Tuesday 14 January 2014

२. सिनेमाची गोष्ट सांगण्याच्या आठवणी


(मायबोली वरील एका स्पर्धेतील लेख)

१५ ऑगस्टला टिव्हीवर 'जनगणमन' लागला होता. शेवटी झेंडा फडकतो सोनटक्के गुरूजी
सॅलुट करतात.नकळत मी हि उठुन सॅलुट केला.किती दिवसानी मी समरसुन सिनेमा पाहिला होता.गाथाचित्रशती लेखन स्पर्धेतिल लेख वाचतावाचता माझ जुन सिनेमाप्रेम आणि आठवणी जाग्या झाल्या.'सोन%गुर्रजी' पाहताना आमचे शाळेतील पाटीलसर आठवले. त्यानीच तर सिनेमा प्रेमाच बीज पेरल होत.
खानापुर हे तालुक्याच गाव सीमाप्रश्न आणि नंतर तेलगी प्रकराणामुळे माध्यमातुन झळकणार.तिथ सिनेमा थिएटर नव्हत. बेळगावला जाउन सिनेमा पाहण म्हणजे चैनिची परिसिमा.थिएटरमधे जाउन सिनेमा पहण्यापुर्वीच माझी सिनेमाची ओळख झाली.भुगोलाच्या पाटील सरांमुळे. ऑफ पिरिअड असला की ते सिनेमाच्या गोष्टी सांगायचे ससुराल्,प्यार का सागर, भाभी,छोटि बहन, अशा कितितरि गोष्टी आम्ही त्यांच्याकडुन ऐकल्या.छोटी बहन नंतर बेळगावला  कृष्णा थिएटरमधे पाहिला १००दिवस झाले म्हणुन सर्वाना मोतीचुर लाडु वाटले होते हेच जास्त लक्षात राहिले. पाहिलेल्या सिनेमापेक्षा ऐकलेली सरांची गोष्टच लै भारी वाटली होती.सिनेमा पाहिल्यावर गोष्टी सांगण्याचा संस्कार माझ्यावर इथेच झाला असावा. गोष्टी सांगताना फळयाचा वापर असायचा कथा रंगत जायची तसा फळाहि गिरगोट्यानी भरलेला असायचा.अस्मदिक तोंड उघड करुन, मान वाकडी करुन ऐकण्यात दंग.आम्हा मुलांना अस बिघडवण्यावर(?) ना पालकांचा आक्षेप कि हेड मास्तरांचा.
आमच्या गावालाच तस सिनेमाच वावड नव्हत.बेळगावला कामाला जावो, लग्नाला जावो वा ट्रीपला संध्याकाळी सिनेमा पाहुन रात्रीच्या गाडिला परत यायच हे श्वास घेण्याइतक सहज असायच.काम लवकर आटोपल तर ३ते६ आणि ६ते९ असे सिनेमा पहायचे.अमक्याचा सिनेमा अमका सिनेमा यापेक्षा स्टेशनच्या जवळ असलेल्या रिझ, रेडिओ येथे सिनेमा पाहण सोयीच असायच.आमची बाळेकुन्द्री मोदगासिल्क फॅक्टरी अशी ट्रिप गेली तेंव्हा' माणसाला पांख असतात' हा सिनेमा पाहिला होता कितितरी दिवस 'पंख हवे मज पोलादाचे शुर लढायु जटायुचे'हे गाणे मोठ्याने म्हणायची. गुणगुणण हा प्रकार नसायचा.
कोल्हापुर,पन्हाळा ट्रिप गेली तेंव्हा' बीस साल बाद 'पाहिला होता घड्याळाचा ठोका पडल्यावर आमच्यातल्या काहि जणी घाबरुन किंचाळल्या होत्या हे चांगल आठवत.पन्हाळ्याच्या दुतोंडी बुरुजावर सिनेमाच शुटिंग झाल्याच तिथल्या गाइडनी सांगितल होत.सगळच ग्रेट वाटल होत.ट्रीपहुन परत आल्यावर ट्रिपला न आलेल्या मैत्रिणीला ट्रिपच्या वर्णनाबरोबर सिनेमाची गोष्टही सांगितली.वहिदाने विश्वजितने कोणते कपडे घातले होते. तिचे काका कसे दिसायचे कसे औषध द्यायचे.अस इतंभूत वर्णन सांगत गोष्ट २/३ तास चालली.सिनेमातल्या गाण्यासह ट्याणटण ढाणटण ढ्याणटण डा अस म्युझीकसह हे कथाकथन होत.वहिदाच्या काकांच्या चांगल असण्याच मी इतक रसभरीत वर्णन केल होत की मैत्रिणिला ते खुन करायचे हे खरच वाटत नव्हत.स्वतःचा मसाला घालणं खानापुरातल्या कमलचित्रमंदिर थिएटरमुळे सुरु झाल होत.
