Monday 2 May 2016

कुलकर्णी सर आणि मॅडम

                        कुलकर्णी सर आणि मॅडम,गेल्या काही दिवसात तुमची खूप आठवण येते.किती किती जणांना सांगितलं मी तुमच्या बद्दल. कदाचित पुन्हा पुन्हाही.
काय झाल आमच्या संगीतानंद क्लासच्या ज्योती देशमुख मॅडमनी यावर्षी 'संगीतकार एक रत्नपारखी' अशी स्पर्धा ठेवली.आठ गट होते. प्रत्यकाला एकेक संगीतकार दिले.३० मिनिटात ते संगीतकार उभे करणार प्रेझेन्टेशन करायचं. त्या संगीतकाराची माहिती ,त्यांनी संगीत दिलेली  गीते,संगीताची वैशिष्ट्य इत्यादी त्यात असण अपेक्षित होत.आमच्या गटाला वसंत देसाई आले.त्यांच्या संगीतातील विविधता अशी थीम घेऊन सादरीकरण करायचं ठरलं.गुगलवर शोधाशोध सुरु झाली.
शोधताना 'प्यारकी प्यास'ला त्याचं संगीत आहे आणि त्यात राष्ट्रीय एकात्मतेवरच 'किसका देश' हे गीत आहे हे लक्षात आल.जवळ जवळ १० मिनिटाच्या या गाण्यावर सर,मॅडमनी मी आठवीत असताना साधारण ६१/६२ च्या दरम्यान गॅदरींगसाठी नृत्यनाट्य बसवलं होत. त्यावेळी लक्षात आल नाही. पण आत्ता वाटत एवढ मोठ्ठ धाडस कस केल होत.बंगाल,महाराष्ट्र,मारवाड,गुजरात,तामिळनाडू विविध राज्ये भारत आपलाच आहे म्हणत भांडत आहेत. भारत माता प्रगट होते. ती गाण्यातून या सर्वांना आपापासात वैर करू नका अस सांगते आणि नंतर सर्व एकत्र येऊन 'हम एक है....दुनियाके आगे बात ये सौबार हम कहेंगे|' म्हणतात.यात ४० तरी  मुली घेतल्या होत्या.खानापुरसारख छोट गाव.पालक पाल्य हे शब्द तेंव्हा अस्तित्वात नव्हते. गॅदरींगच्या ड्रेपरीसाठी भले मोट्ठे खर्च करण शक्य नव्हत. पण या दोघांची कल्पकता एवढी होती,हाताशी असलेल्या साहित्यातून त्यांनी विविध प्रदेशाची ड्रेपरी उभी केली.एक उदाहरण सांगते.मी यात मारवाडी होते.घरात जुनी ठेवणीतली साडी ती रुंदीत दुडून त्याला मोठ्ठा मोठ्ठा धावदोरा घालून नेफा बनवला होता.त्यात बंद घातला होता.कडेनीही मोठठा धावधोरा घातला आणि मारवाडी घागरा तयार. 'घेरदार घागर लुभायो'ला गिरकी मारून बसल्यावर तो पसरायचा.इतक मस्त वाटायचं.छोटे कच्चे पेरू दोन्हीकडून घासायचे थोडा चपटा झाला,की मधला गर काढायचा, वर एक चीर पाडायची आणि बेगड लावायच. चांदीचे  मोठे रिंग तयार.त्यावेळी टेपरेकॉर्डर होते की ग्रामोफोनच्या रेकॉर्डवर गाण ऐकवल होत आठवत नाही पण आम्ही ते लिहून घेतलं नव्हत नक्की. ऐकून ऐकून
सर्वाना पाठ झाल होत कितीतरी दिवस तालीम चालू होती.आणि आश्चर्य म्हणजे आजही ते सर्व गाण मला आठवत होत.वसंतरावांच्या संगीताच एक वैशिष्ट्य, त्यांनी मराठी हिंदीबरोबर गुजराथी,इंग्लिश,तमिळ अशा विविध भाषातील चीत्रपटाना  संगीत दिल.सुब्बलक्ष्मीनी शंकराचार्यांचा संस्कृत श्लोक युनोत गायला त्याच संगीतही वसंतरावांच.त्यामुळे एक दुसऱ्या भाषेतलं गीत घ्यायचं ठरलं.मी 'बोन्धू रे...'हे बंगाली गाण  ऐकवल. सर्वाना ते खूप आवडलं.थोडा कोरस असल्याने इतरांसाठी पहिल्यांदाच कागदावर लिहील. वसंतरावांची इतर गीते युट्युबवरून रेकॉर्ड करून कितीतरीवेळा प्रॅक्टीस करावी लागली.पण हे गाण मात्र सहज बसल.हे गाण म्हणताना प्रत्येक वेळी तुमची आणि त्यावेळी केलेल्या धमालीची आठवण झाली.स्पर्धेच्यावेळी सर्वाना ते आवडलच. पण परीक्षकांनीही इतके कष्ट घेऊन बंगाली गाण बसवलं अस कौतुक केल.आम्ही काहीच कष्ट घेतले नव्हते. कष्ट तर त्यावेळी तुम्ही घेतले होते.उगाच कानकोंड्यासारख झाल.आम्हाला दुसरा नंबर मिळाला.खर श्रेय होत सर आणि मॅडम तुमच.ते तुमच्यापर्यंत पोचउन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन
प्रपंच.
वसंतरावांचा अभ्यास करताना ते  साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी होते हे लक्षात आल.त्यांची आठवण म्हणून त्यांनी बांधलेला मोगर्याचा गजरा त्यांनी आयुष्यभर त्यांची  हाताला बांधला.चांद्यापासून बांद्यापर्यंत देशभक्तीपर गीते शाळाशाळातून मोफत शिकविली.संस्कारक्षम वयात मुलांना देशप्रेम शिकवायला हव असा त्यांना वाटे.याच भावनेतून सर आणि मॅडमनीही हे राष्ट्रीय एकात्मता रुजवणार नृत्य बसवलं असाव. सर आणि मॅडमही सानेगुरुजी प्रेमी त्यांनी खानापुरला साने गुरुजी कथामाला चालविली.बेळगावहून कितीतरी वक्ते आणले जायचे.तुम्ही केलेल्या कितीतरी गोष्टींचा अर्थ आत्ता लागतो.आम्ही नशीबवान म्हणून तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले.