Friday 20 November 2020

आनंदी वृद्धत्व - ३

                          आमच्यासाठी रोलमॉडेल असणार्या व्यक्तींच्याबद्द्ल येथे लिहिण्यातील माझा उद्देश येथे स्पष्ट करावा असे वाटते. मी निवृत्तीपर्यंत अनेक नकारात्मक भावनांनी ग्रासलेले होते.छोट्या गोष्टींचे भयंकरीकरण करणे,छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे,मुलींच्या शिक्षणाची,लग्नाची या कौटुंबिक काळज्या होत्याच पण काळजी करणे हा स्थायी भाव होता.कोणताही विषय त्यासाठी चाले.न्यूनगंड होताच.मनोविकारतज्ञांची मदत घेण्यापर्यंत सगळे गेले माझ्या नवर्याला पार्किन्सन्स झाल्यावर तर चिंता काळजी गैरसमज यातून अनेक चुका केल्या पार्किन्सन्स मित्रमंडळ या गटात सामील झाल्यावर परिस्थिती बदलली.आजारासह आनंदी राहणारी माणसे भेटली.त्यांच्याबरोबर आम्ही बी घडलो.ही प्रक्रिया हळूहळू झाली.आमच्या आयुष्यात आलेल्या अशा माणसाना माझ्या कुवतीनुसार आपल्यापर्यंत पोचवल्यास अनेकांना त्याचा फायदा होईल असे वाटले.

https://parkinson-diary.blogspot.com/2014/03/blog-post_29.html

  आनंदी वृद्धत्व -३

                                        सुमनताई जोग आणि अरुण जोग हे आमच्या आयुष्यात आलेले आणि आमचे रोल मॉडेल बनलेले जोडपे.समृद्ध सहजीवन आनंदी वृद्धत्व कसे असावे याचा वस्तुपाठ त्यांचे जगणे पाहताना मिळाला..शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात प्राध्यापकी केलेले अरुण जोग आणि सुमनताई, अरुण जोग याना झालेल्या पार्किन्सन्समुळे आमच्या परिवारात सामील झाले.

अरुण जोग शांत,सौम्य,मितभाषी,ऋजू व्यक्तिमत्व ,चेहऱ्यावर हसरा भाव, पार्किन्सन्सलाही  त्यांनी हसत हसत स्वीकारले.सुमन ताईनाच हा खेळाडू,सशक्त माणूस याला कसा पार्किन्सन्स झाला म्हणून वाईट वाटले होते. .खणखणीत आवाज,विचाराची स्पष्टता,रोकठोक बोलण,बोलण्याला कृतीशीलतेची जोड.ही सुमनताईंची वैशिष्ट्य.सत्तरी ओलांडलेल्या  जोग पती पत्नींना भेटायला आम्ही  त्यांच्या घरी  गेलो त्या आधी सभामधून भेटी झाल्या होत्या.घरभेटीत ते अधिक उलगडले.तरुण वयातच  सुमनताईना संधीवाताने गाठले. अरुण जोग शुभंकर ( केअर टेकर )म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.आता सुमनताई शुभंकर बनून त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.आमच्या गप्पात त्यांचा कुठेही तक्रारीचा स्वर, कुरकुर नव्हती.खर तर बोलण्याचे काम मी आणि सुमनताईच करत होतो आणि आमच्या दोघांचे नवरे.मधून मधून अत्यावश्यक तेवढेच बोलत होते.
                        B.E. Electrical आणि M.E.Mechanical असलेले जोग पुना इंजिनिअरींग कॉलेजमधून मेकॅनिकल विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून निवृत्त झाले.मंडळात मात्र ते आमच्यापैकीच एक असत.सुमनताइनीही .शासकीय अभियांत्रिकी विद्यालयातून सिव्हील इंजिनिअर झाल्या.त्या काळात स्त्रियांनी हे क्षेत्र निवडणे धाडसाचे होते.नंतर काही काळ त्यांनी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात नोकरी केली आणि मुलगा झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णयही घेतला.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही धाडसी वृत्ती कायम राहिली.

