कन्या व्हावी ऐसी
कन्या व्हावी ऐसी
माझे दूरस्थ विद्यार्थी - तुळशीराम कुसाळकर
तुळशीराम कुसाळकर यांचे अकस्मात फेसबुकवर भेटणे.फेसबुकला खूप खूप धन्यवाद.त्यानंतर Whats app वर भरभरून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र येणे.सोबत १७ नोव्हेंबर १९८८ मधल्या पदवीदान समारंभाचा फोटो.एका शिक्षकासाठी याहून मोठ्ठा पुरस्कार तो कोणता असणार.त्यांचे पत्र तसेच्या तसे देत आहे.
त्यांची २ मुले सायंटीस्ट झाली आहेत याचे तर मला फारच अप्रूप वाटले.त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेंव्हा ते ९० साली म्हणजे बी.ए,झाल्यावर लगेचच एम.ए.झाल्याचे समजले. त्यांनी माजी विध्यार्थ्याना हाताशी धरून पिंपळनेर सामजिक प्रतिष्ठान नावाचा न्यास स्थापन केला आहे.गरीब विद्यार्थ्यानापुस्तके वह्या पुरविणे,गणवेश देणे गरजूंची फी भरणे हे ते करत असतात.ते कृतार्थ,समाधानी जीवन जगत आहेत. मला हे सर्व खूपखूप सुखाऊन गेले.
त्यांच्यावर २७ नोव्हेंबर २००४ साली केसरी मध्ये उत्तुंग भरारी सदरात लिहिलेला लेखही सोबत देत आहे.
मुक्त विद्या केंद्राने मला घडवले.

माझे दूरस्थ विद्यार्थी - अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे
रामदास म्हात्रे यांच्यावरील सदर लेख १२ जानेवारी २००६ मध्ये लिहिलेला आहे.केसरी वर्तमानपत्रात आमच्या टीमवी च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' हे सदर लिहित होते.हे विद्यार्थी सध्या काय करतात ते शोधून त्यांच्या पुढील यशाबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहित होते.प्रत्येक अपंग दिनाला मला रामदास म्हात्रे त्यांची स्वप्ने आठवायची.त्यांचा माझ्याकडे असलेला फोन नंबर लागत नव्हता त्यांचा पत्ता शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण मिळाला नाही.अचानक मला ते फेसबुकवर ते भेटले.मी त्यांचा फोन नंबर मागितला त्यांच्याशी बोलून लिहायचे होते.पण त्यांचा फोन मिळालाच नाही.काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण शारदा वाडकर हिच्याशी बोलताना करोनामध्ये किती लोकांचे नाहक बळी गेले हे सांगताना रामदास म्हत्रेचे नाव घेतले गेले. माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक होते. त्यांचा पत्ता सापडला तोही असा.शारदा त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होती.आज अपंग दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

रिक्षावाले अरुण शिंदे - घरचा माणूस
पुणेरी रिक्षा वाल्यांच्या बाबत नेहमी तक्रारीचा सूर असतो.आम्हाला मात्र नेहमी चांगलेच अनुभव आले.त्यातही अरुण शिंदे हे आमच्यासाठी घरचा माणूस आहेत.आम्ही दोघे जेष्ठ नागरिक असल्याने त्यातही माझ्या पतिना पार्किन्सन्स सारखा आजार असल्याने कोणीतरी मदतीला लागते.कोठेही जायचे असले तर आम्ही अरुण शिंदेना फोन करतो.जवळच्या ATM मध्ये, किराणा माल, फळवाला,पिठाची गिरणी असे कोठेही अगदी छोट्या अंतरासाठी ते येतात. ते असले कि बिनधास्त वाटते काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी थांबत करतो.आम्हाला यासाठी वेळ लागतो पण त्यांची कधी कुरकुर नसते.उलट वस्तू. रिक्षात आणून ठेवणे, दळण गिरणीत ठेवणे अशी कामे ते न सांगता करतात.
रिक्षात वृध्द माणसे आहेत याचे त्याना भान असते.त्यात मला कमरेचा त्रास आहे ही जाणीव असल्याने ते अत्यंत सुरक्षित रिक्षा चालवतात.
दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतरही ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळेनुसार हक्काने बोलावतो.एकदा सारसबागेत जायचे होते. त्यांनी बाजूच्या गेटने कमीत कमी पायर्या चढाव्या लागतील अशा ठिकाणा पर्यंत रिक्षा नेली. वयस्क माणसे पाहून बागेतही कोणी हरकत घेतली नाही.आमचे छान गणेश दर्शन झाले.जवळच एक शिव मंदिर आहे तेथेही बदल म्हणून त्यांना घेऊन जातो.घाई करू नका व्यवस्थित दर्शन घ्या असे सांगतात.
स्टेशन,विमानतळ अशा ठिकाणी पहाटे जायचे असेल तर अरुण शिंदेना रिक्षा सांगितली की अलार्मही न लावता बीनधास्त झोपता येते.
त्याना बोलावले की ते पाच मिनिटे आधीच येऊन थांबतात.बेल वाजवून मी आलो आहे. सावकाश आवरा काही घाई नाही.असे सांगतात..लगबगीने सामान घ्यायला येतात. कधी चहा घ्यायला थांबा म्हटले कि मात्र घाई करतात.कधीच थांबत नाहीत.मृदू आवाजात नम्रतेने बोलतात.
आमच्या साठी अडीनडीला उपयोगी पडणारा,आधार देणारा हा घरचा माणूस आहे.
या ग्रुपवर एका लेखाद्वारे एकट्या पुरुषांनी राहण्याविषयी चर्चा झाली होती. मला आमचे कलबागकाका आठवले आणि त्यांच्याबद्दल लिहावेसे वाटले ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे वाटले.
आनंदी वृद्धत्व - ७
' परंतु यासम हा' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे आमचे कलबाग काका होते. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान.उर्जा स्त्रोत,तन,मन धनानी पार्किन्सन्स मित्रमंडळाशी एकरूप झालेले कलबागकाका म्हणजे जेष्ठ शुभार्थी नारायण कलबाग.असा माणूस होणे नाही.आज ते आपल्यात नाहीत पण ९६ वर्षे ते आनंदात जगले.पर्किन्सन्सही त्यांच्या आनंदाला रोखू शकला नाही.यांचे ३० सप्टेंबर २०२० ला ९६ व्या वर्षी निधन झाले.तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.तरीही ते सेन्चुरी नक्की करतील असे वाटत होते.त्यांच्याशी अजून किती तरी विषयावर बोलायचे होते सर्व राहून गेले.माझा शेवटचा फोन lock down च्या काळात झाला.
.त्यांच्या पत्नीलाही
पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका एकटेच
राहात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत नाही तर
इतरांनाही मदत करत.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला होता.
त्यानुसार दिनचर्या आखली.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली.या सपोर्ट सिस्टीममध्ये मुंबईचा भाचा,कॅनडाची भाची,मसाजवाला,कामवाली,तिची मुलगी,काही काळाकरता येणारा केअरटेकर,पीवायसीच्या कॅन्टीन मध्ये गप्पा मारायला भेटणारे मित्र.असे अनेकजण होते.आमचा सपोर्टग्रुपही त्यात असावा.सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.कधी गोकर्ण,कारवार असे गाडी करून जात.आळंदी देहूला जात.
ते भांडारकररोडला राहात.सकाळी रिक्षाने वैशालीत जाऊन ब्रेकफास्ट करत. ते त्यांना पचनाला त्रासदायक वाटायला लागले.नंतर यात त्यांनी बदल केला.मुंबईच्या भाच्याकडे ते आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा ब्रेकफास्ट ठरवायचे.यात सूप sandwich,इ.हलका आहार असायचा. भाचा स्वीगीवरून तो बुक करायचा.
Lock down काळात त्यांच्याकडे येणारा मसाजवाला सकाळी थोड्या वेळासाठी आणि रात्री येणारा केअर टेकर येत असेल का अशी काळजी मला वाटत होती..म्हणून चौकशीसाठी सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.
मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके
आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा
माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये
नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची भारतात आलेली होती.ती काही दिवस राहिली आणि आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही
त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो.हे सर्व कथन ते कोणतेही
भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र नव्हते,त्यांचा टीव्हीही बिघडलेला.दुरुस्तीसाठी कोणाला बोलावणे शक्य नव्हते.याबाबत त्याना काही खंत नव्हती.ते सांगत होते माझी कॅनडाची भाची दोन वेळा भारतातल्या सर्व हकीकतीच्या बातम्या वाचून दाखवते.त्यांच्याकडे सर्व गोष्टीची त्यांच्या पद्धतिची सोल्युशन असायची.
आनंदी वृद्धत्व - ६
आत्तापर्यंत आमचे वृद्धत्व आनंददायी होण्यासाठी रोलमॉडेल असणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल लिहिले यावेळी मात्र एका व्यक्तीबद्दल नाही तर जोडप्याबद्दल लिहिणार आहे.या दोघांचा एकमेकाव्यतीरिक्त विचारच करता येत नाही इतके त्यांच्यात अद्वैत आहे.हे जोडपे म्हणजे हास्य्योगी विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे.काटे सर वय वर्षे ८४ आणि सुमनताई वय वर्षे ७५. केवळ या वयामुळेच त्यांना वृद्ध म्हणायचे.नाहीतर कोणत्याच अंगाने ते वृद्ध नाहीत.गेली २३ वर्षे ते चैतन्य हास्ययोग परिवाराची धुरा समर्थथपणे सांभाळत आहेत..ही सांभाळतानाचा त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे.
आमची रोजची सुप्रभात विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांच्या टाळ्या आणि प्रार्थनेने होते.खणखणीत आवाजात आकडे मोजत आणि माहिती सांगत २० मिनिटे व्यायाम प्रकार,यात डोळ्यापासून पाउलापर्यंत सर्व अवयवांना व्यायम होईल अशी रचना आहे.त्यानंतर प्राणायाम आणि हास्य असे चालते.प्राणायाम झाला की मकरंद टिल्लू हास्य घेतात.प्रमोद ढेपे वाढदिवस साजरे करतात.ही सर्व रचना अनेक रथी मह्रारथीनी पाहून मान्यकेली आहे.काही सुधारणा सुचविल्या.त्याचे कौतुक केले.यात कै. डॉ. ह..वी.सरदेसाई, कै.डॉ.नितीन उनकुले,डॉ.शरद मुतालिक, डॉ संचेती, डॉ.हिमांशू वझे अशी दिग्गज मंडळी आहेत.
करोना पूर्व काळात १८० बागामधून विविध सहकारी हे सर्व घेत.अधून मधुन प्रत्येक बागेत दोघांची फेरी असे.त्यात्या बागेत यांच्या फेरीने चैतन्य निर्माण होई.यासाठी दोघे पहाटे पाचला उठत.अंघोळ,पूजा आवरून स्कूटरवर लांबलांबच्या ठिकाणी जात.फक्त शस्त्रक्रिया,आजारपण यामुळे या अविरत चाललेल्या कामात खंड पडे.सगळ्या हास्यक्लबनी मिळून फोर व्हीलर भेट द्यायचा प्रस्ताव मांडला होता पण त्यांनी तो धुडकावून लावला.काही घेण्यापेक्षा देणेच ते पसंत करतात. मध्यंतरी त्यांच्या पंच्याहत्तरीला त्याना पंच्याहत्तर हजाराची थैली देण्यात आली.त्यात २५००० ची भर घालून त्यांनी हास्य्क्लबलाच ती दिली.आमच्या समोरच्या बागेत २००७ साली हास्यक्लब सुरु झाला आणि आम्ही या दाम्पत्याच्या संपर्कात आलो.प्रथम दर्शनी प्रभाव पडावा अशी ही जोडी.बघता बघता आमच्या जवळची झाली.आमच्या बरोबर आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळ असतेच ते आमच्या या परिवारातलेही झाले.केंव्हाही बोलावले तरी आमच्यासाठी हजर झाले.
