Friday 20 November 2020

आनंदी वृद्धत्व - ३

                          आमच्यासाठी रोलमॉडेल असणार्या व्यक्तींच्याबद्द्ल येथे लिहिण्यातील माझा उद्देश येथे स्पष्ट करावा असे वाटते. मी निवृत्तीपर्यंत अनेक नकारात्मक भावनांनी ग्रासलेले होते.छोट्या गोष्टींचे भयंकरीकरण करणे,छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे,मुलींच्या शिक्षणाची,लग्नाची या कौटुंबिक काळज्या होत्याच पण काळजी करणे हा स्थायी भाव होता.कोणताही विषय त्यासाठी चाले.न्यूनगंड होताच.मनोविकारतज्ञांची मदत घेण्यापर्यंत सगळे गेले माझ्या नवर्याला पार्किन्सन्स झाल्यावर तर चिंता काळजी गैरसमज यातून अनेक चुका केल्या पार्किन्सन्स मित्रमंडळ या गटात सामील झाल्यावर परिस्थिती बदलली.आजारासह आनंदी राहणारी माणसे भेटली.त्यांच्याबरोबर आम्ही बी घडलो.ही प्रक्रिया हळूहळू झाली.आमच्या आयुष्यात आलेल्या अशा माणसाना माझ्या कुवतीनुसार आपल्यापर्यंत पोचवल्यास अनेकांना त्याचा फायदा होईल असे वाटले.

https://parkinson-diary.blogspot.com/2014/03/blog-post_29.html

  आनंदी वृद्धत्व -३

                                        सुमनताई जोग आणि अरुण जोग हे आमच्या आयुष्यात आलेले आणि आमचे रोल मॉडेल बनलेले जोडपे.समृद्ध सहजीवन आनंदी वृद्धत्व कसे असावे याचा वस्तुपाठ त्यांचे जगणे पाहताना मिळाला..शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात प्राध्यापकी केलेले अरुण जोग आणि सुमनताई, अरुण जोग याना झालेल्या पार्किन्सन्समुळे आमच्या परिवारात सामील झाले.

अरुण जोग शांत,सौम्य,मितभाषी,ऋजू व्यक्तिमत्व ,चेहऱ्यावर हसरा भाव, पार्किन्सन्सलाही  त्यांनी हसत हसत स्वीकारले.सुमन ताईनाच हा खेळाडू,सशक्त माणूस याला कसा पार्किन्सन्स झाला म्हणून वाईट वाटले होते. .खणखणीत आवाज,विचाराची स्पष्टता,रोकठोक बोलण,बोलण्याला कृतीशीलतेची जोड.ही सुमनताईंची वैशिष्ट्य.सत्तरी ओलांडलेल्या  जोग पती पत्नींना भेटायला आम्ही  त्यांच्या घरी  गेलो त्या आधी सभामधून भेटी झाल्या होत्या.घरभेटीत ते अधिक उलगडले.तरुण वयातच  सुमनताईना संधीवाताने गाठले. अरुण जोग शुभंकर ( केअर टेकर )म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.आता सुमनताई शुभंकर बनून त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.आमच्या गप्पात त्यांचा कुठेही तक्रारीचा स्वर, कुरकुर नव्हती.खर तर बोलण्याचे काम मी आणि सुमनताईच करत होतो आणि आमच्या दोघांचे नवरे.मधून मधून अत्यावश्यक तेवढेच बोलत होते.
                        B.E. Electrical आणि M.E.Mechanical असलेले जोग पुना इंजिनिअरींग कॉलेजमधून मेकॅनिकल विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून निवृत्त झाले.मंडळात मात्र ते आमच्यापैकीच एक असत.सुमनताइनीही .शासकीय अभियांत्रिकी विद्यालयातून सिव्हील इंजिनिअर झाल्या.त्या काळात स्त्रियांनी हे क्षेत्र निवडणे धाडसाचे होते.नंतर काही काळ त्यांनी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात नोकरी केली आणि मुलगा झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णयही घेतला.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही धाडसी वृत्ती कायम राहिली.

