Sunday, 5 March 2017

आमचा हास्य परिवार - विविधतेतून एकता

                   आमची नव चैतन्य हास्ययोगपरिवारची   भिमाले उद्यान शाखा क्रमांक १४५ बघता बघता  १० वर्षाची झाली..शाखेचे जवळजवळ १३० सभासद पटावर आहेत.सर्व सभासद रोज हजर नसले तरी सहली,वर्धापनदिन,कोजागिरी कार्यक्रम यावेळी बहुसंख्य हजेरी लावतात.  शिवाय आमचे शिक्षक आणि संघटक एकनाथ सुगावकर गमतीने ज्याला एक्स्टर्नल सभासद म्हणतात असे बागेत वेगवेगळ्या कारणासाठी येणारेही आमच्या उपक्रमात सामील होत असतात.आमची शाखा विविध कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे गावातील कोलाहल,गर्दी,वाढती रहदारी,प्रदूषण यापासून दूर असलेल्या विस्तीर्ण बागेत शाखा भरते. बागेत प्रवेश करताच कोणाचेही मन प्रसन्न होऊन जाते.यामुळेच बहुता  काटे सराना  हास्यक्लबची सीडी या उद्यानात करावीशी वाटली.
                  कोणताही  ऋतू,सणवार या कशाचीच शाखा सुरु राहण्यासाठी आडकाठी येत नाही.पाऊस,सण असल्यास संख्या कमी असेल पण बंद नाही.शाखेची सहल असली तरी सहलीला न येणारे जमून व्यायाम करतात.
                  कार्पोरेटर सभासद असलेली आमचीच शाखा असावी.श्रीनाथ भिमाले आणि वंदना भिमाले प्रथम पासून सभासद आहेत.सुरुवातीला ते रोज हजर असायचे आता कार्यबाहुल्यामुळे शक्य होत नाही.
                   महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परिवार शब्द फक्त  नावापुरता नाही. वर्षे वाढली तशी केवळ व्यायामासाठी एकत्र येणे न राहता नातीही दृढ होत गेली.खऱ्या अर्थाने परिवार झाला.वाढदिवस लग्नाचा पन्नासावा वाढदिवस उत्साहात साजरे केले जातात.नातवंडांच्या यशाचा आनंद वाटला जातो.उत्सवमुर्तीबाबत इतर सभासद भरभरून बोलतात.किरण गांधी,पुष्पा देशपांडे सुंदर कविता करून देतात.फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे करून आनंद मिळणार नाही तेव्हढा येथिल जिव्हाळ्याने मिळतो.सभासदांना पुरस्कार मिळाले,की त्याचे कौतुक केले जाते. प्रत्येकाच्या सुखदु:खाच्या क्षणी,आजारपणात  इतर सभासद पाठीशी उभे राहतात.एखादा सभासद आजारातून उठून खूप दिवसांनी येतो सर्वजण त्याच्याभोवती गोळा होतात. आमच्याबाबतीत सांगायचं तर गेले काही दिवस मुलगी आणि जावई आमची आजारपणे पाहून आमच्याकडे राहायला चला म्हणत होते.आमच्या  मुलीने  ह्यांचा हास्यक्लबमध्ये पंचाह्त्तरावा वाढदिवस साजरा केलेला पाहिला.किती मोठ्ठा परिवार आमच्याबरोबर आहे हे तिने पहिले आणि आपल्याकडे ये म्हणणे बंद केले.मध्यंतरी गांधी पतीपत्नीनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस थाटामाटात साजरा केला.निमंत्रीतात त्यांच्या नातेवाईकांपेक्षा हास्यक्लबचे लोकच जास्त होते.         
                  आमच्या शाखे इतकी विविधता इतरत्र कोठेच नसेल सभासदात तरुण, जेष्ठ नागरिक असे विविध वयाचे स्त्री पुरुष आहेत.निरक्षरापासून  पीएचडीपर्यंत शिक्षण असणारे  आहेत. वकील,डॉक्टर,अभियंते,गृहिणी,उद्योजक.व्यापारी,प्राध्यापक,शिक्षक,सरकारी कर्मचारी,चार्टर्ड अकौंटंट,शेतकरी  अशी व्यावसायिक विविधता आहे.आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या स्तरातील आहेत.विविध जातीधर्माचे लोक आहेत.मराठी भाषिक बहुसंख्य असले तरी मराठी न येणारे इतर भाषिकही आहेत.         
  अशा विविध पातळ्यांवर  विविधता असली तरी त्यातून निर्माण झालेली एकता महत्वाची    आहे. ही विविधता आणि त्यातील एकता  आकडेवारी पुरतीच मर्यादित नाही तर सभासदांचे परिवाराशी आणि परस्पराशी जवळीकीचे नाते असणारी आहे.सहली,विविध समारंभातून,कौटुंबिक कार्याला सगळ्यांच्या जाण्यातून,सभासदांच्या सुखदु:खात सामील होण्यातून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जायचे असल्यास एकमेकांना सहकार्य करण्यातून ही नाती वृद्धिंगत झाली.हास्याच्या शेवटी असणारी शाबासकी सर्वांनाच आवडते.त्यातून होणारा स्पर्श प्रेमाची उब वाढवतो.    
            व्यायामाची वेळ ६.३० ते ७.३० आहे.पण व्यायाम संपला तरी अनेकांची पावले बागेत रेंगाळत असतात.राणी राजानी, पुष्पा देशपांडे,किरण गांधी,कुमुद नरांजे बागेला एकत्र फेऱ्या मारतात.कठड्यावर सावित्री पंजाबी,हिरा जगताप,यशोदा खंडेलवाल,शमीम बागवान या गप्पा मारत उन खात असलेल्या दिसतात.
कुसुम डीकोळेनी पायी पंढरपूर वारी केलेली असते त्यांना अनुभव सांगण्याची विनंती केली जाते.शमीम बागवान हाज यात्रा करून येतात. पाय सुजलेले असतात पण सर्वाना तेथून आणलेले पवित्र पाणी आणि खजूर देण्यासाठी आवर्जून येतात.आपले अनुभव सांगतात, गजराज .दोषींनी मधल्या वेळेत सांगितलेले जैन मुनींचे विचारही  ऐकले जातात.सध्या अमेरिकेला गेलेली ख्रिस्तिना सर्वाना केक देऊन ख्रिसमस साजरा करते.असा सर्वधर्म समभाव असतो.
                  हास्यक्लबमुळे आरोग्यविषयक फायदे होतात,आत्मविश्वास वाढतो,मानसिक आरोग्य सुधारते.मधल्या वेळेत होणाऱ्या चर्चातून सामजिक,राजकीय,सांस्कृतिक,कायदेविषयक,पर्यावरणविषयक ज्ञान मिळते.या सर्वापेक्षाही मला जास्त महत्वाचे वाटते ते.आज परस्परातील नाती दुरावत असताना हास्यक्लबमुळे ती जोडली जात आहेत,माणसामाणसातला संवाद वाढतो आहे.राष्ट्रीय एकात्मतेला पूरक वातावरण तयार होत आहे.ही चळवळ सुरु करणारे काटे सर आणि सुमनताई यांना सलाम.





