Wednesday, 4 November 2020

आनंदी वृद्धत्व - १

     आनंदी वृद्धत्व - १

                           वृद्धांचे पालकत्व या ग्रुपवर विविध अनुभव वाचायला मिळत आहेत.प्रत्येक अनुभवावर दीर्घ प्रतिसाद लिहायचा असतो.पण थोडक्यात लिहिले जाते. आज मी आमचाच अनुभव सांगणार आहे.

                          आमच्या बाबतीत सांगायचे तर आमचे वृद्धत्व अत्यंत आनंदी आहे.समधानी,कृतार्थ आहे. सुखी माणसाचा सदरा आमच्याकडे मागु शकता.यासाठी आर्थिक गुंतवणुकीइतकीच  नात्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. आर्थिक नियोजनात आम्ही थोडे कमी पडलो पण नात्यांची गुंतवणूक मात्र भरपूर आहे.

                            निवृत्तीपूर्वीच निवृत्तीनंतर काय करायचे याचे प्लान ठरवले होते.आमच्या घरात पार्किन्सन्सने प्रवेश केला आणि आधीचे प्लान बाजूला ठेवून जीवनाला वेगाळीच दिशा मिळाली. मी आधी काय ठरवले होते हे सांगणे येथे गरजेचे नसल्याने त्याबाबत लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे.

बर्याच अनुभवात ४५/ ५० वयापासून नियोजन करावे असा विचार दिसला. त्याप्रमाणे झाले तर उत्तमच. पण वेळ पडली तर प्लान बदलण्याचीही मनाची तयरी ठेवावी.ठरवल्याप्रमाणे होत नाही याची खंत बाळगू नये असे सुचवावेसे वाटते.

                             माझे पती इंजिनिअर.वय वर्षे ७९.एका मोठ्या कंपनीतून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.गेली २१ वर्षे पार्किन्सन्स आजार आहे.जुलैमध्ये कोविद्नीही हजेरी लावली.आता पूर्ण बरे झाले.मी वय वर्षे ७२.समाजशास्त्राची प्राध्यापक, २००७ मध्ये स्लीप डिस्कचा त्रास सुरु झाल्याने एक वर्ष आधीच स्वेछ्यानिवृत्ती घेतली.मला ब्लड प्रेशर,Hypo ,thyroid,चा त्रास आहे.मागच्या वर्षी कॅन्सर झाला त्यातून बरी झाले.

तीन मुली. त्या विवाहित आहेत.आम्ही दोघेच राहतो.पण मुली जावयांचे आमच्याकडे पूर्ण लक्ष असते.फोनवर आवाजावरून त्यांना आम्ही ठीक आहोत का हे समजते.आम्ही बरीच वर्षे या भागात राहत असल्याने आमची सपोर्ट सिस्टीम भक्कम आहे.यात वाणी,फळवाला,भाजीवाला इ. दैनंदिन गरजा भागवणारे आहेत तसेच गावातून काही आणायचे असेल,इतर काही गरजा असतील तर पुरवणारे मित्र मैत्रिणी आहेत.ज्यासाठी आम्हालाच जायला हवे अशा कामासाठी बरोबर येणारे रिक्षावाले आहेत.आमच्याकडे घरकाम करणाऱ्याही आमच्या सपोर्ट सिस्टीमचा भाग आहेत.आमचे शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच आहे त्यांच्याकडे तीन डॉक्टर आहेत.आम्हाला उठून दवाखान्यात जावे लागत नाही..येता जाता तेच व्हिजीट   करतात.त्यांचा खूपच आधार वाटतो मुलींच्या प्रमाणे ते आमचे पालकच आहेत.मुलीनाही त्यांच्यामुळे आमची काळजी कमी वाटते.याशिवाय एक जावई आर्मीत अर्थोपेडीक सर्जन आहे.त्याचाही आधार वाटतो.  

                          एक मुलगी पुण्यातच कायम आहे एक दिल्लीला तर एक बदल्यानुसार वेगवेगळ्या गावी. गेली काही वर्षे पुण्यात आहे.त्या एका हाकेत धाऊन येतील अशी खात्री असते.आम्हीही त्याना काळजी वाटणार नाही असेच वागतो.सकाळी आमच्या समोरच्याच बागेत हास्यक्लबला जातो मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू घेतो.तो संपल्यावर थोडावेळ मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा,हास्यविनोद यातून भरपूर मानसिक प्राणवायू मिळतो. संध्याकाळी आमच्याकडे आजूबाजूचे काहीजण येतात आम्ही रामरक्षा,प्राणायाम,मेडीटेशन करतो.आठवड्यातून दोनदा आमच्या घरी गाण्याचा क्लास असतो.त्याचे विविध उपक्रम चालू असतात.

