Sunday 25 May 2014

आंतरभारती : सानेगुरुजींचे स्वप्न

                                    आंतरभारती : सानेगुरुजींचे स्वप्न

                             भारतीय स्वातंत्र्याला अर्धशतक उलटून गेले.या काळात काही कमावले काही गमावले.गमावलेल्या बाबीत महत्वाची बाब म्हणजे राष्ट्राच्या एकात्मतेला गेलेले विविध तडे.स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांना हाकलण्याच्या कैफात फुटीरतेची विषवल्ली कशी फैलावत गेली ते समजलेच नाही.काही द्रष्ट्या विचारवंताना मात्र याचे भान होते.त्यातील एक सानेगुरुजी.'खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे' असे सांगणार्‍या सानेगुरुजीना जातीभेद,प्रांतभेद,भाषाभेद,हे रुचणे शक्यच नव्हते.विविधतेतील ऐक्य अनुभवता आले तर विविधाता वैभवाचे साधन बनते.तसे झाले नाही तर मात्र ती वैराला कारणीभूत ठरते.विविधतेतील एकता अनुभवता येण्यासाठी माणसामाणसांची हृदये एक झाली पाहिजेत. हृदये एक करण्याची ताकद भाषा व साहित्य यात आहे.यातून त्याना आंतरभारतीची कल्पना सुचली.आंतरभारती हे त्यांचे स्वप्न होते.ध्यास होता.
                           आंतरभारतीची कल्पना त्यांनी स्वातंत्र्यानंतर मांडली असली तरी व्यक्तिगत जीवनात हे तत्व त्यांनी आधीच आत्मसात केले होते.स्वामी रामकृष्ण,रवीन्द्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांच्या विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता.स्वामीरामकृष्णांची धर्मसमन्वयवृत्ती ,रवींद्रनाथांची पूर्व व पश्चिम यातील समन्वय द्रष्टी व महात्मा गांधींचे सर्वसमन्वयाचे प्रयोग यांचे त्याना आकर्षण होते.अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात ते अध्ययनासाठी गेले.तेथे गुजरात,बंगाल,मद्रास येथील व्यक्तीही अध्ययनासाठी आल्या होत्या.परस्पर संपर्कातून भाषा हा एकमेकांची मने जोडण्याचा सेतू आहे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी बंगाली भाषा शिकून घेतली.रवींद्र संगीत अभ्यासले.आपल्या कित्येक कवितांच्या रचना बंगाली चाली देऊन केल्या.१९३०-३२ च्या सत्याग्रहात त्याना त्रीचनापाल्लीच्या तुरुंगात ठेवले होते तेथे त्यांनी दक्षिणी भाषांचा अभ्यास केला.सुब्रम्हण्यम भारतींच्या काव्याचा परिचय करून घेतला.'तामिळवेद' अशी पदवी असलेल्या कुरळ ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला.गुजराती सत्याग्रहींशी आलेल्या संबंधातून त्यांनी गुजराती साहित्याचा अभ्यास केला काही गुजराती साहित्याचे अनुवादही केले.विनोबांच्या गीता प्रवचनाचे लेखनही तुरुंगात झाले.या सर्व काळात त्यांची समन्वय दृष्टी अधिकच दृढ झाली.भारतीय संस्कृतीचे माहात्म्य सांगणार्‍या अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी या काळात केले.१९४० -४२च्या स्वातंत्र्य लढयातही त्याना तुरुंगवास सोसावा लागला.त्यावेळी त्यांनी चीनी व इस्लामी संस्कृतीचा अभ्यास केला त्यावर लेखनही केले.त्याना भारतीय संस्कृतीत जाणवणारी समन्वय दृष्टी हे वृथा अभिमानाचे नव्हे तर या सर्व अभ्यासक्रमाचे फलित होते.