Tuesday, 3 January 2017

लावा भांड्याला कल्हई

                          
 


 
                                                  
         घरोघरी आता तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झाली आहेत.त्यामुळे त्यासाठी लागणारी  कल्हई करणारा  कल्हईवालाही दिसेनासा झाला आहे.आमच्या लहानपणी खानापूरला पाटलांच्या कपड्याच्या दुकानाशेजारी  कल्हईवाल्याच दुकान होत. भांड्याची  कल्हई गेली की जायचं तिथ.पुण्यात आल्यावर पितळेची भांडी फारशी नव्हती.सासू सासरे शहापूर सोडून पुण्यात आल्यावर त्यांच्याबरोबर पितळेची भांडीही आली.आम्ही अजून ती वापरतो.त्यात पदार्थ बराच वेळपर्यंत गरम राहतो. आमच्याकडे येणाऱ्या अनेकांना त्याच अप्रूप वाटत.पूर्वी एक काम करणाऱ्या बाई होत्या. त्यांना त्याची कटकट वाटायची ही सगळी भांडी मोडीत का घालत नाही? अस त्या म्हणायच्या. आताची माझी मदतनीस जया मात्र याबद्दल कधी कुरकुर करत नाही.देव पूजेची तांब्याची भांडीही ती पितांबरीने चकचकीत करते.त्यामुळे मी तांब्या पितळेच्या भांड्याची ऐट करू शकते.सुरुवातीला एक कल्हईवाला आला. त्यांनी केलेली कल्हई ७/८ महिन्यातच गेली. गेली तीस एक वर्षे मात्र  इसाकभाई नावाचा चांगला कल्हईवाला मिळाला आहे.तीन चार वर्षे कल्हई टिकते.
                                    नुकताच हा कल्हईवाला येऊन गेला.नोटांचा काटकसरीने वापर करायचा म्हणून अत्यावश्यक गोष्टीवर खर्च करायचा ठरवलं होत.माझी कल्हई करायची सर्व भांडी दाखवल्यावर त्यांनी सातशे रुपये सांगितले मी मान्य केले.अशा दारोदार फिरून व्यवसाय करणाऱ्यांकडे घासाघीस करायला मला आवडत नाही.खर तर हे अत्यावश्यक मध्ये येत नव्हत.पण तरी ही,ही चैन करायचं ठरवल.दरवेळी तो आला कि मी आजूबाजूला,ओळखीपाळखीच्याना कल्हई करायची आहे का विचारते.कारण एखाद दुसऱ्या भांड्यासाठी कल्हईसाठीची सर्व मांडणी शक्य नसते.अशी भांडी यायचीही.पण यावेळी मात्र कोणाकडेच भांडी द्यायची नव्हती. काहीजण घरी नव्हते..कल्हईवाला मोठ्या आशेने  साहित्य ठेऊन गेला.आठ दिवसांनी मोकळ्या हाताने  गेला.मलाच वाईट वाटले.येथे हे सर्व देत आहे कारण आत्तापर्यंत त्याच्याकडे फोन नव्हता.संपर्क साधता येत नव्हता.आता मात्र फोन आहे.ज्यांना कल्हई करायची आहे त्यांना संपर्क साधता येईल.चकचकीत कल्हईची भांडी पाहून मिळणारे समाधान खरतर पैशात मोजता येत नाही.
इसाकभाई   ९६५७९४२५४२
     


Saturday, 10 December 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.

                   डॉक्टर वसुधा भंडारे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची समाज शास्त्र विषयातील विद्या वाचस्पती ( पीएचडी) पदवी मिळाली.अडचणींचा डोंगर पार करत संकटावर मात करत त्यांनी यशश्री खेचून आणली. मन:पूर्वक अभिनंदन! ६७ व्या वर्षी त्यांनी  मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे'.स्वेच्छां रक्त्दानासंबंधी पुणे शहरातील रक्तपेढ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास' असा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
. त्यांच्या जिद्दी बद्दल  २० ऑगस्ट २००४ .च्या केसरीच्या अंकात' कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची' असा लेख लिहिला होता.त्यात लिहील होत,."डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'"  माझ भाकीत त्यांनी खर करून दाखवलं.त्यांची धडपड इथेच थांबणार नाही.त्यांच्या भविष्यकालीन योजनात काही  पुस्तकांचे लिखाण आहे.          
  माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.
                                     भारतातील सामाजिक समस्या या विषयात वेश्या व्यवसायाच्या समस्येविषयी लिहायचे होते.त्यांच्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभव गाडीखान्यात काम करणाऱ्या कुसुम फुले यांना विचारावे म्हणून तेथे गेले होते.आमची चर्चा चालू होती.तेवढ्यात शुब्र वास्नातील गोऱ्यापान,प्रसन्न चेहऱ्याच्या परिचारिका तेथे आल्या.चर्चेत सहभागी झाल्या.'या वसुधा भंडारे' फुलेंनी ओळख करून दिली.चर्चेत त्याही सामील झाल्या.त्यांची निरीक्षणे,त्यांच्यासाठी काय करायला हवे हे सांगू लागल्या.या प्रश्नाविषयी आपल ज्ञान किती तोकड आणि पुस्तकी आहे असे मला वाटले..मी त्यांना म्हटल' खरे तर तुम्ही काम करणाऱ्या लोकांनी यावर संशोधन करायला हवे.'
                                    वसुधाताईनी एक सुस्कारा सोडला.क्षणार्धात त्यांचा प्रसन्न चेहरा उदास झाला.' खरे तर माझे पदवीचे स्वप्नही अपुरे राहिले आहे.उत्पध्यन्ते विलीयन्ते दरिद्राणा मनोरथा.'पुढे त्या म्हणाल्या,'तुमच्या विद्यापीठातून मुलासाठी माहिती पुस्तिका आणली होती.स्वत:हि प्रवेश घ्यावा असे वाटले होते.पण आता पन्नाशी जवळ आली आहे, स्वत:वर पैसे खर्च करायला नको वाटते'
                                   ' स्वप्न पुरे करायला वयाचा काही संबंध नाही.आमच्याकडे  ७५ वर्षाच्या गृहस्थानीही प्रवेश घेतला आहे.आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर मी तुमची फी भरते.जमेल तशी सवडीने परत करा.' मी त्यांना म्हटले.
                                    सात आठ दिवसांनी वसुधाताई फॉर्म भरून घेऊन आल्या.'तुम्ही येऊन गेल्यापासून खूप विचार केला.एक अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी फी भरायला तयार होते,तर आपण घेऊच प्रवेश असे ठरवले.पण मला जमेल ना हो?'
                                 ' न जमायला काय झाले? नक्की जमेल'.मी त्यांना म्हटले.वसुधाताईनी माझ्याकडून फीचे पैसे मात्र घेतले नाहीत.
                                    त्यांच्या भरगच्च दिनक्रमातूनवेळ काढून त्या मन लाऊन अभ्यास करत होत्या.शंका विचारायला येत होत्या.'मला जमेल ना हो' हे पालुपद मात्र सारखे चालूच असायचे.योग शिक्षक म्हणून काम करणे,नर्सिंगवर व्याख्याने देणे,होमिओपॅथी शिकणे असे इतर उद्योगही चालूच होते.तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला.त्या प्रथम श्रेणीत पदवीधर झाल्या.समाजशास्त्रा या विषयात  पहिल्या आल्या.त्यासाठीचे पारितोषिकही त्यांना मिळाले.
                                  आता त्यांच्या प्रतिभेला बहार आला होता.कथा लेख लिहिणे चालूच होते.त्यांच्या सर्व्हिसबुकमध्ये आता पदवीधर झाल्याची नोंद होणार होती.पगारवाढही होणार होती.पण नोकरशाही आड आली.'ही कुठली तुमची पदवी आम्ही नाही मानत' तिथल्या मग्रूर क्लार्कने सुनावले. खर तर अशी वेळ आली की विध्यार्थी निराश होतात. आक्रमक होऊन विद्यापीठात येतात.पदवीच्या सामाज्माण्यातेचे पत्र मागतात.पण वसुधाताईनी मात्र यातले काही केले नाही.त्यांनी शांतपणे माहिती पुस्तिकेतील शासन मान्यतेचे पत्र दाखवले.तरीही काम होत नाही म्हटल्यावर वरिष्ठांपर्यंत जाऊन तड लावली.
                               बी.ए. झाल्यावर त्या एम,ए.ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.आता त्या थांबणार नव्हत्या.टिळक विद्यापीठाच्या नेहरू विद्यास्थानात मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी प्रवेश दिला जातो.तेथेही त्यांची निवड झाली.अभ्यासक्रमाला उपस्थिती गरजेची असते.वर्ग दुपारी असल्याने नोकरी सांभाळून हजार राहणे त्यांना शक्य होणार होते.नोकरीचा व्याप,मुलीचे बाळंतपण,स्वत:चे आजारपण ही तारेवरची कसरत करत त्या जीद्दीने एम.फिल. पूर्ण करत आहेत.परीक्षेच्यावेळीमणक्याचा आजार उद्भवला.बाकावर बसने अशक्य झाले.विध्यापिथाने पाठीला आधार घेऊन बसता येईल असी स्वतंत्र व्यवस्था केली.एक निवृत्त परिचारिका त्यांच्या औषध आणि इंजक्शनचे पाहत होती.
                                डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'.






