Wednesday, 6 January 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे.

                         गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)









Tuesday, 22 December 2015

डॉक्टर भारती विकास आमटे - सहवास हवासा.

            


फोटो सौजन्य : अरुण कुलकर्णी


   काही व्यक्तींच्या आपल्या आयुष्यात असण्याने खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटते.मला अस श्रीमंत करणार्‍या अनेक व्यक्ती आहेत.डॉक्टर भारती विकास आमटे हे त्यातलं एक महत्वाच नाव.खर तर भारती ताईंची आणि माझी ओळख ३/४ वर्षातलीच पण अस वाटत, अनेक वर्षापासुन आम्ही एकमेकीना ओळखतो.भारतीताईना मी प्रथम पाहिलं ते नोव्हेंबर २०११ मध्ये आनंदवनच्या माझ्या पहिल्या भेटीत.आनंदवन पाह्ण्याच कित्येक दिवसाच स्वप्न साठीनंतर पुर होत होत. जोत्स्ना ओकच्या  स्वरूप ट्रॅव्हलतर्फे आठ दिवसाची आनंदवन,हेमलकसा अशी सहल होती
                 पहिल्या दिवशीच गेस्ट कँटीन जवळच्या काचेच्या ऑफिसमध्ये डॉक्टर विकास आमटे यांच्याशी  विविध ठिकाणाहून आनंदवन पाहायला आलेल्यांची  भेट होती.टेबलभोवती गोल खुर्च्या मांडल्या होत्या.इस्त्रीच्या पांढर्‍याशुभ्र झब्बा पायजम्यात विकास आमटे अवतीर्ण झाले.ते आनंदवनात विकासभाऊ म्हणून ओळखले जातात.जोत्स्नाक्डून त्यांच्याबद्दल खूप ऐकल होत.ते आले,ते बोलले आणि त्यांनी जिंकले. अशी सर्व उपस्थितांची परिस्थिती होती. मलाही आनंदवनला आल्याचे श्रम सार्थकी लागले.आता पुढच काही नाही झेपल तरी काही वाटणार नाही अस वाटत होत.आनंदवनची  निर्मिती, बाबा, ताईनी त्यासाठी घेतलेले कष्ट स्वत: आणि भाऊ प्रकाश याचं बालपण,शिक्षण यावर ते  भरभरून बोलत होते.कोणताही मुलाहिजा न ठेवता समाजातील अनिष्ठ गोष्टी, राजकारणी,भ्रष्टाचारी यांच्यावर कोरडे ओढत होते.शेवटी गाडी स्वत:च्या लग्नावर आली.
                   धाकट्या भावाच्या प्रेमकहाणीत मध्यस्ती केली.विकास यांच्या लग्नासाठी मात्र जगदीश गोडबोले आणि पु.ल.देशपांडे यांनी रोहिणी मध्ये जाहिरात दिली'.बाबा आमटेना सून हवी'. रोहिणीने ती मोफत छापली.जात धर्माची अट नव्हती.डॉक्टर असण्याची मात्र अट होती.५०० रुपये मानधनावर कार्यकर्ता म्हणून नेमणूक होणार होती.पण कुणीही पुढे आले नाही.हे सांगत असतानाच एक शालीन,सोज्वळ सौंदर्याच प्रतिक अशा  स्त्रीने  प्रवेश केला. 'आल्या पहा आमच्या गृहलक्ष्मी ' असा विकासभाऊनी परिचय करून दिला.एम.बी.बी.एस.डॉक्टर आहेत गोल्डमेडल मिळवलं आहे.औरंगाबादचे माजी खासदार भाऊ वैशंपायन यांच्या त्या कन्या असल्याचीही माहिती दिली.औरंगाबादला लग्नाला जाताना बाबांनी खाजगी काम म्हणून आनंदवनची गाडी  न वापरता नटराज टूर्सने वर्‍हाड औरंगाबादला नेल.भारती ताईंची ही पहिली ओळख,दुरूनच झालेली.विकास भाऊंच्या बोलण्याच गारुड उतरलं नव्हत तरीही भारतीताईंचा नंदादीपासारखा शांत, अबोल वावर उपस्थितांवर प्रभाव टाकून गेला.

