Tuesday 27 September 2022

स्मिता तळवलकर

                                     आभाळ पेलताना  - स्मिता तळवलकर

                   स्मिता तळवलकर यांनी १७ /१८ वर्षाच्या वयात कॉलेज शिक्षण घेत दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून पाउल ठेवले. बघता बघता उंच भरारी घेतली. नाटक, चित्रपट, टीव्ही, क्षेत्रात, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, वितरण अशी विविध क्षेत्रे यशस्वीपणे पादाक्रांत केली.दी स्मिता तळवलकर झाल्या. विशेष म्हणजे हे सर्व विवाहानंतर केले.दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ५९ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.त्यांचा जीवन प्रवास आणि आजाराशी लढा दोन्ही अत्यंत प्रेरणादायी आहे.

              या सर्व क्षेत्रात काम करताना दूरदर्शन काळात झालेले संस्कार त्या विसरल्या नाहीत.५ वर्षाच्या व्यक्तीपासून ८० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी एकत्रित बसून पहावे असे कार्यक्रम असावेत असा त्यावेळी दृष्टीकोन होता.काळ बदलला,स्पर्धा आली पण तरी कोणतीही तडजोड न करता सामाजिक भान,कलात्मक मुल्ये जपत नाटक,सिनेमा,टीव्ही सिरीयलची निर्मिती केली.मनोरंजनाबरोबर काही विचार दिला.'कळत नकळत' आणि 'तू तिथे मी' या त्यांच्या चीत्रपटाना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.अभिनिवेश नसताना निर्मितीतील इनोसन्सला हे अवार्ड मिळाले असे त्या म्हणाल्या. काही चित्रपट तोट्यात गेले. काही चालले.पण हताश न होता त्या नवनवीन देत राहिल्या.झोकून देऊन काम करत राहिल्या.'तू तिथे मी' च्यावेळी घरपोच तीकीट विक्री सुरु केली.अवन्तिका आणि इतर दूरदर्शन  मालिकाही गाजल्या.६ चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली.विस्तारभयास्तव नावे देत नाही.

                  लहान वयात विवाह झाला ४० माणसांचे एकत्र कुटुंब होते.तळवलकर कुटुंब व्यवसाय क्षेत्रातले.व्यायाम क्षेत्रात मोठे नाव असलेले,पुरोगामी होते.माणसांची आवड असल्याने लगेच या कुटुंबात  मिसळून गेल्या.कुटुंबाकडूनही त्याना कोणतेही काम करायला विरोध झाला नाही उलट मदतच झाली.निर्मिती संस्था काढल्यावर  स्पॉट बॉइजपासून अनेक काम करणार्यांचा त्यांच्या कुटुंबात सहभाग झाला.त्यांची त्यांच्या कुटुंबाची काळजी त्याना होती. सहवासात असलेल्या सर्वांचीच त्यांनी नेहमी विचार केला. कामाला त्या वाघ होत्या. नाटकाचे दौरे असो कि निर्मिती संस्थेचा सेट असो वेळ पडली तर पदर खोचून सर्वांचा स्वयंपाकही त्यांनी केला.अनेक व्याप सांभाळण्याची तारेवरची कसरत करताना त्या सदैव ताज्यातवान्या असत.फिजिकल आणि मेंटल फिटनेस बद्दल जागरूक असत.

                  निर्मितीचे,वितरणाचे काम तसे जोखामिचे.पैशाचे व्यवहार असत.एकदा एका अंडर वर्ल्डच्या माणसाने स्मिताताईंच्या च्या पोस्टर लावणाऱ्या माणसांवर हल्ला केला.या न घाबरता पोलिसात गेल्या.त्या दादाचे ह्रदयपरिवर्तन करण्यात त्या यशस्वी झाल्या असाव्यात.त्या माणसाने स्मिताताईना नंतर त्रास दिला नाही उलट आदराचे वर्तन ठेवले.आजूबाजूच्या सर्वात एकाच पुरुष आहे त्या म्हणजे स्मिता तळवलकर असे तो म्हणाला.आपल्या कामाने. प्रेमाने त्यांनी सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले.अनेकांसाठी रोल मॉडेल झाल्या.

                 त्या व्हिजनरी होत्या. पुढच्या पिढीचा विचार करून त्यांनी 'अस्मिता चित्र अकॅडेमी' हे अक्टिंग स्कूल चालू केले.स्पर्धेच्या जगात मुलांना अभिनय शिकवण्याबरोबर अपमान,नकार सहन करणे,यश अपयश पचविणे या गोष्टीही शिकवून  मानसिक दृष्ट्या सक्षम करणे त्याना महत्वाचे वाटले.                     २०१० साली त्याना कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यांच्या स्वत:च्या कुटुंबापेक्षा या विस्तारित कुटुंबाचे काय याची काळजी वाटली.बर्याच जणांनी घरासाठी कर्जे घेतली होती त्याचे हप्ते स्मिताताई भरायच्या.त्या ७/८ महिने तरी काम करू शकणार नव्हत्या तर निर्मिती संस्थेवर त्याचा परिणाम होणारच होता.या काळजीनेच मी आजारातून लवकर बाहेर आले असे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.भविष्यकालीन स्वप्ने पाहणे,संकल्प करणे त्यांनी सोडले नाही.

                 मनाचा खंबीरपणा, विलपॉवर, अध्यात्मिक  बैठक त्यांच्या मदतीला आली.माहिकारी या कोणतेही कर्मकांड नसलेल्या अध्यात्मिक संप्रदायाची कोणीतरी ओळख करून दिली.वैश्विक शक्ती घेण्याची थेरपी त्यांनी सहा महिने घेतली. त्याना बरे वाटल्यावर इतरांना अशी शक्ती देणेही त्यांनी केले. कॅन्सर, त्यासाठी घ्यावी लागणारी किमो त्यांच्या शरीराला दुर्बल करत गेले पण त्यांच्या मनावर हल्ला करणे या आजारालाही जमले नाही.आज त्या नसल्या तरी त्यांच्या हाताखाली सहवासात तयार झालेल्या अनेकांच्या कार्यातून त्यांच्या विविध कलाकृतीतून त्या प्रेरणा देतच आहेत.

              


No comments:

Post a Comment