Monday, 2 May 2016

कुलकर्णी सर आणि मॅडम

                        कुलकर्णी सर आणि मॅडम,गेल्या काही दिवसात तुमची खूप आठवण येते.किती किती जणांना सांगितलं मी तुमच्या बद्दल. कदाचित पुन्हा पुन्हाही.
काय झाल आमच्या संगीतानंद क्लासच्या ज्योती देशमुख मॅडमनी यावर्षी 'संगीतकार एक रत्नपारखी' अशी स्पर्धा ठेवली.आठ गट होते. प्रत्यकाला एकेक संगीतकार दिले.३० मिनिटात ते संगीतकार उभे करणार प्रेझेन्टेशन करायचं. त्या संगीतकाराची माहिती ,त्यांनी संगीत दिलेली  गीते,संगीताची वैशिष्ट्य इत्यादी त्यात असण अपेक्षित होत.आमच्या गटाला वसंत देसाई आले.त्यांच्या संगीतातील विविधता अशी थीम घेऊन सादरीकरण करायचं ठरलं.गुगलवर शोधाशोध सुरु झाली.
शोधताना 'प्यारकी प्यास'ला त्याचं संगीत आहे आणि त्यात राष्ट्रीय एकात्मतेवरच 'किसका देश' हे गीत आहे हे लक्षात आल.जवळ जवळ १० मिनिटाच्या या गाण्यावर सर,मॅडमनी मी आठवीत असताना साधारण ६१/६२ च्या दरम्यान गॅदरींगसाठी नृत्यनाट्य बसवलं होत. त्यावेळी लक्षात आल नाही. पण आत्ता वाटत एवढ मोठ्ठ धाडस कस केल होत.बंगाल,महाराष्ट्र,मारवाड,गुजरात,तामिळनाडू विविध राज्ये भारत आपलाच आहे म्हणत भांडत आहेत. भारत माता प्रगट होते. ती गाण्यातून या सर्वांना आपापासात वैर करू नका अस सांगते आणि नंतर सर्व एकत्र येऊन 'हम एक है....दुनियाके आगे बात ये सौबार हम कहेंगे|' म्हणतात.यात ४० तरी  मुली घेतल्या होत्या.खानापुरसारख छोट गाव.पालक पाल्य हे शब्द तेंव्हा अस्तित्वात नव्हते. गॅदरींगच्या ड्रेपरीसाठी भले मोट्ठे खर्च करण शक्य नव्हत. पण या दोघांची कल्पकता एवढी होती,हाताशी असलेल्या साहित्यातून त्यांनी विविध प्रदेशाची ड्रेपरी उभी केली.एक उदाहरण सांगते.मी यात मारवाडी होते.घरात जुनी ठेवणीतली साडी ती रुंदीत दुडून त्याला मोठ्ठा मोठ्ठा धावदोरा घालून नेफा बनवला होता.त्यात बंद घातला होता.कडेनीही मोठठा धावधोरा घातला आणि मारवाडी घागरा तयार. 'घेरदार घागर लुभायो'ला गिरकी मारून बसल्यावर तो पसरायचा.इतक मस्त वाटायचं.छोटे कच्चे पेरू दोन्हीकडून घासायचे थोडा चपटा झाला,की मधला गर काढायचा, वर एक चीर पाडायची आणि बेगड लावायच. चांदीचे  मोठे रिंग तयार.त्यावेळी टेपरेकॉर्डर होते की ग्रामोफोनच्या रेकॉर्डवर गाण ऐकवल होत आठवत नाही पण आम्ही ते लिहून घेतलं नव्हत नक्की. ऐकून ऐकून
सर्वाना पाठ झाल होत कितीतरी दिवस तालीम चालू होती.आणि आश्चर्य म्हणजे आजही ते सर्व गाण मला आठवत होत.वसंतरावांच्या संगीताच एक वैशिष्ट्य, त्यांनी मराठी हिंदीबरोबर गुजराथी,इंग्लिश,तमिळ अशा विविध भाषातील चीत्रपटाना  संगीत दिल.सुब्बलक्ष्मीनी शंकराचार्यांचा संस्कृत श्लोक युनोत गायला त्याच संगीतही वसंतरावांच.त्यामुळे एक दुसऱ्या भाषेतलं गीत घ्यायचं ठरलं.मी 'बोन्धू रे...'हे बंगाली गाण  ऐकवल. सर्वाना ते खूप आवडलं.थोडा कोरस असल्याने इतरांसाठी पहिल्यांदाच कागदावर लिहील. वसंतरावांची इतर गीते युट्युबवरून रेकॉर्ड करून कितीतरीवेळा प्रॅक्टीस करावी लागली.पण हे गाण मात्र सहज बसल.हे गाण म्हणताना प्रत्येक वेळी तुमची आणि त्यावेळी केलेल्या धमालीची आठवण झाली.स्पर्धेच्यावेळी सर्वाना ते आवडलच. पण परीक्षकांनीही इतके कष्ट घेऊन बंगाली गाण बसवलं अस कौतुक केल.आम्ही काहीच कष्ट घेतले नव्हते. कष्ट तर त्यावेळी तुम्ही घेतले होते.उगाच कानकोंड्यासारख झाल.आम्हाला दुसरा नंबर मिळाला.खर श्रेय होत सर आणि मॅडम तुमच.ते तुमच्यापर्यंत पोचउन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन
प्रपंच.
वसंतरावांचा अभ्यास करताना ते  साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी होते हे लक्षात आल.त्यांची आठवण म्हणून त्यांनी बांधलेला मोगर्याचा गजरा त्यांनी आयुष्यभर त्यांची  हाताला बांधला.चांद्यापासून बांद्यापर्यंत देशभक्तीपर गीते शाळाशाळातून मोफत शिकविली.संस्कारक्षम वयात मुलांना देशप्रेम शिकवायला हव असा त्यांना वाटे.याच भावनेतून सर आणि मॅडमनीही हे राष्ट्रीय एकात्मता रुजवणार नृत्य बसवलं असाव. सर आणि मॅडमही सानेगुरुजी प्रेमी त्यांनी खानापुरला साने गुरुजी कथामाला चालविली.बेळगावहून कितीतरी वक्ते आणले जायचे.तुम्ही केलेल्या कितीतरी गोष्टींचा अर्थ आत्ता लागतो.आम्ही नशीबवान म्हणून तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले.

Wednesday, 6 January 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे.

                         गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)









Tuesday, 22 December 2015

डॉक्टर भारती विकास आमटे - सहवास हवासा.

