Tuesday, 27 September 2022

स्मिता तळवलकर

                                     आभाळ पेलताना  - स्मिता तळवलकर

                   स्मिता तळवलकर यांनी १७ /१८ वर्षाच्या वयात कॉलेज शिक्षण घेत दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून पाउल ठेवले. बघता बघता उंच भरारी घेतली. नाटक, चित्रपट, टीव्ही, क्षेत्रात, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, वितरण अशी विविध क्षेत्रे यशस्वीपणे पादाक्रांत केली.दी स्मिता तळवलकर झाल्या. विशेष म्हणजे हे सर्व विवाहानंतर केले.दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ५९ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.त्यांचा जीवन प्रवास आणि आजाराशी लढा दोन्ही अत्यंत प्रेरणादायी आहे.

              या सर्व क्षेत्रात काम करताना दूरदर्शन काळात झालेले संस्कार त्या विसरल्या नाहीत.५ वर्षाच्या व्यक्तीपासून ८० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी एकत्रित बसून पहावे असे कार्यक्रम असावेत असा त्यावेळी दृष्टीकोन होता.काळ बदलला,स्पर्धा आली पण तरी कोणतीही तडजोड न करता सामाजिक भान,कलात्मक मुल्ये जपत नाटक,सिनेमा,टीव्ही सिरीयलची निर्मिती केली.मनोरंजनाबरोबर काही विचार दिला.'कळत नकळत' आणि 'तू तिथे मी' या त्यांच्या चीत्रपटाना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.अभिनिवेश नसताना निर्मितीतील इनोसन्सला हे अवार्ड मिळाले असे त्या म्हणाल्या. काही चित्रपट तोट्यात गेले. काही चालले.पण हताश न होता त्या नवनवीन देत राहिल्या.झोकून देऊन काम करत राहिल्या.'तू तिथे मी' च्यावेळी घरपोच तीकीट विक्री सुरु केली.अवन्तिका आणि इतर दूरदर्शन  मालिकाही गाजल्या.६ चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली.विस्तारभयास्तव नावे देत नाही.

                  लहान वयात विवाह झाला ४० माणसांचे एकत्र कुटुंब होते.तळवलकर कुटुंब व्यवसाय क्षेत्रातले.व्यायाम क्षेत्रात मोठे नाव असलेले,पुरोगामी होते.माणसांची आवड असल्याने लगेच या कुटुंबात  मिसळून गेल्या.कुटुंबाकडूनही त्याना कोणतेही काम करायला विरोध झाला नाही उलट मदतच झाली.निर्मिती संस्था काढल्यावर  स्पॉट बॉइजपासून अनेक काम करणार्यांचा त्यांच्या कुटुंबात सहभाग झाला.त्यांची त्यांच्या कुटुंबाची काळजी त्याना होती. सहवासात असलेल्या सर्वांचीच त्यांनी नेहमी विचार केला. कामाला त्या वाघ होत्या. नाटकाचे दौरे असो कि निर्मिती संस्थेचा सेट असो वेळ पडली तर पदर खोचून सर्वांचा स्वयंपाकही त्यांनी केला.अनेक व्याप सांभाळण्याची तारेवरची कसरत करताना त्या सदैव ताज्यातवान्या असत.फिजिकल आणि मेंटल फिटनेस बद्दल जागरूक असत.

                  निर्मितीचे,वितरणाचे काम तसे जोखामिचे.पैशाचे व्यवहार असत.एकदा एका अंडर वर्ल्डच्या माणसाने स्मिताताईंच्या च्या पोस्टर लावणाऱ्या माणसांवर हल्ला केला.या न घाबरता पोलिसात गेल्या.त्या दादाचे ह्रदयपरिवर्तन करण्यात त्या यशस्वी झाल्या असाव्यात.त्या माणसाने स्मिताताईना नंतर त्रास दिला नाही उलट आदराचे वर्तन ठेवले.आजूबाजूच्या सर्वात एकाच पुरुष आहे त्या म्हणजे स्मिता तळवलकर असे तो म्हणाला.आपल्या कामाने. प्रेमाने त्यांनी सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले.अनेकांसाठी रोल मॉडेल झाल्या.

                 त्या व्हिजनरी होत्या. पुढच्या पिढीचा विचार करून त्यांनी 'अस्मिता चित्र अकॅडेमी' हे अक्टिंग स्कूल चालू केले.स्पर्धेच्या जगात मुलांना अभिनय शिकवण्याबरोबर अपमान,नकार सहन करणे,यश अपयश पचविणे या गोष्टीही शिकवून  मानसिक दृष्ट्या सक्षम करणे त्याना महत्वाचे वाटले.                     २०१० साली त्याना कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यांच्या स्वत:च्या कुटुंबापेक्षा या विस्तारित कुटुंबाचे काय याची काळजी वाटली.बर्याच जणांनी घरासाठी कर्जे घेतली होती त्याचे हप्ते स्मिताताई भरायच्या.त्या ७/८ महिने तरी काम करू शकणार नव्हत्या तर निर्मिती संस्थेवर त्याचा परिणाम होणारच होता.या काळजीनेच मी आजारातून लवकर बाहेर आले असे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.भविष्यकालीन स्वप्ने पाहणे,संकल्प करणे त्यांनी सोडले नाही.

                 मनाचा खंबीरपणा, विलपॉवर, अध्यात्मिक  बैठक त्यांच्या मदतीला आली.माहिकारी या कोणतेही कर्मकांड नसलेल्या अध्यात्मिक संप्रदायाची कोणीतरी ओळख करून दिली.वैश्विक शक्ती घेण्याची थेरपी त्यांनी सहा महिने घेतली. त्याना बरे वाटल्यावर इतरांना अशी शक्ती देणेही त्यांनी केले. कॅन्सर, त्यासाठी घ्यावी लागणारी किमो त्यांच्या शरीराला दुर्बल करत गेले पण त्यांच्या मनावर हल्ला करणे या आजारालाही जमले नाही.आज त्या नसल्या तरी त्यांच्या हाताखाली सहवासात तयार झालेल्या अनेकांच्या कार्यातून त्यांच्या विविध कलाकृतीतून त्या प्रेरणा देतच आहेत.

              


Monday, 19 September 2022

आनंदी वृद्धत्व - ८

                                                आनंदी वृद्धत्व -८
 
                           आत्तापर्यंत या लेखमालेत ज्या व्यक्तींच्यावर लिहिले त्या व्यक्ती बाहेरच्या होत्या. आत्ता ज्या व्यक्तीवर मी लिहिणार आहे ती व्यक्ती २४ तास सहवासातील होती.ती म्हणजे माझे सासरे.त्याना आम्ही सर्वच नाना म्हणायचो.तीर्थहळ्ळी ही त्यांची जन्मभूमी आणि बेळगाव ही कर्मभूमी.बेळगावात त्यांची नारायण भटजी अशी ओळख होती.समाजात त्यांच्याबद्दल आदर होता.बेळगाव सोडताना त्यांचा मोठ्ठा निरोप समारंभ झाला.त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे,त्यांच्यावर लिहिण्याजोगे खूप आहे. येथे फक्त त्यांच्या आनंदी वृद्धत्वावर लिहित आहे.
                       बेळगाव सोडून आई आणि नाना ७८ साली पुण्याला आले त्यावेळी नाना ७८ वर्षाचे होते.त्याना डायबेटीस होता पण बाकी तब्येत छान होती.ते प्रथमच पुण्याला आले होते.सासुबाई मात्र त्यांच्या आजारपणात बरेच दिवस राहिल्या होत्या.त्यांची काळजी नव्हती.बेळगावला मोट्ठे घर.येथे दोन खोल्या त्यामुळे नानाच कसे काय राहणार असे आम्हाला वाटत होते.बेळगावात ते दिवसभर उधोगात असायचे.येथे काय करतील? तेथे सकाळी राममंदिर, मारुती मंदिरात पूजा, इतर भिक्षुकीची कामे असल्यास सायकलवर जात.घरी आल्यावर ज्योतिष विचारण्यासाठी अनेकजण येत.त्यात ते रमून जात. ज्योतिष हा त्यांचा छंद होता.कोणाला काय द्यायचे ते द्यावे.आलेले पैसे त्यांनी एक धर्मादाय खाते केले होते त्यात टाकत.ते घरासाठी वापरत नसत.येथे काय करतील?

                             नानांनी आमची भीती खोटी ठरवली.देश.काल,परिस्थितीनुसार राहायचे असे ते म्हणत आणि त्यांनी ते खरे करून दाखवले.बेळगावचे सोवळेओवळे येथे संपले.नाना पुण्यात आलेले ऐकून पुराणिक नावाचे भिक्षुकी करणारे गृहस्थ भेटायला आले.नानांची विद्वत्ता ते ऐकून होते.ते त्याना वास्तूशांती, नवग्रहहोम, मुंज,विवाह अशा कामाला घेऊन जाऊ लागले.नाना संस्कृत पंडित होते.प्रत्येक विधीचा अर्थ समजाऊन सांगत.गप्पात संस्कृत सुभाषिते अर्थासह सांगत.नानांच्यामुळे पुराणिक यांचा व्यवसाय वाढला आणि नानांचा वेळ जायचा प्रश्न सुटला.आता येथेही ज्योतिष विचारण्यासाठी अनेक जण येऊ लागले.