त्याच अस झाल,खानापुरला
कमलचित्रमंदिरती हे सिनेमाच थिएटर झाल आणि माझ सिनेमा पहाण्याच प्रमाण थोड वाढल.होत.भरतभेट,संत तुलसिदास, चायना टाऊन आणि ज्यांची नावही आठवत नाहित असे कितितरी.सारखी फिल्म तुटायची.कधी फक्त चित्र दिसायच.तर कधी फक्त आवाज यायचा.३ तासाचा सिनेमा ४ तास चालायचा.'आप्पाचा सिनेमा' हा स्पर्धेतिल लेख वाचल्यावर यातील अडचणी समजल्या. .माझ्या गोष्ट सांगण्याला मात्र हे आव्हानच होत. न दिसलेल्या ठिकाणी न ऐकु आलेल्या ठिकाणी माझ्या गाळलेल्या जागा भरा असायच्या इथ कल्पनाशक्तीला मस्त वाव होता.  कमलचित्रमंदिर ही हालत. त्यामुळे लोकाना मात्र बेळगावला जाउन सिनेमा पहाण्याचा पर्यायच जास्त सोयीचा होता.परिणामी थिएटर बद पडल.तिथ लग्न व्हायला लागली.
एकुणात भुकेल्याने जिभेचे चोचले न करता समोर दिसेल ते अन्न निमुटपणे खाव.तस आमच असायच.सिनेमा म्हणजे त्याला एक गोष्ट असते एवढच सिनेमाबद्दल आकलन होत.तोपर्यंत आमच्याकडे रेडिओहि नव्हता. बाबूकाकांकडे पहिल्यांदा रेडिओ आला मग दर बुधवारी बिनाका ऐकायला त्यांच्याकडे जायच. सिनेमाच ज्ञान वाढण्याच आणखी एक साधन वाढल.बिनाकामुळे नविन नविन सिनेमा समजायला लागले सिनेमाची गाणी पाठ व्हायला लागली.'शनि और मंगलका शुभ मिलाफ दो सितारोंका मिलन है उनका नाम है'अस म्हणत दिलिपकुमार आणि वैजंतीमालाच्या एका सिनेमाची अमिन सयानीच्या आवाजातील जाहिरात अजुन कानावर आहे.याच वैजन्तिमालाच्या राजकपुर बरोबरच्या संगमची जाहिरात जोरात होती.गाणी खुप गाजत होती सिनेमाला दोन मध्यंतर होती.
शाळेची बेळगाव ट्रिप मिलिट्री, महादेवाच देउळ ,किल्ला आणि संगम सिनेमा अशी गेली होती. घरी येउन बहिणिला गोष्ट सांगितली सिनेमा मोठ्ठा त्यात सगळी गाणि पाठ झाली होती मग गोष्ट सांगता सांगता रात्र संपली होती.आजही अंताक्षरी मधे बहुतेकजण य अक्षराला ये मेरा प्रेमपत्र सुरु करतात तेंव्हा मी सांगते सुरुवात मेहेरबा लिखु पासुन आहे.
