Friday, 27 May 2022

आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                                आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                   आज आमच्या लग्नाला ५२ वर्षे झाली.पहिली २९ वर्षे या सहजीवनात आम्ही दोघेच होतो.गेली २३ वर्षे मात्र पार्किन्सन्स मित्र घुसला आहे.आमचे सहजीवन एक उघडे पुस्तक बनले आहे. निमित्तानिमित्ताने पार्किन्सन्सने आमच्याबद्दल खूप लिहायला लावले आम्हाला बदलवून टाकले. आज जरा त्याला न जुमानता आधीच्या २९ वर्षात रमावे असे वाटले.

                  नुकतीच बी.ए.झाले होते.अजून शिकायची इच्छा होती.पण पहिल्याच कांदेपोहे कार्यक्रमात लग्न जमले.शोभना रामचंद्र देशपांडेची शोभना गोपाळ तीर्थळी झाले.विवाहानंतर पुण्यात आलो.टिमवी कॉलनित मेजर दामले यांच्या विकास बंगल्यात ह्यांनी आधीच जागा घेऊन ठेवली होती.मोठ्या घरातून दोन खोल्यात रहायचे? पण त्या दोन खोल्या राहिल्याच नाहीत.दामले बाबा,दामले वहिनी,त्यांचा अख्खा बंगला,बाग आणि त्यांचे सर्व कुटुंबीय बघता बघता आमचेही झाले.प्रेम,धाक,त्याचबरोबर आम्हाला आणि आमच्या मुलीनाही उत्तम संस्कार मिळाले.मुलींसाठी समोर महराष्ट्र मंडळ शाळा,व्यायाम शाळा,कॉलनीतले वातावरण कुटुंबासारखे होते.मैत्रिणी मिळाल्या.वैदिक संशोधन मंडळाची लायब्ररी मिळाली.आणि छोट्या गावातून आलेली बुजरी,बेळगावी भाषा बोलणारी मी बघता बघता पुणेरी झाले.

                हे किर्लोस्कर न्यूमॅटीक मध्ये सर्व्हिसला होते.सकाळी सातला जायचे यायची वेळ नसायची.सुटीच्या दिवशी मात्र मोटारसायकलवर भटकणे व्हायचे. कात्रज, थेऊर, ओळखीच्या, नात्यातील लोकांकडे जाणे व्हायचे.कधी चक्क  मुंबईलाही.हे खूप वेगाने मोटार सायकल चालवायचे.ह्यांचे मित्र म्हणायचे वहिनी तुम्हाला भीती वाटत नाही का? पण मी आधी कधी अशी दुचाकी वाहनाच्या मागे न बसल्याने मला वेग काय असतो माहीतच नव्हते.सोनाली आणि देवयानी झाल्यावरही आम्ही त्या दोघींना घेऊन शिवाय सामान असे मोटार सायकलवर खूप फिरलो.श्रद्धाच्या वेळी पोटात कळा सुरु झाल्यावर आम्ही मोटार सायकलवर कर्वे रोडला डॉ.तेलंग यांच्या दवाखान्यात गेलो होतो.आजुबाजुचे म्हणायचे जावानी तुमच्यावर जाहिरात करायला पाहिजे.

              आम्हाला दोघानाही माणसांची आवड आणि साधेपणा हे साम्य सोडता आमच्या व्यक्तीमत्वात खूप फरक.हे नीटनेटके राहणारे मी थोडी गबाळी.मी सर्वांची सदैव काळजी करणारी तर हे बिनधास्त.मला हेच हवे तेच हवे,प्रत्येक गोष्ट हातात देणे अशी ह्यांची नवरेगिरी अजिबात नव्हती.स्त्री, पुरुष समानता अशा पोकळ गप्पा नव्हत्या पण प्रत्यक्षात आचरण मात्र समानतेचे.मला एकटी बाहेर जाण्याची, रस्ता क्रॉस करायची ही भीती वाटायची. याबाबत मात्र त्यांनी सक्ती केली.एकटी बाहेर जायला भाग पाडले.माझ्या मोठ्या बहिणींना माहेरी सोडायला जावे लागायचे आणि वडील परत पोचवायला यायचे माझ्या बाबतीत त्यांनी या दोन्ही गोष्टी बंद केल्या.मी तिन्ही मुलीना घेऊन रेल्वेने पुणे, मिरज आणि पहाटे झोपेत असलेल्या मुलीना उठवून गाडी बदलून मिरज ते खानापूर असे प्रवास सहजपणे करू लागले.रिझर्वेशनही मीच करून आणायचे.आधी राग यायचा पण माझ्याही नकळत त्यांनी मला आत्म निर्भर केले. त्यांनी कंपनीला वाहून घेतलेले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी,मुलींची आजारपण,शाळा प्रवेश,अभ्यास सर्व माझ्याकडे. मी नोकरी करत नसल्याने मलाही ती माझीच जबाबदारी वाटत होती.

               हे अचानक पूर्वकल्पना न देता कोणालाही जेवायला घेवून यायचे.कधीकधी कोणाला बोलावून ठेवायचे आणि स्वत: ऑफिसमधून खूप उशीरा यायचे.त्या लोकांशी बोलत मला स्वयंपाक करावा लागत असे.एकीकडे अजून का आले नाहीत. मोटारसायकलला अपघात तर झाला नाही न या काळजीत मी असे.एकदा तर हे येताना चिकन घेऊन येणार होते.पाहुणे आले. माझा चिकनची पूर्व तयारीसह  सर्व स्वयंपाक झाला तरी यांचा पत्ता नाही मला कानकोंड्यासारखे झाले. शेवटी हे आले अशा वेळी राग येण्यापेक्षा सुखरूप आहेत यामुळे हुश्श व्हायचे.यांच्या अनेक मित्राना या आठवणी नक्की असतील.

               आमच्या दोन खोल्यांच्या घरात पाहुण्यांची सारखी वर्दळ असे.पार्ट्या,नातेवायिक,ओळखीचे असे अनेकांचे कान्देपोह्याचे कार्यक्रम,साखरपुडा,लग्नाचे वऱ्हाड राहणे अशा अनेक गोष्टी व्हायच्या अर्थात यासाठी दामले बाबा वहिनी यांचे सहकार्य असे,आमच्या दोन खोल्या आणि बंगला यात मध्ये दार होते ते दिवसभर उघडे असायचे त्यांच्या हॉलमध्ये मोट्ठे कार्यक्रम व्हायचे जास्त पाहुणे आले की त्यांची वरची केबिन,जास्तीच्या गाद्या सर्व मिळायचे.आम्ही स्वत:च्या बंगल्यात जाईपर्यंत आमच्याकडे टी.व्ही.नव्हता.आम्ही सर्व बाबांकडेच टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचो.छोट्या खोलीत अंतर कमी असल्याने मुलींच्या डोळ्यावर परिणाम होईल असे बाबा म्हणायचे. १९७८ मध्ये यांचे आईवडील बेळगाव सोडून कायमचे आमच्याकडे आले.आम्ही मोट्ठे घर बघत होतो.एकीकडे बंगला बांधणे आणि मोठ्या घराचे डीपॉझीट,भाडे परवडणारे नव्हते.आता बंगला बांधताय तर तेथेच जा एकदम असे वहिनीनीनी पटवले.मालक आणि भाडेकरू यांच्यात साप,मुंगुस रिलेशन असते.पण आमचे तसे नव्हते.या संबंधावर वेगळा लेख लिहायला हवा.त्यांच्यामुळे अनेक कटू प्रसंगातून जावे लागले तरी आमच्या सहजीवनाला तडा न जाता ते अधिक घट्ट झाले.प्रेम विश्वास,निष्ठा अधिक पिळदार झाल्या.

             याच काळात मी टीमवी तून एम.ए.केले.संध्याकाळी क्लास असायचे.मुली त्यावेळी समोर व्यायाम शाळेत जायच्या.प्रत्येकांनी सारखे काहीना कामात असलेले याना आवडायचे.मी काही शिकण्यासाठी त्यांचा विरोध नव्हता.बायकोने सारखे घरात अडकून राहायला हवे असे वाटत नसे.मी एमफिल,पीएचडी करताना त्यांचा अहं आड आला नव्हता.उलट अभिमानच असायचा.बायकोला स्वातंत्र्य देतो असा आवही नसायचा.ते स्वत: डिप्लोमा इंजिनीअर होते. त्यांच्या कामानी त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.जनरल मॅनेजर पदापर्यंत ते पोचले होते.