                        स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्र उभारणीसाठी पाश्च्यात्यांच्या आक्रमक राष्ट्रवादाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेशा विश्वबंधुत्वाच्या कल्पनेत राष्ट्रवाद वाढावा अशी सानेगुरुजींची इच्छा होती.भाषा,धर्म,प्रांत अशा विविध स्तरावर एकता निर्माण होणे ही सांस्कृतिक गरज होती.राजकारणी मात्र स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी जिथे तिथे फुटीरता निर्माण करीत होते.स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारायची तर ती प्रेमाच्या पायावर उभी राहणे आवश्यक होते.आणि परस्पर प्रेम निर्माण होण्यासाठी सांस्कृतिक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे असे त्यांच्या लक्षात आले.आंतरभारती हा त्यांच्या आत्म्याचा  हुंकार होता.त्यांच्या समन्वय दृष्टीची सांस्कृतिक मूर्ती होती.
                      १९४७ला साधना साप्ताहिक सुरु झाले.त्यात प्रांतभारती नावाचे सदर असे.त्यातून भारतातील विविध प्रांतातील साहित्याची ओळख करून दिली जाई.विविध लेखामधून,व्याख्यानातूनही त्यांनी आंतरभारती या नव्या कल्पनेचा प्रचार सुरु  केला. (प्रथम त्याला ते प्रांत भारती म्हणत.पुढे त्यांनी आंतरभारती हे नामांतर केले.)
                  १९४९च्या मे मध्ये पुण्यात आचार्य जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन भरले.त्यात सानेगुरुजीनी प्रांतभारतीचा ठराव मांडला.महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी पाठिंबा दिला.सर्वानुमते ठराव मंजूर झाला.
                   सानेगुरुजीना आंतरभारती या सांस्कृतिक चळवळीची प्रेरणा रवीन्द्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीतून मिळाली.'यत्र विश्व भावती एकनीडम' हे विश्वभारतीचे घोषवाक्य आहे. 'मानव मात्र सर्वत्र एक आहे त्याचे हृदय सर्वकाळी सर्व ठिकाणी एकतेचे स्पंदन करीत आहे' असे रवींद्रनाथ सांगत.विश्वबंधुत्वाचा आदर्श, जगापुढे ठेवण्यासाठी त्यांनी आपली वाणी,लेखणी सतात झिजविली.राष्ट्र ,धर्म,संस्कृती यांच्या दुराभिमानाने मानवकुलाच्या एकतेला तडा जातो.भेदातून अभेद पाहण्याची. भारतीय संस्कृतीतील समन्वय दृष्टी त्यासाठी उपयोगी आहे.याद्वारे विविधतेतून विद्वेष निर्माण न होता विविधतेतील सौंदर्य जाणवेल.सत्ता संपत्ती यांच्या स्पर्धेत मानवी संस्कृतीचा नाश होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.त्यामुळे स्पर्धेऐवजी सहकाराचा मंत्र जपला पाहिजे.व द्वेषाऐवजी प्रेमाला थारा दिला पाहिजे.हीच दृष्टी राजकीय आर्थिक व सामाजिक जीवनात स्वीकारली तर मानवी जीवन सुखावह व संपन्न होईल.रवींद्रनाथ यांच्या  या विचारचा पुरस्कार करणारे अनेक विचारवंत व कलावंत निरनिराळ्या राष्ट्रातून निर्माण झाले.व विश्वभारतीची भारतात निर्मिती झाली.