                      आमच्याकडे एक मोठ्ठा हॉल असल्याने.गुरु पौर्णिमा,मित्र मैत्रीणीत कोणाचे लग्न असल्यास एकत्रित केळवण आमच्या पार्किन्सन्स मित्रेमंडळ या सपोर्ट ग्रुपची मिटिंग,हास्य्क्लबची मिटिंग अशा गोष्टी ही चालू असतात.काही चांगल्या कामासाठी छोटा हॉल हवा असल्यास आम्ही देतो.मध्यंतरी वर्ध्याच्या सर्वोदयी माननीय कालीन्दिताई पुण्यात आल्या होत्या. अयोजकाना त्यांच्याशी अनौपचारिक गप्पांसाठी जागा हवी होती आमच्याकडे या गप्पा झाल्या.आमच्यासाठीही घरबसल्या ही सुवर्ण संधी होती.समोर बाग असल्याने तेथे येणारे डोकावतात.काही हवे नको विचारतात. आम्ही दोघेही माणसात रमणारे असल्याने आम्हाला केंव्हाही कोणी आलेले चालते. 

                     सर्व काही सुरळीत असताना हे असे जगणे असते पण घराच्या  दुरुस्त्या,देखभाल यासाठी मुलींचाच आधार असतो.माझी एक शस्त्रक्रिया,कॅन्सर,ह्यांचा कोविद अशी आमची मोठ्ठी आजारपणे झाली त्यावेळी मुलीनी एकत्र संगनमताने सर्व सूत्रे  आपल्या हातात घेतली आता आम्ही म्हणू तसेच करायचे असे बजावले तन,मन धन या सर्व पातळीवर चोख भूमिका बजावली.आम्हाला १०० टक्के कम्फर्टआणि झिरो इनकन्व्हीनिंअस असेल याची पुरेपूर काळजी घेतली.आमचे काही एक न ऐकता स्वत:च्या घरी काही काळाकरिता हलवले.मोतीबिंदू सारख्या शास्त्रक्रीयान्च्यावेळी मात्र आमचे आम्ही मॅनेज केले.                      

करोना नंतर लॉकडाऊन झाला त्यावेळीही कामवाल्या नसल्याने आम्हाला झेपणे शक्य नव्हते.आम्ही कोणतीही खळखळ न करता मुलीकडे राहायला गेलो.

 आम्ही स्वत:ला  पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले आहे.तोही मोठ्ठा परिवार आमच्याबरोबर आहे.या आमच्या कामात आमच्या पालकांची लुडबुड नसते.उलट गरजेनुसार मदतच असते.पण माझ्या ,कॅन्सरच्या काळात माझ्या मुली आणि आमचा पार्किन्सन्स परिवार यांनी मी पूर्ण बरी होईपर्यंत काही काम करू दिले नाही.एकुणात आमचे पालक आणि आम्ही यांच्यात सुंदर हार्मनी आहे.तारा जास्त ताणलेल्याही नाहीत आणि सैलही नाहीत.

आमच्या या आनंदी वृद्धत्वाचे श्रेय' पार्किन्सन्ससह अनांदाने जगूया' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पार्किन्सन्स मित्रमंडळाला जाते येथे काम करताना आमचा स्व विस्तारला.१५०/२०० पेशंटच्या घरभेटी घेताना आणि काम करताना आनंदी वृद्धत्वासाठी रोल मॉडेल मिळाले. वृद्धत्व कसे असावे कसे नसावे याचा वस्तुपाठ मिळाला.

या रोल मॉडेल बद्दलही लिहिणार आहे.

