गौतम बुद्धाचा शिष्य अश्वघोष यांनी आपल्या वज्रसूची ग्रंथात जाती पाडण अनैसर्गिक खोटं आहे असे लिहिले आहे. वर्ण भेदही मानलेले नाहीत. या
ग्रंथाला उपनिषदे ही म्हटले जाते. तुकारामाची शिष्या बहिणाबाई यांनी या
ग्रंथाचे प्रथम मराठीत भाषांतर केले पण त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही
याचे दुर्गाबाईंना वाईट वाटते. अस्पृश्यताविरोधी प्रथम कृती करणाऱ्या
रामानुजाचार्य (१०१७ ते ११३० ) त्यानंतरचे मध्वाचार्य ( १९१८ ते १२४० )यांची दखल कोणी
घेतली नाही याबद्दल ही त्या खेद व्यक्त करतात. त्यांच्या मठात सर्व जाती
धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश होता. त्यांच्यावर संशोधन व्हावयास हवे मी
म्हातारे झाले कोणीतरी तरुणांनी येऊन हे काम करावे असावे असे त्या सुचवितात. बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे त्या सांगतात. गौतम बुद्धाने सांगितलेला
धर्म व भारतात आज अस्तित्वात असलेल्या धर्म याबाबतीत गप्पांच्या ओघात तुलना
होते आंबेडकरांच्या ग्रंथ प्रेमाबद्दल योग्य तो आदर दाखवून त्यांच्या मनुस्मृति
जाळण्याच्या कृतीबद्दल त्या दुःखी होतात. ग्रंथ हत्या मनुष्य हत्ये पेक्षा वाईट
असे मत त्या व्यक्त करतात. आंबेडकरांनी पाली शिकून मुळातून बौद्ध धर्म
अभ्यासायला हवा होता असे त्यांना वाटते.
विविधांगी लेखन करणाऱ्या
दुर्गाबाईंची लेखक म्हणून जडणघडण कशी झाली याबद्दलच्या गप्पा दुर्गाबाईंचा
लेखन प्रवास या भागात आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर यांच्याशी मैत्री असणारे,
शिकलेल्या मुलीशीच विवाह करायची अट ठेवणारे आजोबा, इंग्रजी, मराठी पुस्तकांचे
स्वतःचे वेगळे कपाट असणारी, दुर्गाबाईंना वाचण्यास प्रवृत्त करणारी, विविध
विषयांवर चर्चा करणारी आजी, अविवाहित राहण्याचा निर्णय घेणाऱ्या आपल्या
बुद्धिमान मुलीला कोणापुढे हाथ पसरावे लागू नये म्हणून तिच्या निर्वाहाची
तरतूद करून ठेवणारे, खडकावर टाकली तरी रुजून येईल असा आपल्या मुलीबद्दल सार्थ
अभिमान बाळगणारे वडील, निसर्ग प्रेम शिकवणारी वनस्पती शास्त्रज्ञ आत्या अशा
वातावरणात दुर्गाबाईंची जडणघडण झाली जागतिक पातळीवरची सगळी पुस्तके त्यांना
घरातच वाचावयास मिळाली. विविध भाषातील वाचन आणि पाठांतर ही त्यांनी केले.
साने गुरुजींनी त्यांना ललित लेखनाला प्रवृत्त केले. त्यांचे ऋतुचक्र वाचून पु.शी.रेगेंसारख्या संवेदनाशील,भावूक कविनीही ' मला तुमचा हेवा वाटतो' अशा शब्दात प्रशस्तीपत्र दिलं.
निसर्गप्रेमी दुर्गाबाई म्हणतात या सगळ्या निसर्गाच्या साखळीतील मी एक दुवा
आहे आणि त्यामुळेच मला पूर्णत्व आहे. झाडे,वेलिंमध्ये देखील मला आत्मा दिसला. जिवंत व्यक्ती
दिसल्या.
बाई
स्वतःला लिहावसं वाटलं तेव्हाच लिहितात. कोणीही सांगितलं म्हणून नाही.
यातूनच सार्थकता येते असे त्यांना वाटते. वाचन करणे, विचार करणे सतत चालू
असल्याने लिहिताना कधी त्यांना आता सुचतच नाही असे होत नाही. लिहून झाल्यावर
मानसिक शारीरिक थकवा येतो पण त्यातही थ्रील असतं असं त्यांना वाटतं.
