Tuesday, 18 February 2025

आनंदी वृद्धत्व - १२

                                                   आनंदी वृद्धत्व - १२

                        श्रीपाद कुलकर्णी यांचा मेसेज आला 'कोथरूडच्या स्मरणिका मी घरी नेऊन देईन स्पीडपोस्टने पाठवू नका'.मंडळाचे पैसे वाचवणे आणि शुभार्थीना भेटणे या हे दोन्ही उद्देश त्यात होते.कोथरूड भागात राहणारे सभासदही बरेच आहेत.

                      दरवर्षी ११ एप्रिल या पार्किन्सनदिनानिमित्त पार्किन्सनमित्रमंडळातर्फे मेळावा आयोजित केला जातो.त्यावेळी तज्ञांचे लेख,शुभंकर शुभार्थींचे अनुभव असा भरगच्च मजकूर असलेली स्मरणिका प्रकाशित केली जाते.कार्यक्रमाला न आलेल्याना ती पोस्टाने पाठवली जाते.कुलकर्णी यांनी स्वत:हून मदत करण्याची तयारी दाखवल्याने आम्ही आनंदित झालो.  त्यांनी आपले काम चोख पूर्ण केले आणि त्याचा रिपोर्टही दिला.त्यांच्या या कृतीमुळे इतर ही काहीजण आम्हीही पुढच्या वर्षी हे काम करू म्हणाले. 

                   कुलकर्णी आता ७७ वर्षाचे आहेत.पत्नी ७४ वर्षाची तिला पार्किन्सन झाला त्याला २७ वर्षे झाली.पगारी केअरटेकर परवडणार नसल्याने तेच तिचे सर्व पाहत असतात.अशावेळी अशी दमवणारी जबाबदरी घेण्याची इच्छा आणि उर्जा आम्हाला थक्क करणारी होती.त्यांचा प्रेरणादायी जीवन परिचय आनंदी वृद्धत्व या सदरातून इतरांपर्यंत पोचवावा असे वाटले. 

                     सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब.वडील खाजगी सहकारी बँकेत नोकरीला होते. आई लहानपणी गेली चार भावंडे.दहावी नंतर मिळेल ती नोकरी सांगतील ते काम,देतील तो पगार अशा तर्हेने नोकरी करत बी.कॉम.शिक्षण करताना केलेल्या नोकरीतून मिळालेल्या पैशातून ही घरी पैसे द्यावे लागायचे. कृषी संशोधन केंद्र सोलापूर येथे लिपिक म्हणून नोकरी केली.पुढे कोल्हापूरला वरिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली.या काळात शिल्पा ताईंशी विवाह झाला.त्याही सामन्य मध्यमवर्गीय घरातून आलेल्या.शेंडेफळ असल्याने लाडात वाढलेल्या.म्हणेल ते मिळत असल्याने थोड्या हट्टी.

                कोल्हापूरला भाड्याने घर घेतले.चार भिंतीशिवाय काहीच नव्हते.लग्नात आलेल्या आहेरातून घर सजवले.पगारातून घरी पैसे द्यावे लागतच.त्यामुळे काटकसर करतच राहावे लागे.कधीतरी गोकुळ हॉटेलमध्ये जाणे.रंकाळ्यावर फिरायला जाणे हीच काय ती चैन.शिल्पाताईंनी पुण्याला बदली करून घेण्यासाठी धोशा लावला.त्यांचा हट्ट पटींनी पुरवला.कृषी विद्यालय पुणे येथे बदली करून घेतली.उरळी कांचन येथे खोली घेऊन राहिले.येजा करायचे.अत्यंत खडतर जीवन होते.शिल्पा ताईनी कोणतीही कुरकुर न करता साथ दिली.

              १९९५ मध्ये थोडी परिस्थिती सुधारली.मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात घर घेतले. सगळे काही सुरळीत आहे असे म्हणेपर्यंत पत्नीला पार्किन्सनने गाठले.आता पार्किन्सनशी लढा सुरु झाला.पत्नीचा पीडी आटोक्यात येण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही.त्यावर स्वतंत्र लेख होईल.काहीच गोष्टींचा उल्लेख करत आहे.

               अनेक पुस्तके वाचून अभ्यास केला.गव्हान्कुराचा प्रयोग वाचून तो प्रयोग सुरु झाला.रामदेव बाबांचे शिबीर केल्यावर प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम सुरु केले.यासाठी पहाटे साडेपाचला उठून टूव्हिलरवर दोघे परमहंस टेकडीपाशी जायचे.अर्धी टेकडी चढून गार वारा आणि सकाळचा अरुणोदय पाहत एके ठिकाणी सतरंजी टाकून प्राणायाम व हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करायचे.घरी आल्यावर गव्हांकुर रस करून द्यायचा.असा रस काढणे ही अत्यंत किचकट आणि दमवणारी प्रक्रिया आहे.नंतर विविध भाज्यांचे सूप करून द्यायचे.ऑफिसला जायचे.संध्यकाळी पुन्हा परमहंस टेकडीवर फिरायला जायचे.असे ६/७ वर्षे केले.अनेक प्रयोग करत शेवटी फक्त अलोपाथीवर स्थिर झाले.   

