Saturday 10 December 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.

                   डॉक्टर वसुधा भंडारे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची समाज शास्त्र विषयातील विद्या वाचस्पती ( पीएचडी) पदवी मिळाली.अडचणींचा डोंगर पार करत संकटावर मात करत त्यांनी यशश्री खेचून आणली. मन:पूर्वक अभिनंदन! ६७ व्या वर्षी त्यांनी  मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे'.स्वेच्छां रक्त्दानासंबंधी पुणे शहरातील रक्तपेढ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास' असा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
. त्यांच्या जिद्दी बद्दल  २० ऑगस्ट २००४ .च्या केसरीच्या अंकात' कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची' असा लेख लिहिला होता.त्यात लिहील होत,."डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'"  माझ भाकीत त्यांनी खर करून दाखवलं.त्यांची धडपड इथेच थांबणार नाही.त्यांच्या भविष्यकालीन योजनात काही  पुस्तकांचे लिखाण आहे.          
  माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.
                                     भारतातील सामाजिक समस्या या विषयात वेश्या व्यवसायाच्या समस्येविषयी लिहायचे होते.त्यांच्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभव गाडीखान्यात काम करणाऱ्या कुसुम फुले यांना विचारावे म्हणून तेथे गेले होते.आमची चर्चा चालू होती.तेवढ्यात शुब्र वास्नातील गोऱ्यापान,प्रसन्न चेहऱ्याच्या परिचारिका तेथे आल्या.चर्चेत सहभागी झाल्या.'या वसुधा भंडारे' फुलेंनी ओळख करून दिली.चर्चेत त्याही सामील झाल्या.त्यांची निरीक्षणे,त्यांच्यासाठी काय करायला हवे हे सांगू लागल्या.या प्रश्नाविषयी आपल ज्ञान किती तोकड आणि पुस्तकी आहे असे मला वाटले..मी त्यांना म्हटल' खरे तर तुम्ही काम करणाऱ्या लोकांनी यावर संशोधन करायला हवे.'
                                    वसुधाताईनी एक सुस्कारा सोडला.क्षणार्धात त्यांचा प्रसन्न चेहरा उदास झाला.' खरे तर माझे पदवीचे स्वप्नही अपुरे राहिले आहे.उत्पध्यन्ते विलीयन्ते दरिद्राणा मनोरथा.'पुढे त्या म्हणाल्या,'तुमच्या विद्यापीठातून मुलासाठी माहिती पुस्तिका आणली होती.स्वत:हि प्रवेश घ्यावा असे वाटले होते.पण आता पन्नाशी जवळ आली आहे, स्वत:वर पैसे खर्च करायला नको वाटते'
                                   ' स्वप्न पुरे करायला वयाचा काही संबंध नाही.आमच्याकडे  ७५ वर्षाच्या गृहस्थानीही प्रवेश घेतला आहे.आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर मी तुमची फी भरते.जमेल तशी सवडीने परत करा.' मी त्यांना म्हटले.
                                    सात आठ दिवसांनी वसुधाताई फॉर्म भरून घेऊन आल्या.'तुम्ही येऊन गेल्यापासून खूप विचार केला.एक अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी फी भरायला तयार होते,तर आपण घेऊच प्रवेश असे ठरवले.पण मला जमेल ना हो?'
                                 ' न जमायला काय झाले? नक्की जमेल'.मी त्यांना म्हटले.वसुधाताईनी माझ्याकडून फीचे पैसे मात्र घेतले नाहीत.
                                    त्यांच्या भरगच्च दिनक्रमातूनवेळ काढून त्या मन लाऊन अभ्यास करत होत्या.शंका विचारायला येत होत्या.'मला जमेल ना हो' हे पालुपद मात्र सारखे चालूच असायचे.योग शिक्षक म्हणून काम करणे,नर्सिंगवर व्याख्याने देणे,होमिओपॅथी शिकणे असे इतर उद्योगही चालूच होते.तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला.त्या प्रथम श्रेणीत पदवीधर झाल्या.समाजशास्त्रा या विषयात  पहिल्या आल्या.त्यासाठीचे पारितोषिकही त्यांना मिळाले.
                                  आता त्यांच्या प्रतिभेला बहार आला होता.कथा लेख लिहिणे चालूच होते.त्यांच्या सर्व्हिसबुकमध्ये आता पदवीधर झाल्याची नोंद होणार होती.पगारवाढही होणार होती.पण नोकरशाही आड आली.'ही कुठली तुमची पदवी आम्ही नाही मानत' तिथल्या मग्रूर क्लार्कने सुनावले. खर तर अशी वेळ आली की विध्यार्थी निराश होतात. आक्रमक होऊन विद्यापीठात येतात.पदवीच्या सामाज्माण्यातेचे पत्र मागतात.पण वसुधाताईनी मात्र यातले काही केले नाही.त्यांनी शांतपणे माहिती पुस्तिकेतील शासन मान्यतेचे पत्र दाखवले.तरीही काम होत नाही म्हटल्यावर वरिष्ठांपर्यंत जाऊन तड लावली.
                               बी.ए. झाल्यावर त्या एम,ए.ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.आता त्या थांबणार नव्हत्या.टिळक विद्यापीठाच्या नेहरू विद्यास्थानात मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी प्रवेश दिला जातो.तेथेही त्यांची निवड झाली.अभ्यासक्रमाला उपस्थिती गरजेची असते.वर्ग दुपारी असल्याने नोकरी सांभाळून हजार राहणे त्यांना शक्य होणार होते.नोकरीचा व्याप,मुलीचे बाळंतपण,स्वत:चे आजारपण ही तारेवरची कसरत करत त्या जीद्दीने एम.फिल. पूर्ण करत आहेत.परीक्षेच्यावेळीमणक्याचा आजार उद्भवला.बाकावर बसने अशक्य झाले.विध्यापिथाने पाठीला आधार घेऊन बसता येईल असी स्वतंत्र व्यवस्था केली.एक निवृत्त परिचारिका त्यांच्या औषध आणि इंजक्शनचे पाहत होती.
                                डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'.