आपलं वाटण त्या सुरेख उदाहरणातून सांगतात. दळून झाल्यावर पीठ गोळा करून
भरून ठेवायचं, जाते पुसून घेऊन भिंतीला उभं ठेवायचं आणि आपणही भिंतीला टेकून
बसायचं. काम केल्याचा थकवा येतो आणि एक तर्हेचा शांत विसावाही मिळतो.
ह.ना.
आपटेंचं लेखन त्यांना जागतिक तोडीचे वाटते. केशवसुत, टागोर, शरच्चंद्र
त्यांना इथल्या मातीतले तरी वैश्विक पातळीवरचे वाटतात अस्पृश्यतेच्या
विरोधात पहिले स्तोत्र लिहिणाऱ्या शंकराचार्यांवर, त्यांच्या अनुपम सुंदर
अतुलनीय संस्कृत भाषेबद्दल त्यांना कमालीचा आदर आहे त्यांच्यासारखी गद्य
पद्य भाषेसारखी भाषा जगात दुसऱ्या कोणाला जमलेली नाही असे त्यांना वाटत.
व्यक्तिस्वातंत्र्याचा
पुरस्कार करणाऱ्या दुर्गाबाईंना व्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार मानले
गेलेल्या स्त्रीमुक्ती चळवळ बाबत आपलेपणा का वाटत नाही, या प्रतिभाताईंच्या
प्रश्नांवर दुर्गाबाई विस्ताराने उत्तर देतात. व्यक्ती म्हणून स्त्रीला
समान प्रतिष्ठा, हक्क असायला हवेत तिच्यावर कसलेही अन्याय, अत्याचार होता
कामा नये हे मान्य असले तरी ते तिने स्वकर्तुत्वावर, स्वसामर्थ्यावर मिळवावयास हवेत असे त्यांना वाटते. अहिल्याबाई होळकर व आजच्या काळातील अनेक
स्त्रियांची उदाहरणे यासाठी त्या देतात. परंपरा न सोडताही व्यक्ती स्वातंत्र्य, समानता मिळवता
येते असे त्यांना वाटते. स्वतःला तसा समन्वय साधता आला असं त्या सांगतात. यात
गांधीजींच्या विचारांचा ही वाटा आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन एखादं
काम करायला त्यांनी शिकवलं. स्त्रियांना चांगल्या अर्थाने बाहेर काढलं.
त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
गोंड आदिवासींच्या जीवनपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. गोंडाचे
स्त्री-पुरुष संबंधातले मुक्त वातावरण, त्यांची गोटुल पद्धत व त्याबाबत
लोकांच्या मनातले गैरसमज, त्यांचे विवाह, सणवार, दारिद्र्य याच त्या रमून
जाऊन वर्णन करतात. विविध ठिकाणच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची प्राचीन
संस्कृती नेस्तनाबूत केली याचे त्यांना वाईट वाटते त्यांच्यात सुधारणा
व्हावयास हव्यात पण त्यासाठी त्यांची पाळंमुळं खणून काढणं हे त्यांना
समाजाचं नुकसान करणारे वाटतं.
वेश्या, तमासगीर यांच्या जीवनाचा त्यांनी
अभ्यास केला त्यावर लिहिलं. १९७५ च्या 'टुवर्ड्स इक्वलिटी' अहवालात वेश्यांचा विचारही
केला नव्हता याचे त्यांना आश्चर्य वाटते दुर्गाबाईंच्या सांगण्यानंतर
त्यांचा विचार केला गेला.
दुर्गाबाईंना मनापासून ललित लेखनाची आवड आहे
पण त्यांनी समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय लिखाण अधिक केलं हे कर्तव्य
बुद्धीतून. 'त्या शिक्षणासाठी पैसा खर्च झाला होता, माझ्या आयुष्याची कितीतरी
वर्ष, कितीतरी शक्ती खर्च झाली होती तेव्हा त्यामध्ये कुठलीही उणीव राहू नये
ही इच्छा. आपल्या अभ्यासाच्या विषयाविषयी लिहिणं हा देखील एक अभ्यासच असतो,
आपले कर्तव्यच असतं असं स्पष्टीकरणही त्यात देतात.