                १९८१ मध्ये सासुबाईंचा पाय गुडघ्यापासून काढावा लागला.घरच्या सगळ्यांच्या पत्रिका नानांच्या डोक्यात असत.यातून ती बाहेर येणार नाही आली तरी हाल आहेत त्यामुळे गेलेलीच बरी असे ते शांतपणे म्हणाले तेंव्हा मीच हादरून गेले.त्यांची भविष्यवाणी खरी ठरली.त्या गेल्यावर ते कोलमडतील असे वाटले पण तसे काही झाले नाही 'सुख दु:खे समेकृत्वा' अशी त्यांची वृत्ती होती.सासूबाई असेपर्यंत त्यांच्याशी सासऱ्यासारखेच नाते होते. त्या गेल्यावर मात्र आमच्यात हळूहळू एक वेगळेच नाते तयार झाले.

                 आमचे बंगल्याचे काम चालू झाले आणि  ८१ व्या वर्षी नाना रोज देखरेखीसाठी सायकलवर जाऊ लागले.ते गर्दीच्या रस्त्यावरूनही सायकलवर अनेक ठिकाणी जात.मला काळजी वाटायची ते म्हणायचे 'काही काळजी करू नको गो माझ अपघातात मरण नाही'.मी ज्योतिष शिकून घ्यावे असे त्यांना वाटे.पण माझा फारसा विश्वास नसल्याने मला शिकावेसे वाटत नसे.ते पत्रिका करत तेंव्हा काही गणिती कामे असत ती करायला त्याना मदत मात्र करत असे.

                  १९८२ मध्ये आम्ही बंगल्यात राहायला आलो.गोडाऊन मध्ये ठेवलेले सर्व जास्तीचे सामान आता घरात आले.यात  त्यांनी बेळगावहून आणलेली पुस्तकाची पेटी होती.ही पेटी आणण्यास सासुबाईंचा विरोध होता.त्यांच्याशी भांडून त्यांनी ती आणली होती.त्यांनी वर्षानुवर्षे जमवलेली ती पुस्तके होती.ती त्यांची खरी इस्टेट होती.पेटीला ते माझ्याशिवत कोणाला हात लावू देत नसत.यातली पुस्तके काढून वाचणे, माझ्याबरोबर चर्चा करणे,कधीकधी वादविवाद ही होत ते वैचारिक पातळीवरचे असत.तू काय वादात हरवणार नाही म्हणायचे. त्यात कौतुक असायचे.मला त्यांच्याबाद्दल यासाठी आदर वाटायचा.  मुलगा हवाच या वादात त्यांनी माघार घेतली.उलट माझ्या तिन्ही मुली त्यांच्या आवडत्या झाल्या. त्यांचे कौतुक ते सर्वाना सांगायचे.आता त्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्च स्थानावर आहेत तेंव्हा नानांची खूप आठवण येते.एका मुलीनी संस्कृतमध्ये M.A केले. ते असते तर तिच्या त्यांच्याशी छान चर्चा झाल्या असत्या.तिचे लोकमतमध्ये संस्कृत कणिका नावाचे सदर वर्षभर रोज येत असे.ते खूप खुश झाले असते.मुली,आम्ही दोघे आणि ते आमच्या सहा जणांची एक सुंदर हार्मनी झाली होती.

                स्वत:च्या जागेत आल्यावर ते जास्तच खुलले.त्याना कोणत्याही कामाची कधी लाज वाटली नाही.रस्ते नव्हते.खड्डे असायचे ते बुजवायचे.समोर स्वत: खड्डे खणून मोठ्ठी झाडे लावली. घराभोवतीही बाग केली.दिवसदिवस बागेत असत.आम्ही माळी लावायचा विचार केला तर संतापले.मी असेपर्यंत माळी लावायचा नाही म्हणाले.पायात काही न घालता काम करायचे त्याना डायबेटीस होता त्यामुळे पायाला काहीतरी लागेल याची आम्हाला भीती वाटायची.

            आम्ही नवीन जागेत रहायला आल्यावर धाकटीही शाळेत जाऊ लागली आणि माझे भारतीय शिक्षण संस्थेत एमफिलसाठी जाणे सुरु झाले.सकाळी ९.३५ ची बस गाठायला घरून ९ला निघावे लागे.मोठ्या दोघी माझ्याबरोबर शाळेला जाण्यासाठी बसला असत. धाकटी मात्र घरी असे.तिला शाळेत न्यायला शाळेचा शिपाई साडे दहाला सायकलवर येई. नाना असल्यामुळे मी बिनधास्त असायची. त्या आधी नानांचा ब्रेकफास्ट,त्यांना इन्शुलीन देणे,मुलींचे डबे,दुपारचे जेवण करावे लागे.नानांना माझ्यानुसार सकाळची दैनंदिन कामे करावी लागत.त्यांची त्याबद्दल तक्रार नसे,मी दुपारी घरी येई. नंतर आम्ही दोघे जेवायचो. मला उशीर झाला तर ते स्वत: वाढून घेत.बेळगावपासुनच त्यांना ती सवय होती. तेथेही ते चूल सारवणे.वैश्वदेवासाठी नैवेद्याचा भात करणे अशी कामे करीत.बायकांनी घरी राहून त्यांची खातिरदारी करावी असे त्याना वाटत नसे.

           टीमवीत Distance Education सुरु झाले.त्यासाठी प्राध्यापक हवे होते. मी सहज म्हणून अर्ज केला आणि माझी निवड झाली.नोकरीसाठी माझ्या नवऱ्याचा विरोध होता.नानांना त्रास होऊ नये यासाठी.नाना म्हणाले तो काय सांगतो त्याचा बाप सांगतोय कर तू नोकरी.याच काळात माझी पीएचडी चालू झाली.२६०७ विद्यार्थ्यांना प्रश्नावली पाठवण्यासाठी पाकिटात भरणे,तिकीट चिकटवणे,माझ्या पत्त्याचा शिक्का मारणे या कामात त्यांनी  आनंदाने सहभाग घेतला.तुझी फार ओढ होते घरची कामेही सांग म्हणत.स्वस्थ बसणे त्यांना माहीतच नव्हते.

           माझ्या माहेरी लग्नकार्याला गेले की तेही बरोबर असत.व्याही म्हणुन न वावरता घरच्यासारखे राहत.तसे तेथेही त्यांनी पूजा करायचे काम हाती घेतले. माझ्या आईला ते लहानपणापासून ओळखत.पत्रिका दाखवायला तेथेही माणसे गोळा झाली.

           नोकरी निमित्त मला संपर्क सत्रासाठी शनिवार रविवार गावोगाव जावे लागत होते.इंजक्शन देण्यापासून मुलीना करावे लागे.मला जरा गिल्ट फिलिंग यायचे. ते म्हणत तुझ्यापेक्षा मुली घर छान सांभाळतात. छान स्वयंपाक करतात.

           त्यावेळी लाईट जात असत.नाना म्हणत 'गाणी म्हणा गो'.मग मी व मुली  'वेडात मराठे वीर दौडले सात' पासून 'मेरा कुछ सामान' पर्यंत वाट्टेल ती गाणी म्हणत असू. ते गेल्यावर लाईट गेले की गाणी म्हणणे थांबलेच.मी मुलीनी गाणे शिकावे म्हणून प्रयत्न केला कोणी शिकले नाही.ते म्हणत तुझा शुक्र चांगला आहे तूच गाणे शिक.मी निवृत्तीनंतर गाणे शिकायला लागले. आमच्याच घरी गाण्याचा क्लास सुरु झाला.ते खुश झाले असते.अशी वेळोवेळी ते जावून ३० वर्षे तरी झाली त्यांची आठवण येते. 

           ते कितीही थंडी असो फक्त.धोतर नेसलेले  असे.माझ्या मैत्रिणी,मुलींच्या मैत्रिणी,ह्यांच्या ऑफिसमधले कोणी आले तरी ते आपली बाहेरच्या खोलीतील जागा सोडत नसत की वेष बदलत नसत.आम्हीही त्याना कधी त्याबद्दल म्हणत नसू उलट ते गप्पात सामील होत.त्यांची संस्कृत सुभाषिते,कुट कोडी सांगत. आलेल्यांनाही ऐकण्यात रस वाटे.  

           नाना रोज व्यायाम करत.बागकाम असेच. त्यामुळे त्यांचा डायबेटीस कंट्रोलमध्ये असे.फारसे आजारपण नसे तरी कधी ताप आला,लूज मोशन झाले तर लंघन हे सर्व आजारावर औषध आहे अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित ते सांगत आणि अजिबात औषध घेत नसत.आणि ते बरेही होत. पण आता वृद्धत्वाच्या समस्या हळूहळू चालू झाल्या.लंघन पुरेसे नव्हते.कधी डीहायड्रेशन,कधी जुलाब,कधी जखम झाल्याने त्याना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागू लागले.एकदा तर त्याना खोल जखम झाली घोट्याकडचा बराच भाग काढावा लागला.बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.जेवण,ब्रेकफास्ट न्यावे लागे.मुली आणि आम्ही दोघेच ही जा ये,तेथे थांबणे करत असू.त्यावेळी काही दिवस आमच्या ऑफिसमधला निवृत्त शिपाई  ते बाहेर जाऊ नये म्हणून लक्ष द्यायला ठेवला होता.काही दिवस डॉक्टर ड्रेसिंगला येत.नंतर मला करण्याची परवानगी दिली.त्यातून व्यवस्थित बरे झाले.

