Tuesday 27 September 2022

स्मिता तळवलकर

                                     आभाळ पेलताना  - स्मिता तळवलकर

                   स्मिता तळवलकर यांनी १७ /१८ वर्षाच्या वयात कॉलेज शिक्षण घेत दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून पाउल ठेवले. बघता बघता उंच भरारी घेतली. नाटक, चित्रपट, टीव्ही, क्षेत्रात, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, वितरण अशी विविध क्षेत्रे यशस्वीपणे पादाक्रांत केली.दी स्मिता तळवलकर झाल्या. विशेष म्हणजे हे सर्व विवाहानंतर केले.दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ५९ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.त्यांचा जीवन प्रवास आणि आजाराशी लढा दोन्ही अत्यंत प्रेरणादायी आहे.

              या सर्व क्षेत्रात काम करताना दूरदर्शन काळात झालेले संस्कार त्या विसरल्या नाहीत.५ वर्षाच्या व्यक्तीपासून ८० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी एकत्रित बसून पहावे असे कार्यक्रम असावेत असा त्यावेळी दृष्टीकोन होता.काळ बदलला,स्पर्धा आली पण तरी कोणतीही तडजोड न करता सामाजिक भान,कलात्मक मुल्ये जपत नाटक,सिनेमा,टीव्ही सिरीयलची निर्मिती केली.मनोरंजनाबरोबर काही विचार दिला.'कळत नकळत' आणि 'तू तिथे मी' या त्यांच्या चीत्रपटाना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.अभिनिवेश नसताना निर्मितीतील इनोसन्सला हे अवार्ड मिळाले असे त्या म्हणाल्या. काही चित्रपट तोट्यात गेले. काही चालले.पण हताश न होता त्या नवनवीन देत राहिल्या.झोकून देऊन काम करत राहिल्या.'तू तिथे मी' च्यावेळी घरपोच तीकीट विक्री सुरु केली.अवन्तिका आणि इतर दूरदर्शन  मालिकाही गाजल्या.६ चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली.विस्तारभयास्तव नावे देत नाही.

                  लहान वयात विवाह झाला ४० माणसांचे एकत्र कुटुंब होते.तळवलकर कुटुंब व्यवसाय क्षेत्रातले.व्यायाम क्षेत्रात मोठे नाव असलेले,पुरोगामी होते.माणसांची आवड असल्याने लगेच या कुटुंबात  मिसळून गेल्या.कुटुंबाकडूनही त्याना कोणतेही काम करायला विरोध झाला नाही उलट मदतच झाली.निर्मिती संस्था काढल्यावर  स्पॉट बॉइजपासून अनेक काम करणार्यांचा त्यांच्या कुटुंबात सहभाग झाला.त्यांची त्यांच्या कुटुंबाची काळजी त्याना होती. सहवासात असलेल्या सर्वांचीच त्यांनी नेहमी विचार केला. कामाला त्या वाघ होत्या. नाटकाचे दौरे असो कि निर्मिती संस्थेचा सेट असो वेळ पडली तर पदर खोचून सर्वांचा स्वयंपाकही त्यांनी केला.अनेक व्याप सांभाळण्याची तारेवरची कसरत करताना त्या सदैव ताज्यातवान्या असत.फिजिकल आणि मेंटल फिटनेस बद्दल जागरूक असत.

                  निर्मितीचे,वितरणाचे काम तसे जोखामिचे.पैशाचे व्यवहार असत.एकदा एका अंडर वर्ल्डच्या माणसाने स्मिताताईंच्या च्या पोस्टर लावणाऱ्या माणसांवर हल्ला केला.या न घाबरता पोलिसात गेल्या.त्या दादाचे ह्रदयपरिवर्तन करण्यात त्या यशस्वी झाल्या असाव्यात.त्या माणसाने स्मिताताईना नंतर त्रास दिला नाही उलट आदराचे वर्तन ठेवले.आजूबाजूच्या सर्वात एकाच पुरुष आहे त्या म्हणजे स्मिता तळवलकर असे तो म्हणाला.आपल्या कामाने. प्रेमाने त्यांनी सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले.अनेकांसाठी रोल मॉडेल झाल्या.