https://parkinson-diary.blogspot.com/2017/09/blog-post_16.html

Sunday, 8 March 2020

मी तीन मुलींची आई

                                               मी तीन मुलींची आई
"मुलं किती तुम्हाला?
"तीन मुली"
 'आणि मुलगा?' 
मला तिसरी मुलगी झाल्यापासून आतापर्यंत  अगणित वेळा अनेकांनी हा प्रश्न विचारला त्यात स्त्री-पुरुष ग्रामीण भागातले, शहरी भागातले तरुण, वृद्ध सर्व तऱ्हेचे लोक होते आजतागायत असा प्रतिप्रश्न का विचारला जातो हे मला समजले नाही मुलगा असता तर लपून का ठेवले असते.
 मी तीन मुलींची आई असल्याने मुलगी आणि मुलगा यातील भेद समाजमनात किती ठासून भरलेला आहे हे वेळोवेळी प्रत्ययास येते.महिला दिनानिमित्ताने तो लिहावासा वाटला.
मी स्वत: मुलगी म्हणून भोगाव्या लागलेल्या समस्यांमुळे माझ्या मनात अशा असमानतेबद्दल थोडी तिडीक होतीच,त्यामुळे वेळोवेळी या असमानतेचे दर्शन खटकत राहिले.याची सुरुवात तिसऱ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या क्षणापासूनच झाली.डिलिव्हरी झाल्याझाल्या डॉक्टर ज्या स्वरात मुलगी झाली हो तुम्हाला म्हणाले त्यात 'अरेरे' मला त्या दमलेल्या क्षणीही जाणवले  आणि थोडा राग आला.तिसरी मुलगी आठ पौंडाची भरपूर जावळ असलेली एक बट तर कपाळावर आलेली आणि पाहता क्षणी उचलून घ्यावी अशी वाटणारी गोड होती.डॉक्टर व्हिजिटला आले कि तिला उचलून घेत.गोड आहे हो तुमची मुलगी म्हणत.असे असले तरी भेटायला येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला मी किती 'बिचारी' चा भाव जाणवे मी इतकी आनंदी कशी याचे आश्चर्यही जाणवे.
माझा ब्लडग्रुप RH - आहे हे मला या प्रेग्नन्सीतच समजले होते.अशावेळी मुलीचा ग्रुप Positive असला तर आईला पुढच्या मुलाच्यावेली धोका नको म्हणून एक इंजेक्शन घ्यावे लागते.मुलीचा ब्लड ग्रुप पाहण्यासाठी नर्स आल्यावर मी म्हटले अहो आता मला चान्स घ्यायचा नाही तर याची गरज नाही. नर्स म्हणाली.आता मुलगी झाली ना विचार बदलला असेल असे वाटले.मी सांगितले माझा विचार बदलला नाही तर ती मला घाई करू नका होईल मुलगा असे समजावत होती.
मला मुलगी झाली त्यापेक्षा मी पुढे चान्स न घेण्याचा निर्णय घेतला याचाच सर्व वडीलधार्यांना राग आला होता.सर्वांच्या विरोधात जाऊन आम्ही दोघांनी एकमताने निर्णय घेतला.माझ्या सासुबाईनी तर बोलणे सोडले मुलीला त्या हातही लावत नसत सासर्यानाही त्याबाबत सक्त ताकीद होती. पण ही तिसरी इतकी गोड होती त्यांचा निर्णय कधी बारगळला हे त्यानाही समजले नाही.उलट ती त्यांची सर्वात लाडकी नात झाली.
असे अनेक अनुभव येताच राहिले.
 आमच्या जवळच्या एका नवीनच आलेल्या डॉक्टरांच्याकडे आजारी असेल तर मुलीला घेऊन जाई.त्यांचा मुलगा माझ्या मुली एवढाच. त्या म्हणाल्या तुम्ही ऑपरेशनची उगीच घाई केली.मी तुम्हाला आयुर्वेदीक उपचार केले असते मला पहा त्या उपचारानीच मुलगा झाला.मुलगा हवाच हा अट्टाहास मी असा विविध स्तरात पाहिला. 
आमच्या जवळ एक टेलिफोन्स मधले उच्चाधिकारी राहत होते.ते Tata Institute of Social Science चे एमएसडब्ल्यू चे पहिल्या batch चे विद्यार्थी होते.त्यांची मुलगी आली होती म्हणून त्यांनी गप्पा मारायला बोलावले.ते मुलीला म्हणले," यांच्याबाबत एक Tragedy  आहे." आता हे काय सांगणार म्हणून मी जीवाचा कान करून ऐकत होते.कारण माझ्या आयुष्यात असे काहीच झाले नव्हते.ते म्हणाले, 'अग यांना तीन मुली आहेत मुलगा नाही.मला इतका संताप आला मनातल्या मनात मी कपाळाला हात लावला.तडक उठून निघावे वाटले पण मी संताप आवरून कशीबशी पाच मिनिट बसले  
ओटी भरणे,बारसे अशा प्रसंगी सुरुवातीला.माझ्याकडून ओटी भरणे नको असल्याचे मला अनेक ठिकाणी जाणवले त्यानंतर मी उपयुक्त पुस्तके भेट द्यायला सुरुवात केली.मुल नसणाऱ्याना तर किती अपमान सहन करावा लागत असेल कल्पनाच करवत नाही.मला कधी अपमान वाटला नाही पण अशा भ्रामक समजुतीतून लोक कधी बाहेर पडणार याची खंत वाटायची.
