Tuesday 18 October 2022

डॉ.विद्या रवींद्र जोशी.

                                           डॉ.विद्या रवींद्र जोशी.

                  आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळ ग्रुपवर 'प्राउड ऑफ यु' असे म्हणावे असे अनेक चमचमते तारे आहेत.डॉ.विद्या रविंद्र जोशी या त्यातील एक.एका लेखात न सामावणारे, चरित्र लिहायला हवे असा त्यांचा जीवन प्रवास आहे.यापूर्वी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे.ती आवर्जून वाचावी.येथे आजारानी त्यांच्या घेतलेल्या कठीण परीक्षा आणि त्यावर त्यांनी केलेली मात यावरच भर दिला आहे.

               १०१२ मध्ये त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले त्या आधी विद्याताई सातवे अस्मानपे होत्या.कारण त्या मुलीकडे अमेरिकेला चालल्या होत्या.स्वत: डॉक्टर,आहारतज्ज्ञ. मुलीचे बाळंतपणाचा आनंद लुटायची स्वप्ने पाहत होत्या.विद्याताई डॉक्टर.चेंबूरच्या साहित्य-संस्कृती, अध्यात्मिक क्षेत्रात विविध संस्थांच्या स्थापनेत आणि कार्यात  पुढाकार असलेल्या. तरी व्यवसाय आणि हे सामजिक कार्य करताना  त्यांनी घर संसार यालाही महत्व दिले होते.ते आणि त्यांचे  Dentist पती यांनी घराजवळचे पॉलीक्लिनिक निवडले होते कामाच्या वेळा मुलांना पाहता येईल अशा adjust केल्या होत्या.प्रॅक्टिस उत्तम चालत होती.रात्री दोनपर्यंत पेशंट यायचे.पेशंट आल्याने रात्री उठावे लागले हे रोजचे असायचे.पण आता मात्र त्यांच्यातल्या आईने मात केली होती.त्यांची अमेरिकेची तिकिटे काढून झाली होती.बॅगा भरणे चालू होते.त्याच वेळी जांघेत एक बारीक गाठ दिसली बायोप्सी,पेट स्कॅन असे सोपस्कार झाले. लीम्फोमाचे (लसिका पेशी) कॅन्सरचे निदान झाले.स्कॅनमध्ये जबड्याखालीही छोटी गाठ दिसत होती चवथी स्टेज आहे असे सांगण्यात आले.अमेरिकेची तिकिटे रद्द झाली.सापशिडीच्या खेळात अगदी १००व्या घराच्या जवळ यावे आणि ९९ ला सापाच्या तोंडाकडे येऊन एकदम खाली घसरावे तसे झाले.१४ साला पर्यंत २२/२३ किमो झाल्या.  

           नातीचे बाळंतपण झालेच नाही पण चार महिन्याच्या नातीला घेऊन मुलगी भारतात आली ती रात्री येणार होती.किमो चालूच होती.सकाळी मराठी साहित्य रसिक मंडळाचे साहित्य संमेलन होते.सर्वांचे म्हणणे पडले,तुम्ही अध्यक्ष आहात तर १५ मिनिटे तरी येऊन जा. रिक्षातून अगदी १५ मिनिटेच जाऊन आल्या.  त्या दिवशीच दुपारी डोळे सुजायला लागले.हे साधेसुधे डोळे येणे नव्हते तर इतरना लगेच लागण होणारे व्हायरल होते. डॉक्टर पतिना ती झालीच.दोघांनी दीड महिना एका खोली कोंडून घेतले.मुलगी आली खालीच असणाऱ्या आत्याकडे राहिली.लांबून मुलीला दाखवले. किती यातना झाल्या असतील.पण नशिबाने हुलकावणी देण्याचा हा पहिला प्रसंग नव्हता.

             प्रथम पासून धाडसी वृत्ती,कॉलेजमध्ये असताना NCC च्या G १,G२ पर्रीक्षा दिल्या होत्या.रायफल युनिटमध्ये होत्या. mountaineering सिलेक्शन झाले होते.पण वडिलांनी परमिशन दिली नाही. AFMC साठी प्रयत्न केला होता.परीक्षा मुलाखत या कठीण परीक्षा पास झाल्या होत्या.या दोन्ही वेळी त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि मध्यमवर्गीय मानसिकता आड आल्या आणि नशिबानी हुलकावणी दिली.अनेक वर्ष याचा सल होता.असे असले तरी अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी असो किंवा आजाराशी लढा देणे असो त्यांची खिलाडीवृत्ती आणि नंतरच्या काळात भिनलेले अध्यात्म कामी आले.

          एकीकडे किमो चालू असताना पुस्तकांचे काम चालूच होते १३ साली आरोग्यासाठी मनाचे श्लोक्चे १३ व्हिडिओ केले.‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’, ‘आत्माराम’, ‘दास सर्वोत्तमाचा’ ही प्रकाशित होत असलेली कादंबरी आणि ‘दासबोध जीवनाचा मार्गदर्शक’ ही पुस्तके लिहून तयार झाली. रामदासांवरील कादंबरी लिहिण्यासाठी त्यांच्या जांभ या मूळगावी त्या जाऊन आल्या.रत्नागीरीत नवरात्रात 9 दिवस अध्यात्मिक विषयावर व्याख्याने दिली. एकीकडे किमो थेरपी कॅन्सरला हटवून शरीर बरे करत होती तर दुसरीकडे रामदास मनाला खंबीर करत होते.आजार मला कुठे झाला तो तर शरीराला झाला. मी म्हणजे शरीर नव्हे. ही आध्यत्मिक समज ना खंत ना खेद अशी वृत्ती निर्माण करत होता.प्रचंड उर्जा देत होता.

