Friday 21 March 2014

अंधत्वावर मात करणारी दृष्टी

मीरा बडवे यांचे "टीम निवांत" वाचायला घेतले फक्त प्रस्तावनाच वाचली आणि मी भाराऊन गेले.निवांत अंध मुक्त विकासालय या शाळेच्या पलीकडच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी रचल्या गेलेल्या विलक्षण प्रयोगाची सकारात्मक गाथा.बडवे कुटुंबाच्या घराचा निवांत टीमपर्यंत झालेला जीवन प्रवास.पुस्तक पूर्ण वाचल्यावर परिचय लिहायलाच हवा.अपंग दिनी बडवे कुटुंबियांच्या कार्याला डोळस माणसानाही शिकवणा-या त्यांच्या चमूला सलाम.मला राहून राहून आज विजय कुदळेची आठवण येते.त्याच्यापर्यंत हे पोचवायला हव.
अपंग दिनानिमित्त त्याची ही कहाणी. १० वर्षापूर्वी केसरी या वृत्तपत्रात लिहिलेली.
"थेल्मा काळे वर्गावर राउंड मारून आल्या तर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहात होते.रोज प्रत्येक वर्गावर कडक शब्दात कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्याना सुनावणा-या अशा एकाएकी हळव्या का झाल्या? मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.
सेंट हिल्डाजमध्ये वार्षिक परिक्षेचे केंद्र होते.आणि थेल्मा काळे तिथल्या स्थानिक वरिष्ठ पर्यवेक्षिका होत्या.माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहिल्यावर त्या म्हणाल्या,'ही धडधाकट मुले आणि कॉपी करतात.तो अंध विद्यार्थी पहा कसा रायटरला धडाधडा उत्तरे सांगतो आहे.त्याला शिकायची इतकी तळमळ आहे,तर वाचता येत नाही.आणि हे विद्यार्थी डोळे असून न वाचता येतात आणि कॉपी करून पास होऊ पहातात'.थेल्माच चिडण रास्त होता आणि हळवं होणही.विजय कुद्ळेकडे पाहिल्यावर त्याच्या वर्गात असणार्या प्रत्येक सुपरवायझरची अशीच भावना व्हायची.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मुक्ताविद्याकेंद्र सुरु झाल्यापासून प्रत्येक वर्षी एकना एक अंध विद्यार्थी असतोच.परिक्षेच्यावेळी या विद्यार्थ्याना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.रायटर घेण्याची परवानगी दिली जाते.अंतर्गत मुल्यामापनात सुट दिली जाते.काहीजण अभासक्रम अर्धवट सोडतात.काही थोडे विषय सोडवत अभ्यासक्रम पूर्ण करतात.अनेक गोष्टी दुसर्यावर अवलंबून असल्याने पदवीधर होणे ही सर्वसामान्य वाटणारी बाब अंधांसाठी खडतर बनते.विजय माझ्या संपर्कात आल्याने हीखडतरता मला लक्षात आली.
प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यावर पुस्तक वाचून दाखवायला कोणी मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.परंतु तसे कोणी उपलब्ध झाले नाही. मुक्ताविद्याकेंद्राने प्रथम वर्षाच्या सर्व विषयाच्या श्राव्यफिती तयार केल्या होत्या पण कुद्ळेची परिस्थिती त्या विकत घेण्याएवढी नव्हती.त्याला वडील नव्हते. आई चतुर्थश्रेणीकर्मचारी.