Friday, 27 January 2023

मर्म बंधातली ठेव ही २

                                                   मर्म बंधातली ठेव ही  २

                  डे केअर सेंटरमध्ये लहान मुलांकडून विविध कलाकृती करुन घेत असतात.असाच एक आर्यकडून करवून घेतलेला स्टेनग्लास डिझाईन केलेला काचेचा ग्लास होता.जावयाच्या सतत बदल्यामुळे घर बदलावे लागे. कधी कधी आर्मी क्वार्टर मिळेपर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागे.अशी घरे बदलताना खुप सारे समान भंगारात निघे.ही सारी उठाठेव मुलीलाच करावी लागे. एकदा या भंगारात मी हा आर्यने केलेला ग्लास पाहिला आणि लगेच उचलून घेतला.माझ्या घरी आणून ठेवला.त्या छोट्या ग्लासचा वापर कसा करावा समजत नव्हते.शो पीस म्हणून कोठेतरी ठेवला जायचा तो नाजूक ग्लास धक्का लागून पडेल फुटेल अशी भीती वाटायची.माझ्यासाठी तो मौल्यवान होता.एक दिवशी अचानक त्यासाठीची जागा सुचली. संगमरवरी बांधलेल्या देवघराच्यावर जपमाळ घालून तो ग्लास ठेवला.आता रोज देवाला नमस्कार करताना तो दिसतो आणि त्या बरोबर आर्यच्या बालपणीच्या आनंददायी आठवणीही.

May be an image of flower and indoor

Friday, 13 January 2023

सोनीचे पालकत्व

                                                  सोनीचे पालकत्व

                          सोनी मला भेटली 'गोष्ट नर्मदालयाची' या भारती ठाकूर यांच्या पुस्तकात.सोनी सात वर्षाची ती नर्मदालयात शिकणाऱ्या मुलींपैकी  नव्हती. छोट्या दोन मुलीना संध्याकाळी घसरगुंडीवर खेळायला घेऊन यायची.नर्मदालयात दिलेला संध्याकाळचा पोष्टिक आहार बहिणीना खाऊ घालून नंतर स्वत: खाउन परतायची. भारतीताईनी तु का शिकायला येत नाही विचारल्यावर तिचे उत्तर होते, या मुली मोठ्या झाल्या की त्याना पाठवीन.

                    सोनीची आई नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून घर सोडून गेली. सोनीचे वडील थोडीफार कमाई मिळवीत ती व्यसनात घालवीत. घर चालवण्याचे काम सोनी करी. त्यासाठी शेतात कापूस तोडणे,दुसऱ्याच्या गाई गुरांना चरायला नेणे अशी कामे करी.या सर्वात झालेल्या दमणूकिचा विचार न करता छोट्या बहिणीना खेळायला घेऊन येत होती.हे सर्व करून हसतमुख चेहऱ्यानी वावरायची. भारतीताईंनी नर्मदाल्यात आल्यास शिकायला मिळेल आणि काम करावे लागणार नाही असे सांगितले.तेंव्हा बहिणींना जेऊ खाऊ कोण घालेल? हा प्रश्न तिला होता. दारुड्या बापाच्या तावडीतून त्यांचा बचाव करणे हाही प्रश्न होता.दोन्ही बहिणीना घेऊन ये असे सांगितल्यावर माझ्या आज्जीकडे कोण पाहिलं तिला आता काम होत नाही असे तिचे उत्तर होते.स्वत:चे सुख,बालपण सर्वावर पाणी सोडून आज्जीचे आणि सर्व घराचेही हसतमुखाने आपणहून पालकत्व  स्वीकारणारी चिमुरडी सोनी मला भावली.खरे तर 'गोष्ट नर्मदालयाची' या पुस्तकातून भारती ताईंच्या शब्दातून ती नेमकी समजेल.

Friday, 6 January 2023

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे

 

                      फेसबुकच्या कृपेने माझे अनेक दूरस्थ  विद्यार्थी ३०/३२ वर्षानंतर संपर्कात आले.त्यातील एक गौतम ननावरे.या मुक्त पत्रकारावर आज पत्रकार दिनादिवशी लिहावेसे वाटले.२००४ मध्ये मी त्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' या केसरीमधील लेखमालेत लेख लिहिला होता.तो सोबत दिला आहे.त्यानंतर १८ वर्षातील त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भरारीचे दर्शन त्यांच्याशी संपर्कातून आणि फेसबुकवरील पोस्टमधून होत राहिले.