                   दुसर्‍यांदा  भारती ताईना पाहिलं ते याच सहलीत स्वरानंदवन या आनंदवनच्या ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर. आनंदवनच्या अद्ययावत आडीटोरियममध्ये आलेल्या पर्यटकांसाठी एक  दिवस या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो.भारती ताईंच वेगळचं रूप तिथ पहायला मिळाल.स्टेजवर दोन अंध मुलींबरोबर त्या आल्या. आणि  बाबांच्या  'ज्वाला आणि फुले ' मधील 'थांबला न सूर्य कधी थांबली न धारा' सुरेल आवाजात गायल.भारती ताईंबरोबर त्या मुली आणि इतर सर्वही घरातल्या व्यक्तीबरोबर वावराव तशा सहजपणे वावरत होते आनंदवनची ही खासियत आहे इथ कोणी लहान मोठ्ठ, मालक नोकर अस काही नसत.सगळ्यांच्या वागण्यात एक सहजता मोकळेपणा असतो हे पहिल्याच दिवशी लक्षात आल होत.
                  सहल संपवून परत निघायची वेळ आली.मन मात्र आनंदवनात रेंगाळत होत. आदल्या दिवशी जोत्स्ना, मी आणि माझी मैत्रीण निरुपमाला भारतीताईंच्याकडे घेऊन गेली. आम्ही त्याना आमच्या पुष्पौषधीच्या अभ्यासाविषयी सांगाव अस तिला वाटत होत.आम्ही मात्र जायला कचरत होतो.हा विषय शिकायला आम्ही आता कोठे सुरुवात केली होती. त्या मोठ्या डॉक्टर आणि आम्ही काय त्यांच्याशी बोलणार.पण प्रत्यक्ष भारतीताईंशी बोलताना सुसंवादाला कधी सुरुवात झाली समजलच नाही.भारतीताई अ‍ॅलोपाथीच्या डॉक्टर असल्या तरी इतर पूरक उपचारपद्धतीबद्दल त्याना उत्सुकता आहे.माहितीही आहे.पुष्पौषधीबद्दल त्यांनी आस्थेने चौकशी केली.आनंदवनाला पुष्पौषधी शिकवायला येण्याच आमंत्रणही दिल.
                  निघायच्या दिवशी भारतीताईंच तिसरच रूप पहायला मिळाल.आणि ओळख वाढत गेली तसतसे व्यक्तिमत्वाचे आवाक करणारे अनेक पैलू उलगडत गेले.निघण्यापूर्वी तासभर आधी आमच्यातील वंदना दगडाला ठेचकाळून पडली डोक्याला खोक पडली.विकासभाऊ आमच्या समवेतच होते. त्यांनी फोन केला आणि पाच मिनिटाच्या आत भारतीताई अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन हजर झाल्या. वंदनाला धीर दिला.हॉस्पिटलमध्ये नेऊन तातडीचे उपचार केले.आम्हा सर्वांसाठी त्याचं हे रूप आश्वासक होत.
                 पुण्याला परत आल्यावर कृतज्ञता म्हणून मी आणि निरुपमानी पुष्पौषधी वापरून तयार केलेलं एक किलो मलम -ज्याला आम्ही जादूच मलम म्हणतो ते तयार केल आणि जोत्स्नाच्या दुसर्‍या ट्रीपबरोबर पाठवले.बरोबर आनंदवन पाहून आम्हाला काय वाटले तो अनुभव सांगणारे पत्रही.लागलीच भारती ताईचे भेटकार्डासह  एक सुंदर अक्षरातले पत्र आले.त्यांनी पत्रात लिहील होत,
' तुमचे पत्र व सोबतची औषधे मिळाली.कृतज्ञ आहे.कै.ती.बाबा असच म्हणायचे की प्रभूचे हजार हात माझ्या कामाला लागले म्हणून एवढ काम उभं राहिल त्याचा प्रत्यय आम्हाला असा येत असतो.'आमच्या अत्यंत किरकोळ भेटीला त्यांनी इतक महत्व दिल होत.आनंदवनात तुमची भेट किती मोठ्ठी किंवा छोटी आहे यापेक्षा देणार्‍याच्या भावनाना महत्व दिल जात.
                 नंतर फोनवरही पुष्पौषधीसंबंधी बोलण होत राहील.निरुपमा आणि मी अस त्यासाठी आनंदवनला जाणार होतो.निरुपमा ६ महिन्यासाठी अमेरिकेला गेल्याने मी एकटीनेच जायचं ठरल.प्रवासाच्या बाबतीत मला एकटीने जाण्याचा आत्मविश्वास नव्हता.आणि इतके दिवस पार्किन्सन्स असलेल्या नवर्‍याला एकट सोडून जाणही प्रशस्त वाटत नव्हत. माझ्या नवर्‍यालाही आनंदवनला पुन्हा जाण आवडणार  होत.त्यामुळे त्यांनीही माझ्याबरोबर यायचं ठरलं.भारतीताईनीही' काही नाही जमेल तुम्हाला' हे इतक्या ठामपणे सांगितलं की मला नाही म्हणण शक्य झाल नाही.फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतीताई नेत्र शिबीर,इतर काही उपक्रमात व्यस्त होत्या.सलग निदान १० दिवस तरी याव अस त्याना वाटत होत.सर्वांच्या सोयीनी २९ फेब्रुवारी जाण्याची तारीख ठरली.गरीबरथच आरक्षण झाल.वर्ध्याला त्या गाडी पाठवणार होत्या. यांच्यासाठी व्हीलचेअर लागेल का? असही त्यांनी विचारलं.बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेऊन आस्थेनी विचारपूस करण्याची त्यांची वृत्ती नंतर वेळोवेळी प्रत्ययास आली.
                  वर्ध्याला आलो तर न्यायला गाडी आलेलीच होती. आमच्याच गाडीतून आनंदवनचे कार्यकर्ते आणि  तिथल्या अंधशाळेचे शाळेचे माजी प्रिन्सिपॉल कडू सर आले होते.ते थेट बसस्टँडवर चालले होते.आम्हाला न्यायला आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरनी त्याना बोलावलं.भारती वहिनींच्या पाहुण्या अशी आमची ओळख करून दिली.कडू सरांकडून वर्ध्याहून आनंदवनसाठी बस असल्याच समजल.ते ऐकून गाडी पाठऊ नका आम्ही बसनी येतो अस सांगायला पाहिजे होत अस वाटल.
                 लोटीराममध्ये २५ नंबरची रूम आम्हाला मिळाली होती.भारतीताईना फोन केला त्या म्हणाल्या'.तुम्ही आलात का पहायला आताच मी तिथ येऊन गेले.येतेच दोन मिनिटात' खरोखर दोन मिनिटात त्या आल्याही.त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये जाता जाता वाटेत स्वयंपाकघराशी थांबावं लागल.कामाच्या वाटणीवरून काहीतरी कुरबुर चालली होती.भारतीताईंनी चुटकीसरशी प्रश्न सोडवला.सगळेजण चुपचाप कामाला लागले.कॅन्टीनमध्ये चहा पोहे खाताखाता पुढील कार्यक्रमाची आखणी झाली.रोज संध्याकाळी ५.३० ला व्याख्यान द्यायचं ठरल.५.१५ ला त्यांचा फोन आला व्याख्यानापूर्वी लाईट काही खायचं आहे का? ५.२५ ला भारतीताई स्वत: न्यायला आल्या.मलाच अवघडल्यासारख झाल.या सर्वात कुठही उपचार नव्हता तर अगत्य आणि आपलेपणा होता.
                 लोटीरामला लागुनच असलेल्या श्री शिर्डी साईबाबा दवाखान्यात व्याख्यानाची सोय केली होती.इथ भारती ताई वैद्यकीय अधिकारी आणि अ‍ॅडमिनीस्ट्रेटर  म्हणून काम पहातात.दवाखान्याच्या बाहेर सुंदर हस्ताक्षरात बोर्ड लिहून ठेवलेला होता.खोलीत सतरंजा अंथरलेल्या होत्या.काही खुर्चा ठेवलेल्या होत्या.टेबलवर आनंदवनातील फुलांची फुलदाणी.आत शिरल्या शिरल्या मन प्रसन्न झाल.इथ अनेक उपक्रम सतत चालू असतात भारतीताईंच्या हाताखाली कार्यक्रमांच नियोजन करण्यात मंडळी तयार झाली आहेत.प्रत्येक गोष्टीत भारतीताईंच बारीक लक्ष असत.
                 व्याख्यानाला विविध क्षेत्रातील विविध वयोगटातील स्त्रीपुरुष होते.इंजिनिअर, होमिओपथी डॉक्टर,शिक्षक,गृहिणी,व्यावसायिक; मुख्य   म्हणजे भरपूर वाचन असलेल्या,पर्यायी उपचार पद्धतीचे ज्ञान असलेल्या विदुषी डॉक्टर भारतीताई.त्यांच्या असण्याच मनावर दडपण होत.त्यासाठी पुष्पौषधीमधील लार्च,मिम्युलस,व्हाईटचेस्टनट ही औषधे मी स्वत: घेतली होती.सुरुवातीला ओळखी झाल्या.माझा प्रवासाचा शीण अजून गेला नव्हता. व्याख्यान देताना  थकवा येऊ नये म्हणून मी पाण्यात पुष्पौषधीमधील ऑलिव्हचे थंब टाकणार होते.सर्वांच्या देखतच मी ते टाकले आणि विचारल ' कुणाला थकवा वाटतो का?कोणी स्वत:वर प्रयोग करायला तयार आहे का?' भारतीताईनीच हात वर केला.त्यांच्या पाण्यात थेंब टाकले.त्याना छान वाटले.मग रोजच त्या पाण्यात ऑलिव्ह घालू लागल्या.त्यांच्या असण्याने व्याख्यानाची रंगत वाढत होती.विविध शारीरिक आजार आणि अ‍ॅनॉटॉमीवर त्यांच्या कडून इनपुट मिळत.यात तज्ज्ञ असल्याचा भाव कोठेही नसे एक जिज्ञासू  विद्यार्थिनी म्हणून त्या व्याख्यान ऐकत..हळूहळू त्यांच्या बद्दलची भीड चेपून मैत्रीत कधी रुपांतर झाल समजलच नाही.
