Sunday, 15 February 2026

आंनदी वृद्धत्व - १०

                                                  आंनदी वृद्धत्व - १०

                  हास्यक्लबमध्ये नसरीनचा वाढदिवस साजरा झाला.प्रत्येक जण तिच्याबद्दल भरभरून बोलत होते. तिचे डॉक्टर भाऊ,मुलगा,सूनही बोलले.नेहमी बडबडणाऱ्या नसरीनने मात्र श्रोत्याची भूमिका घेतली होती.चेहऱ्यावर कृतार्थतेचे हसू,पिवळ्या झगमगत्या ड्रेसमधली,रुपेरी केसात पिवळा गुलाब माळलेली नसरीन, 'ही परी अस्मानीची' अशी वाटत होती.अंतर्बाह्य सुंदर,बुद्धिमान,क्रिएटीव,प्रेमळ,खोडकर नसरीन सर्वांनाच आपल्या अगदी जवळची वाटते.

              नसरीनची प्रथम भेट कधी झाली आठवतही नाही.अनेक वर्षे आम्ही एकमेकाना ओळखतो असे वाटते.भिमाले गार्डनमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या.त्यात नसरीनही होती.भेट झाली तेंव्हा तिने सत्तरी पार केली होती हे नक्की. ८१ वर्षाच्या डॉक्टर नसरीन शेख म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा.मन प्रसन्न करणारे थुईथुई कारंजे.तिचे कर्तुत्व,व्यक्तित्व एका लेखात माववणे महा कठीण काम आहे.तिला आत्मचरित्र लिही असे मी म्हणत असते पण ती ते करणार नाही.तिच्यातल्या डॉक्टरला,शिक्षिकेला शैक्षणिक क्षेत्रात काम करायला,त्याबद्दलच लिहायला आवडते.पोस्ट ग्रज्युएट,पीएचडी विद्यार्थ्यांना गाईड करताना,त्यांचे थेसिस तपासताना ती खुश असते.

                  शालेय जीवनापासून अत्यंत हुशार नसरीनने अनेक मेडल मिळवली.तिने बी.जे.मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि Preventive medicine मध्ये एम.डी.केले.आणि व्यवसायात पडण्याऐवजी प्राध्यापिका बनून डॉक्टर घडवणे पसंत केले.आज मान्यताप्राप्त असलेले कितीतरी डॉक्टर तिचे विद्यार्थी आहेत.अनेक National आणि Inter National सेमिनारमध्ये तिने रिसर्च पेपर प्रेझेंट केले आहेत,पब्लिशही केलेले आहेत.

               कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करणारी नसरीन निवृत्त झाली असली तरी अजूनही ती P.A.Inamdar University च्या डेंटल कॉलेज,फिजिओथेरपि कॉलेजच्या पोस्ट ग्रज्युएट विद्यार्थ्यांना शिकवते.केईएम मध्ये मानद प्राध्यापक म्हणून शिकवायला जात असते.रिसर्च प्रोजेक्टमध्ये सहभाग घेत असते.करोना काळातही नातीच्या मदतीने तिचे ऑनलाईन शिकवणे सुरु होते.अनेक सेमिनारना तिला अध्यक्ष म्हणून बोलावतात.एकदा मलाही तिने नेले होते.संस्थेचे अधिकारी,प्राध्यापक,विध्यार्थी यांच्या मनातला तिच्याबद्दलचा आदर पाहून या माझ्या मैत्रिणीचा मला अभिमान वाटला.

                      तिला शैक्षणिक वारसा घरातूनच मिळाला आहे.तिच्या आईचे वडील अलिगढ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते.वडील अग्रीकल्चर कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. १९४७ साली त्यांनी अमेरिकेतून एम.एस.केले.माहेर, सासर दोन्हीकडे बरेच उच्च शिक्षित आहेत.

                   शैक्षणिक वर्तुळातले तिचे कितीही वरचे स्थान असले तरी आमच्या भिमाले गार्डन ग्रुपमध्ये ती गळ्यात गळे घालणारी,आमची सखी असते.सगळे तिला नसरीनदीदी म्हणतात मला मात्र तिला काही दीदी म्हणावेसे नाही वाटत.तरुण,वृद्ध,पुरुष.स्त्रिया,उच्च शिक्षित,निरक्षर सगळेच तिच्या जवळच्या वर्तुळातले असतात.सर्वांची चेष्टामस्करी करणे,हास्यक्लबमध्ये वाढदिवस साजरे केले जातात त्यावेळी त्या व्यक्तीवर उत्स्फूर्तपणे शेरोशायरी करणे हे चाललेले असते.

              हास्य क्लब संपला की तिची मोफत ओपीडी सुरु असते.आपले रिपोर्ट घेऊन कोणीना कोणी तिच्याकडे येते.अनेक प्रतिथयश डॉक्टर तिचे कलीग तरी असतात किंवा विध्यार्थी तरी.डॉ मोहन आगाशे.रंगकर्मी,प्रसिध्द लेखक सतीश आळेकर.यांच्या आठवणी तर ती नेहमी सांगत असते.ती योग्य त्या डॉक्टरकडे जायचा सल्ला देते.

                तिचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नसतो.तिला स्वत:ला नवनवीन कपडे घालायला.त्याला शोभतील अशा बांगड्या,गळ्यात घालायला आवडते.त्यासाठी खरेदी,बार्गेनिंग करायला आवडते.कोठे काय चांगले मिळेल यासाठीही ती सल्ले देते.स्वत:च कपडेही शिवते.नातींचे जुने ड्रेस त्याला मध्ये काहीतरी जोड लावून लेस लावून कुठे साड्यांचे काठ लावून नव्यासारखे बनवते.हे जुन्यापासुन बनवले हे सांगूनही खरे वाटणार नाही.तिचा फॅशन डिझाईनिंगचा सेन्स अफलातून आहे.आता पेंटिंगचा नाद लागला आहे.ड्रेसवर काहीतरी पेंट करते.मला वाढदिवसाला खणाची पर्स करून त्यावर पेंटिंग करून दिले आहे.रिसर्च प्रोजेक्टएवढीच ती या कामात रमते.

               न्युट्रीशस पदार्थ बनवून खिलवायलाही तिला आवडते. शाळेपासून  मित्र मैत्रिणी पुणेरी असल्याने टिपिकल ब्राम्हणी पारंपारिक पदार्थ तिला आवडतात.मैत्रीणीही तिची आवड पुरवतात.माझ्या नवर्यावर तिचा विशेष जीव आहे.त्यांच्यासाठी ती काहीतरी करून पाठवते. ते आता बागेत हास्यकलबला जात नाहीत.आमचे घर बागेच्या समोरच असल्याने तीच मधून मधून भेटायला येते.तीचे पती नइम शेख साहेबांच्या आठवणी निघतात.तीर्थळी आणि शेख साहेब सांगलीच्या वालचंद कॉलेजचे.त्यामुळे मैत्री झाली.ते बजाज मध्ये चीफ इंजिनिअर होते.फिरोदिया साहेबांचे लाडके.कामावर आणि कामगारांवरही त्यांचे प्रेम असायचे.स्वत:च्या डब्याबरोबर कामगारांसाठीही पोळ्या न्यायचे.

              त्यांनी बजाज सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला.बाजाजशी सल्ला देण्याचे काम चालूच राहिले.त्यांचा व्यवसाय  पुढे मुलानी चालू ठेवला नसरीन प्रमाणे तेही कामातून पूर्ण निवृत्त झाले नाहीत.मुलाला सांगेन युक्तीच्या गोष्टी चार हे काम ते करतच असत.या दोघांचे सहजीवन अत्यंत सुंदर होते.एक रोमॅन्टिक कपल असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल.ते हॅंडसम,नसरीन ब्युटीफुल.सर्वार्थाने एकमेकाना अनुरूप. त्यांच्याशी गप्पा आनंददायी असत.विनोद सांगणे, शेरोशायरी करणे,नसरीनचीची फिरकी घेणे हे चाले.त्यांच्या सपोर्टमुळे ती शैक्षणिक क्षेत्रातील कामे करत राहिली.अर्थात तिला ही भरपूर तडजोडी कराव्या लागल्या.

                  मुले सुना असली तरी नसरीन स्वत: जातीने त्यांचे खाणे,पिणे पहायची.बागेतून शेख साहेब वाट पहात असतील म्हणून घाईघाईने जायची.शेवटपर्यंत त्यांची तिने खूप सेवा केली.त्यांच्या  जाण्याने काही दिवस कोमेजली.आता हळूहळू मुळ पदावर येत आहे.मुलगा सून ,नाती यासाठी जातीने लक्ष घालत असतात.अमेरिकेतील मुलगा रोज व्हिडीओ कॉल करतो.

           ती जुन्या हिंदी सिनेमातील नायीकेसारखी दिसते.ताठ चालते.थकलेली मरगळलेली,वृद्ध कधीच दिसत नाही.याचा अर्थ तिला व्याधी नाहीत असे नाही.ती खूप मोठ्या शस्त्रक्रियेतून गेली आहे.ओव्हरीज आणि गर्भाशय काढलेलाच होता.पोटात दुखायचे. निदान होत नव्हते.विविध ठिकाणच्या बायोप्सी केल्या निगेटिव्ह निघाल्या.मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या.अवयवांची मोडतोडं,जोड करावी लागली.डॉक्टरांनी आशा सोडली होती.तिच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे,आनंदी राहण्यामुळे,पथ्य सांभाळण्यामुळे यातून ती बाहेर आली.ती यातून बाहेर येणे डॉक्टर्सनाही आश्चर्याचे वाटले.तिला चेष्टेने ते तू भूत आहे म्हणतात.ती पण मी रात्री येऊन घाबरवणार असे तिच्या खास हसूसह म्हणते.  

                मी अर्धे अवयव देवाला आधीच देवून टाकलेत असे ती हसत हसत सांगते.तिच्या सर्व गोष्टी आनंदाने घेण्यामुळे ती सर्वाना हवीहवीशी वाटते.तिच्यासारखी मैत्रीण मिळाली याचा अभिमान वाटतो.तिच्या फक्त आनंदी वृद्धत्वावर लिहायचे असल्याने लिहिताना हात आखडता घेतला.नसरीन, सखी अशीच आनंदी राहा आणि आनंद लुटत रहा.

                तिच्या नातीचे मध्यंतरी लग्न झाले.तिचे सासरे अब्दुल जब्बार शेख यांनी नसरीनच्या वाढदिवसाला तिच्याबद्दल लिहिले आहे त्यातील काही भाग मला येथे दिल्याशिवाय राहवत नाही.

        " Let's salute and wish doctor Nasreen Shaikh on her birthday today. When Muslim doctors were few and if they were  gents she was the soul lady Muslim doctor 

In those studying was a far fetched dream for girls. Stepping out of their houses was a challenge in the community.She not only stepped out  but created a trail a blazing trail for others to follow. 
She says her mother was behind her success. girls wear frowned upon for working as doctors. Her mother used to accompany her to Sassoon hospital during the nights. She used to sit out of wards where doctor Nasreen worked during the long nights. Upon getting her degree she didn't go for making money by starting clinic instead she opted to teach in the BJ medical college.
Salute such person who was trial blazer and inspiration to thousands of girls especially Muslim girls.
 She turned 81 today and she still working helping students today  with their thesis.
This is called life.Not the life we lead with no aim or utility.
On her birthday I wish her my life along life all the best in health. Even at this age she is so cheerful and bubbly that would be an Envy of many a youngsters."

   

             

                    

Tuesday, 18 February 2025

आनंदी वृद्धत्व - १२

                                                   आनंदी वृद्धत्व - १२

                        श्रीपाद कुलकर्णी यांचा मेसेज आला 'कोथरूडच्या स्मरणिका मी घरी नेऊन देईन स्पीडपोस्टने पाठवू नका'.मंडळाचे पैसे वाचवणे आणि शुभार्थीना भेटणे या हे दोन्ही उद्देश त्यात होते.कोथरूड भागात राहणारे सभासदही बरेच आहेत.

                      दरवर्षी ११ एप्रिल या पार्किन्सनदिनानिमित्त पार्किन्सनमित्रमंडळातर्फे मेळावा आयोजित केला जातो.त्यावेळी तज्ञांचे लेख,शुभंकर शुभार्थींचे अनुभव असा भरगच्च मजकूर असलेली स्मरणिका प्रकाशित केली जाते.कार्यक्रमाला न आलेल्याना ती पोस्टाने पाठवली जाते.कुलकर्णी यांनी स्वत:हून मदत करण्याची तयारी दाखवल्याने आम्ही आनंदित झालो.  त्यांनी आपले काम चोख पूर्ण केले आणि त्याचा रिपोर्टही दिला.त्यांच्या या कृतीमुळे इतर ही काहीजण आम्हीही पुढच्या वर्षी हे काम करू म्हणाले. 

                   कुलकर्णी आता ७७ वर्षाचे आहेत.पत्नी ७४ वर्षाची तिला पार्किन्सन झाला त्याला २७ वर्षे झाली.पगारी केअरटेकर परवडणार नसल्याने तेच तिचे सर्व पाहत असतात.अशावेळी अशी दमवणारी जबाबदरी घेण्याची इच्छा आणि उर्जा आम्हाला थक्क करणारी होती.त्यांचा प्रेरणादायी जीवन परिचय आनंदी वृद्धत्व या सदरातून इतरांपर्यंत पोचवावा असे वाटले. 

                     सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब.वडील खाजगी सहकारी बँकेत नोकरीला होते. आई लहानपणी गेली चार भावंडे.दहावी नंतर मिळेल ती नोकरी सांगतील ते काम,देतील तो पगार अशा तर्हेने नोकरी करत बी.कॉम.शिक्षण करताना केलेल्या नोकरीतून मिळालेल्या पैशातून ही घरी पैसे द्यावे लागायचे. कृषी संशोधन केंद्र सोलापूर येथे लिपिक म्हणून नोकरी केली.पुढे कोल्हापूरला वरिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली.या काळात शिल्पा ताईंशी विवाह झाला.त्याही सामन्य मध्यमवर्गीय घरातून आलेल्या.शेंडेफळ असल्याने लाडात वाढलेल्या.म्हणेल ते मिळत असल्याने थोड्या हट्टी.

                कोल्हापूरला भाड्याने घर घेतले.चार भिंतीशिवाय काहीच नव्हते.लग्नात आलेल्या आहेरातून घर सजवले.पगारातून घरी पैसे द्यावे लागतच.त्यामुळे काटकसर करतच राहावे लागे.कधीतरी गोकुळ हॉटेलमध्ये जाणे.रंकाळ्यावर फिरायला जाणे हीच काय ती चैन.शिल्पाताईंनी पुण्याला बदली करून घेण्यासाठी धोशा लावला.त्यांचा हट्ट पटींनी पुरवला.कृषी विद्यालय पुणे येथे बदली करून घेतली.उरळी कांचन येथे खोली घेऊन राहिले.येजा करायचे.अत्यंत खडतर जीवन होते.शिल्पा ताईनी कोणतीही कुरकुर न करता साथ दिली.

              १९९५ मध्ये थोडी परिस्थिती सुधारली.मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात घर घेतले. सगळे काही सुरळीत आहे असे म्हणेपर्यंत पत्नीला पार्किन्सनने गाठले.आता पार्किन्सनशी लढा सुरु झाला.पत्नीचा पीडी आटोक्यात येण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही.त्यावर स्वतंत्र लेख होईल.काहीच गोष्टींचा उल्लेख करत आहे.

               अनेक पुस्तके वाचून अभ्यास केला.गव्हान्कुराचा प्रयोग वाचून तो प्रयोग सुरु झाला.रामदेव बाबांचे शिबीर केल्यावर प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम सुरु केले.यासाठी पहाटे साडेपाचला उठून टूव्हिलरवर दोघे परमहंस टेकडीपाशी जायचे.अर्धी टेकडी चढून गार वारा आणि सकाळचा अरुणोदय पाहत एके ठिकाणी सतरंजी टाकून प्राणायाम व हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करायचे.घरी आल्यावर गव्हांकुर रस करून द्यायचा.असा रस काढणे ही अत्यंत किचकट आणि दमवणारी प्रक्रिया आहे.नंतर विविध भाज्यांचे सूप करून द्यायचे.ऑफिसला जायचे.संध्यकाळी पुन्हा परमहंस टेकडीवर फिरायला जायचे.असे ६/७ वर्षे केले.अनेक प्रयोग करत शेवटी फक्त अलोपाथीवर स्थिर झाले.   

                   पत्नीला पान्न्शीच्या आताच पार्किन्सन झाला.तेंव्हापासून ते त्यांचा पार्किन्सन न कंटाळता सांभाळत आहेत.अर्थात एकत्र कुटुंब असल्याने घरातील इतरही मदत करतात.तरीही त्यांच्या पत्नीचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यात कुलकर्णींचा मोठ्ठा वाटा आहे.पत्नी शिल्पाताईसह अजूनही सहलीला,कार्यक्रमांना हजर राहतात.त्यांचे न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांनी त्यांचा मंडळात इतकी वर्षे पीडीला छान संभाळल्याबद्दल सत्कार करायला सांगितला होता. आम्ही एका कार्यक्रमात तो केलाही.आपल्याकडे स्त्रिया सेवा करू शकतात.पुरुषांना ते जमत नाही असा एक समज असतो.आमच्या ग्रुपधीलल उल्हास गोगटे,शरच्चंद्र पटवर्धन,विनोद भट्टे,श्रीपाद कुलकर्णी यांनी तो खोटा ठरवला आहे.

               शिल्पाताई अशक्त झाल्या आहेत.परमहंस टेकडीवर जाणे शक्य होत नाही.तरी ते पत्नीकडून संध्याकाळी अनुलोम विलोम आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करून घेतात.सकाळी शाखेत जातात. तेथे इतर कार्यक्रम चालू असले आणि त्यासाठी थांबण्याचा मोह होत असला तरी बायकोचा डोस वेळेत देण्यासाठी लवकर परत येतात.

              सकाळी घरी आल्यावर प्रथम इतर गोष्टी आवरून तिला औषधे काढून दिल्यावर दुधामध्ये राजगिरा टाकून देतात.कमोडवर बसवतात.साधारण अर्ध्या तासाने ती पुन्हा झोपते. दीड तासात स्वत:ची  अंघोळ पूजा आवरतात. पत्नीला उठवून अंघोळ झाल्यावर तिचे केस बांधून, दोघांचे कपडे धुतल्यावर तिला जेवण देतात.अगदी मागच्या वर्षीपर्यंत शिल्पाताई स्वत:चे कपडे स्वत:च धूत असत.ती जेवल्यावर सांडलेले सर्व स्वच्छ करतात.त्या पुन्हा थोडावेळ झोपतात. त्या वेळात पोथी एक अध्याय वाचतात. व नंतर स्वत: जेवतात. असे सकाळचे वेळेचे नियोजन त्यांनीच एकदा सांगितले होते. स्वत:चा सर्व दिनक्रम पत्नीच्या दिनक्रमानुसार त्यांना करावा लागतो.त्या घरातल्या घरात फिरतात.मराठी मालिका,जुने सिनेमा लावून दिले की त्या आवडीने पाहत बसतात. त्या वेळा कुलकर्णी बाहेरची कामे करून घेतात.
                     पत्नीचा व्यायाम करून घेण्याबरोबर ते स्वत:ही व्यायाम करतात.त्यांची एन्जोप्लास्टि झाली आहे.रोज सकाळी १ तास ते प्राणायाम,योगासने सूर्य नमस्कार घालतात. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाला त्यांनी ७५ सूर्य नमस्कार घातले.५ मिनिटे ते वृक्षासनात राहू शकतात.व्यायामाने त्यांनी आपली शुगर नियंत्रणात ठेवली आहे. इतर शुभंकराना ( केअरटेकर ) ते व्यायामाने स्वत:ला तंदुरुस्त ठेवा म्हणजे शुभार्थीची सेवा करणे सुकर होईल असा सल्ला नेहमी देतात.
                 ७५व्या  वर्षी त्यांनी स्वत:च केलेल्या संकल्पानुसार वनवासी कल्याण आश्रम या संस्थेस पाच लाख साठ हजार देणगी मिळवून दिली.अशा देणग्या मिळवायच्या तर किती वणवण करावी लागते.नकार झेलावे लागतात हे सर्व जाणतातच.पत्नीची सेवा करताना अशा अनेक लष्कराच्या भाकर्या ते भाजत असतात. 
 