                        सानेगुरुजींच्या आंतरभारतीच्या कल्पनेमागे  विश्वभारतीचेच तत्वज्ञान आहे.विश्वभारतीमध्ये जागतिक पातळीवर एकता सहजीवन निर्माण व्हावे ही इच्छा आहे.तर आंतरभारतीमध्ये भारताच्या प्रांताप्रांतात प्रेमभावना वाढणे व सहजीवनाची निर्मिती होणे ही भावना आहे.आचार्य भागवतांच्या शब्दात सांगायचे तर 'विश्वभारती हे पराष्ट्रीय धोरण (फॉरेन पॉलीसी),तर आंतरभारती हे भारताचे अंतर्गत धोरण (इंटर्नल पॉलीसी )आहे.रवींद्रनाथांच्या विश्वभारतीमागे भारत व विश्व याना जोडणारी विशाल योजना होती.तर आंतरभारतीचे प्रयोजन भारतीय गणराज्यातील विविध भाषांचा व सांस्कृतिक चळवळीचा परामर्श घेणे हे होते.भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना आंतरराष्ट्र्वाद या विकसित रुपात परीवर्तीत होण्यासाठी प्रथम एक राष्ट्र ही भावना निर्माण होणे आवश्यक होते.यासाठी भारतीयत्व व प्रदेशिकत्व यांचा मेळ आवश्यक होता.पण प्रत्यक्षात  मात्र या काळात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली.आणि राजकारणी लोकांनी याचा उपयोग लोकशाही दृढमूल होण्यासाठी न करता परस्पर द्वेष निर्माण होण्यासाठी केला.आंतरभारतीची चळवळ यावर उतारा होती.
                         आंतरभारतीच्या चळवळीमागे आणखी एक उद्देश होता.तो म्हणजे लोकभाषांचा विकास.लोकशाहीच्या विकासासाठी लोकभाषांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे.विकास झाला पाहिजे.शिक्षणाच्या क्षेत्रात,व्यावहारिक  क्षेत्रात लोकभाषांचा वापर झाला पाहिजे.लोकशाही हे लोकांचे राज्य असल्याने सर्वसामान्यांच्या भाषेत व्यवहार झाल्याने लोकमानस समृद्ध होईल आणि लोकशाही दृढमूल करणारी लोकशक्ती निर्माण होईल.भारतात मराठी,गुजराथी,हिंदी,बंगाली तामिळ,उडिया काश्मिरी,पंजाबी,कन्नड,तेलगु,मल्याळम या १२ प्रदेश भाषा आहेत.शिवाय उर्दू व सिंधी भाषिकही बहुसंख्य आहेत.एकीकडे या सर्व भाषांचा विकास व्हावयास हवा.व दुसरीकडे या भाषांच्या अभिमानाचे दुराभिमानात रुपांतर होऊ नये याचीही दक्षता घ्यावयास हवी.राष्ट्रभाषा हिंदी प्रदेश भाषांना मार्क न होता सर्व १४ भाषा राष्ट्रभाषाच आहेत अशी व्यापक भावना वाढीस लागावयास हवी.दक्षिणेकडील लोकांनी हिंदीबद्दल आकस धरू नये,उत्तरेकडील लोकांनी स्वखुशीने एखादी दक्षिणी भाषा शिकावी.भिन्न असलो तरी अभिन्न आहोत,हीआंतरभारतीची स्नेहार्दता यातून निर्माण होईल.एकीकडे प्रदेशभाषांची वाढ व दुसरीकडे भिन्न प्रादेशिक भाषांचा एकमेकात परिचय यांची आज नितांत गरज आहे.इंग्रजीचा प्रचंड पगडा आज सुशिक्षितांच्यावर  आहे इंग्लंड,अमेरिकेच्या साहित्यिकांची माहिती असते.परंतु स्वत:च्या भाषेतील साहित्याची व शेजारच्या साहित्यिकांची माहिती नसते.शेजारच्या राज्यातील साहित्यिकांची माहिती असणे तर दूरचीच बाब.
                          भारतातील सुशिक्षिताना भारतीय भाषेतील साहित्याची आणि कलांची माहिती करून देणे हे आंतरभारतीचे कार्य आहे.साहित्यात माणसाच्या मनाना एकत्र आणणारी शक्ती असते.साहित्याच्या परिशीलनाने माणसाची मने संकुचित भेदभावाच्या पलीकडे जाऊ शकतात.आंतरभारतीच्या द्वारे साहित्यानिष्ठा व त्याद्वारे मनाची विकसितता या गोष्टी साध्य करता येतील.