              १९८२ मध्ये आम्ही स्वत:च्या बंगल्यात राहायला आलो.दामलेंचे घर सोडताना मी आणि वहिनी खूप रडलो होतो.आता मुलीही मोठ्या झाल्या होत्या.रस्ता ओलांडला की शाळा नव्हती.धाकटी दीड वर्षाचीच होती.मोठ्या दोघींना बसने शाळेतून यायला खूप वेळ व्ह्यायचा. ज्ञान प्रबोधिनीत जात त्यामुळे त्यांचे इतरही उपक्रम असत. पण ह्यांचे सातच्या आत घरात असे अजिबात नव्हते. गावाबाहेर घर. सामसूम असायची मला खूप काळजी वाटायची परंतु ह्यांचे म्हणणे असायचे लाखात एखादे उदाहरण घडते म्हणून मुलीना डांबून ठेवायच्या का? माझ्याप्रमाणेच ह्यांनी दिलेली मोकळीक आणि प्रबोधिनी यामुळे या मुलीही आत्मनिर्भर झाल्या.सायकलवर शाळेत आणि पुढे कॉलेजलाही जायच्या.कायदा मोडून १८ वर्षाच्या आत टूव्हीलर द्यायची नाही असे आम्हला वाटायचे. आम्ही दोघे कायम जमिनीवर असल्याने मुलींच्यावरही तेच संस्कार झाले.

            बंगल्याचे अर्धेमुर्धे काम झाले होते.बंगला बांधतानाही ह्यांनी घराची अनेक कामे मलाच करायला लावली.रिक्षाला खूप पैसे पडतात अशी माझी कुरकुर असायची पण हे म्हणायचे मी सुटी घेऊन पगार बुडवण्यापेक्षा रिक्षा परवडते.गुरुवारी ह्याना सुटी.तेंव्हा मात्र आम्ही बाहेर पडायचो.अनेक नर्सरीमधून झाडे आणली सुंदर बाग झाली.बागेची निगराणी सासरे आवडीने करायचे.येथे रस्ते झाले नव्हते,रिक्षावाले येत नसत.याना समाजकार्याची आवड येथल्या काही लोकांनी मिळून 'विकास समिती' स्थापन केली.यातून आजूबाजूची अनेक माणसे जोडली गेली.

             नवीन बंगल्यात आल्यावर श्रद्धा थोडी मोठ्ठी झाली आणि मी आयआयइत (भारतीय शिक्षण संस्था ) एमफिलला प्रवेश घेतला.दोन बस बदलून जावे लागत असे.मी आणि मुली एकाच वेळी बसने निघायचो. ह्याना गुरुवारी सुटी असायची. सुटीच्या दिवशी ते मला सोडायला आणि आणायला टू व्हिलरवर कोथरूडला यायचे.माझे लेक्चर चालू असले तर थांबून राहायचे.तिथल्या कर्मचार्यांशी त्यांची मैत्री झाली होती.प्रथम दर्शनी इम्प्रेशन पडणे हे त्यांचे वैशिष्ठ आहे. ते मलाच लिफ्ट द्यायचे असे नाही तर ऑफिसमधले वर्कर्स,वाटेत कोणी ओळखीचे दिसले तर थांबून लिफ्ट द्यायचे.आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीकडे जात,धर्म,वय,आर्थिक परिस्थिती, शिक्षण अशी कोणतीच लेबले न लावता माणूस म्हणून पाहतो.त्यामुळे आमचा सर्व स्तरातील लोकसंग्रह मोठ्ठा आहे.सपोर्ट सिस्टीम मोठ्ठी आहे.आमच्या सहजीवनातील हे मोट्ठे संचित आहे.ही इन्व्हेस्टमेंट आमच्या सेकण्ड इनिंगमध्ये उपयोगी पडत आहे.   

             आमच्या सहजीवनात यांनी गजरा आणणे,वाढदिवसाला भेटी देणे असे काही नव्हते.Romantic असे आमचे कपल नाही.गोतावळा जमा करण्यातच आम्हा दोघानाही आनंद असायचा.मी लग्नानंतर १५ वर्षांनी टीमवीत नोकरीला लागले.मे महिन्यात परीक्षा घ्यायला जावे लागे.लग्नाच्या वाढदिवसाला नेमके आम्ही एकत्र नसायचो.आमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला हे इटलीला आणि मी कोल्हापूरला होते.माझ्या मुलीच्या सासुबाईना याचे खूप वाईट वाटले होते.

             यांनी कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास खूप केला त्यावेळी मात्र आमच्यासाठी तिथल्या खास वस्तू हे आणायचे. एकमेकाना आम्ही मोठ्ठी मोठ्ठी पत्रे लिहायचो.आमच्यात धुसपूस भांडणे असे नसायचे. याला कारण ही हेच. मी कधी आरडाओरडा  केला तर ते प्रत्युत्तर द्यायचे नाहीत.मी अपोआप गप्प व्हायची.मी वृत्तपत्रात,मासिकात लेखन करायची ते त्याना आवडायचे.माझे अक्षर चांगले नसल्याने पहिली कथा छापून आली तर माझे आडनाव तीर्थकी लिहिले होते. मग हे, कोठे लेखन पाठवायचे तर सुंदर अक्षरात लिहून द्यायला लागले.एका समजशास्त्र परिषदेसाठी माझा तेथे वाचण्या साठीचा रिसर्च पेपरही त्यांनी सुंदर अक्षरात लिहून दिला.त्याचे खूप कौतुक झाले. तोवर ते निवृत्त झाले होते.ते स्वत: कार ड्राईव्ह करत रत्नागिरीला आले होते.त्यापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो.आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला आमचे दोन दिवसाचे संपर्क सत्र होते तर ते तेथेही आले.त्यांच्या अशा माझ्या नोकरीतील पूर्ण सहकार्याची आठवण आजही माझे सहकारी काढतात.

               मला नोकरीच्या निमित्ताने संपर्क सत्रांना,परीक्षेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जावे लागे.खरे तर यापूर्वी १५ वर्षे मी पूर्ण वेळ दिमतीला असण्याची सर्वाना सवय होती.परंतु माझ्या नोकरीतील कामांमुळे आमच्या सहजीवनात कोणताही ताण तणाव आला नाही.कोणतीही कुरकुर न करता सासरे,हे आणि मुली व्यवस्थित निभावून नेत.

                या सर्व काळात सासू,सासर्यांचे आजारपण, मृत्यू,मुलींची शिक्षणे,लग्ने,नातवंडांचे आगमन अशा अनेक गोष्टी घडल्या. चारचाकी आली.मुलींसह अलिबाग,गोवा,खिदरापूर,लोणावळा अशी भ्रमंती होत राहिली.आमची अमेरिका ट्रीप झाली.केरळ झाले.केसरीबरोबर नैनिताल,काश्मीर झाले.आता खूप फिरायचे ठरवले होते. पण माझे कमरेचे दुखणे सुरु झाले आणि ते शक्य झाले नाही.

               २९ वर्षांचा काळ खूप मोठ्ठा आहे.अनेकानेक आठवणीत रमले पण ते लिखाणात नेमकेपणाने आणणे काही जमले नाही.आम्हाला बरेच जण विचारतात तुमचे लव्हमॅरेज का? ठरवून केलेले लग्न एक मटकाच असतो असे म्हटले जाते.आम्हाला तो लागला.आमचे जीवन कृतार्थ,समाधानी,आनंदी आहे.सगळे काही आलबेल होते असे नाही थोडा खट्टा थोडा मिठा असतेच पण आमचा सहजीवनाचा पाया श्रद्धा,प्रेम विश्वास,निष्ठा यांच्या भक्कम पायावर उभा असल्याने त्याला तडा गेला नाही.वेळोवेळी प्रतीकुलतेला अनुकुलतेत बदलून घेणे आम्हाला जमत गेले.जुन्या जखमा व्रणसुद्धा न ठेवता भरून आल्या.काही जण आमच्या सहजीवनाला रोलमॉडेल मानतात.त्यामुळे इतरांनाही आमचे सहजीवन यशस्वी वाटत असावे. 

