Friday 26 May 2017

गेले द्यायचे राहुनी

                                          
         दसऱ्याच्या आधी झेंडूच्या फुलांच्या राशी दिसल्या की मला प्रकर्षाने आमच्या झेनची आठवण येते.  आमची झेन गाडी विकली त्याला ४ / ५  वर्षे तरी झाली. गेली एकदा कटकट अशीच भावना होती त्यावेळी.त्याला कारणही तसेच होते.माझ्या  नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.पीडी असणाऱ्यांना किती कठीण याची कल्पना करु शकतो. मोटर डिसऑर्डचा हा आजार असल्यामुळे हालचालीवर नियंत्रण कठीण जाते. त्यात हात,पाय अशा शरीराच्या विविध भागावर कंप असतो.प्रतिक्षिप्त क्रिया असतात तेंव्हा इतका प्रॉब्लेम येत नाही. पण विचार प्रक्रिया सुरु झाली की कंप वाढतो. गाडी सरळ रस्त्यावर चालवताना प्रॉब्लेम यायचा नाही.पण रिव्हर्स घेणे,यु टर्न घेणे, ट्राफिक जाम झाला की त्यातून गाडी बाहेर काढणे कठीण व्हायचे,आजूबाजूच्या लोकांचे हॉर्न वाजणे सुरु झाले की कंप वाढायचा.आजूबाजूचे लोक अशावेळी वाट्टेल ते बोलतात ते ऐकताना मला त्रास व्हायचा,यांच्या रागाचाही पारा चढायचा.पेट्रोल पंपावरचा माणूस दरवेळी म्हणायचा आजोबा आता गाडी चालवणे बंद करा.रस्त्यावरच्या इतर लोकांचे आडाखे  आणि पीडीमुळे यांच्या मेंदूने निर्णयास घेतलेला वेळ यात फरक पडत होता.छोटे मोठे अपघात होत होते,नशीबाने आम्हाला आणि इतर कोणाला कधी दुखापत झाली नाही. पण गाडी दुरुस्ती साठी १० /१२ हजार तरी खर्च यायचा.गराजवालेही आता गाडी चालवणे बंद करा म्हणायचे. यांना एकट्याला मी कुठे जाऊ देत नव्हते याचाही त्यांना राग यायचा.मी यांच्या बरोबर जीव मुठीत घेऊन गाडीत बसायची,पार्किन्सन्सची सभा संपवून आले की पोचलात ना व्यवस्थित असे सहकाऱ्यांचे फोन यायचे.कुठे जायचे तर एखादा ड्रायव्हर बोलऊ असे सुचवून पहिले पण त्यांना ते मान्य नव्हते.आणि हवा तेंव्हा असा ड्रायव्हर मिळणे कठीणही होते.गाडीवरून आमची सारखी भांडणे होऊ लागली.गाडी विकणे हा पर्याय होता.गाडीवर येणाऱ्या खर्चापेक्षा भाड्याचे वाहन वापरणे कसे स्वस्त पडेल हा गणिती हिशोबही करून झाला.शेवटी आमच्या ग्रुपमधील बुजुर्ग शुभार्थी ( पार्किन्सन्स पेशंट )  शेंडे साहेब यांना मी सांगितले ह्यांना जरा समजावा.शेंडे साहेबांनीही गाडी चालवणे योग्यवेळी थांबवले होते.कशाचाच उपयोग होत नव्हता.
शेवटी यांनाच उपरती झाली.ब्रेक पटकन दाबला जात नाही असे लक्षात आले.आपल्या गाडीखाली कोणी गेले तर काय असा विचार आला आणि आता गाडी विकूया असे त्यांनी जाहीर केले.जेथे गाडी दुरुस्तीला देत होतो त्यांनीच गिऱ्हाईक आणले.
                   मला हुश्य झाले.रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या वेळी गाडी विकली ते किती बरे झाले असे वाटायचे गाडी विकल्यानंतरचा पहिला दसरा आला.नेहमीप्रमाणे भरपूर झेंडूची फुले आणली.दाराची तोरणे केली. आता गाडीसाठी हार करायचा.आणि एकदम लक्षात आले गाडी कुठे आहे आता? आणि प्रथमच झेनच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले.ती आणल्यापासूनच्या आठवणी येऊ लागल्या.आपण तिला हकलायच्या नादात तिची पाठवणी किती निर्दयपणे केली.ती आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा होती.दरवर्षी सावंतवाडी,गोवा,बेळगाव अशी ट्रीप तर जवळजवळ ठरलेली असे.महाबळेश्वर, नाशिक सहल व्याही आणि विहीणबाईबरोबर केली होती.रत्नागिरीला समाजशास्त्र परिषदेला गेलो. माझ्या  आईला सोपान महाराज समाधी पहायची होती,आळंदी, देहू तर कितीक वेळा.मुलींच्या लग्नात हिने खूप धावपळ केली.लेकीला रात्री डीलीव्हरीसाठी नेताना हिचाच आधार होता.छोट्या बाळालाहि हिने आणले. आणि हे बाळ मोट्ठे  झाले  तर आमच्या कडे झेन आहे म्हणून त्यांनी आमचे झेन आज्जी आणि झेन अब्बू असे नामकरण केले. झेन गेली तरी हे नाव मात्र आम्हाला चिकटलेलेच राहिले.
                  पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम सुरु केल्यावर हडपसर,कात्रज,औंध,कोथरूड अशा पुण्याच्या कानाकोपर्यातील कित्येक घरभेटी हिच्या साथीने झाल्या.पेशंट असून गाडी चालवत येतात याचे इतरांना कौतुक वाटे.पीडी आटोक्यात होता तोवर हे ठीक होते.झेन गेल्यावर आमच्या घरभेटीना मर्यादा आल्या.मंडळाच्या पहिल्या सहलीत बस बुक केली होती ऐन वेळी लोक वाढले आणि ही मदतीला आली.अशा या सखीच्या बाबत मी रुक्ष कोरडी कशी झाले.मला प्रकर्षाने वाटले आपण तिच्यावरून हात फिरवून धन्यवाद. तरी म्हणायला हवे होते. प्रेमाने तिची पाठवणी करायला हवी होती राहूनच गेले.
(' संपूर्ण ' या मित्रगणात' गेले द्यायचे राहुनी' असा विषय दिला होता त्याला अनुसरून लिहिले आहे. आरती प्रभू यांच्या कवितेतील ओळीलक्षात घेऊन नाही.)