Saturday 10 December 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.

                   डॉक्टर वसुधा भंडारे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची समाज शास्त्र विषयातील विद्या वाचस्पती ( पीएचडी) पदवी मिळाली.अडचणींचा डोंगर पार करत संकटावर मात करत त्यांनी यशश्री खेचून आणली. मन:पूर्वक अभिनंदन! ६७ व्या वर्षी त्यांनी  मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे'.स्वेच्छां रक्त्दानासंबंधी पुणे शहरातील रक्तपेढ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास' असा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
. त्यांच्या जिद्दी बद्दल  २० ऑगस्ट २००४ .च्या केसरीच्या अंकात' कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची' असा लेख लिहिला होता.त्यात लिहील होत,."डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'"  माझ भाकीत त्यांनी खर करून दाखवलं.त्यांची धडपड इथेच थांबणार नाही.त्यांच्या भविष्यकालीन योजनात काही  पुस्तकांचे लिखाण आहे.          
  माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.
                                     भारतातील सामाजिक समस्या या विषयात वेश्या व्यवसायाच्या समस्येविषयी लिहायचे होते.त्यांच्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभव गाडीखान्यात काम करणाऱ्या कुसुम फुले यांना विचारावे म्हणून तेथे गेले होते.आमची चर्चा चालू होती.तेवढ्यात शुब्र वास्नातील गोऱ्यापान,प्रसन्न चेहऱ्याच्या परिचारिका तेथे आल्या.चर्चेत सहभागी झाल्या.'या वसुधा भंडारे' फुलेंनी ओळख करून दिली.चर्चेत त्याही सामील झाल्या.त्यांची निरीक्षणे,त्यांच्यासाठी काय करायला हवे हे सांगू लागल्या.या प्रश्नाविषयी आपल ज्ञान किती तोकड आणि पुस्तकी आहे असे मला वाटले..मी त्यांना म्हटल' खरे तर तुम्ही काम करणाऱ्या लोकांनी यावर संशोधन करायला हवे.'
                                    वसुधाताईनी एक सुस्कारा सोडला.क्षणार्धात त्यांचा प्रसन्न चेहरा उदास झाला.' खरे तर माझे पदवीचे स्वप्नही अपुरे राहिले आहे.उत्पध्यन्ते विलीयन्ते दरिद्राणा मनोरथा.'पुढे त्या म्हणाल्या,'तुमच्या विद्यापीठातून मुलासाठी माहिती पुस्तिका आणली होती.स्वत:हि प्रवेश घ्यावा असे वाटले होते.पण आता पन्नाशी जवळ आली आहे, स्वत:वर पैसे खर्च करायला नको वाटते'
                                   ' स्वप्न पुरे करायला वयाचा काही संबंध नाही.आमच्याकडे  ७५ वर्षाच्या गृहस्थानीही प्रवेश घेतला आहे.आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर मी तुमची फी भरते.जमेल तशी सवडीने परत करा.' मी त्यांना म्हटले.
                                    सात आठ दिवसांनी वसुधाताई फॉर्म भरून घेऊन आल्या.'तुम्ही येऊन गेल्यापासून खूप विचार केला.एक अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी फी भरायला तयार होते,तर आपण घेऊच प्रवेश असे ठरवले.पण मला जमेल ना हो?'
                                 ' न जमायला काय झाले? नक्की जमेल'.मी त्यांना म्हटले.वसुधाताईनी माझ्याकडून फीचे पैसे मात्र घेतले नाहीत.
                                    त्यांच्या भरगच्च दिनक्रमातूनवेळ काढून त्या मन लाऊन अभ्यास करत होत्या.शंका विचारायला येत होत्या.'मला जमेल ना हो' हे पालुपद मात्र सारखे चालूच असायचे.योग शिक्षक म्हणून काम करणे,नर्सिंगवर व्याख्याने देणे,होमिओपॅथी शिकणे असे इतर उद्योगही चालूच होते.तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला.त्या प्रथम श्रेणीत पदवीधर झाल्या.समाजशास्त्रा या विषयात  पहिल्या आल्या.त्यासाठीचे पारितोषिकही त्यांना मिळाले.
                                  आता त्यांच्या प्रतिभेला बहार आला होता.कथा लेख लिहिणे चालूच होते.त्यांच्या सर्व्हिसबुकमध्ये आता पदवीधर झाल्याची नोंद होणार होती.पगारवाढही होणार होती.पण नोकरशाही आड आली.'ही कुठली तुमची पदवी आम्ही नाही मानत' तिथल्या मग्रूर क्लार्कने सुनावले. खर तर अशी वेळ आली की विध्यार्थी निराश होतात. आक्रमक होऊन विद्यापीठात येतात.पदवीच्या सामाज्माण्यातेचे पत्र मागतात.पण वसुधाताईनी मात्र यातले काही केले नाही.त्यांनी शांतपणे माहिती पुस्तिकेतील शासन मान्यतेचे पत्र दाखवले.तरीही काम होत नाही म्हटल्यावर वरिष्ठांपर्यंत जाऊन तड लावली.
                               बी.ए. झाल्यावर त्या एम,ए.ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.आता त्या थांबणार नव्हत्या.टिळक विद्यापीठाच्या नेहरू विद्यास्थानात मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी प्रवेश दिला जातो.तेथेही त्यांची निवड झाली.अभ्यासक्रमाला उपस्थिती गरजेची असते.वर्ग दुपारी असल्याने नोकरी सांभाळून हजार राहणे त्यांना शक्य होणार होते.नोकरीचा व्याप,मुलीचे बाळंतपण,स्वत:चे आजारपण ही तारेवरची कसरत करत त्या जीद्दीने एम.फिल. पूर्ण करत आहेत.परीक्षेच्यावेळीमणक्याचा आजार उद्भवला.बाकावर बसने अशक्य झाले.विध्यापिथाने पाठीला आधार घेऊन बसता येईल असी स्वतंत्र व्यवस्था केली.एक निवृत्त परिचारिका त्यांच्या औषध आणि इंजक्शनचे पाहत होती.
                                डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'.