आमच्या एका नात्यातल्या मुलाला मुलगी पाहताना एक मुलाला आवडलेली मुलगी केवळ त्या तीन बहिणी आहेत म्हणून नाकारली.आईला मुली म्हणजे हिलाही मुलीच होतील आणि आईवडिलांची जबाबदारी त्यांच्या शेवटच्या काळात घ्यावी लागेल असा दूरदर्शी विचार होता.पण यामुळे माझ्या मुलींची लग्ने जमण्यात  ही समस्या निर्माण होणार अशी भीती माझ्या मानत निर्माण झाली एवढे मात्र खरे.पण तसे झाले नाही दोन मुलीनी आपली लग्ने आपणच जमविली.एकीचे आम्ही जमवले पण ती माणसे कोत्या विचारांची नव्हती.उलट आत्ताच्या माझ्या आजारपणात मी मुलीकडे राहिले.पूर्ण बरे झाल्याशिवाय जायचे नाही अशी मुलीच्या सासूची ताकीद होती.
आम्हाला मात्र मुलगा नाही याची खंत आजतागायत वाटली नाही.त्यांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले त्यांच्यावर विश्वास ठेवला.त्या म्हणजे  आमचा मुलगाच आहेत असाही विचार केला नाही.त्याना माणूस म्हणूनच वाढविले.त्यानाही आपल्याला भाऊ नाही याची खंत कधी वाटली नाही.मावस आत्ये,मामे,चुलत अशा सर्व भाऊ  होतेच.भाऊ नाही म्हणू आवर्जून त्यांच्याकडून ओवाळणी मिळायची. मानलेला भाऊ किंवा मुलगा अशी काही नाती नव्हती.
 आम्ही नवीन बंगल्यात राहायला आलो तेंव्हा आमच्या आजूबाजूला कोणीच नव्हते इतर बंगले होत होते त्याचे लमाणी Watchman होते.त्यातील एकाला तिसरी मुलगी झाली.नवरा दारू पिऊन मुलगी झाली म्हणून मारायचा.त्याचा भाऊ आमच्या शेजारी Watchman होता.तो त्याला सांगत होता".साहेबाला तीन मुली .तो मारतोय का बाईना? त्याची मुलगी मुक्त्याली काही दिवसापूर्वी भेटली तिचे लग्न झाले होते आणि ती मला अभिमानाने .तीन मुली झाल्यावर ऑपरेशन केले असे सांगत होती..एक मुलगी मुकबधीर होती तिला तिने विशेष शाळेत घातले होते.मला तिचे खूपच कौतुक वाटले.संस्कार असे इतक्या अशिक्षित माणसातही झिरपू शकतात.
आता मला एक वेगळाच अनुभव येत आहे.आमच्या परिचयातले बरेच जण म्हणतात "बरे आहे तुम्हाला मुलगा नाही.सुना आल्या की मुले आपली राहत नाहीत.मुलीना प्रेम असते'.अर्थात त्यांच्या मुलाला त्यांना मुलगी नाही तर मुलगाच व्हायला हवे असते.
आता माझ्या तीनही मुली आमच्या अभिमानाचा विषय आहेत.भाराऊन जावे असेअनेक क्षण त्यांनी दिले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यानी Excellence प्राप्त केला आहे. 
मोठ्ठी आर्किटेक्ट आहे. हैद्राबाद आयआयटीच्या होस्टेलचे,कोइमतुरच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तिचे काम पाहताना अभिमान वाटतो.तिला सुरुची पुरस्कार मिळाला त्यापेक्षाही तिच्या कमिन्स कॉलेजच्या विद्यार्र्थीनीनी तिचे भरभरून केलेले कौतुक मला सुखाऊन जाते.दुसरीनी कोलंबिया युनिव्हर्सिटीसारख्या प्रतिष्ठीत विद्यापीठांत पीएचडी केले.तिला 'लाईन वन विदाऊट एनी चेंजेस' ही क्वचित मिळणारी गेड मिळाली.तिचे प्रकाशित झालेले पुस्तक' Outstanding academic title'  म्हणून' American Library Association ' ने निवडले.धाकटीला डिप्लोमा इंजिनिअरिंगला गोल्ड मेडल मिळाले आणि COEP त प्रवेश मिळाला हे मला सुखावणारे होते.ती आर्मी कल्चर  आणि कार्पोरेट कल्चर या दोन्ही  भीन्न वातावरणात  यशस्वीपणे वावरत आहे.नवऱ्याच्या बदल्यांमुळे नवीन घरे, नवीन गावे, मुलाच्या नवीन शाळा,तिच्या नवीन नोकऱ्या अशा  सततच्या  बदलांना, यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावाना यशस्वीपणे सामोरी जात  आहे.
 माझ्या कॅन्सरच्या काळात तिघींनी एकत्र येऊन तन.मन धनानी  माझा आजार हाताळला.मला १००% कम्फर्ट आणि झिरो टक्के इनकन्व्हीनीअन्स कसा असेल हे पाहिले.याचबरोबर माझ्या नवऱ्याचा पार्किन्सन्सही सांभाळला.
आज मी तीन मुलींची आई असून बिचारीची नशीबवान मानली जाऊ लागलेय.
असे असूनही समाजमनात हळू हळू भिनत गेलेली मुलगा आणि मुलगी यातली असमानता गेलीय असे मात्र म्हणवत नाही .माझ्या मुली माझ्यासाठी खर्च करतात तेंव्हा मला अवघड वाटते.त्यांच्या घरी राहणे अवघड वाटते  याबाबतीत माझ्या आईच्या काळातच मी असते.आणि स्वत:ला समनतेची पुरस्कर्ती म्हणणाऱ्या माझ्या मनातही माझ्या घडणीतून  असमानता छुप्या रीतीने चिकटून बसली आहे का अशी मला शंका येते.ही विषवल्ली किती पिढ्यापर्यंत दाबा धरून असेल माहित नाही.
ती लवकरात लवकर मुळासकट उखडली जावो ही महिलादिनी सदिच्छा.



