून हा विषय डोक्यात खदखदत होता.डॉक्टर गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु झाल्यावर मला आनंद झाला या समाजाभिमुख वैद्न्यानिकापर्यंत माझ म्हणण पोचवाव अस वाटल.  मी त्याना एक पत्र आणि सोबत टिळक विद्यापीठाच्या मासिक पत्रिकेत याविषयी आलेला लेख पाठऊन दिला होता.आणि आज त्याविषयी बोलायला हा फोन होता.
                 दुसर्‍या बाजूचा आवाज इतका आश्वासक आणि सहज संवादी होता.की माझ्या भीतीची जागा परस्पर सहज संवादात कधी बदलली मला समजलच नाही.त्यांनी लेख बारकाईने वाचला होता.त्याबाबतचे त्यांचे परदेशातील अनुभव सांगत होते.किती वेळ चर्चा चालली होती याच भान नव्हत.बेल वाजली.सर मी जरा दार उघडते,अस म्हणण्या इतका मोकळेपणा आता माझ्यात आला होता.दार उघडल्यावर आत येणार्‍या माझ्या नवर्‍याला मी हळूच सांगितलं डॉक्टर गोवारीकर बोलत आहेत.( मी तासनतास फोनवर बोलते याबद्दल नेहमी बोलणी खावी लागतात. मागून याबाबत काही कॉमेंट नकोत म्हणून ही खबरदारी होती).नंतरही कितीतरी वेळ बोलण चालू होत.फोन संपला तरी मी  अगदी हवेत होते.भारावलेपण थोड ओसरल्यावर अरे हे सांगायचं राहील ते बोलायला हव होत अस वाटत राहील.मी आभाराच आणि माझी ही भावना व्यक्त करणार
पत्र लिहील.
                   काही दिवसात दुसरा आश्चर्याचा धका बसला.पुणे विद्यापीठाकडून कुलागुरुनी भेटीला बोलावल्याच पत्र  आल.ठरल्याप्रमाणे मी गेले.कुलगुरुंच्या खोलीबाहेर अनेकजण बसले होते.शिपायांनी मला आत बोलावल्याच सांगितलं.कुलगुरुंच्या अलिशान रूमच दडपण,डॉक्टर गोवारीकरांच्या शांत,रुजू,आश्वासक व्यक्तीमत्वाने आणि बोलण्याने कोठल्याकोठे पळाल.थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी निरंतर शिक्षण विभागाच्या तेज निवळीकराना बोलवून घेतल त्यांच्यासोबतही चर्चा झाली.माझ्याकडे आता सांगायचं राहील अस काही नव्हत.मी पूर्ण समाधानी होते.माझा एम.फिलचा थिसीस मी नेला होता.कुलगुरुनी निवळीकराना तो वाचायला सांगितला.माझ्या एम.फिल डिग्रीपेक्षा माझ्यासाठी हा सर्व अनुभव मोलाचा होता.
                 डॉक्टर गोवारीकराना पाठवलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे.आत्ता तो वाचताना मला स्वत:लाच त्यातला अपुरेपणा,मांडणीतला विस्कळीतपणा,भरपूर संपादनाची गरज जाणवली.अशा कच्च्या लिखाणाची त्यांनी  दखल घेतलेली होती.
http://shobhanatai.blogspot.in/2014/01/blog-post_6754.html
                
                 
                 
                      

Saturday 3 January 2015

सावित्रीबाई फुलेना जन्मदिनी अभिवादन

                 जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची  संख्या जास्त आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.
आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्याच लेखनाद्वारे अभिवादन.