                       व्याख्यान संपल्यावर.कॅन्टीनकडे चाललो होतो.विकासभाऊंच लेक्चर सुरु होत. भारतीताई दिसल्यावर त्यांच्याकडे माईक देऊन ते दुसर्‍या कामाला निघून गेले.थकलेल्या भारतीताईनी समर्थपणे पुढे संभाषण चालू केल.आनंदवनमध्ये अस पडेल ते काम प्रत्येकजण करत असतात.
                        दुसर्‍या दिवसापासून भारतीताईंबरोबर ओपीडीत बसण सुरु झाल.हा एक समृद्ध करणारा अनुभव होता.सल्ल्यासाठी येणार्‍यात अंध,मुके,बहिरे,अपंग,लहान मुले,वृद्ध  असे विविध पेशंट होते.एका मुकी मुलगी काय सांगते आहे ते त्याना समजत नव्हत. मग रांगेत असलेल्यांपैकी मुकबधीर शाळेत काम करणार्‍या बाई  होत्या त्याना त्यांनी बोलवून घेतलं.मध्ये रजा मागायला एक बाई आल्या.तिला रजा मिळणार नाही सांगितलं तरीही तीने रजा द्याना अस टुमण लावलं होत. आणि भारतीताई त्यांच्या म्हणण्यावर ठाम होत्या. आणि गेलीस तर पुन्हा यायचं नाही असही बजावलं.आनंदवनातील प्रत्येक व्यक्तीबद्दल कोण कामाच आहे, कोण चुकार आहे, कोण बहाणे करत,कोणाला कस हाताळायच, कोणाबद्दल किती  सहानुभूती बाळगायची याच नेमक भान त्याना असल्याच पुढे विविध प्रसंगातून लक्षात आल.मध्येच   अर्टीफिशिअल लिंब सेटरचा माणूस आला त्यांचे प्रश्न सोडऊन झाले.एकीकडे पेशंट तपासण सुरूच होत. अ‍ॅलोपाथीच्या औषधाबरोबर आहारविषयक सल्ला,कोणाला तुळस,मध अशी घरगुती औषध,आवश्यक तेथे ताबडतोब वर्ध्याला सेवाग्राममध्ये जाण्याचा सल्ला त्या देत होत्या.यातच मधून मधून माझ्याशी चर्चा.भारतीताईंची आपल्या विषयावर उत्तम पकड आहे.एम.बी.बी.एस. करताना उत्तम शिक्षक मिळाल्याने हे साध्य झाल अस त्या सांगतात.विषयावर उत्तम पकड असल्याने अ‍ॅलोपाथीच्या सामर्थ्याची आणि मर्यादांचीही त्याना जाणीव आहे.
                        रोज ओपीडीत नवनवीन किस्से असायचे.औषधोपचाराबरोबर न्यायदान,विवध समस्या सोडवण चालू असत. हे करताना त्या तडजोड स्वीकारत नाहीत काही कठोर निर्णय घ्यायचे झाले तर ते काम भारतीताईंकडे येत.एकदा ओपीडीत नेहमी शांत असणार्‍या भारतीताईंच चंडीच रूप पहायला मिळाल.एक विवाहित स्त्री तक्रार घेऊन आल्या होत्या.कामावरून परतताना आनंदवनात काम करणारा एक माणूस तिची छेड काढत होता.तिचा नवरा आणि ती तक्रार घेऊन आली होती.भारतीताईनी त्या छेड काढणार्‍या माणसालाही बोलऊन घेतलं.तक्रारीबद्दल शहानिशा केली.झाल्या प्रकाराने त्या खूप चिडल्या होत्या.म्हणाल्या, 'बाबा असते तर त्यांनी तुला ताबडतोब हाकलून दिल असत.- बाबा असते तर हे वाक्य त्यांच्या बोलण्यात नेहमी  येत असत.त्याचा या महिन्याचा पगार न देण्याच फर्मान निघाल.मंडळी निघून गेली.लगेचच त्या शांतपणे पुढच्या पेशंटकडे वळल्या.
                       त्यांच्यातल्या डॉक्टरबरोबर संवेदनाशील आणि अगत्यशील माणूस सदैव जागा असतो.डॉक्टर लहाने यांच्या  नेत्र शिबिरात इतरांबरोबर रात्रंदिवस स्वत: काम करूनही न थकता या सर्वाना आग्रहाने चार घास खाऊ घालतील,माझ्यासारख्या सर्व सामान्य व्यक्तीच्या गरजांकडेही तितक्याच ममतेने लक्ष घालतील.माझ्या मुक्कामात मला हा प्रत्यय वेळोवेळी आला.मार्च महिना.उन्हाळा सुरु झाल्याच्या खुणा शरीर दाखवत होत.माझ्या डोळ्याची आग होत होती.भारतीताईनी गुलाबाच्या पाकळ्या पाठवल्या.पाण्यात टाकून त्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल.बाटलीतून ताकही पाठवलं.पोटात आग पडल्यासारखं वाटत होत.'.कॅन्टीनमधल जेवण तुम्हाला तिखट पडत. उद्यापासून उत्तरायण(आनंदवनमध्ये वृद्धांसाठी असलेली व्यवस्था.)मधल्या लोकांच्याबरोबर तिथल्या स्वयंपाकघरात जेवायचं.' भारतीताईंची आज्ञा झाली.दुपारी दवाखान्यातील भारतीताईंचे सहकारी विठ्ठल आले..'भारतीताईनी मड थेरपी करायला सांगितले.' म्हणत त्यांनी ती केलीही..भारतीताईनी सहकार्‍यानाही पूरक उपचार करण्यात योग्य त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवून किंवा आनंदवनात तज्ज्ञ बोलवून तयार केल आहे.स्वत:ही निसर्गोपचार,होमिओपाथी,रेकी,अ‍ॅक्युप्रेशर यांचा  अभ्यास केला आहे.त्या योगशिक्षकही आहेत.आधुनिक वैद्यकाच बोट केंव्हा घट्ट धरायचं. पूरक उपचार केंव्हा,आणि किती वापरायचे याचे त्याना ज्ञान आहे. आणि भानही आहे.लेक्चर संपउन परतताना होणार्‍या गप्पातून त्यांची ही बहुश्रुतता लक्षात यायची.
                                     एकदा अशाच गपा चालल्या होत्या आणि त्या एकदम थबकल्या.'तुम्हाला सुगंध आला?' मी नकारार्थी मान हलवली.त्या मात्र तो सुगंध भरभरून घेत होत्या.तो कोणत्या फुलांचा आहे ते सांगत होत्या.त्यावेळचा त्यांचा खुललेला चेहरा अजून मला डोळ्यासमोर येतो.हल्ली त्यांची  फेसबुकवर अनेक  छायाचित्र असतात.ती पाहून माझ्या मेंदूने क्लिक केलेल्या त्यांच्या अशा विविध भाव मुद्रा माझ्या डोळ्यासमोर येतात आणि एवढ्या मुक्कामात मी त्यांचा एकही फोटो काढला नाही याची खंत  वाटते..त्याचं निसर्गाच आणि निसर्गाबद्दलच वाचन माझ्या हळूहळू लक्षात यायला लागल होत.त्याहिपेक्षा महत्वाच म्हणजे आपली पंचेंद्रिय,संवेदना किती बोथट झाल्या आहेत हेही समजत होत. त्यांच्याबरोबर वावरताना आपण किती खुजा आहोत आणि त्यांचा सहवास आपल्याला मिळतोय म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत अशा संमिश्र भावना असायच्या.त्यांच्या घरी ब्रेकफास्टला गेलेल्यावेळी त्यांच्या विविध पातळ्यांवरील व्यासंगाचा प्रत्यय आला.
                                रविवारी ओपीडी नसल्याने थोड निवांत होत.त्यांनी आम्हा दोघानाही घरी ब्रेकफास्टला बोलावलं.मुलगी शीतल, सून पल्लवी यांची ओळख झाली.भारतीताईंशी साहित्य,संगीत,सिनेक्षेत्र,समाजजीवन अशा विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा झाल्या.त्याचं वाचन अफाट आहे.पुस्तकांचा संग्रहही मोठ्ठा आहे.आमच्या जेष्ठ नागरिक संघात महिला दिनानिमित्त्त्याने एक कार्यक्रम ठेवला होता.आम्ही पुण्यात पोचणार त्यादिवशीच तो होता.सभासद महिलांनी कर्तुत्ववान महिला निवडून तिच्यावर बोलायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई निवडल्या होत्या. आनंदवनमध्ये कॉलेज असल्याने तिथ त्यांच्यावरची पुस्तक मिळतील अस वाटल होत.मी याबाबत भारतीताईना सांगितलं त्या म्हणाल्या' माझ्याकडे आहेत ना मी देते.'खर तर त्यांची जागा बदलल्याने पुस्तक शोधण जिकिरीच होत.त्यांच्या व्यापातून त्याना तो त्रास व्हावा अस मला वाटत नव्हत.त्याना मात्र यात आनंद वाटत होता.संध्याकाळपर्यंत त्यांनी या दोघींवरची भरपूर पुस्तक माझ्या पर्यंत पोचवली.मी काही फ्लॉवर रेमेडीवर पुस्तक नेली होती.संध्याकाळी त्या न्यायला आल्या तर पुस्तक वाचून परतही दिली.
                                 लोटीराममधून बाहेर पडलो तर प्रभाताई चाफेकर,बाबांच्या मानसकन्या आणि  त्यांचे पती आणि काही पुण्याची मंडळीं येत होती.भारतीताईनी तेथेच वाकून  नमस्कार केला.प्रभाताई त्यादिवशी व्याख्यानालाही आल्या.वीस वर्षापूर्वीच त्या पुष्पौषधी शिकल्या होत्या.तेंव्हापासून त्या यशस्वीपणे वापरही करतात.त्यांच्या कडून भारतीताईंच खूप कौतुक ऐकल.
                               दुसर्‍या दिवशी होळी आणि नंतर रंगपंचमीला वर्ग घ्यायचा नाही अस ठरत होत. पण सर्वाना पुष्पौषधीची आवड निर्माण झाली होती.सर्वजण म्हणाले होळीला सकाळी सहा  ते आठ आम्ही येऊ.रंगपंचमी तर सकाळीच संपते.त्यांमुळे काही प्रश्न नाही.भारती ताई म्हणाल्या,' होळीला मात्र मला लवकर निघाव लागेल पोळ्या करायच्या असतात.' हे सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.मलाही त्यांनी पोळ्या लाटायला आमंत्रण दिल.लोटीरामच्या जवळच स्वयंपाकघर आहे.आदल्यादिवाशिपासूनच पुरणाचा वास सुटला होता.