             आत्ता तेवीस वर्षे पार्किन्सन्स आमच्यात घुसला आहे.आमच्या निवृत्तीनंतर कामाची क्षेत्रे वेगळी असल्याने वाटा बदलल्या असत्या.पण पार्किन्सन्सने आम्हाला त्याच्या भोवतीच घोटाळत ठेवले आहे. ही प्रतीकुलताही आम्हाला अनुकुलतेत बदलायला जमले आहे.याला आपल्यात सामावून कसे घ्यायचे आणि त्याच्यासह आनंदी कसे राहायचे हे इतर पार्किन्सन्सग्रास्तांपर्यंत पोचवायचे हे आमचे जीवन ध्येय बनले आहे. 

               पाहिलत या पार्किन्सनला थोडा वेळ बाजूला ठेवायचे ठरवले होते पण नकळत आलाच.आता सहजीवनाचा भागच झालाय. ये बाबा.


               

               

            

                 

                    

           

 

Wednesday, 2 March 2022

आदर्श व्यक्तिमत्व कै.नारायण भटजी - गोपाल तीर्थळी

                                            आदर्श व्यक्तिमत्व कै.नारायण भटजी

                           आमचे पिताश्री साऱ्यांचे नारायण भटजी.ज्ञाती बांधव तसेच इतरांना परिचित आहेत ते त्यांची सायकल आणि त्यांचा नेहमीचा पेहेराव धोतर,कोट,टोपी,एक उपरणे आणि प्रसन्न मुद्रा.तरी खूप लोकांना त्यांच्या पूर्वायुष्याची कल्पना असेल म्हणून त्यांच्या २४ जानेवारी या जन्म शताब्दी दिनाचे औचित्य साधून ते उलगडून दाखवायचा प्रयत्न आहे.

                        तीर्थहळ्ळी हे शिमोग्यापासून ३०/३५ कि.मी.वरील गाव.तेथे २४ जानेवारी १९०१ साली आमच्या नानांचा जन्म झाला.त्यांना २ भावंडे .एक भाऊ आणि बहिण .त्यात नाना मोट्ठे. वयाच्या ७/८ व्या वर्षी मातृछत्र हरपले.आणि वय लहान असल्याने मामाने त्यांना हलीयाळला नेले.त्याच सुमारास प्लेगच्या साथीने थैमान घातले होते.त्यामुळे मामा नानांना घेऊन शहापूर येथील बिच्चूगल्लीतील देवळात राहायला आले.

                   त्याकाळात नानांचा बाळंभटजी कामत म्हणजे कै.शारंगधर कामत यांचे वडील यांचा परिचय झाला.तसेच बेळगाव मध्ये आणखी काही लोकांचा परिचय वाढला.त्यात बेळगावला प्लेगची साथ आली आणि मामांचे छत्र हरपले.एकापाठीपाठ हे लहान वयात आघात झाल्यावर विषण्ण मनस्थितीत ते काशिला संस्कृताचे पठण तसेच वैदिक शिक्षण घेण्यास गेले.आणि तब्बल आठ नऊ वर्षांनी बेळगावी परतले ते भटचाळीत बाळंभटजी यांच्या घरी आले.त्यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन पुढे चालू झाले.त्या काळात संस्कृतसाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींची मुलेही तेथे येत..नाना काही आठवणी सांगताना त्यांचा उल्लेख नेहमी करत.डॉक्टर गिंडे आणि अशीच ही मंडळी संस्कृतची आवड म्हणून येत.

               तो १९२९ चा काळ असेल.त्यावेळी नाना रेगेंच्या घरी राहत असत.रेगेंच्या घरी कुणी एका साधूने रामाच्या मूर्ती दिल्या.आणि त्याची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा प्रदर्शित केली.बराच काळ तो साधू न आल्याने पुढे त्या मूर्तीची रेगेंच्या समोर असलेल्या पिंपळावर प्रतिष्ठापना झाली.तेंव्हापासून नानांची रामाची सेवा चालू झाली.त्याला वेळोवेळी उर्जितावस्था आली.१९७८ पर्यंत सेवा केली.मधल्या काळात पांडुरंग महाजनिंच्या विनंतीवरून श्री मारुतीची ( लहान) सेवाही १९७८ पर्यंत चालूच राहिली.या सगळ्या इतक्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी होत्या की जेंव्हापासून शहापूर बाजारातील गणपती उत्सव सुरु झाला तेंव्हापासून त्याची पूजा नैवेद्य,आरती देखील बेळगावचे वास्तव्य होते तेंव्हापर्यंत त्यांच्याकडे चालू होते.श्री राम,श्री मारुती तसेच श्री.गणपतीच्या सेवेने नानाची सर्व इच्छिते पुरी झाली.नानांनी १९३४ च्या दरम्यान बिच्चू गल्लीत घर घेतले.थोडी शेती घेतली.

              नानांना जेवढी संस्कृतची गोडी तेवढीच ज्योतिष शास्त्राची.त्यामुळे त्यांनी आपल्या अभ्यासु वृत्तीने ते चालूच ठेवले.त्यांच्याकडे जन्म झाल्यावर पत्रिका करणासाठी येणाऱ्या सर्वांची पत्रिका केल्यावर रेकॉर्ड करण्याची पद्धत होती.त्यांचेकडे कित्येक हजार पत्रिकांचे रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे. ज्योतिषाची आवड असल्याने गावात कोणी चांगला ज्योतिषी आला की ते त्यांची गाठ घेत.आणि एखाद्या पत्रिकेवर चिकित्सा करत.दक्षिणेकडून,उत्तरेकडून आलेल्या खूप ज्योतिषांकडून त्यांची पत्रिका पाहण्याची पद्धत अभ्यासून स्वत:ची ज्योतिष विद्या पूर्णत्वास नेली.

            त्यांच्याकडे सर्व स्तरातील लोक पत्रिका दाखवत.सल्ला घेत.धर्म, जात, वर्ग यांचे बंधन नसे.त्यांना सर्वांकडून आदरच मिळायचा.त्यांचे ज्योतिषाबद्दल एक तत्व होते.ते एक शास्त्र आहे विद्या आहे.त्याचा आदर राखायला पाहिजे ती रिक्त हस्ताने पाहू नये म्हणून येणाऱ्या व्यक्तीस ते आपल्या कुवतीप्रमाणे पैसे ठेवावयास सांगत.त्यात एक पैसा एका आण्यापासून  कित्येक रुपयापर्यंत पैसे देणारे असत.भविष्य सांगणे मात्र दिलेल्या पैशासी रिलेटेड नसे.येणाऱ्या माणसाचे पूर्ण समाधान होइपर्यंत त्यांच्या भल्याचा सल्ला देत.त्यामुळे त्यांनी एखाद्याचे भविष्य सांगितले काही सल्ला दिला तर मानला गेला नाही अस कधीच होत नसे.त्यांची सर्वांची सेवा तसेच आचरणाने नानांना एक वाकसिद्धीच होती असे म्हणावे लागेल.बेळगावच्या वास्तव्यात खूप लोकांना दिलेले सल्ले तंतोतंत पटल्याने पुढे ते पुण्याला आल्यावरही अनेक जण भविष्य विचारायला येत.नानांनी ज्योतिष ही विद्या म्हणूनच जोपासली.त्यापासून मिळालेले पैसे उपजीविकेसाठी न वापरता ते पैसे धर्मादाय नावाने केलेल्या खात्यात टाकीत व धर्मादायचं करत.पुण्याला आल्यानंतरही त्यांचे सायकलवर जाणे पौरोहित्य,ज्योतिष सांगणे चालूच राहिले.

                            बेळगावला असताना त्यांचे ज्योतीशाबाद्द्लचे योगदान मोट्ठे आहे.तसेच बरऱ्या जणांच्या मुंजी लग्नापासून त्यांच्या मुलांच्यापर्यंत त्यांनी लग्ने मुंजी केल्या.अशा नमूद करण्यासारखी बरीच कुटुंबे होती.त्यात नागेशराव हेरेकर, मधुभाऊ हेरेकर,गजाननराव देशपांडे,डॉक्टर कामत कुटुंबीय,गणपतराव देशपांडे अशी नावे प्रामुख्याने घेता येतील.त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे अनेकांचे ते सल्ला देत असत.लग्न मुन्जीतही विधीचा अर्थ,उद्देश ते समजाऊन सांगत.त्यामुळे विधी यांत्रिक न होता बोधपर होत.यामुळे नाना सर्वाना हवेसे वाटत.