                         एकदा केइएममध्ये ठेवले होते. प्रसिद्ध डॉ. पै तेथे होते.त्यांची मुंज नानांनी केली होती.त्यांनी ओळखले.ते अगत्यानी चौकशी करत.त्यांच्यामुळे नकळत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायला लागली.ते चेहऱ्यावरूनही भविष्य सांगत त्यामुळे तेथेही भोवती लोक गोळा होत.

                   त्याना  बर्याच वेळा लघवीला शौचाला घाई होऊन कपडे खराब होणे असे प्रकार होत पण डायपर माहीत नव्हते.त्या गोष्टीचा त्रास वाटला असेही आठवत नाही.त्यांचे वृद्धत्व त्रासदायक झाले अशा आठवणी नाहीत.उलट आनंददायी आठवणीच आहेत.त्यांच्याही आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा काळ असावा.

             ते एकदा घरातच पडले.खुब्याचे हाड मोडले.हॉस्पिटलमध्ये ठेवायचे होते. अम्ब्युलन्सची वाट पाहत बसलो होतो.ते रोज विष्णूसहस्त्रनाम म्हणत त्याच्या कव्हरच्या मागच्या बाजूला माझी पत्रिका मांडली.आणि ते काही सांगत होते इतक्यात अम्ब्युलन्स आली.ते म्हणाले आता आल्यावर पत्रिका बघुयात.पण ते परत आलेच नाहीत.शस्त्रक्रिया ठरली होती. आमच्या समोर त्यांना OT मध्ये नेले.भूल देण्यापूर्वीच त्याना Hart attack आला.एक दोन दिवस त्यानंतर ते होते.त्यांच्या सेवेला असलेली केरळी नर्स ढसाढसा रडत होती.त्यांनी चेहऱ्यावरून तिचे भविष्य सांगितले होते.घरी परत येणार या भावनेतून ते गेले होते आणि आलेच नाहीत याचा खूप त्रास झाला.ते शतक नक्की काढतील असे वाटले होते.पण थोडक्यात हुकले.

             आमची सेकंड इनिंग सुरु झाली.आमच्यासमोर त्यांचे आनंदी वृद्धत्वाचे मॉडेल आहे.

              https://shobhanatai.blogspot.com/2022/03/blog-post.html

            


 

 


                   

Tuesday, 12 July 2022

हरहुन्नरी प्रकाश विष्णू जोशी

                                       हरहुन्नरी प्रकाश विष्णू जोशी

                  १२ जुलै २०२२ ला प्रकाश जोशी ७५ वे वर्ष संपवून ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना उत्तम आरोग्य लाभू दे.सळसळता उत्साह असाच टिकू दे यासाठी शुभेच्छा.पंचाहत्तरी ओलांडल तरी 'अजून यौवनात मी' अशी त्यांची वृत्ती आहे.अर्ध्या रात्री कोणीही मदतीचा हात मागितला तर हजर होतील अशी यांची खासियत आहे.आम्ही त्याचा अनुभव घेतलाय.तसे पाहता जोशी दाम्पत्याशी आमची ओळख निवृत्तीनंतर झाली तरीही अनेक वर्षे एकमेकाना ओळखतो असे मैत्र जमले.माझ्यासाठी ते फ्रेंड,फिलासाफर, गाईड झाले.तसे ते मित्रपरिवारातील अनेकांना वाटत असणार.

त्यांचा मित्रपरिवार मोठ्ठा आहे. कोल्हापूरच्या शाळा कॉलेजातील मित्र,इंडियन बँकेतील कलीग,पुण्यात स्थाईक झाल्यावर तेथले.यात विविध जाती धर्माचे,सर्व वयातील,आर्थिक स्तरातील मित्र, मैत्रिणी आहेत.भिमाले उद्यानात फीरत असताना लक्षात आले की, अगदी नर्सरीतल्या मुलापासून,८० ओलांडलेल्या वृद्धापर्यंत सर्व त्यांना मित्र मानतात.त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा करिष्मा आहे.

मोबाईलमध्ये काही तांत्रीक अडचण आली,ऑनलाईन काही घ्यायचे आहे,बँकेचे काही प्रोब्लेम आहेत, मराठीतले इंग्रजीत भाषंतर हवे आहे अशा विविध बाबीत सर्वाना हक्कानी जोशी काका आठवतात.कमी तेथे आम्ही अशा वृत्तीने त्यांचे काम चालते.हे सर्व करताना कोणताही आव नाही,परतफेडीची अपेक्षा नाही.'इदं न मम' ही भावना असते.

               हे झाले सर्वमान्याविषयी.वलयांकित असे अनेक त्यांचे मित्र आहेत. अगदी त्यांच्या घरी राहून पाहुणचार घेणारे आहेत.ते इंडियन बँकेतून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.भारतात, भारताबाहेर अनेक ठिकाणी बदल्या झाल्या.त्या त्या ठिकाणीही असे भेटत गेले.रेव्हरंट टिळकांचे नातू अशोक टिळक,गणिती शकुंतलादेवी,लेखिका प्रतिभा रानडे अशी काही उदाहरणादाखल नावे सांगता येतील.हे विश्वची माझे घर अशी वृत्ती असल्याने सगळेच त्यांना आपले वाटतात.त्यांच्यासाठी खिसा मोकळा करण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत.

              त्यांचे हे दानशूरत्व या हाताचे त्या हातालाही माहिती नसते.अनेक संस्थाना ते सातत्याने देणग्या देतात.अगदी अनोळखी,गरजू अडचणीत आहे असे दिसले तर ते तत्काळ मदतीचा हात देतात.आमची दोघांची कामवाली मीरा एक आहे. तिचा मुलगा नुकताच दहावी झाला. अमेरिकेला जाताना ते तिला सांगून गेले, पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक गरज लागली तर मला सांग.

आनंदवनची ट्रीप ठरली.आम्ही गावाला गेलो होतो.आम्ही येईपर्यंत तारीख उलटून जाणार होती.जोशींनी आमचे पैसे भरून टाकले.आम्ही आल्यावर परत दिले नाही तर अशी शंकाही त्यांना आली नाही.विश्वासाचे नाते तयार झाले.करोना काळात माझे एटीएम मधून पैसे आणून द्यायचे काम वेळोवेळी त्यांनीच केले. 

             प्रवास हा जोशी दाम्पत्याचा आवडीचा प्रांत. देशविदेशात त्यांनी भरपुर मुशाफिरी केली.कैलास मानस सरोवर,नर्मदा परिक्रमा,कर्दळीवन,लेह लडाख अशा कठीण ठिकाणीही त्यांनी भ्रमंती केली.तेथून उत्तम फोटो काढून पाठवणे.आणि आल्यावर हास्यकलब आणि जेष्ठ नागरीक संघात त्याची ऐतिहासिक, माहिती,त्याच्याशी निगडीत कथा,विश्लेषण यासह सांगणे हे ते करतात. आमच्या सारख्या घर बश्याना घरी राहून प्रवास केल्याचा आनंद मिळतो.आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाची आनंदवनला सहल गेली तेंव्हा आम्ही निरुपमा आणि जोशींना हक्कानी स्वयंसेवक म्हणून बोलावले.

             अनेक वेळा मंडळाच्या कामासाठी आम्ही त्यांना हक्काने बोलावले आहे.११ एप्रिलचा पार्किन्सन मेळावा,प्रोजेक्टरवर काही दाखवायचे असले तर त्यांच्या लॅपटॉपसह कार्यक्रम दाखवायला इत्यादी.आज आमच्या Whatsapp ग्रुपचा पेशंटना खूप फायदा होतो. असा ग्रुप करायला त्यांनीच मला प्रवृत्त केले.अशा गोष्टीसाठी लागणारी तांत्रिक मदत त्यांचीच.

मोठ्या अधिकारपदावरून निवृत झाले असले आणि अजूनही तज्ज्ञ म्हणून त्याना भारतातील विविध भागातून मागणी असली तरी कोणतेही छोटे काम करताना त्याना लाज वाटत नाही त्यांचे असे पाय जमिनीवर असल्याने ते सर्वांना आपलेसे वाटतात.मी आणि नीरुपमानी फ्लॉवर रेमेडीच्या नोट्स तयार केल्या होत्या. त्याचे टायपिंग त्यांनी करून दिले.               

          तसे पाहता ते फिजिक्सचे विद्यार्थी पण बॅंकेतील नोकरीमुळे त्याक्षेत्रातील तज्ज्ञत्व त्यांच्याकडे आहे तसेच साहित्य,कला,इतिहास,सामाजिक शास्त्रे,खेळ,अध्यात्म अशा अनेक क्षेत्राबद्दल त्यांचे ज्ञान अचंबित करणारे आहे.त्यांच्या वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्ताने केलेल्या audio क्लीप एकत्र करायला हव्यात. त्यात त्यांची बुद्धीची चमक,बहुश्रुतता,प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन,विश्लेषण करण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सोप्या शब्दात ते सांगण्याची हातोटी हे सर्व दिसून येते.

            बऱ्याच जणांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे वयाच्या २०व्या वर्षी retinal detachment मुळे एका डोळ्याला अंधत्व आले.गेल्या ३० वर्षापासून उजव्या डोळ्याचे दिसणे विक आहे.काही दिवसांपूर्वी त्याना थोडे चालले की पाय दुखायचा.पण त्यांची जिगर सगळ्या अवयवांचे काम करते.आणि ते सर्वांच्या नजरेला अगदी ठणठणीत असतात. आणि तसे ते आहेतही.त्यांचे सर्वच जीवन इतरांसाठी पथदर्शक आहे.माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता काठोकाठ भरलेली असते.

            तसे लिहिण्याजोगे खूप आहे.पण विस्तार भयास्तव एक महत्वाची गोष्ट सांगून थांबते. पत्नीच्या आपल्या यशातील वाटा जाहीरपणे सांगणे आणि त्यापेक्षाही 'I love my wife and Dirang' असे फोटो टाकत मोकळेपणानी सांगणे मला फार भावले.दोघांचेही सहजीवन असेच एकमेकासोबत आनंदाने जावो.अमेरिकेत आजचा वाढदिवस लेकी.जावई,नातवंडे यांच्यासह आनंदात साजरा होवो.

            वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!

May be an image of 2 people and outdoors


Friday, 27 May 2022

आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                                आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                   आज आमच्या लग्नाला ५२ वर्षे झाली.पहिली २९ वर्षे या सहजीवनात आम्ही दोघेच होतो.गेली २३ वर्षे मात्र पार्किन्सन्स मित्र घुसला आहे.आमचे सहजीवन एक उघडे पुस्तक बनले आहे. निमित्तानिमित्ताने पार्किन्सन्सने आमच्याबद्दल खूप लिहायला लावले आम्हाला बदलवून टाकले. आज जरा त्याला न जुमानता आधीच्या २९ वर्षात रमावे असे वाटले.

                  नुकतीच बी.ए.झाले होते.अजून शिकायची इच्छा होती.पण पहिल्याच कांदेपोहे कार्यक्रमात लग्न जमले.शोभना रामचंद्र देशपांडेची शोभना गोपाळ तीर्थळी झाले.विवाहानंतर पुण्यात आलो.टिमवी कॉलनित मेजर दामले यांच्या विकास बंगल्यात ह्यांनी आधीच जागा घेऊन ठेवली होती.मोठ्या घरातून दोन खोल्यात रहायचे? पण त्या दोन खोल्या राहिल्याच नाहीत.दामले बाबा,दामले वहिनी,त्यांचा अख्खा बंगला,बाग आणि त्यांचे सर्व कुटुंबीय बघता बघता आमचेही झाले.प्रेम,धाक,त्याचबरोबर आम्हाला आणि आमच्या मुलीनाही उत्तम संस्कार मिळाले.मुलींसाठी समोर महराष्ट्र मंडळ शाळा,व्यायाम शाळा,कॉलनीतले वातावरण कुटुंबासारखे होते.मैत्रिणी मिळाल्या.वैदिक संशोधन मंडळाची लायब्ररी मिळाली.आणि छोट्या गावातून आलेली बुजरी,बेळगावी भाषा बोलणारी मी बघता बघता पुणेरी झाले.

                हे किर्लोस्कर न्यूमॅटीक मध्ये सर्व्हिसला होते.सकाळी सातला जायचे यायची वेळ नसायची.सुटीच्या दिवशी मात्र मोटारसायकलवर भटकणे व्हायचे. कात्रज, थेऊर, ओळखीच्या, नात्यातील लोकांकडे जाणे व्हायचे.कधी चक्क  मुंबईलाही.हे खूप वेगाने मोटार सायकल चालवायचे.ह्यांचे मित्र म्हणायचे वहिनी तुम्हाला भीती वाटत नाही का? पण मी आधी कधी अशी दुचाकी वाहनाच्या मागे न बसल्याने मला वेग काय असतो माहीतच नव्हते.सोनाली आणि देवयानी झाल्यावरही आम्ही त्या दोघींना घेऊन शिवाय सामान असे मोटार सायकलवर खूप फिरलो.श्रद्धाच्या वेळी पोटात कळा सुरु झाल्यावर आम्ही मोटार सायकलवर कर्वे रोडला डॉ.तेलंग यांच्या दवाखान्यात गेलो होतो.आजुबाजुचे म्हणायचे जावानी तुमच्यावर जाहिरात करायला पाहिजे.

              आम्हाला दोघानाही माणसांची आवड आणि साधेपणा हे साम्य सोडता आमच्या व्यक्तीमत्वात खूप फरक.हे नीटनेटके राहणारे मी थोडी गबाळी.मी सर्वांची सदैव काळजी करणारी तर हे बिनधास्त.मला हेच हवे तेच हवे,प्रत्येक गोष्ट हातात देणे अशी ह्यांची नवरेगिरी अजिबात नव्हती.स्त्री, पुरुष समानता अशा पोकळ गप्पा नव्हत्या पण प्रत्यक्षात आचरण मात्र समानतेचे.मला एकटी बाहेर जाण्याची, रस्ता क्रॉस करायची ही भीती वाटायची. याबाबत मात्र त्यांनी सक्ती केली.एकटी बाहेर जायला भाग पाडले.माझ्या मोठ्या बहिणींना माहेरी सोडायला जावे लागायचे आणि वडील परत पोचवायला यायचे माझ्या बाबतीत त्यांनी या दोन्ही गोष्टी बंद केल्या.मी तिन्ही मुलीना घेऊन रेल्वेने पुणे, मिरज आणि पहाटे झोपेत असलेल्या मुलीना उठवून गाडी बदलून मिरज ते खानापूर असे प्रवास सहजपणे करू लागले.रिझर्वेशनही मीच करून आणायचे.आधी राग यायचा पण माझ्याही नकळत त्यांनी मला आत्म निर्भर केले. त्यांनी कंपनीला वाहून घेतलेले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी,मुलींची आजारपण,शाळा प्रवेश,अभ्यास सर्व माझ्याकडे. मी नोकरी करत नसल्याने मलाही ती माझीच जबाबदारी वाटत होती.

               हे अचानक पूर्वकल्पना न देता कोणालाही जेवायला घेवून यायचे.कधीकधी कोणाला बोलावून ठेवायचे आणि स्वत: ऑफिसमधून खूप उशीरा यायचे.त्या लोकांशी बोलत मला स्वयंपाक करावा लागत असे.एकीकडे अजून का आले नाहीत. मोटारसायकलला अपघात तर झाला नाही न या काळजीत मी असे.एकदा तर हे येताना चिकन घेऊन येणार होते.पाहुणे आले. माझा चिकनची पूर्व तयारीसह  सर्व स्वयंपाक झाला तरी यांचा पत्ता नाही मला कानकोंड्यासारखे झाले. शेवटी हे आले अशा वेळी राग येण्यापेक्षा सुखरूप आहेत यामुळे हुश्श व्हायचे.यांच्या अनेक मित्राना या आठवणी नक्की असतील.

               आमच्या दोन खोल्यांच्या घरात पाहुण्यांची सारखी वर्दळ असे.पार्ट्या,नातेवायिक,ओळखीचे असे अनेकांचे कान्देपोह्याचे कार्यक्रम,साखरपुडा,लग्नाचे वऱ्हाड राहणे अशा अनेक गोष्टी व्हायच्या अर्थात यासाठी दामले बाबा वहिनी यांचे सहकार्य असे,आमच्या दोन खोल्या आणि बंगला यात मध्ये दार होते ते दिवसभर उघडे असायचे त्यांच्या हॉलमध्ये मोट्ठे कार्यक्रम व्हायचे जास्त पाहुणे आले की त्यांची वरची केबिन,जास्तीच्या गाद्या सर्व मिळायचे.आम्ही स्वत:च्या बंगल्यात जाईपर्यंत आमच्याकडे टी.व्ही.नव्हता.आम्ही सर्व बाबांकडेच टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचो.छोट्या खोलीत अंतर कमी असल्याने मुलींच्या डोळ्यावर परिणाम होईल असे बाबा म्हणायचे. १९७८ मध्ये यांचे आईवडील बेळगाव सोडून कायमचे आमच्याकडे आले.आम्ही मोट्ठे घर बघत होतो.एकीकडे बंगला बांधणे आणि मोठ्या घराचे डीपॉझीट,भाडे परवडणारे नव्हते.आता बंगला बांधताय तर तेथेच जा एकदम असे वहिनीनीनी पटवले.मालक आणि भाडेकरू यांच्यात साप,मुंगुस रिलेशन असते.पण आमचे तसे नव्हते.या संबंधावर वेगळा लेख लिहायला हवा.त्यांच्यामुळे अनेक कटू प्रसंगातून जावे लागले तरी आमच्या सहजीवनाला तडा न जाता ते अधिक घट्ट झाले.प्रेम विश्वास,निष्ठा अधिक पिळदार झाल्या.

             याच काळात मी टीमवी तून एम.ए.केले.संध्याकाळी क्लास असायचे.मुली त्यावेळी समोर व्यायाम शाळेत जायच्या.प्रत्येकांनी सारखे काहीना कामात असलेले याना आवडायचे.मी काही शिकण्यासाठी त्यांचा विरोध नव्हता.बायकोने सारखे घरात अडकून राहायला हवे असे वाटत नसे.मी एमफिल,पीएचडी करताना त्यांचा अहं आड आला नव्हता.उलट अभिमानच असायचा.बायकोला स्वातंत्र्य देतो असा आवही नसायचा.ते स्वत: डिप्लोमा इंजिनीअर होते. त्यांच्या कामानी त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.जनरल मॅनेजर पदापर्यंत ते पोचले होते.