            


फोटो सौजन्य : अरुण कुलकर्णी


   काही व्यक्तींच्या आपल्या आयुष्यात असण्याने खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटते.मला अस श्रीमंत करणार्‍या अनेक व्यक्ती आहेत.डॉक्टर भारती विकास आमटे हे त्यातलं एक महत्वाच नाव.खर तर भारती ताईंची आणि माझी ओळख ३/४ वर्षातलीच पण अस वाटत, अनेक वर्षापासुन आम्ही एकमेकीना ओळखतो.भारतीताईना मी प्रथम पाहिलं ते नोव्हेंबर २०११ मध्ये आनंदवनच्या माझ्या पहिल्या भेटीत.आनंदवन पाह्ण्याच कित्येक दिवसाच स्वप्न साठीनंतर पुर होत होत. जोत्स्ना ओकच्या  स्वरूप ट्रॅव्हलतर्फे आठ दिवसाची आनंदवन,हेमलकसा अशी सहल होती
                 पहिल्या दिवशीच गेस्ट कँटीन जवळच्या काचेच्या ऑफिसमध्ये डॉक्टर विकास आमटे यांच्याशी  विविध ठिकाणाहून आनंदवन पाहायला आलेल्यांची  भेट होती.टेबलभोवती गोल खुर्च्या मांडल्या होत्या.इस्त्रीच्या पांढर्‍याशुभ्र झब्बा पायजम्यात विकास आमटे अवतीर्ण झाले.ते आनंदवनात विकासभाऊ म्हणून ओळखले जातात.जोत्स्नाक्डून त्यांच्याबद्दल खूप ऐकल होत.ते आले,ते बोलले आणि त्यांनी जिंकले. अशी सर्व उपस्थितांची परिस्थिती होती. मलाही आनंदवनला आल्याचे श्रम सार्थकी लागले.आता पुढच काही नाही झेपल तरी काही वाटणार नाही अस वाटत होत.आनंदवनची  निर्मिती, बाबा, ताईनी त्यासाठी घेतलेले कष्ट स्वत: आणि भाऊ प्रकाश याचं बालपण,शिक्षण यावर ते  भरभरून बोलत होते.कोणताही मुलाहिजा न ठेवता समाजातील अनिष्ठ गोष्टी, राजकारणी,भ्रष्टाचारी यांच्यावर कोरडे ओढत होते.शेवटी गाडी स्वत:च्या लग्नावर आली.
                   धाकट्या भावाच्या प्रेमकहाणीत मध्यस्ती केली.विकास यांच्या लग्नासाठी मात्र जगदीश गोडबोले आणि पु.ल.देशपांडे यांनी रोहिणी मध्ये जाहिरात दिली'.बाबा आमटेना सून हवी'. रोहिणीने ती मोफत छापली.जात धर्माची अट नव्हती.डॉक्टर असण्याची मात्र अट होती.५०० रुपये मानधनावर कार्यकर्ता म्हणून नेमणूक होणार होती.पण कुणीही पुढे आले नाही.हे सांगत असतानाच एक शालीन,सोज्वळ सौंदर्याच प्रतिक अशा  स्त्रीने  प्रवेश केला. 'आल्या पहा आमच्या गृहलक्ष्मी ' असा विकासभाऊनी परिचय करून दिला.एम.बी.बी.एस.डॉक्टर आहेत गोल्डमेडल मिळवलं आहे.औरंगाबादचे माजी खासदार भाऊ वैशंपायन यांच्या त्या कन्या असल्याचीही माहिती दिली.औरंगाबादला लग्नाला जाताना बाबांनी खाजगी काम म्हणून आनंदवनची गाडी  न वापरता नटराज टूर्सने वर्‍हाड औरंगाबादला नेल.भारती ताईंची ही पहिली ओळख,दुरूनच झालेली.विकास भाऊंच्या बोलण्याच गारुड उतरलं नव्हत तरीही भारतीताईंचा नंदादीपासारखा शांत, अबोल वावर उपस्थितांवर प्रभाव टाकून गेला.

