Wednesday 6 January 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे.

                         गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)