परत देण्याच्या बोलीवर त्याला श्राव्यफिती द्यायचे ठरले. पण त्याला लावायला टेपरेकॉर्डर हावा त्याचे काय?शेवटी परिक्षेच्या काही दिवस आधी त्याच्या आईने हप्त्यावर टेपरेकॉर्डर आणला.श्राव्यफिती ऐकून ऐकून विजयने अभ्यास केला.त्याचे सर्व विषय तोंडपाठ झाले होते.विज्ञान आणि समाज या पेपरच्या दिवशी वीज गेल्यामुळे त्याला केसेट ऐकताच आल्या नाहीत.म्हणून तो थोडा उदास होता.परंतु तो सर्व विषयात पास झाला.त्याचा रायटर असलेल्या मानेने प्रथम वर्षास प्रवेश घेतला..
प्रत्येक वर्षी कुदळेचा रायटर वेगळा होता.प्रत्येकानी पुढील वर्षी मुक्तामध्ये प्रवेश घेतला.डोळसानी अंधाकडून प्रेरणा घेतली होती.
प्रथम वर्षानंतर विजयचा आत्मविश्वास वाढला.आता त्याच्याकडे टेपरेकॉर्डर होता.द्वितीय वर्षाला त्यांनी प्रथमपासून अभ्यास केला होता सुरुवातीपासून कॅसेट ऐकल्या.त्यामुळे ते वर्ष सहज पार पडले.तृतीय वर्षात मात्र संज्ञापनकौशल्य, आणि विशिष्ट सामाजिक प्रश्नांचा अभ्यास या दोनच विषयाच्या कॅसेट होत्या.त्याने विशेष विषय म्हणून निवडलेल्या राज्यशास्त्राच्या नव्हत्या.मग राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका सुमित्रा काकडे, प्रतिभा मुडगेरीकर,शुभदा चांदवले यांनी विद्यापीठाच्या टेपरेकॉर्डरवर खास त्याच्यासाठी जेंव्हा फारसा आवाज नसतो अशी वेळ पाहून व्याख्यान रेकॉर्ड केले.प्राध्यापकांचे सहकार्य आणि विजयचे कष्ट याला फळ आले. तो हायर सेकण्डक्लास मिळून पदवीधर झाला.त्याला महानगरपालिकेत नोकरीही मिळाली.
पदवीधरांच्या स्नेहमेळाव्यास तो आला होता.बरोबर त्याची आईही आली होती.आकाशवाणीच्या तत्कालीन संचालिका उष:प्रभा पागे आणि साहित्यिक शरणकुमार लिंबाळे प्रमुख पाहुणे होते विजयचा सत्कार करण्यात आला.त्याच्या आईलाही स्टेजवर बोलावले होते.तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.निमंत्रित पाहुणे प्रेक्षक सर्वांनाच गहिवरून आले. खणखणीत आवाजात विजयने आपले मनोगत व्यक्त केले.त्यानेच केलेल्या दृष्टी या कावितेने भाषणाचा शेवट केला.
सुयोग्य दृष्टी प्रखर ज्ञान
टि.म.वि.चा मंत्र महान
अध्ययन पद्धती आहे छान
लोकशाहीची खरीखुरीजाण
टि.म.वि.ने आम्हाला केले सज्ञान
विजय कुडळे गातो गान
टि.म.वि.स करितो प्रणाम.
विजयला पुढे एम.ए. करायचे होते.टि.म.वि. मधेच तो प्रवेश घेणार होता.राज्यशास्त्राच्या माधाळेसरांनी त्याला मदत करायचे कबुल केले.अंधत्वावर मात करायची दृष्टी असल्याने तो येथेही यशस्वी होईल यात शंका नाही"
___________________________________________________
मी निवृत्त झाल्यावर त्याचा संपर्क राहिला नाही. कुठे असेल? कसा असेल? माहित नाही.त्याच्याशी संपर्काचे साधन नाही.कुठेही असलास तरी विजय तुला अपंग दिनासाठी तुझ्या स्वप्नांसाठी शुभेच्छा.
(केसरीने छापावयास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.)