                 त्यांचा झोपडपट्टी ते म्हाडाचे कांदिवलीतील स्वत:चे घर हा प्रवास सहज,सोपा नव्हता तरीही एक आनंदयात्रा आहे.हे करताना स्वत:बरोबर पत्नी, मुले यांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास होईल यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.मुलाना उत्तम संस्कार दिले.स्वत:चे करिअर निवडणे,विवाह याबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले.आंतरजातीय,आंतरधर्मीय,परदेशी कोणताही जोडीदार निवडा अशी मुभा दिली. एक मुलगा कोरा या साईटचा मराठी भाषेसाठी व्यवस्थापक आहे.वडिलांचा पत्रकारितेचा,सामाजाभिमुखतेचा, लेखनाचा वसा तोही चालवत आहे.त्याची पत्नी प्राध्यापक आहे.दुसरा मुलगा फाईव्हस्टार हॉटेलमध्ये शेफ आहे. सद्या ऑस्ट्रेलियात आहे, मुलीनी टुरीझमचा कोर्स केला आहे आणि ती भाग्यश्री ट्राव्हलमध्ये काम करते.पत्नीचे शिक्षण जास्त नसले तरी ती स्वत:च्या पायावर उभे राहील हे पाहिले.तिला स्वत:चा व्यवसाय निवडू दिला.या कोकण कन्येने मासळी विक्रीचा व्यवसाय निवडला.

                 सध्या त्यांची मुक्त पत्रकारिता सोशल मिडीयावर मुक्त संचार करत आहे.विविधांगी वाचन असल्याने कोरावर सामाजिक,राजकीय,शैक्षणिक अशा विविध विषयावर ते लेखन करतात.फेसबुकवरील  लेखही लक्ष वेधून घेतात.निर्वाहाचे साधन असलेली सायकल एक छंद झाली. त्यांच्या फोटोग्राफीचा अविष्कार फेसबुकवर सायकल,मुंबई सकाळ,ग्रामीण जीवन,निसर्ग,कात्रणातील बातमी अशा विविध विषयातून साकार होत आहे.त्यांचे सूक्ष्म निरीक्षण,सामाजिक भान,कलावंताची नजर यातून जाणवते.

                 निवृत्तीनंतर त्यांनी मनसोक्त प्रवास सुरु केला आहे.बस स्थानकावर जायचे मोकळी दिसेल त्या बसमध्ये बसायचे असा unplanned प्रवास ते करतात.तेथील प्रेक्षणीय स्थळे,निसर्ग,जनजीवन यांचे फोटो ते टाकतात.सकाळच्या सायकल राईडमधुनही त्याना फोटोसाठी विषय मिळत असतात.पन्नासी नंतरही त्यांनी सायकलवर बॉम्बे गोवा,इंटरनल गोवा या  ट्रीप केल्या. मुलांनी यासाठी प्रोत्साहन दिले.बोरिवलीपासून खारघर,कान्हेरी गुंफा,गोरेगाव आरे कॉलनी,अशा विविध सहली केल्या.कांदिवलीहून कुलाब्याला ऑफिसलाही ते जात.मुलांच्या दोनचाकी,चारचाकी आल्या तरी सायकल प्रेम संपले नाही.

                   ननावरे विध्यार्थी म्हणून मला तुमचे कौतुक आणि अभिमान वाटतो.

                 पर्यावरण,निसर्गप्रेमी,खुल्या विचाराचा, जुन्या नव्यातील चांगले वेचणारा,जगण्यातील विविध रंगत रंगणारा कलाकार,भरभरून जगणारा आणि इतरांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देणारा संवेदनशील माणूस,उक्ती आणि कृती एकच असणारा अशा या मुक्त पत्रकाराला पत्रकारदिनी भरभरून शुभेच्छा!

                           उत्तुंग भरारी

                        गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)








Friday, 9 December 2022

मर्म बंधातली ठेव ही १

                                              मर्म बंधातली ठेव ही १

                      माझी मैत्रीण तिच्या नातवाच्या Grand parents day ला गेली होती.त्याचे फोटो तिने टाकले होते.ती खूप खुश होती.मला माझ्या नातवाच्या आर्यच्या Grand parents day ला गेले होते त्याची आठवण झाली.नातू आता दहावीत आहे.पण मला अगदी काल परवा घडल्यासारखा तो दिवस आठवतो.त्याचे पाळणाघर आणि नर्सरी एकच होती.छोटी,छोटी मुले आणि त्यांचे आज्जी, आजोबा.वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भारलेले. प्रत्येक आज्जी-आजोबा आणि त्यांचे नातवंड याना बोलावले जात होते आणि त्यांच्या नातवंडानी तयार केलेल्या वस्तू नातवंडाकडूनच भेट दिल्या जात होत्या.एक निळ्या कापडावर फुल आणि पान  पेंट केलेले मोबाईल कव्हर आणि एक लाल रंगाची पिशवी भेट दिली गेली. पिशवीवर नातवाच्या हातांचे रंगीत ठसे घेऊन डिझाईन केले होते.खरे तर हे करवून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते.