                  त्यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली.तेंव्हा त्यांनी लिहिले,"तिने दिलेल्या साथीचे मला नेहमी स्मरण होते.त्यामुळे तिला आता माझी गरज असल्याने तिला जास्तीत जास्त आनंद देण्याचा मी प्रयत्न करत आहे.इतरांना शिल्पाताई यांच्या नशिबाचा नक्कीच हेवा वाटेल.पार्किन्सनसह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य या पतीपत्नींनी  आचरणात आणून दाखवले आहे.
                    श्रीपाद कुलकर्णी यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आणि कौतुक वाटते.ते आदर्श शुभंकर,हाडाचे कार्यकर्ते,उत्तम वक्ते आहेत.अभ्यासू वृत्तीचे आहेत.वाचून नोट्स काढायच्या इतरांना द्यायच्या ही वृत्ती.विवेकानंद,मासाजीस्ट राम भोसले यांच्यावरील पुस्तकाचे कथन इत्यादी त्यांच्या व्याख्यानाचे विषय आहेत.प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळत नाही.Whats app वर ते सातत्याने काहीना काही पोस्ट टाकतात.त्यांच्या जगण्यातील सकारात्मकता आणि वेगळेपणा त्यातून मनावर ठसतो.प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी कसे राहावे हे शिकवतो.
                आमची शुभार्थी गौरी इनामदार आणि त्यांचे पती त्यांच्या घरी गेले होते.तिनी केलेले निरीक्षण येथे नोंदावावेसे वाटते,"काकांनी त्यांचे आयुष्य पत्नीशी बांधून ठेवले आहे पण जखडून ठेवले नाही.....प्रेम,सेवाभाव,आणि निरपेक्ष वृत्तीने काम करणे हे त्यांच्या आनंदी स्वभावाचे गमक असावे.आम्ही प्रथमच भेटलो. त्यांच्या घरी अर्धा तास होतो पण आम्हीच सकारात्मक उर्जा घेऊन निघालो."
                 


 



Monday, 13 May 2024

अघटित

                                             अघटित

  •               जुनी कागदपत्रे आवरताना माझी कथा असलेले अनुप्रिता मासिक सापडले.एप्रिल १९७४ चे होते.मुल्य तीन रुपये.वार्षिक वर्गणी २५ रुपये.कागद जीर्ण झाल्यामुळे ब्लॉगवर सेव्ह केली.
     