Monday 2 May 2016

कुलकर्णी सर आणि मॅडम

                        कुलकर्णी सर आणि मॅडम,गेल्या काही दिवसात तुमची खूप आठवण येते.किती किती जणांना सांगितलं मी तुमच्या बद्दल. कदाचित पुन्हा पुन्हाही.
काय झाल आमच्या संगीतानंद क्लासच्या ज्योती देशमुख मॅडमनी यावर्षी 'संगीतकार एक रत्नपारखी' अशी स्पर्धा ठेवली.आठ गट होते. प्रत्यकाला एकेक संगीतकार दिले.३० मिनिटात ते संगीतकार उभे करणार प्रेझेन्टेशन करायचं. त्या संगीतकाराची माहिती ,त्यांनी संगीत दिलेली  गीते,संगीताची वैशिष्ट्य इत्यादी त्यात असण अपेक्षित होत.आमच्या गटाला वसंत देसाई आले.त्यांच्या संगीतातील विविधता अशी थीम घेऊन सादरीकरण करायचं ठरलं.गुगलवर शोधाशोध सुरु झाली.
शोधताना 'प्यारकी प्यास'ला त्याचं संगीत आहे आणि त्यात राष्ट्रीय एकात्मतेवरच 'किसका देश' हे गीत आहे हे लक्षात आल.जवळ जवळ १० मिनिटाच्या या गाण्यावर सर,मॅडमनी मी आठवीत असताना साधारण ६१/६२ च्या दरम्यान गॅदरींगसाठी नृत्यनाट्य बसवलं होत. त्यावेळी लक्षात आल नाही. पण आत्ता वाटत एवढ मोठ्ठ धाडस कस केल होत.बंगाल,महाराष्ट्र,मारवाड,गुजरात,तामिळनाडू विविध राज्ये भारत आपलाच आहे म्हणत भांडत आहेत. भारत माता प्रगट होते. ती गाण्यातून या सर्वांना आपापासात वैर करू नका अस सांगते आणि नंतर सर्व एकत्र येऊन 'हम एक है....दुनियाके आगे बात ये सौबार हम कहेंगे|' म्हणतात.यात ४० तरी  मुली घेतल्या होत्या.खानापुरसारख छोट गाव.पालक पाल्य हे शब्द तेंव्हा अस्तित्वात नव्हते. गॅदरींगच्या ड्रेपरीसाठी भले मोट्ठे खर्च करण शक्य नव्हत. पण या दोघांची कल्पकता एवढी होती,हाताशी असलेल्या साहित्यातून त्यांनी विविध प्रदेशाची ड्रेपरी उभी केली.एक उदाहरण सांगते.मी यात मारवाडी होते.घरात जुनी ठेवणीतली साडी ती रुंदीत दुडून त्याला मोठ्ठा मोठ्ठा धावदोरा घालून नेफा बनवला होता.त्यात बंद घातला होता.कडेनीही मोठठा धावधोरा घातला आणि मारवाडी घागरा तयार. 'घेरदार घागर लुभायो'ला गिरकी मारून बसल्यावर तो पसरायचा.इतक मस्त वाटायचं.छोटे कच्चे पेरू दोन्हीकडून घासायचे थोडा चपटा झाला,की मधला गर काढायचा, वर एक चीर पाडायची आणि बेगड लावायच. चांदीचे  मोठे रिंग तयार.त्यावेळी टेपरेकॉर्डर होते की ग्रामोफोनच्या रेकॉर्डवर गाण ऐकवल होत आठवत नाही पण आम्ही ते लिहून घेतलं नव्हत नक्की. ऐकून ऐकून