                  मोबाईल कव्हर हरवली. एखादा दागिना हरवावा तेवढे याचे दु:ख होते.पिशवी मात्र अजून छान आहे.किती वेळा धुतली तरी लाल रंग आणि डिझाईन अजून हालले नाही.मी जिकडे तिकडे ती घेऊन मिरवत असते.वाचनालयात पुस्तके आणणे,दुध आणणे,बागेत जाणे अशा कोणत्याही कामाला मी तीच वापरते.कोणी विचारो न विचारो मी आवर्जून सांगते याच्यावर हाताचे ठसे आहेत ते माझ्या नातवाचे आहेत. त्यांनी हे पेंट केले आहे.हे सांगताना मीच आठवणीत रमून जाते मला छान वाटते.काही काही जणांना तर दोन तीन वेळा हे सांगितले असण्याची शक्यता आहे.पण मला कोण काय म्हणेल याचे फारसे काही वाटत नाही.मला सांगताना आनंद मिळतो हे महत्वाचे.आर्यच्या अशा कितीतरी छोट्या छोट्या आठवणी माझ्या 'मर्म बंधातली ठेव' आहेत.आता सांगेन एकेक.

May be an image of 3 people and people smiling

Sunday, 13 November 2022

आनंदी वृद्धत्व - ९

                                               आनंदी वृद्धत्व -  ९

                       भाऊराव रामजी कदम यांची आमच्या कुटुंबाशी ओळख झाल्याला २३/ २४ वर्षे झाली.निवृत्तीनंतर त्यांनी शिवशंकर सभागृहात योगासन क्लास सुरु केला. आम्हीही तीर्थळीना पार्किन्सनचे निदान झाल्यावर तेथेच योगासन क्लास सुरु केला.आमच्याच भागात राहणारे आणि त्यात बेळगावचे त्यामुळे लगेच मैत्रीत रुपांतर झाले.तरतरीत,हसतमुख चेहरा,बोलण्यात मार्दव.कोणाशीही सहज मैत्री होईल असेच व्यक्तिमत्व.योगासनाचे क्लास घेणारे सर आले नाहीत तर कदम क्लास घ्यायचे.रोजच्या रोज क्लासहून गेल्यावर कोणती आसने केली. ती कशी करायची,त्याचा उपयोग याची डायरीत नोंद करत.मनापासून समजून घेत.त्यामुळे वर्षभरातच ते शिक्षक होण्याइतके तरबेज झाले होते.त्यांचे शरीर अत्यंत लवचिक. कोणतीही आसने सहज करायचे.आता कदम सर ८४ वर्षांचे आहेत पण आम्ही त्यांना प्रथम पहिले तसेच आहेत.नियंत्रणात असलेला डायबेटीस वगळता तब्येत ठणठणीत आहे.अजूनही सर्व आसने सहजपणे करतात.पुण्यात असतात तेंव्हा आमच्या जवळच्याच बागेत सूर्यनमस्कार ,आसने शिकवताना दिसतात.पुण्यात असतात तेंव्हा असे म्हणायचे कारण दोन मुले, एक मुलगी आणि बेळगावला स्वगृही अशी त्यांची फिरस्ती चालू असते.विशेष म्हणजे पत्त्त्यातील ज्योकर सारखे ते कुठेही सामावून जातात.

                    बेळगावला इंटर सायन्स नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला.पीडब्ल्यूडीमध्ये  नोकरीला लागले.काही दिवस इरीगेशनलाही होते. कोकड,अलिबाग,आटपाडी टॅंक, वीर धरण,रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या.गुणवत्तेत तडजोड नाही यासाठी स्ट्रीक्ट,हव्या तेथे सवलती द्यायच्या.असा त्यांचा कामाचा खाक्या होता.क्लास वन ऑफिसर म्हणून ते निवृत्त झाले.सर्व ठिकाणी अनेक माणसे जोडली. आजही त्या सर्वांशी लागेबांधे आहेत.माणसे जोडणे ही त्यांची खासियत आहे. शिवशंकर सोडून खूप दिवस झाले तरी त्यावेळच्या सर्वांशी संबंध आहेत. आमच्या समोरच्या बागेतही कदम सर्वांचे मित्र आहेत.