                          रात्रीची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर विशेष गर्दी नव्हती आणि तसेच स्टेशनही लहानच कुठेतरी तुरळक दोन-चार माणसं दिसत होती. आणि सालं घड्याळ ही किती मंद चाललं आहे आता कुठे सव्वा दहा झालेत. मन इतकं अधीर झाले आईकडे पोहोचायला पण चांगली पंधरा मिनिटे आहेत गाडी यायला. एक एक क्षण अगदी युगासारखा वाटतोय गाडी केव्हाही येवो पण मनाला सवड कुठे आहे इतका वेळ वाट बघायला ते केव्हाच धावत पळत आईकडे जाऊन पोहोचते देखील आणि म्हणते आई मी तुझा लाडका श्री आलोय.बनघ किती पैसे घेऊन आलोय. आपण आज सारं कर्ज फेडून टाकू. तुला आता बरोबर घेऊनच जाईन. तुझा शिवण क्लास, शिवण सगळं बंद. आजवर खूप सोसलस आणि कष्टलिस. आता अगदी आरामात ठेवणार तुला आणि आई बरं का तू माझ्या ड्रॉइंगच्या नादावर चिडायचीस त्या नादानेच तर एवढा पैसा मिळवून दिलाय.  ड्रॉइंग मास्तरची नोकरी म्हणून नाराज असायचीस ना आता चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी पण मिळाली खूप खूप सुखात ठेवीन तुला. आईच्या चेहऱ्यावर ओसंडणाऱ्या समाधानाचं हसू पाहून जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.
                                    आईकडे जाऊन येऊन पिसाट मन केंव्हाच नव्या नीटनेटक्या घराचं चित्र बघण्यात रमून गेले. तिथं गेल्यावर आईला काहीही काम करायला लावायचं नाही. धुण्या भांड्याला मोलकरीण, नाना आजोबांसाठी दाई आणि नेसायला चांगली तलम लुगडी घ्यायची. इतके दिवस सतरा कडे फाटकीच लुगडी नेसलीन बिचारीनं. गाडी येण्याची सूचना देणारी घंटा वाजली आणि मी भानावर आलो. डब्यात जागा मिळाली प्रवाशांनी रिकाम्या बाकांवर पथाऱ्या पसरल्या. मीही वरच्या बर्थ वर जाऊन झोपलो. गाडी पोहोचायला सकाळचे आठ साडेआठ तरी वाजणार होते. तोपर्यंत झोप काढावी म्हटलं पण झोप कुठली? मन पिसासारखं हलकं झालं होतं. खरंच दैव फळाला आले होते. वाटलं सुद्धा नव्हतं आयुष्यात इतक्या लवकर इतकी मोठी संधी मिळेल. झोप येत नव्हती पण गत जीवनाचा चित्रपट डोळ्यापुढे तरळत होता. तसा मी चार-पाच वर्षाचा असताना वडील वारले. नीटसा आठवत सुद्धा नाही त्यांचा चेहरा. त्यांना कॅन्सर झाला होता म्हणे. बरेच उपाय झाले ऑपरेशन ही केलं पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. वडील जायचे ते गेलेच. त्यांचे आजारपण आणि ऑपरेशन यासाठी कर्ज तेवढं झालं. माझे वडील म्हणजे पटवर्धन मास्तर सगळ्यांचा तसा आदराचा विषय. नातलगांसाठी आणि मित्रमंडळी साठी खूप केलं होतं त्यांनी. पण अडचणीच्या वेळी सगळे पाठ फिरवून हात झटकून मोकळे झाले. माझी आणि आजारी नाना आजोबांची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईवर. दोन-चार पोती येणार भात एवढेच काय ते उत्पन्न. राहायला घर सुद्धा नाही. तसे इतर भाऊबंद श्रीमंत होते पण आजोबांनी तरुण वयातच जंगीभंगीपणा व व्यसन यात सारं घालून टाकलं होतं. आईचे भाऊ आणि वडील म्हणाले होते "रमा इथं काय राहिले तुझं श्रीला घेऊन चल आमच्याकडे राहायला" पण आईने साफ नकार दिला. आणि माझी आणि नाना आजोबांची जबाबदारी धडाडीने स्वीकारली होती. घरी हात मशीन होती त्यावर दिवस-रात्र शिलाई करायची. आणि एक शिवण क्लास मध्ये 250 रुपये पगारांवर शिवण शिकवायची नोकरी. तसं पाहिलं तर चालकांना जास्त पगार देणं परवडलं असतं पण ते "पटवर्धन मास्तरांची बायको आणि अशी वेळ आली आहे म्हणून नोकरी दिली तशा शिवणाचा डिप्लोमा घेतलेल्या कितीतरी काम करायला तयार आहेत" असं म्हणायचे. शिवाय गावातल्या बायकाही हर घडी मदतीला बोलवायच्या. आई कुणाला नाही म्हणायची नाही. त्या कामातून काही फायदा नसायचा. कपभर चहा दिला तरी मेहरबानी केली असं वाटायचं त्यांना. मी लहान असल्यापासून आईला नुसतं दिवस रात्र राबतानाच पाहिले. अगदी अंगात ताप असतानाही. कर्ज फेडायची जबाबदारी आणि घर चालवायचं तर पैसा तरी पुरला पाहिजे. त्यात नानांचा दम्याचा विकार. औषधाला पैसा आणि बिडीसाठी पैसा सारखा लागायचाच. मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये पण नाना म्हणजे एक बॅदच होती. इतकं वय झालं पण परिस्थितीची जाणीव आई इतक राबून दोन-चार घास घालते त्याबद्दल कृतज्ञता आणि कौतुक तर नव्हतच, उलट त्यांचा त्रास असायचा. आई राबुन घरी येते तर स्वस्थ झोप म्हणून मिळत नव्हती. खोकत खोकत त्यांची कुरकुर सारखी चालायचीच. येणाऱ्या जाणाऱ्यांना बसवून माझे कसे हाल करते, लक्ष देत नाही, चांगल्या डॉक्टरच औषध देत नाही, मी डगळ वाटतो तिला. एकदा उलथून गेलो की हिला नंगा नाच घालायला मोकळीक असं सांगायचे.
    आई सगळ्या कामातून वेळ काढून सरकारी दवाखान्यातल्या भल्या मोठ्या रांगेत उभी राहून नानांचं औषध आणत होती. कोणी काही घरगुती उपाय सुचवले की तेही करून बघायची. मोठ्या डॉक्टरांची बिल परवडायची कशी? रतीबाचे दोन पावशेर दूध म्हणजे नुसते पाणी. नानांना दिवसातून दहा-बारा वेळा चहा लागायचा. आई बिचारी सकाळी एक थेंबभर दूध गळवून काळं कुट्ट चहाचं पाणी प्यायची.  मला आणि नानांना त्यातल्या त्यात जास्त दूध घालून द्यायची. जास्त दूध घेणं तरी परवडलं पाहिजे. नाना कप भिरकावून द्यायचे एवढा खोकून जीव जातोय पण चहा सुद्धा धड करून देत नाही म्हणायचे. नानांच्या जिभेला चमचमीत खायची सवय. पण आता कसं असं करून भागलं असतं? भाताला कधी पातळ भाजी असली तर वरण नसायचं. डाळीतच कसल्या तरी चार दोन फोडी टाकून भाकरीसाठी कालवण भागवाव लागे. आई स्वतः कितीदा तरी नुसतं गटागट पाणी पिऊनच राहायची पण आमचं दोघांचं व्यवस्थित व्हावं म्हणून धडपडायची. पण नाना कधीच तृप्त नसत. आई मला आणि नानांना जेवण ठेवून गेली असली तर नाना सारे फस्त करीत. अर्धी चतकोर भाकरी किंवा घासभर भात ठेवीत आणि म्हणत, "पाहिलं श्री, आपण दुसरीकडे भरपूर खाते. इथेही खाऊन गेलीये पोटभर. तुला आणि मला मात्र एवढं जेवण ठेवले. मला अशी भूक लागलीये पण तू उपाशी राहशील तर तूच खाऊन टाक माझं म्हाताऱ्याचं काय? आईने किती ठेवलं होतं काय ठेवलं होतं मला माहिती असायचं मी फक्त शाळेला जायच्या गडबडीत जेवलेलो नसायचं. आईला तरी किती आणि काय काय सांगून त्रास देणार म्हणून निमुट राहायचो. पण नानांच्या निर्दय हृदयाची व खोटेपणाची एवढी चिड यायची ब्रह्मदेवांनी असं कसं हृदय घडवले तोच जाणे.
                              आई घरी आली की पुन्हा तेच रडगाणं आणि तीच कटकट सुरू म्हणायचे माझा सोन्यासारखा मुलगा तूच मारलास. तो तुझ्याच पायगुणाने गेला. तुला मजा करायला मोकळीक मिळावी म्हणून धड औषधही केलं नाहीस. त्यावर आई एक शब्दही बोलायची. नाही बोचरे बोलणं ऐकून हळूच माझ्या नकळत डोळे टिपायची. मी लहानपणापासून आईचे हेच त्रास बघत आलो. प्रसंगांनी माणसाला जास्त लवकर शहाणपण येत असावं. लहान असल्यापासून वाटायचं लवकर शिकून खूप मोठं व्हायचं, आईला अगदी सुखात ठेवायचं. नानांच्या बद्दल मात्र शेजाऱ्यांकडून त्यांच्या तारुण्यातील एकेक रंगेलपणाचे पराक्रम ऐकून आणि आत्ताच वागणं बघून नुसती चीड आणि तिरस्कार मात्र यायचा. कधी सारखं खोकणार नरड आईला काही  बोलायला लागले की दाबून टाकावे असे वाटे. पण कधी उलट उत्तर सुद्धा द्यायचो नाही कारण आईची ताकीद, "अरे ते मोठे आहेत उलट बोलू नये".