                 त्या व्हिजनरी होत्या. पुढच्या पिढीचा विचार करून त्यांनी 'अस्मिता चित्र अकॅडेमी' हे अक्टिंग स्कूल चालू केले.स्पर्धेच्या जगात मुलांना अभिनय शिकवण्याबरोबर अपमान,नकार सहन करणे,यश अपयश पचविणे या गोष्टीही शिकवून  मानसिक दृष्ट्या सक्षम करणे त्याना महत्वाचे वाटले.                     २०१० साली त्याना कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यांच्या स्वत:च्या कुटुंबापेक्षा या विस्तारित कुटुंबाचे काय याची काळजी वाटली.बर्याच जणांनी घरासाठी कर्जे घेतली होती त्याचे हप्ते स्मिताताई भरायच्या.त्या ७/८ महिने तरी काम करू शकणार नव्हत्या तर निर्मिती संस्थेवर त्याचा परिणाम होणारच होता.या काळजीनेच मी आजारातून लवकर बाहेर आले असे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.भविष्यकालीन स्वप्ने पाहणे,संकल्प करणे त्यांनी सोडले नाही.

                 मनाचा खंबीरपणा, विलपॉवर, अध्यात्मिक  बैठक त्यांच्या मदतीला आली.माहिकारी या कोणतेही कर्मकांड नसलेल्या अध्यात्मिक संप्रदायाची कोणीतरी ओळख करून दिली.वैश्विक शक्ती घेण्याची थेरपी त्यांनी सहा महिने घेतली. त्याना बरे वाटल्यावर इतरांना अशी शक्ती देणेही त्यांनी केले. कॅन्सर, त्यासाठी घ्यावी लागणारी किमो त्यांच्या शरीराला दुर्बल करत गेले पण त्यांच्या मनावर हल्ला करणे या आजारालाही जमले नाही.आज त्या नसल्या तरी त्यांच्या हाताखाली सहवासात तयार झालेल्या अनेकांच्या कार्यातून त्यांच्या विविध कलाकृतीतून त्या प्रेरणा देतच आहेत.

              


Monday 19 September 2022

आनंदी वृद्धत्व - ८

                                                आनंदी वृद्धत्व -८
 
                           आत्तापर्यंत या लेखमालेत ज्या व्यक्तींच्यावर लिहिले त्या व्यक्ती बाहेरच्या होत्या. आत्ता ज्या व्यक्तीवर मी लिहिणार आहे ती व्यक्ती २४ तास सहवासातील होती.ती म्हणजे माझे सासरे.त्याना आम्ही सर्वच नाना म्हणायचो.तीर्थहळ्ळी ही त्यांची जन्मभूमी आणि बेळगाव ही कर्मभूमी.बेळगावात त्यांची नारायण भटजी अशी ओळख होती.समाजात त्यांच्याबद्दल आदर होता.बेळगाव सोडताना त्यांचा मोठ्ठा निरोप समारंभ झाला.त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे,त्यांच्यावर लिहिण्याजोगे खूप आहे. येथे फक्त त्यांच्या आनंदी वृद्धत्वावर लिहित आहे.
                       बेळगाव सोडून आई आणि नाना ७८ साली पुण्याला आले त्यावेळी नाना ७८ वर्षाचे होते.त्याना डायबेटीस होता पण बाकी तब्येत छान होती.ते प्रथमच पुण्याला आले होते.सासुबाई मात्र त्यांच्या आजारपणात बरेच दिवस राहिल्या होत्या.त्यांची काळजी नव्हती.बेळगावला मोट्ठे घर.येथे दोन खोल्या त्यामुळे नानाच कसे काय राहणार असे आम्हाला वाटत होते.बेळगावात ते दिवसभर उधोगात असायचे.येथे काय करतील? तेथे सकाळी राममंदिर, मारुती मंदिरात पूजा, इतर भिक्षुकीची कामे असल्यास सायकलवर जात.घरी आल्यावर ज्योतिष विचारण्यासाठी अनेकजण येत.त्यात ते रमून जात. ज्योतिष हा त्यांचा छंद होता.कोणाला काय द्यायचे ते द्यावे.आलेले पैसे त्यांनी एक धर्मादाय खाते केले होते त्यात टाकत.ते घरासाठी वापरत नसत.येथे काय करतील?