                   मध्यंतरी बरेच दिवस ते दिसले नाहीत. आणि दिसले तेंव्हा चेहर्यावरचे हास्य लोपले होते.काहीतरी आघात झाल्यासारखा चेहरा झाला होता.आणि खरेच तसे झाले होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.त्याना सांगताना रडू आवरत नव्हते.त्या बरेच दिवस बेडरीडन होत्या.त्या काळात ते बेळगावला होते.त्यांच्या सेवेसाठी केअरटेकर  मिळत नव्हती.ए टू झेड सर्व मी करत होतो असे ते सांगत होते.माझ्यासाठीही हे धक्कादायक होते.मी त्याना फ्लॉवर रेमेडीतले रेस्क्क्यू रेमेडी दिले.दोनचार दिवसातच ते म्हणाले मला तुमच्या औषधाने बरे वाटत आहे.नातवंडे,मुले, सुना यांच्या सहवासात लवकरच ते पूर्व पदावर आले.              

             त्यांची मुले, सुना सर्व उच्चशिक्षित आहेत त्यांच्याबद्दल सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो.मुलगी कार्व्याला असते. तिने बंगला बांधला.वास्तूशांतीला ते गेले होते.बंगल्याचे, मुलीच्या संसाराचे भरभरून कौतुक करत होते.मुलीसार्खेच सुनांचे ही कौतुक सांगताना ते थकत नाहीत.एक सून एम.ए.डी.एड.तर एक एम.ए.बी.एड आहे.एम.ए.ला तिला डीस्टिंगशन मिळाले आहे. अशी माहिती ते पुरवत असतात.हास्यक्लबमध्ये वाढदिवस साजरे केले जातात.त्यांच्या सुनेची सकाळी लवकर शाळा असते पण त्यापूर्वी तिने सासर्यांच्या वाढदिवसासाठी ५० लोकांसाठी शिरा करून दिला होता.अशा छोट्या छोट्या गोष्टी नातेसंबंधातील घट्ट विण दाखवतात.कुटुंबियातील सर्वांशी मिळून मिसळून वागल्यास कुटुंबीयांनाही वृद्ध हवेसेच वाटतात.आनंद द्यावा आनंद घ्यावा हेच खरे.

              कदम असेच आनंदी रहा आणि आनंद वाटा.

 

                  


                     

 

                  

Thursday, 10 November 2022

माझे दूरस्थ विद्यार्थी - प्रा.माया नलावडे

                                  माझे दूरस्थ विद्यार्थी  -  प्रा.माया नलावडे

                मी विजय भांडार मध्ये खरेदी करत होते.आणि मॅडम असा मागून आवाज आला.मी चमकून मागे पाहिले.माया नलावडे हाक मारत होती.माया माझी विद्यार्थिनी. आनंदाने तिचा चेहरा फुलला होता.ती शेजारच्या दुकानात खरेदी करत होती आणि तेथे तिला माझा आवाज आला.भर रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या त्या दुकानात आणि शेजारच्या दुकानात खूप गर्दी असते त्यातून तिने माझा आवज ओळखला याचा आनंदही झाला आणि मी किती मोठ्या आवाजात बोलत होते हे जाणवून थोडी खजीलही झाले. स्वत:ची खरेदी अर्धवट सोडून ती आली होती.मी २००७ ला टिळक विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर खूप वर्षांनी आमची गाठभेट होत होती.आम्ही दोघी खरेदी सोडून कितीतरी वेळ बोलत होतो.ती डीएसडब्ल्यू झालेले मला माहित होते त्यानंतर ती उच्च द्वितीय श्रेणीत एमएसब्ल्यू झाली.यासाठी कुटुंब न्यायालय आणि कामायनी मूक बधीर विद्यालय येथे फिल्डवर्क करून उत्तम अनुभव मिळवला होता.बाया कर्वे अभ्यास केंद्रातून Child Abuse - Prevention & Cure हा अभ्यासक्रमातती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती.महाराष्ट्र शासनाचा MSCIT अभ्यासक्रम आणि बी.एड. ही केले होते.एकुणात बी.ए. झाल्यावर तिने विविध अभ्यासक्रम करण्याचा धडाका लावला होता.टिळक विद्यापिठात ती फिल्ड सुपरवायझर फॅकल्टी म्हणून काम करत होती.जेथे शिकली तेथेच ती आता प्राध्यापक आहे. हे  सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलला होता.विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्य केले.