                   दुसर्‍यांदा  भारती ताईना पाहिलं ते याच सहलीत स्वरानंदवन या आनंदवनच्या ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर. आनंदवनच्या अद्ययावत आडीटोरियममध्ये आलेल्या पर्यटकांसाठी एक  दिवस या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो.भारती ताईंच वेगळचं रूप तिथ पहायला मिळाल.स्टेजवर दोन अंध मुलींबरोबर त्या आल्या. आणि  बाबांच्या  'ज्वाला आणि फुले ' मधील 'थांबला न सूर्य कधी थांबली न धारा' सुरेल आवाजात गायल.भारती ताईंबरोबर त्या मुली आणि इतर सर्वही घरातल्या व्यक्तीबरोबर वावराव तशा सहजपणे वावरत होते आनंदवनची ही खासियत आहे इथ कोणी लहान मोठ्ठ, मालक नोकर अस काही नसत.सगळ्यांच्या वागण्यात एक सहजता मोकळेपणा असतो हे पहिल्याच दिवशी लक्षात आल होत.
                  सहल संपवून परत निघायची वेळ आली.मन मात्र आनंदवनात रेंगाळत होत. आदल्या दिवशी जोत्स्ना, मी आणि माझी मैत्रीण निरुपमाला भारतीताईंच्याकडे घेऊन गेली. आम्ही त्याना आमच्या पुष्पौषधीच्या अभ्यासाविषयी सांगाव अस तिला वाटत होत.आम्ही मात्र जायला कचरत होतो.हा विषय शिकायला आम्ही आता कोठे सुरुवात केली होती. त्या मोठ्या डॉक्टर आणि आम्ही काय त्यांच्याशी बोलणार.पण प्रत्यक्ष भारतीताईंशी बोलताना सुसंवादाला कधी सुरुवात झाली समजलच नाही.भारतीताई अ‍ॅलोपाथीच्या डॉक्टर असल्या तरी इतर पूरक उपचारपद्धतीबद्दल त्याना उत्सुकता आहे.माहितीही आहे.पुष्पौषधीबद्दल त्यांनी आस्थेने चौकशी केली.आनंदवनाला पुष्पौषधी शिकवायला येण्याच आमंत्रणही दिल.
                  निघायच्या दिवशी भारतीताईंच तिसरच रूप पहायला मिळाल.आणि ओळख वाढत गेली तसतसे व्यक्तिमत्वाचे आवाक करणारे अनेक पैलू उलगडत गेले.निघण्यापूर्वी तासभर आधी आमच्यातील वंदना दगडाला ठेचकाळून पडली डोक्याला खोक पडली.विकासभाऊ आमच्या समवेतच होते. त्यांनी फोन केला आणि पाच मिनिटाच्या आत भारतीताई अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन हजर झाल्या. वंदनाला धीर दिला.हॉस्पिटलमध्ये नेऊन तातडीचे उपचार केले.आम्हा सर्वांसाठी त्याचं हे रूप आश्वासक होत.
                 पुण्याला परत आल्यावर कृतज्ञता म्हणून मी आणि निरुपमानी पुष्पौषधी वापरून तयार केलेलं एक किलो मलम -ज्याला आम्ही जादूच मलम म्हणतो ते तयार केल आणि जोत्स्नाच्या दुसर्‍या ट्रीपबरोबर पाठवले.बरोबर आनंदवन पाहून आम्हाला काय वाटले तो अनुभव सांगणारे पत्रही.लागलीच भारती ताईचे भेटकार्डासह  एक सुंदर अक्षरातले पत्र आले.त्यांनी पत्रात लिहील होत,
' तुमचे पत्र व सोबतची औषधे मिळाली.कृतज्ञ आहे.कै.ती.बाबा असच म्हणायचे की प्रभूचे हजार हात माझ्या कामाला लागले म्हणून एवढ काम उभं राहिल त्याचा प्रत्यय आम्हाला असा येत असतो.'आमच्या अत्यंत किरकोळ भेटीला त्यांनी इतक महत्व दिल होत.आनंदवनात तुमची भेट किती मोठ्ठी किंवा छोटी आहे यापेक्षा देणार्‍याच्या भावनाना महत्व दिल जात.
                 नंतर फोनवरही पुष्पौषधीसंबंधी बोलण होत राहील.निरुपमा आणि मी अस त्यासाठी आनंदवनला जाणार होतो.निरुपमा ६ महिन्यासाठी अमेरिकेला गेल्याने मी एकटीनेच जायचं ठरल.प्रवासाच्या बाबतीत मला एकटीने जाण्याचा आत्मविश्वास नव्हता.आणि इतके दिवस पार्किन्सन्स असलेल्या नवर्‍याला एकट सोडून जाणही प्रशस्त वाटत नव्हत. माझ्या नवर्‍यालाही आनंदवनला पुन्हा जाण आवडणार  होत.त्यामुळे त्यांनीही माझ्याबरोबर यायचं ठरलं.भारतीताईनीही' काही नाही जमेल तुम्हाला' हे इतक्या ठामपणे सांगितलं की मला नाही म्हणण शक्य झाल नाही.फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतीताई नेत्र शिबीर,इतर काही उपक्रमात व्यस्त होत्या.सलग निदान १० दिवस तरी याव अस त्याना वाटत होत.सर्वांच्या सोयीनी २९ फेब्रुवारी जाण्याची तारीख ठरली.गरीबरथच आरक्षण झाल.वर्ध्याला त्या गाडी पाठवणार होत्या. यांच्यासाठी व्हीलचेअर लागेल का? असही त्यांनी विचारलं.बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेऊन आस्थेनी विचारपूस करण्याची त्यांची वृत्ती नंतर वेळोवेळी प्रत्ययास आली.
                  वर्ध्याला आलो तर न्यायला गाडी आलेलीच होती. आमच्याच गाडीतून आनंदवनचे कार्यकर्ते आणि  तिथल्या अंधशाळेचे शाळेचे माजी प्रिन्सिपॉल कडू सर आले होते.ते थेट बसस्टँडवर चालले होते.आम्हाला न्यायला आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरनी त्याना बोलावलं.भारती वहिनींच्या पाहुण्या अशी आमची ओळख करून दिली.कडू सरांकडून वर्ध्याहून आनंदवनसाठी बस असल्याच समजल.ते ऐकून गाडी पाठऊ नका आम्ही बसनी येतो अस सांगायला पाहिजे होत अस वाटल.
                 लोटीराममध्ये २५ नंबरची रूम आम्हाला मिळाली होती.भारतीताईना फोन केला त्या म्हणाल्या'.तुम्ही आलात का पहायला आताच मी तिथ येऊन गेले.येतेच दोन मिनिटात' खरोखर दोन मिनिटात त्या आल्याही.त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये जाता जाता वाटेत स्वयंपाकघराशी थांबावं लागल.कामाच्या वाटणीवरून काहीतरी कुरबुर चालली होती.भारतीताईंनी चुटकीसरशी प्रश्न सोडवला.सगळेजण चुपचाप कामाला लागले.कॅन्टीनमध्ये चहा पोहे खाताखाता पुढील कार्यक्रमाची आखणी झाली.रोज संध्याकाळी ५.३० ला व्याख्यान द्यायचं ठरल.५.१५ ला त्यांचा फोन आला व्याख्यानापूर्वी लाईट काही खायचं आहे का? ५.२५ ला भारतीताई स्वत: न्यायला आल्या.मलाच अवघडल्यासारख झाल.या सर्वात कुठही उपचार नव्हता तर अगत्य आणि आपलेपणा होता.
                 लोटीरामला लागुनच असलेल्या श्री शिर्डी साईबाबा दवाखान्यात व्याख्यानाची सोय केली होती.इथ भारती ताई वैद्यकीय अधिकारी आणि अ‍ॅडमिनीस्ट्रेटर  म्हणून काम पहातात.दवाखान्याच्या बाहेर सुंदर हस्ताक्षरात बोर्ड लिहून ठेवलेला होता.खोलीत सतरंजा अंथरलेल्या होत्या.काही खुर्चा ठेवलेल्या होत्या.टेबलवर आनंदवनातील फुलांची फुलदाणी.आत शिरल्या शिरल्या मन प्रसन्न झाल.इथ अनेक उपक्रम सतत चालू असतात भारतीताईंच्या हाताखाली कार्यक्रमांच नियोजन करण्यात मंडळी तयार झाली आहेत.प्रत्येक गोष्टीत भारतीताईंच बारीक लक्ष असत.
                 व्याख्यानाला विविध क्षेत्रातील विविध वयोगटातील स्त्रीपुरुष होते.इंजिनिअर, होमिओपथी डॉक्टर,शिक्षक,गृहिणी,व्यावसायिक; मुख्य   म्हणजे भरपूर वाचन असलेल्या,पर्यायी उपचार पद्धतीचे ज्ञान असलेल्या विदुषी डॉक्टर भारतीताई.त्यांच्या असण्याच मनावर दडपण होत.त्यासाठी पुष्पौषधीमधील लार्च,मिम्युलस,व्हाईटचेस्टनट ही औषधे मी स्वत: घेतली होती.सुरुवातीला ओळखी झाल्या.माझा प्रवासाचा शीण अजून गेला नव्हता. व्याख्यान देताना  थकवा येऊ नये म्हणून मी पाण्यात पुष्पौषधीमधील ऑलिव्हचे थंब टाकणार होते.सर्वांच्या देखतच मी ते टाकले आणि विचारल ' कुणाला थकवा वाटतो का?कोणी स्वत:वर प्रयोग करायला तयार आहे का?' भारतीताईनीच हात वर केला.त्यांच्या पाण्यात थेंब टाकले.त्याना छान वाटले.मग रोजच त्या पाण्यात ऑलिव्ह घालू लागल्या.त्यांच्या असण्याने व्याख्यानाची रंगत वाढत होती.विविध शारीरिक आजार आणि अ‍ॅनॉटॉमीवर त्यांच्या कडून इनपुट मिळत.यात तज्ज्ञ असल्याचा भाव कोठेही नसे एक जिज्ञासू  विद्यार्थिनी म्हणून त्या व्याख्यान ऐकत..हळूहळू त्यांच्या बद्दलची भीड चेपून मैत्रीत कधी रुपांतर झाल समजलच नाही.