                             नानांनी आमची भीती खोटी ठरवली.देश.काल,परिस्थितीनुसार राहायचे असे ते म्हणत आणि त्यांनी ते खरे करून दाखवले.बेळगावचे सोवळेओवळे येथे संपले.नाना पुण्यात आलेले ऐकून पुराणिक नावाचे भिक्षुकी करणारे गृहस्थ भेटायला आले.नानांची विद्वत्ता ते ऐकून होते.ते त्याना वास्तूशांती, नवग्रहहोम, मुंज,विवाह अशा कामाला घेऊन जाऊ लागले.नाना संस्कृत पंडित होते.प्रत्येक विधीचा अर्थ समजाऊन सांगत.गप्पात संस्कृत सुभाषिते अर्थासह सांगत.नानांच्यामुळे पुराणिक यांचा व्यवसाय वाढला आणि नानांचा वेळ जायचा प्रश्न सुटला.आता येथेही ज्योतिष विचारण्यासाठी अनेक जण येऊ लागले.

                १९८१ मध्ये सासुबाईंचा पाय गुडघ्यापासून काढावा लागला.घरच्या सगळ्यांच्या पत्रिका नानांच्या डोक्यात असत.यातून ती बाहेर येणार नाही आली तरी हाल आहेत त्यामुळे गेलेलीच बरी असे ते शांतपणे म्हणाले तेंव्हा मीच हादरून गेले.त्यांची भविष्यवाणी खरी ठरली.त्या गेल्यावर ते कोलमडतील असे वाटले पण तसे काही झाले नाही 'सुख दु:खे समेकृत्वा' अशी त्यांची वृत्ती होती.सासूबाई असेपर्यंत त्यांच्याशी सासऱ्यासारखेच नाते होते. त्या गेल्यावर मात्र आमच्यात हळूहळू एक वेगळेच नाते तयार झाले.

                 आमचे बंगल्याचे काम चालू झाले आणि  ८१ व्या वर्षी नाना रोज देखरेखीसाठी सायकलवर जाऊ लागले.ते गर्दीच्या रस्त्यावरूनही सायकलवर अनेक ठिकाणी जात.मला काळजी वाटायची ते म्हणायचे 'काही काळजी करू नको गो माझ अपघातात मरण नाही'.मी ज्योतिष शिकून घ्यावे असे त्यांना वाटे.पण माझा फारसा विश्वास नसल्याने मला शिकावेसे वाटत नसे.ते पत्रिका करत तेंव्हा काही गणिती कामे असत ती करायला त्याना मदत मात्र करत असे.

                  १९८२ मध्ये आम्ही बंगल्यात राहायला आलो.गोडाऊन मध्ये ठेवलेले सर्व जास्तीचे सामान आता घरात आले.यात  त्यांनी बेळगावहून आणलेली पुस्तकाची पेटी होती.ही पेटी आणण्यास सासुबाईंचा विरोध होता.त्यांच्याशी भांडून त्यांनी ती आणली होती.त्यांनी वर्षानुवर्षे जमवलेली ती पुस्तके होती.ती त्यांची खरी इस्टेट होती.पेटीला ते माझ्याशिवत कोणाला हात लावू देत नसत.यातली पुस्तके काढून वाचणे, माझ्याबरोबर चर्चा करणे,कधीकधी वादविवाद ही होत ते वैचारिक पातळीवरचे असत.तू काय वादात हरवणार नाही म्हणायचे. त्यात कौतुक असायचे.मला त्यांच्याबाद्दल यासाठी आदर वाटायचा.  मुलगा हवाच या वादात त्यांनी माघार घेतली.उलट माझ्या तिन्ही मुली त्यांच्या आवडत्या झाल्या. त्यांचे कौतुक ते सर्वाना सांगायचे.आता त्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्च स्थानावर आहेत तेंव्हा नानांची खूप आठवण येते.एका मुलीनी संस्कृतमध्ये M.A केले. ते असते तर तिच्या त्यांच्याशी छान चर्चा झाल्या असत्या.तिचे लोकमतमध्ये संस्कृत कणिका नावाचे सदर वर्षभर रोज येत असे.ते खूप खुश झाले असते.मुली,आम्ही दोघे आणि ते आमच्या सहा जणांची एक सुंदर हार्मनी झाली होती.