              १९८२ मध्ये आम्ही स्वत:च्या बंगल्यात राहायला आलो.दामलेंचे घर सोडताना मी आणि वहिनी खूप रडलो होतो.आता मुलीही मोठ्या झाल्या होत्या.रस्ता ओलांडला की शाळा नव्हती.धाकटी दीड वर्षाचीच होती.मोठ्या दोघींना बसने शाळेतून यायला खूप वेळ व्ह्यायचा. ज्ञान प्रबोधिनीत जात त्यामुळे त्यांचे इतरही उपक्रम असत. पण ह्यांचे सातच्या आत घरात असे अजिबात नव्हते. गावाबाहेर घर. सामसूम असायची मला खूप काळजी वाटायची परंतु ह्यांचे म्हणणे असायचे लाखात एखादे उदाहरण घडते म्हणून मुलीना डांबून ठेवायच्या का? माझ्याप्रमाणेच ह्यांनी दिलेली मोकळीक आणि प्रबोधिनी यामुळे या मुलीही आत्मनिर्भर झाल्या.सायकलवर शाळेत आणि पुढे कॉलेजलाही जायच्या.कायदा मोडून १८ वर्षाच्या आत टूव्हीलर द्यायची नाही असे आम्हला वाटायचे. आम्ही दोघे कायम जमिनीवर असल्याने मुलींच्यावरही तेच संस्कार झाले.

            बंगल्याचे अर्धेमुर्धे काम झाले होते.बंगला बांधतानाही ह्यांनी घराची अनेक कामे मलाच करायला लावली.रिक्षाला खूप पैसे पडतात अशी माझी कुरकुर असायची पण हे म्हणायचे मी सुटी घेऊन पगार बुडवण्यापेक्षा रिक्षा परवडते.गुरुवारी ह्याना सुटी.तेंव्हा मात्र आम्ही बाहेर पडायचो.अनेक नर्सरीमधून झाडे आणली सुंदर बाग झाली.बागेची निगराणी सासरे आवडीने करायचे.येथे रस्ते झाले नव्हते,रिक्षावाले येत नसत.याना समाजकार्याची आवड येथल्या काही लोकांनी मिळून 'विकास समिती' स्थापन केली.यातून आजूबाजूची अनेक माणसे जोडली गेली.

             नवीन बंगल्यात आल्यावर श्रद्धा थोडी मोठ्ठी झाली आणि मी आयआयइत (भारतीय शिक्षण संस्था ) एमफिलला प्रवेश घेतला.दोन बस बदलून जावे लागत असे.मी आणि मुली एकाच वेळी बसने निघायचो. ह्याना गुरुवारी सुटी असायची. सुटीच्या दिवशी ते मला सोडायला आणि आणायला टू व्हिलरवर कोथरूडला यायचे.माझे लेक्चर चालू असले तर थांबून राहायचे.तिथल्या कर्मचार्यांशी त्यांची मैत्री झाली होती.प्रथम दर्शनी इम्प्रेशन पडणे हे त्यांचे वैशिष्ठ आहे. ते मलाच लिफ्ट द्यायचे असे नाही तर ऑफिसमधले वर्कर्स,वाटेत कोणी ओळखीचे दिसले तर थांबून लिफ्ट द्यायचे.आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीकडे जात,धर्म,वय,आर्थिक परिस्थिती, शिक्षण अशी कोणतीच लेबले न लावता माणूस म्हणून पाहतो.त्यामुळे आमचा सर्व स्तरातील लोकसंग्रह मोठ्ठा आहे.सपोर्ट सिस्टीम मोठ्ठी आहे.आमच्या सहजीवनातील हे मोट्ठे संचित आहे.ही इन्व्हेस्टमेंट आमच्या सेकण्ड इनिंगमध्ये उपयोगी पडत आहे.   

             आमच्या सहजीवनात यांनी गजरा आणणे,वाढदिवसाला भेटी देणे असे काही नव्हते.Romantic असे आमचे कपल नाही.गोतावळा जमा करण्यातच आम्हा दोघानाही आनंद असायचा.मी लग्नानंतर १५ वर्षांनी टीमवीत नोकरीला लागले.मे महिन्यात परीक्षा घ्यायला जावे लागे.लग्नाच्या वाढदिवसाला नेमके आम्ही एकत्र नसायचो.आमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला हे इटलीला आणि मी कोल्हापूरला होते.माझ्या मुलीच्या सासुबाईना याचे खूप वाईट वाटले होते.

             यांनी कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास खूप केला त्यावेळी मात्र आमच्यासाठी तिथल्या खास वस्तू हे आणायचे. एकमेकाना आम्ही मोठ्ठी मोठ्ठी पत्रे लिहायचो.आमच्यात धुसपूस भांडणे असे नसायचे. याला कारण ही हेच. मी कधी आरडाओरडा  केला तर ते प्रत्युत्तर द्यायचे नाहीत.मी अपोआप गप्प व्हायची.मी वृत्तपत्रात,मासिकात लेखन करायची ते त्याना आवडायचे.माझे अक्षर चांगले नसल्याने पहिली कथा छापून आली तर माझे आडनाव तीर्थकी लिहिले होते. मग हे, कोठे लेखन पाठवायचे तर सुंदर अक्षरात लिहून द्यायला लागले.एका समजशास्त्र परिषदेसाठी माझा तेथे वाचण्या साठीचा रिसर्च पेपरही त्यांनी सुंदर अक्षरात लिहून दिला.त्याचे खूप कौतुक झाले. तोवर ते निवृत्त झाले होते.ते स्वत: कार ड्राईव्ह करत रत्नागिरीला आले होते.त्यापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो.आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला आमचे दोन दिवसाचे संपर्क सत्र होते तर ते तेथेही आले.त्यांच्या अशा माझ्या नोकरीतील पूर्ण सहकार्याची आठवण आजही माझे सहकारी काढतात.

               मला नोकरीच्या निमित्ताने संपर्क सत्रांना,परीक्षेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जावे लागे.खरे तर यापूर्वी १५ वर्षे मी पूर्ण वेळ दिमतीला असण्याची सर्वाना सवय होती.परंतु माझ्या नोकरीतील कामांमुळे आमच्या सहजीवनात कोणताही ताण तणाव आला नाही.कोणतीही कुरकुर न करता सासरे,हे आणि मुली व्यवस्थित निभावून नेत.

                या सर्व काळात सासू,सासर्यांचे आजारपण, मृत्यू,मुलींची शिक्षणे,लग्ने,नातवंडांचे आगमन अशा अनेक गोष्टी घडल्या. चारचाकी आली.मुलींसह अलिबाग,गोवा,खिदरापूर,लोणावळा अशी भ्रमंती होत राहिली.आमची अमेरिका ट्रीप झाली.केरळ झाले.केसरीबरोबर नैनिताल,काश्मीर झाले.आता खूप फिरायचे ठरवले होते. पण माझे कमरेचे दुखणे सुरु झाले आणि ते शक्य झाले नाही.

               २९ वर्षांचा काळ खूप मोठ्ठा आहे.अनेकानेक आठवणीत रमले पण ते लिखाणात नेमकेपणाने आणणे काही जमले नाही.आम्हाला बरेच जण विचारतात तुमचे लव्हमॅरेज का? ठरवून केलेले लग्न एक मटकाच असतो असे म्हटले जाते.आम्हाला तो लागला.आमचे जीवन कृतार्थ,समाधानी,आनंदी आहे.सगळे काही आलबेल होते असे नाही थोडा खट्टा थोडा मिठा असतेच पण आमचा सहजीवनाचा पाया श्रद्धा,प्रेम विश्वास,निष्ठा यांच्या भक्कम पायावर उभा असल्याने त्याला तडा गेला नाही.वेळोवेळी प्रतीकुलतेला अनुकुलतेत बदलून घेणे आम्हाला जमत गेले.जुन्या जखमा व्रणसुद्धा न ठेवता भरून आल्या.काही जण आमच्या सहजीवनाला रोलमॉडेल मानतात.त्यामुळे इतरांनाही आमचे सहजीवन यशस्वी वाटत असावे. 

             आत्ता तेवीस वर्षे पार्किन्सन्स आमच्यात घुसला आहे.आमच्या निवृत्तीनंतर कामाची क्षेत्रे वेगळी असल्याने वाटा बदलल्या असत्या.पण पार्किन्सन्सने आम्हाला त्याच्या भोवतीच घोटाळत ठेवले आहे. ही प्रतीकुलताही आम्हाला अनुकुलतेत बदलायला जमले आहे.याला आपल्यात सामावून कसे घ्यायचे आणि त्याच्यासह आनंदी कसे राहायचे हे इतर पार्किन्सन्सग्रास्तांपर्यंत पोचवायचे हे आमचे जीवन ध्येय बनले आहे. 

               पाहिलत या पार्किन्सनला थोडा वेळ बाजूला ठेवायचे ठरवले होते पण नकळत आलाच.आता सहजीवनाचा भागच झालाय. ये बाबा.


               

               

            

                 

                    

           

 

Wednesday, 2 March 2022

आदर्श व्यक्तिमत्व कै.नारायण भटजी - गोपाल तीर्थळी

                                            आदर्श व्यक्तिमत्व कै.नारायण भटजी

                           आमचे पिताश्री साऱ्यांचे नारायण भटजी.ज्ञाती बांधव तसेच इतरांना परिचित आहेत ते त्यांची सायकल आणि त्यांचा नेहमीचा पेहेराव धोतर,कोट,टोपी,एक उपरणे आणि प्रसन्न मुद्रा.तरी खूप लोकांना त्यांच्या पूर्वायुष्याची कल्पना असेल म्हणून त्यांच्या २४ जानेवारी या जन्म शताब्दी दिनाचे औचित्य साधून ते उलगडून दाखवायचा प्रयत्न आहे.

