माझे दूरस्थ विद्यार्थी - प्रा.माया नलावडे
मी विजय भांडार मध्ये खरेदी करत होते.आणि मॅडम असा मागून आवाज आला.मी चमकून मागे पाहिले.माया नलावडे हाक मारत होती.माया माझी विद्यार्थिनी. आनंदाने तिचा चेहरा फुलला होता.ती शेजारच्या दुकानात खरेदी करत होती आणि तेथे तिला माझा आवाज आला.भर रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या त्या दुकानात आणि शेजारच्या दुकानात खूप गर्दी असते त्यातून तिने माझा आवज ओळखला याचा आनंदही झाला आणि मी किती मोठ्या आवाजात बोलत होते हे जाणवून थोडी खजीलही झाले. स्वत:ची खरेदी अर्धवट सोडून ती आली होती.मी २००७ ला टिळक विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर खूप वर्षांनी आमची गाठभेट होत होती.आम्ही दोघी खरेदी सोडून कितीतरी वेळ बोलत होतो.ती डीएसडब्ल्यू झालेले मला माहित होते त्यानंतर ती उच्च द्वितीय श्रेणीत एमएसडब्ल्यू झाली.यासाठी कुटुंब न्यायालय आणि कामायनी मूक बधीर विद्यालय येथे फिल्डवर्क करून उत्तम अनुभव मिळवला होता.बाया कर्वे अभ्यास केंद्रातून Child Abuse - Prevention & Cure हा अभ्यासक्रमातती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती.महाराष्ट्र शासनाचा MSCIT अभ्यासक्रम आणि बी.एड. ही केले होते.एकुणात बी.ए. झाल्यावर तिने विविध अभ्यासक्रम करण्याचा धडाका लावला होता.टिळक विद्यापिठात ती फिल्ड सुपरवायझर फॅकल्टी म्हणून काम करत होती.जेथे शिकली तेथेच ती आता प्राध्यापक आहे. हे सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलला होता.विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्य केले.
इतर सह विद्यार्थ्यांनाबद्दलही तिने बरीच माहिती पुरवली प्रत्येकजण आपापाल्या क्षेत्रात पुढे गेले होते.फोनची देवाणघेवाण झाली.यानंतर Whats app वर आम्ही भेटू लागलो.इतर मैत्रिणींचे तिने फोन पाठवले.तिची प्रगतीही कळू लागली. आता सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एम.एड.झाली आहे.पीएचडी करण्याची तिची तयारी चालली आहे.करोना काळात तिने विद्यापीठासाठी व्हिडिओ लेक्चर दिली.एक दिवशी टिळक विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निघालेल्या गौरव ग्रंथात तिचे यशस्वी माजी विद्यार्थिनी म्हणून आलेले मनोगत तिने पाठवले.बरोबर व्हाईस मेसेज होता.आज पर्यतच्या वाटचालीत तुम्ही विद्यार्थ्यांना करंगळीला धरून,धरून चालवले आणि तीच पावती आज पाठवत आहे.यात आपला सिंहाचा वाटा आहे असे सांगत तिनी आभार मानले होते.खरे तर तिचे कष्ट,जिद्द यात महत्वाची होती.
काही मोजक्या मनोगतात तिची निवड झालेली पाहून मला ही तिचा खूप अभिमान वाटला.तिचा बॅंकबेन्चर ते प्राघ्यापक हा प्रवास शिक्षक म्हणून मला निश्चितच सुखावणारा होता.तिच्याविषयी केसरीमध्ये २००५ साली लिहिलेला लेख येथे देत आहे.तो वाचल्यावर तिची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी वाटेल
"माया
नलावडे मुक्त मधून पदवीधर होऊन तीन वर्षे उलटून गेली.आता ती पुणे
विद्यापीठातून एम.ए. ही झाली आहे पण कोणत्याही कामासाठी आम्ही तिला हक्काने
बोलावतो. तीही हजर होते. तेही कामाचा व्याप सांभाळून. ती दिवसभर ट्युशन
घेते, मराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवते, तिच्या शाळेच्या शिक्षकांना आणि
तिला शाळेपासून ओळखणाऱ्यांना मात्र हे अजिबात खरे वाटणार नाही. कारण
त्यांच्या मनात तिची बॅकबेंचर, शाळा बुडवणारी, अभ्यासात रस नसणारी अशीच
प्रतिमा आहे. मुक्त विद्या केंद्रात बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांत आर्थिक
परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्यांचे प्रमाण अधिक असते. माया मात्र याला
अपवाद होती. अत्यंत सुस्थितीतील कुटुंब. घरातले सर्व उच्चशिक्षित, हिला
मात्र शिक्षणात अजिबात रस नव्हता. खेळात मात्र विशेष रस. कबड्डीमध्ये
आंतरशालेय स्पर्धात भाग घ्यावयाचा त्यासाठी वेळोवेळी गावाला जावे लागे.
त्यामुळे शाळा बुडे पण मायाला त्याचे फारसे दुःखही नव्हते. अभ्यासात मागे
असलेल्या मायाने खेळात मात्र खूपच प्रगती केली. कबड्डी व सॉफ्टबॉल ची तर ती
राष्ट्रीय खेळाडू होती. विशेष कामगिरीबद्दल दोनदा महापौर पदकाचा मानही
मिळाला.