                        मित्रमंडळाची सभा असो,मेळावा असो की सहल असो ते आवर्जून उपस्थित असत.सुमनताइंचे नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले त्यावेळी काही दिवस त्या सभांना येऊ शकल्या नाहीत,पण जोग मात्र सोबत शोधून सभांना उपस्थीत राहिले.मुलगा आणि मुलगी परदेशात राहणारे.गरज पडली कि तातडीने हजर राहणारे. नातेवायिक आणि मित्रमंडळीचा मोठ्ठा गोतावळा होता.त्यांच्या घराचा वरचा हॉल तेथे जेकृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानावर विचार करणारा अभ्यासगट चाले.जे कृष्णमुर्ती यांची पुस्तके,सीडीज सर्वांसाठी उपलब्ध होती.कृष्णमुर्ती यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खडकवासला येथे त्यांनी बैठे घर बांधून घेतले होते..अरुण जोगाना यात रस नव्हता पण विरोधही नव्हता.परस्पर विरोधी स्वभावाच्या या जोडप्यात नात्याची वीण मात्र घट्ट होती.

                        त्यांचा हॉल अनेक चांगल्या कामासाठी उपलब्ध असे. हृषीकेश पवार यांना पार्किन्सन्स पेशंटसाठी मोफत नृत्योपचार करण्याची इछ्या होती पण जागेचा प्रश्न होता.जोग पती पत्नींनी आपली जागा देवू केली.जोग स्वत:ही नृत्य वर्गात  सामील झाले.त्याचा त्यांना फायदा होत होता म्हणून ते खुश होते.नृत्योपाचारातील सहभागींसाठी तर अरुण काका म्हणजे जवळचे मित्रच.२०१३ मध्ये अरुण जोग यांचे निधन झाले.सातत्यने बरोबर राहणाऱ्या सुमनताई हे कसे सहन करतील असे वाटले.पण त्यांनी जोडीदाराचा मृत्यू अत्यंत समंजसपणाने स्वीकारून पुढील वाटचाल चालू देखील केली.नृत्यवर्गाच्या सर्वाना अरुण काका नसताना तेथे क्लास ही कल्पनाही सहन होणारी नव्हती.पण सुमनताइनी प्रत्येकाना फोन करून सांगितले आणि क्लास तेथेच सुरु राहिला. त्या अमेरिकेला गेल्या तरी हॉलची किल्ली देऊन गेल्या. अमेरिकेला मुलांकडे गेल्यावर.तेथे सेवेसाठी हजर असलेली मुले, नातवंडे, स्वतंत्र खोली अशी लौकिक अर्थाने उत्तम व्यवस्था होती पण सतत कार्यरत असणाऱ्या सुमनताई तेथे रमल्या नाहीत.केअरटेकर,फिजिओथेरपिस्ट, मसाजीस्ट यांच्या सहाय्याने त्या त्यांचे वृद्धत्व तरुणाला लाजवेल अशा जोमाने आपल्याच घरात राहून जगत होत्या,डान्सक्लासमध्ये सहभागी होत होत्या आमच्या सहलीना येत होत्या, आणि त्यांनि उभारलेल्या विविध उद्योगातही सामील होत होत्या..त्यांचे विविध उद्वोग येथे सांगितलेच पाहिजेत.

                             त्यांनी आस्क ( अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्रा)च्या स्थापनेत पुढाकार घेतला.खेड्यापाड्यातील मुलाना गुण कमी मिळाले की इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही.महहागडी प्रायव्हेट कॉलेज परवडत नाहीत.अशा  गरीब मुलाना येथे अत्यंत माफक खर्चात तांत्रिक शिक्षण दिले जाते.प्रत्येक विद्यार्थ्याला काम मिळेल याचीही जबाबदारी घेतली जाते.आस्क्चे ऑफिसही काही दिवस त्यांच्या घरी होते.त्यांच्या मृत्युपूर्वी १/२ वर्षे त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला.तरी वेळोवेळी सल्ला द्यायला त्या होत्याच.विद्यार्थी कमी झाले की इतर  नाउमेद होत पण सुमनताईंच्या  पोतडीतून नवनवीन कल्पना येतच.त्यात सामजिक जाणीव हा गाभा असे.खेड,राजगुरुनगर येथील धरणग्रस्त मुलांसाठी तांत्रिक शिक्षणाची सोय,कोकणातील मुलाना राहण्याची सोय असे उपक्रम असत.हे सगळे करताना वय आजार या कशाचीच अडचण नसे.                 