                         साने गुरुजी आंतरभारतीची कल्पना नुसती मांडूनच थांबले नाहीत,तर त्यांनी कृतीला सुरुवात केली.आंतरभारती संस्था सुरु करण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईच्या जवळ जोगेश्वरी येथे ९९ वर्षाच्या कराराने जागा घेतली.विविध ठिकाणी प्रवचने देऊन संस्थेसाठी पैसा मिळवायचे ठरविले.दक्षिणेत कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात ते गेले.हुबळी,कारवार,धारवाड या भागात तीन तीन दिवस गीतेवर प्रवचने केली.अहमदाबादेतही गेले.आंतरभारतीच्या ध्यासाने पछाडलेल्या सानेगुरूजीचे त्यानंतर काही काळात निधन झाले.त्यांच्या चाहत्यांनी व स्नेह्यांनी आंतरभारतीची रीतसर स्थापना केली.महाराष्ट्रातील प्रमुख शहरी आंतरभारतीची केंद्रे स्थापन झाली.अहमदाबाद येथे उमाशंकर जोशी या गुजराती साहित्यिकांनी आंतरभारतीचे केंद्र स्थापन केले.भारतीय नागरिकात परस्पर प्रेमभाव निर्माण करणे,एकात्मतेची वाढ करणे,राष्ट्रप्रेम समता,मानवता,जातीधार्मातीत नागरिकता,विज्ञाननिष्ठा यांच्या पायावर एकात्मता निर्माण होता असल्याने या मूल्यांचे संवर्धन करणे,देशातील विविध भाषिक राज्यात्व समुहात सार्वत्रिक संबंध प्रस्थापित करणे,आंतरराष्ट्रीय बंधुभाव निर्माण करणे ही आंतरभारतीची उद्दिष्टे सांगितली गेली.या उद्दिष्टांशी बांधिलकी राखू शकणार्‍या कोणत्याही भारतीयाला तिचे सदस्य होता येते.ही संस्था राजकारणापासून मुक्त असेल असे जाहीर केले गेले.असे असले तरी विविध राजकीय पक्षाकडून राष्ट्रीय एकात्मतेत वाढ करण्यासाठी मदत घेतली जाईल.असेही नमूद केले गेले.
                          गुरुजी आंतरभारती संस्थेचे जे स्वप्न पाहात होते त्यात सर्व भाषातील ग्रंथांचे समृद्ध ग्रंथालय असावे,एक विद्यालय असावे,तेथे शेती व हस्तोद्योग असावेत,सर्व भारतीय भाषा शिकवल्या जाव्यात,वेगवेगळ्या प्रांतातील संस्कृतीचा परिचय एकमेकाना करून दिला जावा.अशी कल्पना होती.भारताला ते विश्वाची प्रतिमूर्ती मानत.भारतात विविध धर्म,वंश,संस्कृती यांच्या समन्वयाचा प्रयोग अनादिकाळापासून चालू आहे.त्यातून निर्माण झालेली संस्कृतीची धारा सर्व माणसांपर्यंत पोचविणारी ती आंतरभारती.आंतरभारती ही भारताच्या आत्म्यातून निघालेली हृदयाची हाक असल्याने तिला भौगोलिक सीमा जखडून ठेवत नाहीत.शब्दाच्या पलीकडील सुक्ष्मातिसुक्ष्म भावही ती व्यक्त करू शकते,दुसर्‍यापर्यंत संक्रमित करू शकते.अशी भावसाक्ष्रता भारताच्या एकात्मतेसाठी गरजेची आहे.ही भावसाक्षरता संक्रमित करण्याची कुवत राहिली नाही तर समाज भावशून्य क्रियाशून्य होतो.त्यामुळे ही भावहीनाता मिटवण्याचे कार्य करणारी ती आंतरभारती.