                        तीर्थहळ्ळी हे शिमोग्यापासून ३०/३५ कि.मी.वरील गाव.तेथे २४ जानेवारी १९०१ साली आमच्या नानांचा जन्म झाला.त्यांना २ भावंडे .एक भाऊ आणि बहिण .त्यात नाना मोट्ठे. वयाच्या ७/८ व्या वर्षी मातृछत्र हरपले.आणि वय लहान असल्याने मामाने त्यांना हलीयाळला नेले.त्याच सुमारास प्लेगच्या साथीने थैमान घातले होते.त्यामुळे मामा नानांना घेऊन शहापूर येथील बिच्चूगल्लीतील देवळात राहायला आले.

                   त्याकाळात नानांचा बाळंभटजी कामत म्हणजे कै.शारंगधर कामत यांचे वडील यांचा परिचय झाला.तसेच बेळगाव मध्ये आणखी काही लोकांचा परिचय वाढला.त्यात बेळगावला प्लेगची साथ आली आणि मामांचे छत्र हरपले.एकापाठीपाठ हे लहान वयात आघात झाल्यावर विषण्ण मनस्थितीत ते काशिला संस्कृताचे पठण तसेच वैदिक शिक्षण घेण्यास गेले.आणि तब्बल आठ नऊ वर्षांनी बेळगावी परतले ते भटचाळीत बाळंभटजी यांच्या घरी आले.त्यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन पुढे चालू झाले.त्या काळात संस्कृतसाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींची मुलेही तेथे येत..नाना काही आठवणी सांगताना त्यांचा उल्लेख नेहमी करत.डॉक्टर गिंडे आणि अशीच ही मंडळी संस्कृतची आवड म्हणून येत.

               तो १९२९ चा काळ असेल.त्यावेळी नाना रेगेंच्या घरी राहत असत.रेगेंच्या घरी कुणी एका साधूने रामाच्या मूर्ती दिल्या.आणि त्याची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा प्रदर्शित केली.बराच काळ तो साधू न आल्याने पुढे त्या मूर्तीची रेगेंच्या समोर असलेल्या पिंपळावर प्रतिष्ठापना झाली.तेंव्हापासून नानांची रामाची सेवा चालू झाली.त्याला वेळोवेळी उर्जितावस्था आली.१९७८ पर्यंत सेवा केली.मधल्या काळात पांडुरंग महाजनिंच्या विनंतीवरून श्री मारुतीची ( लहान) सेवाही १९७८ पर्यंत चालूच राहिली.या सगळ्या इतक्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी होत्या की जेंव्हापासून शहापूर बाजारातील गणपती उत्सव सुरु झाला तेंव्हापासून त्याची पूजा नैवेद्य,आरती देखील बेळगावचे वास्तव्य होते तेंव्हापर्यंत त्यांच्याकडे चालू होते.श्री राम,श्री मारुती तसेच श्री.गणपतीच्या सेवेने नानाची सर्व इच्छिते पुरी झाली.नानांनी १९३४ च्या दरम्यान बिच्चू गल्लीत घर घेतले.थोडी शेती घेतली.

              नानांना जेवढी संस्कृतची गोडी तेवढीच ज्योतिष शास्त्राची.त्यामुळे त्यांनी आपल्या अभ्यासु वृत्तीने ते चालूच ठेवले.त्यांच्याकडे जन्म झाल्यावर पत्रिका करणासाठी येणाऱ्या सर्वांची पत्रिका केल्यावर रेकॉर्ड करण्याची पद्धत होती.त्यांचेकडे कित्येक हजार पत्रिकांचे रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे. ज्योतिषाची आवड असल्याने गावात कोणी चांगला ज्योतिषी आला की ते त्यांची गाठ घेत.आणि एखाद्या पत्रिकेवर चिकित्सा करत.दक्षिणेकडून,उत्तरेकडून आलेल्या खूप ज्योतिषांकडून त्यांची पत्रिका पाहण्याची पद्धत अभ्यासून स्वत:ची ज्योतिष विद्या पूर्णत्वास नेली.

            त्यांच्याकडे सर्व स्तरातील लोक पत्रिका दाखवत.सल्ला घेत.धर्म, जात, वर्ग यांचे बंधन नसे.त्यांना सर्वांकडून आदरच मिळायचा.त्यांचे ज्योतिषाबद्दल एक तत्व होते.ते एक शास्त्र आहे विद्या आहे.त्याचा आदर राखायला पाहिजे ती रिक्त हस्ताने पाहू नये म्हणून येणाऱ्या व्यक्तीस ते आपल्या कुवतीप्रमाणे पैसे ठेवावयास सांगत.त्यात एक पैसा एका आण्यापासून  कित्येक रुपयापर्यंत पैसे देणारे असत.भविष्य सांगणे मात्र दिलेल्या पैशासी रिलेटेड नसे.येणाऱ्या माणसाचे पूर्ण समाधान होइपर्यंत त्यांच्या भल्याचा सल्ला देत.त्यामुळे त्यांनी एखाद्याचे भविष्य सांगितले काही सल्ला दिला तर मानला गेला नाही अस कधीच होत नसे.त्यांची सर्वांची सेवा तसेच आचरणाने नानांना एक वाकसिद्धीच होती असे म्हणावे लागेल.बेळगावच्या वास्तव्यात खूप लोकांना दिलेले सल्ले तंतोतंत पटल्याने पुढे ते पुण्याला आल्यावरही अनेक जण भविष्य विचारायला येत.नानांनी ज्योतिष ही विद्या म्हणूनच जोपासली.त्यापासून मिळालेले पैसे उपजीविकेसाठी न वापरता ते पैसे धर्मादाय नावाने केलेल्या खात्यात टाकीत व धर्मादायचं करत.पुण्याला आल्यानंतरही त्यांचे सायकलवर जाणे पौरोहित्य,ज्योतिष सांगणे चालूच राहिले.

                            बेळगावला असताना त्यांचे ज्योतीशाबाद्द्लचे योगदान मोट्ठे आहे.तसेच बरऱ्या जणांच्या मुंजी लग्नापासून त्यांच्या मुलांच्यापर्यंत त्यांनी लग्ने मुंजी केल्या.अशा नमूद करण्यासारखी बरीच कुटुंबे होती.त्यात नागेशराव हेरेकर, मधुभाऊ हेरेकर,गजाननराव देशपांडे,डॉक्टर कामत कुटुंबीय,गणपतराव देशपांडे अशी नावे प्रामुख्याने घेता येतील.त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे अनेकांचे ते सल्ला देत असत.लग्न मुन्जीतही विधीचा अर्थ,उद्देश ते समजाऊन सांगत.त्यामुळे विधी यांत्रिक न होता बोधपर होत.यामुळे नाना सर्वाना हवेसे वाटत.

                            जेजे घडवते ते नियती घडवते.त्यांच्या आयुष्यात बेळगावकरांचा संग घडायचा होता तेवढा काळ ते बेळगावला राहिले.त्याचाही एक किस्साच आहे.ज्यावेळी नाना  बाळंभटजीकडे राहत त्यावेळी पुण्यातील एका सारस्वत असामिनी   बाळंभटजीकडे एक पौरोहित्य करणारा पुण्यात पाठविण्याविषयी विनंती केली होती त्यावेळी तेलीचारी आणि नाना यापैकी एक पाठविण्याचे ठरले.तेलीचारी पुण्याला गेले आणि नानांचे बेलागावकरांचे सेवाव्रत चालू राहिले.पुढे बेळगावकारांचा  सेवाव्रताचा काळ नियतीने ठरविला.माझ्या मातोश्रींची तब्येत ठीक नसल्याने मी त्या दोघांना पुण्याला  घेऊन आलो.कित्येक वर्षे यासाठी मागे लागल्यावर शेवटी १९७८ साली ते पुण्याला कायमचे राहायला आले.नानांचा निरोप समारंभ मोठ्या जनसमुदायाने आखला.ती बेळगावच्या लोकांनी त्यांच्या कामाची त्याना दिलेली पावती होती.

                        आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांची मुले आहोत.त्यांना संगीताची आवड होती.त्याना स्वत:ला शिकायची आवड होती तसे मुला सुनानीही शिकावे असे वाटे.त्यांनी खूप दुर्मिळ पुस्तके संग्रही बाळगली.त्यांचा संग्रह त्यांच्या नातीला हिरामोत्याचा खजिना असल्याचा आनंद देतो.आम्ही आज उपभोगतो ते त्यांची पुण्याई आमच्या मागे असल्याने उपभोगतो असे वाटते.  

                      उतार वयात पुढे त्याना बाहेर जाणे कमी करावे लागले.पण पुण्यातील बेळगावशी संबंधित माणसे येत.सल्ले घेत त्यामुळे त्यांना बेळगाव सोडल्याचे जाणवले नाही.पुण्यातील आजूबाजूचे लोकही  भविष्य विचारायला येत. बंगल्याभोवतालच्या बागेची देखभाल करण्यातही त्यांचा वेळ जाई.

                     ज्योतिष तर त्यांच्या हाडात भिनले होते १९९१ साली त्यांना घरीच मढ्यावरून पडल्याचे निमित्त झाले आणि हिपबोन मोडले.त्यावेळी त्याना हॉस्पिटलमध्ये ठेवले.केरळची एक ख्रिश्चन नर्स त्याची देखभाल करत होती.तिला ते म्हणाले तू माझी एवढी देखभाल करतेस तर तुझे भविष्य सांगतो.आणि त्यांनी आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत तिचे भविष्य सांगितले.ते ऐकल्यावर प्रत्येक गोष्ट पटल्याने ती आवाक झाली.तिने नानाचे झोपलेल्या स्थितीत पाय धरले.दुसरे दिवशी नानांची प्राणज्योत मालवली.त्या नर्सला आणखी जाणून घेण्याची इच्छा होती.नाना गेल्यावर ती ढसाढसा रडली.