                      इतर सह विद्यार्थ्यांनाबद्दलही तिने बरीच माहिती पुरवली प्रत्येकजण आपापाल्या क्षेत्रात पुढे गेले होते.फोनची देवाणघेवाण झाली.यानंतर Whats app वर आम्ही भेटू लागलो.इतर मैत्रिणींचे तिने फोन पाठवले.तिची प्रगतीही कळू लागली. आता सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एम.एड.झाली आहे.पीएचडी करण्याची तिची तयारी चालली आहे.करोना काळात तिने विद्यापीठासाठी व्हिडिओ लेक्चर दिली.एक दिवशी टिळक विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निघालेल्या गौरव ग्रंथात तिचे यशस्वी माजी विद्यार्थिनी म्हणून आलेले मनोगत तिने पाठवले.बरोबर व्हाईस मेसेज होता.आज पर्यतच्या वाटचालीत तुम्ही विद्यार्थ्यांना करंगळीला धरून,धरून  चालवले आणि तीच पावती आज पाठवत आहे.यात आपला सिंहाचा वाटा आहे असे सांगत तिनी आभार मानले होते.खरे तर तिचे कष्ट,जिद्द यात महत्वाची होती.

                काही मोजक्या मनोगतात तिची निवड झालेली पाहून मला ही तिचा खूप अभिमान वाटला.तिचा बॅंकबेन्चर ते प्राघ्यापक हा प्रवास शिक्षक म्हणून मला निश्चितच सुखावणारा होता.तिच्याविषयी केसरीमध्ये २००५ साली लिहिलेला लेख येथे देत आहे.तो वाचल्यावर तिची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी वाटेल