सगळे कसे छान चालले होते आणि १९८८ मध्ये वडिलांचे निधन झाले. खेळ,
शिक्षण सर्वांनाच पूर्णविराम मिळाला. वास्तवाचे चटके बसायला लागले.
आजूबाजूच्या मराठी मुलांना मराठी भाषा शिकवण्याचे काम सुरू केले. दिवसभर
वेगवेगळ्या वर्गांना शिकवायची. पाहता पाहता दहा वर्षे गेली. तिच्या
विद्यार्थिनी पुढे उच्च शिक्षण घेत कोणी डॉक्टर झाल्या, कोणी इंजिनियर
झाल्या, प्राध्यापक झाल्या. त्यांची शिक्षिका मात्र पदवीधर ही नव्हती.
मायाला हळूहळू याची खंत वाटायला लागली. दहावीनंतर पंधरा वर्षाची गॅप
झालेली. ट्युशन्स होत्याच. पदवीधर होण्याची इच्छा मनातच राहिली.
अशातच
टिळक विद्यापीठाची जाहिरात पाहिली व प्रवेश घेतला. प्रवेश घेतला खरा पण आई
आजारी पडली. दिवस रात्र आईची सेवा करणे चालू झाले. पण आता मायाने पदवीधर
होण्याचा चंगच बांधला होता. बॅकबेंचर माया आता बदलायला लागली. शंका
विचारायला लागली. उत्तरे द्यायला लागली. तिची उपस्थिती आता शंभर टक्के
होती. वाचनालयात येऊन ती अभ्यास करायची. मुक्त मध्ये सीनियर विद्यार्थिनी
म्हणून सर्व प्राध्यापकांना ती माहिती झाली. शालेय जीवनातील माया आणि
मुक्त मधली माया यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. सर्व शक्यता असूनही
तिला शिक्षणाचे महत्त्व समजले नव्हते. आता मात्र ते पुरते उमगले होते. दोन
वर्षे यात गेली. घर, अभ्यास, ट्युशन्स, आईची सेवा असा अति कामाचा व्हायचा
तोच परिणाम झाला. तिसऱ्या वर्षात तिला स्पोंडीलाइटिसचा त्रास सुरू झाला.
डॉक्टरांनी लिहिणे, वाचणे काही काळ बंद ठेवायला सांगितले पण तिने या
सर्वांवर मात केली. ती पदवीधर झाली. आता तिला शिक्षणाची गोडी लागली होती
तिने पुणे विद्यापीठात एम.ए.साठी प्रवेश घेतला. ती सेकंड क्लासमध्ये एम.ए.
झाली. नातेवाईकांना घरच्यांना खूप आनंद झाला. दूर शिक्षणाद्वारे झालेले
तिचे बी.ए. अनेकांना फार महत्त्वाचे वाटत नसावे. कदाचित माया बी.ए. करते
म्हणजे काहीतरी थातूरमातूर असेल असा समज ( गैर )असेल पुणे विद्यापीठाच्या
एम. ए. नी मात्र त्यांचा समज दूर झाला.
दूर
शिक्षणाबाबतचे समाजातले गैरसमज पाहून मायाला वाईट वाटते. आमचे नाणे खणखणीत
आहे असे ती सर्वांना ठासून सांगते. तिच्या विद्यार्थ्यांना आता ती जास्त
चांगले शिकवू शकते असे तिला वाटते. मुक्तच्या एम. एस. डब्ल्यू. ला ती आता
प्रवेश घेणार आहे. स्वतःचे नातेवाईक व इतरांनाही प्रवेश घेण्यास ती
प्रवृत्त करते. त्यांना मार्गदर्शन करते. मुक्त विद्या केंद्राच्या विविध
उपक्रमाला आम्ही तिला हक्काने बोलवतो. घरचे काम असल्यासारखे तीही येते.
प्रथम वर्षाचे विद्यार्थी थोडे घाबरलेले, साशंक असतात. माजी
विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आम्ही बोलावतो याचा चांगला
परिणाम होतो. अशा विद्यार्थ्यात पहिले हक्काचे नाव मायाचे असते. सतत हसत
असणारी माया अनुभव सांगते तेव्हा तिच्या शरीराचा कणकण बोलत असतो. तिचे बिन
मुखवट्याचे हृदयापासून केलेले कथन विद्यार्थ्यांना भावते. निवासी संपर्क
सत्रात योगासने शिकवायला ती येते. हे सर्व कोणतेही मानधनाच्या
अपेक्षेशिवाय. शिक्षण घेणे आणि जे मिळवले ते पुढच्या पिढीला देण्याची
प्रक्रिया तिला इमाने इतबारे अखंडपणे चालू ठेवायची आहे. गुरु ऋणातून उतराई
होण्याचा हा उत्तम मार्ग आहे असे तिला वाटते. ती ज्यांना शिकवते ते
विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतात तेव्हा तिला कृतार्थ वाटते. आणि
मायाचे हे घडणे फुलणे पाहून आम्हाला कृतार्थता वाटत"
No comments:
Post a Comment