     मी थोडासा मोठा झाल्यावर सकाळी पेपर टाकायला जायचो. थोडेफार पैसे मिळवायचो.  मी लहान वयात राबताना पाहून आईला भडभडून यायचे. पोटाशी धरून रडत राहायची आणि म्हणायची 'तुझ्या वडिलांना किती हौस होती रे मुलांची. तुझ्याबद्दल एवढी मनोरथ करायचे. तुला सुखात, चैनीत ठेवलं असतं मी आभागिनी म्हणून हे पाहण्याची वेळ आली आहे". मी तिचे डोळे पुसून म्हटलं, "आई मी लवकर मोठा होऊन तुला सुखात ठेवीन" ती मला घट्ट मिठी मारून जास्तच रडायची. आईची सगळी आशा माझ्यावरच केंद्रित होती. मी खूप शिकावं असं तिला वाटे. पण इथेही तिचं दुर्दैव आडच आलं. मी तिला वाटायचं तसा हुशार निपजलो नव्हतो. मी तसा शाळेत जाण्यास दुर्लक्ष करत नसे. पण अभ्यास माझ्या डोक्यात शिरायचा नाही. किंबहुना चित्रकलेचे इतके वेड होते अभ्यास करण्यापेक्षा त्याचं जास्त चिंतन चालायचं. मी इतक्या लहान वयात इतकी सुंदर चित्रे काढलेली पाहून मास्तरांकडून कौतुक वाटायचं पण मठ्ठपणाबद्दल शिक्षाही. ड्रॉइंगच्या परीक्षा द्याव्या असं मला फार वाटायचं पण आई परवानगी देणं शक्य नव्हतं ती आधीच ड्रॉइंग चा राग करायची. वही समोर घेतली की अभ्यासापेक्षा चित्र काढणं चालायचं. आई ते बघून चिडायची. आधीच वैतागलेली आणि त्यात दरवर्षी काठावर कसाबसा पास होई. कधी गटांगळी खायचो. आई निराश व्हायची चित्रकला पाहिली की तळपायाची आग मस्तकाला लागायची तिच्या. या चित्रकलेपाई तू अभ्यास करत नाहीस आणि नापास होतोस म्हणायची. कधी पट्टीने झोडपून काढायची. मग तिचे तिला वाईट वाटे. आणि आपणच डोळे पुसत मला जवळ घ्यायची मला मारलं म्हणून. आई बद्दल आलेला राग मग कुठल्या कुठे पळून जायचा. तिची तरी बिचारीची काय चूक होती मी सरळ पास होत जावं अशी अपेक्षा करण्यात. माझ्या अंगात चित्रकला इतकी भिनली होती इतका वेड केलं होतं, कधी कधी वाटायचं माझ्या कलेचे कुणाला कौतुकच नाही.
                               मी एसएससी ला होतो त्यावेळी मात्र रात्रंदिवस अभ्यास केला  अगदी कसाबसा काठावर का होईना पहिल्या वर्षी पास झालो. आईला खुप आनंद झाला. तिला फार वाटे मी खूप पुढे शिकावं पण माझी कपॅसिटी मला माहिती होती. आणि आईला तरी किती दिवस कष्ट करायला लावायचे. गटांगळ्या खात एस.एस.सी. पर्यंत आल्यानं अठरा वर्षे पुरी झाली होती म्हणून गोव्याला प्राथमिक शाळेत अर्ज करून टाकला.
                            नुकतेच गोवा स्वतंत्र झाल्याने बऱ्याच नोकऱ्या मिळत. तेथे एका लहानशा गावात नोकरीही लागली चटकन. गोव्याचा निसर्ग सोबत असताना चित्रकला प्रेम जास्तच उफाळून आलं. आणि इथं चित्र काढण्यावर कुणाचं बंधन ही नव्हतं. या बाबतीत पिंजऱ्यातून उडालेल्या पक्षासारखी गत झाली. भराभर ड्रॉइंगच्या परीक्षा देत सुटलो. शाळा सुटली की दिवसभर चित्रकलेचा ध्यास. हिरवीगार शेत, फेसाळणारा समुद्र, नारळी,पोफळी आणि कुळाघर साऱ्यांनी अगदी वेड करून सोडलं होतं. आईला पैसेही पाठवत असे पण मास्तरकीत पगार किती मिळणार? नानांचा दुखणं पाच सहा वर्षात जास्त झालं होतं. अंग सुजलं होत अंथरुणावर पडून होते. सारे विधी घरीच. सारं आईला करावे लागे.
     मी पैसे पाठवल्यावर आईने नानांसाठी चांगल्या डॉक्टरचं औषध सुरू केलं होतं. आईची इतर काम चालूच होती. मी मधून सुट्टीत जायचो. आईचे हाल बघत नव्हते. आजाराबरोबर नानांचा छळणही चालूच होतं. डॉक्टरांनी वीड्या ओढणं बंद करा म्हणून सांगितलं, तरी धड उडता येत नव्हतं तशात विड्या ओढणं चालूच होतं. पथ्य पाणी काहीच करत नसत. आईला बोचरे बोलणं मात्र नेहमी असे. दुखणं इतकं  विकोपाला गेलो होते की हे वर्ष काढतील असं वाटत नव्हतं. अशा अवस्थेत नानांना टाकून माझ्याकडे आई येण शक्यच नव्हतं. मनात यायचं की नानांची बॅद टळली की आईला घेऊन जाता येईल. थोडा पगार मिळतो त्यातल्या त्यात सुखात ठेवता येईल. खरंच नानांच्या बद्दल काडीचाही ओलावा मनात नव्हता. लहानपणापासून त्यांच्यामुळे खुप सोसलं होतं. गेले तरी देखील डोळ्यातून पाणी आलं नसतं.
                                      माझं नशीब भलतंच बलवत्तर निघालं होतं मी परिश्रमपूर्वक काढलेल्या चित्राला पाहिलं पाच हजाराच बक्षीस मिळालं होतं. मला कल्पना देखील नव्हती पहिलं बक्षीस मिळण्याची. फारच कष्ट घेतले होते आणि त्या चित्रामुळे माझ्याकडे बरेच जणांचं लक्ष वेधलं होतं  एका जाहिरात कंपनीत बड्या पगाराची नोकरीही चालून आली होती म्हणून मी इतका आनंदात होतो. आता कर्ज थोडं थोडं फेडत बसण्यापेक्षा एकदम सारं फेडता आलं असतं. मला मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यामुळे आईला खूप आनंद झाला होता. मी आईला पत्र घातलं होतं सगळी आवरावर करून ठेव मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठीच येणार आहे. नानाला तसेच घेऊन जाऊन त्यांच्यासाठी एक दाई ठेवता येईल. आईला आता कसलेच कष्ट लावायचे नाहीत आता मी आईला सुखी करू शकेन म्हणून वेगळीच धन्यता वाटत होती.
     गाडी पोहोचली त्यावेळी ९ वाजून गेले होते. मला कधी एकदा घरी पोहोचेल असं झालं होतं. लांब लांब टांगा टाकत आपल्याशी हसत निघालो होतो. शेजारचे खटाव दिसले. विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होते पण मला हे असं का पाहतात याची चिकित्सा करत बसायला वेळ नव्हता. चांगल्या ड्रेस मध्ये आणि आनंदात असलेलं बघवत नसेल.  त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघालो कारण त्याचं बोलणं सुरू झालं असतं तर चार तास थांबावं लागलं असतं घरी जायला तेवढाच वेळ झाला असता. वाटेत भेटणारे प्रत्येक जण विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होते. मोठी नोकरी मिळाली बक्षीस मिळालं बघवत नसेल त्यांना. मी नुसतं साऱ्यांशी हसत हसत काय कसं काय म्हणत चाललो होतो. घर कधी येईल असं झालं होतं. गल्लीच्या टोकाला पोहोचलो असेल तोच आमच्या दारात वेगळं दृश्य दिसत होतं. मी डोळे फाडून पाहिलं, नक्की आपल्या दारात ना? मर्तिकेची तयारी होती. ती तीरडी बांधणे चालले होते. शेवटी नाना गेले वाटतं? तरी मी वेळेवर पोहोचलो म्हणायचं. दारात पोहोचलो तर सगळे वेगळ्याच सहानभूतीच्या नजरेने पाहत होते. नाना गेले तर विशेष वाईट वाटायचं कुणालाच कारण नव्हतं कारण त्यांनी इतके दिवस काढले तेच जास्ती. पण अगदी दारातून आज शिरणार तर नानांचा खोकला ऐकू येतच होता. वाटलं भास असेल पण नाही जीवाचे कान करून ऐकलं, तरी होय नानांच्या खोकल्याचाच आवाज. आणखी आत गेलो तर खाली आईला झोपवलेलं होतं वरून चादर घातलेली होती चेहरा ओळखता येणार नाही इतका भाजून विद्रूप झाला होता. जागा आहे की स्वप्नात समजत नव्हते. कुणाकुणाचे काय काय शब्द अर्धवट कानावर येत होते. काल गुळपापडीच्या वड्या करताना स्टो भडकला. रात्रीच तुला तार केली. कोण काय कोण काय सांगत होतं. काही डोक्यात शिरत नव्हतं. माझ्या आवडत्या वड्या मी येणार म्हणून करायला गेली होती आणि मला सोडून गेली. मग नुसतच ओरडून म्हणत होत, "आई अशी का सोडून गेलीस. अशा सुखाच्या क्षणी मी तुझ्या पाया पडायला, तुझ्या मिठीत विसावायला आणि तुझ्या डोळ्यात कृतार्थतेच हसू बघायला इतका उत्सुक झालो होतो. आई बोल ना, तुझा लाडका श्री आलाय. उठ इ! अशी कशी गाढ झोप लागलीये तुला. मी आलोय,उठ  जवळ घे मला." लोक मला बाजूला ओढत होते पण कशाचाच भान राहिल नव्हतं. घशाला कोरड पडली होती. पाय जमिनीवर नाहीत  असं वाटत होतं. सगळं घर गरगर फिरत आहे असं वाटत होतं. ऐकू येत होती फक्त डोक्यात तिडीक आणणारी नानांची धाप आणि खोकला.