                   पत्नीला पान्न्शीच्या आताच पार्किन्सन झाला.तेंव्हापासून ते त्यांचा पार्किन्सन न कंटाळता सांभाळत आहेत.अर्थात एकत्र कुटुंब असल्याने घरातील इतरही मदत करतात.तरीही त्यांच्या पत्नीचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यात कुलकर्णींचा मोठ्ठा वाटा आहे.पत्नी शिल्पाताईसह अजूनही सहलीला,कार्यक्रमांना हजर राहतात.त्यांचे न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांनी त्यांचा मंडळात इतकी वर्षे पीडीला छान संभाळल्याबद्दल सत्कार करायला सांगितला होता. आम्ही एका कार्यक्रमात तो केलाही.आपल्याकडे स्त्रिया सेवा करू शकतात.पुरुषांना ते जमत नाही असा एक समज असतो.आमच्या ग्रुपधीलल उल्हास गोगटे,शरच्चंद्र पटवर्धन,विनोद भट्टे,श्रीपाद कुलकर्णी यांनी तो खोटा ठरवला आहे.

               शिल्पाताई अशक्त झाल्या आहेत.परमहंस टेकडीवर जाणे शक्य होत नाही.तरी ते पत्नीकडून संध्याकाळी अनुलोम विलोम आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करून घेतात.सकाळी शाखेत जातात. तेथे इतर कार्यक्रम चालू असले आणि त्यासाठी थांबण्याचा मोह होत असला तरी बायकोचा डोस वेळेत देण्यासाठी लवकर परत येतात.

              सकाळी घरी आल्यावर प्रथम इतर गोष्टी आवरून तिला औषधे काढून दिल्यावर दुधामध्ये राजगिरा टाकून देतात.कमोडवर बसवतात.साधारण अर्ध्या तासाने ती पुन्हा झोपते. दीड तासात स्वत:ची  अंघोळ पूजा आवरतात. पत्नीला उठवून अंघोळ झाल्यावर तिचे केस बांधून, दोघांचे कपडे धुतल्यावर तिला जेवण देतात.अगदी मागच्या वर्षीपर्यंत शिल्पाताई स्वत:चे कपडे स्वत:च धूत असत.ती जेवल्यावर सांडलेले सर्व स्वच्छ करतात.त्या पुन्हा थोडावेळ झोपतात. त्या वेळात पोथी एक अध्याय वाचतात. व नंतर स्वत: जेवतात. असे सकाळचे वेळेचे नियोजन त्यांनीच एकदा सांगितले होते. स्वत:चा सर्व दिनक्रम पत्नीच्या दिनक्रमानुसार त्यांना करावा लागतो.त्या घरातल्या घरात फिरतात.मराठी मालिका,जुने सिनेमा लावून दिले की त्या आवडीने पाहत बसतात. त्या वेळा कुलकर्णी बाहेरची कामे करून घेतात.
                     पत्नीचा व्यायाम करून घेण्याबरोबर ते स्वत:ही व्यायाम करतात.त्यांची एन्जोप्लास्टि झाली आहे.रोज सकाळी १ तास ते प्राणायाम,योगासने सूर्य नमस्कार घालतात. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाला त्यांनी ७५ सूर्य नमस्कार घातले.५ मिनिटे ते वृक्षासनात राहू शकतात.व्यायामाने त्यांनी आपली शुगर नियंत्रणात ठेवली आहे. इतर शुभंकराना ( केअरटेकर ) ते व्यायामाने स्वत:ला तंदुरुस्त ठेवा म्हणजे शुभार्थीची सेवा करणे सुकर होईल असा सल्ला नेहमी देतात.
                 ७५व्या  वर्षी त्यांनी स्वत:च केलेल्या संकल्पानुसार वनवासी कल्याण आश्रम या संस्थेस पाच लाख साठ हजार देणगी मिळवून दिली.अशा देणग्या मिळवायच्या तर किती वणवण करावी लागते.नकार झेलावे लागतात हे सर्व जाणतातच.पत्नीची सेवा करताना अशा अनेक लष्कराच्या भाकर्या ते भाजत असतात. 
 
                  त्यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली.तेंव्हा त्यांनी लिहिले,"तिने दिलेल्या साथीचे मला नेहमी स्मरण होते.त्यामुळे तिला आता माझी गरज असल्याने तिला जास्तीत जास्त आनंद देण्याचा मी प्रयत्न करत आहे.इतरांना शिल्पाताई यांच्या नशिबाचा नक्कीच हेवा वाटेल.पार्किन्सनसह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य या पतीपत्नींनी  आचरणात आणून दाखवले आहे.
                    श्रीपाद कुलकर्णी यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आणि कौतुक वाटते.ते आदर्श शुभंकर,हाडाचे कार्यकर्ते,उत्तम वक्ते आहेत.अभ्यासू वृत्तीचे आहेत.वाचून नोट्स काढायच्या इतरांना द्यायच्या ही वृत्ती.विवेकानंद,मासाजीस्ट राम भोसले यांच्यावरील पुस्तकाचे कथन इत्यादी त्यांच्या व्याख्यानाचे विषय आहेत.प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळत नाही.Whats app वर ते सातत्याने काहीना काही पोस्ट टाकतात.त्यांच्या जगण्यातील सकारात्मकता आणि वेगळेपणा त्यातून मनावर ठसतो.प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी कसे राहावे हे शिकवतो.
                आमची शुभार्थी गौरी इनामदार आणि त्यांचे पती त्यांच्या घरी गेले होते.तिनी केलेले निरीक्षण येथे नोंदावावेसे वाटते,"काकांनी त्यांचे आयुष्य पत्नीशी बांधून ठेवले आहे पण जखडून ठेवले नाही.....प्रेम,सेवाभाव,आणि निरपेक्ष वृत्तीने काम करणे हे त्यांच्या आनंदी स्वभावाचे गमक असावे.आम्ही प्रथमच भेटलो. त्यांच्या घरी अर्धा तास होतो पण आम्हीच सकारात्मक उर्जा घेऊन निघालो."