सर्वाना पाठ झाल होत कितीतरी दिवस तालीम चालू होती.आणि आश्चर्य म्हणजे आजही ते सर्व गाण मला आठवत होत.वसंतरावांच्या संगीताच एक वैशिष्ट्य, त्यांनी मराठी हिंदीबरोबर गुजराथी,इंग्लिश,तमिळ अशा विविध भाषातील चीत्रपटाना  संगीत दिल.सुब्बलक्ष्मीनी शंकराचार्यांचा संस्कृत श्लोक युनोत गायला त्याच संगीतही वसंतरावांच.त्यामुळे एक दुसऱ्या भाषेतलं गीत घ्यायचं ठरलं.मी 'बोन्धू रे...'हे बंगाली गाण  ऐकवल. सर्वाना ते खूप आवडलं.थोडा कोरस असल्याने इतरांसाठी पहिल्यांदाच कागदावर लिहील. वसंतरावांची इतर गीते युट्युबवरून रेकॉर्ड करून कितीतरीवेळा प्रॅक्टीस करावी लागली.पण हे गाण मात्र सहज बसल.हे गाण म्हणताना प्रत्येक वेळी तुमची आणि त्यावेळी केलेल्या धमालीची आठवण झाली.स्पर्धेच्यावेळी सर्वाना ते आवडलच. पण परीक्षकांनीही इतके कष्ट घेऊन बंगाली गाण बसवलं अस कौतुक केल.आम्ही काहीच कष्ट घेतले नव्हते. कष्ट तर त्यावेळी तुम्ही घेतले होते.उगाच कानकोंड्यासारख झाल.आम्हाला दुसरा नंबर मिळाला.खर श्रेय होत सर आणि मॅडम तुमच.ते तुमच्यापर्यंत पोचउन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन
प्रपंच.
वसंतरावांचा अभ्यास करताना ते  साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी होते हे लक्षात आल.त्यांची आठवण म्हणून त्यांनी बांधलेला मोगर्याचा गजरा त्यांनी आयुष्यभर त्यांची  हाताला बांधला.चांद्यापासून बांद्यापर्यंत देशभक्तीपर गीते शाळाशाळातून मोफत शिकविली.संस्कारक्षम वयात मुलांना देशप्रेम शिकवायला हव असा त्यांना वाटे.याच भावनेतून सर आणि मॅडमनीही हे राष्ट्रीय एकात्मता रुजवणार नृत्य बसवलं असाव. सर आणि मॅडमही सानेगुरुजी प्रेमी त्यांनी खानापुरला साने गुरुजी कथामाला चालविली.बेळगावहून कितीतरी वक्ते आणले जायचे.तुम्ही केलेल्या कितीतरी गोष्टींचा अर्थ आत्ता लागतो.आम्ही नशीबवान म्हणून तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले.

Wednesday 6 January 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे.

                         गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)