                             दुसर्‍या दिवशी सकाळी सहापुर्वीच दीपकशिव न्यायला आले'.भारतीताई येऊ शकणार नाहीत.त्याना बर नाही त्यांनी मला फोन करून तुम्हाला घेऊन यायला सांगितलं.' वर्ग सुरु झाला तर ५/१० मिनिटात भारतीताई आल्याच.'मला राहवलं नाही म्हणून आले' म्हणाल्या.पूर्णवेळ थांबल्याही.
                            लेक्चर संपवून मीही स्वयंपाकघरात जायच ठरवल.इथल  स्वयंपाकघर ऐसपैस आहे.डायनींग हॉल, खोल्या आणि महत्वाचे म्हणजे लोकांची मन - सगळच ऐसपैस आहे.
स्वयंपाकघरात भारतीताईंसकट अनेक स्त्रिया होत्या. आनंदवनातील होत्याच शिवाय पाहुण्या आलेल्या प्रभाताई,गितांजलीही होत्या. मोठा गॅस होता. डोश्याचा असतो तसा मोठा तवा होता. ५/६जणी पुरणाच सारण भरुन गोळा तयार करत होत्या. ५/६जणी पोळ्या लाटत होत्या. आणि एकटी पोळ्या भाजत होती. एकवेळी ५/६पोळ्या भाजल्या जात होत्या. हे करताना गाणी, गप्पाही.भारतीताईनी 'वक्तने किया क्या हसी सितम' म्हटलं.एका टीव्ही चॅनलचे लोक मुलाखतीसाठी आल्याने भारतीताईना मधेच जाव लागल. बघता बघता ९/१० किलोच्या पोळ्या झाल्याही. जेवण तयारच होत.उत्तरायणमधल्या जेष्ठ नागरीकांची १० वाजता जेवणाचची बेल असते. आम्हीही ११.३०ला पुरणपोळीच सुग्रास जेवण जेवलो.गरमागरम पुरण पोळीवर आनंदवनातच तयार झालेल साजुक तुप. मला हरबर्‍याच्या डाळीचा त्रास होतो म्हणून भारतीताईंनी लक्षात ठेऊन तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या त्या वाढल्या.
                               परतीचा दिवस जवळ आला.छान माहेरपणाच झाल होत.समारोपाच्या दिवशी डॉक्टर पोळ अध्यक्ष म्हणून आले होते.प्रभाताईही होत्या.कार्यक्रम हृद्य झाला.उगाच खोट खोट कौतुक नाही जे जस वाटल तस विद्यार्थी आपल्या मनोगतात सांगत होते.भारतीताईनी हा ग्रुप उत्तम नांगरणी  करून छान  तयार केलाय.त्यामुळे पेरलेल छान उगवत.फार थोड्या वेळात त्यांनी पुष्पौषधीच ज्ञान चांगल्याप्रकारे  आत्मसात केल.भारतीताईंमुळे त्यांच्यापर्यंत अस विविध प्रकारच ज्ञान येत याबद्दल त्याना कृतज्ञता वाटत होती.पाहुण्याना आणि आम्हाला दोघाना आनंदवनातल्या पानाफुलांपासून तयार केलेले पुष्पगुच्छ दिले.भारतीताईनी साडी आणि नारळांनी ओटी भरली.मला अवघडल्यासारखे झाले.प्रभाताई म्हणाल्या,'भारतींनी दिलेली साडी म्हणजे प्रसाद असतो.ती नेसल्यावर कोणतीही कामे सहजा सहजी होतात.'मी अशा गोष्टी मानणार्‍यातली नाही.पण ती साडी नेसली की मला मायेची उब जाणवते. कॉन्फिडन्ट वाटत.
                          निघायच्या दिवशी जेऊन दुपारी एक पर्यंत नागपूरला जायचं होत. भारतीताईंच्याकडे मुलीच्या सासरच्या कडचे पाहुणे आले होते.ते अह्दाबाद्ला जायचे होते.त्या गडबडीतही मी पर्किन्सन्स सपोर्ट ग्रुपचे काम करते हे माहित असल्याने त्या आनंदवन मधील १२व्या वर्षी जिला पीडी झाला आहे अशा मंजुळाला मला दाखवायला घेऊन आल्या होत्या.भारतीताई किती जणांच्या किती गोष्टी लक्षात ठेवतात याच मला अप्रूप वाटलं.गाडीत बसायच्यावेळी त्यांनी पटकन पोळीभाजीचा डबा दिला.तुम्हाला बाहेरच खाण झेपत नाही म्हणून दिला म्हणाल्या.वाटल होत आता पुन्हा भेट नाही व्हायची . पण आमचे काय ऋणानुबंध माहित नाही पुनःपुन्हा भेटी होत राहिल्या.
                          १ ऑगस्टला डॉक्टर विकास आमटे आणि प्रकाश आमटे याना मानाचा लोकमान्य पुरस्कार मिळाला.भारतीताईही आल्या होत्या.पुण्यात टिळकस्मारक मध्ये समारंभ झाला.मी आणि निरुपमा गेलो होतो.समारंभानंतर त्या सर्वाना भेटण्यासाठी झुंबड उडाली होती.आम्हीही गेलो.इतक्या गर्दीतही त्यांनी निरुपमा अमेरिकेहून कधी आली विचारल.माझा हात हातात घेऊन म्हणाल्या खूप बोलायचं आहे आता फोनवरच बोलू.
                         गणेश कलाक्रीडा मध्ये स्वरानंदवनचा दिवाळी पहाटचा  कार्यक्रम झाला.त्यात भारतीताईंचा सहभाग होता.स्वरानंदवनच्या उभारणीत त्यांचा हात आहे तसच तो उत्तम होतोय ना याकडे त्याचं बारकाईन लक्ष असत.कॉलेजजीवनात वक्तृत्व आणि स्टेज गाजविलेल्या ताईंच आनंदवनच्या कामात स्टेज मागेच पडल होत.३५ वर्षांनी मोठ्या समारंभाच्या स्टेजवर आल्याच त्यांनी सांगितलं.बाबांच्या आठवणीनी त्या सदगदित झाल्या होत्या. त्यांच्या  भावपूर्ण भाषणाने लोक प्रभावित झाले.मोगरा फुलला हे बाबाना आवडणार गीत त्यांनी गायलं.शेवटी त्या विलासभाऊ आणि स्वरानंदवनच्या चमूने गायलेल्या गाण्याने सर्वांची दिवाळी संस्मरणीय केली.आम्ही दोघे शेवटी त्याना भेटायला गेलो तर त्यांनी मला मिठीच मारली.याना वाकून नमस्कार केला.
                     फोनवर संपर्क असायचा.पुष्पौषधीचा उजळणी वर्ग घ्यावा अस त्याना वाटत होत.पर्किन्सन्सच्या लोकांची आम्ही आनंदवनला सहल नेणार होतो.निरुपमा आणि प्रकाश जोशी आमच्याबरोबर मदतीसाठी येणार होते सहलीला जोडून आम्ही दोघींनी उजळणी वर्ग घ्यायला जायचं ठरलं.पण त्यावेळी भारतीताईना नाशीकला जाव लागणार होत म्हणून आमचा उजळणी वर्ग रद्द झाला.आनंदवनात जायचं आणि भारतीताई नसणार याच वाईट वाटल.ठरल्याप्रमाणे आम्ही आनंदावनला पोचलो विकासभाऊंच व्याख्यान सुरु होत.आणि तेथे भारतीताईना  पाहून आम्ही चकितच झालो.काही कारणांनी त्या नाशिकला गेल्या नाहीत.जेवण घेऊन आमची सहल हेमलकसाला जाणार होती.भारतीताईंनी आम्हाला पुष्पौषधी उजळणीवर्ग घेण्यासाठी राहण्याचा आग्रह केला.सहलीला आलेल्या सर्वांनी आम्हाला परवानगी दिली.आम्हालाही .भारतीताईंचा सहवास हवाच होता.आम्ही दोघी राहिलो.भारतीताईंच्या सक्षम यंत्रणेद्वारे पटापट निरोप गेले. आणि व्याख्यानाला संध्याकाळपर्यंत १५/२० जण हजर झाले.काही जुने काही नवे.यावेळी त्या थोड्या हळव्या झाल्या होत्या.सून पल्लवी डिलिव्हरीसाठी माहेरी चालली होती बरोबर नात अस्मीही जाणार होती.अस्मीही सारखी त्याना चिकटून होती.पल्लवीची आई तिला न्यायला आल्या होत्या.या गडबडीतही आमच्या पार्किन्सन्स गटाला त्या आवर्जून भेटायला आल्या होत्या. पुष्पौषधी वर्ग सोडल्यास त्यांचा सहवास मात्र फारसा मिळाला नाही मिळाला नाही.ही उणीव त्यांच्या पुणे भेटीत भरून निघाली.
                                  गोंदवल्याला जाताना त्यांचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता आमच्याकडे रहायला आल्या.मला अजूनही हे स्वप्न असल्यासारखे वाटते.पूर्ण दिवस त्यांचा सहवास मिळाला.आमचा हास्यक्लब,गाण्याचा क्लास सर्वात त्यांनी सहभाग घेतला.खूप गप्पा झाल्या.गाण्याच्या क्लासमध्ये तर दोन गाणीही म्हटली.त्यांच्या साधेपणामुळे सर्वजण प्रभावित झाले.ज्वाला आणि फुलेची सीडी झाली आहे.त्यात त्यांची दोनगीते गायिली असल्याच चाली दिल्या असल्याच समजल.
                                   भारतीभारतीताईंच व्यक्तीमत्व खर तर चतुरस्त्र आहे.  उत्तम गायिका, संगीतकार, लेखिका, समिक्षक,संशोधक,वैद्यकीय क्षेत्रात शिक्षक अस कोणत्याही क्षेत्रात त्या अत्युच्च शिखर गाठू शकल्या असत्या. पण त्यांनी आनंदवनची सून बनून सर्व आयुष्य आनंदवनला देण पसंत केल.पडद्यामागे राहून आनंदवनच्या विविध कार्याची धुरा समर्थपणे पेलली.आता आनंदवनचा कारभार पहाण्यासाठी मुलगा, सून,मुलगी, जावई सज्ज झाले आहेत भारती ताईना  आपल्या आवडत्या छंदाना वेळ द्यायला फुरसद मिळू शकेल.आणि हे करण्यासाठी त्याना उत्तम आरोग्य लाभाव ही शुभेच्छा!
                       

