कालचीच गोष्ट.मी डॉक्टरकडे गेले होते हे घरी एकटेच होते.आणि गॅस सिलेंडर आला.खर तर मी गॅससाठी नंबर लावला आणि दोनचार दिवसांनी गॅस येईल असा मेसेज आला तेंव्हा आम्ही मुलीकडे होतो. मला वाटले आता पुन्हा नंबर लावावा लागणार.मी डॉक्टरकडून आल्यावर नंबर लावायच्या विचारात होते आणि गॅस आला होता.गॅसवाल्या माणसांनी गॅस दिला आणि कार्ड, पैसे देणे आपल्याला शक्य नाही असे माझ्या यजमानांच्या लक्षात आले.त्यांनी सांगितले १० /१५ मिनिटात माझी पत्नी येईल आणि पैसे देईल.मी पैसे घ्यायला नंतर येतो म्हणून गॅसवाला गेला.आम्ही उशीरापर्यंत वाट पाहिली पण तो आलाच नाही. आज संध्याकाळी तो पैसे न्यायला आला.मी त्याला म्हटले काल तुमचा हिशोब द्यावा लागला असेल ना? तो 'म्हणाला मी माझ्याकडचे पैसे दिले.आज्जी नेहमीची माणसे पैसे कुठे जातात?' मला त्याचे कौतुक वाटले.त्याचे नाव अमजत खिलजी.अनुभव शेअर करावासा वाटला.
Friday 11 October 2019
Sunday 25 August 2019
रेडिएशनचा आनंददायी अनुभव
रेडिएशनचा आनंददायी अनुभव.
'कॅन्सर मग नो अन्सर!' आज विज्ञानाने कॅन्सरसाठी उत्तरे शोधून हे विधान खोटे ठरवले असले तरी समाज मनात मात्र कॅन्सर या नावाचा घेतलेला धसका आणि भ्रामक समजुती तशाच आहेत.हॅरी पॉटर मधल्या व्हिलन व्होल्डमार्टचा दरारा इतका असतो की त्याचे नाव न घेता He who must not be named संबोधले जाते तसेच मला कॅन्सरबाबत समाजात दरारा असल्याचे जाणवले.लोक नाव देखील उच्चारत नाहीत.
कॅन्सर माझ्यापर्यंत पोचला आणि त्यातले वास्तव इतके भयानक नाही हे जाणवले.Oncologist ची पायरी चढल्यावर त्यातही किमो,रेडीएशन, सर्जरी अशा तीन शाखांचे वेगवेगळे तज्ज्ञ असतात हे समजले.पेशंटच्या आजाराचे स्वरूप अवस्था,वय अशा विविध गोष्टी विचारात घेऊन उपचार ठरवले जातात.माझ्यासाठी सर्व तज्ज्ञांच्या एकत्र विचारातून रेडीएशनची निवड झाली.
कॅन्सर माझ्यापर्यंत पोचला आणि त्यातले वास्तव इतके भयानक नाही हे जाणवले.Oncologist ची पायरी चढल्यावर त्यातही किमो,रेडीएशन, सर्जरी अशा तीन शाखांचे वेगवेगळे तज्ज्ञ असतात हे समजले.पेशंटच्या आजाराचे स्वरूप अवस्था,वय अशा विविध गोष्टी विचारात घेऊन उपचार ठरवले जातात.माझ्यासाठी सर्व तज्ज्ञांच्या एकत्र विचारातून रेडीएशनची निवड झाली.
तुम्हाला ५ आठवडे सोमवार ते शुक्रवार रेडिएशन थेरपी घ्यावी लागेल. असे डॉक्टरांनी सांगितले तेंव्हा 'बापरे इतके दिवस घर ते रूबी हॉस्पिटल करायचे म्हणजे शींगरू मेल हेलपाट्यांनी असंच होणार' या कल्पनेनीच मी दडपून गेले.पण बघता बघता रेडिएशन थेरपी चे ५ आठवडे संपले देखील आणि प्रत्यक्षात हा अनुभव आनंददायी ठरला.ही आनंदाची लागण हळुहळु झाली.माझ्या अनुभवावरून ती इतरांना सुरूवातीपासून व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
पहिल्या दिवशी रूबीच्या कॅन्सर सेंटरमध्ये शिरतांना मनात अनामिक हुरहुर,धास्ती होती.आत शिरल्यावर कॅन्सरच्या खुणा दाखवणारे अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांनी हॉल भरलेला होता.आता मीही एक कॅन्सर पेशंट आहे या वास्तवाने मन अधिकच दडपून गेले.
Oncologist Doctor मानसी मुन्शी यांच्या प्रसन्नचित्त आणि आश्वासक दर्शनाने दडपण थोडे कमी झाले.
रेडिएशनचा पहिला दिवस.तळघरातल्या तळघरात रेडिएशन टेबलवर माझी पोझीशन adjust झाल्यावर आरामसे पडे रहो.हिलना मत असे सांगण्यात आले.आता मी एकटीच तेथे होते.मी डोळे गच्च मिटून घेतले.भोवती फिरणाऱ्या मशीनचा ईरीटेटींग आवाज येत होता.श्वासोच्छ्वाकडे लक्ष देणे,ते मोजणे सुरू केले.२५० श्वास झाले आणि 'उठो आपका हो गया' सीस्टर सांगत होत्या.उठल्यावर थोडे गरगरत आहे वाटले.सीस्टरनी हात धरून वर सोडले.
दुसरे दिवशी कानात कापसाचे बोळे घालून आले.डोळे गच्च मिटलेलेच.
तिसरे दिवशी भरपूर पाऊस आणि हवेत गारवा.त्यात एसी.आणि तो सेंट्रलाईज असल्याने कमी करता न येणारा.मला हुडहुडी भरली.हातपाय थंड पडले.उठल्यावर पायात बुट घालता येईनात.दुसऱ्या दिवशी मी पायात मोजे आणि डोक्याला रूमाल बांधून आले.न सांगताच सीस्टरनी हळुवारपणे पायावर एक बेडशीट ची घडी आणि त्यावर blanket घातले.छातीवर blanket ची घडी घातली.उब आली.तिची स्नेहार्द नजर प्रेमळ स्पर्श सुखावून गेला.आज माझे डोळे न कळत उघडे राहिले.कानात बोळे घालायला ही विसरले होते.प्रथमच छतावर निळ्याशार आकाशात शुभ्र पिंजलेल्या कापसासारखे ढग दिसले.