  • "माया नलावडे मुक्त मधून पदवीधर होऊन तीन वर्षे उलटून गेली.आता ती पुणे विद्यापीठातून एम.ए. ही झाली आहे पण कोणत्याही कामासाठी आम्ही तिला हक्काने बोलावतो. तीही हजर होते. तेही कामाचा व्याप सांभाळून. ती दिवसभर ट्युशन घेते, मराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवते, तिच्या शाळेच्या शिक्षकांना आणि तिला शाळेपासून ओळखणाऱ्यांना मात्र हे अजिबात खरे वाटणार नाही. कारण त्यांच्या मनात तिची बॅकबेंचर, शाळा बुडवणारी, अभ्यासात रस नसणारी अशीच प्रतिमा आहे. मुक्त विद्या केंद्रात बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांत आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्यांचे प्रमाण अधिक असते. माया मात्र याला अपवाद होती. अत्यंत सुस्थितीतील कुटुंब. घरातले सर्व उच्चशिक्षित, हिला मात्र शिक्षणात अजिबात रस नव्हता. खेळात मात्र विशेष रस. कबड्डीमध्ये आंतरशालेय स्पर्धात भाग घ्यावयाचा त्यासाठी वेळोवेळी गावाला जावे लागे. त्यामुळे शाळा बुडे पण मायाला त्याचे फारसे दुःखही नव्हते. अभ्यासात मागे असलेल्या मायाने खेळात मात्र खूपच प्रगती केली. कबड्डी व सॉफ्टबॉल ची तर ती राष्ट्रीय खेळाडू होती. विशेष कामगिरीबद्दल दोनदा महापौर पदकाचा मानही मिळाला. 
                      सगळे कसे छान चालले होते आणि १९८८ मध्ये वडिलांचे निधन झाले. खेळ, शिक्षण सर्वांनाच पूर्णविराम मिळाला. वास्तवाचे चटके बसायला लागले. आजूबाजूच्या मराठी मुलांना मराठी भाषा शिकवण्याचे काम सुरू केले. दिवसभर वेगवेगळ्या वर्गांना शिकवायची. पाहता पाहता दहा वर्षे गेली. तिच्या विद्यार्थिनी पुढे उच्च शिक्षण घेत कोणी डॉक्टर झाल्या, कोणी इंजिनियर झाल्या, प्राध्यापक झाल्या. त्यांची शिक्षिका मात्र पदवीधर ही नव्हती. मायाला हळूहळू याची खंत वाटायला लागली. दहावीनंतर पंधरा वर्षाची गॅप झालेली. ट्युशन्स होत्याच. पदवीधर होण्याची इच्छा मनातच राहिली.
                    अशातच टिळक विद्यापीठाची जाहिरात पाहिली व प्रवेश घेतला. प्रवेश घेतला खरा पण आई आजारी पडली. दिवस रात्र आईची सेवा करणे चालू झाले. पण आता मायाने पदवीधर होण्याचा चंगच बांधला होता. बॅकबेंचर माया आता बदलायला लागली. शंका विचारायला लागली. उत्तरे द्यायला लागली. तिची उपस्थिती आता शंभर टक्के होती. वाचनालयात येऊन ती अभ्यास करायची. मुक्त मध्ये सीनियर विद्यार्थिनी म्हणून सर्व प्राध्यापकांना ती   माहिती झाली. शालेय जीवनातील माया आणि मुक्त मधली माया यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. सर्व शक्यता असूनही तिला शिक्षणाचे महत्त्व समजले नव्हते. आता मात्र ते पुरते उमगले होते. दोन वर्षे यात गेली. घर, अभ्यास, ट्युशन्स, आईची सेवा असा अति कामाचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिसऱ्या वर्षात तिला स्पोंडीलाइटिसचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी  लिहिणे, वाचणे काही काळ बंद ठेवायला सांगितले पण तिने या सर्वांवर मात केली. ती पदवीधर झाली. आता तिला शिक्षणाची गोडी लागली होती तिने पुणे विद्यापीठात एम.ए.साठी प्रवेश घेतला. ती सेकंड क्लासमध्ये एम.ए. झाली. नातेवाईकांना घरच्यांना खूप आनंद झाला. दूर शिक्षणाद्वारे झालेले तिचे बी.ए. अनेकांना फार महत्त्वाचे वाटत नसावे. कदाचित माया बी.ए. करते म्हणजे काहीतरी थातूरमातूर असेल असा समज ( गैर )असेल पुणे विद्यापीठाच्या एम. ए. नी मात्र त्यांचा समज दूर झाला. 
                          दूर शिक्षणाबाबतचे समाजातले गैरसमज पाहून मायाला वाईट वाटते. आमचे नाणे खणखणीत आहे असे ती सर्वांना ठासून सांगते. तिच्या विद्यार्थ्यांना आता ती जास्त चांगले शिकवू शकते असे तिला वाटते. मुक्तच्या एम. एस. डब्ल्यू. ला ती आता प्रवेश घेणार आहे. स्वतःचे नातेवाईक व इतरांनाही प्रवेश घेण्यास ती प्रवृत्त करते. त्यांना मार्गदर्शन करते. मुक्त विद्या केंद्राच्या विविध उपक्रमाला आम्ही तिला हक्काने बोलवतो. घरचे काम असल्यासारखे तीही येते. प्रथम वर्षाचे विद्यार्थी थोडे घाबरलेले, साशंक असतात. माजी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आम्ही बोलावतो याचा चांगला परिणाम होतो. अशा विद्यार्थ्यात पहिले हक्काचे नाव मायाचे असते. सतत हसत असणारी माया अनुभव सांगते तेव्हा तिच्या शरीराचा कणकण बोलत असतो. तिचे बिन मुखवट्याचे हृदयापासून केलेले कथन विद्यार्थ्यांना भावते. निवासी संपर्क सत्रात योगासने शिकवायला ती येते. हे सर्व कोणतेही मानधनाच्या अपेक्षेशिवाय. शिक्षण घेणे आणि जे मिळवले ते पुढच्या पिढीला देण्याची प्रक्रिया तिला इमाने इतबारे अखंडपणे चालू ठेवायची आहे. गुरु ऋणातून उतराई होण्याचा हा उत्तम मार्ग आहे असे तिला वाटते. ती ज्यांना शिकवते ते विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतात तेव्हा तिला कृतार्थ वाटते. आणि मायाचे हे घडणे फुलणे पाहून आम्हाला कृतार्थता वाटत"

May be an image of 1 person, standing and indoor         


                       

                  

                  

                 

Tuesday, 18 October 2022

डॉ.विद्या रवींद्र जोशी.

                                           डॉ.विद्या रवींद्र जोशी.

                  आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळ ग्रुपवर 'प्राउड ऑफ यु' असे म्हणावे असे अनेक चमचमते तारे आहेत.डॉ.विद्या रविंद्र जोशी या त्यातील एक.एका लेखात न सामावणारे, चरित्र लिहायला हवे असा त्यांचा जीवन प्रवास आहे.यापूर्वी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे.ती आवर्जून वाचावी.येथे आजारानी त्यांच्या घेतलेल्या कठीण परीक्षा आणि त्यावर त्यांनी केलेली मात यावरच भर दिला आहे.