                              

                        


                   
                 

Friday, 16 October 2015

अभिनंदनाच्या निमित्ताने

                                                 अभिनंदनाच्या निमित्ताने
                    माझी पासष्टी ओलांडलेली,मैत्रीण  प्रतिभा पारखे नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संस्कृत या विषयात एम,ए.'A' ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाली.'मन:पूर्वक अभिनंदन.' खूप दिवसाच स्वप्न, निवृत्तीनंतर.पूर्ण झाल.पोस्टासारख्या निरस ठिकाणी काम करूनही त्यांनी आपली रसिकता,वाचन वेड जोपासलं.पण व्याख्यानांना हजर राहण, परीक्षा देण शक्य नव्हत.त्यामुळे एम.ए. जमत नव्हत.निवृत्तीनंतरही अडचणी येतच राहिल्या.दु:ख,अडचणी,समस्या या प्रतिभाताताईंच्या पाचवीलाच पुजलेल्या.त्यात लष्करच्या भाकर्या भाजण्याची हौस त्यामुळे. प्रतिभाताईंच हे यश भल्या मोठ्या  अडथळ्याची शर्यतच होती.आम्ही सर्व पाहिलं आहे त्यामुळे या यशच अप्रूप.त्याचं एम.ए. होण आम्हीही एन्जोय केल.या काळात त्यांच्या भेटीगाठी दुर्मिळ झाल्या होत्या मग त्याना गाठण्यासाठी त्यानीच सुरु केलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयात.पुस्तक बदलायचं नसल तरी जायचं मग आमचा गप्पांचा फड जमायचा त्यांच्या अभ्यासातल्या, संस्कृत साहित्यातील अनेक गमती जमती समजायच्या  एम.ए. करताना, व्यक्ती म्हणूनही त्याचं विकसित होण आम्ही पाहिलं.
                  त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने त्यांचे सहाध्यायी,प्राध्यापक यांचही अभिनंदन करायचं आहे.कारण त्यांच्या  यशात  यांचाही मोठा   वाटा आहे.अनेकवेळा अभ्यासक्रम सोडून द्यावा अशी वेळ आली.पण हे सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहिले.त्याना मानसिक आधार दिला. पहिल्या वर्षानंतर पतीच्या निधनामुळे आता थांबू अस त्याना वाटत होत. पण या सर्वांनी हे होऊ दिल नाही .प्रवेश घ्यायची शेवटची तारीख होती.आता प्रवेश घ्यायचा नाही हे ठरऊन त्या विद्यापीठात गेल्या.पण प्राचार्य श्रीपाद भट म्हणाले, नाही .आता पैसे आणले नसले तर मी भरतो. पण प्रवेश घ्यायचा.सहध्यायानीही दुजोरा दिला.
                  टीमवीच्या संस्कृत विभागाने वाडा पडून उंच इमला झाला तरी, पर्सनल टच कायम ठेवला आहे हे पाहून मला आनंद झाला.भट सर आणि टीम लागे रहो!