करोना नंतर बागा बंद झाल्या आणि एकदम हे सर्व ठप्प झाले.पण स्वस्थ बसतील ते काटे दाम्पत्य कसले? टिल्लू यांनी ओंनलाईन हास्यक्लब घेण्याची कल्पना सुचवली आणि ती एकदम हिट झाली.आज महराष्ट्रातील विविध भागातून, भारत आणि परदेशातीलही २००० च्या वर सदस्य आहेत.झूमवर जास्तीत जास्त १००० सहभागी मर्यादा आहे.ती संपल्यावर युट्युबवर सोय करण्यात आली.सहभागी करून घेणे थांबवले नाही.सेवादलातील सानेगुरुरुजींच्या आंतरभारती,विश्वभारतीची संकल्पना येथे प्रत्यक्षात आली आहे 'भारत जोडो विश्व जोडो' हे हास्यक्लबचे ब्रीदवाक्य असते.सर्व जाती धर्माच्या, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक स्तरातल्या सदस्यामुळे सामजिक समरसतेचे हे उत्तम उदाहरण आहे. सेवादलाचे संस्कार असले तरी येथे सर्व राजकीय पक्षाचे सहभागी आहेत आणि विविध पक्षांचे नेते या कार्याला मदत करत असतात. माणसे जोडण्याच्या या जोडप्याच्या गुणामुळे हे शक्य होते. हे मोफत चालते.या त्यांच्या कामाबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे.यावर स्वतंत्र लेख लीहावा लागेल.आनंदी वृद्धत्व हा विषय असल्याने हात आवरता घेते.महत्वाचे म्हणजे या कार्याची सुरुवातच काटे सरांच्या निवृत्तीनंतर झाली.
गव्हर्मेंट पॉलीटेकनिक मधून निवृत्त झाले.घरातल्या जबाबदाऱ्या आधीच संपल्या होत्या. काम करून शिक्षण केल्याने सतत कामात राहायची सवय निवृत्तीनंतर रिकामपण खायला उठले.त्यातच स्वत;ची चूक नसताना एका जवळच्या व्यक्तीच्या चुकीने ते आर्थिक संकटात सापडले.त्याना नैराश्याने घेरले.त्याचा शरीरावर परिणाम होऊ लागला.वजन कमी होत होते.सर्व तपासण्या नॉर्मल.तरी तब्येतीची कुरकुर चालू होती.कुटुंबीय चिंतेत पडले. डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांच्याकडे गेले. त्यांनी लिहून दिले. रोज सकाळी बागेत जाणे आणि व्यायाम करणे.जवळच्या संभाजी उद्यानात जाऊन सेवादलात शिकलेले व्यायाम सुरु केले. हळूहळू इतर लोक सामील होऊ लागले.नैराश्य कधी पळून गेले समजलेच नाही.यात प्राणायाम ,हास्य यांचाही समावेश झाला. लोकाना फायदा होत होता लोक वाढू लागले.शिक्षक तयार झाले.वेगवेगळ्या बागात शाखा सुरु झाल्या..
घरातील सर्व त्यांचे डिप्रेशन गेले म्हणून खुश होते. सुमनताईनी तर त्यांची अकाउंटंटची चांगली नोकरी पन्नासितच सोडली आणि जेथे राघव तेथे सीता म्हणत त्यांच्या कार्यात स्वत:ला झोकून घेतले.तसे त्यांचे एकत्र कुटुंब आहे.त्याना दोन मुले.एक मुलगा एअरफोर्से मध्ये त्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुली प्रथमपासूनच बदलीच्या ठिकाणी.दुसरा साफ्टवेअर इंजिनिअर.पत्नी शिक्षिका आणि दोन मुली,काटे सरांची एक अविवाहित बहीण सिंधुताई त्यांच्याबरोबर राहतात.त्या ९१वर्षाच्या आहेत.काटे दाम्पत्यासाठी त्या रोल मॉडेल आहेत.मुख्याध्यपिका होत्या..सामजिक कामात सहभागी असतात.यासाठी कोरोना पूर्व काळात दुपारी तीन साडे तीनला बाहेर पडायच्या त्या रात्री आठ साडेआठला घरी यायच्या.अजूनही स्वत:ची कामे स्वत: करतात. पहाटे उठून व्यायाम करतात.काटे सरांचे आईवडील ९७/९८ वर्षाचे होऊन गेले.सरांची मावशीही त्यांच्याकडे राहायची.ती ९७ वर्षांची होऊन गेली.सुमन ताईंची याबद्दल तक्रार नसते.नोकरी सांभाळून सर्वांचे करताना त्यांना त्रास झाल असेल असे आपल्याला वाटते.त्या म्हणतात सहवासातून प्रेम निर्माण होते.आता सुनेशीही त्या छान जमवून घेतात.इतर कामाला बाई असली तरी स्वयंपाक घरीच असतो.दोघी मिळून परस्पर संगनमताने त्या स्वयंपाक करतात.आपल्याला सामजिक काम सुनेच्या सहकार्यामुळे करता येते हे अभिमानाने त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.मुलांनीही बाबांना सांगितले आहे आतापर्यंत खूप केलेत आता घराची जबाबदारी माझी.तुम्हाला जे आवडेल ते करा.काटे सरांनी तन मन, धनाने हास्यक्लबच्या कार्याला वाहून घेतले. एकुणात काटे सरांच्या.तीन पिढ्या गुण्यागोविन्दानी राहतात.