Sunday, 17 March 2024

मर्म बंधातली ठेव ही - १०

                                            मर्म बंधातली ठेव ही  -  ९

                         फेसबुक मेमरीत आर्यचा Fancy dress मधील 'कोलगेट पेस्ट' बनलेला फोटो आला आणि मी त्याच्या जुनिअर केजीच्या गॅदरिंगमध्ये पोचले.त्यावेळी तो मंडाले लाईन आर्मी क्वार्टर मध्ये राहायचा. भोसले नगरच्या डेकेअर सेंटर कम केजी स्कूल मध्ये जायचा.त्याच्या गॅदरिंग,ग्रांडपेरंट डे अशा सर्व कार्यक्रमाना आम्ही जायचो.तो नर्सरीत असताना थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही गेलो.कार्यक्रम संपत आला तरी आर्य स्टेजवर येत नव्हता. श्रद्धा पाहायला गेली तर टीचर म्हणाल्या तो स्टेजवर जायला तयारच नाही.आम्ही इतक्या लांबून आलो आणि आमचा विरस झाला असे श्रद्धाला वाटले.आम्ही मात्र इतर मुलांचे कार्यक्रम एन्जॉय केले होते.लेकीचा आणि नातवाचा सहवास मिळाला यांनीही खुश होतो.तो दुपारी झोपला नव्हता आणि त्यावेळी तो झोपेला आला होता असे मला लक्षात आले.

                     दुसर्या वर्षीच्या  गॅदरिंगला आम्ही सकाळीच गेलो मी पुष्पौषधीचे प्रयोग नुकतेच करत होते.त्याला सकाळी पासून लार्च आणि मिम्युलस ही भीती घालवणारी आणि आत्मविश्वास आणणारी औषधे दिली.तो एका ग्रुप डान्समध्ये होता. कसाबसा स्टेजवर आला रडत रडत परफॉर्म करून गेला.मी आधी विंगेत त्याला भेटायला गेले होते.तेथे लहान मुले,पालक,शिक्षक असा एकच गलबला होता.वेगळ्या मोठ्या शाळेच्या हॉलमध्ये   गॅदरिंग होते..मी गेल्यावर त्याने माझा हात घट्ट धरला.त्याला भीती पेक्षा असुरक्षितता वाटते असे लक्षात आले.तिसऱ्या वर्षी मी दोन दिवस आधीच जाऊन राहिले.त्याला आधीच्या औषधाबरोबर असुरक्षिततेसाठी पुष्पौषधी दिली.स्टेजवर बोलायचेही होते.त्याचे पाठांतर छान झाले होते.श्रद्धानी त्याला कोलगेट पेस्ट बनवले होते.मी त्याला दुपारी दिडदोनलाच गोष्ट सांगत झोपवले होते.जाताना तो अगदी फ्रेश होता.मलाच टेन्शन होते.तो ऐटीत स्टेजवर आला I am Colgate हे पहिले वाक्य धीटपणे म्हटल्यावर मलाच हुश्श झाले.पुढचे सर्व निट म्हणून नमस्कार करून तो विंगेत आला.टाळ्यांचा कडकडाट झाला.

             त्यानंतर शाळेत,गणपती उत्सवात त्यांनी कविता,बासरीवादन, गीटार वादन असे अनेक कार्यक्रम केले.इंटरस्कूल क्विज काम्पीटेशन मध्ये शाळेला करंडक मिळवून दिला.हे सर्व माझ्या पुष्पौषधीशिवाय बर का! आता त्याची गगन भरारी चालूच आहे.अशीच राहूदे यासाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

May be an image of 2 people, people smiling and text


                   

   

Thursday, 1 February 2024

मर्म बंधातली ठेव ही - ९

                                                   मर्म बंधातली ठेव ही  -  ९

                     सोबतचे फोटो ओळखता येतात का कुठले आहेत ते? आपल्या पुण्यातीलच आहेत.'आपले पुणे' या फेसबुक ग्रुपमध्ये खूप वर्षापूर्वीच्या पुण्याचे फोटो येत असतात.बदललेले पुणे पाहून गंमत वाटते.हे फोटो ६/७ वर्षापूर्वीचे आहे. पण फोटोत दिसणारे पुणे आता तसे राहिले नाही.बऱ्याच दिवसांनी स्वारगेट जवळच्या ओव्हरब्रिज वरून जाण्याचा प्रसंग आला आणि आर्यने काढलेले हे फोटो आठवले.

                   आठ वर्षाचा आर्य शाळेतून आलेला असायचा.त्याला जेवायला घालून लगेच पार्किन्सन मित्रमंडळाच्या सभेला आम्हाला जायचे असायचे. रिक्षात त्याचे अखंड बडबडी बरोबर अनेक उद्योग चालायचे.त्यातला मोबाईलवर फोटो काढणे हा असायचा.त्याचे फोटो पाहिल्यावर हे पुण्याच्या गजबज असलेल्या ठिकाणचे आहेत असे वाटतच नाही.सुंदर निसर्ग दिसतो. आता त्याच ठिकाणी मेट्रोचे काम चालले आहे.त्याचे दर्शन होते.एकुणात बदलाचा वेग वाढला आहे हे खरे.