Sunday, 4 January 2015

मला भेटलेले डॉक्टर वसंत गोवारीकर

                        डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या निधनानंतर वैद्न्यानिक,राजकीय नेते,सहकारी,सर्वानीच भरभरून लिहील.संशोधन ,लेखन,प्रशासन सर्वच पातळ्यावर समाजाभिमुख, विकासाभिमुख,उद्देशाभिमुख अस त्याचं काम राहील.अनौपचारिक सह्जसंवादी अस त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वर्णन केल गेल.मलाही याचा अनुभव आला.त्यांच्याशी भेट ही माझ्या  आयुष्यातील अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अशी घटना आहे.त्याविषयी.
                    ' मी वसंत गोवारीकर बोलतोय 'मी फोन उचलला होता खरा पण दुसर्‍या बाजुने बोलणारी व्यक्ती? मला फोन का आहे हे लक्षात आल. पण हे अगदी  अनपेक्षित,धक्कादायक (सुखद) होत. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता.अवसान गोळा करून मी थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
                  त्याच अस झाल,माझा एम.फिलचा विषय  निरंतर शिक्षण हा होता.पुणे विद्यापीठाच्या या विभागाचा १० वर्षाच्या काळाचा आढावा त्यात होता.१९८७ साली मी एम.फिल केल तेंव्हापासून हा विषय डोक्यात खदखदत होता.डॉक्टर गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु झाल्यावर मला आनंद झाला या समाजाभिमुख वैद्न्यानिकापर्यंत माझ म्हणण पोचवाव अस वाटल.  मी त्याना एक पत्र आणि सोबत टिळक विद्यापीठाच्या मासिक पत्रिकेत याविषयी आलेला लेख पाठऊन दिला होता.आणि आज त्याविषयी बोलायला हा फोन होता.
                 दुसर्‍या बाजूचा आवाज इतका आश्वासक आणि सहज संवादी होता.की माझ्या भीतीची जागा परस्पर सहज संवादात कधी बदलली मला समजलच नाही.त्यांनी लेख बारकाईने वाचला होता.त्याबाबतचे त्यांचे परदेशातील अनुभव सांगत होते.किती वेळ चर्चा चालली होती याच भान नव्हत.बेल वाजली.सर मी जरा दार उघडते,अस म्हणण्या इतका मोकळेपणा आता माझ्यात आला होता.दार उघडल्यावर आत येणार्‍या माझ्या नवर्‍याला मी हळूच सांगितलं डॉक्टर गोवारीकर बोलत आहेत.( मी तासनतास फोनवर बोलते याबद्दल नेहमी बोलणी खावी लागतात. मागून याबाबत काही कॉमेंट नकोत म्हणून ही खबरदारी होती).नंतरही कितीतरी वेळ बोलण चालू होत.फोन संपला तरी मी  अगदी हवेत होते.भारावलेपण थोड ओसरल्यावर अरे हे सांगायचं राहील ते बोलायला हव होत अस वाटत राहील.मी आभाराच आणि माझी ही भावना व्यक्त करणार
पत्र लिहील.
                   काही दिवसात दुसरा आश्चर्याचा धका बसला.पुणे विद्यापीठाकडून कुलागुरुनी भेटीला बोलावल्याच पत्र  आल.ठरल्याप्रमाणे मी गेले.कुलगुरुंच्या खोलीबाहेर अनेकजण बसले होते.शिपायांनी मला आत बोलावल्याच सांगितलं.कुलगुरुंच्या अलिशान रूमच दडपण,डॉक्टर गोवारीकरांच्या शांत,रुजू,आश्वासक व्यक्तीमत्वाने आणि बोलण्याने कोठल्याकोठे पळाल.थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी निरंतर शिक्षण विभागाच्या तेज निवळीकराना बोलवून घेतल त्यांच्यासोबतही चर्चा झाली.माझ्याकडे आता सांगायचं राहील अस काही नव्हत.मी पूर्ण समाधानी होते.माझा एम.फिलचा थिसीस मी नेला होता.कुलगुरुनी निवळीकराना तो वाचायला सांगितला.माझ्या एम.फिल डिग्रीपेक्षा माझ्यासाठी हा सर्व अनुभव मोलाचा होता.
                 डॉक्टर गोवारीकराना पाठवलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे.आत्ता तो वाचताना मला स्वत:लाच त्यातला अपुरेपणा,मांडणीतला विस्कळीतपणा,भरपूर संपादनाची गरज जाणवली.अशा कच्च्या लिखाणाची त्यांनी  दखल घेतलेली होती.
http://shobhanatai.blogspot.in/2014/01/blog-post_6754.html
                
                 
                 
                      

Saturday, 3 January 2015

सावित्रीबाई फुलेना जन्मदिनी अभिवादन

                 जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची  संख्या जास्त आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.
आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्याच लेखनाद्वारे अभिवादन.


                                पुण्यापासून ३५ मैलावरच्या नायगावला सजवलेल्या खिलारी बैलगाडीने मंडळी मुलगी पाहायला निघाली होती.खंडोजी पाटलाच इनामदाराच घराण.एकुलती एक सुस्वरूप मुलगी पसंत पडली.यथावकाश ४/५ दिवस लग्न सोहाळा झाला.हत्तीवरून वरात निघाली.आणि मुलगी पुण्यात आली.ती ९ वर्षाची.आणि तो १३ वर्षाचा.१८४० चा काळ, नायगावमध्ये काय, पुण्यात काय, मुलीच्याबाबत परिस्थिती वेगळी नव्हती ती असायची एक मालकीची वस्तू.जणू गोठ्यातल जनावर.तिनी लिहीण वाचण शिकल की वैधव्य येत अशी समजूत असायची.मग कोणाची आहे बिशाद शिकायची.पण हे जोडप वेगळच होत.तिला शिकायची आवड आणि याला शिकवायची.दोघे शिवारात गेले कि फांदीच्या काटकीने' अ,आ,इ,ई 'शिकणे सुरु व्हायचे.आठ वर्षात ती खूप शिकली.भरपूर बुक वाचायला लागली.आणि हिच्या नवर्‍याच्या मनात स्त्रियांसाठी, शुद्रांसाठी शाळा काढायचं खूळ शिरलं.मग ही घरचीच शिक्षिक मिळाली.
                                   १८४८ मध्ये भिड्यांचा वाड्यात  शाळा सुरु झाली.समाजात खूप मोठ्ठा विरोध झाला.पण हे जोडप काही बधल नाही.म्हटल्यावर सर्वांनी तिच्या सासर्‍याला धरल.धर्म बुडाला अशी हाकाटी करत बहिष्कार घालू म्हणून धमकी दिली.सासर्‍यानी सामोपचारांनी सांगून पाहिलं.काही उपयोग झाला नाही.सासरेबुवा म्हणाले.माझ सांगण ऐकायचं नसेल तर घर सोडा.त्यांनी घर सोडलं.बरोबर रामाच्या मागे सीतेने जाव तस तीही बाहेर पडली.शाळा सुरूच राहिली.मग धर्ममार्तंड चिडले.तिच्या जायच्या यायच्या वाटेवर दबा धरून बसून तिला दगडाने शेणाने मारायला लागली.ती घाबरली नाही.उतली नाही मातली नाही घेतला वसा टाकला नाही.उलट त्याने सुचविले पिशवीत एक जादा लुगड घेऊन जा.शाळेत जाऊन बदल येताना पुन्हा पहिलच लुगड नेसुन ये.दोघांच्या कार्याचे सार्थक झाले.१६ नोव्हेंबर १८५२ मध्ये या जोडप्याचा ब्रिटीश शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तो म्हणाला,"हा गौरव तुझाच आहे.मी शाळा स्थापण्यास कारण मात्र आहे.पण तू शाळा अनेक संकटाशी तोंड देऊन यशस्वीपणे चालविल्या.याचा मला अभिमान आहे"
                               या दांपत्याच काम फक्त शाळा सुरु करून थांबले नाही.त्या काळात बालविवाह होत.बालमृत्यूच प्रमाणही मोठ्ठ होत.मग लहान वयात मुलगी विधवा होई.तीच केशवपन केल जाई.तिच्या रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा येत.सती जाणारी एकदाच मरे.हिला मात्र रोजच मरण यातना सोसाव्या लागत.कधी तरुण वय पाय घसरे.कधी समाजातील बुभुक्षितांच  त्या सावज बनत. अशावेळी दिवस राहिले की,जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसे.मग यांनी आपल्या राहत्या घराशेजारीच १८६० मध्ये वाडा बांधला.विधवा बायकांनी इथे यावे गुप्त रीतीने बाळंत होऊन मुल ठेऊन जावे अशी सोय केली.भितीभिंतीवर याची माहिती देणारी पत्रके लागली.इथ झालेलं पहिले मुल त्यांनीच दत्तक घेतले.या मुलांसाठी अनाथाश्रम सुरु केला.त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आश्रम काढले.
                          शाळा असो,अनाथाश्रम असो,अस्पृश्याना पाण्यासाठी हौद खुला करणे असो,न्हाव्यांचा संप असो,विधवाविवाह असो की दुष्काळ निवारणार्थ अन्नछत्र  असो ही पतीच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली.उलट प्रसंगी धीर दिला.त्या एका पत्रात त्याना लिहितात, "पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदुषक खूप आहेत,तसेच येथेही आहेत त्याना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे.सदासर्वदा कामात गुंतावे.भविष्यातले यश आपलेच आहे"
                        अशी ही पतीच्या मागे केवळ अंधानुकरणाने जाणारी नव्हती.तर डोळस सहधर्मचारिणी होती.तिचा पतीही तितकाच खंबीर साथीदार होता.तिला मुल नाही म्हणून दुसरे लग्न करायची गळ अनेकांनी घातली.पण त्याने मानले नाही.
                       पतीला अर्धांगवायू झाला.तिने धैर्याने तोंड दिले.मनापासून सेवासुश्रूषा केली.मृत्युनंतर विश्वास घातकी भाऊबंदान्चा स्पर्शही होऊ देऊ नका असे त्याने सांगितले.तिने ही इछ्या पूर्ण केली.पतीच्या अंतिम यात्रेत गाडगे पुढे घेऊन जाणारी ही एकमेव स्त्री असावी.पती निधानानंतरही रडत न बसता त्यांचे शिक्षणाचे कार्य,सत्यशोधक समाज तिनी चालू ठेवला.कविता, भाषणे,संपादन हेही कार्य ती करत राहिली.पुण्यात प्लेगची साथ आली.दत्तकपुत्र यशवंत डॉक्टर झाला होता.ही त्याच्या मदतीला धावली.जातीपातीचा विचार न करता सेवाकार्य करत राहिली.दवाखाना गावाबाहेर.रुग्णांना पोचविण्यासाठी वहाने मिळणे कठीण होते.एका अस्पृश्य मुलाला प्लेगची लागण झाली.ही सरळ त्याला पाठीवर घेऊन मुलाच्या दवाखान्यात पोचली.अखेर हिलाच प्लेगची लागण झाली.आणि त्यातच १० मार्च १८९७ मध्ये तिचा मृत्यू झाला.अशी ही मृत्युंजय क्रांतीज्योती कोण बरे?