                       व्याख्यान संपल्यावर.कॅन्टीनकडे चाललो होतो.विकासभाऊंच लेक्चर सुरु होत. भारतीताई दिसल्यावर त्यांच्याकडे माईक देऊन ते दुसर्‍या कामाला निघून गेले.थकलेल्या भारतीताईनी समर्थपणे पुढे संभाषण चालू केल.आनंदवनमध्ये अस पडेल ते काम प्रत्येकजण करत असतात.
                        दुसर्‍या दिवसापासून भारतीताईंबरोबर ओपीडीत बसण सुरु झाल.हा एक समृद्ध करणारा अनुभव होता.सल्ल्यासाठी येणार्‍यात अंध,मुके,बहिरे,अपंग,लहान मुले,वृद्ध  असे विविध पेशंट होते.एका मुकी मुलगी काय सांगते आहे ते त्याना समजत नव्हत. मग रांगेत असलेल्यांपैकी मुकबधीर शाळेत काम करणार्‍या बाई  होत्या त्याना त्यांनी बोलवून घेतलं.मध्ये रजा मागायला एक बाई आल्या.तिला रजा मिळणार नाही सांगितलं तरीही तीने रजा द्याना अस टुमण लावलं होत. आणि भारतीताई त्यांच्या म्हणण्यावर ठाम होत्या. आणि गेलीस तर पुन्हा यायचं नाही असही बजावलं.आनंदवनातील प्रत्येक व्यक्तीबद्दल कोण कामाच आहे, कोण चुकार आहे, कोण बहाणे करत,कोणाला कस हाताळायच, कोणाबद्दल किती  सहानुभूती बाळगायची याच नेमक भान त्याना असल्याच पुढे विविध प्रसंगातून लक्षात आल.मध्येच   अर्टीफिशिअल लिंब सेटरचा माणूस आला त्यांचे प्रश्न सोडऊन झाले.एकीकडे पेशंट तपासण सुरूच होत. अ‍ॅलोपाथीच्या औषधाबरोबर आहारविषयक सल्ला,कोणाला तुळस,मध अशी घरगुती औषध,आवश्यक तेथे ताबडतोब वर्ध्याला सेवाग्राममध्ये जाण्याचा सल्ला त्या देत होत्या.यातच मधून मधून माझ्याशी चर्चा.भारतीताईंची आपल्या विषयावर उत्तम पकड आहे.एम.बी.बी.एस. करताना उत्तम शिक्षक मिळाल्याने हे साध्य झाल अस त्या सांगतात.विषयावर उत्तम पकड असल्याने अ‍ॅलोपाथीच्या सामर्थ्याची आणि मर्यादांचीही त्याना जाणीव आहे.
                        रोज ओपीडीत नवनवीन किस्से असायचे.औषधोपचाराबरोबर न्यायदान,विवध समस्या सोडवण चालू असत. हे करताना त्या तडजोड स्वीकारत नाहीत काही कठोर निर्णय घ्यायचे झाले तर ते काम भारतीताईंकडे येत.एकदा ओपीडीत नेहमी शांत असणार्‍या भारतीताईंच चंडीच रूप पहायला मिळाल.एक विवाहित स्त्री तक्रार घेऊन आल्या होत्या.कामावरून परतताना आनंदवनात काम करणारा एक माणूस तिची छेड काढत होता.तिचा नवरा आणि ती तक्रार घेऊन आली होती.भारतीताईनी त्या छेड काढणार्‍या माणसालाही बोलऊन घेतलं.तक्रारीबद्दल शहानिशा केली.झाल्या प्रकाराने त्या खूप चिडल्या होत्या.म्हणाल्या, 'बाबा असते तर त्यांनी तुला ताबडतोब हाकलून दिल असत.- बाबा असते तर हे वाक्य त्यांच्या बोलण्यात नेहमी  येत असत.त्याचा या महिन्याचा पगार न देण्याच फर्मान निघाल.मंडळी निघून गेली.लगेचच त्या शांतपणे पुढच्या पेशंटकडे वळल्या.
                       त्यांच्यातल्या डॉक्टरबरोबर संवेदनाशील आणि अगत्यशील माणूस सदैव जागा असतो.डॉक्टर लहाने यांच्या  नेत्र शिबिरात इतरांबरोबर रात्रंदिवस स्वत: काम करूनही न थकता या सर्वाना आग्रहाने चार घास खाऊ घालतील,माझ्यासारख्या सर्व सामान्य व्यक्तीच्या गरजांकडेही तितक्याच ममतेने लक्ष घालतील.माझ्या मुक्कामात मला हा प्रत्यय वेळोवेळी आला.मार्च महिना.उन्हाळा सुरु झाल्याच्या खुणा शरीर दाखवत होत.माझ्या डोळ्याची आग होत होती.भारतीताईनी गुलाबाच्या पाकळ्या पाठवल्या.पाण्यात टाकून त्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल.बाटलीतून ताकही पाठवलं.पोटात आग पडल्यासारखं वाटत होत.'.कॅन्टीनमधल जेवण तुम्हाला तिखट पडत. उद्यापासून उत्तरायण(आनंदवनमध्ये वृद्धांसाठी असलेली व्यवस्था.)मधल्या लोकांच्याबरोबर तिथल्या स्वयंपाकघरात जेवायचं.' भारतीताईंची आज्ञा झाली.दुपारी दवाखान्यातील भारतीताईंचे सहकारी विठ्ठल आले..'भारतीताईनी मड थेरपी करायला सांगितले.' म्हणत त्यांनी ती केलीही..भारतीताईनी सहकार्‍यानाही पूरक उपचार करण्यात योग्य त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवून किंवा आनंदवनात तज्ज्ञ बोलवून तयार केल आहे.स्वत:ही निसर्गोपचार,होमिओपाथी,रेकी,अ‍ॅक्युप्रेशर यांचा  अभ्यास केला आहे.त्या योगशिक्षकही आहेत.आधुनिक वैद्यकाच बोट केंव्हा घट्ट धरायचं. पूरक उपचार केंव्हा,आणि किती वापरायचे याचे त्याना ज्ञान आहे. आणि भानही आहे.लेक्चर संपउन परतताना होणार्‍या गप्पातून त्यांची ही बहुश्रुतता लक्षात यायची.
                                     एकदा अशाच गपा चालल्या होत्या आणि त्या एकदम थबकल्या.'तुम्हाला सुगंध आला?' मी नकारार्थी मान हलवली.त्या मात्र तो सुगंध भरभरून घेत होत्या.तो कोणत्या फुलांचा आहे ते सांगत होत्या.त्यावेळचा त्यांचा खुललेला चेहरा अजून मला डोळ्यासमोर येतो.हल्ली त्यांची  फेसबुकवर अनेक  छायाचित्र असतात.ती पाहून माझ्या मेंदूने क्लिक केलेल्या त्यांच्या अशा विविध भाव मुद्रा माझ्या डोळ्यासमोर येतात आणि एवढ्या मुक्कामात मी त्यांचा एकही फोटो काढला नाही याची खंत  वाटते..त्याचं निसर्गाच आणि निसर्गाबद्दलच वाचन माझ्या हळूहळू लक्षात यायला लागल होत.त्याहिपेक्षा महत्वाच म्हणजे आपली पंचेंद्रिय,संवेदना किती बोथट झाल्या आहेत हेही समजत होत. त्यांच्याबरोबर वावरताना आपण किती खुजा आहोत आणि त्यांचा सहवास आपल्याला मिळतोय म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत अशा संमिश्र भावना असायच्या.त्यांच्या घरी ब्रेकफास्टला गेलेल्यावेळी त्यांच्या विविध पातळ्यांवरील व्यासंगाचा प्रत्यय आला.
                                रविवारी ओपीडी नसल्याने थोड निवांत होत.त्यांनी आम्हा दोघानाही घरी ब्रेकफास्टला बोलावलं.मुलगी शीतल, सून पल्लवी यांची ओळख झाली.भारतीताईंशी साहित्य,संगीत,सिनेक्षेत्र,समाजजीवन अशा विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा झाल्या.त्याचं वाचन अफाट आहे.पुस्तकांचा संग्रहही मोठ्ठा आहे.आमच्या जेष्ठ नागरिक संघात महिला दिनानिमित्त्त्याने एक कार्यक्रम ठेवला होता.आम्ही पुण्यात पोचणार त्यादिवशीच तो होता.सभासद महिलांनी कर्तुत्ववान महिला निवडून तिच्यावर बोलायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई निवडल्या होत्या. आनंदवनमध्ये कॉलेज असल्याने तिथ त्यांच्यावरची पुस्तक मिळतील अस वाटल होत.मी याबाबत भारतीताईना सांगितलं त्या म्हणाल्या' माझ्याकडे आहेत ना मी देते.'खर तर त्यांची जागा बदलल्याने पुस्तक शोधण जिकिरीच होत.त्यांच्या व्यापातून त्याना तो त्रास व्हावा अस मला वाटत नव्हत.त्याना मात्र यात आनंद वाटत होता.संध्याकाळपर्यंत त्यांनी या दोघींवरची भरपूर पुस्तक माझ्या पर्यंत पोचवली.मी काही फ्लॉवर रेमेडीवर पुस्तक नेली होती.संध्याकाळी त्या न्यायला आल्या तर पुस्तक वाचून परतही दिली.
                                 लोटीराममधून बाहेर पडलो तर प्रभाताई चाफेकर,बाबांच्या मानसकन्या आणि  त्यांचे पती आणि काही पुण्याची मंडळीं येत होती.भारतीताईनी तेथेच वाकून  नमस्कार केला.प्रभाताई त्यादिवशी व्याख्यानालाही आल्या.वीस वर्षापूर्वीच त्या पुष्पौषधी शिकल्या होत्या.तेंव्हापासून त्या यशस्वीपणे वापरही करतात.त्यांच्या कडून भारतीताईंच खूप कौतुक ऐकल.
                               दुसर्‍या दिवशी होळी आणि नंतर रंगपंचमीला वर्ग घ्यायचा नाही अस ठरत होत. पण सर्वाना पुष्पौषधीची आवड निर्माण झाली होती.सर्वजण म्हणाले होळीला सकाळी सहा  ते आठ आम्ही येऊ.रंगपंचमी तर सकाळीच संपते.त्यांमुळे काही प्रश्न नाही.भारती ताई म्हणाल्या,' होळीला मात्र मला लवकर निघाव लागेल पोळ्या करायच्या असतात.' हे सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.मलाही त्यांनी पोळ्या लाटायला आमंत्रण दिल.लोटीरामच्या जवळच स्वयंपाकघर आहे.आदल्यादिवाशिपासूनच पुरणाचा वास सुटला होता.