Thursday, 16 January 2020

फळांचीओळख

 फळांचीओळख
 आवरावारी करताना ही मी केलेली कविता सापडली.
बंडोबान काढलं फळांचं दुकान
फळं घ्या फळं गोड ताजी छान
लोकांना मिळाली वर्दी
दुकानात झाली एकच गर्दी

काठी टेकत टेकत आले मिस्टर तांबे
खोकत खोकत म्हणाले कसे डझन आंबे
अंतू चिंतू मंडळी, पाहून आली जंजीर
बंडोबाना म्हणाली गोड आहे ना अंजीर
सुलू ताई आल्या, बरोबर होती कुक्कु
म्हणाली आई मला नको काही, घे फक्त चिक्कू

खाड खाड बूट आपटत आले दोन शिपाई
ऐटीत राहूंन उभी, मागितली पपई
डुलत डुलत आले लट्ठमभारती पोंक्षे
सीझन नव्हता तरी म्हणे हवी मला द्राक्षे

स्कुटर थांबवत थोडी म्हणाले सुरेश मंत्री
आहेत का हो तुमच्याकडे नागपुरी संत्री
विद्याताई आली साडी नेसून डाळिंबी
आजोबांसाठी तिला घ्यायची होती मोसंबी
प्रतिभाची मुलं म्हणे खात नाहीत भाजी पोळी
शिकरणाला हवीत तिला रोज घरात केळी
यमुनाताईंची सदा घाई, दोन हवे अननस
लवकर द्या हो नाहीतर चुकेल माझी बस

बंडोबान काढलं फळांचं दुकान 
माल गेला संपून व्यापार झाल




Friday, 11 October 2019

असाही अनुभव

                      कालचीच गोष्ट.मी डॉक्टरकडे गेले होते हे घरी एकटेच होते.आणि गॅस सिलेंडर आला.खर तर मी गॅससाठी नंबर लावला आणि दोनचार दिवसांनी गॅस येईल असा मेसेज आला तेंव्हा आम्ही मुलीकडे होतो. मला वाटले आता पुन्हा नंबर लावावा लागणार.मी डॉक्टरकडून आल्यावर नंबर लावायच्या विचारात होते आणि गॅस आला होता.गॅसवाल्या माणसांनी गॅस दिला आणि  कार्ड, पैसे देणे आपल्याला शक्य नाही असे माझ्या यजमानांच्या लक्षात आले.त्यांनी सांगितले १० /१५ मिनिटात माझी पत्नी येईल आणि पैसे देईल.मी पैसे घ्यायला नंतर येतो म्हणून गॅसवाला गेला.आम्ही उशीरापर्यंत वाट पाहिली पण तो आलाच नाही. आज संध्याकाळी तो पैसे न्यायला आला.मी त्याला म्हटले काल तुमचा हिशोब द्यावा लागला असेल ना? तो 'म्हणाला मी माझ्याकडचे पैसे दिले.आज्जी नेहमीची माणसे पैसे कुठे जातात?' मला त्याचे कौतुक वाटले.त्याचे नाव अमजत खिलजी.अनुभव शेअर करावासा वाटला.          