                        मित्रमंडळाची सभा असो,मेळावा असो की सहल असो ते आवर्जून उपस्थित असत.सुमनताइंचे नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले त्यावेळी काही दिवस त्या सभांना येऊ शकल्या नाहीत,पण जोग मात्र सोबत शोधून सभांना उपस्थीत राहिले.मुलगा आणि मुलगी परदेशात राहणारे.गरज पडली कि तातडीने हजर राहणारे. नातेवायिक आणि मित्रमंडळीचा मोठ्ठा गोतावळा होता.त्यांच्या घराचा वरचा हॉल तेथे जेकृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानावर विचार करणारा अभ्यासगट चाले.जे कृष्णमुर्ती यांची पुस्तके,सीडीज सर्वांसाठी उपलब्ध होती.कृष्णमुर्ती यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खडकवासला येथे त्यांनी बैठे घर बांधून घेतले होते..अरुण जोगाना यात रस नव्हता पण विरोधही नव्हता.परस्पर विरोधी स्वभावाच्या या जोडप्यात नात्याची वीण मात्र घट्ट होती.

                        त्यांचा हॉल अनेक चांगल्या कामासाठी उपलब्ध असे. हृषीकेश पवार यांना पार्किन्सन्स पेशंटसाठी मोफत नृत्योपचार करण्याची इछ्या होती पण जागेचा प्रश्न होता.जोग पती पत्नींनी आपली जागा देवू केली.जोग स्वत:ही नृत्य वर्गात  सामील झाले.त्याचा त्यांना फायदा होत होता म्हणून ते खुश होते.नृत्योपाचारातील सहभागींसाठी तर अरुण काका म्हणजे जवळचे मित्रच.२०१३ मध्ये अरुण जोग यांचे निधन झाले.सातत्यने बरोबर राहणाऱ्या सुमनताई हे कसे सहन करतील असे वाटले.पण त्यांनी जोडीदाराचा मृत्यू अत्यंत समंजसपणाने स्वीकारून पुढील वाटचाल चालू देखील केली.नृत्यवर्गाच्या सर्वाना अरुण काका नसताना तेथे क्लास ही कल्पनाही सहन होणारी नव्हती.पण सुमनताइनी प्रत्येकाना फोन करून सांगितले आणि क्लास तेथेच सुरु राहिला. त्या अमेरिकेला गेल्या तरी हॉलची किल्ली देऊन गेल्या. अमेरिकेला मुलांकडे गेल्यावर.तेथे सेवेसाठी हजर असलेली मुले, नातवंडे, स्वतंत्र खोली अशी लौकिक अर्थाने उत्तम व्यवस्था होती पण सतत कार्यरत असणाऱ्या सुमनताई तेथे रमल्या नाहीत.केअरटेकर,फिजिओथेरपिस्ट, मसाजीस्ट यांच्या सहाय्याने त्या त्यांचे वृद्धत्व तरुणाला लाजवेल अशा जोमाने आपल्याच घरात राहून जगत होत्या,डान्सक्लासमध्ये सहभागी होत होत्या आमच्या सहलीना येत होत्या, आणि त्यांनि उभारलेल्या विविध उद्योगातही सामील होत होत्या..त्यांचे विविध उद्वोग येथे सांगितलेच पाहिजेत.

                             त्यांनी आस्क ( अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्रा)च्या स्थापनेत पुढाकार घेतला.खेड्यापाड्यातील मुलाना गुण कमी मिळाले की इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही.महहागडी प्रायव्हेट कॉलेज परवडत नाहीत.अशा  गरीब मुलाना येथे अत्यंत माफक खर्चात तांत्रिक शिक्षण दिले जाते.प्रत्येक विद्यार्थ्याला काम मिळेल याचीही जबाबदारी घेतली जाते.आस्क्चे ऑफिसही काही दिवस त्यांच्या घरी होते.त्यांच्या मृत्युपूर्वी १/२ वर्षे त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला.तरी वेळोवेळी सल्ला द्यायला त्या होत्याच.विद्यार्थी कमी झाले की इतर  नाउमेद होत पण सुमनताईंच्या  पोतडीतून नवनवीन कल्पना येतच.त्यात सामजिक जाणीव हा गाभा असे.खेड,राजगुरुनगर येथील धरणग्रस्त मुलांसाठी तांत्रिक शिक्षणाची सोय,कोकणातील मुलाना राहण्याची सोय असे उपक्रम असत.हे सगळे करताना वय आजार या कशाचीच अडचण नसे.                 