                  १३ साली त्या अमेरीकेला  गेल्या.किती तरी दिवसाच्या  तितिक्षे नंतर आता त्याना नातीला कवटाळता आले होते.सहवासाचा आनंद लुटता आला होता. १५ साली त्या पुन्हा अमेरीकेला गेल्या तेंव्हा  बरोबर दासबोध घेवून गेल्या.शिक्षक आणि पालक यांच्यासाठी 'दासबोध जीवनाचा मार्गदर्शक' हे पुस्तक लिहिले.

                    दरम्यान १६ साली रविंद्र जोशीना पार्किन्सन्स झाला. ७५ वर्षापर्यंत ते प्रॅक्टिस करत होते. ते तबला वाजवतात त्याचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यासाठी उपयोग होतो असं त्यांना वाटतं. प्राणायम, मेडिटेशन आणि व्यायाम हे दोघेही करतात. खेळाडू असल्याने पॉझिटिव वृत्ती आहे त्यामुळे त्यांचा पार्किन्सन्स आटोक्यात आहे.यातच विद्याताई डॉक्टर आणि सजग  शुभंकर त्याचाही फायदा आहेच.विद्याताईनीही दवाखाना बंद केला पण फोनवर साल देणे सुरूच असते पुर्विपासूनचे पेशंट तुमचा चेहरा पहिला तरी चांगले वाटते म्हणतात.स्वस्थ बसणे हा त्यांचा स्वभावच नाही. नवनवीन क्षेत्रे धुंडाळणे सुरूच असते

               कॅन्सरनी थोडी उसंत दिली होती.त्यांनी स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला छान ग्रुप जमला.'द मेकिंग' ही शॉर्ट फिल्म कशी बनवायची यावर,देवाचा धर्म अशा  शॉर्ट फिल्म केल्या.व्हेन्यू विद्याताईंचे घर आणि दवाखाना. तेथेच सेट उभे राहत.आता रामदासांवर फिल्म बनवायची आहे.सगळे छान चालले असताना पुन्हा कॅन्सरने डोके वर काढले.१९ साली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली.संगणकावर लाईन वरवर दिसायला लागल्या.शस्त्रक्रियेमुळे थोडे दिवस होईल असे वाटले.डोळ्यांच्या डॉक्टरांनीही काही समस्या दिसत नसल्याचे सांगितले.पण अखंड ते सावधान पण असे समर्थ अभ्यासक असलेल्या विद्याताईना वेगळाच संशय येत होता.

डॉक्टर म्हणून त्यांच्या मनात आलेल्या शंका फिटेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या.एका अद्ययावत तपासणीत मानेच्या शिरेत छोटी gland दिसली.आता किमो थोड्या पण रीगरस tritment होती.प्लेट लेट कमी होत. त्या वाढल्याशिवाय दुसरी किमो नसे.त्यासाठी पोटात इंजक्शन घावी लागत.डोळ्याला ड्रायनेस येई.स्क्रीन दिसत नसे.युरीनरी इन्फेक्शन अशा अनेक गुंतागुंती होत होत्या.जेवताना जेवण जात नव्हते आणि रात्रीअपरात्री कडकडून भूक लागे.अगदी रडायला येई.विवाहित मुलगी नोकरी सोडून राहायला आली.ती त्या काळात विद्याताईची आई झाली.कोविद हजेरी राहून गेला.दोनदा नागीण या आजारानेही विळखा घातला होता.या सर्वातून मनाची ताकद आणि अध्यात्मिक उंची वाढली. प्रत्येक गोष्ट स्वीकारून पुढे जायचे याचा विचार केला की आजार विसरणे सोपे जाते असे त्यांचे साधे सोपे तत्वज्ञान आहे. अध्यात्मावर त्यांनी फक्त पुस्तके लिहिली नाहीत तर स्वतः ते आचरणात आणले आहे.

         इतका त्रास असला तरी काम थांबले नव्हतेच.दोन किमो मध्ये थोडा काळ बरे वाटे त्यात तीन पुस्तकांचे प्रुफरीडिंग केले.डोळे दुखत.डोळ्यात ड्रोप घालायचे आणि काम करायचे.’दास सर्वोत्तमाचा’ या पुस्तकाचे प्रुफ रीडिंग याच काळातले.  

        आता कवितांचे पुस्तक,८ दीर्घकथांचे पुस्तक,आयुर्वेदीय रेसिपी,योगासानावरील पुस्तक छपाईच्या मार्गावर आहेत.२० साली पेट स्कॅन नॉर्मल आला आहे.आता अजारानो नका फिरकू आमच्या विद्याताईंकडे.भरपूर काम व्हायचे आहे अजून त्यांच्याकडून.यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.