                            जेजे घडवते ते नियती घडवते.त्यांच्या आयुष्यात बेळगावकरांचा संग घडायचा होता तेवढा काळ ते बेळगावला राहिले.त्याचाही एक किस्साच आहे.ज्यावेळी नाना  बाळंभटजीकडे राहत त्यावेळी पुण्यातील एका सारस्वत असामिनी   बाळंभटजीकडे एक पौरोहित्य करणारा पुण्यात पाठविण्याविषयी विनंती केली होती त्यावेळी तेलीचारी आणि नाना यापैकी एक पाठविण्याचे ठरले.तेलीचारी पुण्याला गेले आणि नानांचे बेलागावकरांचे सेवाव्रत चालू राहिले.पुढे बेळगावकारांचा  सेवाव्रताचा काळ नियतीने ठरविला.माझ्या मातोश्रींची तब्येत ठीक नसल्याने मी त्या दोघांना पुण्याला  घेऊन आलो.कित्येक वर्षे यासाठी मागे लागल्यावर शेवटी १९७८ साली ते पुण्याला कायमचे राहायला आले.नानांचा निरोप समारंभ मोठ्या जनसमुदायाने आखला.ती बेळगावच्या लोकांनी त्यांच्या कामाची त्याना दिलेली पावती होती.

                        आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांची मुले आहोत.त्यांना संगीताची आवड होती.त्याना स्वत:ला शिकायची आवड होती तसे मुला सुनानीही शिकावे असे वाटे.त्यांनी खूप दुर्मिळ पुस्तके संग्रही बाळगली.त्यांचा संग्रह त्यांच्या नातीला हिरामोत्याचा खजिना असल्याचा आनंद देतो.आम्ही आज उपभोगतो ते त्यांची पुण्याई आमच्या मागे असल्याने उपभोगतो असे वाटते.  

                      उतार वयात पुढे त्याना बाहेर जाणे कमी करावे लागले.पण पुण्यातील बेळगावशी संबंधित माणसे येत.सल्ले घेत त्यामुळे त्यांना बेळगाव सोडल्याचे जाणवले नाही.पुण्यातील आजूबाजूचे लोकही  भविष्य विचारायला येत. बंगल्याभोवतालच्या बागेची देखभाल करण्यातही त्यांचा वेळ जाई.

                     ज्योतिष तर त्यांच्या हाडात भिनले होते १९९१ साली त्यांना घरीच मढ्यावरून पडल्याचे निमित्त झाले आणि हिपबोन मोडले.त्यावेळी त्याना हॉस्पिटलमध्ये ठेवले.केरळची एक ख्रिश्चन नर्स त्याची देखभाल करत होती.तिला ते म्हणाले तू माझी एवढी देखभाल करतेस तर तुझे भविष्य सांगतो.आणि त्यांनी आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत तिचे भविष्य सांगितले.ते ऐकल्यावर प्रत्येक गोष्ट पटल्याने ती आवाक झाली.तिने नानाचे झोपलेल्या स्थितीत पाय धरले.दुसरे दिवशी नानांची प्राणज्योत मालवली.त्या नर्सला आणखी जाणून घेण्याची इच्छा होती.नाना गेल्यावर ती ढसाढसा रडली.

                  आज तिसरी पिढीही त्यांचे जरूर नाव काढेल अशी आहे.एक नात संस्कृतची अभ्यासका असल्याने आणि नातू ज्योतिषाचा अभ्यासू असल्याने तो वारसा असाच चालू राहो ही आजच्या दिनी श्रद्धांजली.

 

( सदर लेख २४ जानेवारी २००१ च्या तरुण भारत बेळगाव मध्ये छापून आला होता.)



Tuesday, 25 January 2022

कन्या व्हावी ऐसी


                                                 कन्या व्हावी ऐसी

                           महाराष्ट्र टाईम्स मध्ये आज जन्मलेले मुल नावाखाली भविष्य यायचे. २४ जानेवारी १९७२ चे भविष्य होते.सूर्य नेपचून त्रिकोण योगामुळे आज जन्मलेल्या मुलाचे आयुष्य अनेक आश्चर्याने भरलेले असेल.दैविक कृपा आणि ग्रहांची साहानुभूती सतत लाभेल.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडवील.
                          घरात आवराआवरी करताना हे सापडले.मी भविष्यावर फारशी विश्वास ठेवणारी नाही.आणि त्या दिवशी जन्मलेली माझी मुलगी सोनाली तर त्याहून नाही.पण तरीही तिने भविष्य खरे केले आहे.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडविला आहे. माझा उर भरून येईल अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.किती लिहू,किती सांगू.
                       लहानपणापासून स्वतंत्र विचाराची,आपल्या विचाराशी ठाम.यात आदळआपट रडारडी न करता हवे तेच करणारी.लोअर केजीला क्रीसेंट स्कूलमध्ये घातले.तिला मराठी मिडीयमला जायचे होते.पुढच्या वर्षी घालू सांगितले वर्षभर गेली आणि दुसऱ्या वर्षी अडून बसली.प्रवेश संपले होते.कसाबसा प्रवेश  मिळाला.आमच्या जवळ राहणारे आर्किटेक्ट पळशीकर यांच्याकडे पाहून आर्किटेक्ट व्हायचे हेही अगदी लहानपणीच ठरवलेले.बारावीनंतर प्रवेश मिळाला नाही.त्यासाठी एक वर्ष थांबली पण आर्किटेक्ट झाली.चवथ्या वर्षात प्रोफेशनल प्रॅक्टिसक्टीससाठी अहमदाबादचे बाळकृष्ण दोषी यांच्याकडेच जायचे होते.आणि तेच तिने केले.या क्षेत्रातील तिचे यश पाहता तिचे निर्णय बरोबर होते.
                    कधी हैद्राबाद,कधी मद्रास,कधी जपान अशी तिच्या पायाला भिंगरी असते.हैद्राबादचे पर्यावरणपूरक आयआयटीचे हॉस्टेल,कोइमतुरचे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी तिच्या यशाची काही उदाहरणे.त्या त्या क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास, कलात्मकता, क्लायंटची गरज,नितीमत्ता या सर्वांचा मेळ घालून हे काम केलेले.जुन्या नव्याचा मेळ,क्रिएटिव्हिटी,यामागे व्यापक विचार हा तिचा स्थायी भाव आहे.बाहेर छोटीशी रांगोळी असो,गणपतीची,दिवाळीची आरास असो साधी भाजी चिरणे.थाळीतील पदार्थांची रंगसंगती,न्युट्रिशन व्ह्याल्यू, घराची सजावट घरगुती कार्यक्रम,लिखाण या सर्वात हा स्थायी प्रगट होत असतो.हे सर्व कमिन्सच्या आर्किटेक्चरच्या विध्यार्थिनीपर्यंत आपल्या व्याख्यानातून,प्रॅक्टिकल,सहली यातून तळमळीने पोचविलेले असते.नवभारत टाईम्सच्या सुरुची तर्फे तिला स्त्रीशक्ती पुरस्कार मिळाला पण त्यापेक्षा स्त्रीशक्ती, आर्किटेक्चरचा गाभा या विध्यार्थिनीपर्यंत पोचणे आणि त्यांची भरभरून मिळालेली पावती तिला पुरस्करापेक्षा अधिक महत्वाची वाटते.हे सर्व असूनही तिचे पाय नेहमी जमिनीवर असतात.
                  इमारतीचे डिझाईन असो,स्वत:चा पेहराव असो,मैत्री असो,नातेसंबंध असो त्यात दिखाऊपणापेक्षा एक ग्रेस,भक्कमपणा,प्रामाणिकपणा असतो.स्वत:च्या पेहरावातही ही ग्रेस असते. प्रसन्न हास्यामुळे,कोणताही आव नसता वागण्यामुळे ती सर्वाना हवीहवीशी वाटते.यात सख्खे,चुलत,आत्ये,वगैरे सासू सासरे यांची पिढी,नणंदा,सलीलचे मित्र,त्यांच्या बायका,सोशल मिडीयावरून झालेल्या बरोबरीच्या मैत्रिणी,पुढच्या पिढीतले भाचे, भाच्या,विध्यार्थी,हात्खाली काम करणारे हे सर्व आले.अनेकांसाठी ती रोल मॉडेल असते.
                 बाहेरचे सर्व व्याप सांभाळताना.सासर,माहेरची नातीही तिने कुशलतेने सांभाळली आहेत.स्वत: धार्मिक नसली तरी सण, समारंभ ती उत्तम साजरे करते त्याचे कर्मकांड न होऊ देता उत्सव करते.तिच्या घराचे दरवाजे कोकणातील माणसे असोत, जर्मनीची मार्गारेट असो,सलील, क्षितीजचे मित्र असोत की सासुबाईंच्या मैत्रिणी. सर्वाना घराचे दरवाजे उघडे असतात.तिच्या घरातला मोकळेपणा सर्वाना आवडतो.तिच्या या गुणामुळे तिने नात्यातली,देश,परदेशातील अनेक माणसे जोडली आहेत.तिच्या सोशल मीडियातील मित्रमंडळीत ती किती प्रिय आहे ते मीडियातील कॉमन मित्र,मैत्रिणींकडून मला समजत असते.
                 तिच्यातील सच्चेपणा,संवेदनशीलता,मिस्कीलता,संस्कृतीशी जोडलेली नाळ हे सर्व तिच्या लिखाणातूनही असते. मग ते लिखाण वास्तू,वास्तू तज्ज्ञ,देश,परदेशातील भटकंती,एखादी रेसिपी कोणतेही असो.यात हटके असेही असते.
                तिचे सगळेच हटके असते त्यामुळे ती युनिक असते.क्षितीजला वाढवताना ही ती आई कमी आणि मैत्रीण जास्त होती.त्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर एक संवेदनाशील आणि वैश्विक माणूस बनवण्यात ती यशस्वी झाली आहे. यासाठी तिने हळुवारपणे घेतलेले कष्ट,प्रक्रिया मी पाहिलेली आहे.मला भावणारी ही तिची सर्वांग सुन्दर रचना आहे. तिची भटकंती ही अशीच हटके.युरोप ट्रीप बॅगपॅक मैत्रिणीबरोबर केली.स्पेनमधील कमिनो वारी तीन मैत्रिणी बरोबर केली.कामासाठी परदेशात गेल्यावर इतर खरेदि करतात पण ही मात्र इमारती तिथली सांस्कृतिक वैशिष्ठ्य बघत फिरते.येथून आता तिला सायकलवर भटकंतीचा छंद लागला आहे.अचानक पाषाण हून आमच्याकडे सल्स्बारीपार्कला येते सरप्राईज देते. आमचे अनेक दिवस आनंदात जातात.यावेळीही ती आळंदीहून किंवा १५ ऑगस्टला ७५ किलोमीटर करण्यासाठी निघालेली असते.
             मुलगी,बहिण,पत्नी,आई,सून,मैत्रीण.बॉस,आर्किटेक्ट,या सर्व आघाड्यावर ती आदर्श आहे.ती स्वत:ची काळजी घेत नाही अशी माझी तक्रार होती. पण आता सलील खनपटीला बसून ती घ्यायला लावतो. एक मुलगी म्हणून आमच्याशी नाते एक स्वतंत्र लेखातच लिहावे लागेल.आम्हाला तुझा अभिमान वाटतो एवढेच म्हणते.
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे असते पण आता आमचे पिल्लू  उंच आकाशात भरारी घेत आहे.पण लक्ष मात्र आमच्याकडे असते.  
 अशी अनादी राहा.आनंद वाटत रहा.
जीवेत शरद शतम   
                
          May be an image of bicycle, outdoors and text that says 'tir thali's'     
      May be an image of 3 people and indoor         

 








                             











Friday, 21 January 2022

माझे दूरस्थ विद्यार्थी - - तुळशीराम कुसाळकर

                                            माझे दूरस्थ विद्यार्थी - तुळशीराम कुसाळकर

   तुळशीराम कुसाळकर यांचे अकस्मात फेसबुकवर भेटणे.फेसबुकला खूप खूप धन्यवाद.त्यानंतर Whats app वर भरभरून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र येणे.सोबत १७ नोव्हेंबर १९८८ मधल्या पदवीदान समारंभाचा फोटो.एका शिक्षकासाठी याहून मोठ्ठा पुरस्कार तो कोणता असणार.त्यांचे पत्र तसेच्या तसे देत आहे.

*वंदनीय तिर्थळी मॅडम*,
स.न.वि.वि.

१७ नोव्हेंबर १९८८ चा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे पदवीदान समारंभाचा आपल्या समवेत चा फोटो जतन करून ठेवला आहे. माझ्या सारख्या भटक्या विमुक्त समाजतल्या मुलाला तुम्ही मोलाचे मार्गदर्शन केले.माझ्यात चैतन्य फुलविले. आपण माझ्या भरकटलेल्या जीवनाला दिशा दिलीत  आत्मविश्वास निर्माण केला. तुमच्या आशिर्वादाने पदवीधर झालो.आणि पुढे जाऊन बी .एड केले. तुम्ही केलेले मोलाचे मार्गदर्शनला 35 वर्षे शिक्षकी पेशात वर्गात तुमचे उदाहरण देत होतो प्रसंगी हाच फोटो वर्गात दाखवत होतो.तुमच्या मुळे माझ्या कुटुंबाला मार्ग व दिशा मिळाली.

माझी तीनही मुले उच्चविद्याविभूषित आहेत.तुमच्या आशिर्वादाने सेवा निवृत्त झाल्यानंतर एक सामाजिक प्रतिष्ठान स्थापन केले आहे.त्या द्वारे गोरगरीब दीनदलित मुलांना मदत करतो. मदत करतो .त्यांच्यासाठी उर्वरीत आयुष्य वाहून घेतले आहे. तुमच्या आठवणी मुलांना सांगत असतो. तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात. विद्यापीठाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तुमचा आशीर्वाद कायम आहे. तुम्ही व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. शतायुषी व्हा.तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.भेतीअंती खूप बोलेन.

*आपला विद्यार्थी*
तुळशीराम कुसळकर सर

 

त्यांची २ मुले  सायंटीस्ट झाली आहेत याचे तर मला फारच अप्रूप वाटले.त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेंव्हा ते ९० साली म्हणजे बी.ए,झाल्यावर लगेचच एम.ए.झाल्याचे समजले. त्यांनी माजी विध्यार्थ्याना हाताशी धरून पिंपळनेर सामजिक प्रतिष्ठान नावाचा न्यास स्थापन केला आहे.गरीब विद्यार्थ्यानापुस्तके वह्या पुरविणे,गणवेश देणे गरजूंची फी भरणे हे ते करत असतात.ते कृतार्थ,समाधानी जीवन जगत आहेत. मला हे सर्व खूपखूप सुखाऊन गेले.

त्यांच्यावर २७ नोव्हेंबर २००४ साली केसरी मध्ये उत्तुंग भरारी सदरात लिहिलेला लेखही सोबत देत आहे.                         

                                 मुक्त विद्या केंद्राने मला घडवले.

  • गुप्त विद्या केंद्रानेस्ट १९८५ मध्ये बी.ए. चा अभ्यासक्रम सुरू केला आणि अनेक वर्षे उपाशी असलेल्या माणसांसमोर पक्वान्नाचे भरलेले ताट ठेवल्यावर तो जसा त्या अन्नावर तुटून पडेल तसे अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमावर अक्षरशः तुटून पडले. कुसळकर तुळशीराम सोमा त्यातील एक. केसाला चोपून लावलेले तेल, मागे फिरवलेले केस, पांढरा शुभ्र पायजमा व शर्ट, प्रसन्न व हसतमुख चेहरा. का कोण जाणे पण कुसळकर यांना पाहिल्यावर 'नव्या मनूचा गिरीधर पुतळा' या मर्ढेकरांच्या ओळी आठवायच्या. 
    कुसळकर यांसारखे विद्यार्थी ज्ञानासाठी हपापलेले होते. परंपरा, सामाजिक परिस्थिती, औपचारिक शिक्षण पद्धतीची ताठरता यामुळे ही भुक मारून जगावे लागत होते. वडारी जातीच्या कुसळकर यांचे बालपण दगड काम करणाऱ्या वडीलांच्या बरोबर गावोगाव भटकणाण्यात गेले. ना घर, जमीन. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरायचे. मिळेल तिथे काम करायचे. काम संपले की दुसरे काम. अशात मुलांच्या शिक्षणाची फरपटच. नियमित शिक्षण घेता आले नाही तरी अनंत अडचणींना तोंड देत एसएससी पर्यंतचा पल्ला गाठला. एसएससी होणे तसे सोपे नव्हते. परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे तर, राहायचे कुठे ? तितके दिवस येणारा जेवणाचा खर्च कसा करायचा? हे साधे सोपे वाटणारे प्रश्न कुसळकरांसाठी अत्यंत जटील होते. अडचणींवर मात करत परीक्षा दिली खरी परंतु गावोगाव भटकत राहणाऱ्या कुसळकर यांचे गणित व इंग्लिश विषय कच्चे राहिले होते. त्यामुळे अनुत्तीर्ण होणे नशिबी आले. दहावीला गणित, इंग्लिश मध्ये विद्यार्थी नापास होतात त्याच्या मुळाशी अशी कारणे असतात. कुसळकर यांचे शिक्षण यानंतर बंद झाले. वडीलांच्या दृष्टीने आतापर्यंत झालेली चैन खूप झाली होती. शिकण्याचे स्वप्न सोडून देण्याशिवाय इलाज नव्हता.
     पिंपळनेर मध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झाले आणि छोटी नोकरी मिळाली. शिक्षण नाही तरी शिक्षण क्षेत्राशी संबंध ठेवता येत होता. अशातच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली.दहावी नापासांना प्रवेश चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार होता. आणि कुसळकर प्रवेशचाचणीत उत्तम प्रकारे पास होऊन  प्रथम वर्षास प्रवेश करते झाले. अत्यंत अभ्यासू विद्यार्थी म्हणून ते सर्व शिक्षकांना परिचित होते. सर्व संपर्कसत्रांना ते हजर राहात. नियमित गृहपाठ पाठवत. मी पीएचडीसाठी पाठवलेली प्रश्नावलीही त्यांनी तातडीने आणि मनापासून भरून पाठवली होती. प्रश्नावलीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला म्हणून मी आठवण पत्र पाठवले. संशोधकास संशोधन करताना असा कमी प्रतिसाद मिळण्याचा अनुभव नवा नाही. आठवण पत्रे पाठवणे हा एक तंत्राचा भाग होता. कुसळकरांसारख्या अनेक विद्यार्थ्यांना मात्र साधी प्रश्नावली भरून पाठविता येत नाही याचा राग येत आला व वाईट वाटले. विद्यार्थ्यांना आर्थिक भार पडू नये म्हणून मी प्रश्नावली बरोबर परतीसाठी पोस्टेज पाठवले होते इतके असूनही विद्यार्थ्यांतील ही उदासीनता त्यांच्या मते अक्षम्य होती. कुसळकर यांचे लगेच पत्र आले 'आपण नाउमेद होऊ नका. आपले संशोधन ही काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री आहे'. कुसळकर यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास व मानसिक आधार यांचा माझ्या पीएचडी होण्यात खूप मोठा वाटा आहे
                माझे पीएचडी पुर्ण झाल्यावरही त्यांचे अभिनंदनाचे पत्र आले.बी.ए.उत्तीर्ण झाल्यावरही त्यांची अधूनमधून पत्रे येत.बी.ए.झाल्यामुळे त्यांना प्रयोगशाळा सहायाक पदावरून प्रमोशन मिळाले होते. त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ झाली होती. पुढे त्यांनी बी.एड.ही केले.शिक्षक झाले पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ लागले. आज ते दैनिक समाचार अहमदनगरचे वार्ताहर म्हणून काम करतात.बी.ए. होणे गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असाध्य होते. ते साध्य  झाल्याचा आनंद या सर्वांपेक्षा मोठा होता. स्वतःचा विकास करून ते थांबले नाहीत आपल्या समाज बांधवांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना सक्तीने शिक्षण घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. समाजातील जुन्या चालीरीती अनिष्ट रूढी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाला पाठवलेल्या मनोगतात त्यांनी लिहिले आहे, 'जिद्द, दृढनिश्चय, आत्मविश्वास व सुयोग्य नियोजन असल्यास अनंत अडचणींवर मात करून विजयश्री खेचून आणता येते'. त्यांच्या मनोगतातील ही वाक्ये, परिस्थितीबाबत कुरकुर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहेत. मुक्त विद्या केंद्राच्या अभ्यासक्रमामुळे जीवन उजळलेल्यात कुसळकर यांसारखे वडारी समाजातील विद्यार्थी आहेत, कैकाडी, कंजारभाट, आदिवासी, वंजारी इत्यादी समाजातील आहेत. शेतमजूर, हमाल आहेत. अशी यादी लांबत जाईल. या सर्वांच्या कथा थोड्याफार फरकाने अशाच आहेत. समस्या थोड्या वेगळ्या, अडचणी वेगळ्या परंतु वंचितता तीच. ज्ञान मिळवण्याची आस तीच.  आणि या सर्वांचा परिणाम ही तोच. मुक्त विद्या केंद्रातून आत्तापर्यंत  १४००० पदवीधर बाहेर पडले परंतु मुक्त विद्या केंद्राचे खरे यश म्हणजे आमचे असे प्रबोधित झालेले तळागाळातील विद्यार्थी.
     May be an image of 4 people and indoor

Friday, 3 December 2021

माझे दूरस्थ विद्यार्थी - अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                                       माझे दूरस्थ विद्यार्थी  -  अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                      रामदास म्हात्रे यांच्यावरील सदर लेख १२ जानेवारी २००६ मध्ये लिहिलेला आहे.केसरी वर्तमानपत्रात आमच्या टीमवी च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' हे सदर लिहित होते.हे विद्यार्थी सध्या काय करतात ते  शोधून त्यांच्या पुढील यशाबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहित होते.प्रत्येक अपंग दिनाला मला रामदास म्हात्रे त्यांची स्वप्ने आठवायची.त्यांचा माझ्याकडे असलेला फोन नंबर लागत नव्हता त्यांचा पत्ता शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण मिळाला नाही.अचानक मला ते फेसबुकवर ते भेटले.मी त्यांचा फोन नंबर मागितला त्यांच्याशी बोलून लिहायचे होते.पण त्यांचा फोन मिळालाच नाही.काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण शारदा वाडकर हिच्याशी बोलताना करोनामध्ये किती लोकांचे नाहक बळी गेले हे सांगताना रामदास म्हत्रेचे नाव घेतले गेले. माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक होते. त्यांचा पत्ता  सापडला तोही असा.शारदा त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होती.आज अपंग दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.                        