Saturday 8 March 2014

आम्ही गृहिणी

                                                 आम्ही गृहिणी
 समस्त महिलानो महिलादिनाच्या शुभेच्छा!
ज्यांच्यामुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला त्या सर्व ज्ञात अज्ञात सुधारकाना आणि त्यांच्या चळवळीला अभिवादन.
                                 मी स्वतः विवाहानंतर १५ वर्षे गृहिणी होते.त्यानंतर प्राध्यापक झाले.विभाग प्रमुख झाले.पण गृहिणी असल्याने वाटणारा न्युनगंड या काळातही राहिलाच.इतरानी केलेले ओरखडे हे काम चोखपणे करत होते.कदाचित म्हणूनच  अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्‍या आणि स्वतःची पुढे प्रगती करणार्‍या गृहीणींबाबत मला विशेष आस्था वाटली.माझ्या दूरशिक्षणातील विद्यार्थिनीवरील हा लेख.

                              "निवासी संपर्कसत्रात परस्पर परिचयाचा कार्यक्रम चालु होता.'मी सुजाता काळे गृहिणी.'सुजाताने आपला परिचय करुन दिला.गृहिणी हा शब्द तिने असा काही उच्चारला की गृहिणी असल्याचा अभिमान त्यात होता.अभ्यासक्रमाबाबतचे अनुभव,अभ्यासक्रमाने काय दिले हे ती अगदी नेमकेपणाने,ठामपणे,आत्मविश्वासाने सांगत होती.प्रवेश घेण्यासाठी आलेली सुजाता मला चांगलीच आठवत होती.बावरलेली, गोंधळलेली,प्रवेश घ्यावा की नाही अशा संभ्रमात असलेली.तुम्ही काय करता या प्रश्नाला तिने काही नाही असे उत्तर दिले होते.

बहुतेक गृहिणींच्याबाबत असेच होते.घर्,मुले संसार यात त्या इतक्या गुरफटून गेलेल्या असतात.की स्वतःचे वेगळे अस्तित्व राहिलेलेच नसते.स्वतःच विणलेल्या कोशात अडकल्याने घराच्या उभारणीत,घरातील माणसांच्या घडणीत त्यांचे असलेले महत्व त्यांच्या लक्षातच आलेले नसते.अशा अनेक गृहिणी दूरशिक्षणातील बी.ए. अभ्यासक्रमास प्रवेश घेतात आणि बघता बघता त्यांच्यातील सुरवंटाचे फुलपाखरु होते. बर्‍याचवेळा फक्त पदवीधर होणे एवढेच स्वप्न त्या घेऊन आलेल्या असतात.पण हळूहळू त्यांचे क्षितिज विस्तारत जाते.पुढे त्या वेगळ्याच रुपात भेटतात आणि आम्ही प्राध्यापक मंडळी सुखावून जातो.
         
रत्नागिरी येथे मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अधिवेषनासाठी गेले होते.तिथे एक पस्तीशीतील स्त्री येऊन म्हणाली,मॅडम ओळखलत का?माझा प्रश्नार्थक चेहरा पाहुन ती म्हणाली,'मी प्रिती कोल्हे''     
' तुम्ही इथे कशा?' मी विचारले.
'मॅडम नाशिकच्या के.टी.एच.एम.मध्ये समाजशास्त्राची प्राध्यापक आहे'
मी अवाक होऊन आणि सुखाउनही तिच्याकडे पहातच राहिले.

प्रिती बी.ए.करत असताना नाशिकच्या संपर्कसत्रात एक दोन वेळाच भेटली होती.परंतु तीनही वर्षातील
गृहपाठातून ती सर्व प्राध्यापकाना माहित होती.एखादी चांगली उत्तरपत्रिका.आली,की तो आनंद सर्व प्राध्यापकात नेहमी वाटला जायचा.प्रितीचे गृहपाठ सुंदर अक्षरातले,निट्नेटके, मनापासून लिहिलेले असायचे.त्यांचे सामूहिक वाचन झाले  प्रितीला पाहिल्यावर मला हे सर्व आठवले.प्रितीने बी.ए.केल्यावर समाजशास्त्रात एम.ए. केले होते.त्यानंतर सेटची परीक्षा दिली होती.सेटचा निकाल नेहमी कडक  लागतो.फार थोडे उत्तीर्ण होतात.आमची दूरशिक्षणातून पुढे आलेली प्रिती मात्र पहिल्याच प्रयत्नात पास झाली.आपलीच विद्यार्थिनी प्राध्यापक म्हणून बरोबरीच्या नात्याने शेजारी बसते हा आनंद काही वेगळाच होता.