 त्यांच्या एका नव्या उद्योगाने तर आम्ही अवाकचा झालो.त्यांचा सकाळी सकाळी फोन आला.नेहमीसारखा खणखणीत आवाजात. ऑर्थरायटीसचा सपोर्टग्रुप काढताहेत हे सांगण्यासाठी.हा फोन होता.याची पहिली सभा ११ ऑक्टोबरला भारतीनिवास हॉलमध्ये होणार आहे.याबद्दलची माहिती मंडळाच्या सभेत द्यावी अशी त्यांची इछ्या होती.याची बरेच दिवस आधी पूर्व तयारी चालू होती.घरातून कोणाच्या मदतीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही,जिला  घरातही मदतनिसाची गरज आहे.जिचा एक पाय घरात तर एक हॉस्पिटलमध्ये असतो  अशी स्त्री ८५ व्या वर्षी सपोर्ट ग्रुप चालू करायचा विचार करु शकते हे थक्क करणारेच होते

परंतु तरुणपणीच संधीवाताने गाठलेली छोटीशी कुडी,वाकडी झालेली बोटे,अनेक आजाराने शस्त्रक्रीयानी पोखरलेले शरीर यात कणखर मन वास करत होते.  स्वत:चा आजार जपताना आजूबाजूच्या व्यक्ती,घडामोडी यांचा विचार करणारे विशाल मन,फक्त विचार न करता ठोस कृती करून त्यावर उत्तर शोधण्याची वृत्ती.या कृतीत  त्यांच्यातल्या सिव्हीलल इंजिनिअरने निट भविष्यकालीन आराखडा काढलेला असे. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अध्यापन केल्याने हा आराखडा समोरच्याला पटेलच अशा तऱ्हेने मांडण्याची हातोटी, समोर १५० विद्यार्थ्याना व्याख्यान देत आहेत असा खणखणीत आवाज.नुसत्या एका फोनवर कोणत्याही कामासाठी हजर होतील अशी जोडलेली उत्तम वकूबाची माणसे.या बळावर त्यांनी हे काम उत्तम प्रकारे निभावले.

.गोल्डन एनार्जायझर संस्थेच्या सहायाने त्यांनी या स्वमदत गटाचे अनेक उपक्रम राबवले.तरूण वयात संधिवात झालेल्यांना जगण्याचा उत्साह दिला.सकारात्मक अनुभव लीहीण्यास प्रोत्साहन दिले.त्याना वेबसाईट करायची होती.केअरटेकर साठी एक अभ्यासक्रम राबवायचा होता.असंख्य योजना होत्या.

त्यांच्या नातवाच्या मुंजीला त्यांनी बोलावले होते.त्या नेहमीच अत्यंत नीटनेटकया राहात.मुंजीतही त्या छान नटलेल्या होत्या.उत्साहाने सर्वांशी बोलत होत्या.ओळखी करून देत होत्या.आजाराचा मागमूसही चेहर्यावर नव्हता.

त्यांची माझ्याशी शेवटची भेट डिसेंबरमध्ये आमच्या मंडळाच्या कार्यकारिणी सभेत झाली.
ही मिटिंग त्यांच्या घरी झाली होती.त्या कार्यकारिणीत नसल्या तरी त्यांचे घर आमच्या मिटिंगसाठी सदैव उघडे असायचे.  इंदूरच्या वनिता सोमण या पुण्याला आल्या होत्या त्यांना आम्हाला भेटायचे होते.आम्ही अगदी हक्कानी मध्यवर्ती असलेल्या सुमनताईंच्या घरी मिटिंगच्या वेळीच भेटायला बोलावल.आम्ही सर्व येण्यापूर्वीच वनिताताई आल्या.पण अनेक वर्षांची ओळख असल्यासारखी सुमनताईंनी त्यांचे स्वागत केले. 
दोन महिन्यातच फेब्रुवारीमध्ये त्यांचे निधन झाले.शेवटपर्यंत अनेकांची मदत घेत स्वत:ला आणि संस्थाना सांभाळले त्यांना पालकत्वाची गरज नव्हती त्याच अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या पालक होत्या.    
 