                      साने गुरुजींच्या स्वप्नातील आंतरभारती जशीच्या तशी उतरवता आली नाही तरी त्यांच्या अनेक धडपडणार्‍या मुलांनी त्या स्वप्नाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला.आपले सर्व आयुष्य पणाला लावले.यदुनाथ थत्ते,चंद्रकांत शहा,वा.य.परीट गुरुजींनी अशा अनेकांचा त्यात महत्वाचा वाटा आहे.यदुनाथ थत्ते याना आंतरभारतीचा प्रतिनिधी म्हणून भारतभर प्रवास करण्याचा रेल्वेचा पास मिळाला होता.त्यांनी भारतभर प्रवास करून भारताच्या  राज्यातील  बहुरंगी संस्कृतीचा,त्यातील जेजे भव्य सुंदर त्याचा वेध घेतला'.साधना' या नियतकालीकाच्या माध्यमातून साने गुरुजीना अपेक्षित भावसाक्षरता लोकांच्या मनामनात पोचविण्याचा प्रयत्न केला.अनेक कार्यकर्ते तयार केले.साधनातून लेखकाना,कार्यकर्त्याना विविध विषयावर लिहिते केले.राजा मंगळवेढेकर यांच्यासारखे साहित्यिक,नरहर कुरुंदकर यांच्या सारखे विचारवंत यातून तयार झाले,आंतरभारतीच्या चळवळीत सामील झाले.चंद्रकांत शहा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गुजरात कर्नाटक अशा विविध प्रांतात न्यायचे. परीट गुरुजी आज ७६ वर्षाचे आहेत(आज तेही हयात नाहीत.)..यदुनाथ थत्ते,चंद्रकांत शहा हे साथीदार गेले.तरी न डगमगता तरुणांच्या उत्साहाने देशभर आंतरभारतीचे कार्य करत फिरत आहेत.देशभरातील शाळातून भारतीय संस्कृतीची,सानेगुरुजींची,आंतरभारतीची आणि आंतरभारतीने स्वीकारलेल्या मुल्यांची महती सांगत आहेत.महिन्यातील फक्त तीन दिवस ते स्वत:च्या घरी जातात.
                          आंतरभारतीतर्फे घेण्यात येणारे इतर कार्यक्रम म्हणजे आंतरभारती भाषा परिचय वर्ग, आंतरभारतीहिंदी मासिक पत्रिका,आंतरभारतीयुवक स्नेहसंमेलन,आंतरभारती प्रकृती परिचय,सागर परिचय,हिमालय परिचय,सायकल यात्रा,कथाकथन,युवक नेतृत्व शिबीर इत्यादी.याशिवाय बालकांसाठी बाल आनंद मेळावा,अभ्यास शिबीर,ओळख स्वत:ची,देशाची,निसर्गाची हे शिबीर.
                           या सर्व शिबिरातून प्रचलित शिक्षणपद्धतीत जखडलेल्या मुलाना मुक्त करणारे,भविष्यातील शांततामय विश्वाचे स्वप्न पहायला लावणारे शिक्षण दिले जाते.त्यांचे भावजीवन,वैचारिक जीवन,सर्जनशीलतेचे पैलू विकसित करण्याला इथे वाव दिला जातो.बालक नवनिर्माणशील,भविष्यातील संतुलित माणूस बनेल असा इथे प्रयत्न केला जातो.धर्म,भाषा,वंश,जन्मस्थान,स्त्री-पुरुष अशा कोणत्याही भेदाला थारा नसणारे निर्मळ वातावरण ठेवण्याचा प्रयत्न असतो.हे वातावरण बालकात समता,बंधुता ही मुल्ये रुजविण्यास सहाय्यभूत ठरते.अशा मेळाव्यातून वेगवेगळ्या प्रांतातील हजारो मुले सहभागी होतात.