Sunday, 25 August 2019

रेडिएशनचा आनंददायी अनुभव

                                         रेडिएशनचा आनंददायी अनुभव.
                    'कॅन्सर मग नो अन्सर!' आज विज्ञानाने कॅन्सरसाठी उत्तरे शोधून हे विधान खोटे ठरवले असले तरी समाज मनात मात्र कॅन्सर या नावाचा घेतलेला धसका आणि भ्रामक समजुती तशाच आहेत.हॅरी पॉटर मधल्या व्हिलन व्होल्डमार्टचा दरारा इतका असतो की त्याचे  नाव न घेता He who must not be named संबोधले जाते तसेच मला कॅन्सरबाबत समाजात दरारा असल्याचे जाणवले.लोक नाव देखील उच्चारत नाहीत.
 कॅन्सर माझ्यापर्यंत पोचला आणि त्यातले वास्तव इतके भयानक नाही हे जाणवले.Oncologist ची पायरी चढल्यावर त्यातही किमो,रेडीएशन, सर्जरी अशा तीन शाखांचे वेगवेगळे तज्ज्ञ असतात हे समजले.पेशंटच्या आजाराचे स्वरूप अवस्था,वय अशा विविध गोष्टी विचारात घेऊन उपचार ठरवले जातात.माझ्यासाठी सर्व तज्ज्ञांच्या एकत्र विचारातून रेडीएशनची निवड झाली.
तुम्हाला ५ आठवडे सोमवार ते शुक्रवार रेडिएशन थेरपी घ्यावी लागेल. असे डॉक्टरांनी सांगितले तेंव्हा 'बापरे इतके दिवस घर ते रूबी हॉस्पिटल करायचे म्हणजे शींगरू मेल हेलपाट्यांनी असंच होणार' या कल्पनेनीच मी दडपून गेले.पण बघता बघता रेडिएशन थेरपी चे ५ आठवडे संपले देखील आणि  प्रत्यक्षात हा अनुभव आनंददायी ठरला.ही आनंदाची लागण हळुहळु झाली.माझ्या  अनुभवावरून ती इतरांना सुरूवातीपासून व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
पहिल्या दिवशी रूबीच्या कॅन्सर सेंटरमध्ये शिरतांना मनात अनामिक हुरहुर,धास्ती होती.आत शिरल्यावर कॅन्सरच्या खुणा दाखवणारे अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांनी हॉल भरलेला होता.आता मीही एक कॅन्सर पेशंट आहे या वास्तवाने मन अधिकच दडपून गेले.
Oncologist Doctor मानसी मुन्शी यांच्या प्रसन्नचित्त आणि आश्वासक दर्शनाने दडपण थोडे कमी झाले.
रेडिएशनचा पहिला दिवस.तळघरातल्या तळघरात रेडिएशन टेबलवर माझी पोझीशन adjust झाल्यावर आरामसे पडे रहो.हिलना मत असे सांगण्यात आले.आता मी एकटीच तेथे होते.मी डोळे गच्च मिटून घेतले.भोवती फिरणाऱ्या मशीनचा ईरीटेटींग आवाज येत होता.श्वासोच्छ्वाकडे लक्ष देणे,ते मोजणे सुरू केले.२५० श्वास झाले आणि 'उठो आपका हो गया' सीस्टर सांगत होत्या.उठल्यावर थोडे गरगरत आहे वाटले.सीस्टरनी हात धरून वर सोडले.
दुसरे दिवशी कानात कापसाचे बोळे घालून आले.डोळे गच्च मिटलेलेच.
तिसरे दिवशी भरपूर पाऊस आणि हवेत गारवा.त्यात एसी.आणि तो सेंट्रलाईज असल्याने कमी करता न येणारा.मला हुडहुडी भरली.हातपाय थंड पडले.उठल्यावर पायात बुट घालता येईनात.दुसऱ्या दिवशी मी पायात मोजे आणि डोक्याला रूमाल बांधून आले.न सांगताच सीस्टरनी हळुवारपणे  पायावर एक बेडशीट ची घडी आणि त्यावर blanket घातले.छातीवर blanket ची घडी घातली.उब आली.तिची स्नेहार्द नजर प्रेमळ स्पर्श सुखावून गेला.आज माझे डोळे न कळत उघडे राहिले.कानात बोळे घालायला ही विसरले होते.प्रथमच  छतावर निळ्याशार आकाशात शुभ्र पिंजलेल्या कापसासारखे ढग दिसले.
मी डोळे उघडेच ठेवले.छतावरचे ढग,आकाश सुखावू लागले.रेडिएशन प्रक्रिया करणारी यंत्रे रोजच्या सारखाच आवाज करत होती.पण त्यांने इरीटेड न होता मला त्यात एक लय,ताल जाणवू लागला.आणि शब्दांकीत होऊन ऐकु येऊ लागला.सीस्टर अनीस आणि टेक्नीशीयन काशीनाथ आत आले.नेहमीप्रमाणे मला उठून बसण्यासाठी आधार दिला.आज हे दोघेही मला एंजल वाटत होते.
चक्कर आती है?अनीसने विचारले.मी मानेनेच नकार दिला.प्रथमच मी रेडिएशन हॉल स्वच्छ नजरेने पाहिला.समोरच्या मोठ्या भिंतीवर पाईन, चिनार वृक्ष होते.रेडिएशनला येणाऱ्यांचे मन प्रसन्न
राहावे असा प्रयत्न  होता.आधाराशिवाय वर आले.
 आता रोज रेडिएशन ला येतांना पाषाण ते रूबी पर्यंतच्या रस्त्यावरील हिरवीगार झाडी,मधुन मधुन फुललेले गुलमोहोर दिसु लागले.कुठेतरी सहलीला चाललोय असे वाटू लागले.खरे तर सर्व तेच होते.मी घट्ट मिटलेले डोळे उघडल्यावर मनाची कवाडेही उघडली.
रेडिएशन प्रक्रिया यांत्रिक न राहता  चैतन्यमय होऊ लागली.सीस्टर अनीसचे प्रेमाने हसून स्वागत करणे,कैसी हो? अशी विचारपूस करणे, हळुवार पणे ब्लडप्रेशर घेणे.मनापर्यंत पोचू लागले.तंत्रज्ञ काशीनाथ मधला सह्रदय माणूस दिसू लागला.रेडिएशन बेड,यंत्रेही सजीव वाटू लागली.रेडिएशन प्रक्रिया आनंददायी झाली.यानंतरच्या दोन Brachy ही सहजपणे पार पडल्या.भिती,हुरहुर अशा नकारात्मक भावना गेल्या.
   आजारावषयी,त्यावरचे उपचार आणि साईड इफेक्ट विषयी इतके गैरसमज,भ्रामक समजुती आहेत.की त्या घाबरवून सोडतात.आणि आजारापेक्षा त्याच नुकसान करतात.माझे चक्कर येणे हे भितीतूनच होते असे मी आता म्हणू शकते.
अनीसनी ठेवलेल्या ब्लडप्रेशर नोंदी पाहिल्या तरी लक्षात येईल की सुरूवातीला बीपी थोडे हाय असायचे ते १२० /८० असू लागले.आनंदी असण्याने उपचाराला ही चांगला प्रतिसाद मिळत असणार नक्की.आपल्या मनातील वृथा भिती टाकून आनंदाने उपचाराला सामोरे जा असे मी माझ्या अनुभवावरून सांगु शकते.
 फोटो १ - रेडीएशन हॉलमध्ये सिस्टर अनिस आणि टेकनिशीएन काशिनाथ सह
फोटो २ - माझ्या आधी रेडीएशन घेऊन हसतमुखाने बाहेर पडणाऱ्या नीलिमा देसाई