Saturday 7 November 2020

आनंदी वृद्धत्व - २

      आनंदी वृद्धत्व - २

 पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटात स्वत:चे स्वत:च पालक बनून सपोर्ट सिस्टीम बनवून आनंदाने जगणारे  वृद्ध,समर्थपणे  पालकत्व निभावणारी मुले,मुलबाळ नसणारी पण जोडलेल्या माणसांच्या आधारे दैनंदिन जीवन सुखाने जगणारी जोडपी असे अनेक प्रेरणादायी अनुभव आले. ही माणसे आयुष्यात आली नसती तर आमचे वृद्धत्व कसे असले असते मी कल्पना करू शकत नाही पण आता एवढे समृद्ध नक्कीच नसते.यांच्याबद्दल लिहिल्याने आपल्यालाही प्रेरणा मिळेल असे वाटल्याने हे अनुभव देत आहे.

आम्ही पेशंटला शुभार्थी आणि केअरटेकरला शुभंकर म्हणतो.स्वमदतगटात हे शब्द आता रूढ झाले आहेत.आज मी शुभार्थी मालती अग्निहोत्री यांच्याबद्दल लिहित आहे. मालती अग्निहोत्री आणि रामचंद्र अग्निहोत्री या दोन्ही पती-पत्नीला पार्किन्सन्स होता. रामचंद्र अग्निहोत्रीना जावून अडीच वर्षे झाली.

मालती अग्निहोत्री म्हणजे एकदम उत्साही, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. दोघांना पण पार्किन्सन्स होता पण त्यांच्या पतीना स्विकारता नाही आला. ते लवकरच शय्याग्रस्त झाले. आम्ही प्रथम त्यांच्याकडे गेलो तेंव्हा त्यांच्यासाठी एक केअर टेकर,मालतीताईना एक केअरटेकर आणि इतर कामाला बाई होती. या सार्वासह मालतीताईनी सुखनैव जगत होत्या.त्यांनी  पार्किन्सन्सला चांगल्या प्रकारे स्वीकारलं आणि हाताळतही आहेत. खरंतर त्यांचा पार्किन्सन्स गुंतागुंतीचा होता बऱ्याच पीडी पेशंटच्या बाबतीत गीळण्याची समस्या असते. त्यांच्याबाबतीत ही समस्या होती पण थोडी वेगळी त्यांना लिक्विड काही गिळता येत नव्हतं. न्यूरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने त्यांच्या पोटात नळी बसवली होती. सर्व नळीतून घ्यावे लागायचे. डॉक्टर म्हणाले होते की, पाव गोळी, अर्धी गोळी असं थोडं थोडं करत वाढवून तुम्ही गोळी गिळण्याचा प्रयत्न करा.ते जमले तर नळी काढू. आम्ही त्यांच्याकडे प्रथम गेलो तेव्हा त्या नळी लावलेल्या अवस्थेतच सहजपणे फिरत होत्या. चष्मा घालावा तसं ते त्यांच्यासाठी सहज होते.नंतर कधी आमची स्मरणिका द्यायला कधी त्याबाजूला गेलो म्हणून असे आम्ही त्यांच्याकडे गेलो 

त्यावेळी आम्ही आमच्या स्मरणिका किंवा काही द्यायचे असले तर जवळच्या लोकांना घरी जाऊन द्यायचो. यामुळे पोस्टाचा पोचेल की नाही हा प्रश्न असतो तो प्रश्न येणार नाही आणि त्या निमित्याने गाठीभेटी होतात असा विचार असे. गेलो की त्या खूप आदरातिथ्य करायच्या. कुठल्याही वेळी गेलं तरी हसतमुखाने स्वागत करायच्या. 