                  आज तिसरी पिढीही त्यांचे जरूर नाव काढेल अशी आहे.एक नात संस्कृतची अभ्यासका असल्याने आणि नातू ज्योतिषाचा अभ्यासू असल्याने तो वारसा असाच चालू राहो ही आजच्या दिनी श्रद्धांजली.

 

( सदर लेख २४ जानेवारी २००१ च्या तरुण भारत बेळगाव मध्ये छापून आला होता.)



Tuesday, 25 January 2022

कन्या व्हावी ऐसी


                                                 कन्या व्हावी ऐसी

                           महाराष्ट्र टाईम्स मध्ये आज जन्मलेले मुल नावाखाली भविष्य यायचे. २४ जानेवारी १९७२ चे भविष्य होते.सूर्य नेपचून त्रिकोण योगामुळे आज जन्मलेल्या मुलाचे आयुष्य अनेक आश्चर्याने भरलेले असेल.दैविक कृपा आणि ग्रहांची साहानुभूती सतत लाभेल.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडवील.
                          घरात आवराआवरी करताना हे सापडले.मी भविष्यावर फारशी विश्वास ठेवणारी नाही.आणि त्या दिवशी जन्मलेली माझी मुलगी सोनाली तर त्याहून नाही.पण तरीही तिने भविष्य खरे केले आहे.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडविला आहे. माझा उर भरून येईल अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.किती लिहू,किती सांगू.
                       लहानपणापासून स्वतंत्र विचाराची,आपल्या विचाराशी ठाम.यात आदळआपट रडारडी न करता हवे तेच करणारी.लोअर केजीला क्रीसेंट स्कूलमध्ये घातले.तिला मराठी मिडीयमला जायचे होते.पुढच्या वर्षी घालू सांगितले वर्षभर गेली आणि दुसऱ्या वर्षी अडून बसली.प्रवेश संपले होते.कसाबसा प्रवेश  मिळाला.आमच्या जवळ राहणारे आर्किटेक्ट पळशीकर यांच्याकडे पाहून आर्किटेक्ट व्हायचे हेही अगदी लहानपणीच ठरवलेले.बारावीनंतर प्रवेश मिळाला नाही.त्यासाठी एक वर्ष थांबली पण आर्किटेक्ट झाली.चवथ्या वर्षात प्रोफेशनल प्रॅक्टिसक्टीससाठी अहमदाबादचे बाळकृष्ण दोषी यांच्याकडेच जायचे होते.आणि तेच तिने केले.या क्षेत्रातील तिचे यश पाहता तिचे निर्णय बरोबर होते.
                    कधी हैद्राबाद,कधी मद्रास,कधी जपान अशी तिच्या पायाला भिंगरी असते.हैद्राबादचे पर्यावरणपूरक आयआयटीचे हॉस्टेल,कोइमतुरचे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी तिच्या यशाची काही उदाहरणे.त्या त्या क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास, कलात्मकता, क्लायंटची गरज,नितीमत्ता या सर्वांचा मेळ घालून हे काम केलेले.जुन्या नव्याचा मेळ,क्रिएटिव्हिटी,यामागे व्यापक विचार हा तिचा स्थायी भाव आहे.बाहेर छोटीशी रांगोळी असो,गणपतीची,दिवाळीची आरास असो साधी भाजी चिरणे.थाळीतील पदार्थांची रंगसंगती,न्युट्रिशन व्ह्याल्यू, घराची सजावट घरगुती कार्यक्रम,लिखाण या सर्वात हा स्थायी प्रगट होत असतो.हे सर्व कमिन्सच्या आर्किटेक्चरच्या विध्यार्थिनीपर्यंत आपल्या व्याख्यानातून,प्रॅक्टिकल,सहली यातून तळमळीने पोचविलेले असते.नवभारत टाईम्सच्या सुरुची तर्फे तिला स्त्रीशक्ती पुरस्कार मिळाला पण त्यापेक्षा स्त्रीशक्ती, आर्किटेक्चरचा गाभा या विध्यार्थिनीपर्यंत पोचणे आणि त्यांची भरभरून मिळालेली पावती तिला पुरस्करापेक्षा अधिक महत्वाची वाटते.हे सर्व असूनही तिचे पाय नेहमी जमिनीवर असतात.
                  इमारतीचे डिझाईन असो,स्वत:चा पेहराव असो,मैत्री असो,नातेसंबंध असो त्यात दिखाऊपणापेक्षा एक ग्रेस,भक्कमपणा,प्रामाणिकपणा असतो.स्वत:च्या पेहरावातही ही ग्रेस असते. प्रसन्न हास्यामुळे,कोणताही आव नसता वागण्यामुळे ती सर्वाना हवीहवीशी वाटते.यात सख्खे,चुलत,आत्ये,वगैरे सासू सासरे यांची पिढी,नणंदा,सलीलचे मित्र,त्यांच्या बायका,सोशल मिडीयावरून झालेल्या बरोबरीच्या मैत्रिणी,पुढच्या पिढीतले भाचे, भाच्या,विध्यार्थी,हात्खाली काम करणारे हे सर्व आले.अनेकांसाठी ती रोल मॉडेल असते.
                 बाहेरचे सर्व व्याप सांभाळताना.सासर,माहेरची नातीही तिने कुशलतेने सांभाळली आहेत.स्वत: धार्मिक नसली तरी सण, समारंभ ती उत्तम साजरे करते त्याचे कर्मकांड न होऊ देता उत्सव करते.तिच्या घराचे दरवाजे कोकणातील माणसे असोत, जर्मनीची मार्गारेट असो,सलील, क्षितीजचे मित्र असोत की सासुबाईंच्या मैत्रिणी. सर्वाना घराचे दरवाजे उघडे असतात.तिच्या घरातला मोकळेपणा सर्वाना आवडतो.तिच्या या गुणामुळे तिने नात्यातली,देश,परदेशातील अनेक माणसे जोडली आहेत.तिच्या सोशल मीडियातील मित्रमंडळीत ती किती प्रिय आहे ते मीडियातील कॉमन मित्र,मैत्रिणींकडून मला समजत असते.
                 तिच्यातील सच्चेपणा,संवेदनशीलता,मिस्कीलता,संस्कृतीशी जोडलेली नाळ हे सर्व तिच्या लिखाणातूनही असते. मग ते लिखाण वास्तू,वास्तू तज्ज्ञ,देश,परदेशातील भटकंती,एखादी रेसिपी कोणतेही असो.यात हटके असेही असते.
                तिचे सगळेच हटके असते त्यामुळे ती युनिक असते.क्षितीजला वाढवताना ही ती आई कमी आणि मैत्रीण जास्त होती.त्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर एक संवेदनाशील आणि वैश्विक माणूस बनवण्यात ती यशस्वी झाली आहे. यासाठी तिने हळुवारपणे घेतलेले कष्ट,प्रक्रिया मी पाहिलेली आहे.मला भावणारी ही तिची सर्वांग सुन्दर रचना आहे. तिची भटकंती ही अशीच हटके.युरोप ट्रीप बॅगपॅक मैत्रिणीबरोबर केली.स्पेनमधील कमिनो वारी तीन मैत्रिणी बरोबर केली.कामासाठी परदेशात गेल्यावर इतर खरेदि करतात पण ही मात्र इमारती तिथली सांस्कृतिक वैशिष्ठ्य बघत फिरते.येथून आता तिला सायकलवर भटकंतीचा छंद लागला आहे.अचानक पाषाण हून आमच्याकडे सल्स्बारीपार्कला येते सरप्राईज देते. आमचे अनेक दिवस आनंदात जातात.यावेळीही ती आळंदीहून किंवा १५ ऑगस्टला ७५ किलोमीटर करण्यासाठी निघालेली असते.
             मुलगी,बहिण,पत्नी,आई,सून,मैत्रीण.बॉस,आर्किटेक्ट,या सर्व आघाड्यावर ती आदर्श आहे.ती स्वत:ची काळजी घेत नाही अशी माझी तक्रार होती. पण आता सलील खनपटीला बसून ती घ्यायला लावतो. एक मुलगी म्हणून आमच्याशी नाते एक स्वतंत्र लेखातच लिहावे लागेल.आम्हाला तुझा अभिमान वाटतो एवढेच म्हणते.
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे असते पण आता आमचे पिल्लू  उंच आकाशात भरारी घेत आहे.पण लक्ष मात्र आमच्याकडे असते.  
 अशी अनादी राहा.आनंद वाटत रहा.
जीवेत शरद शतम   
                
          May be an image of bicycle, outdoors and text that says 'tir thali's'     
      May be an image of 3 people and indoor         

 








                             











Friday, 21 January 2022

माझे दूरस्थ विद्यार्थी - - तुळशीराम कुसाळकर

                                            माझे दूरस्थ विद्यार्थी - तुळशीराम कुसाळकर

   तुळशीराम कुसाळकर यांचे अकस्मात फेसबुकवर भेटणे.फेसबुकला खूप खूप धन्यवाद.त्यानंतर Whats app वर भरभरून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र येणे.सोबत १७ नोव्हेंबर १९८८ मधल्या पदवीदान समारंभाचा फोटो.एका शिक्षकासाठी याहून मोठ्ठा पुरस्कार तो कोणता असणार.त्यांचे पत्र तसेच्या तसे देत आहे.