                            
                                        अपंगांचे खंबीर नेते
                         पुण्यातील कुमठेकर रोडवरील शिक्षण शास्त्र संस्थेचा हॉल खच्चून भरला होता ग.प्र.प्रधान, नारायण सुर्वे, शरदचंद्र गोखले अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर स्थानापन्नवर भेटले. झाली होती. निमित्त होते रामदास म्हात्रे यांच्या 'थोट्या' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे. रामदास म्हात्रे आमचे बी.ए.चे विद्यार्थी म्हणून मी आवर्जून गेले होते.
                              कोकणातल्या खेड्यातील एका गरीब शेतमजुराच्या मुलाची शिक्षणासाठीची धडपड अचंबित करणारी होती. जगण्याच्या प्रत्येक क्षणाला समाजाने अव्हेरले, नाकारले तरी सर्वातुन वर उठून रामदास म्हात्रेनी समाजालाच भरभरून दिले होते. 
                                 पेण जवळील मळवली गावातील शेतमजुराच्या घरात जन्मलेले रामदास हे पाचवे अपत्य. ते पाच वर्षाचे असतानाच पोलिओंनी अपंगत्व आले आणि नंतर सगळं जगणंच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे झाले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे आपण धांडोरे पिटतो पण शिक्षणाच्या जबरदस्त ओढीने खुरडत घराचा उंबरठा ओलांडून जाणाऱ्या रामदासला अपंग म्हणून शिक्षकांनी प्रवेशच नाकारला. वडिलांना काही झाल्यास मी जबाबदारी घेईन असे लिहून द्यावे लागले. पाच मैलावरच्या शाळेत रामदास माकडासारखा सारख्या उड्या मारत जाई. पावसाळ्यात हात चिखलाने कोपरापर्यंत  बरबटलेले असत. साप अंगावरून जात. शाळे बरोबर शेतात ढेकळे फोडणे, लावणी करणे, गुराखी पण करणे अशी कामेही रामदास करी. यातूनही रामदास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होई. पुढे पुण्याला  शिक्षणासाठी जायचे खुळ डोक्यात शिरले. अशोक विद्यालयात धडपड करून प्रवेश मिळविला. तिथे राहायची मोफत सोय होती. जेवायला मिलो ची भाकरी मिळायची कोकणात दारिद्र्य असलं तरी रान मेवा भरपूर असे. पळून जावं वाटे पण शिक्षणाच्या ओढीने त्यावर मात केली. पुढे ज्ञानेश्वर वस्तीगृहात प्रवेश मिळाला. जीपीओ ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत खुरडत, तेथून न्यू इंग्लिश स्कूलला बसने जावे लागे. अपंग रामदाससाठी हे खूप कष्टाचे होते. एसएससीला बोरमाळ विकून आई ने पैसे भरले दहावीत ६५  टक्के गुण मिळाले. एस.पी.त सायन्सला प्रवेश घेतला. शिक्षणाच्या वाटेवर वेगळीच समस्या निर्माण झाली.भावाचे निधन झाले. गावाकडून पैसे येणे बंद झाले. त्याचा संसार हि उघड्यावर पडला. शिक्षण सोडून अर्थार्जन करावे लागले.
                                            रामदास ने निर्वाहासाठी आपली कामे सुरू केली.पुढे समाज कल्याण खात्यात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. येथेही अपंग म्हणून घेण्यास खळखळ होती. या काळात सेवा दलाशी संपर्क आला. एस. एम. जोशी, भाई वैद्य यांचा सहवास लाभला व्यक्तिमत्त्व विकसित झाले१९८१ मध्ये जागृत अपंग संघटनेची स्थापना केली. अपंग जागृतीसाठी लेखन, कृती सर्व मार्ग हाताळले.पु.ग. वैद्यांनी आपटे प्रशालेत संस्थेसाठी मोफत जागा दिली. अपंग जागृती करणे तसे सोपे नव्हते अपंगांचे पत्ते काढून घरी जायचे घरच्यांना पटवायचे स्त्रियांसाठी तर हे अधिक कठीण होते पण नोकरी सांभाळून झपाटल्यासारखे रामदास ने काम केले फलित म्हणून १९८१ मध्ये राज्य पुरस्कार १९८७  मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.
                              अपंगांच्या हक्कासाठी लढायचे तर कायद्याचे शिक्षण हवे होते त्यासाठी पदवी नव्हती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पदवी मिळाली आणि लगेच शाहू कॉलेजमध्ये सकाळच्या शाखेत प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज दिवसा नोकरी, संध्याकाळी संस्थेचे काम अशी कसरत सुरू झाली अपंगांचे विवाह, नोकऱ्या, प्रवेश, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करणे, न्यूनगंड नाहीसा करणे, समाजात अपंगांच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास निर्माण करणे हे सगळे म्हणजे कठीण खडकात बी पेरणे होते. कोकणातल्या निसर्गाने खडतरतेवर मात करावयाची दिलेले शिक्षण कामी आले. दुर्दम्य इच्छाशक्ती होती आज संस्थेच्या रोपट्याचा वृक्षासारखा विस्तार झाला आहे.४० अपंगांची निवासाची सोय आहे. संगणक, शिवणकाम असे स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण दिले जाते. रामदास ने अपंगांतून नेतृत्वाची पुढची फळी तयार केली आहे. संस्थेचा  डोलारा सांभाळताना  महाराष्ट्र अपंग विकलांग मंच, महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना यांच्या कार्याध्यक्ष पदांची धुरा ही आता रामदास म्हात्रे यांच्याकडे आहे. हे सर्व करताना अपंगांचे सोबती, अपंगाचे हक्क, सनद हे हँडबुक, गंगाजळी कादंबरी आणि भरपूर स्फुट लेखन म्हात्रे यांनी केले आहे.
 आज ते ऑफिस सुपरिटेंडेंट या पोस्टवर आहेत. धडधाकटांनाही लाजवेल असे  त्यांचे कर्तृत्व पाहून त्यांच्या मित्रांच्या अव्यंग असलेल्या मावशीनीच त्यांच्याशी विवाह केला. त्या जिल्हापरिषदेच्या शिक्षिका आहेत. दोन मुलं उत्तम शाळेत शिकत आहेत स्वतःची कोणतीही गोष्ट बायको-मुलांना करावी लागू नये असा त्यांचा कटाक्ष असतो. पत्नीची शनिवारी सकाळची शाळा म्हणून घरातील स्वयंपाका पासून सर्व कामे करतात पण तरी अपंगांच्या बाबतीत समाजाच्या मानसिकतेबद्दल त्यांना खंत वाटते. ते म्हणतात कार्पोरेशन,  एटीएम सेंटर अशा अनेक ठिकाणी जाताना बिल्डिंगच्या रचनेत अपंगांचा विचार न केल्याने अडचणी येतात. इतरांवर अवलंबून राहावे लागते. रामदास मात्रे यांच्या जीवन कार्यातून धडधाकट माणसांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे कार्य आहे. अपंगा बद्दल च्या त्यांच्या कार्यासाठी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
 

Sunday, 17 October 2021

रिक्षावाले अरुण शिंदे - घरचा माणूस

                                              रिक्षावाले अरुण शिंदे  -  घरचा माणूस

                                 पुणेरी रिक्षा वाल्यांच्या बाबत नेहमी तक्रारीचा सूर असतो.आम्हाला मात्र नेहमी चांगलेच अनुभव आले.त्यातही अरुण शिंदे हे आमच्यासाठी घरचा माणूस आहेत.आम्ही दोघे जेष्ठ नागरिक असल्याने त्यातही माझ्या पतिना पार्किन्सन्स सारखा आजार असल्याने कोणीतरी मदतीला लागते.कोठेही जायचे असले तर आम्ही अरुण शिंदेना फोन करतो.जवळच्या  ATM मध्ये, किराणा माल, फळवाला,पिठाची गिरणी असे कोठेही अगदी छोट्या अंतरासाठी ते येतात. ते असले कि बिनधास्त वाटते काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी थांबत करतो.आम्हाला यासाठी वेळ लागतो पण त्यांची कधी कुरकुर नसते.उलट वस्तू. रिक्षात आणून ठेवणे, दळण गिरणीत ठेवणे अशी कामे ते न सांगता करतात.

रिक्षात वृध्द माणसे आहेत याचे त्याना भान असते.त्यात मला कमरेचा त्रास आहे ही जाणीव असल्याने ते अत्यंत सुरक्षित रिक्षा चालवतात.

 दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतरही ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळेनुसार हक्काने बोलावतो.एकदा सारसबागेत जायचे होते. त्यांनी बाजूच्या गेटने कमीत कमी पायर्या चढाव्या लागतील अशा ठिकाणा पर्यंत रिक्षा नेली. वयस्क माणसे पाहून बागेतही कोणी हरकत घेतली नाही.आमचे छान गणेश दर्शन झाले.जवळच एक शिव मंदिर आहे तेथेही बदल म्हणून त्यांना घेऊन जातो.घाई करू नका व्यवस्थित दर्शन घ्या असे सांगतात.

स्टेशन,विमानतळ अशा ठिकाणी पहाटे जायचे असेल तर अरुण शिंदेना रिक्षा सांगितली की अलार्मही न लावता बीनधास्त झोपता येते.

त्याना बोलावले की ते पाच मिनिटे आधीच येऊन थांबतात.बेल वाजवून मी आलो आहे. सावकाश आवरा काही घाई नाही.असे सांगतात..लगबगीने सामान घ्यायला येतात. कधी चहा घ्यायला थांबा म्हटले कि मात्र घाई करतात.कधीच थांबत नाहीत.मृदू आवाजात नम्रतेने बोलतात.