एकदा काय झालं राव नर्सिंग होम मध्ये आम्ही एका पेशंटला भेटायला गेलो होतो आणि भेटायची वेळ नसल्याने थोडे थांबावे लागणार होते. माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी होत्या मी त्यांना म्हटलं इथे आमच्या अग्निहोत्री म्हणून पेशंट जवळ राहतात आपण जाऊयात का? त्या म्हणाल्या चालेल. माझ्या पर्समध्ये पत्त्यांची एक यादी असते अग्निहोत्रीना फोन केला आणि येऊ का विचारले. दुपारची वेळ होती तरी त्या चालेल म्हणाल्या. आम्ही गेलो तर त्या व्हीलचेअरवरून दार काढायला आल्या. मनातून मला थोडे वाईट वाटले नंतर आम्ही आत गेल्यावर आम्हाला काहीतरी द्यायला व्हीलचेअरवरून उठल्या. चालत काम करू लागल्या.मी प्रश्नार्थक नजरेने पहिले. ते लक्षात आल्यावर त्या म्हणाल्या, की‘ मला दमणूक होते म्हणून मी व्हीलचेअर घेतली आहे. येरझा-या घालायच्या असतील, इकडेतिकडे जायचे असेल, तर मी व्हीलचेअर वापरते. एरवी माझी मी उठून कामे करत असते.आत्तासुद्धा काही काम नव्हते म्हणून मी बाईला झोपायला सांगितले.म्हणून मी दार काढायला व्हीलचेअरवरून आले’.तेव्हा असाही विचार करता येतो हे लक्षात आल्यावर मला खूप गंमत वाटली.अनेकांना मी हे उदाहरण देते. पण घरच्या लोकांना वाटते एकदा व्हीलचेअर दिली की चालण्याचा प्रयत्नच होणार नाही.अर्थात प्रत्येकजण मालतीताईसारखा असणार नाही हेही खरेच. 

मालतीताईना स्वत:ची शक्ती कशी पुरवून वापरायची. असलेल्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे हे छान जमले आहे. त्या आणि त्यांचे पती दोघेही शाळेत शिक्षक होते या रेणुकास्वरूप मध्ये स्पोर्ट्सच्या शिक्षिका होत्या त्यामुळे खिलाडु वृत्ती, हार मानायची नाही जिंकण्यासाठी लढायचे हा त्यांचा बाणा जगण्यातही आहे.

त्यानंतर एकदा आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या पोटावर असलेली नळी काढलेली होती आणि आता त्यांना गोळी गिळता येत होती.पाणी प्याल्याचे समाधान मिळत होते. त्यांनी प्रयत्नपूर्वक हे साध्य केले होते आणि न्यूरॉलॉजिस्टच्या सांगण्यावरूनच नळी काढली होती. इतर व्यायामाबाबतही त्या नियमित होत्या.त्यांना जिथे नळी लावली होती तिथे पोटात अजून थोडं दुखत असे. 

मध्यंतरी त्यांच्या घराचे रंग देणे,रिनोव्हेशन चालले होते त्यामुळे त्या तळजाइच्या बाजूला तात्पुरत्या राहायला गेल्या होत्या.मी घरी आले की फोन करीन म्हणाल्या होत्या. घरी आल्यावर त्यांचा फोनही आला.

माझ्या स्वत:च्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्यावर माझे त्यांच्याकडे जाणे कमी झाले.त्यांचे पती गेल्यावरही मला भेटायला जाणे जमले नव्हते. त्यांचे तीन जिने चढून जावे लागतात हा माझ्यासाठी अडथळा होता. मी त्यांना फोन केला होता आणि माझी अडचण सांगितली होती.

बर्याच दिवसांनी त्यांच्याकडे भेटीला जाण्याचा योग आला.त्याचे काय झाले ८० वर्षाच्या मालतीताईना पेटी शिकायची होती माझी माझी मैत्रीण सुनीता पोतनीस त्याना पेटी शिकावायला जाणार होती.सुनीता मला व्यवस्थित नेऊ शकेल याचा विश्वास होता म्हणून मी तिच्याबरोबर जायचे ठरवले.

                    त्या दिवशी शिकवणाऱ्या बाई येणार म्हणून त्यांची मुलगी आली होती. सुनिता त्यांच्या नात्यातील होती त्यामुळे त्यांचे संबंध अनौपचारिक होते सुनीताच्या मालती ताई गुरु होत्या आणि आता सुनीता त्यांची गुरु होणार होती. आम्ही गेल्यावर त्या व्हीलचेअरवरून आल्या. ऊठून पेटी वाजवण्यासाठी खुर्चीवर बसल्या. सगळे अगदी सहजपणे चालले होते. त्यांची केव्हापासून ची गाणं शिकण्याची इच्छा पूर्ण होणार म्हणून त्या खुश होत्या सुनीता जे शिकवत होती ते सहजपणे करत होत्या. काही वेळाने त्या पार्किन्सन पेशंट आहेत हे मी ही विसरून गेले.