*वंदनीय तिर्थळी मॅडम*,
स.न.वि.वि.

१७ नोव्हेंबर १९८८ चा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे पदवीदान समारंभाचा आपल्या समवेत चा फोटो जतन करून ठेवला आहे. माझ्या सारख्या भटक्या विमुक्त समाजतल्या मुलाला तुम्ही मोलाचे मार्गदर्शन केले.माझ्यात चैतन्य फुलविले. आपण माझ्या भरकटलेल्या जीवनाला दिशा दिलीत  आत्मविश्वास निर्माण केला. तुमच्या आशिर्वादाने पदवीधर झालो.आणि पुढे जाऊन बी .एड केले. तुम्ही केलेले मोलाचे मार्गदर्शनला 35 वर्षे शिक्षकी पेशात वर्गात तुमचे उदाहरण देत होतो प्रसंगी हाच फोटो वर्गात दाखवत होतो.तुमच्या मुळे माझ्या कुटुंबाला मार्ग व दिशा मिळाली.

माझी तीनही मुले उच्चविद्याविभूषित आहेत.तुमच्या आशिर्वादाने सेवा निवृत्त झाल्यानंतर एक सामाजिक प्रतिष्ठान स्थापन केले आहे.त्या द्वारे गोरगरीब दीनदलित मुलांना मदत करतो. मदत करतो .त्यांच्यासाठी उर्वरीत आयुष्य वाहून घेतले आहे. तुमच्या आठवणी मुलांना सांगत असतो. तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात. विद्यापीठाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तुमचा आशीर्वाद कायम आहे. तुम्ही व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. शतायुषी व्हा.तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.भेतीअंती खूप बोलेन.

*आपला विद्यार्थी*
तुळशीराम कुसळकर सर

 

त्यांची २ मुले  सायंटीस्ट झाली आहेत याचे तर मला फारच अप्रूप वाटले.त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेंव्हा ते ९० साली म्हणजे बी.ए,झाल्यावर लगेचच एम.ए.झाल्याचे समजले. त्यांनी माजी विध्यार्थ्याना हाताशी धरून पिंपळनेर सामजिक प्रतिष्ठान नावाचा न्यास स्थापन केला आहे.गरीब विद्यार्थ्यानापुस्तके वह्या पुरविणे,गणवेश देणे गरजूंची फी भरणे हे ते करत असतात.ते कृतार्थ,समाधानी जीवन जगत आहेत. मला हे सर्व खूपखूप सुखाऊन गेले.

त्यांच्यावर २७ नोव्हेंबर २००४ साली केसरी मध्ये उत्तुंग भरारी सदरात लिहिलेला लेखही सोबत देत आहे.                         

                                 मुक्त विद्या केंद्राने मला घडवले.

  • गुप्त विद्या केंद्रानेस्ट १९८५ मध्ये बी.ए. चा अभ्यासक्रम सुरू केला आणि अनेक वर्षे उपाशी असलेल्या माणसांसमोर पक्वान्नाचे भरलेले ताट ठेवल्यावर तो जसा त्या अन्नावर तुटून पडेल तसे अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमावर अक्षरशः तुटून पडले. कुसळकर तुळशीराम सोमा त्यातील एक. केसाला चोपून लावलेले तेल, मागे फिरवलेले केस, पांढरा शुभ्र पायजमा व शर्ट, प्रसन्न व हसतमुख चेहरा. का कोण जाणे पण कुसळकर यांना पाहिल्यावर 'नव्या मनूचा गिरीधर पुतळा' या मर्ढेकरांच्या ओळी आठवायच्या. 
    कुसळकर यांसारखे विद्यार्थी ज्ञानासाठी हपापलेले होते. परंपरा, सामाजिक परिस्थिती, औपचारिक शिक्षण पद्धतीची ताठरता यामुळे ही भुक मारून जगावे लागत होते. वडारी जातीच्या कुसळकर यांचे बालपण दगड काम करणाऱ्या वडीलांच्या बरोबर गावोगाव भटकणाण्यात गेले. ना घर, जमीन. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरायचे. मिळेल तिथे काम करायचे. काम संपले की दुसरे काम. अशात मुलांच्या शिक्षणाची फरपटच. नियमित शिक्षण घेता आले नाही तरी अनंत अडचणींना तोंड देत एसएससी पर्यंतचा पल्ला गाठला. एसएससी होणे तसे सोपे नव्हते. परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे तर, राहायचे कुठे ? तितके दिवस येणारा जेवणाचा खर्च कसा करायचा? हे साधे सोपे वाटणारे प्रश्न कुसळकरांसाठी अत्यंत जटील होते. अडचणींवर मात करत परीक्षा दिली खरी परंतु गावोगाव भटकत राहणाऱ्या कुसळकर यांचे गणित व इंग्लिश विषय कच्चे राहिले होते. त्यामुळे अनुत्तीर्ण होणे नशिबी आले. दहावीला गणित, इंग्लिश मध्ये विद्यार्थी नापास होतात त्याच्या मुळाशी अशी कारणे असतात. कुसळकर यांचे शिक्षण यानंतर बंद झाले. वडीलांच्या दृष्टीने आतापर्यंत झालेली चैन खूप झाली होती. शिकण्याचे स्वप्न सोडून देण्याशिवाय इलाज नव्हता.
     पिंपळनेर मध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झाले आणि छोटी नोकरी मिळाली. शिक्षण नाही तरी शिक्षण क्षेत्राशी संबंध ठेवता येत होता. अशातच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली.दहावी नापासांना प्रवेश चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार होता. आणि कुसळकर प्रवेशचाचणीत उत्तम प्रकारे पास होऊन  प्रथम वर्षास प्रवेश करते झाले. अत्यंत अभ्यासू विद्यार्थी म्हणून ते सर्व शिक्षकांना परिचित होते. सर्व संपर्कसत्रांना ते हजर राहात. नियमित गृहपाठ पाठवत. मी पीएचडीसाठी पाठवलेली प्रश्नावलीही त्यांनी तातडीने आणि मनापासून भरून पाठवली होती. प्रश्नावलीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला म्हणून मी आठवण पत्र पाठवले. संशोधकास संशोधन करताना असा कमी प्रतिसाद मिळण्याचा अनुभव नवा नाही. आठवण पत्रे पाठवणे हा एक तंत्राचा भाग होता. कुसळकरांसारख्या अनेक विद्यार्थ्यांना मात्र साधी प्रश्नावली भरून पाठविता येत नाही याचा राग येत आला व वाईट वाटले. विद्यार्थ्यांना आर्थिक भार पडू नये म्हणून मी प्रश्नावली बरोबर परतीसाठी पोस्टेज पाठवले होते इतके असूनही विद्यार्थ्यांतील ही उदासीनता त्यांच्या मते अक्षम्य होती. कुसळकर यांचे लगेच पत्र आले 'आपण नाउमेद होऊ नका. आपले संशोधन ही काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री आहे'. कुसळकर यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास व मानसिक आधार यांचा माझ्या पीएचडी होण्यात खूप मोठा वाटा आहे
                माझे पीएचडी पुर्ण झाल्यावरही त्यांचे अभिनंदनाचे पत्र आले.बी.ए.उत्तीर्ण झाल्यावरही त्यांची अधूनमधून पत्रे येत.बी.ए.झाल्यामुळे त्यांना प्रयोगशाळा सहायाक पदावरून प्रमोशन मिळाले होते. त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ झाली होती. पुढे त्यांनी बी.एड.ही केले.शिक्षक झाले पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ लागले. आज ते दैनिक समाचार अहमदनगरचे वार्ताहर म्हणून काम करतात.बी.ए. होणे गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असाध्य होते. ते साध्य  झाल्याचा आनंद या सर्वांपेक्षा मोठा होता. स्वतःचा विकास करून ते थांबले नाहीत आपल्या समाज बांधवांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना सक्तीने शिक्षण घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. समाजातील जुन्या चालीरीती अनिष्ट रूढी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाला पाठवलेल्या मनोगतात त्यांनी लिहिले आहे, 'जिद्द, दृढनिश्चय, आत्मविश्वास व सुयोग्य नियोजन असल्यास अनंत अडचणींवर मात करून विजयश्री खेचून आणता येते'. त्यांच्या मनोगतातील ही वाक्ये, परिस्थितीबाबत कुरकुर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहेत. मुक्त विद्या केंद्राच्या अभ्यासक्रमामुळे जीवन उजळलेल्यात कुसळकर यांसारखे वडारी समाजातील विद्यार्थी आहेत, कैकाडी, कंजारभाट, आदिवासी, वंजारी इत्यादी समाजातील आहेत. शेतमजूर, हमाल आहेत. अशी यादी लांबत जाईल. या सर्वांच्या कथा थोड्याफार फरकाने अशाच आहेत. समस्या थोड्या वेगळ्या, अडचणी वेगळ्या परंतु वंचितता तीच. ज्ञान मिळवण्याची आस तीच.  आणि या सर्वांचा परिणाम ही तोच. मुक्त विद्या केंद्रातून आत्तापर्यंत  १४००० पदवीधर बाहेर पडले परंतु मुक्त विद्या केंद्राचे खरे यश म्हणजे आमचे असे प्रबोधित झालेले तळागाळातील विद्यार्थी.
     May be an image of 4 people and indoor