रेडिएशन चालू असताना, यंत्रांच्या आवाजातून मला ऐकू आलेले शब्द आणि स्वर. मी ते माझ्या आवाजात रेकॉर्ड केले ते असे -


Saturday, 24 August 2019

टोपणनावाची गोष्ट

                                                 टोपणनावाची गोष्ट
                          काल मुलीकडे फोन केला तर तिच्या भाच्याने उचलला.आणि झेन आज्जीचा फोन आहे सांगत आपल्या आजोबाना दिला.झेन आज्जी हे मला माझ्या नातवाने दिलेले टोपण नाव.लहानपणापासून मला कोणतेच टोपण नाव नव्हते. ते नातवांनी बहाल केले.माझा नातू क्षितीज त्याच्या बाबांच्या आई वडिलाना आज्जी, अब्बू म्हणायचा  मग आम्हाला काय म्हणायचे? लहानपणापासून त्याला गाड्यांची आवड होती.तशी हल्ली बहुतेक लहान मुलाना असते. आमच्याकडे झेन होती म्हणून ह्यांना तो झेन अब्बू म्हणायला लागला.आणि मी मग झेन आज्जी झाले.माझ्या मुलीच्या सासरी सर्वांच्या तोंडी हेच नाव झाले.
माझ्या  नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.घरी गाडी असल्यावर ती चालवण्याचा मोह व्हायचा म्हणून शेवटी गाडी विकली.
आम्हाला टोपण नाव देणारा नातू आता इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.आता तो स्वत: गाडी चालवतो.
झेन गेली तरी आम्हाला अजून तो आणि  इतरही झेन आज्जी, झेन अब्बुच म्हणतात.हे नाव आम्हाला चिकटलेलेच राहिले आणि राहणार. 
(महारष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले.)

Friday, 8 March 2019

महिला दिनानिमित्ताने

                               जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची  संख्या जास्त आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांच्याब्द्द्लाचा लेख प्रसिद्ध केला होता आज महिला दिनाच्या निमित्ताने बहिणाबाईना अभिवादन.