सुनिताबरोबर मी गेले तेंव्हा पार्किन्सन्सविषयी काही बोलायचे नाही असे ठरवले होते.मला त्यांचे पेटी शिकणे अनुभवायचे होते.
त्या स्वतःवर विनोद करत होत्या इतरांवर विनोद करत होत्या. त्यांची मुलगी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत होती जास्तीत जास्त स्वावलंबी कस राहायचं असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या कॅलेंडरवर दुधाचा हिशोब,गॅस केव्हा आला त्याच्या तारखा, वेगवेगळी बिल भरण्याच्या तारखा, फिजिओथेरपिस्ट,मसाजीस्ट,बिकानेरवाला, वाणी असे विविध फोन नंबर असे सर्व लिहिलेलं होतं आणि गरजेनुसार त्या फोन करून स्वतः सर्व मॅनेज करत होत्या आम्ही गेल्या गेल्या त्यांनी बिकानेर वाल्याकडे फोन करायला सुरुवात केली होती आमच्यासाठी त्यांना खायला मागवायचं होतं आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला काही खायचं नाहीये तरी त्यांनी बर्फी मागवली आमच्याबरोबर खाल्ली ही.

त्यांच्याकडे दिवस-रात्र राहणारी एक बाई ठेवलेली आहे तरीही स्वतःला जमेल तेवढे त्या करतच असतात.मुलगी अधून मधून फेरी मारत असते.
त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर त्यामुळे त्यांचे खाली उतरणे होत नाही तेवढी ताकद त्यांच्यात नाही.त्यांच्या बरोबर राहणारी बाई आणि त्या हे दोनच चेहरे,आणि घराच्या भिंती.घराला बाहेरचे दृश्य दिसेल रस्त्यावरची हालचल दिसेल असेही काही नाही.अशावेळी शुभार्थीला नैराश्य येण्याची शक्यता असते. पण मालती ताई हे वेगळेच रसायन आहे. त्यांच्यात कोठे ही कंटाळलेपणा,दुर्मुखलेपणा,कुरकुर नाही.उलट आनंदी दिसत होत्या.शेजारच्या चाळीस पन्नाशीच्या बायका येतात आम्ही गप्पा मारतो,हसतो, खिदळतो,खानपान करतो.असे त्या सांगत होत्या.मला याचे खूप आश्चर्य वाटले.

त्यांची शारीरिक अवस्था फारशी चांगली नाही.इतक्या वर्षाचा पीडी.या कशाचेच त्यांना काही नव्हते.त्या सहजपणे वावरत होत्या.चहा पिण्यासाठी, पेटी वाजविण्यासाठी खुर्चीवर बसल्या.मध्येच व्हीलचेअरवरून बाथरुमला जाऊन आल्या.मुलगी सांगत होती उलट ती आम्हालाच सारखीच तुमची सर्दी झाली,पाठ दुखली अशी कुरकुर का असते?.असे रागावते.

एकुणात मुलगा,मुलगी गरजेनुसार आहेत पण त्या स्वात:च स्वत:च्या पालक आहेत असे म्हणायला हरकत नाही.

मी घरी परतले ती एक सकारात्मक उर्जा घेऊनच.निराशेने ग्रासलेल्या शुभार्थीनी एक दिवस मालती ताई यांच्याबरोबर घालवला तर त्यांचे नैराश्य कोणत्याही समुपादेशनाशिवाय निघून जाईल असे मला वाटले.

या लेखातून त्यांच्यातली थोडी जरी उर्जा मी पोचवू शक्ले तरी माझ्या लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटेल.

( मंडळाच्या वेबसाईटवर' क्षण भारावलेले'  असा लेख मी मालतीताई यांच्यावर लिहिला होता.त्यातच थोडा फेरफार करून हे लेखन केले आहे.)