                             दुसर्‍या दिवशी सकाळी सहापुर्वीच दीपकशिव न्यायला आले'.भारतीताई येऊ शकणार नाहीत.त्याना बर नाही त्यांनी मला फोन करून तुम्हाला घेऊन यायला सांगितलं.' वर्ग सुरु झाला तर ५/१० मिनिटात भारतीताई आल्याच.'मला राहवलं नाही म्हणून आले' म्हणाल्या.पूर्णवेळ थांबल्याही.
                            लेक्चर संपवून मीही स्वयंपाकघरात जायच ठरवल.इथल  स्वयंपाकघर ऐसपैस आहे.डायनींग हॉल, खोल्या आणि महत्वाचे म्हणजे लोकांची मन - सगळच ऐसपैस आहे.
स्वयंपाकघरात भारतीताईंसकट अनेक स्त्रिया होत्या. आनंदवनातील होत्याच शिवाय पाहुण्या आलेल्या प्रभाताई,गितांजलीही होत्या. मोठा गॅस होता. डोश्याचा असतो तसा मोठा तवा होता. ५/६जणी पुरणाच सारण भरुन गोळा तयार करत होत्या. ५/६जणी पोळ्या लाटत होत्या. आणि एकटी पोळ्या भाजत होती. एकवेळी ५/६पोळ्या भाजल्या जात होत्या. हे करताना गाणी, गप्पाही.भारतीताईनी 'वक्तने किया क्या हसी सितम' म्हटलं.एका टीव्ही चॅनलचे लोक मुलाखतीसाठी आल्याने भारतीताईना मधेच जाव लागल. बघता बघता ९/१० किलोच्या पोळ्या झाल्याही. जेवण तयारच होत.उत्तरायणमधल्या जेष्ठ नागरीकांची १० वाजता जेवणाचची बेल असते. आम्हीही ११.३०ला पुरणपोळीच सुग्रास जेवण जेवलो.गरमागरम पुरण पोळीवर आनंदवनातच तयार झालेल साजुक तुप. मला हरबर्‍याच्या डाळीचा त्रास होतो म्हणून भारतीताईंनी लक्षात ठेऊन तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या त्या वाढल्या.
                               परतीचा दिवस जवळ आला.छान माहेरपणाच झाल होत.समारोपाच्या दिवशी डॉक्टर पोळ अध्यक्ष म्हणून आले होते.प्रभाताईही होत्या.कार्यक्रम हृद्य झाला.उगाच खोट खोट कौतुक नाही जे जस वाटल तस विद्यार्थी आपल्या मनोगतात सांगत होते.भारतीताईनी हा ग्रुप उत्तम नांगरणी  करून छान  तयार केलाय.त्यामुळे पेरलेल छान उगवत.फार थोड्या वेळात त्यांनी पुष्पौषधीच ज्ञान चांगल्याप्रकारे  आत्मसात केल.भारतीताईंमुळे त्यांच्यापर्यंत अस विविध प्रकारच ज्ञान येत याबद्दल त्याना कृतज्ञता वाटत होती.पाहुण्याना आणि आम्हाला दोघाना आनंदवनातल्या पानाफुलांपासून तयार केलेले पुष्पगुच्छ दिले.भारतीताईनी साडी आणि नारळांनी ओटी भरली.मला अवघडल्यासारखे झाले.प्रभाताई म्हणाल्या,'भारतींनी दिलेली साडी म्हणजे प्रसाद असतो.ती नेसल्यावर कोणतीही कामे सहजा सहजी होतात.'मी अशा गोष्टी मानणार्‍यातली नाही.पण ती साडी नेसली की मला मायेची उब जाणवते. कॉन्फिडन्ट वाटत.
                          निघायच्या दिवशी जेऊन दुपारी एक पर्यंत नागपूरला जायचं होत. भारतीताईंच्याकडे मुलीच्या सासरच्या कडचे पाहुणे आले होते.ते अह्दाबाद्ला जायचे होते.त्या गडबडीतही मी पर्किन्सन्स सपोर्ट ग्रुपचे काम करते हे माहित असल्याने त्या आनंदवन मधील १२व्या वर्षी जिला पीडी झाला आहे अशा मंजुळाला मला दाखवायला घेऊन आल्या होत्या.भारतीताई किती जणांच्या किती गोष्टी लक्षात ठेवतात याच मला अप्रूप वाटलं.गाडीत बसायच्यावेळी त्यांनी पटकन पोळीभाजीचा डबा दिला.तुम्हाला बाहेरच खाण झेपत नाही म्हणून दिला म्हणाल्या.वाटल होत आता पुन्हा भेट नाही व्हायची . पण आमचे काय ऋणानुबंध माहित नाही पुनःपुन्हा भेटी होत राहिल्या.
                          १ ऑगस्टला डॉक्टर विकास आमटे आणि प्रकाश आमटे याना मानाचा लोकमान्य पुरस्कार मिळाला.भारतीताईही आल्या होत्या.पुण्यात टिळकस्मारक मध्ये समारंभ झाला.मी आणि निरुपमा गेलो होतो.समारंभानंतर त्या सर्वाना भेटण्यासाठी झुंबड उडाली होती.आम्हीही गेलो.इतक्या गर्दीतही त्यांनी निरुपमा अमेरिकेहून कधी आली विचारल.माझा हात हातात घेऊन म्हणाल्या खूप बोलायचं आहे आता फोनवरच बोलू.
                         गणेश कलाक्रीडा मध्ये स्वरानंदवनचा दिवाळी पहाटचा  कार्यक्रम झाला.त्यात भारतीताईंचा सहभाग होता.स्वरानंदवनच्या उभारणीत त्यांचा हात आहे तसच तो उत्तम होतोय ना याकडे त्याचं बारकाईन लक्ष असत.कॉलेजजीवनात वक्तृत्व आणि स्टेज गाजविलेल्या ताईंच आनंदवनच्या कामात स्टेज मागेच पडल होत.३५ वर्षांनी मोठ्या समारंभाच्या स्टेजवर आल्याच त्यांनी सांगितलं.बाबांच्या आठवणीनी त्या सदगदित झाल्या होत्या. त्यांच्या  भावपूर्ण भाषणाने लोक प्रभावित झाले.मोगरा फुलला हे बाबाना आवडणार गीत त्यांनी गायलं.शेवटी त्या विलासभाऊ आणि स्वरानंदवनच्या चमूने गायलेल्या गाण्याने सर्वांची दिवाळी संस्मरणीय केली.आम्ही दोघे शेवटी त्याना भेटायला गेलो तर त्यांनी मला मिठीच मारली.याना वाकून नमस्कार केला.
                     फोनवर संपर्क असायचा.पुष्पौषधीचा उजळणी वर्ग घ्यावा अस त्याना वाटत होत.पर्किन्सन्सच्या लोकांची आम्ही आनंदवनला सहल नेणार होतो.निरुपमा आणि प्रकाश जोशी आमच्याबरोबर मदतीसाठी येणार होते सहलीला जोडून आम्ही दोघींनी उजळणी वर्ग घ्यायला जायचं ठरलं.पण त्यावेळी भारतीताईना नाशीकला जाव लागणार होत म्हणून आमचा उजळणी वर्ग रद्द झाला.आनंदवनात जायचं आणि भारतीताई नसणार याच वाईट वाटल.ठरल्याप्रमाणे आम्ही आनंदावनला पोचलो विकासभाऊंच व्याख्यान सुरु होत.आणि तेथे भारतीताईना  पाहून आम्ही चकितच झालो.काही कारणांनी त्या नाशिकला गेल्या नाहीत.जेवण घेऊन आमची सहल हेमलकसाला जाणार होती.भारतीताईंनी आम्हाला पुष्पौषधी उजळणीवर्ग घेण्यासाठी राहण्याचा आग्रह केला.सहलीला आलेल्या सर्वांनी आम्हाला परवानगी दिली.आम्हालाही .भारतीताईंचा सहवास हवाच होता.आम्ही दोघी राहिलो.भारतीताईंच्या सक्षम यंत्रणेद्वारे पटापट निरोप गेले. आणि व्याख्यानाला संध्याकाळपर्यंत १५/२० जण हजर झाले.काही जुने काही नवे.यावेळी त्या थोड्या हळव्या झाल्या होत्या.सून पल्लवी डिलिव्हरीसाठी माहेरी चालली होती बरोबर नात अस्मीही जाणार होती.अस्मीही सारखी त्याना चिकटून होती.पल्लवीची आई तिला न्यायला आल्या होत्या.या गडबडीतही आमच्या पार्किन्सन्स गटाला त्या आवर्जून भेटायला आल्या होत्या. पुष्पौषधी वर्ग सोडल्यास त्यांचा सहवास मात्र फारसा मिळाला नाही मिळाला नाही.ही उणीव त्यांच्या पुणे भेटीत भरून निघाली.
                                  गोंदवल्याला जाताना त्यांचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता आमच्याकडे रहायला आल्या.मला अजूनही हे स्वप्न असल्यासारखे वाटते.पूर्ण दिवस त्यांचा सहवास मिळाला.आमचा हास्यक्लब,गाण्याचा क्लास सर्वात त्यांनी सहभाग घेतला.खूप गप्पा झाल्या.गाण्याच्या क्लासमध्ये तर दोन गाणीही म्हटली.त्यांच्या साधेपणामुळे सर्वजण प्रभावित झाले.ज्वाला आणि फुलेची सीडी झाली आहे.त्यात त्यांची दोनगीते गायिली असल्याच चाली दिल्या असल्याच समजल.
                                   भारतीभारतीताईंच व्यक्तीमत्व खर तर चतुरस्त्र आहे.  उत्तम गायिका, संगीतकार, लेखिका, समिक्षक,संशोधक,वैद्यकीय क्षेत्रात शिक्षक अस कोणत्याही क्षेत्रात त्या अत्युच्च शिखर गाठू शकल्या असत्या. पण त्यांनी आनंदवनची सून बनून सर्व आयुष्य आनंदवनला देण पसंत केल.पडद्यामागे राहून आनंदवनच्या विविध कार्याची धुरा समर्थपणे पेलली.आता आनंदवनचा कारभार पहाण्यासाठी मुलगा, सून,मुलगी, जावई सज्ज झाले आहेत भारती ताईना  आपल्या आवडत्या छंदाना वेळ द्यायला फुरसद मिळू शकेल.आणि हे करण्यासाठी त्याना उत्तम आरोग्य लाभाव ही शुभेच्छा!
                       