           ही म्हणजे कविता. हिच्याबद्दल बोलायचं म्हणजे तिच्या कवितेबद्दल बोलायचं
.' कवितेचे दळण दळून अनेकांनी मांडले पण सुखदुःखाच्या जात्यात स्वतःचे जीवन भरडले जात असताना त्या श्रमाचे सामवेद करून गाणारी एखादी' असं पु ल देशपांडे म्हणतात
           'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावणारा चमत्कार आहे' असं आचार्य अत्रे म्हणतात
अनेकानेक विचारवंत तिची स्तुती करताना थकले नाहीत. नमुन्यासाठी वरील दोन उदाहरणे पुरेशी आहेत
               हा चमत्कार घडला तरी कसा ती म्हणते
                'माझी माय सरोसती मला शिकवते बोली
               लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली'
ही गुपित बाहेर कशी  येतात, ऐका.
             ' अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
              तसं तसं माझं गाणं पोटातून येत होटी'
 विठोबाच,रामाच मंदिर याच माझ्या शाळा असं ती म्हणते.. निसर्गातही तिला मग भजन दिसतं. तानक्या सोपानाला हऱ्यात निजवून तो हारा डोक्यावर घेऊन ती शेतात निघायची तिच्याबरोबर तिचं काव्यही
विषय पुरवायला आजूबाजूचा निसर्ग माणस होतीच.  ' ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून
                    पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
                     टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी'
  घरी आल्यावर तव्यावर भाकरी टाकताना ही हिला काव्य सूचाटे.
                   'बरा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
                    आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर
                   ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार
                  देतो दुःखाले होकार आणि सुखाले नकार'
             एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान सारखी हिच्या मुखातून सुभाषित बाहेर पडतात
                 - ज्यातून कापूस निघत नाही त्याला बोंड म्हणू नये ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हणू नये
                    - इमानाला जो विसरतो त्याला नेक म्हणू नये
                     जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये

                      ' आला सास गेला सास देवा तुझं र तंतर
                       अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर'
 असं जगण्या-मरण्याचा तत्वज्ञान समजल्यामुळे ती पतिनिधनानंतर रडत बसत नाही
                   ' जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतुत
                      तुटे मंगयसूतर उरे गयाची शपथ
                      नका नका आया बाया करू माझी कीव
                      झालं माझं समाधान आता माझे मला जीव'
 प्रत्यक्षातही तिने  मोठ्या धिराने दोन लहान मुलांना वाढवलं, घडवलं.
                    ' येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
                       काम करता करता देख देवाजीच रूप' असं म्हणत ती काम रेटत राहिली. कामाच्या रगाड्यात ती सहजपणे आजूबाजूचे बदल न्याहाळत होती कवितेतून मांडत होती नुकताच छापखाना सुरू झाला होता,
                    ' माणसा परी माणूस राहतो रे येडजना
                     होतो छापिसनी कोरा कागद शहाणा'
 प्लेगची साथ आली त्याबद्दल ती म्हणते,
                   ' पिलोक पिलोक आल्या पिलोका च्या गाठी
                      उजाडलं गाव खया मयामधी भेटी'
 माणसाच्या स्वार्थाची तिला चीड .येते.
                   'अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?' असं ती विचारते
                     ' जवा ईमान सचोटी पापामध्ये बुडाली
                       तेव्हा याच माणसाने किल्ल्याकुलूप घडले.
                      किल्ल्या राह्यल्या ठिकाणी जवा तिजोऱ्या फोडल्या.
                       तवा याच माणसाने   बेड्या लोखंडी  gघडल्या.
  अशा या   माणसाचा मनाबद्दल ती म्हणते,'
                      मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
                      किती हाकला हाकला फिरी येते पिकावर
                      मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर
                      आरे इचू साप बरा तयाले उतारे मनतर
                      मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
                     आता व्हत भुइवर गेल गेल आभाळात
                      मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना
                      मन केवढं केवढं आभायात बी मायेना
                 संत-महात्म्यांच्या रांगेत बसणारी असं हे मनाचं वर्णन.
        देव कुठे याबाबत ही ही अडाणी बाई एखाद्या तत्वज्ञाना शोभेल असं काव्य लिहिते.
                 ' सदा जगाच्या कारणे चंदनापरी घसला
                   अरे सोतामदी  त्याला देव दिसला दिसला
                    स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला
                    अरे दगडात त्याले  देव दिसला दिसला
                    डोये मिटले मिटले स्वतःला विसरला
                   अरे अंधारात त्याला देव दिसला दिसला
                    देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुया माझार
                    देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार'
 तिचं जगणं एक कविता होती. तीच मोल न समजल्याने काळाच्या ओघात बरच काव्य नष्ट झालं. थोडफार मुलांनी लिहून ठेवलं ते आज उपलब्ध आहे तेच इतकं अनमोल सर्व उपलब्ध झाला असता तर? बहिणाई तुझ्या जगण्याला, तुझ्या काव्याला आणि तुला सलाम