समाजशास्त्र व सामाजिक कार्य यावरही चर्चा होते. सामाजिक कार्यकर्त्याला
आपल्या विषयाचे पूर्ण ज्ञान, व्यासंग आजूबाजूच्या नियमांबद्दलची माहिती
हवी, तर तुमचं काम, अभ्यास एकांगी होत नाही. याबाबतीत पाश्चात्य स्त्रिया अधिक
झोकून देणार्या वाटतात. सामाजिक कार्यात राजकारण, वैयक्तिक स्वार्थ आलेला
त्यांना आवडत नाही. समाजशास्त्रज्ञाच्या बाबतीत त्या म्हणतात,
समाजशास्त्रज्ञाने पराकोटीच्या प्रामाणिकपणाने काटेकोरपणे आपले विचार
निष्कर्ष मांडले पाहिजेत. कल्पित कथा मांडू नयेत. संशोधनाचे पुरावे
काटेकोरपणे दिले पाहिजेत व पडताळून पाहिले पाहिजेत. स्वतःची गृहीतक, अनुमान
सिद्ध करता आली नाहीत तर प्रामाणिकपणे तसे कबूल करता आले पाहिजे. मुळात सत्यासाठी ज्ञान या करता ज्ञानाचा हव्यास असायला हवा.
मानववंशशास्त्र,
समाजशास्त्र, तत्त्वज्ञान इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त स्वयंपाक, विणकाम,
भरतकाम हे विषय आले की त्या रंगतात. अस्वल पंचामृत, फणस पोळी करतात. माकड
डिंकाचे लाडू करतात. सीता तांदळापासून मैरेय नावाचं मध्य बनवायची. खादाड भीमाने श्रीखंड
कसे करायचे शोधले अशी गमतिची माहिती त्या देतात. या वयातही नळराजाच्या पाकशास्त्राच्या
पुस्तकाचे भाषांतर करण्याची त्यांची इच्छा आ. आपण सतत खालच्या वर्गातच असतो.
शिकून वरच्या वर्गात जायचा प्रयत्न करायचा असं त्या म्हणतात.
'मृत्यू
एक परम गंभीर सत्य' या भागात आदिमानव व आदिवासींच्या मृत्यू विषयीच्या
कल्पना त्या सांगतात. तसेच कृष्ण, बुद्ध, गांधीजी, सॉक्रेटीस, ख्रिस्त यांचे
मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाले याचे विश्लेषण करतात ते सर्व विश्लेषण
मुळातूनच वाचावयास हवे आत्महत्या व समाधीतिल फरक त्या
दाखवितात.आत्महत्येपेक्षा माणसाने अर्थपूर्ण जगायला शिकलं पाहिजे असं
त्यांना वाटतं.त्या म्हणतात जगाला तुमचा कितपत उपयोग आहे त्यापेक्षा
तुम्हाला तुमचा किती उपयोग आहे हे बघितलं पाहिजे, त्याप्रमाणे ज्ञानाचे आस
सतत ठेवली पाहिजे. तसेच सृष्टीतील सौंदर्य टिपण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.
नित्य नुतन ज्ञान आणि सौंदर्य कणाकणात जिथून मिळेल तिथून मिळत राहिलं की जगण्याला
अर्थ येतो. रोज नवी उमेद येते. जग, जगण होत शिळ होत नाही. आपण स्वतः शिळे
होत नाही. माझी वृत्ती अशीच आहे म्हणून एवढे होऊनही मला म्हातारपणाची अडचण
वाटत नाही, की मृत्यूचे भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं. रोजचा दिवस मी
नवेपणाने जगते असं सांगताना इच्छामरणाचा हक्क मानतात. त्यांचा पुनर्जन्मावर
विश्वास आहे. पुढच्या जन्मी मुंगीच्या किंवा मधमाशीच्या जन्माला यावं असं
वाटतं. त्यांच्या चिकाटीने काम करण्याच्या वृत्तीमुळे नव्हे तर वात्सल्य या
सर्वोत्कृष्ट भावनेचा लिंगनिरपेक्ष आविष्कार मुंग्या आणि माशांमध्ये दिसतो
असं त्यांना वाटतं. स्वतःच्या मृत्यूबद्दल त्या वस्तुनिष्ठपणे बोलतात पण
त्यांच्या आप्तांच्या मृत्यूने भावूक होतात. त्यांची धाकटी बहीण कमुताईच्या
मृत्यूने भावूक झालेल्या दुर्गाबाई आधारासाठी निसर्गाकडे वळतात. कमूताईची
आठवण म्हणून त्यांच्या सपाता घरात ठेवतात रोज तिला आवडणारी तुळस वाहतात. मी
गेल्यावर माझ्या मृत्यूचे अवडंबर माजवू नये असं त्या सांगतात. देहोपनिषद
या त्यांनीच रचलेल्या कवितेने पुस्तकाचा शेवट होतो. बाईनी स्वतःच्या
मृत्यूला उपनिषदाच्या ज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवलं हा अधिकार दुर्गाबाई
भागवत यांना आहेच हे प्रतिभाताईंचा म्हणणं सहजगत्या या दोघींच्या गप्पात
सामील झालेल्या वाचकांनाही पटतं.