आमच्या साठी अडीनडीला उपयोगी पडणारा,आधार देणारा हा घरचा माणूस आहे.

 




Sunday, 12 September 2021

आनंदी वृद्धत्व - ७

               या ग्रुपवर एका लेखाद्वारे एकट्या पुरुषांनी राहण्याविषयी चर्चा झाली होती. मला आमचे कलबागकाका आठवले आणि त्यांच्याबद्दल लिहावेसे वाटले ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे वाटले.                         

                                                        आनंदी वृद्धत्व - ७

                ' परंतु यासम हा' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे आमचे कलबाग काका होते. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान.उर्जा स्त्रोत,तन,मन धनानी  पार्किन्सन्स मित्रमंडळाशी  एकरूप झालेले कलबागकाका म्हणजे जेष्ठ शुभार्थी नारायण कलबाग.असा माणूस होणे नाही.आज ते आपल्यात नाहीत पण ९६ वर्षे ते आनंदात जगले.पर्किन्सन्सही त्यांच्या आनंदाला रोखू शकला नाही.यांचे ३० सप्टेंबर २०२० ला ९६ व्या वर्षी निधन झाले.तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.तरीही ते सेन्चुरी नक्की करतील असे वाटत होते.त्यांच्याशी अजून किती तरी विषयावर बोलायचे होते सर्व राहून गेले.माझा शेवटचा फोन lock down च्या काळात झाला.

                   .त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका  एकटेच राहात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत  नाही तर इतरांनाही मदत करत.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला होता. त्यानुसार दिनचर्या आखली.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली.या सपोर्ट सिस्टीममध्ये मुंबईचा भाचा,कॅनडाची भाची,मसाजवाला,कामवाली,तिची मुलगी,काही काळाकरता येणारा केअरटेकर,पीवायसीच्या कॅन्टीन मध्ये गप्पा मारायला भेटणारे मित्र.असे अनेकजण होते.आमचा सपोर्टग्रुपही त्यात असावा.सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.कधी गोकर्ण,कारवार असे गाडी करून जात.आळंदी देहूला जात.

                 ते भांडारकररोडला राहात.सकाळी  रिक्षाने वैशालीत जाऊन ब्रेकफास्ट करत. ते त्यांना पचनाला त्रासदायक वाटायला लागले.नंतर यात त्यांनी बदल केला.मुंबईच्या भाच्याकडे ते आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा ब्रेकफास्ट ठरवायचे.यात सूप sandwich,इ.हलका आहार असायचा. भाचा स्वीगीवरून तो बुक करायचा. 

                          Lock down काळात त्यांच्याकडे येणारा मसाजवाला सकाळी थोड्या वेळासाठी आणि रात्री येणारा केअर टेकर येत असेल का अशी काळजी मला वाटत होती..म्हणून चौकशीसाठी सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.

             मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची भारतात आलेली होती.ती काही दिवस राहिली आणि आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो.हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र नव्हते,त्यांचा टीव्हीही बिघडलेला.दुरुस्तीसाठी कोणाला बोलावणे शक्य नव्हते.याबाबत त्याना काही खंत नव्हती.ते सांगत होते माझी कॅनडाची भाची दोन वेळा भारतातल्या सर्व हकीकतीच्या बातम्या वाचून दाखवते.त्यांच्याकडे सर्व गोष्टीची त्यांच्या पद्धतिची सोल्युशन असायची.

                              त्यांच्या फोनच्या डीपीवर आमच्या मंडळाच्या सहलीच्या वेळचा वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असतानाचा फोटो होता. ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईत असले तरी मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येत.सह्लीना येत.
                          मंडळात ते सामील झाले तेंव्हा बहुदा त्यांची  ८५ वर्षे उलटून गेली होती.मध्यंतरी आता हयात नसलेल्या जुन्या शुभार्थीच्या घरी जाऊन भेटी द्यायचे ठरले कलबागांची पत्नी पेशंट होती.शेखर बर्वे त्यांच्या घरी गेले तर कलबागांची भेट झाली.ते म्हणाले मला आता पार्किन्सन्स झाला आहे मला मंडळात सामील करून घ्या.ते सामील झाले आणि आमच्यातलेच झाले.सभेच्यावेळी फार बोलता येत नसे पण सहलीत गप्पा होत. त्यांचे नवनवीन पैलू तुकड्यातुकड्याने समजत गेले.त्यांच्या तरुणपणातील मुंबईच्या साहित्यिक,सांस्कृतिक, वैद्यकीय,शैक्षणिक वर्तुळात त्यांचा संचार होता.त्या काळाचा ते चालताबोलता इतिहास होते.आचार्य अत्रे,विजय तेंडुलकर,वसंत देसाई अशी बुजुर्ग मंडळी त्यांच्या उठण्या बसण्यातील होती.वसंत देसाई यांच्या कार्यक्रमात ते सहभाग ही घेत असत.
                          .त्यांनी न्यूरॉलॉजिकल आजारावरची वृत्तपत्रातील, मासिकातील कात्रणे काढून ठेवली होती.ती वेगवेगळ्या आजारानुसार लावून ठेवली होती.ती त्याना आमच्याकडे सुपूर्द करायची होती.त्यांच्याकडे येणाऱ्या केअरटेकरच्या मुलीची शिक्षणासह सर्व जबाबदारी त्यांनी घेतली होती.ते दीडदोन तास सलग बोलायचे.दमतील म्हणून त्याना थांबावावे लागायचे.
                         माझे नाव त्याना आठवायचे नाही मग ते डॉक्टर म्हणायचे.२०१९ सालच्या सहलीत दुपारी कोणाला आराम करायचा असेल तर वेळ ठेवला होता.कलबाग म्हणाले डॉक्टर जरा बसा बोलायचे आहे.मला त्यांनी विश्रांती घ्यावी असे वाटत होते.पण गप्पा हीच त्यांची विश्रांती असावी.बसमधून येताना त्याना छोटी छोटी गावे दिसली.आय.एम,ए.चे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे त्यांचे Family Doctor. त्यांच्याशी बोलतो हे फॉर्म हाऊस छान आहे येथे डॉक्टर्सची मिटिंग घेऊन आजूबाजूच्या गावातील वैद्यकीय प्रश्नांचा  आढावा घ्यावा.ते प्रश्न सोडवावे असा त्यांचा विचार होता.त्यासाठी फार्महाउसचा फोन नंबरही त्यांनी घेतला.आम्ही बसमधून येताना गमती जमती करत होतो पण हा अनेक आजार असलेला ९५ वर्षाचा तरुण भोवतालच्या खेड्यांचा विचार करत होता.त्यांची यासाठी पैसे खर्च करायची तयारी होती. त्यांच्याविषयीच्या आदरानी मी नतमस्तक झाले.असे क्षण त्यांनी वेळोवेळी दिले.नंतर त्यांच्या  डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली.ते बरेच दिवस भाच्याकडे मुंबईला होते.हा विषय मागे पडला असावा.
                          सोमवार ११ डिसेंबर ला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती  कलबागकाकांचा  फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले..ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान  कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
                              त्यावर्षी आम्ही एप्रिलमधील जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात कलबाग काकांचे इशस्तवन ठेवायचे ठरवले. आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर (केअरटेकर) असा इशस्त्वनात सहभाग असायचा.आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असल्याने.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते. सकाळी त्यांचा फोन आला.'मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?'त्याप्रमाणे ते आलेही.
                                  ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले'.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला  तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील' असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते   त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.प्रमुख पाहुणे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
                       त्यांच्याकडे सांगण्याजोगे  खूप होते..कोणीतरी त्यांच्याशी  बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.त्यांच्या दिनचर्येचा व्हिडिओ केंला पाहिजे असे आम्हाला  वाटत होते.पण सर्व राहूनच गेले याची फारफार हळहळ वाटते.
.आपल्या परिवारातील वडिलधारे माणूस गेल्याची भावना आम्हा सर्वांच्याच मनात आहे.कलबागकाका आमच्यासाठी तुम्ही कायम प्रेरणा स्थान राहाल.