मी डोळे उघडेच ठेवले.छतावरचे ढग,आकाश सुखावू लागले.रेडिएशन प्रक्रिया करणारी यंत्रे रोजच्या सारखाच आवाज करत होती.पण त्यांने इरीटेड न होता मला त्यात एक लय,ताल जाणवू लागला.आणि शब्दांकीत होऊन ऐकु येऊ लागला.सीस्टर अनीस आणि टेक्नीशीयन काशीनाथ आत आले.नेहमीप्रमाणे मला उठून बसण्यासाठी आधार दिला.आज हे दोघेही मला एंजल वाटत होते.
चक्कर आती है?अनीसने विचारले.मी मानेनेच नकार दिला.प्रथमच मी रेडिएशन हॉल स्वच्छ नजरेने पाहिला.समोरच्या मोठ्या भिंतीवर पाईन, चिनार वृक्ष होते.रेडिएशनला येणाऱ्यांचे मन प्रसन्न
राहावे असा प्रयत्न होता.आधाराशिवाय वर आले.
आता रोज रेडिएशन ला येतांना पाषाण ते रूबी पर्यंतच्या रस्त्यावरील हिरवीगार झाडी,मधुन मधुन फुललेले गुलमोहोर दिसु लागले.कुठेतरी सहलीला चाललोय असे वाटू लागले.खरे तर सर्व तेच होते.मी घट्ट मिटलेले डोळे उघडल्यावर मनाची कवाडेही उघडली.
रेडिएशन प्रक्रिया यांत्रिक न राहता चैतन्यमय होऊ लागली.सीस्टर अनीसचे प्रेमाने हसून स्वागत करणे,कैसी हो? अशी विचारपूस करणे, हळुवार पणे ब्लडप्रेशर घेणे.मनापर्यंत पोचू लागले.तंत्रज्ञ काशीनाथ मधला सह्रदय माणूस दिसू लागला.रेडिएशन बेड,यंत्रेही सजीव वाटू लागली.रेडिएशन प्रक्रिया आनंददायी झाली.यानंतरच्या दोन Brachy ही सहजपणे पार पडल्या.भिती,हुरहुर अशा नकारात्मक भावना गेल्या.
आजारावषयी,त्यावरचे उपचार आणि साईड इफेक्ट विषयी इतके गैरसमज,भ्रामक समजुती आहेत.की त्या घाबरवून सोडतात.आणि आजारापेक्षा त्याच नुकसान करतात.माझे चक्कर येणे हे भितीतूनच होते असे मी आता म्हणू शकते.
आजारावषयी,त्यावरचे उपचार आणि साईड इफेक्ट विषयी इतके गैरसमज,भ्रामक समजुती आहेत.की त्या घाबरवून सोडतात.आणि आजारापेक्षा त्याच नुकसान करतात.माझे चक्कर येणे हे भितीतूनच होते असे मी आता म्हणू शकते.
अनीसनी ठेवलेल्या ब्लडप्रेशर नोंदी पाहिल्या तरी लक्षात येईल की सुरूवातीला बीपी थोडे हाय असायचे ते १२० /८० असू लागले.आनंदी असण्याने उपचाराला ही चांगला प्रतिसाद मिळत असणार नक्की.आपल्या मनातील वृथा भिती टाकून आनंदाने उपचाराला सामोरे जा असे मी माझ्या अनुभवावरून सांगु शकते.
फोटो १ - रेडीएशन हॉलमध्ये सिस्टर अनिस आणि टेकनिशीएन काशिनाथ सह
फोटो २ - माझ्या आधी रेडीएशन घेऊन हसतमुखाने बाहेर पडणाऱ्या नीलिमा देसाई
फोटो १ - रेडीएशन हॉलमध्ये सिस्टर अनिस आणि टेकनिशीएन काशिनाथ सह
फोटो २ - माझ्या आधी रेडीएशन घेऊन हसतमुखाने बाहेर पडणाऱ्या नीलिमा देसाई
रेडिएशन चालू असताना, यंत्रांच्या आवाजातून मला ऐकू आलेले शब्द आणि स्वर. मी ते माझ्या आवाजात रेकॉर्ड केले ते असे -
Saturday 24 August 2019
टोपणनावाची गोष्ट
टोपणनावाची गोष्ट
काल मुलीकडे फोन केला तर तिच्या भाच्याने उचलला.आणि झेन आज्जीचा फोन आहे सांगत आपल्या आजोबाना दिला.झेन आज्जी हे मला माझ्या नातवाने दिलेले टोपण नाव.लहानपणापासून मला कोणतेच टोपण नाव नव्हते. ते नातवांनी बहाल केले.माझा नातू क्षितीज त्याच्या बाबांच्या आई वडिलाना आज्जी, अब्बू म्हणायचा मग आम्हाला काय म्हणायचे? लहानपणापासून त्याला गाड्यांची आवड होती.तशी हल्ली बहुतेक लहान मुलाना असते. आमच्याकडे झेन होती म्हणून ह्यांना तो झेन अब्बू म्हणायला लागला.आणि मी मग झेन आज्जी झाले.माझ्या मुलीच्या सासरी सर्वांच्या तोंडी हेच नाव झाले.
माझ्या नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.घरी गाडी असल्यावर ती चालवण्याचा मोह व्हायचा म्हणून शेवटी गाडी विकली.
आम्हाला टोपण नाव देणारा नातू आता इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.आता तो स्वत: गाडी चालवतो.
झेन गेली तरी आम्हाला अजून तो आणि इतरही झेन आज्जी, झेन अब्बुच म्हणतात.हे नाव आम्हाला चिकटलेलेच राहिले आणि राहणार.
(महारष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले.)
काल मुलीकडे फोन केला तर तिच्या भाच्याने उचलला.आणि झेन आज्जीचा फोन आहे सांगत आपल्या आजोबाना दिला.झेन आज्जी हे मला माझ्या नातवाने दिलेले टोपण नाव.लहानपणापासून मला कोणतेच टोपण नाव नव्हते. ते नातवांनी बहाल केले.माझा नातू क्षितीज त्याच्या बाबांच्या आई वडिलाना आज्जी, अब्बू म्हणायचा मग आम्हाला काय म्हणायचे? लहानपणापासून त्याला गाड्यांची आवड होती.तशी हल्ली बहुतेक लहान मुलाना असते. आमच्याकडे झेन होती म्हणून ह्यांना तो झेन अब्बू म्हणायला लागला.आणि मी मग झेन आज्जी झाले.माझ्या मुलीच्या सासरी सर्वांच्या तोंडी हेच नाव झाले.
माझ्या नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.घरी गाडी असल्यावर ती चालवण्याचा मोह व्हायचा म्हणून शेवटी गाडी विकली.
आम्हाला टोपण नाव देणारा नातू आता इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.आता तो स्वत: गाडी चालवतो.
झेन गेली तरी आम्हाला अजून तो आणि इतरही झेन आज्जी, झेन अब्बुच म्हणतात.हे नाव आम्हाला चिकटलेलेच राहिले आणि राहणार.