पुस्तक वाचून संपल्यावर दुर्गाबाईंच्या
विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. त्यांचा प्रचंड
आशावाद, जीवनोत्साह, कर्तव्यनिष्ठ जीवनातील सौंदर्य टिपण्याची वृत्ती, नित्य
नवीन शिकण्याची वृत्ती, विष्णुदासा प्रमाणे मेणाहून मऊ होण, प्रसंगी वज्राहून
कठोर होणं यांनी आपण भारावून जातो. कोणत्याही विषयाचा सर्वांगाने अभ्यास
करायचा म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण दुर्गाबाई यांच्या रूपाने आपल्याला दिसतं.
उदाहरणार्थ आदिकाळापासून माणूस कसा घडत गेला त्याचे टप्पे मानववंशशास्त्र,
समाजशास्त्र लोकसाहित्य, धर्म, महाकाव्य, रूढी, परंपरा यातून त्या शोधतात.
सबंध
पुस्तक भर दुर्गाबाई व प्रतिभाताई कुठेही गप्पांची ऐसपैस पातळी सोडून
वाहवताना दिसत नाहीत. इथे कोणी मोठा, कोणी लहान राहत नाही. दुर्गाबाई अनेकवेळा
प्रतिभाताईना' बरं झालं सांगितलं, मला नव्हतं माहित' असं म्हणून प्रतिभाताईनी
सांगितलेली माहिती लहान मुलाच्या कुतूहलाने ऐकतात. मग ती मणिपूरमधल्या राधाष्टमीची
किंवा तिबेटमधील रांगोळीची असो. अर्थात आपल्या विवेचनाची कुरघोडी होऊ नये,
गप्पांचं रुपांतर वितंडवादात होऊ नये याबाबत प्रतिभाताई दक्ष असतात. दुर्गाबाईंच्या
जीवनात अनेक कटू प्रसंग आले असतील पण वाचकांपर्यंत गप्पातून दुर्गाबाईंच्या
मनातली तृप्ती, समाधानच पोचते.
दुर्गाबाई प्रतिभाताईंना भरपूर वाचायलाही लावतात. त्यावरही
पुन्हा गप्पा होतात पण अजूनही कितीतरी विषय राहून गेले, अधिक खोलवर जायला
हवे होते अशी रुखरुख प्रतिभाताईना वाटते. पण बाईंच्याकडे खजिना आहे तो
अपरंपार आहे याचेही त्यांना भान आहे दुर्गाबाईंशी गप्पा मारताना प्रतिभाताईना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. दुर्गाबाईंच्या खजिन्यातला फारच थोडे आपल्यापर्यंत पोहोचले हे माहित असलं तरी वाचक त्यांनीच दिपून जातो.
हा पुस्तक
परिचय एक छोटीशी झलक आहे. परिचय वाचून मूळ पुस्तक व मूळ पुस्तक वाचून
दुर्गाबाईची सर्व पुस्तके वाचावीत अशी वाढते अंगाने जिज्ञासा वाढावी हीच
अपेक्षा.
ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी
प्रतिभा रानडे
राजहंस प्रकाशन पुणे
१०२५, सदाशिव पेठ
( माध्यम १९९९ - २००० अंक १,मुक्त विद्याकेंद्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये यापूर्वी प्रकाशित.)