त्यांचे घर मोट्ठे आहे.पण कोरोनामुळे सगळे घरी आणि दोन नाती,सून मुलगा यांचे ऑनलाईन काम चालू असते.प्रत्येकजण एकेका खोलीत. दर बुधवारी हास्यक्लबची ऑनलाईन मिटिंग तसेच विविध कार्यक्रमही ऑनलाईन असतात.सर्वाना यासाठी एकमेकांशी जुळवून घ्यावेच लागते.सुमनताईनी निवृत्तीनंतर संगीताच्या विशारद पर्यंत परीक्षा दिल्या.आता घरात रोजच्या गरजेच्या गोष्टी विविध खोल्यातून ऑनलाईन चालू असल्याने रियाज करणे बंद असे सुमनताईनी परिस्थितीनुसार ठरवले आहे.हे एक तडजोडीचे उदाहरण सांगितले.अशा अनेक तडजोडी प्रत्येकाला कराव्याच लागत असणार तेंव्हाच आनंदाने एकत्र राहता येते.आता तर हे विश्वची यांचे घर झाले आहे.त्यांचे कुटुंब विस्तारीत झाले आहे.
या विस्तारित कुटुंबाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.आनंद लुटला जातो..कोरोन पूर्वी देश परदेश अशा अनेक सहली झाल्या.अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. दिवाळीत ११००० किलो मिठाई वाटण्यात येते. शहीद जवान कुटुंबियांना मदत केली जाते.भूकंप,पूर अशी कोठेही आपत्ती आली की हे धाऊन जातात तेथे जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते.अशा खूप गोष्टी आहेत.
ऑनलाईन हास्यक्लब मध्ये अनेकजण आपले मनोगत सांगतात काटे दाम्पत्याबाद्द्ल कृतज्ञता व्यक्त करतात..करोनामुळे,लॉकडाऊनमुळे जगणे विसरलेल्या नैराश्यात गेलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढले आहे.हे ते श्वासाईतक्या सहजतेने करतात.उलट या सर्वाना बदलताना पाहून आमचीच उर्जा वाढते, ही देवाणघेवाण आहे असे त्यांचे म्हणणे असते.कोणतेही काम आनंदाने करायचे ही या दोघांची वृत्ती आहे.अनेक पुरस्कार या त्यांच्या कार्यामुळे त्यांच्याकडे चालून आले आहेत.पुणे महानगरपालिकेचा जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष नागरी सत्कार करण्यात आला जनसेवा फौंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तशी यादी मोठ्ठी आहे हजारोंच्या मनातील अबाधित स्थान हाही मौलिक पुरस्कार आहेच.
आपले कार्य असेच बहरो.यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही मनापासून प्रार्थना.