(महारष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले.)
Friday 8 March 2019
महिला दिनानिमित्ताने
जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव
उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता
लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण
स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक
स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची संख्या जास्त
आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि
बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांच्याब्द्द्लाचा लेख प्रसिद्ध केला होता आज महिला दिनाच्या निमित्ताने बहिणाबाईना अभिवादन.
ही म्हणजे कविता. हिच्याबद्दल बोलायचं म्हणजे तिच्या कवितेबद्दल बोलायचं
.' कवितेचे दळण दळून अनेकांनी मांडले पण सुखदुःखाच्या जात्यात स्वतःचे जीवन भरडले जात असताना त्या श्रमाचे सामवेद करून गाणारी एखादी' असं पु ल देशपांडे म्हणतात
'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावणारा चमत्कार आहे' असं आचार्य अत्रे म्हणतात
अनेकानेक विचारवंत तिची स्तुती करताना थकले नाहीत. नमुन्यासाठी वरील दोन उदाहरणे पुरेशी आहेत
हा चमत्कार घडला तरी कसा ती म्हणते
'माझी माय सरोसती मला शिकवते बोली
लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली'
ही गुपित बाहेर कशी येतात, ऐका.
' अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गाणं पोटातून येत होटी'
विठोबाच,रामाच मंदिर याच माझ्या शाळा असं ती म्हणते.. निसर्गातही तिला मग भजन दिसतं. तानक्या सोपानाला हऱ्यात निजवून तो हारा डोक्यावर घेऊन ती शेतात निघायची तिच्याबरोबर तिचं काव्यही
विषय पुरवायला आजूबाजूचा निसर्ग माणस होतीच. ' ऊन वार्याशी खेळता एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी'
घरी आल्यावर तव्यावर भाकरी टाकताना ही हिला काव्य सूचाटे.
'बरा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर
ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार
देतो दुःखाले होकार आणि सुखाले नकार'
एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान सारखी हिच्या मुखातून सुभाषित बाहेर पडतात
- ज्यातून कापूस निघत नाही त्याला बोंड म्हणू नये ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हणू नये
- इमानाला जो विसरतो त्याला नेक म्हणू नये
जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये
' आला सास गेला सास देवा तुझं र तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर'
असं जगण्या-मरण्याचा तत्वज्ञान समजल्यामुळे ती पतिनिधनानंतर रडत बसत नाही
' जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतुत
तुटे मंगयसूतर उरे गयाची शपथ
नका नका आया बाया करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझे मला जीव'
प्रत्यक्षातही तिने मोठ्या धिराने दोन लहान मुलांना वाढवलं, घडवलं.
' येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप' असं म्हणत ती काम रेटत राहिली. कामाच्या रगाड्यात ती सहजपणे आजूबाजूचे बदल न्याहाळत होती कवितेतून मांडत होती नुकताच छापखाना सुरू झाला होता,
' माणसा परी माणूस राहतो रे येडजना
होतो छापिसनी कोरा कागद शहाणा'
प्लेगची साथ आली त्याबद्दल ती म्हणते,
' पिलोक पिलोक आल्या पिलोका च्या गाठी
उजाडलं गाव खया मयामधी भेटी'
माणसाच्या स्वार्थाची तिला चीड .येते.
'अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?' असं ती विचारते
' जवा ईमान सचोटी पापामध्ये बुडाली
तेव्हा याच माणसाने किल्ल्याकुलूप घडले.
किल्ल्या राह्यल्या ठिकाणी जवा तिजोऱ्या फोडल्या.
तवा याच माणसाने बेड्या लोखंडी gघडल्या.
अशा या माणसाचा मनाबद्दल ती म्हणते,'
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येते पिकावर
मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर
आरे इचू साप बरा तयाले उतारे मनतर
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर गेल गेल आभाळात
मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं आभायात बी मायेना
संत-महात्म्यांच्या रांगेत बसणारी असं हे मनाचं वर्णन.
देव कुठे याबाबत ही ही अडाणी बाई एखाद्या तत्वज्ञाना शोभेल असं काव्य लिहिते.
' सदा जगाच्या कारणे चंदनापरी घसला
अरे सोतामदी त्याला देव दिसला दिसला
स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला
अरे दगडात त्याले देव दिसला दिसला
डोये मिटले मिटले स्वतःला विसरला
अरे अंधारात त्याला देव दिसला दिसला
देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुया माझार
देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार'
तिचं जगणं एक कविता होती. तीच मोल न समजल्याने काळाच्या ओघात बरच काव्य नष्ट झालं. थोडफार मुलांनी लिहून ठेवलं ते आज उपलब्ध आहे तेच इतकं अनमोल सर्व उपलब्ध झाला असता तर? बहिणाई तुझ्या जगण्याला, तुझ्या काव्याला आणि तुला सलाम
ही म्हणजे कविता. हिच्याबद्दल बोलायचं म्हणजे तिच्या कवितेबद्दल बोलायचं
.' कवितेचे दळण दळून अनेकांनी मांडले पण सुखदुःखाच्या जात्यात स्वतःचे जीवन भरडले जात असताना त्या श्रमाचे सामवेद करून गाणारी एखादी' असं पु ल देशपांडे म्हणतात
'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावणारा चमत्कार आहे' असं आचार्य अत्रे म्हणतात
अनेकानेक विचारवंत तिची स्तुती करताना थकले नाहीत. नमुन्यासाठी वरील दोन उदाहरणे पुरेशी आहेत
हा चमत्कार घडला तरी कसा ती म्हणते
'माझी माय सरोसती मला शिकवते बोली
लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली'
ही गुपित बाहेर कशी येतात, ऐका.
' अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गाणं पोटातून येत होटी'
विठोबाच,रामाच मंदिर याच माझ्या शाळा असं ती म्हणते.. निसर्गातही तिला मग भजन दिसतं. तानक्या सोपानाला हऱ्यात निजवून तो हारा डोक्यावर घेऊन ती शेतात निघायची तिच्याबरोबर तिचं काव्यही
विषय पुरवायला आजूबाजूचा निसर्ग माणस होतीच. ' ऊन वार्याशी खेळता एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी'
घरी आल्यावर तव्यावर भाकरी टाकताना ही हिला काव्य सूचाटे.