                           हे वर्ष सानेगुरुजी जन्म शताब्दी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.पालगड या त्यांच्या जन्मगावी साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात येत आहे.येथे विविध प्रांताची माहिती देणारी दालने असणार आहेत.सुसज्ज ग्रंथालय असेल.या पाच कोटींच्या प्रकल्पासाठी गुरुजींवर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील अनेक चाहते देणग्या देत आहेत.
                        साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न साकार होण्यासाठी हे प्रयत्न अपुरे आहेत.खरे तर आता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातिल क्रांतीचा यासाठी खूप मोठा उपयोग करून घेता येण्याजोगा आहे.पण त्यासाठी अधिक हातांची गरज आहे.गुरुजींनी ही कल्पना मांडली त्यावेळेपेक्षाही याची गरज आज अधिक आहे.कारण देशात आसुरी शक्ती वाढत आहेत.भेदभावाचे,जातीजातीतील वैराचे विष समाजात भिनत आहे.धर्माच्या नावावर लोकाना भडकविले जात आहे.सर्वत्र दहशतवाद,भ्रष्टाचार,काळाबाजार यांचे साम्राज्य आहे.वाढत्या हिंसाचाराने सर्व सामान्यांची सुख- शांती हिरावून घेतलीआहे.राजकीय पक्ष युवकांचा उपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी साधन म्हणून करीत आहेत.बंद, घेराव, तोडफोड यासाठी त्याना हवेत तरुण.हेच तरुणांचे हात विधायक कार्यासाठी लावण्याची भावप्रेरणा देण्याचे कार्य करावयाचे आहे.आंतरभारतीला. त्यांच्या प्रेरणाना, क्षमताना नवा आकार देण्याचे कार्य करावयाचे आहे आंतरभारतीला.जगाचे नेतृत्व करणार्‍या भारताचे विशाल स्वप्न या तरुणांना दाखवायचे आहे.आंतरभारतीचे  हे काम करण्यात ज्याचा पुढाकार असावा असे साने गुरुजीना वाटत होते,त्या व्यासंगी,बुद्धीजीवी लोकांनी उदासीनता झटकून आंतरभारतीचा प्रवाह जोरकस करावयास हवा.
                        ७२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट आपल्या भाषणात म्हणाले होते."साने गुरुजी स्वत:च एक पेटती मशाल होते,आम्ही त्यावर आपल्या पणत्या लाऊन घेतल्या."साने गुरुजींच्या मशालीवर पेटलेल्या काहीच पणत्या शिल्लक आहेत,आणि अंधार इतका आहे की त्याचा उजेड पुरणार नाही.सानेगुरुजीन्सारखी पेटती मशाल जरी मिळाली नाही तरी आपली पणती या पेटत्या पणत्यांनी लाऊन घेऊयात.अशा लाखो पणत्या एकत्र आल्या तर अंध:कार दूर व्हावयास किती उशीर लागणार.साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात हीच त्याना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल!
आधार
१) आचार्य भागवत संकलित वाङमय खंड २संपादक - अच्युत भागवत
२) साधनयदुनाथ थत्ते स्मृतीविशेषांक शनिवार दिनांक १२ सप्टेंबर १९९८.
३)श्री. वा.य. परीट गुरुजींशी चर्चा
                          
.'माध्यम १९९८-९९ अंक-२ 'या टिळक विद्यापिठाच्या प्रकाशनातील सदर लेख छापावयास परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठ व्यवस्थापनाचे आभार.



3 comments:

  1. मस्त ग. आज इथे टाकलास हे फार समोयोचीत झाले :) खूप छान लेख!

    ReplyDelete
  2. अनेकानेक धन्यवाद या लेखाबद्दल....मलाही एखादी दक्षिण भारतीय भाषा शिकायची आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हर्षद धन्यवाद प्रतिसादाबद्दल प्रभातरोडच्या कर्नाटक हायस्कूलमध्ये कानडीचे वर्ग चालतात.मलाही इच्छा असून अजून जमल नाही.

      Delete