               १०१२ मध्ये त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले त्या आधी विद्याताई सातवे अस्मानपे होत्या.कारण त्या मुलीकडे अमेरिकेला चालल्या होत्या.स्वत: डॉक्टर,आहारतज्ज्ञ. मुलीचे बाळंतपणाचा आनंद लुटायची स्वप्ने पाहत होत्या.विद्याताई डॉक्टर.चेंबूरच्या साहित्य-संस्कृती, अध्यात्मिक क्षेत्रात विविध संस्थांच्या स्थापनेत आणि कार्यात  पुढाकार असलेल्या. तरी व्यवसाय आणि हे सामजिक कार्य करताना  त्यांनी घर संसार यालाही महत्व दिले होते.ते आणि त्यांचे  Dentist पती यांनी घराजवळचे पॉलीक्लिनिक निवडले होते कामाच्या वेळा मुलांना पाहता येईल अशा adjust केल्या होत्या.प्रॅक्टिस उत्तम चालत होती.रात्री दोनपर्यंत पेशंट यायचे.पेशंट आल्याने रात्री उठावे लागले हे रोजचे असायचे.पण आता मात्र त्यांच्यातल्या आईने मात केली होती.त्यांची अमेरिकेची तिकिटे काढून झाली होती.बॅगा भरणे चालू होते.त्याच वेळी जांघेत एक बारीक गाठ दिसली बायोप्सी,पेट स्कॅन असे सोपस्कार झाले. लीम्फोमाचे (लसिका पेशी) कॅन्सरचे निदान झाले.स्कॅनमध्ये जबड्याखालीही छोटी गाठ दिसत होती चवथी स्टेज आहे असे सांगण्यात आले.अमेरिकेची तिकिटे रद्द झाली.सापशिडीच्या खेळात अगदी १००व्या घराच्या जवळ यावे आणि ९९ ला सापाच्या तोंडाकडे येऊन एकदम खाली घसरावे तसे झाले.१४ साला पर्यंत २२/२३ किमो झाल्या.  

           नातीचे बाळंतपण झालेच नाही पण चार महिन्याच्या नातीला घेऊन मुलगी भारतात आली ती रात्री येणार होती.किमो चालूच होती.सकाळी मराठी साहित्य रसिक मंडळाचे साहित्य संमेलन होते.सर्वांचे म्हणणे पडले,तुम्ही अध्यक्ष आहात तर १५ मिनिटे तरी येऊन जा. रिक्षातून अगदी १५ मिनिटेच जाऊन आल्या.  त्या दिवशीच दुपारी डोळे सुजायला लागले.हे साधेसुधे डोळे येणे नव्हते तर इतरना लगेच लागण होणारे व्हायरल होते. डॉक्टर पतिना ती झालीच.दोघांनी दीड महिना एका खोली कोंडून घेतले.मुलगी आली खालीच असणाऱ्या आत्याकडे राहिली.लांबून मुलीला दाखवले. किती यातना झाल्या असतील.पण नशिबाने हुलकावणी देण्याचा हा पहिला प्रसंग नव्हता.

             प्रथम पासून धाडसी वृत्ती,कॉलेजमध्ये असताना NCC च्या G १,G२ पर्रीक्षा दिल्या होत्या.रायफल युनिटमध्ये होत्या. mountaineering सिलेक्शन झाले होते.पण वडिलांनी परमिशन दिली नाही. AFMC साठी प्रयत्न केला होता.परीक्षा मुलाखत या कठीण परीक्षा पास झाल्या होत्या.या दोन्ही वेळी त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि मध्यमवर्गीय मानसिकता आड आल्या आणि नशिबानी हुलकावणी दिली.अनेक वर्ष याचा सल होता.असे असले तरी अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी असो किंवा आजाराशी लढा देणे असो त्यांची खिलाडीवृत्ती आणि नंतरच्या काळात भिनलेले अध्यात्म कामी आले.

          एकीकडे किमो चालू असताना पुस्तकांचे काम चालूच होते १३ साली आरोग्यासाठी मनाचे श्लोक्चे १३ व्हिडिओ केले.‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’, ‘आत्माराम’, ‘दास सर्वोत्तमाचा’ ही प्रकाशित होत असलेली कादंबरी आणि ‘दासबोध जीवनाचा मार्गदर्शक’ ही पुस्तके लिहून तयार झाली. रामदासांवरील कादंबरी लिहिण्यासाठी त्यांच्या जांभ या मूळगावी त्या जाऊन आल्या.रत्नागीरीत नवरात्रात 9 दिवस अध्यात्मिक विषयावर व्याख्याने दिली. एकीकडे किमो थेरपी कॅन्सरला हटवून शरीर बरे करत होती तर दुसरीकडे रामदास मनाला खंबीर करत होते.आजार मला कुठे झाला तो तर शरीराला झाला. मी म्हणजे शरीर नव्हे. ही आध्यत्मिक समज ना खंत ना खेद अशी वृत्ती निर्माण करत होता.प्रचंड उर्जा देत होता.