कॉलेजसाठी बेळगावला भावंडासह मामांच घर होत तिथ बिर्‍हाड केल. हे घर भटचाळ नावाच्या प्रसिद्ध चाळीत होत.हा सिनेमा पहाण्याचा सुवर्ण काळ होता.आमच्या शेजारी राहणारे देशपांडे रिझ टॉकिजचे मॅनेजर होते.रिझच्या मालकांची बेळगावात चार थिएटर होती त्यामुळे सौ. देशपांडेना बेळगावातील सर्व थिएटर मधे पास असायचा. श्रियुत देशपांडेना सिनेमात रस नसायचा आणि वेळहि नसायचा.मग आम्हाला त्या सिनेमाला बरोबर न्यायच्या.त्यांच्या घरी रसरंग यायचा. त्याच्या वाचनाने गोष्टीच्या पलिकडची सिनेमाची अंग समजायला लागली.नायक नायिका कथा याबरोबर दिग्दर्शक, गीतकार संगीतकार कोण आहेत हेही महत्वाचे वाटायला लागले.सलिल चौधरी मदन मोहन हे संगितकार अधिक आवडु लागले.राजकपुरच्या सिनेमातिल शैलेन्द्रची गीत, शंकरजयकिसनच संगीत ,देवानंदच्या सिनेमातला एसडिंचा वाटा अशा बाबीहि लक्षात यायला लागल्या.येथे दिग्दर्शक दिसतो, सारख्या गोष्टी सिनेमा पहाताना महत्वाच्य वाटायला लागल्या.आवडीच्या नटातल राजेन्द्रकुमारच स्थान घसरल.गुरुदत्त प्रथम क्रमांकावर आला. गोष्ट सांगण मात्र चालुच होत. गोष्ट सांगुन झाली कि मगच सिनेमाचा अस्वाद घेण पुर्ण व्हायच.ऐकणारेही भेटायचे. उलट शोभानी गोष्ट सांगितली की सिनेमा बघायची गरज नाही अस अनेकाना वाटायच.
बेळगावला आल्यावर गोष्ट ऐकणारी माणस बदलली.समोर राहणार्‍या भडगावकर काकु हक्काच गिर्‍हाइक.मोठ्ठा प्रपंच सतत कामात असायच्या.३ तास सिनेमा पहायला वेळ घालवण्यापेक्षा माझी गोष्ट ऐकण त्याना चांगल.वाटायच.कारण त्यांच काम चालु असताना त्यांच्या मागेमागे फिरत मी गोष्ट सांगायची.औरत,आरती, दुल्हा दुल्हन हा राजकपुरच्या सिनेमात फारसा उल्लेखला न जाणारा.सिनेमा,उपकार,पाठलाग किती नाव सांगावी त्याला सिमाच नाही.गोष्ट ऐकणार्‍याना हव तिथ हसु,रडु आल नाही भिति वाटली नाही अस व्हायच नाही.याबाबत भडगावकर काकु आदर्श श्रोता. वहिदाच्या खामोशीची गोष्ट सांगता ना तर मलाच रडायला येत होत ही गोष्ट अनेकाना सांगितली प्रत्येकजण रडायचे.
गोष्ट सांगितलेल्या दिवशी आमच्या स्वयंपाकाला सुटी असायची. काकुंच चविष्ट जेवण मिळायच.अर्थात इथ हिशोब नसायचा खुशीचा मामला होता.
माझ अति सिनेमा पहाण कोणा हितशत्रुनी माझ्या वडिलां पर्यंत पोचवल.मग आमच कॉलेजच्या रिडिंगरुममध्ये अभ्यासाला जाण सुरु झाल.पण तिथ गेल्यावर सुरुवातीचा वेळ फिल्मफेअर,स्टारडस्ट वाचनात जायचा सिने क्षेत्रातील विविध प्रकरण,एकमेकातील रुसवे फुगवे याबाबतच ज्ञानहि वाढायला लागल.वैजन्तिमालाचा नृत्य नसलेला एकमेव सिनेमा,सर्वाधिक कपूर लोकांबरोबर कामे करणारी नटी कोण असे सामान्य ज्ञानहि वाढु लागले.
गोष्ट सांगताना हाही मसाला वाढला.कॉलेजच्या मैत्रिणि या गोष्ट ऐकणार्‍या श्रोत्रु वर्गात वाढल्या.दिलिपकुमार आणि वैजयंतीमाला असलेला संघर्ष पाहिला.अतिशय गुंतागुंतीची कथा खुन किती पडले याला गणतीच नाही.याची गोष्ट आमच्या वर्गातल्या बर्वेला ऑफ तासाला सांगायला सुरुवात केली.पुढचा तास सुरु झाला. संपला तरी आम्हाला पत्ताच नाहि. लेडिज रुमचा शिपाई रुम बंद करायला आला आम्हाला बाहेर काढल.मग आम्ही घरी आलो पुरी गोष्ट ऐकली आणि मगच बर्वे तिच्या घरी गेली.घरी तिला बोलणी खावी लागली.