आनंदी वृद्धत्व - ५
आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांना आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडावे असे सांगण्यासाठी मी फोन केला.विषय कोणता या बाबत विचारले तर म्हणाले, सध्या माझा करोनावर अभ्यास चालू आहे.त्यांचा करोना या आजाराचे स्वरूप,करोनाच्या चाचण्या,करोनामुळे होत असलेले सामाजिक मानसिक परिणाम असा करोना वर विविधांगी अभ्यास आकडेवारीसह झाला होता.एकीकडे या विषयाकडे तटस्थपणे पाहात असताना करोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या दोन घटना वाचून ते व्यथित झाले होते आणि यासाठी जेष्ठांसाठी स्वमदत गट तयार करावा का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.करोनाविषयी अजिबात वाचायचे नाही.बातम्या पहायच्या नाहीत. प्राथमिक माहिती आहे तेवढी बस झाली असा विचार करणाऱ्या मला हे भारीच वाटले.अर्थात मी हा विषय नाकारला त्यांच्या दुसऱ्या एका प्रयोगाबद्दल बोलायला सांगितले. २००० मध्ये त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हाचाच उत्साह आज ८७ व्या वर्षी तब्येतीच्या थोड्या तक्रारी असूनही पाहून मी अवाकच झाले.त्यांच्या सहवासात आल्यापासून असे आवाक होण्याचे क्षण अनेक आले.
पटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये
भेटले.तेंव्हा त्यांनी सत्तरी ओलांडली होती.त्यावेळीही आणि आताही त्याना वृद्ध म्हणावेसे वाटत नाही.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स
मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..
१९९२
मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध
माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स
फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती
मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट
सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु
केला.
'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्या आमच्या
मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता
बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का
डीटीपी शिकून घ्यायचं नाही? पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर
झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया
प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात
कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर
संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना
आपल शिकण होईल हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.
स्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात
विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव
आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल
ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट
प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी
मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर
सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके विनामूल्य देण याबाबत ते ठाम
आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार विरोध नव्हता.दुसर्याबाबत 'रुका हुवा फैसला'
सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र
हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना
वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी
परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची
बाजू मांडणार्या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले.
तेही सायकलवर.
या वयातही उन असो, पाउस असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार
असतो.मिटिंग दुपारी तीनला असली
तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत
येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या
जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या
त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता १००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे
कमी तिथ आम्ही' ही
वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर
पेशंटला नेमक कस जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत.
शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी
होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन
पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न
.झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते वजन काट्याच ओझ
आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे
भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा
(केअर टेकर)यांनाच जास्त असते.
कोरोनानंतर मात्र ते घराच्या बाहेर अजिबात पडले नाहीत.त्यामुळेच कदाचित घरात इतरांना कोरोना भेटून गेला पण पटवर्धन यांच्याकडे मात्र फिरकला नाही.त्यांच्या मुलांनी म्हटले गाडीतून थोडे फिरवून आणू का? तर त्यांनी नकार दिला एकदा बाहेर जायचे नाही हे स्वीकारले आहे.तर आता मला त्याचे काही वाटत नाही. असे त्यांचे म्हणणे.एक मुलगी पुण्यात तर एक तळेगावला करोना काळात त्यांच्या भेटीही फोनवरच असतात.असलेल्या परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार ते नेहमीच करत आले.आम्ही प्रथम त्यांच्या घरी गेलो तेंव्हा ते आणि पत्नी दोघेच होते.मुलगा जपानला होता,नंतर मुलगा जपानहून आला त्याचे लग्न झाले.त्यांच्याबरोबर एकत्रित राहत. पत्नीच्या निधनानंतर मुलगा सून नातवंड असे राहतात.पण या प्रत्येक परिस्थितीत ते विना तक्रार आनंदातच असतात.आता करोना काळात त्यांनी बाहेर तंबू ठोकला आहे आणि मधुन मधून वाचन,आराम तेथेच करतात, आता पाउसात ते तंबूचे काय करणार आणि आणि कोणता वेगळा मार्ग शोधणार याची मला उत्सुकता आहे.सध्या सायकलला आराम मिळाला आहे.पटवर्धन मात्र आराम करणाऱ्यातले नाहीतच.
ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग
करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आत्महत्या
करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे
समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण
आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते फक्त त्यांच्या पत्नीचे
शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल
पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी( पार्किन्सन्स डिसीज ) पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका
त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार
केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली
अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या
सर्वातून
निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात
मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही
रटाळ न होता संवाद साधणार्या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.
लिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत
हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा
ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली
होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात
घेता इतकी वर्षे त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप
मोठ्ठा वाटा आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही
देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना
येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम
मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या
छोट्या काचेच्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे
असत.वहिनी बरोबर असल्या की त्यांच्या औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण
ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि
शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले
तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही
बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी
आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ
कस नेमक !
त्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष
बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण
ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्याचवेळा
आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन
सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट
ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो
पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच
करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच
राहतात.
पटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला
दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत
करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन
पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर
या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची
परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी
असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती
समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय
निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न
असतात, शंका असतात काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस
बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा
ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.
एका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा
विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला
होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद
असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे
कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर
उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.मनोरंजनाच्या कार्यक्रमात Ramp Walk असो की सैराट वरील गाण्यावर नाचणे असो पटवर्धन यांच्या उत्स्फूर्त सहभागाने इतरांना ही स्फूर्ती मिळते..प्रत्येक सहलीत वहिनी बरोबर
असायच्या.एक वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ
शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी कोणीतरी वहिनींच्या मदतीला
येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान
करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.
पार्किन्सन्स मित्रमंडळाला २०१४ मध्ये अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला
त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी
बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी म्हणजे मुलगा आणि दोन विवाहित मुली यांनी हॉस्पिटलचा सर्व
चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले
होते.तुम्हाला इच्छा होईल तेंव्हा या असे सांगितले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण
हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना
सन्मान चिन्ह दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर
त्यांचाही वाटा होताच ना?काही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे
माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार
त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्यांसाठी एका कागदावर
हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले
होते.तो कागद ते येणार्यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा
शुभार्थींच्या यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन
नाव होते. हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना?का नसतील
माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ
हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर
कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन
व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना
अजून लटपटतात.
त्यामुळे वाटलं पटवर्धन येतील?पटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या
व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत
नव्हते म्हणून हेच गेले.
सध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते
भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम स्वांतसुखाय आहे.
स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून
बदलली.आता बाहेर जाता येत नसल्याने हे काम थांबले पण त्याची खंत न करता त्यांचा कोरोनावर अभ्यास सुरु झाला.
माझ्या पाहण्यात ते एकदाच आजारी पडले त्यावेळी खोकला आणि अशक्त पण खूप होता आवाज खोल गेला होता.मुलगा सून घरी असल्याने त्यांचा आधार होता.तो घेण्यात त्यांनी अनमान केले नाही.या काळात त्यांनी आपल्या आजाराची कारणे शोधली ठराविक सिझन मध्ये हे होते हे त्यांच्या लक्षात आले त्यानुसार त्याकाळात ते आधीपासूनच तयार असतात एकदा हे होणार हे माहित आहे तर स्वीकार करून त्यातून मार्ग काढायचा हे त्यांनी ठरवून टाकले.सारखे पडून राहावे लागायचे तर त्यांनी श्रवणपचार शोधून स्वत:वर प्रयोग केले.पीडीमुळे हालचालीवर मर्यादा आलेल्याना बेडरिडन पेशंटना,वृद्धत्वामुळे विकलांग झालेल्यांना उपयोगी होईल असा एम पी ३ प्लेअर घेऊन मराठी हिंदी भरपूर गाणी लोड केली.वापरायला सोपा असा हा प्लेअर तीन महिने शुभार्थिनी वापरायचा आणि उपयोगी वाटला तर ठेऊन घ्यायचा अशा तत्वावर प्रयोग केला स्वत:च्या पदरचे पैसे घातले.फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे का झाले याचा शोध घेणारा लेख लिहिला.मग काही शुभार्थीना ओळखीच्या स्नेही मंडळीना ऐका आणि आनंद लुटा म्हणत भेट दिला.असे आमचे स्वत:ही आनंदी राहणारे आनंद लुटणारे तरुण शुभंकर.
शुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच
निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर
होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू
शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे पटवर्धन मला
तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी
अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म
जगणारे अध्यात्मिक.