                  १३ साली त्या अमेरीकेला  गेल्या.किती तरी दिवसाच्या  तितिक्षे नंतर आता त्याना नातीला कवटाळता आले होते.सहवासाचा आनंद लुटता आला होता. १५ साली त्या पुन्हा अमेरीकेला गेल्या तेंव्हा  बरोबर दासबोध घेवून गेल्या.शिक्षक आणि पालक यांच्यासाठी 'दासबोध जीवनाचा मार्गदर्शक' हे पुस्तक लिहिले.

                    दरम्यान १६ साली रविंद्र जोशीना पार्किन्सन्स झाला. ७५ वर्षापर्यंत ते प्रॅक्टिस करत होते. ते तबला वाजवतात त्याचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यासाठी उपयोग होतो असं त्यांना वाटतं. प्राणायम, मेडिटेशन आणि व्यायाम हे दोघेही करतात. खेळाडू असल्याने पॉझिटिव वृत्ती आहे त्यामुळे त्यांचा पार्किन्सन्स आटोक्यात आहे.यातच विद्याताई डॉक्टर आणि सजग  शुभंकर त्याचाही फायदा आहेच.विद्याताईनीही दवाखाना बंद केला पण फोनवर साल देणे सुरूच असते पुर्विपासूनचे पेशंट तुमचा चेहरा पहिला तरी चांगले वाटते म्हणतात.स्वस्थ बसणे हा त्यांचा स्वभावच नाही. नवनवीन क्षेत्रे धुंडाळणे सुरूच असते

               कॅन्सरनी थोडी उसंत दिली होती.त्यांनी स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला छान ग्रुप जमला.'द मेकिंग' ही शॉर्ट फिल्म कशी बनवायची यावर,देवाचा धर्म अशा  शॉर्ट फिल्म केल्या.व्हेन्यू विद्याताईंचे घर आणि दवाखाना. तेथेच सेट उभे राहत.आता रामदासांवर फिल्म बनवायची आहे.सगळे छान चालले असताना पुन्हा कॅन्सरने डोके वर काढले.१९ साली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली.संगणकावर लाईन वरवर दिसायला लागल्या.शस्त्रक्रियेमुळे थोडे दिवस होईल असे वाटले.डोळ्यांच्या डॉक्टरांनीही काही समस्या दिसत नसल्याचे सांगितले.पण अखंड ते सावधान पण असे समर्थ अभ्यासक असलेल्या विद्याताईना वेगळाच संशय येत होता.

डॉक्टर म्हणून त्यांच्या मनात आलेल्या शंका फिटेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या.एका अद्ययावत तपासणीत मानेच्या शिरेत छोटी gland दिसली.आता किमो थोड्या पण रीगरस tritment होती.प्लेट लेट कमी होत. त्या वाढल्याशिवाय दुसरी किमो नसे.त्यासाठी पोटात इंजक्शन घावी लागत.डोळ्याला ड्रायनेस येई.स्क्रीन दिसत नसे.युरीनरी इन्फेक्शन अशा अनेक गुंतागुंती होत होत्या.जेवताना जेवण जात नव्हते आणि रात्रीअपरात्री कडकडून भूक लागे.अगदी रडायला येई.विवाहित मुलगी नोकरी सोडून राहायला आली.ती त्या काळात विद्याताईची आई झाली.कोविद हजेरी राहून गेला.दोनदा नागीण या आजारानेही विळखा घातला होता.या सर्वातून मनाची ताकद आणि अध्यात्मिक उंची वाढली. प्रत्येक गोष्ट स्वीकारून पुढे जायचे याचा विचार केला की आजार विसरणे सोपे जाते असे त्यांचे साधे सोपे तत्वज्ञान आहे. अध्यात्मावर त्यांनी फक्त पुस्तके लिहिली नाहीत तर स्वतः ते आचरणात आणले आहे.

         इतका त्रास असला तरी काम थांबले नव्हतेच.दोन किमो मध्ये थोडा काळ बरे वाटे त्यात तीन पुस्तकांचे प्रुफरीडिंग केले.डोळे दुखत.डोळ्यात ड्रोप घालायचे आणि काम करायचे.’दास सर्वोत्तमाचा’ या पुस्तकाचे प्रुफ रीडिंग याच काळातले.  

        आता कवितांचे पुस्तक,८ दीर्घकथांचे पुस्तक,आयुर्वेदीय रेसिपी,योगासानावरील पुस्तक छपाईच्या मार्गावर आहेत.२० साली पेट स्कॅन नॉर्मल आला आहे.आता अजारानो नका फिरकू आमच्या विद्याताईंकडे.भरपूर काम व्हायचे आहे अजून त्यांच्याकडून.यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.