                                पुण्यापासून ३५ मैलावरच्या नायगावला सजवलेल्या खिलारी बैलगाडीने मंडळी मुलगी पाहायला निघाली होती.खंडोजी पाटलाच इनामदाराच घराण.एकुलती एक सुस्वरूप मुलगी पसंत पडली.यथावकाश ४/५ दिवस लग्न सोहाळा झाला.हत्तीवरून वरात निघाली.आणि मुलगी पुण्यात आली.ती ९ वर्षाची.आणि तो १३ वर्षाचा.१८४० चा काळ, नायगावमध्ये काय, पुण्यात काय, मुलीच्याबाबत परिस्थिती वेगळी नव्हती ती असायची एक मालकीची वस्तू.जणू गोठ्यातल जनावर.तिनी लिहीण वाचण शिकल की वैधव्य येत अशी समजूत असायची.मग कोणाची आहे बिशाद शिकायची.पण हे जोडप वेगळच होत.तिला शिकायची आवड आणि याला शिकवायची.दोघे शिवारात गेले कि फांदीच्या काटकीने' अ,आ,इ,ई 'शिकणे सुरु व्हायचे.आठ वर्षात ती खूप शिकली.भरपूर बुक वाचायला लागली.आणि हिच्या नवर्‍याच्या मनात स्त्रियांसाठी, शुद्रांसाठी शाळा काढायचं खूळ शिरलं.मग ही घरचीच शिक्षिक मिळाली.
                                   १८४८ मध्ये भिड्यांचा वाड्यात  शाळा सुरु झाली.समाजात खूप मोठ्ठा विरोध झाला.पण हे जोडप काही बधल नाही.म्हटल्यावर सर्वांनी तिच्या सासर्‍याला धरल.धर्म बुडाला अशी हाकाटी करत बहिष्कार घालू म्हणून धमकी दिली.सासर्‍यानी सामोपचारांनी सांगून पाहिलं.काही उपयोग झाला नाही.सासरेबुवा म्हणाले.माझ सांगण ऐकायचं नसेल तर घर सोडा.त्यांनी घर सोडलं.बरोबर रामाच्या मागे सीतेने जाव तस तीही बाहेर पडली.शाळा सुरूच राहिली.मग धर्ममार्तंड चिडले.तिच्या जायच्या यायच्या वाटेवर दबा धरून बसून तिला दगडाने शेणाने मारायला लागली.ती घाबरली नाही.उतली नाही मातली नाही घेतला वसा टाकला नाही.उलट त्याने सुचविले पिशवीत एक जादा लुगड घेऊन जा.शाळेत जाऊन बदल येताना पुन्हा पहिलच लुगड नेसुन ये.दोघांच्या कार्याचे सार्थक झाले.१६ नोव्हेंबर १८५२ मध्ये या जोडप्याचा ब्रिटीश शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तो म्हणाला,"हा गौरव तुझाच आहे.मी शाळा स्थापण्यास कारण मात्र आहे.पण तू शाळा अनेक संकटाशी तोंड देऊन यशस्वीपणे चालविल्या.याचा मला अभिमान आहे"
                               या दांपत्याच काम फक्त शाळा सुरु करून थांबले नाही.त्या काळात बालविवाह होत.बालमृत्यूच प्रमाणही मोठ्ठ होत.मग लहान वयात मुलगी विधवा होई.तीच केशवपन केल जाई.तिच्या रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा येत.सती जाणारी एकदाच मरे.हिला मात्र रोजच मरण यातना सोसाव्या लागत.कधी तरुण वय पाय घसरे.कधी समाजातील बुभुक्षितांच  त्या सावज बनत. अशावेळी दिवस राहिले की,जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसे.मग यांनी आपल्या राहत्या घराशेजारीच १८६० मध्ये वाडा बांधला.विधवा बायकांनी इथे यावे गुप्त रीतीने बाळंत होऊन मुल ठेऊन जावे अशी सोय केली.भितीभिंतीवर याची माहिती देणारी पत्रके लागली.इथ झालेलं पहिले मुल त्यांनीच दत्तक घेतले.या मुलांसाठी अनाथाश्रम सुरु केला.त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आश्रम काढले.
                          शाळा असो,अनाथाश्रम असो,अस्पृश्याना पाण्यासाठी हौद खुला करणे असो,न्हाव्यांचा संप असो,विधवाविवाह असो की दुष्काळ निवारणार्थ अन्नछत्र  असो ही पतीच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली.उलट प्रसंगी धीर दिला.त्या एका पत्रात त्याना लिहितात, "पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदुषक खूप आहेत,तसेच येथेही आहेत त्याना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे.सदासर्वदा कामात गुंतावे.भविष्यातले यश आपलेच आहे"
                        अशी ही पतीच्या मागे केवळ अंधानुकरणाने जाणारी नव्हती.तर डोळस सहधर्मचारिणी होती.तिचा पतीही तितकाच खंबीर साथीदार होता.तिला मुल नाही म्हणून दुसरे लग्न करायची गळ अनेकांनी घातली.पण त्याने मानले नाही.
                       पतीला अर्धांगवायू झाला.तिने धैर्याने तोंड दिले.मनापासून सेवासुश्रूषा केली.मृत्युनंतर विश्वास घातकी भाऊबंदान्चा स्पर्शही होऊ देऊ नका असे त्याने सांगितले.तिने ही इछ्या पूर्ण केली.पतीच्या अंतिम यात्रेत गाडगे पुढे घेऊन जाणारी ही एकमेव स्त्री असावी.पती निधानानंतरही रडत न बसता त्यांचे शिक्षणाचे कार्य,सत्यशोधक समाज तिनी चालू ठेवला.कविता, भाषणे,संपादन हेही कार्य ती करत राहिली.पुण्यात प्लेगची साथ आली.दत्तकपुत्र यशवंत डॉक्टर झाला होता.ही त्याच्या मदतीला धावली.जातीपातीचा विचार न करता सेवाकार्य करत राहिली.दवाखाना गावाबाहेर.रुग्णांना पोचविण्यासाठी वहाने मिळणे कठीण होते.एका अस्पृश्य मुलाला प्लेगची लागण झाली.ही सरळ त्याला पाठीवर घेऊन मुलाच्या दवाखान्यात पोचली.अखेर हिलाच प्लेगची लागण झाली.आणि त्यातच १० मार्च १८९७ मध्ये तिचा मृत्यू झाला.अशी ही मृत्युंजय क्रांतीज्योती कोण बरे?