प्रितीप्रमाणे अनेक उदाहरणे सांगता येतील.पतीच्या बद्लीप्रमाणे गावोगाव फिरायला लागले तरी पदवीनंतर पीएच..डी.पर्यन्त भरारी मारुन पुढे पुस्तके लिहिणारी सुवर्णा,एम.ए.,एम.एस.ड्ब्ल्यु. करुन भारती विद्यापिठात काम करणार्‍या मंजुषा  मांडके आणि रमा सोनावणे,एम.ए. आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन स्वतःची स्वयंसेवी संस्था काढणारी सुशिला ढवळे अशा कितीतरी.

काही गृहिणीनी मात्र बी.ए. झाल्यावर दुसरे काही न करता गृहिणी म्हणून राहणेच पसंत केले.परंतु अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापुर्वीचे आमचे गृहिणी असणे आणि अभ्यासक्रमानंतरचे गृहिणी असणे यात जमिन अस्मानाचा फरक असल्याचे अनेक गृहिणी सांगतात.कधी पत्रातून तर कधी प्रत्यक्ष भेटुन. 'गृहिणी सचिवः सखी' असे यांच्याबाबत म्हणता येइल

बँक ऑफिसरची पत्नी असणारी स्मिता म्हणते,पतीच्या सुखदु:खात अधिक चांगल्या रीतीने समरस होता आले.त्यामुळे पतीची प्रगती अधिक वेगाने झाली.सहजिवन अधिक चांगले झाले'.

शशीकलाचे पती अर्थशास्त्रातील तज्ज्ञ.तिच्या पतीचे समाजासाठी योगदान किती मोठे आहे याची तिला नव्याने जाणिव झाली.संसारातील बारीकसारीक कुरबुरी त्यांच्यापर्यंत न पोहोचविता.घराचा सर्वार्थाने भार उचलणे आणि पतीला त्यांच्या कामात झोकून काम करु देणे,हे सुद्धा मोठे समाजकार्य आहे असे तिला वाटते.मुले आणि बाबा यांच्यात मध्यस्ताचे काम आपण निट करु शकतो असे सुरेखाला वाटते.मुले अशी का वागतात याच्या मुळाशी जाउन ती विचार करु शकते.ती आता मुलांची जवळची मैत्रिण झाली आहे.

विशेष म्हणजे या गृहिणींमध्ये सर्व आर्थिक सामाजिक स्तरातील स्त्रिया आहेत.हिंदू आहेत तशा मुस्लीम, ख्रिश्चन आहेत.ग्रामिण भागातील आहेत तशा शहरातील आहेत.यांची भरारी वरवर पाहता उत्तुंग वाटणार नाही.पण अनेक चिमण्या पाखरांच्या पंखात उत्तुंग भरारी घेण्याचे बळ देण्याचे काम त्या जाणिवपूर्वक करत आहेत हे निश्चित.एक स्त्री शिकली, की कुटूंब सुधारेल् व समाज सुधारेल हे सुधारकांचे गृहितक मोठाल्या पद्व्या घेउन फक्त स्वतःचीच प्रग्ती करणार्‍या स्त्रियानी खोटेच पाडले.होते. आमच्या विद्यार्थिनी गृहिणी मात्र या गृहितकला निस्चित न्याय देत आहेत"


१८डिसेंबर २००४ च्या केसरी मध्ये उत्तुंग भरारी या सदरात सदर लेख छापून आला होता. छापण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.