                स्वत:च्या जागेत आल्यावर ते जास्तच खुलले.त्याना कोणत्याही कामाची कधी लाज वाटली नाही.रस्ते नव्हते.खड्डे असायचे ते बुजवायचे.समोर स्वत: खड्डे खणून मोठ्ठी झाडे लावली. घराभोवतीही बाग केली.दिवसदिवस बागेत असत.आम्ही माळी लावायचा विचार केला तर संतापले.मी असेपर्यंत माळी लावायचा नाही म्हणाले.पायात काही न घालता काम करायचे त्याना डायबेटीस होता त्यामुळे पायाला काहीतरी लागेल याची आम्हाला भीती वाटायची.

            आम्ही नवीन जागेत रहायला आल्यावर धाकटीही शाळेत जाऊ लागली आणि माझे भारतीय शिक्षण संस्थेत एमफिलसाठी जाणे सुरु झाले.सकाळी ९.३५ ची बस गाठायला घरून ९ला निघावे लागे.मोठ्या दोघी माझ्याबरोबर शाळेला जाण्यासाठी बसला असत. धाकटी मात्र घरी असे.तिला शाळेत न्यायला शाळेचा शिपाई साडे दहाला सायकलवर येई. नाना असल्यामुळे मी बिनधास्त असायची. त्या आधी नानांचा ब्रेकफास्ट,त्यांना इन्शुलीन देणे,मुलींचे डबे,दुपारचे जेवण करावे लागे.नानांना माझ्यानुसार सकाळची दैनंदिन कामे करावी लागत.त्यांची त्याबद्दल तक्रार नसे,मी दुपारी घरी येई. नंतर आम्ही दोघे जेवायचो. मला उशीर झाला तर ते स्वत: वाढून घेत.बेळगावपासुनच त्यांना ती सवय होती. तेथेही ते चूल सारवणे.वैश्वदेवासाठी नैवेद्याचा भात करणे अशी कामे करीत.बायकांनी घरी राहून त्यांची खातिरदारी करावी असे त्याना वाटत नसे.

           टीमवीत Distance Education सुरु झाले.त्यासाठी प्राध्यापक हवे होते. मी सहज म्हणून अर्ज केला आणि माझी निवड झाली.नोकरीसाठी माझ्या नवऱ्याचा विरोध होता.नानांना त्रास होऊ नये यासाठी.नाना म्हणाले तो काय सांगतो त्याचा बाप सांगतोय कर तू नोकरी.याच काळात माझी पीएचडी चालू झाली.२६०७ विद्यार्थ्यांना प्रश्नावली पाठवण्यासाठी पाकिटात भरणे,तिकीट चिकटवणे,माझ्या पत्त्याचा शिक्का मारणे या कामात त्यांनी  आनंदाने सहभाग घेतला.तुझी फार ओढ होते घरची कामेही सांग म्हणत.स्वस्थ बसणे त्यांना माहीतच नव्हते.

           माझ्या माहेरी लग्नकार्याला गेले की तेही बरोबर असत.व्याही म्हणुन न वावरता घरच्यासारखे राहत.तसे तेथेही त्यांनी पूजा करायचे काम हाती घेतले. माझ्या आईला ते लहानपणापासून ओळखत.पत्रिका दाखवायला तेथेही माणसे गोळा झाली.

           नोकरी निमित्त मला संपर्क सत्रासाठी शनिवार रविवार गावोगाव जावे लागत होते.इंजक्शन देण्यापासून मुलीना करावे लागे.मला जरा गिल्ट फिलिंग यायचे. ते म्हणत तुझ्यापेक्षा मुली घर छान सांभाळतात. छान स्वयंपाक करतात.

           त्यावेळी लाईट जात असत.नाना म्हणत 'गाणी म्हणा गो'.मग मी व मुली  'वेडात मराठे वीर दौडले सात' पासून 'मेरा कुछ सामान' पर्यंत वाट्टेल ती गाणी म्हणत असू. ते गेल्यावर लाईट गेले की गाणी म्हणणे थांबलेच.मी मुलीनी गाणे शिकावे म्हणून प्रयत्न केला कोणी शिकले नाही.ते म्हणत तुझा शुक्र चांगला आहे तूच गाणे शिक.मी निवृत्तीनंतर गाणे शिकायला लागले. आमच्याच घरी गाण्याचा क्लास सुरु झाला.ते खुश झाले असते.अशी वेळोवेळी ते जावून ३० वर्षे तरी झाली त्यांची आठवण येते. 