'बरा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर
ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार
देतो दुःखाले होकार आणि सुखाले नकार'
एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान सारखी हिच्या मुखातून सुभाषित बाहेर पडतात
- ज्यातून कापूस निघत नाही त्याला बोंड म्हणू नये ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हणू नये
- इमानाला जो विसरतो त्याला नेक म्हणू नये
जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये
' आला सास गेला सास देवा तुझं र तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर'
असं जगण्या-मरण्याचा तत्वज्ञान समजल्यामुळे ती पतिनिधनानंतर रडत बसत नाही
' जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतुत
तुटे मंगयसूतर उरे गयाची शपथ
नका नका आया बाया करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझे मला जीव'
प्रत्यक्षातही तिने मोठ्या धिराने दोन लहान मुलांना वाढवलं, घडवलं.
' येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप' असं म्हणत ती काम रेटत राहिली. कामाच्या रगाड्यात ती सहजपणे आजूबाजूचे बदल न्याहाळत होती कवितेतून मांडत होती नुकताच छापखाना सुरू झाला होता,
' माणसा परी माणूस राहतो रे येडजना
होतो छापिसनी कोरा कागद शहाणा'
प्लेगची साथ आली त्याबद्दल ती म्हणते,
' पिलोक पिलोक आल्या पिलोका च्या गाठी
उजाडलं गाव खया मयामधी भेटी'
माणसाच्या स्वार्थाची तिला चीड .येते.
'अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?' असं ती विचारते
' जवा ईमान सचोटी पापामध्ये बुडाली
तेव्हा याच माणसाने किल्ल्याकुलूप घडले.
किल्ल्या राह्यल्या ठिकाणी जवा तिजोऱ्या फोडल्या.
तवा याच माणसाने बेड्या लोखंडी gघडल्या.
अशा या माणसाचा मनाबद्दल ती म्हणते,'
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येते पिकावर
मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर
आरे इचू साप बरा तयाले उतारे मनतर
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर गेल गेल आभाळात
मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं आभायात बी मायेना
संत-महात्म्यांच्या रांगेत बसणारी असं हे मनाचं वर्णन.
देव कुठे याबाबत ही ही अडाणी बाई एखाद्या तत्वज्ञाना शोभेल असं काव्य लिहिते.
' सदा जगाच्या कारणे चंदनापरी घसला
अरे सोतामदी त्याला देव दिसला दिसला
स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला
अरे दगडात त्याले देव दिसला दिसला
डोये मिटले मिटले स्वतःला विसरला
अरे अंधारात त्याला देव दिसला दिसला
देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुया माझार
देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार'
तिचं जगणं एक कविता होती. तीच मोल न समजल्याने काळाच्या ओघात बरच काव्य नष्ट झालं. थोडफार मुलांनी लिहून ठेवलं ते आज उपलब्ध आहे तेच इतकं अनमोल सर्व उपलब्ध झाला असता तर? बहिणाई तुझ्या जगण्याला, तुझ्या काव्याला आणि तुला सलाम
Tuesday 12 February 2019
ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी लेखिका - प्रतिभा रानडे - पुस्तक परिचय
- नोव्हेंबर १९९८ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशी झाली.अवघ्या सह महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.दरम्यानच्या काळात या दोघींमधल्या गप्पा चालूच होत्या.त्यातला महत्वाचा वाटणारा भाग लेखिका आणि प्रकाशक यांनी तत्परतेने दुसऱ्या आवृत्तीत वाचकांना उपलब्ध करून दिला.
या गप्पा आहेत दोन प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या विदुषी मधील त्यातील एक दुर्गाबाई या खाष्ट विदुषी म्हणून सर्वांना परिचित आहेत. शिवाय त्या मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ लोकसाहित्याच्या भाष्यकार, ललित लेखिका .संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन अशा विविध भाषेत निष्णात आहेत ७० वर्षे त्या विविध विषयावर लेखन करीत आहेत. दुसऱ्या विदुषी प्रतिभा रानडे प्रथितयश लेखिका आहेत, जिज्ञासू आहेत अभ्यासू आहेत, देश विदेश फिरलेल्या आहेत. उघड्या डोळ्यांनी सभोवतालचं जग न्याहाळताना जे जाणवलं त्यावर धीटपणे आपली मतं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलेली आहेत बदनसीब, अफगाण डायरी, स्त्री प्रश्नांची चर्चा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांचा अभ्यास या पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या दोन विदुषी मधील गप्पा असूनही विद्वज्जड , तर्ककर्कश नाहीत, चौकटीबद्ध ही नाहीत. आहे ती चौकट ऐसपैस शब्द वापरून त्यांनी लवचिक करून घेतली आहे एकनाथांनी भारूडातून जसे सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचवले तसे प्रतिभाताईंनी दुर्गाबाईंचा व्यासंग, ज्ञानसाधना, तत्वचिंतन, संशोधन, निसर्गाचे हळुवार वर्णन करत त्याचा घेतलेला शोध हे सर्व काही गप्पांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, समाजसेवक, सर्वसामान्य या सर्वांनाच भावेल असे हे पुस्तक आहेपुस्तकाची विभागणी पाच प्रकरणात केलेली आहे. पहिल्या भागात संस्कृती शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या, वाटचाल, मीथक