Monday, 10 November 2014

चैतन्याचा झरा


                                             चैतन्याचा झरा

.
'स्काइपवर येऊ शकाल का?' पटवर्धनांचा सकाळी ११.३० ला फोन आला.खर तर माझा स्वयंपाक व्हायचा होता इतरही कामे होती.पण त्यांच्या स्वरात इतका उत्साह होता.मला नाही म्हणवल नाही.त्यांचा मुलगा त्यावेळी जपानमधून संपर्कात होता.त्यांना  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग करून पहायचा होता.मला अंतरजालावरील बाबी हाताळण्याचे अत्यंत जुजबी ज्ञान,त्याना माझ्यापेक्षा थोडेच जास्ती आणि जपान मधल्या तज्ज्ञ मुलाची  अशा आमच्याबरोबर गाठ होती.तांत्रिक अडचणी येत होत्या.पण अनेक खटपटीनंतर प्रयोग किंचित पुढे सरकला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल नाही पण होऊ शकेल असा अंदाज आला.पटवर्धनांनी मनावर घेतलं म्हणजे ते पूर्णत्वाला जाणारच यात काही संदेह नाही.दोन दिवसापूर्वीच मिटींगमध्ये चर्चा झाली आपल्या सर्वांच्या तब्येतींचा विचार करता, मिटींगसाठी येण्याजाण्याचा व्याप करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केल तर काय हरकत आहे.आम्ही बोलबच्चन. त्यांनी मात्र लगेच कृती केली. त्यांच्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्याकडून शिकल्या जातात.त्यांच्या संपर्कात राहणे हेच एक प्रकारचे शिक्षण असते.

.शरच्चंद्र पटवर्धन म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक.वय वर्षे ७९..परंतु संस्थापक म्हटलेलं त्याना अजिबात आवडत नाही.म्हटल तर ते दुरुस्त करून म्हणतात 'मी साधा कार्यकर्ता आहे.' हे फक्त बोलण्यापुरत नाही.त्याना तसच वाटत असत.त्याप्रमाणे त्यांची कृतीही असते.समारंभात मंचावर त्याना जबरदस्ती बसवावं लागत.त्यांच्या कामाला योग्य ती आणि तेवढीच दाद दिली तरी ते अवघडतात.

  पटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..
 १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.

'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्‍या आमच्या मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्‍या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का डीटीपी शिकून घ्यायचं नाही? पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना आपल शिकण होईल  हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.

स्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर  सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके  विनामूल्य देण याबाबत ते ठाम आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार  विरोध नव्हता.दुसर्‍याबाबत 'रुका हुवा फैसला' सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची बाजू मांडणार्‍या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले. तेही सायकलवर.

 या वयातही उन असो, पाउस  असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार असतो.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता१००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर पेशंटला नेमक कस  जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत. शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न .झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते  वजन काट्याच ओझ आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा (केअर टेकर)यांनाच जास्त असते.

 ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आत्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते  फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही रटाळ न होता संवाद साधणार्‍या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.

लिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात घेता इतकी वर्षे  त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप मोठ्ठा वाटा  आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या छोट्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे असत.वहिनी बरोबर असल्या  की त्यांच्या  औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ कस नेमक !

त्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्‍याचवेळा आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच राहतात.

पटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न असतात शंका असतात.एकदा त्यांनी विचारल संस्कृत आपण देवनागरीत पाहतो तस इतर लिपीत असत का?प्रथम कोणत्या लिपीत सुरुवात झाली वगैरे.अर्धवट माहितीवर उत्तर देऊन चालणार नव्हत मग मी माझ्या ओळखीतल्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विचारल.काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.

एका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.प्रत्येक सहलीत वहिनी बरोबर असायच्या.या वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी  कोणीतरी मदतीला येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.

पार्किन्सन्स मित्रमंडळाला अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी हॉस्पिटलचा सर्व  चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना सन्मान चिन्ह  दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर त्यांचाही वाटा होताच ना?काही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना?का नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.
त्यामुळे वाटलं पटवर्धन येतील?पटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून हेच गेले.

सध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम  स्वांतसुखाय आहे. स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून बदलली.

शुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे  पटवर्धन मला तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म जगणारे अध्यात्मिक.








Sunday, 10 August 2014

प्रसिद्धी पराङमुख,परोपकारी रामचंद्र देशपांडे.

( ४ डिसेंबर १९९२च्या बेळगाव तरुण भारत अंकात आलेला लेख  जसाच्या तसा देत आहे.)
खानापूर तालुक्यातील विकासात अनेकांचे योगदान आहे.त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे रामचंद्र विष्णुपंत देशपांडे.समाजात ते परिचित आहेत ते मात्र रामभाऊ या नावाने.नुकतीच त्यांनी वयाची पंचाहत्तरी पुरी केली.त्यांची प्रसिद्धी पराङमुख वृत्ती माहित असल्याने त्यांच्या मुला नातवंडानीच त्यांनाही न सांगता एकत्र जमून घरगुती स्वरूपात अनौपचारिक रीतीने पंचाहत्तरी सोहळा पार पाडला.त्या निमित्त्याने त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला करून देणे आवश्यक आहे.
 