                              

                        


                   
                 

Friday, 16 October 2015

अभिनंदनाच्या निमित्ताने

                                                 अभिनंदनाच्या निमित्ताने
                    माझी पासष्टी ओलांडलेली,मैत्रीण  प्रतिभा पारखे नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संस्कृत या विषयात एम,ए.'A' ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाली.'मन:पूर्वक अभिनंदन.' खूप दिवसाच स्वप्न, निवृत्तीनंतर.पूर्ण झाल.पोस्टासारख्या निरस ठिकाणी काम करूनही त्यांनी आपली रसिकता,वाचन वेड जोपासलं.पण व्याख्यानांना हजर राहण, परीक्षा देण शक्य नव्हत.त्यामुळे एम.ए. जमत नव्हत.निवृत्तीनंतरही अडचणी येतच राहिल्या.दु:ख,अडचणी,समस्या या प्रतिभाताताईंच्या पाचवीलाच पुजलेल्या.त्यात लष्करच्या भाकर्या भाजण्याची हौस त्यामुळे. प्रतिभाताईंच हे यश भल्या मोठ्या  अडथळ्याची शर्यतच होती.आम्ही सर्व पाहिलं आहे त्यामुळे या यशच अप्रूप.त्याचं एम.ए. होण आम्हीही एन्जोय केल.या काळात त्यांच्या भेटीगाठी दुर्मिळ झाल्या होत्या मग त्याना गाठण्यासाठी त्यानीच सुरु केलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयात.पुस्तक बदलायचं नसल तरी जायचं मग आमचा गप्पांचा फड जमायचा त्यांच्या अभ्यासातल्या, संस्कृत साहित्यातील अनेक गमती जमती समजायच्या  एम.ए. करताना, व्यक्ती म्हणूनही त्याचं विकसित होण आम्ही पाहिलं.
                  त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने त्यांचे सहाध्यायी,प्राध्यापक यांचही अभिनंदन करायचं आहे.कारण त्यांच्या  यशात  यांचाही मोठा   वाटा आहे.अनेकवेळा अभ्यासक्रम सोडून द्यावा अशी वेळ आली.पण हे सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहिले.त्याना मानसिक आधार दिला. पहिल्या वर्षानंतर पतीच्या निधनामुळे आता थांबू अस त्याना वाटत होत. पण या सर्वांनी हे होऊ दिल नाही .प्रवेश घ्यायची शेवटची तारीख होती.आता प्रवेश घ्यायचा नाही हे ठरऊन त्या विद्यापीठात गेल्या.पण प्राचार्य श्रीपाद भट म्हणाले, नाही .आता पैसे आणले नसले तर मी भरतो. पण प्रवेश घ्यायचा.सहध्यायानीही दुजोरा दिला.
                  टीमवीच्या संस्कृत विभागाने वाडा पडून उंच इमला झाला तरी, पर्सनल टच कायम ठेवला आहे हे पाहून मला आनंद झाला.भट सर आणि टीम लागे रहो!