कथांचे समाजाच्या दृष्टीने महत्त्व, दशावतार कल्पना, तांत्रिक पंथ याबाबतच्या गप्पा आहेत पाषाणयुगापासून आज पर्यंतच्या संस्कृतीबाबत चर्चा करताना शेवटी मुक्त विचार हा संस्कृतीचा आधार आहे असे मत दुर्गाबाई व्यक्त करतात. यापुढे म्हणतात मुक्त विचारांची जपणूक करणे हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. विचारवंत लेखकावर कोणतीही बंधने आली की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते ती येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य सुस्थिती राजकीय स्थिरता या गोष्टी आवश्यक. संस्कृतीच्या साखळीत एकातून दुसरे निघत वाढत गेले पण प्रत्येक टप्प्यावर निसर्गाशी नातं कुठे तुटलं नाही आजच्या काळात मात्र आपण निसर्गाशी नातं तोडत आहोत माणूस सारखा निसर्गाला ओरबाडून घेतोय याची त्यांना खंत वाटते. संस्कृती वरून गप्पांचा ओघ मिथककथा कडे येतो. त्यांच्या मते समाजाची सांघिक जाणिव, संवेदना या मिथककथातून प्रगट केल्या जातात. जगात प्रथम मिथक कथा भारतात रचल्या गेल्या आणि तेथून त्या जगभर पसरल्या मिथककथातून अध्यात्मिक शिक्षण दिलं जातं. जीवनाचा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न असतो. दुर्गाबाईंनी वाचायला सांगितलेल्या' पावर ऑफ मीथ' चा हवाला देऊन प्रतिभाताई सांगतात अमेरिकन समाजात मोठ्या प्रमाणात हिंसा व क्रौर्य आहे. याचे कारण त्यांच्याकडे सशक्त समृद्ध अशा मिथक कथा नाहीत. गप्पांमध्ये मग दशावतार, विठोबा, पदूबाई, जगन्नाथ पुरी ची लक्ष्मी, सावित्री इत्यादी मिथककथा येतात व वाचकांची उत्कंठा वाढवत जातात या कथा सांगताना साहित्यात नित्य कथा रचण्याची शक्ती ज्याप्रमाणे अधिक आणि सातत्याने चालते त्या प्रमाणात ते साहित्य समाज अधिक चैतन्यमय वर्धिष्णू असतो, असे भाष्यही त्या करतात पुढे संस्कृतीचा महत्त्वाचा भाग अशा तांत्रिक पंथाची चर्चा सुरू होते.या पंथातील गुप्ततेमुळे व भयकारी मार्गामुळे हा पंथ तसा दुर्लक्षित व अपरिचित राहिला आहे .त्यामुळे त्यातील स्त्री पुरुष समानता, अस्पृश्यता न मानणे या चांगल्या बाबीही लोकांना फारशा माहीत नाहीत १९५६ साली प्रसिद्ध झालेल्या लोकसाहित्याची रुपरेषा या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे 'वैदिक काळापासून आज पर्यंतच्या लोकसाहित्यात प्रगट झालेली भारतीय संस्कृती ही सारख्याच गुणवत्तेची, सारख्याच पोताची व तशीच शक्तिशाली आहे तिचा आत्मा एक आहे. काळाचा तिच्यावर फारसा परिणाम झालेला नाही' प्रतिभाताई हे आपले मत आजही तसंच आहे का विचारतात. दुर्गाबाई त्याला होकारार्थी उत्तर देतात आणि सांगतात 'वरवरचा थर बदलतो.मूळ तेच राहते. काही गोष्टी टाकून देतो पण त्यामुळे संस्कृतीत फरक पडत नाही यासाठी आजच्या नास्तीकतेचे उदाहरण देऊन त्या म्हणतात 'नास्तिकता चार्वाकापासून नव्हे तर वेदकाळापासून सुरू झालेली आहे म्हणजे पूर्वपारची नास्तिक परंपरा आणि ती संस्कृती सुद्धा टिकून आहे.साहित्य चिंतन या भागात रामायण, महाभारत हे महाकाव्य, ग्रीकांची महाकाव्य, दोन्हीतील फरक यांची चर्चा होते. महाभारतातील आवडलेल्या व्यक्तींवर दुर्गाबाईंनी व्यासपर्व लिहिलं त्यामागे त्यांचा खूप मोठा व्यासंग होता. त्यातल्या रसाळपणा बरोबर लोकांना विवाद्य वाटणाऱ्या काही विचारांवरूनही ते बरंच गाजलं. व्यासपर्व, त्यात दुर्गाबाईंनी रंगवलेली पात्र, तेव्हा काय झाले या सर्वांवर दोघींनीही विस्ताराने चर्चा केली आहे. दुर्गाबाईंना महाभारताचे मारेकरी म्हणण्यात आले पण दुर्गाबाईनी निर्भयपणे या पुस्तकांवर अनेकांगी विरोधाला परिणामांची भीती न बाळगता तोंड दिलंस्वतःच्या बुद्धीला जे पटेल ते नेहमीच त्यांनी निर्भयपणे मांडलं. साहित्य , चिंतनामध्ये याचे अनेक दाखले मिळतात अर्थात अशी मतं मांडून सनसनाटी पैदा करणे ही भूमिका नसते तर स्वतःच्या अभ्यासातून जगण्यातून चिंतनातून निर्माण झालेल्या भक्कम व तर्कशुद्ध विचाराचा त्याला आधार असतो. पाश्चात्य अभ्यासकांवर विश्वास ठेवून बाणभट्टाला दुर्लक्षिल म्हणून महाराष्ट्रीय व बंगाली अभ्यासकांबद्दल राग व्यक्त करतात. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि स खांडेकर यांचे साहित्य त्यांना खुज वाटतं.ययाती ही त्यांची कादंबरी त्यांना संपूर्णपणे फेल झालेली वाटते. हरिभाऊ आपटे यांचे लेखन त्यांना इथल्या मातीशी नाते सांगणारे वाटते. भाऊ पाध्यांच्या लेखनानंतर झालेल्या श्लील - अश्लील वादात त्या त्यांच्यामागे उभ्या राहतात व प्र.के.अत्रे यांच्या झोडीला तोंड देतात. हे संदर्भानुसार ठरते असं मत त्या मांडतात. 'अश्लीलतेला विरोध करावयास हवा पण तो आक्रस्ताळेपणाने नव्हे तर लोकांची बौद्धिक भावनिक सांस्कृतिक पातळी उंचावून' असं सांगत हे काम विचारवंतांवर व कार्यकर्त्यांवर त्या सोपवितात. महात्मा गांधींचा त्याकाळातील सर्वसामान्य व नेते यांच्यावर असा नैतिक धाक होता असं त्यांना वाटतंअश्लीलतेच्या संदर्भात र.धों.कर्व्यांचाही उल्लेख येतो कारण अश्लील लिहिलं म्हणून त्यांना तुरुंगात जायची वेळ आली होती. र.धों.ना ते महात्मा गांधी नंतरचा थोर पुरुष मानतात. विठ्ठल रामजी शिंदे यांची समाजशास्त्रज्ञ म्हणून उपेक्षा झाली याचा त्यांना विषाद वाटतो. दलित लेखकांचे त्या कौतुक करतात त्यांचे दोषही त्या दाखवितात. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीमुक्तीवादी साहित्य असे वेगवेगळे प्रकार त्यांना मान्य नाहीत. या सबंध चर्चेत प्रतिभाताई वेळोवेळी विरोधातले छोटे-मोठे मुद्दे मांडून दुर्गाबाईंना अधिक बोलायला प्रवृत्त करतात.दुर्गाबाई आपल्या सर्वच मतांना कायमच्या चिकटून राहतात असे मात्र नाही. दुर्गाबाईंचा आवडता लेखक थोरोंवर इंदिरा गांधींनी केलेली कविता वाचून त्या त्यांचे आणीबाणी सकट सगळे गुन्हे माफ करतात. डॉक्टर केतकरांचे गुजरातेतील ज्ञानकोश निर्माण होण्यात महात्मा गांधी आड आल्यावर गांधीभक्त दुर्गाबाई एका लेखाद्वारे त्यावर टीका करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांची गांधी भक्ती व्यक्तिपूजेच्या पातळीवर जात नाही व बुद्धिनिष्ठेच्या आड येत नाही. स्वतःची मते बनवण्यासाठी कणखरपणा हवा, तपश्चर्या हवी, सतत नावीन्याच्या शोधात असायला हवं असं त्या सांगतात. या शोधाबद्दल सानेगुरुजींचे उदाहरण देतात.कोमल मनाचे साने गुरुजी जहाल देशबंधू दास यांचे चरित्र लिहिताना त्याला साजेशी भाषा वापरतात त्यांच्या सागर संगीतावरचे सानेगुरुजींचे लेखन वाचून दुर्गाबाई बंगाली शिकल्या. मराठी भाषेच्या वाढीसाठी इतर भाषा, साहित्य यांची माहिती असणे त्यांना आवश्यक वाटते. चांगल्या निर्मितीसाठी तपश्चर्या,कष्ट,व्यासंग एवढेच उपयोगाचे नाही तर त्यात आपला जीव ओतला पाहिजे असं त्या सांगतात याच बरोबर आणीबाणीला सर्वप्रथम विरोध करणाऱ्या दुर्गाबाई लेखक, शास्त्रज्ञ,विद्वान,कलावंत यांची आणखीन एक मोठी जबाबदारी मानतात ती म्हणजे समाजापुढे सत्य-असत्य योग्य - अयोग्य,न्याय- अन्याय यांची सुस्पष्ट, परखड मांडणी करायला हवी आणि सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. बुद्धिमंतांचा धाक सत्ताधाऱ्यांना वाटला पाहिजे.बौद्धांचे योगदान या भागात गौतमाच्या जन्मापासून नवबौद्धा पर्यंतचा बौद्ध काळ समजावून घेण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. डॉक्टर ऱ्हीस डेव्हीस यांच्या बुद्धिझम या ग्रंथात बुद्धाला सर्वोत्कृष्ट हिंदू म्हंटले आहे. मॅक्समुल्लरनेही बुद्धाला ग्रेटेस्ट हिंदू म्हटले आहे. हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्म वेगळा आहे असं दुर्गाबाईंना वाटत नाही. वैदिक धर्मापेक्षा बौद्ध धर्मात वेगळे काय सांगितले आहे हे त्या सांगतात महावीर व बुद्धाचीही त्या तुलना करतात. स्त्रियांच्या बाबत महावीर उदार होते गौतम बुद्ध मात्र अतिशय कंजूष होते स्त्रियांना भिक्षुसंघात घेण्याची गौतम बुद्धाची तयारी नव्हती परंतु त्याचा शिष्य आनंद याने खूप आग्रह केल्यावर त्यांनी स्त्रियांना भिक्षुसंघात प्रवेश दिला. स्त्रिया अर्हत होऊ शकत नाहीत. अर्हत म्हणजे ज्याने निर्वाणाच्या प्रांतात पाऊल टाकले आहे असा मनुष्य. अर्हत आपली आध्यात्मिक प्रगती करून घेत घेत शेवटी बुद्ध होतो. बुद्धांनी विविध जन्म घेतले हे सांगणाऱ्या जातक कथा आहेत त्यातही बुद्धाने स्त्रीचा जन्म घेतलेला नाही. तीव्र इच्छा असेल तर एखादी स्त्री नंतरच्या जन्मात पुरुषाच्या जन्माला येऊन अर्हत बनू शकते. बौद्ध धर्मातील एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा संन्यास घेऊन बौद्ध भिक्षू झाल्यावरही इच्छा असल्यास पुन्हा गृहस्थाश्रमात येता येते. हिंदू , ख्रिश्चन, इस्लाम धर्मात अशी सोय नाही.बौद्ध भिक्षुंना वैद्यकीय शिक्षण दिलं जायचं तसे हिंदू व जैन संन्याशांना दिले जायचं नाही. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मावर जातीचा नाही. बुद्धाच्या शिष्यात ब्राह्मण, क्षत्रिय यांच्या बरोबर वैश्य,क्षुद्रही होते.गौतम बुद्धाचा शिष्य अश्वघोष यांनी आपल्या वज्रसूची ग्रंथात जाती पाडण अनैसर्गिक खोटं आहे असे लिहिले आहे. वर्ण भेदही मानलेले नाहीत. या ग्रंथाला उपनिषदे ही म्हटले जाते. तुकारामाची शिष्या बहिणाबाई यांनी या ग्रंथाचे प्रथम मराठीत भाषांतर केले पण त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही याचे दुर्गाबाईंना वाईट वाटते. अस्पृश्यताविरोधी प्रथम कृती करणाऱ्या रामानुजाचार्य (१०१७ ते ११३० ) त्यानंतरचे मध्वाचार्य ( १९१८ ते १२४० )यांची दखल कोणी घेतली नाही याबद्दल ही त्या खेद व्यक्त करतात. त्यांच्या मठात सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश होता. त्यांच्यावर संशोधन व्हावयास हवे मी म्हातारे झाले कोणीतरी तरुणांनी येऊन हे काम करावे असावे असे त्या सुचवितात. बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे त्या सांगतात. गौतम बुद्धाने सांगितलेला धर्म व भारतात आज अस्तित्वात असलेल्या धर्म याबाबतीत गप्पांच्या ओघात तुलना होते आंबेडकरांच्या ग्रंथ प्रेमाबद्दल योग्य तो आदर दाखवून त्यांच्या मनुस्मृति जाळण्याच्या कृतीबद्दल त्या दुःखी होतात. ग्रंथ हत्या मनुष्य हत्ये पेक्षा वाईट असे मत त्या व्यक्त करतात. आंबेडकरांनी पाली शिकून मुळातून बौद्ध धर्म अभ्यासायला हवा होता असे त्यांना वाटते.