        खानापूर अर्बन बँकेच्या १९७२ साली झालेल्या सुवर्ण महोत्सवी समारंभात महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब भारदे व कै.बाबुराव ठाकूर यांच्या समवेत रामभाऊ देशपांडे


जीवन परिचय
रामचंद्र देशपांडे तथा आण्णांचा जन्म११ ऑगष्ट १९१७ साली झाला.लहानपणीचा वडिलांचे कृपाछत्र  हरपले.आईनी सांभाळ केला.मुलाकीपर्यन्तचे शिक्षण कसेबसे घेता आले.पुढे शिक्षणाची सोय नव्हती.घरची जबाबदारीही तेराव्या वर्षीच स्वीकारावी लागली.परंपरेने कुलकर्णीपद चालून आलेले.अंकले ह्सनवाडी,खेमेवाडी या गावाचे कुलकर्णीपद होते.ते काम १९४५ डिसेंबरपर्यंत केले.या काळात ब्रिटीश सरकारची सक्तीची लेव्ही वसुली सुरु झाली.गरिबांच्या कडून सक्तीने लेव्ही घेणे न  पटल्याने कुलकर्णीपदाचा राजीनामा दिला.
राजकीय सहभाग
सार्वजनिक कामाची आवड रक्तातच भिनलेली.ती स्वस्थ बसू देईना.१९४५ साली लोकल बोर्डाच्या निवडणुकीला उभे राहिले.आणि निवडूनही आले.पदाचा उपयोग खानापूर तालुक्याच्या मागासलेल्या पश्चिम भागाच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात केला.हे कार्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता आपल्या पत्नीलाही निवडणुकीस उभे राहण्यास प्रवृत्त केले.त्या काळात हे विशेष म्हणावे लागेल ग्रामपंचायतीचेही ते काही काळ सदस्य होते.खानापूर येथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली त्याचे ते खजिनदार होते.संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याच्या वेळी सत्याग्रहीना आमच्या घरी जेवण असायचे हे मला आठवते.
अर्बन बँकेतील कार्य
खानापूरच्या आर्थिक विकासात खानापूरच्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मोठ्ठा वाटा आहे.अर्बन बँकेच्या उभारणीत आणि प्रगतीत आण्णांचा सिंहाचा वाटा आहे.१९५१ ते १९८० पर्यंत ते अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर होते.त्यामध्ये सहा वर्षे चेअरमन म्हणूनही काम केले.त्यांच्याच अध्यक्ष पदाच्या काळात बँकेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला.तो यशस्वी होण्यासाठी घेतलेले अपार कष्ट आम्ही पाहिलेले आहेत.बँकेला इमारत नव्हती.इमारतीसाठी जागा मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.१९५५ मध्ये इमारत बांधून घेतली.
साखर कारखान्याची सुरुवात
अर्बन बँकेचे चेअरमन असताना खानापूर तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी सहकारी तत्वावर कारखानदारी सुरु करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पहिली बैठक बोलाविली.यातून सहकारी तत्वावर कारखाना उभारण्याची कल्पनापुढे आली.केवळ कल्पना मांडून न थांबता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कै.निळकंठराव सरदेसाई यांच्या बरोबरीने कार्य केले.सुरुवातीची काही वर्षे ते या कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते पुढे डोळ्याचा त्रास सुरु झाल्याने पदाचा राजीनामा दिला.
धार्मिक व सामाजिक कार्य
आण्णा प्रथमपासून धार्मिक वृत्तीचे परंतु ही धार्मिक वृत्ती कर्मकांडाकडे झुकणारी नाही तर भक्तिमार्गावर भर देणारी.नैतिकता जोपासणारी आहे.वारकरी संप्रदायाचा अधिक प्रभाव आहे.पंढरीची वारी त्यांनी कधी केली नाही.'येथेच पंढरपूर' या वृत्तीने खानापूरचे विठ्ठल मंदिर व पांडुरंग हेच अधिक जवळचे वाटले.या संदर्भात पुरोगामीपणाचा कुठेच गाजावाजा न करता अनेक जातीच्या लोकांशी त्यांचे जवळीकीचे संबंध होते.भक्ती मार्गातील त्यांच्या भजनी मंडळाबरोबर असताना त्यांनी सार्वजनिक जीवनातील मोठेपणा नेहमीच बाजूला ठेवला.
१९३८ पासून ते देवस्थान कमिटीवर होते.१९४८ साली कम्प्लीट देवास्थान कमितीचे ट्रस्टी म्हणून काम केले.१९५५ पर्यंत रवळनाथ देवस्थान कमिटीचे चेअरमन व गेली ४५ वर्षे पांडुरंग देवस्थान कमिटीचे चेअरमन आहेत.अत्यंत कमी उत्पनात देवस्थानचा सर्व कारभार सांभाळणे,कीर्तने,पुराण,काकड आरती,इ.पूर्वापार गोष्टी चालू ठेवणे हे अत्यंत जिकीरीचे काम.परंतु गेली ४५ वर्षे ते हे काम कोणतीही तक्रार न करता गाजावाजा न करता करत आले आहेत.
आज सार्वजनिक कामात सहभागी होणार्‍यांनी पदरी माया जोडण्याचा जमाना सुरु होत आहे.आण्णांनी मात्र सार्वजनिक कामात पदरमोडच अधिक केली.तालुक्याच्या ठिकाणी कामास येणारे अनेक लोक आमच्याकडे राहावयास असत.कीर्तनकार पुराणिक यांची जेवणाची सोय नसेल तर तीही अनेकवेळा आमच्याकडे असे.आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असे नाही.तरीही अनेकाना शिक्षणात सहकार्य,लग्नकार्यात सहकार्य,ज्यांचे मागेपुढे कोणी नाही,गरिबीमुळे ऐपत नाही अशांच्या अंतिम संस्कारांसाठी सहकार्य इ.मध्येंआण्णांचा नेहमी पुढाकार असे.त्यांनी कुणाला किती मदत केली याचा हिशोब कधी ठेवला नाही.परंतु आण्णांनी केलेल्या मदतीमुळेआयुष्यात पुढे आल्याचे स्मरण ठेऊन त्या व्यक्ती जेंव्हा सांगतात तेंव्हाच ते समजते.भांडे मिटवणे,एकमेकातील गैरसमज दूर करणे यासाठी मध्यस्ताची भूमिका निभावताना त्याना अनेकवेळा पाहिलं आहे.त्यांच्या सर्व कार्यात आईनेही विना तक्रार सहाय्य केले.आजही त्यांची अशी कामे चालूच असतात.आम्ही पुण्यामुंबईला राहणारी मुले,मुली,नातवंडे त्याना व्यवहारी होण्याचा सल्ला देत असतो,परंतु त्यांच्यात काही फरक पडत नाही.
व्यक्तिमत्वाचे पैलू
आज आपल्या नातेवाईकाना आपल्या क्षेत्रात पुढे आणून घराणेशाही चालू ठेवण्याचे युग आहे.परंतु आण्णांनी मात्र आपल्या प्रतिष्ठेचा स्वत:च्या फायद्यासाठी कधीच उपयोग केला नाही.आम्हाला नोकर्‍या मिळवून देण्यासाठीही त्यांनी हे केले नाही.खर तर त्यांच्या एका शब्दावर ही कामे झाली असती.त्यावेळी त्यांचा राग आला तरी याद्वारे शुद्ध चारीत्र्याचा त्यांनी आदर्श घालून दिला हे आज जाणवते.कर्मण्ये वाधिकारस्ते हा गीतेचा संदेश त्यांनी जीवनात प्रत्यक्षात उतरविला असे मला त्यांचे जीवन चरित्र पाहताना वाटते.त्यांचा धोरणीपणा,दिलदारपणा,बुद्धिमत्ता,कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची वृत्ती,निरपेक्ष प्रेम करण्याची वृत्ती,आधुनिक काळाशी जमवून घेण्याची वृत्ती,या सर्वाबाबताच्या अनेक आठवणी आहेत.परंतु हे सर्व लेखाच्या व्याप्तीत मावणे कठीण.यासाठी पुस्तकच लिहायला हवे.
आज त्यांची मुले मुली नातवंडे,वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात यश मिळवत आहेत.सर्वांनाच आण्णांबद्दल अपरंपार आदर आहे.आण्णांचा आशीर्वाद व पुण्याई पाठीशी आहे म्हणून आम्ही सुखी आहोत अशी माझी भावना आहे.त्याना दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
( आज आण्णा आमच्यात नाहीत.परंतु आठवणी आहेत.११ ऑगष्ट या जन्मदिनी त्याना आदरांजली सर्व लेकीसुना,मुलगे जावई,नातवंडे,  पणतवंडे या सर्वाना आण्णांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून हा जुना लेख  देत आहे.)