 त्यांच्या एका नव्या उद्योगाने तर आम्ही अवाकचा झालो.त्यांचा सकाळी सकाळी फोन आला.नेहमीसारखा खणखणीत आवाजात. ऑर्थरायटीसचा सपोर्टग्रुप काढताहेत हे सांगण्यासाठी.हा फोन होता.याची पहिली सभा ११ ऑक्टोबरला भारतीनिवास हॉलमध्ये होणार आहे.याबद्दलची माहिती मंडळाच्या सभेत द्यावी अशी त्यांची इछ्या होती.याची बरेच दिवस आधी पूर्व तयारी चालू होती.घरातून कोणाच्या मदतीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही,जिला  घरातही मदतनिसाची गरज आहे.जिचा एक पाय घरात तर एक हॉस्पिटलमध्ये असतो  अशी स्त्री ८५ व्या वर्षी सपोर्ट ग्रुप चालू करायचा विचार करु शकते हे थक्क करणारेच होते

परंतु तरुणपणीच संधीवाताने गाठलेली छोटीशी कुडी,वाकडी झालेली बोटे,अनेक आजाराने शस्त्रक्रीयानी पोखरलेले शरीर यात कणखर मन वास करत होते.  स्वत:चा आजार जपताना आजूबाजूच्या व्यक्ती,घडामोडी यांचा विचार करणारे विशाल मन,फक्त विचार न करता ठोस कृती करून त्यावर उत्तर शोधण्याची वृत्ती.या कृतीत  त्यांच्यातल्या सिव्हीलल इंजिनिअरने निट भविष्यकालीन आराखडा काढलेला असे. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अध्यापन केल्याने हा आराखडा समोरच्याला पटेलच अशा तऱ्हेने मांडण्याची हातोटी, समोर १५० विद्यार्थ्याना व्याख्यान देत आहेत असा खणखणीत आवाज.नुसत्या एका फोनवर कोणत्याही कामासाठी हजर होतील अशी जोडलेली उत्तम वकूबाची माणसे.या बळावर त्यांनी हे काम उत्तम प्रकारे निभावले.

.गोल्डन एनार्जायझर संस्थेच्या सहायाने त्यांनी या स्वमदत गटाचे अनेक उपक्रम राबवले.तरूण वयात संधिवात झालेल्यांना जगण्याचा उत्साह दिला.सकारात्मक अनुभव लीहीण्यास प्रोत्साहन दिले.त्याना वेबसाईट करायची होती.केअरटेकर साठी एक अभ्यासक्रम राबवायचा होता.असंख्य योजना होत्या.

त्यांच्या नातवाच्या मुंजीला त्यांनी बोलावले होते.त्या नेहमीच अत्यंत नीटनेटकया राहात.मुंजीतही त्या छान नटलेल्या होत्या.उत्साहाने सर्वांशी बोलत होत्या.ओळखी करून देत होत्या.आजाराचा मागमूसही चेहर्यावर नव्हता.

त्यांची माझ्याशी शेवटची भेट डिसेंबरमध्ये आमच्या मंडळाच्या कार्यकारिणी सभेत झाली.
ही मिटिंग त्यांच्या घरी झाली होती.त्या कार्यकारिणीत नसल्या तरी त्यांचे घर आमच्या मिटिंगसाठी सदैव उघडे असायचे.  इंदूरच्या वनिता सोमण या पुण्याला आल्या होत्या त्यांना आम्हाला भेटायचे होते.आम्ही अगदी हक्कानी मध्यवर्ती असलेल्या सुमनताईंच्या घरी मिटिंगच्या वेळीच भेटायला बोलावल.आम्ही सर्व येण्यापूर्वीच वनिताताई आल्या.पण अनेक वर्षांची ओळख असल्यासारखी सुमनताईंनी त्यांचे स्वागत केले. 
दोन महिन्यातच फेब्रुवारीमध्ये त्यांचे निधन झाले.शेवटपर्यंत अनेकांची मदत घेत स्वत:ला आणि संस्थाना सांभाळले त्यांना पालकत्वाची गरज नव्हती त्याच अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या पालक होत्या.    
 



No comments:

Post a Comment