या काळात आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे घाल घाल पिंगा वार्‍या लिहिणारे निकुंब सर मराठी शिकवायला आले.साहित्य, कला, निसर्ग सर्वांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आली..त्यांच्याकडुन समिक्षा शिकताना अस्वादक समिक्षा कशी असावी याची जाण आली.
'शारदिचिये चंद्रकळेमाजी अम्रुतकण कोवळे
ते वेचती मनोमवाळे चकोर तलगे."
हे ज्ञानेश्वरांचे बोल समिक्षा कशी असावी यासाठी ते सांगायचे.इतकी हळुवार अस्वादकता आली नाही तरी अनेक श्रद्धा स्थानाना धक्का बसला.वाइट चांगल उत्तम यातला भेद समजायला लागला.फुकटचे मिळतात म्हणुन कुठले हि सिनेमा पहाण बंद झाल.आधी इथे दिग्दर्शक दिसतो सारखी भारी वाटणारि दृष्ये आता बटबटीत वाटायला लागली.गोष्ट सांगताना रडवण्यात.आनंद वाटेना.प्रभातचे कुंकु, माणुस वगैरे सिनेमा मॅटिनिला पैसे देउन पाहिले. गोष्ट आणि उत्तम गाणी असणारे सिनेमा मात्र इतर दोष पत्करुनही आवडत होते.
लग्न होउन मी पुण्यात आले. माझ्या पतींना सिनेमाची अजिबात आवड नव्हती गोष्टी ऐकण तर त्याहुन नाही.पहिले काही दिवस ते माझ्यासाठी सिनेमा पहायला यायचे पण पहिल्या अर्ध्या तासात चक्क घोरायला लागायचे.सिनेमा पहाण्यातला उत्साहच संपायचा. हळुहळु ओळखी झाल्या पती ऑफिसला गेल्यावर मैत्रिणिबरोबर सिनेमा पाहण सुरु झाल.गोष्ट ऐकायलाही हक्काच गिर्‍हाइक मिळाल.ते म्हणजे आमच्या घर मालकांची मुलगी चित्रा. ती लहानपणी सारखी आजारी असायची.मग तिचा वेळ घालवायला तिच्याशी पत्ते खेळण आणि गोष्टी सांगण चालायच.आता तिचा मुलगाही नोकरीला लागला पण माझ्या गोष्टी सांगण्याच्या आठवणी अजुनही तिच्या मनात ताज्या आहेत.मध्यंतरी ती भेटली तर म्हणाली' "तु सांगितलेल्या' दो चोर' आणि 'कटि पतंग'च्या गोष्टी आजही मला आठवतात. गाण्यासह.मी ते कधिही पाहिले नाहीत पण मला पाहिल्यासारखेच वाटतात."
खर तर 'दो चोर'च्याबाबत तनुजाबरोबर त्यात काम करणारा नायक कोण होता हेही मला आज आठवत नाही.
माझी भावंड, मैत्रिणी,शेजारी अशा अनेकाना मात्र माझ्या सिनेमाच्या गोष्टीच्या आठवणी आहेत.माझ सिनेमाप्रेम हळुहळु ओसरत गेल.मुल संसार नंतर नोकरी, पीएचडी यात मी पुरती बुडुन गेले.नंतर सिनेमा पाहिले तरी गोष्टी ऐकणार कोणी मिळाल नाही.अगदी हल्लीहल्ली 'वासुदेव बळवंत' सिनेमाची गोष्ट नातवाला सांगितली पण पुर्वीसारखी तीन तीन तास नाही सांगता आली. पण जुन्या आठवणी येत राहतात. गाथाचित्रशती स्पर्धेच्या निमिताने काही आठवलेल्या या आठवणी. स्पर्धेसाठी म्हणून फारशी मनाजोगती लिहिता आली नाही ही "गोष्ट सांगण्याची गोष्ट" . पण लेकीच्या आग्रहासाठी आणि माबोकरांशी शेअर कराविशी वाटली म्हणुन लिहिले. आठवणींनी दगा दिल्याने काही माहितीच्या चुका झाल्या असल्यास दुरुस्त करायला तज्ञ मायबोलीकर आहेतच.

No comments:

Post a Comment