 May be an image of horizon, fog and tree

May be an image of fog and tree

May be an image of tree, horizon and fog

                 May be an image of fog, tree and horizon

Thursday, 18 January 2024

मर्म बंधातली ठेव ही - ८

                                         मर्म बंधातली ठेव ही  -  ८

                       डॉ.अविनाश बिनीवाले यांना 'महाराष्ट्र भारतीय शिक्षण संस्थे'चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला.हा समारंभ वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या हॉलमध्ये होता.याच हॉलमध्ये माझा नातू आर्यचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला होता.मला त्याची आठवण झाली.त्याचे बासरीचे गुरु पंडित रमेश गुलानी यांच्या लहान मुलांपासून ८० वर्षांच्या आजोबापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम होता.पंडित गुलानींचा तो लाडका विद्यार्थी होता.त्यावेळी तो नउ वर्षांचा असेल.

                     श्रद्धाला आम्ही दगदग करून कार्यक्रमाला येऊ नये असे वाटत होते पण नातवाचे कौतुक पाहायला जाण्याचा आम्हाला उत्साह होता.पहिल्या तीनचार मुलांचे बासरी वादन झाल्यावर आर्यचा नंबर आला. तो स्टेजवर चढत होता तेंव्हा मलाच धडधडत होते.त्याने अगदी आत्मविश्वासाने दोन गाणी वाजवली एक 'हम होंगे कामयाब' आणि दुसरे 'अजीब दास्ता है ये' टाळ्यांचा कडकडाट झाला.त्यापेक्षाही त्याच्या गुरूंच्या चेहर्यावर दिसणारे कौतुकाचे भाव मोलाचे वाटले. त्याचे नाव पुकारल्यापासून ते भाव होते.

                     अगदी पहिल्या भेटीपासून हे गुरु शिष्य एकमेकांना आवडत होते.बासरी शिकणे हा आर्यचाच निर्णय होता. त्याच्या आर्मी पब्लिक स्कूल मध्ये संगीताच्या तासाला वेगवेगळ्या वाद्यांची ओळख करून दिली होती.आर्य बासरी आणण्यासाठी मागे लागला हे तात्पुरता खूळ असेल म्हणून अगदी खेळातली वाटणारी बासरी श्रद्धाने आणून दिली.आर्यने स्वत:च ट्यून बसवायला सुरु केली.जनगणमन बसवले.याला खरच आवड आहे हे लक्षात घेऊन गुरूंचा शोध चालू झाला आणि मायलेक नेण्या आणण्यास सोयीचे असलेल्या शिवाजी नगरच्या पंडित गुलानिंच्या पर्यंत पोचले.आकाशवाणीचे ते स्टाफ artist होते.निवृत्तीनंतरही आकाशवाणीच्या सामजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात ते सहभागी होत. नेत्रहीन होते.या गिफ्टेड कलाकाराचे  संगीत क्षेत्रात नाव होते. कसे कोण जाणे दोघांचे सूर पहिल्याच भेटीत जुळले.क्लास सुरु झाला.आर्य अनेक गाणी वाजवू लागला.कुणी वाजव म्हटल्यावर आनंदाने वाजवायचा कौतुक होऊ लागले.सोसायटीच्या कार्यक्रमात,शाळेत बासरीवादन होऊ लागले घरातल्यांच्या वाढदिवसाला Happy birthday to you ची धून वाजू लागली.

               सगळे छान चालले होते आणि श्रद्धा गोळीबार मैदानाला राहायला आली.क्लासला लांब जाणे शक्य नव्हते. जवळचा क्लास शोधायचा प्रयत्न झाला.पण आर्यला कोणीच पसंत पडत नव्हते.करोना नंतर गुरुनी ऑनलाईन क्लास सुरु केला.आर्य खुश झाला.पण त्याच्या आनंदावर विरजण पडणारी घटना घडली. १५ जून २० ला त्यांचे करोनाने निधन झाले.आर्यला हे सांगायला धीर होत नव्हता.सांगायला तर लागणारच होते.या छोट्या शिष्याने बासरी वाजवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

            आता आर्य अकरावीत आहे.आयआयटीची तयारी करायच्या मागे लागला आहे.बासरी मागे पडली.माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला Happy birthday to you वाजवणारा आर्यचा व्हिडीओ आला.सुप्त रुपात बासरी जिवंत आहे याचा आनंद झाला.योग्य वेळी ती बाहेर येईल असा मला विश्वास आहे.            

                    

Tuesday, 5 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ७

                                                     मर्म बंधातली ठेव ही - ७

                      अंजली महाजनची तब्येत बरी नव्हती.मी भेटायला गेले होते.तेथे आर्यची आठवण निघाली.त्याचे काय झाले

एकदा दहा साडेदहालाच अंजलीचा फोन आला.आज पावभाजी केले.केशवराव काका, काकुना बोलाव म्हणत आहेत तर तुम्ही येता का? अंजलीचे तीन जिने चढून जायचे माझ्या जीवावर आले होते.पण आमचे बोलणे ऐकून आर्य म्हणाला आज्जी पाव भाजी आहे नको का म्हणतेस जाऊया ना.अंजलीने ते ऐकले आणि ती म्हणाली पहा तुमचा नातूही म्हणतोय,केशाव्रव्ही आग्रह  करत आहेत,तुम्ही याच.आर्यसाठी  पार्किन्सन मित्रमंडळाच्या माझ्या मित्र मैत्रिणी घरच्याच होत्या.शेवटी आम्ही पावभाजी खायला गेलो.

                    अंजलीकडे  तिच्या नातवासाठी ठेवलेले खेळ होते.केशवरावांच्या बरोबर कॅरम खेळून झाले.अंजलीची उर्जा आणि आर्यची उर्जा घर दणाणून गेले होते.केशवराव खुश होते.इतक्यात आर्यचे लक्ष व्हीलचेअरकडे गेले.अंजलीने शंभरीच्या सासू बाईंसाठी कमोड असलेली व्हीलचेअर घेतली होती. त्यांच्यासाठी ती सोयीची होती.त्या ती वापरायला अजिबात तयार नव्हत्या.नवी कोरी व्हीलचेअर तशीच पडून होती.गरज असून व्हीलचेअर वापरण्यास तयार नसलेल्या अनेक शुभार्थीबद्दल आमची चर्चा चालू झाली.

                     उतारवयाच्या अनेकांना व्हीलचेअर पाहिली की निगेटिव्ह फिलिंग येते.कितीही सोयीचे असले तरी ती वापरताना आजार,अवलंबित्व याच भावना प्रकर्षाने येतात.लहान मुले मात्र निरागस असतात.त्यांच्या साठी ते खेळणेच.मी बसू का यावर असे  अंजलीला विचारत आर्य त्यावर बसलाही.घरभर त्यावरून फिरु लागला.

                     अंजलीला त्यांनी वापरत नसाल तर OLX वर विकून का टाकत नाही असा सल्लाही दिला.त्याचा सल्ला ऐकून आम्ही खूप हसलो.आमची व्हीलचेअर बाबतीतील चाललेली गंभीर चर्चा त्याच्या गावीही नव्हती.