           ते कितीही थंडी असो फक्त.धोतर नेसलेले  असे.माझ्या मैत्रिणी,मुलींच्या मैत्रिणी,ह्यांच्या ऑफिसमधले कोणी आले तरी ते आपली बाहेरच्या खोलीतील जागा सोडत नसत की वेष बदलत नसत.आम्हीही त्याना कधी त्याबद्दल म्हणत नसू उलट ते गप्पात सामील होत.त्यांची संस्कृत सुभाषिते,कुट कोडी सांगत. आलेल्यांनाही ऐकण्यात रस वाटे.  

           नाना रोज व्यायाम करत.बागकाम असेच. त्यामुळे त्यांचा डायबेटीस कंट्रोलमध्ये असे.फारसे आजारपण नसे तरी कधी ताप आला,लूज मोशन झाले तर लंघन हे सर्व आजारावर औषध आहे अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित ते सांगत आणि अजिबात औषध घेत नसत.आणि ते बरेही होत. पण आता वृद्धत्वाच्या समस्या हळूहळू चालू झाल्या.लंघन पुरेसे नव्हते.कधी डीहायड्रेशन,कधी जुलाब,कधी जखम झाल्याने त्याना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागू लागले.एकदा तर त्याना खोल जखम झाली घोट्याकडचा बराच भाग काढावा लागला.बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.जेवण,ब्रेकफास्ट न्यावे लागे.मुली आणि आम्ही दोघेच ही जा ये,तेथे थांबणे करत असू.त्यावेळी काही दिवस आमच्या ऑफिसमधला निवृत्त शिपाई  ते बाहेर जाऊ नये म्हणून लक्ष द्यायला ठेवला होता.काही दिवस डॉक्टर ड्रेसिंगला येत.नंतर मला करण्याची परवानगी दिली.त्यातून व्यवस्थित बरे झाले.

                         एकदा केइएममध्ये ठेवले होते. प्रसिद्ध डॉ. पै तेथे होते.त्यांची मुंज नानांनी केली होती.त्यांनी ओळखले.ते अगत्यानी चौकशी करत.त्यांच्यामुळे नकळत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायला लागली.ते चेहऱ्यावरूनही भविष्य सांगत त्यामुळे तेथेही भोवती लोक गोळा होत.

                   त्याना  बर्याच वेळा लघवीला शौचाला घाई होऊन कपडे खराब होणे असे प्रकार होत पण डायपर माहीत नव्हते.त्या गोष्टीचा त्रास वाटला असेही आठवत नाही.त्यांचे वृद्धत्व त्रासदायक झाले अशा आठवणी नाहीत.उलट आनंददायी आठवणीच आहेत.त्यांच्याही आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा काळ असावा.

             ते एकदा घरातच पडले.खुब्याचे हाड मोडले.हॉस्पिटलमध्ये ठेवायचे होते. अम्ब्युलन्सची वाट पाहत बसलो होतो.ते रोज विष्णूसहस्त्रनाम म्हणत त्याच्या कव्हरच्या मागच्या बाजूला माझी पत्रिका मांडली.आणि ते काही सांगत होते इतक्यात अम्ब्युलन्स आली.ते म्हणाले आता आल्यावर पत्रिका बघुयात.पण ते परत आलेच नाहीत.शस्त्रक्रिया ठरली होती. आमच्या समोर त्यांना OT मध्ये नेले.भूल देण्यापूर्वीच त्याना Hart attack आला.एक दोन दिवस त्यानंतर ते होते.त्यांच्या सेवेला असलेली केरळी नर्स ढसाढसा रडत होती.त्यांनी चेहऱ्यावरून तिचे भविष्य सांगितले होते.घरी परत येणार या भावनेतून ते गेले होते आणि आलेच नाहीत याचा खूप त्रास झाला.ते शतक नक्की काढतील असे वाटले होते.पण थोडक्यात हुकले.

             आमची सेकंड इनिंग सुरु झाली.आमच्यासमोर त्यांचे आनंदी वृद्धत्वाचे मॉडेल आहे.

              https://shobhanatai.blogspot.com/2022/03/blog-post.html