Wednesday 4 November 2020

आनंदी वृद्धत्व - १

     आनंदी वृद्धत्व - १

                           वृद्धांचे पालकत्व या ग्रुपवर विविध अनुभव वाचायला मिळत आहेत.प्रत्येक अनुभवावर दीर्घ प्रतिसाद लिहायचा असतो.पण थोडक्यात लिहिले जाते. आज मी आमचाच अनुभव सांगणार आहे.

                          आमच्या बाबतीत सांगायचे तर आमचे वृद्धत्व अत्यंत आनंदी आहे.समधानी,कृतार्थ आहे. सुखी माणसाचा सदरा आमच्याकडे मागु शकता.यासाठी आर्थिक गुंतवणुकीइतकीच  नात्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. आर्थिक नियोजनात आम्ही थोडे कमी पडलो पण नात्यांची गुंतवणूक मात्र भरपूर आहे.

                            निवृत्तीपूर्वीच निवृत्तीनंतर काय करायचे याचे प्लान ठरवले होते.आमच्या घरात पार्किन्सन्सने प्रवेश केला आणि आधीचे प्लान बाजूला ठेवून जीवनाला वेगाळीच दिशा मिळाली. मी आधी काय ठरवले होते हे सांगणे येथे गरजेचे नसल्याने त्याबाबत लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे.

बर्याच अनुभवात ४५/ ५० वयापासून नियोजन करावे असा विचार दिसला. त्याप्रमाणे झाले तर उत्तमच. पण वेळ पडली तर प्लान बदलण्याचीही मनाची तयरी ठेवावी.ठरवल्याप्रमाणे होत नाही याची खंत बाळगू नये असे सुचवावेसे वाटते.

                             माझे पती इंजिनिअर.वय वर्षे ७९.एका मोठ्या कंपनीतून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.गेली २१ वर्षे पार्किन्सन्स आजार आहे.जुलैमध्ये कोविद्नीही हजेरी लावली.आता पूर्ण बरे झाले.मी वय वर्षे ७२.समाजशास्त्राची प्राध्यापक, २००७ मध्ये स्लीप डिस्कचा त्रास सुरु झाल्याने एक वर्ष आधीच स्वेछ्यानिवृत्ती घेतली.मला ब्लड प्रेशर,Hypo ,thyroid,चा त्रास आहे.मागच्या वर्षी कॅन्सर झाला त्यातून बरी झाले.

तीन मुली. त्या विवाहित आहेत.आम्ही दोघेच राहतो.पण मुली जावयांचे आमच्याकडे पूर्ण लक्ष असते.फोनवर आवाजावरून त्यांना आम्ही ठीक आहोत का हे समजते.आम्ही बरीच वर्षे या भागात राहत असल्याने आमची सपोर्ट सिस्टीम भक्कम आहे.यात वाणी,फळवाला,भाजीवाला इ. दैनंदिन गरजा भागवणारे आहेत तसेच गावातून काही आणायचे असेल,इतर काही गरजा असतील तर पुरवणारे मित्र मैत्रिणी आहेत.ज्यासाठी आम्हालाच जायला हवे अशा कामासाठी बरोबर येणारे रिक्षावाले आहेत.आमच्याकडे घरकाम करणाऱ्याही आमच्या सपोर्ट सिस्टीमचा भाग आहेत.आमचे शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच आहे त्यांच्याकडे तीन डॉक्टर आहेत.आम्हाला उठून दवाखान्यात जावे लागत नाही..येता जाता तेच व्हिजीट   करतात.त्यांचा खूपच आधार वाटतो मुलींच्या प्रमाणे ते आमचे पालकच आहेत.मुलीनाही त्यांच्यामुळे आमची काळजी कमी वाटते.याशिवाय एक जावई आर्मीत अर्थोपेडीक सर्जन आहे.त्याचाही आधार वाटतो.  