विविधांगी लेखन करणाऱ्या दुर्गाबाईंची लेखक म्हणून जडणघडण कशी झाली याबद्दलच्या गप्पा दुर्गाबाईंचा लेखन प्रवास या भागात आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर यांच्याशी मैत्री असणारे, शिकलेल्या मुलीशीच विवाह करायची अट ठेवणारे आजोबा, इंग्रजी, मराठी पुस्तकांचे स्वतःचे वेगळे कपाट असणारी, दुर्गाबाईंना वाचण्यास प्रवृत्त करणारी, विविध विषयांवर चर्चा करणारी आजी, अविवाहित राहण्याचा निर्णय घेणाऱ्या आपल्या बुद्धिमान मुलीला कोणापुढे हाथ पसरावे लागू नये म्हणून तिच्या निर्वाहाची तरतूद करून ठेवणारे, खडकावर टाकली तरी रुजून येईल असा आपल्या मुलीबद्दल सार्थ अभिमान बाळगणारे वडील, निसर्ग प्रेम शिकवणारी वनस्पती शास्त्रज्ञ आत्या अशा वातावरणात दुर्गाबाईंची जडणघडण झाली जागतिक पातळीवरची सगळी पुस्तके त्यांना घरातच वाचावयास मिळाली. विविध भाषातील वाचन आणि पाठांतर ही त्यांनी केले. साने गुरुजींनी त्यांना ललित लेखनाला प्रवृत्त केले. त्यांचे ऋतुचक्र वाचून पु.शी.रेगेंसारख्या संवेदनाशील,भावूक कविनीही ' मला तुमचा हेवा वाटतो' अशा शब्दात प्रशस्तीपत्र दिलं. निसर्गप्रेमी दुर्गाबाई म्हणतात या सगळ्या निसर्गाच्या साखळीतील मी एक दुवा आहे आणि त्यामुळेच मला पूर्णत्व आहे. झाडे,वेलिंमध्ये देखील मला आत्मा दिसला. जिवंत व्यक्ती दिसल्या.बाई स्वतःला लिहावसं वाटलं तेव्हाच लिहितात. कोणीही सांगितलं म्हणून नाही. यातूनच सार्थकता येते असे त्यांना वाटते. वाचन करणे, विचार करणे सतत चालू असल्याने लिहिताना कधी त्यांना आता सुचतच नाही असे होत नाही. लिहून झाल्यावर मानसिक शारीरिक थकवा येतो पण त्यातही थ्रील असतं असं त्यांना वाटतं. आपलं वाटण त्या सुरेख उदाहरणातून सांगतात. दळून झाल्यावर पीठ गोळा करून भरून ठेवायचं, जाते पुसून घेऊन भिंतीला उभं ठेवायचं आणि आपणही भिंतीला टेकून बसायचं. काम केल्याचा थकवा येतो आणि एक तर्हेचा शांत विसावाही मिळतो.ह.ना. आपटेंचं लेखन त्यांना जागतिक तोडीचे वाटते. केशवसुत, टागोर, शरच्चंद्र त्यांना इथल्या मातीतले तरी वैश्विक पातळीवरचे वाटतात अस्पृश्यतेच्या विरोधात पहिले स्तोत्र लिहिणाऱ्या शंकराचार्यांवर, त्यांच्या अनुपम सुंदर अतुलनीय संस्कृत भाषेबद्दल त्यांना कमालीचा आदर आहे त्यांच्यासारखी गद्य पद्य भाषेसारखी भाषा जगात दुसऱ्या कोणाला जमलेली नाही असे त्यांना वाटत.व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या दुर्गाबाईंना व्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार मानले गेलेल्या स्त्रीमुक्ती चळवळ बाबत आपलेपणा का वाटत नाही, या प्रतिभाताईंच्या प्रश्नांवर दुर्गाबाई विस्ताराने उत्तर देतात. व्यक्ती म्हणून स्त्रीला समान प्रतिष्ठा, हक्क असायला हवेत तिच्यावर कसलेही अन्याय, अत्याचार होता कामा नये हे मान्य असले तरी ते तिने स्वकर्तुत्वावर, स्वसामर्थ्यावर मिळवावयास हवेत असे त्यांना वाटते. अहिल्याबाई होळकर व आजच्या काळातील अनेक स्त्रियांची उदाहरणे यासाठी त्या देतात. परंपरा न सोडताही व्यक्ती स्वातंत्र्य, समानता मिळवता येते असे त्यांना वाटते. स्वतःला तसा समन्वय साधता आला असं त्या सांगतात. यात गांधीजींच्या विचारांचा ही वाटा आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन एखादं काम करायला त्यांनी शिकवलं. स्त्रियांना चांगल्या अर्थाने बाहेर काढलं. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली.गोंड आदिवासींच्या जीवनपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. गोंडाचे स्त्री-पुरुष संबंधातले मुक्त वातावरण, त्यांची गोटुल पद्धत व त्याबाबत लोकांच्या मनातले गैरसमज, त्यांचे विवाह, सणवार, दारिद्र्य याच त्या रमून जाऊन वर्णन करतात. विविध ठिकाणच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची प्राचीन संस्कृती नेस्तनाबूत केली याचे त्यांना वाईट वाटते त्यांच्यात सुधारणा व्हावयास हव्यात पण त्यासाठी त्यांची पाळंमुळं खणून काढणं हे त्यांना समाजाचं नुकसान करणारे वाटतं.दुर्गाबाईंना मनापासून ललित लेखनाची आवड आहे पण त्यांनी समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय लिखाण अधिक केलं हे कर्तव्य बुद्धीतून. 'त्या शिक्षणासाठी पैसा खर्च झाला होता, माझ्या आयुष्याची कितीतरी वर्ष, कितीतरी शक्ती खर्च झाली होती तेव्हा त्यामध्ये कुठलीही उणीव राहू नये ही इच्छा. आपल्या अभ्यासाच्या विषयाविषयी लिहिणं हा देखील एक अभ्यासच असतो, आपले कर्तव्यच असतं असं स्पष्टीकरणही त्यात देतात.
वेश्या, तमासगीर यांच्या जीवनाचा त्यांनी अभ्यास केला त्यावर लिहिलं. १९७५ च्या 'टुवर्ड्स इक्वलिटी' अहवालात वेश्यांचा विचारही केला नव्हता याचे त्यांना आश्चर्य वाटते दुर्गाबाईंच्या सांगण्यानंतर त्यांचा विचार केला गेला.समाजशास्त्र व सामाजिक कार्य यावरही चर्चा होते. सामाजिक कार्यकर्त्याला आपल्या विषयाचे पूर्ण ज्ञान, व्यासंग आजूबाजूच्या नियमांबद्दलची माहिती हवी, तर तुमचं काम, अभ्यास एकांगी होत नाही. याबाबतीत पाश्चात्य स्त्रिया अधिक झोकून देणार्या वाटतात. सामाजिक कार्यात राजकारण, वैयक्तिक स्वार्थ आलेला त्यांना आवडत नाही. समाजशास्त्रज्ञाच्या बाबतीत त्या म्हणतात, समाजशास्त्रज्ञाने पराकोटीच्या प्रामाणिकपणाने काटेकोरपणे आपले विचार निष्कर्ष मांडले पाहिजेत. कल्पित कथा मांडू नयेत. संशोधनाचे पुरावे काटेकोरपणे दिले पाहिजेत व पडताळून पाहिले पाहिजेत. स्वतःची गृहीतक, अनुमान सिद्ध करता आली नाहीत तर प्रामाणिकपणे तसे कबूल करता आले पाहिजे. मुळात सत्यासाठी ज्ञान या करता ज्ञानाचा हव्यास असायला हवा.
मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त स्वयंपाक, विणकाम, भरतकाम हे विषय आले की त्या रंगतात. अस्वल पंचामृत, फणस पोळी करतात. माकड डिंकाचे लाडू करतात. सीता तांदळापासून मैरेय नावाचं मध्य बनवायची. खादाड भीमाने श्रीखंड कसे करायचे शोधले अशी गमतिची माहिती त्या देतात. या वयातही नळराजाच्या पाकशास्त्राच्या पुस्तकाचे भाषांतर करण्याची त्यांची इच्छा आ. आपण सतत खालच्या वर्गातच असतो. शिकून वरच्या वर्गात जायचा प्रयत्न करायचा असं त्या म्हणतात.'मृत्यू एक परम गंभीर सत्य' या भागात आदिमानव व आदिवासींच्या मृत्यू विषयीच्या कल्पना त्या सांगतात. तसेच कृष्ण, बुद्ध, गांधीजी, सॉक्रेटीस, ख्रिस्त यांचे मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाले याचे विश्लेषण करतात ते सर्व विश्लेषण मुळातूनच वाचावयास हवे आत्महत्या व समाधीतिल फरक त्या दाखवितात.आत्महत्येपेक्षा माणसाने अर्थपूर्ण जगायला शिकलं पाहिजे असं त्यांना वाटतं.त्या म्हणतात जगाला तुमचा कितपत उपयोग आहे त्यापेक्षा तुम्हाला तुमचा किती उपयोग आहे हे बघितलं पाहिजे, त्याप्रमाणे ज्ञानाचे आस सतत ठेवली पाहिजे. तसेच सृष्टीतील सौंदर्य टिपण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. नित्य नुतन ज्ञान आणि सौंदर्य कणाकणात जिथून मिळेल तिथून मिळत राहिलं की जगण्याला अर्थ येतो. रोज नवी उमेद येते. जग, जगण होत शिळ होत नाही. आपण स्वतः शिळे होत नाही. माझी वृत्ती अशीच आहे म्हणून एवढे होऊनही मला म्हातारपणाची अडचण वाटत नाही, की मृत्यूचे भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं. रोजचा दिवस मी नवेपणाने जगते असं सांगताना इच्छामरणाचा हक्क मानतात. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. पुढच्या जन्मी मुंगीच्या किंवा मधमाशीच्या जन्माला यावं असं वाटतं. त्यांच्या चिकाटीने काम करण्याच्या वृत्तीमुळे नव्हे तर वात्सल्य या सर्वोत्कृष्ट भावनेचा लिंगनिरपेक्ष आविष्कार मुंग्या आणि माशांमध्ये दिसतो असं त्यांना वाटतं. स्वतःच्या मृत्यूबद्दल त्या वस्तुनिष्ठपणे बोलतात पण त्यांच्या आप्तांच्या मृत्यूने भावूक होतात. त्यांची धाकटी बहीण कमुताईच्या मृत्यूने भावूक झालेल्या दुर्गाबाई आधारासाठी निसर्गाकडे वळतात. कमूताईची आठवण म्हणून त्यांच्या सपाता घरात ठेवतात रोज तिला आवडणारी तुळस वाहतात. मी गेल्यावर माझ्या मृत्यूचे अवडंबर माजवू नये असं त्या सांगतात. देहोपनिषद या त्यांनीच रचलेल्या कवितेने पुस्तकाचा शेवट होतो. बाईनी स्वतःच्या मृत्यूला उपनिषदाच्या ज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवलं हा अधिकार दुर्गाबाई भागवत यांना आहेच हे प्रतिभाताईंचा म्हणणं सहजगत्या या दोघींच्या गप्पात सामील झालेल्या वाचकांनाही पटतं.
पुस्तक वाचून संपल्यावर दुर्गाबाईंच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. त्यांचा प्रचंड आशावाद, जीवनोत्साह, कर्तव्यनिष्ठ जीवनातील सौंदर्य टिपण्याची वृत्ती, नित्य नवीन शिकण्याची वृत्ती, विष्णुदासा प्रमाणे मेणाहून मऊ होण, प्रसंगी वज्राहून कठोर होणं यांनी आपण भारावून जातो. कोणत्याही विषयाचा सर्वांगाने अभ्यास करायचा म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण दुर्गाबाई यांच्या रूपाने आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ आदिकाळापासून माणूस कसा घडत गेला त्याचे टप्पे मानववंशशास्त्र, समाजशास्त्र लोकसाहित्य, धर्म, महाकाव्य, रूढी, परंपरा यातून त्या शोधतात.
सबंध पुस्तक भर दुर्गाबाई व प्रतिभाताई कुठेही गप्पांची ऐसपैस पातळी सोडून वाहवताना दिसत नाहीत. इथे कोणी मोठा, कोणी लहान राहत नाही. दुर्गाबाई अनेकवेळा प्रतिभाताईना' बरं झालं सांगितलं, मला नव्हतं माहित' असं म्हणून प्रतिभाताईनी सांगितलेली माहिती लहान मुलाच्या कुतूहलाने ऐकतात. मग ती मणिपूरमधल्या राधाष्टमीची किंवा तिबेटमधील रांगोळीची असो. अर्थात आपल्या विवेचनाची कुरघोडी होऊ नये, गप्पांचं रुपांतर वितंडवादात होऊ नये याबाबत प्रतिभाताई दक्ष असतात. दुर्गाबाईंच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले असतील पण वाचकांपर्यंत गप्पातून दुर्गाबाईंच्या मनातली तृप्ती, समाधानच पोचते.
दुर्गाबाई प्रतिभाताईंना भरपूर वाचायलाही लावतात. त्यावरही पुन्हा गप्पा होतात पण अजूनही कितीतरी विषय राहून गेले, अधिक खोलवर जायला हवे होते अशी रुखरुख प्रतिभाताईना वाटते. पण बाईंच्याकडे खजिना आहे तो अपरंपार आहे याचेही त्यांना भान आहे दुर्गाबाईंशी गप्पा मारताना प्रतिभाताईना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. दुर्गाबाईंच्या खजिन्यातला फारच थोडे आपल्यापर्यंत पोहोचले हे माहित असलं तरी वाचक त्यांनीच दिपून जातो.
हा पुस्तक परिचय एक छोटीशी झलक आहे. परिचय वाचून मूळ पुस्तक व मूळ पुस्तक वाचून दुर्गाबाईची सर्व पुस्तके वाचावीत अशी वाढते अंगाने जिज्ञासा वाढावी हीच अपेक्षा.
ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशीप्रतिभा रानडेराजहंस प्रकाशन पुणे१०२५, सदाशिव पेठ
( माध्यम १९९९ - २००० अंक १,मुक्त विद्याकेंद्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये यापूर्वी प्रकाशित.)
Subscribe to:
Posts (Atom)