                          एक मुलगी पुण्यातच कायम आहे एक दिल्लीला तर एक बदल्यानुसार वेगवेगळ्या गावी. गेली काही वर्षे पुण्यात आहे.त्या एका हाकेत धाऊन येतील अशी खात्री असते.आम्हीही त्याना काळजी वाटणार नाही असेच वागतो.सकाळी आमच्या समोरच्याच बागेत हास्यक्लबला जातो मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू घेतो.तो संपल्यावर थोडावेळ मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा,हास्यविनोद यातून भरपूर मानसिक प्राणवायू मिळतो. संध्याकाळी आमच्याकडे आजूबाजूचे काहीजण येतात आम्ही रामरक्षा,प्राणायाम,मेडीटेशन करतो.आठवड्यातून दोनदा आमच्या घरी गाण्याचा क्लास असतो.त्याचे विविध उपक्रम चालू असतात.

                      आमच्याकडे एक मोठ्ठा हॉल असल्याने.गुरु पौर्णिमा,मित्र मैत्रीणीत कोणाचे लग्न असल्यास एकत्रित केळवण आमच्या पार्किन्सन्स मित्रेमंडळ या सपोर्ट ग्रुपची मिटिंग,हास्य्क्लबची मिटिंग अशा गोष्टी ही चालू असतात.काही चांगल्या कामासाठी छोटा हॉल हवा असल्यास आम्ही देतो.मध्यंतरी वर्ध्याच्या सर्वोदयी माननीय कालीन्दिताई पुण्यात आल्या होत्या. अयोजकाना त्यांच्याशी अनौपचारिक गप्पांसाठी जागा हवी होती आमच्याकडे या गप्पा झाल्या.आमच्यासाठीही घरबसल्या ही सुवर्ण संधी होती.समोर बाग असल्याने तेथे येणारे डोकावतात.काही हवे नको विचारतात. आम्ही दोघेही माणसात रमणारे असल्याने आम्हाला केंव्हाही कोणी आलेले चालते. 

                     सर्व काही सुरळीत असताना हे असे जगणे असते पण घराच्या  दुरुस्त्या,देखभाल यासाठी मुलींचाच आधार असतो.माझी एक शस्त्रक्रिया,कॅन्सर,ह्यांचा कोविद अशी आमची मोठ्ठी आजारपणे झाली त्यावेळी मुलीनी एकत्र संगनमताने सर्व सूत्रे  आपल्या हातात घेतली आता आम्ही म्हणू तसेच करायचे असे बजावले तन,मन धन या सर्व पातळीवर चोख भूमिका बजावली.आम्हाला १०० टक्के कम्फर्टआणि झिरो इनकन्व्हीनिंअस असेल याची पुरेपूर काळजी घेतली.आमचे काही एक न ऐकता स्वत:च्या घरी काही काळाकरिता हलवले.मोतीबिंदू सारख्या शास्त्रक्रीयान्च्यावेळी मात्र आमचे आम्ही मॅनेज केले.                      

करोना नंतर लॉकडाऊन झाला त्यावेळीही कामवाल्या नसल्याने आम्हाला झेपणे शक्य नव्हते.आम्ही कोणतीही खळखळ न करता मुलीकडे राहायला गेलो.

 आम्ही स्वत:ला  पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले आहे.तोही मोठ्ठा परिवार आमच्याबरोबर आहे.या आमच्या कामात आमच्या पालकांची लुडबुड नसते.उलट गरजेनुसार मदतच असते.पण माझ्या ,कॅन्सरच्या काळात माझ्या मुली आणि आमचा पार्किन्सन्स परिवार यांनी मी पूर्ण बरी होईपर्यंत काही काम करू दिले नाही.एकुणात आमचे पालक आणि आम्ही यांच्यात सुंदर हार्मनी आहे.तारा जास्त ताणलेल्याही नाहीत आणि सैलही नाहीत.

आमच्या या आनंदी वृद्धत्वाचे श्रेय' पार्किन्सन्ससह अनांदाने जगूया' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पार्किन्सन्स मित्रमंडळाला जाते येथे काम करताना आमचा स्व विस्तारला.१५०/२०० पेशंटच्या घरभेटी घेताना आणि काम करताना आनंदी वृद्धत्वासाठी रोल मॉडेल मिळाले. वृद्धत्व कसे असावे कसे नसावे याचा वस्तुपाठ मिळाला.

या रोल मॉडेल बद्दलही लिहिणार आहे.

https://parkinson-diary.blogspot.com/2017/09/blog-post_16.html